Tuesday 2 July 2024

आजीची गोष्ट ०२

(भाग ०१)

०२

आजीचं लग्न आयनीतच झालं. घरापुढल्या मांडवात.

लग्नाला किती लोक असतीलतिच्या मोठ्या दोन बहिणींची लग्नं तोवर झालीच असतील. पण मोठी सिंधू तिच्या घरची तशी परवडच होती. त्याबद्दल पुढे कधीतरी. ताईचं घरचं बरं असणार. ती आणि तिचा नवरा असे आले असतील का लग्नालाबहुधा असतील. पाठची वत्सूशिरू आणि बाळू हे दोन भाऊइतकी तरी भावंडं असतील. वडील अर्थात असतील. कनवटीला सुपारी लावून त्यांनी ग्रहमक ठेवलं असेलकसं करतात कन्यादान विधुर पुरुषकाय माहीत. आणि अर्थात आजी. पण ती बोडकी. म्हणजे घरात मागीलदारी कुठेतरी तोंड लपवून खपणारी.

नवर्‍यामुलाकडून तीन लोक नक्की असतील. खुद्द नवरा मुलगा. नवर्‍याची थोरली बहीण. राधा. आणि तिचे यजमान अण्णा. त्यांनीच पुढाकार घेऊन मेव्हण्याचं लग्नकर्तव्य पार पाडायचं मनावर घेतलेलं. नवर्‍याला अजून एक थोरली बहीण कृष्णा नावाची. तिला कुशी म्हणत. तिचं सासर रत्नागिरीत. तिचा नवरा ऐन पंचविशीत वारलेला. त्यामुळे तीही लग्नाला येण्याचा प्रश्नच नाही. पण ती विधवा होईस्तोवर काळ बदललेला असावा किंवा रत्नागिरी तरी थोडं पुढारलेलं असावं. कारण ती बोडकी झाली नाही. त्यामागची गोष्ट तिला विचारायला हवी होती. पण ते राहिलंच. तर - तिनं रत्नागिरीतलं आपलं घर नीट राखलंआला-गेला-पै-पाहुणा-नातंगोतं सांभाळलं. तिचीही गोष्ट चटका लावणारीच. पण तीही पुढे कधीतरी. ती काही लग्नाला आलेली नसणार. आणखी एक बहीण होती, तिचं सासर खेडमधलंच. घर चांगलं शेतीवाडी असलेलं, पण नवरा बशा. तिचीही गोष्ट... असो. तर ती कदाचित असेल. पण थोडक्यात, वर्‍हाड एकूण तीन-चार जणांचंच.

नवरा मुलगा गणेश. त्याचं मूळ गाव पालगड. त्यांच्या वडलांची पालगडात सावकारी होती. हे मी प्रथम ऐकलंतोवर मी ‘श्यामची आई’ वाचलं होतं. श्यामच्या आईचा अपमान करणारा तो हरामखोर वसुली कारकून आजोबांच्या वडलांच्या पदरचा कारकून तर नसेलया शंकेनं मला कितीतरी दिवस अतिशय अतिशय अपराधी वाटत राहिल्याचं आठवतं. पुढे कधीतरी त्या अपराधाचा डंख पुसट होत गेला. असो. तर गणेशचे वडील वारले तेव्हा तो अडीच-तीन वर्षांचा होता. अलीकडच्या काळातही कर्तृत्ववान नवर्‍याची बायको विधवा झाली आणि तिला नवर्‍याच्या पैशाअडक्याची काडीमात्र माहिती नव्हती, त्यामुळे परवड झाली... अशा कहाण्या ऐकू येतात. तेव्हा काय परिस्थिती असेलत्याची निव्वळ कल्पनाच करता येते. त्या परिस्थितीत त्याच्या आईला काय राखायचं सुचलं असेलसोन्याच्या पुतळ्या भरभरून गडवे घरात असतअसं नंतर कधीतरी आजोबा सांगायचेतेव्हा आम्ही आ वासत असू. आजोबांच्या आईचं कौतुक असं की नवरा वारल्यावर एकत्र कुटुंबात मुलांच्या भविष्याची धूळदाण होऊ नये, म्हणून तिला  त्यातला एक गडवा आणि थोडी चांदी नणंदेकडे ठेवायला द्यायचं सुचलं. थोडं सोनं तिनं एका जावयाकडेही दिलं होतं. पण... एनिवे! आजोबांचे आईवडील सहा महिन्यांच्या अंतरानं पाठोपाठ वारले. कसल्याश्या साथीत एका वर्षभराच्या अवधीत घरातली एकूण आठ माणसं मरून गेली. सोन्याच्या कंबरपट्ट्यासकट दागिने ल्यायलेल्या दहा सासुरवाशिणी घरात नांदवणारं ते घर. ब्रिटिश सरकारकडून उत्तम शेतकरीअसा किताब मिळवणारे आजोबांचे सावकार वडील. दारी हौसेनं त्यांनी बाळगलेला छकडा. सगळं उण्यापुर्‍या वर्षभरात होत्याचं नव्हतं झालं.

पुढे लग्नानंतर आजीनं हौसेनं माहिती काढून पालगडला उत्सवाला जायला सुरुवात करेपर्यंत आजोबांच्या आयुष्यातलं पालगड पर्व संपलं. 

त्या सावकारी घरातलं एक नक्षीदार लाकडी कपाट आणि एक पैशांची लाकडी पेटी एवढंच आजीच्या संसारात आलं. अजूनही ते मामाकडे आहे. आता त्या वस्तूंची सगळी रया अर्थात गेली आहे. कंबरभर उंचीची जड लाकडी पेटी, आत मखमलीनं मढवलेले बरेच कप्पे-चोरकप्पे, खण असलेली. ती उघडताना कुलपाच्या सात वळशांनिशी सात घंटा होत, म्हणे. आता घंटा, आतली मखमल, पेटी उघडल्यावर दरवळणारा अत्तराचा वासबीस... जाऊन नुसतीच पेटी उरली आहे. तरी कपाटाच्या दारांवरच्या कोरीव कामातून त्याच्या सरलेल्या वैभवाच्या खुणा दिसतात. त्या वस्तू वगळता आजोबांना घरातलं काहीच लाभलं नाही.

आजोबांची रवानगी कुठल्याशा सावत्र काकाच्या संसारात झाली. "माझं अंथरूण बहुतेकदा ओलं होई, मग ती काकू जेवायला देत नसे, ‘नखं टुपवून’ गाल ओढायची," अशीही एक आठवण आजोबा सांगायचे. मग कधी या नातेवाइकाकडे, कधी त्या. आईवडलांच्या आठवणीच नाहीत. त्यांना तर आईचं माहेर कुठलं, गाव कोण, आडनाव काय... हेही माहीत नाही, असं ते सांगायचे. दोनपाच वर्षं अशीच गेल्यावर त्यांची एक बालविधवा मावशी त्यांना उचलून पुण्याला घेऊन गेली. तिचीही गोष्टच. तिचं तालेवार सासर केळशीला. पण बालविधवा झालेली ती मुलगी त्या घरात सत्तेची मोलकरीणच असणार. ती चक्क उठून पुण्याला गेली. लोकांच्या घरी पोळ्या लाटून ती पोट भरत असे, पण तिनं स्वतंत्र बिर्‍हाड केलं होतं. पुढे होईनासं झाल्यावर तिचा पुतण्या तिला पुन्हा घरी घेऊन गेला. तर - तिनं आजोबांना उचलून आपल्याबरोबर नेलं. माधुकरी मागायची, चार घरी पूजा सांगायची, शाळा शिकायची – असं तिनं त्यांना सातवीपर्यंत शिकवलं. ती मोठी शिस्तीची होती, म्हणे. मोरीत पाण्याची बादली भरलेली हवी. तितकंच नव्हे, पाण्याचा गडवाही त्याशेजारी नीट भरून-झाकूनच ठेवलेला असायला हवा... अशी तिची नेटकी राहणी. आजोबांची सातवी झाल्यावर तिच्याकडचं राहणंही संपलं. पुन्हा परवड. कुठे कधी दुकानाच्या बाहेरच्या फळ्यांवर झोप. पार्ल्याच्या बिस्किटाच्या फॅक्टरीत नोकरी कर... असे तरुणपणापर्यंतचे दिवस. पण त्याही दिवसांची आठवण आजोबा मजेनंच सांगायचे. “आम्ही खिशातून हिरव्या मिरच्या न्यायचो. बिस्किटं खायची आणि मिरचीचा चावा घ्यायचापुन्हा बिस्किटं. की पाणी. पोटभर!असं ते सांगायचेतेव्हा त्यांच्या नजरेत आत्मकरुणेचा लवलेशही नसायचा. निव्वळ स्वतः केलेल्या ट्रिकबद्दल लुकलुकती मजा असायची! हे पुढे त्यांच्या सगळ्या मुलानातवंडांतही आलं. पडलं तरी नाक वर! एनिवे!

राधा नि अण्णांना स्थैर्य आल्यावर त्यांनी गणेशच्या आयुष्याची जबाबदारी घेतली. अण्णा धोरणी आणि जबाबदार गृहस्थ असणार. आजोबांच्या आईनं जावयाकडे ठेवलेल्या सोन्याबाबत जावयानं हात वर केले. पण नणंदेकडे ठेवलेलं सोनं होतं. ते वापरून आजोबांच्या आत्तेभावाला गणेशचं लग्न थाटात करून द्यायचं होतं. पण आण्णांनी ते थोपवलं. 'त्याच्या संसाराला कामी येतील' म्हणून ते पैसे राखून ठेवले. अण्णांचं घर खेडजवळच्या तळे-मांडवे गावात होतं. होयहेही जोडगावच. स्वत अण्णा खेडात राहायचे. कधीतरी  मेव्हणा घरी आला असता, त्याला त्यांनी विचारलं, “ना घर ना दार. कशाला पुण्यामुंबईत हाल काढतोस? त्यापेक्षा इथे राहा.” आजोबा राहिले. तिथल्या अण्णांच्या दुकानात वर्षाला पाचशे रुपये अशा बोलीवर नोकरी केली.

त्यांचं लग्न काढल्यावर तळ्यातल्या त्या घराच्या मागच्या पडवीत अण्णांनी त्यांना बिर्‍हाड थाटून दिलं. पडवीत एका अंगाला एक भाडेकरू होताच. दुसर्‍या अंगाला मेव्हण्याचं बिर्‍हाड. मधलं घर अण्णांसाठी राखलेलं. अण्णांची तब्बेत तशी नाजूकच होती. मग आजोबांचे राखलेले पैसे वापरून त्यांनी आजोबांना दुकानात सात आणे हिस्सा दिला, नऊ आणे हिस्सा भाडेकरूला विकला. दुकानाची जागा आणि त्यामुळे वर्षाकाठी रॉयल्टी आण्णांची. ते सगळ्या व्यवहारावर लक्ष ठेवून असत. 

आजी लग्न होऊन आली ती त्या घरात. 

मला ते घर आठवतं. माजघरातून खाली पडवीत उतरलं की डावीकडे आजीचं बिर्‍हाड. मध्ये लाकडी मांडणीचं कपाट ठेवून त्या अर्ध्या पडवीचे दोन भाग केलेले. शिरल्या शिरल्या बसायची खोलीपुढे आत चूल आणि मोरी. उजवीकडे तसंच शेजार्‍यांचं नलूआजी आणि भाऊआजोबांचं घर. त्यांचं घर पूर्वी कसं होतं ठाऊक नाहीमला आठवतं तेव्हापासून त्या पडवीला पोटपडवी काढून नलूआजीचं स्वैपाकघर केलेलं होतं. दोन्ही घरांच्या मधून मागीलदारी उतरलं की न्हाणीतिच्यापुढे मोठी दगडी द्रोणतसंच खाली उतरत गेलं की चिकूचं झाड आणि मग विहीर. नलूआजीच्या घराच्या उजवीकडून खाली उतरलंतर तिकडेही अजून एक पोटपडवी आणि पुढे त्यांचं न्हाणीघर. माजघरत्यातली बाळंतिणीची खोली वा काळोखाची खोलीजुनं आणि आता वापरात नसलेलं स्वैपाकघर हे सगळं मधलं घर दोन्ही घरं मिळून वापरत. पुढीलदारी ओटीअर्ध्या पडवीत दुकानअर्ध्यात दुकानाचा माल.  

आजोबा तेव्हा रोज अर्धा कप ‘घेत’ असत. कुठली असेलकुठून मिळवत असतीलगावातल्या कुणा मिल्ट्रीवाल्याकडून घेत असतील? काय माहीत! आजोबांबरोबर ही माहितीही गंगार्पण. पुष्कळ मोठं होईपर्यंत याचा पत्ता आईलाही नव्हताइतकं हे गुपचूप प्रकरण असायचं. पण या सवयीपायी नवरा कामातून गेला तरही भीती आजीच्या पोटात असणार. त्यामुळे तिला भागीदारी आणि अण्णांचा आजोबांना असलेला धाक हे दोन्ही मानवलं. तिला स्वतःला अंकगणित अतिशय आवडे. ती लक्ष घालून दुकानचे हिशेब तपासत असे.

त्या घरात आजीनं तिचा संसार तर मांडलाचपण तिची सगळी हौसमौजकर्तृत्वआवडीनिवडी… आणि मुख्य म्हणजे माणसं जोडून घेणारा तिचा स्वभाव या सगळ्याला तिथे धुमारे फुटत गेले.  

क्रमशः

No comments:

Post a Comment