Saturday 29 December 2012

टू मिसेस वाल्या कोळी


सगळ्यांच्या पोटी
एकटं असायची भीती. 
नातेवाईक धरून ठेवणं. 
माणसं-बिणसं जोडणं-बिडणं. 
लोकांना रुचेल तसं(च) वागणं. 
सदसद्विवेकाला न रुचेल असं काही घडलं, 
तरी सोबतीच्या धाकानं काणाडोळा करणं.
गोतावळ्यात रुतून बसणं.
वेगळं होता येत नाही म्हटल्यावर,
गोतावळा करेल त्याचं समर्थन करणं.

नाहीतर काय?
आपल्याच नाकात आपलेच पाय.
अपराधभावातून सुटका नाही.
समर्थन करताना 
दुसरा काय नि स्वत: काय,
समजुतीला पारावार नाही. 
जोरदार आणि समजूतदार समर्थन. 
'सारं काही सापेक्ष' असल्याचं स्पष्टीकरण. 
सगळंच सगळ्यांना रुचतं.
स्वत:सकट सार्‍यांना 
जेवणबिवण छान पचतं.

हे असं आहे खरं.
'असं का आहे?' विरून जातं. 
'असंच असतं'ची आळवणी,
मागून 'असंच चालणार' येतं.
विरोध संपला. 
ठिणगी संपली. 
संघर्ष संपला. 
चेतना संपली. 
सारं कसं शांत शांत.
टोटल बोअरिंग. 
एकदम निवांत.
कुणी कुणावर हल्लाबिल्ला केला
तर थोडी सनसनाटी.
स्वसंरक्षणासाठी
एखादी काठी.
सगळ्यांच्याच हाती.
एकटं पडायची भीती,
सगळ्यांच्याच पोटी.

यावर उपाय काय करावा?
एकान्ताचा वसा मनी धरावा.
खुशाल उतावे, खुशाल मातावे
तत्त्वाबित्त्वासाठी खुश्शाल भांडावे.
काही तोडून-मोडून घ्यावे,
काही सोबत जोडून घ्यावे.
काही वेचून फेकून द्यावे.
बरेच काही पोटी धरावे.
माणसे येतील, माणसे जातील,
आपण सुखें एकटे उरावे.
मिळतील थोडे सखे-सोयरे.
भांडा-तंटायला 
एकटे असायला,
न भिणारे.

जुन्या कविता



नव्यानं सुरू झालेल्या दिवसांच्या छाताडावर गुडघे रोवून.
नव्या आयुष्याच्या झिंज्या मुठीत पकडून.
ओळीत लावलेल्या दिनक्रमाची रासवटपणे कॉलर पकडून.
अनोळखी आविर्भावाला एक खणखणीत मुस्काटात खेचून.
फिरवलेल्या पाठीला एक आईवरची शिवी बिनदिक्कत हासडून.
सगळ्या सगळ्या बेईमानीवर थुंकून,
तुझ्या पौरुषावर उमटलेली माझी लाखबंद मोहर तुझ्याकडे परत मागितली -
तर तू कसा दिवाळखोरपणे रस्त्यावर येशील नाही?
जखमी झालेल्या तुला कुशीत घेऊन तुझ्या ओठांवर ओठ टेकू शकेन मी फक्त.
मग तरी उतरेल तुझ्या ओठांवर माझी ओळख?
सांग ना, मित्रा.

***

मातीत बी रुजतं तेव्हा माती असते का सजग?
की सर्जनाच्या आनंदात भिजत असते ती देहामनाच्या पार?
म्हणूनच,
म्हणूनच बीज असं रुजतं तिच्या गर्भात?
अशाच कुठल्यातरी पावसात.
मीही होते देहामनासकटच्या आनंदात अपरंपार.
तेव्हाच रुजत गेलास तू माझ्यात.
असण्या-नसण्याचं भान आलं, तोवर ओटीपोट टपोरलं होतं माझं.
पाहता पाहता आकारत गेलास माझं सर्वस्व व्यापत
आणि मग ते भीषण द्वंद्वही गेलं माझ्यात साकारत.

रुजलेल्या बीजानं अंकुरणं हा त्याचा देहधर्मच.
पण आपण मिळून ठेचून काढायचा ठरवला हा अंकुर.
तेव्हाच लिहिलं गेलं असेल आपलंही भवितव्य त्यासोबत?
ठरवून आयुष्याकडं निकरानं पाठ फिरवावी
तसे माघारी वळलो आपण.
आणि जगण्याची ही लसलसती इच्छा
थोपवून धरली आतल्याआत.
सोपं नाही,
नव्हतंच.
जगण्याचे अंकुर इतक्या सहजासहजी मरत नसतात,
कळायचं होतं आपल्याला.

आपल्याच असण्याच्या भिंतींना वेढत चिरफाळत आत वळलेला तो अंकुर.
आता गर्भपातही संभवत नाही मित्रा.
आणि जन्मही.

***

किती कविता तुझ्या हातात अल्लाद ठेवत गेले
हात पोळले तरी -
आता समजत नाही.
तू कधी स्पर्श तरी केलास का रे त्यांना?
की ती नुसतीच एखादी फॉरवर्डेड मेल होती तुझ्यालेखी?

कुणीतरी कुठेतरी लिहिलेली एक कविता.
त्यात रुजलेले माझे श्वास.
माझे स्पर्श.
दुसर्‍या कुणाची कविता आपल्या आत अशी हिरवाळते,
तेव्हा आपली होते ना ती?

तीच तर तुला पाठवली अनेक वार.
कधी संपृक्त बी.
कधी एखाद्या सुगंधी खोडाचा तुकडा.
कधी नव्हाळलेली ओलसर पानं.
कधी फुटावलेलं एखादं वयोवृद्ध मूळ.
फळांचा ऋतू आपल्यात कधी आलाच नाही,
एकदम मान्य.
पण,
फुलांचा तरी आला का रे?

आता माझी बोटं हिरवी नाहीत.
फक्त पोळल्याच्या काही खुणा.
आणि आपल्या कविता उगवल्यात का कुठेतरी,
की निर्वंश झाला आहे आपल्या जातीचा,
आणि एखाच्या नामशेष होणार्‍या प्रजातीच्या शेवटच्या स्पेसिमेनसारखे
नाहीसे व्हायचे आहे इथून निमूट?
असल्या प्रश्नांनी चिन्हांकित नजर.

तुझ्या बागेत कुठली कुठली झाडं आहेत, बाय दी वे?

***

Thursday 8 November 2012

रेषेवरची अक्षरे २०१२

नमस्कार!

’रेषेवरची अक्षरे’चा पाचवा अंक सादर करताना फार आनंद होतो आहे.

मराठीतल्या निवडक ब्लॉगनोंदी प्रकाशित करण्याचा हा उपक्रम राबवताना आम्ही बेहद्द मजा केली. एकमेकांना नवनवीन ब्लॉगांबद्दल सांगितलं. नोंदी निवडताना हमरीतुमरीवर येऊन भांडलो. कंटाळा येईस्तोवर चर्चिलपणा केला. नवनवीन प्रयोग करून पाहिले. काही जमले, काही फसले. पण सगळ्यांत जास्त महत्त्वाचं काय असेल, तर या माध्यमातून लिहिलं जाणार ललित आणि तरुण मराठी मनापासून एन्जॉय केलं. यंदाच्या अंकावर काम करताना इथे साचत गेलेला निरुत्साह आम्हांलाही स्पर्शून गेला, ’या माध्यमाचं काय होणार’ असे तद्दन संमेलनीय गळे आम्हीही काढले नि तरी ’आपण अंक काढायचा, काय व्हायचं ते होवो’ या निष्कर्षावर येऊन आपल्या असुधारणीयपणाबद्दल एकमेकांना टाळ्याही दिल्या. तरीही मजा आलीच! अंक वाचताना मराठी ब्लॉगांच्या भवितव्याची ही चिंता तुम्हांलाही थोडी सतावो आणि तरी तुम्हांला अंक वाचताना भरपूर मजा येवो, हीच शुभेच्छा!

काहीही चुका मिळाल्या, सुधारणा सुचवाव्याश्या वाटल्या, शिव्या-ओव्या द्याव्या-गाव्याश्या वाटल्या, तरी निःसंकोच कळवा!

दिवाळी तुम्हां सर्वांना आनंदाची आणि नेहमीप्रमाणेच सकस साहित्याची जावो. भेटत राहू. :)

Friday 19 October 2012

खेळ


सध्या मी रोज एक नवे झाड लावून संध्याकाळी ते मुळापासून तोडण्याचा खेळ खेळते.

कसे आहे,
भवतालात झाडे असण्याची आपली खोड जुनी.
आपले म्हणावे - निदान म्हणावे - असे एक तरी झाड परसात असावे लागते.

पण
आपल्या दारात वाढून शेजारी फुले ढाळत,
 आपल्याला बिनदिक्कत हिरमुसले करण्याची झाडांची खोडही जुनीच.
तेही ठीक.
दिवसातले काही प्रहर तरीसावली तरी आपली म्हणावी...
बाकी फुलांची आणि पावसाची शाश्वती कुणी कुणाला द्यावी?

पण आपल्यासाठी बहरून आलेले एखादे झाड 
हे असे पाहता पाहता वठत जाते आपल्यासाठी
नि आरडून वा मुकाट - 
पाहत जाण्याखेरीज हाती काही उरत नाही
अशाही वेळा येतात.

तेव्हा खरे खरे आणि कायमचे दुखते.

झाड लावून आपण पाठ फिरवून हसत निघून जावेइतकीही उमेद उरत नाही मग.
रोज नवे झाड लावून संध्याकाळी वैराण होण्यातला सुटवंगपणाच बरा वाटू लागतो.

अर्थात
झाडांच्या मर्जीचे काय -
असा अवसानघातकी विचार बाजूला सारण्याइतके बेगुमान व्हावे लागते.
पण ते एकदा जमले की,
विश्वास ठेवा अगर ठेवू नकात्यासारखी दुसरी मजा नाही!

हांपहाटे अगदी उजाड उजाड वाटते.
आणि संध्याकाळ ओलांडून रात्रीच्या प्रहरात पाऊल टाकताना पाऽर पोरके.
पण तितके तर...
तितके चालायचेचनाही का!

झाडांनाही पोरके वाटतेखरे.
पण झाडांना निर्दयही होता येते,
हेही एकदाच समजून घ्यावे,
कारण आपल्यालाही कुणाकुणासाठी झाड व्हावे लागते!

तर -
हल्ली मी रोज एक नवे झाड लावून संध्याकाळी ते मुळापासून तोडण्याचा खेळ खेळते!

Sunday 24 June 2012

खपाऊ पण पकाऊ पुस्तकं


संवेदचा खो बघून खरंच त्यानं म्हटल्यासारखी वॉशिंग्टनची कुर्‍हाड हाती आल्यासारखे हात शिवशिवायला लागले. कुणाला झोडू नि कुणाला नको, असं होऊन गेलं.

मग लक्षात आलं, एखाद्या लेखकाला अशा प्रकारे लक्ष्य करणं सोपं आहे. एका बाजूला ग्रेस, जी. ए. वा तेंडुलकर. एका बाजूला व.पु., संदीप खरे, मीना प्रभू, प्रवीण दवणे, हल्ली अनिल अवचट आणि चक्क पु.ल.सुद्धा. या लेखकांची वेगवेगळ्या कारणांनी वारंवार रेवडी उडवली जाते. कधी दुर्बोधपणाच्या आरोपाखाली. कधी तथाकथित ’बोल्ड’ वा ’अश्लील’ असण्याबद्दल. कधी साहित्यबाह्य कारणं असतात म्हणून, कधी तसं करणं उच्चभ्रू असतं म्हणून, कधी त्यांची लोकप्रियता आणि लिहिण्याचा दर्जा (अर्थात सापेक्ष) यांचं प्रमाण व्यस्त असतं म्हणून, कधी निव्वळ तशी फॅशन असते म्हणून. पण या सगळ्या लेखकांनी कधी ना कधीतरी गाजण्याइतकं चांगलं, दखल घेण्याजोगं लिहिलं आहे. एका पुस्तकाच्या गाजण्यावर नंतर सगळी कारकीर्द उभारली असेलही कुणी कुणी, पण त्यांच्या त्यांच्या काळाच्या चौकटीत त्यांच्या पुस्तकांच्या गाजण्याला सबळ कारणं आहेत. ती दुर्लक्षून पुस्तकांबद्दल न बोलता लेखकांच्या शैलीवर, विषयांवर, लोकप्रियतेवर टीकेची झोड उठवणं, कसलीच जबाबदारी न घेता - विखारी टवाळकीचा / सर्वसामान्य वाचकाच्या बाळबोध अभिरुचीचा / सिनिक जाणकारीचा आसरा घेत बोलणं सोपं आहे.

पण इथे संवेदनं तसला सोपा रस्ता ठेवलेला नाही. अमुक एक पुस्तक, ते का गाजलं नि त्याची तितकी लायकी नव्हती असं मला का वाटतंय असं रोखठोक बोलावं लागेल हे लक्षात आलं, तेव्हा कुर्‍हाडीची धार गेल्यासारखी वाटली. पुस्तक निवडताना तर फारच पंचाईत. इतक्यात गाजलेलं, पण गाजण्याची लायकी नसलेलं पुस्तक कुठलं तेच मुळी मला ठरवता येईना. भाषेच्या नावानं दरसाल गळे काढणारे आपण लोक, आपल्या भाषेत पुरेशी पुस्तकं गाजतात तरी का, असा प्रश्न पडला. ’हिंदू, हिंदू... हिंदू’ अशी आसमंतातली कुजबुज ऐकली मी, नाही असं नाही. पण निदान तुकड्या-तुकड्यांत तरी मला ’हिंदू’ आवडली होती. तसंच ’नातिचरामि’चं. शिवाय ’हिंदू’ आणि ’नातिचरामि’ला झोडण्याची सध्या फॅशन असली, तरी काही वर्षांचा काळ मधे गेल्यानंतरच त्यांचं मूल्यमापन करता येईल असंही मला वाटतं.

अलिप्त अंतर बहाल करण्याइतकं जुनं, खूप गाजलेलं नि मला तितकंसं न आवडणारं - अशा पुस्तकाचा शोध घेताना ’मृत्युंजय’ आठवलं. सुरुवातीलाच कबूल करते - मी लहानपणापासून ’मृत्युंजय’ अतिशय प्रेमानं, अनेक पारायणं करत वाचलं आहे. निदान काही वर्षं तरी त्या पुस्तकाची शिडी करून इतर पुस्तकांपर्यंत - लेखकांपर्यंत पोचले आहे. त्याबद्दल या खोमध्ये लिहिणं काहीसं कृतघ्नपणाचं ठरेल, हेही मला कळतं आहे. पण आता ते इतकं गाजण्याइतकं थोर वाटत नाही हेही खरंच आहे.

का बरं?

माझी चांगल्या गोष्टीची व्याख्या ही अशी - ज्यात गोष्टीचा तंबू एकखांबी नसतो. एकापेक्षा जास्त पात्रांनी मिळून बनलेली ती गोष्ट असते. पात्रं हाडामांसाची, चुका करणारी-शिकणारी, वाढणारी, घडणारी-मोडणारी असतात. काळी किंवा पांढरी नसून राखाडी असतात. गोष्टीला खिळवून ठेवणारे चढ-उतार असतात. नि मुख्य म्हणजे वाढणार्‍या आपल्यासोबत गोष्ट कालबाह्य होत जात नाही. तिचं अपील आपल्याकरता टिकून राहतं.

या व्याख्येत ’मृत्युंजय’ बसते का? नाही बसत.

एक तर ती पुरी गोष्ट नाही. कुणीतरी आधीच सांगितलेल्या गोष्टीचा आपल्या सोयीनं निवडून घेतलेला नि आपल्या सोयीनं भर घालून वा कातरी लावून मांडलेला एक तुकडा आहे. अशी सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन सांगितलेल्या गोष्टी मुळातूनच दुय्यम असतात (आणि त्यांना संदर्भमूल्य नसतं) हे आपण मान्य केलं पाहिजे. तेही एक वेळ ठीक. त्यातून काही नवे अन्वयार्थ लागत असतील तर. इथे महाभारताचा कोणता नवीन पैलू सामोरा येतो? कुठलाच नाही. फक्त त्यातल्या एका पात्राला कुठल्याही तोलाचं भान न बाळगता एखाद्या सुपरहीरोसारखं अपरिमित मोठं केलं जातं. त्यासाठी सावंत वरवर अतीव आकर्षक भासेलशी संस्कृतप्रचुर विशेषणांनी लगडलेली भरजरी, अलंकृत भाषा वापरतात. कर्णाच्या आजूबाजूची पात्रं फिक्या-मचूळ रंगांत रंगवतात. इतकी, की कादंबरी वाचल्यावर त्यातलं फक्त कर्णाचं पात्र तेवढं आपल्या डोक्यात स्पष्ट ठसा उमटवून उरतं. थोडा-फार कृष्ण. बस. बाकी काहीही छाप पाडून जात नाही. ही काही चांगल्या कादंबरीची खूण नव्हे. याला फार तर एखादं गोडगोड चरित्र किंवा गौरवग्रंथ म्हणता येईल.

कदाचित मी फारच जास्त कडक निकष लावून पाहते आहे. एक ’एकदा वाचनीय पुस्तक’ या निकषावर आजही ’मृत्युंजय’ पास होईल. पण मग तिला मिळालेला ’मूर्तिदेवी पुरस्कार’? भारतातल्या नि भारताबाहेरच्याही भाषांमध्ये तिची झालेली भाषांतरं? तिच्या दोन आकडी आवृत्त्या? कुणीही मराठी कादंबर्‍यांचा विषय काढला की अपरिहार्यपणे तिचं घेतलं जाणारं नाव? ती वाचलेली नसली तर अपुरं समजलं जाणारं तुमचं वाचन? हे सगळं मिळण्याइतकी तोलामोलाची आहे ती?

सावंत, माफ करा, पण ’मॄत्युंजय’ इतकी मोठी नाही. तरी तिला मिळालेल्या इतक्या अफाट लोकप्रियतेमुळे तिच्यानंतर अशा प्रकारच्या चरित्रात्मक कादंबर्‍यांचं पेवच मराठीत फुटलं. इतिहासाला वा पुराणातली कोणतीही एक व्यक्तिरेखा उचलावी, तिला अपरिमित मोठं-भव्य-दिव्य-लार्जर दॅन लाईफ रंगवावं, तिच्या आजूबाजूला यथाशक्ती प्रेमकथा / युद्धकथा / राजनीतीकथा रचावी आणि एक सो-कॉल्ड यशस्वी कादंबरी छापावी, असं एक समीकरणच होऊन बसलं, हे ’मृत्युंजय’नं केलेलं आपलं नुकसान. तशा पुस्तकांची यादी करायला बसलं, तर मराठी वाचकांची कितीतरी ’लाडकी’ नावं बाहेर येतील...

पण आपला खो एकाच पुस्तकापुरता मर्यादित आहे. ’मृत्युंजय’वर माझ्यापुरता खिळा ठोकून नि कुर्‍हाड मिंट,  राज, गायत्री, दुरित आणि एन्काउंटर्स विथ रिऍलिटी यांच्याकडे सोपवत तो पुरा करतेय. संवेदचा खो तर घ्याच, शिवाय माझी ही खालची पुरवणीही जरूर घ्या.

माझी पुरवणी:

’खपाऊ पण पकाऊ पुस्तकं’ हा संवेदचा विषय वाचताक्षणी माझ्या डोक्यात ताबडतोब त्याला जुळा असलेला विषय आला होता. ’उत्तम पण उपेक्षित पुस्तकं’.

काही पुस्तकांना ती तितकी तालेवार असूनही मिळायचं तितकं श्रेय कधीच मिळत नाही. ती कायम उपेक्षित राहतात. नंदा खरे यांचं ’अंताजीची बखर’ हे ऐतिहासिक कादंबरीचा घाट असलेलं पुस्तक मी या खणात टाकीन. मराठी ऐतिहासिक कादंबरीतली कायमची-भव्य-दिव्य-जिरेटोपी व्यक्तिमत्त्व बाजूला सारून एका क्षुल्लक मराठी हेराच्या नजरेतून ही कादंबरी मराठी रियासतीतल्या एका मोठ्या कालखंडाकडे डोळसपणे (आणि तिरकसपणे) बघते. ती शब्दबंबाळ नाही. तिला उपरोधाचं नि पक्षी विनोदाचंही अजिबात वावडं नाही. त्यातली अस्सल रांगडी नि मिश्कील मराठी भाषा आवर्जून वाचावी अशीच आहे.

पण तिची म्हणावी तशी दखल घेतलेली ऐकिवात नाही. बर्‍यापैकी जुनी असूनही ती मी अगदी अलीकडे वाचली आणि हरखून गेले.

बहुतेक मराठी वाचकाला भव्य नसलेल्या इतिहासाचं वावडं असावं!

Friday 22 June 2012

गोष्ट


एखादी गोष्ट आपल्याआत रुजवत जाताना कसं वाटतं ठाऊक आहे तुला?

मोठ्या काव्यमय कल्पना असतात लोकांच्या गोष्टीच्या जन्माबद्दल.
राजकन्या-गुलबकावली-परी-राक्षस-हिमगौरी-बुटके-उडते गालिचे... आणि तत्सम.
पण गोष्ट दिसते तशी असत नाही.

अरब आणि उंटाची गोष्ट माहीत आहे तुला?
त्या गोष्टीतल्या उंटासारखीच असते गोष्ट.
निर्दयपणे हात-पाय पसरत आपल्याला धीम्या-ठाम वेगानं बेघर करत जाणारी.
किंवा निर्लज्जपणे सूर्यासोबत पाठ फिरवत बेगुमानपणे जगत जाणार्‍या सूर्यफुलासारखी.

आजूबाजूला असणारा जिवंतपणाचा कण न् कण शोषून घेत रसरसून वाढत राहते ती आपल्या आत.
आपल्या शांततेवर पोसत आपलाच प्रकाश झाकोळून टाकत राहते,
जोवर आपल्या खिडकीत हिरव्यागर्द-काळोख्या-कातर फांद्यांच्या गच्च पसार्‍याखेरीज दुसरं काहीच उरत नाही.

तिला सोबत घेऊन फिरताना क्षणाक्षणाला कसोटी लागत राहते आपली.
आपल्या समजुती, दिलासे आणि हुंकार नक्की कुणाकरता आहेत?
बाहेरच्या या अफाट भीषण सुंदर जगात शूरपणानं वावरणार्‍या आपल्यासाठी,
की अंतरंग व्यापत जाणार्‍या या तितक्याच सुंदर भीषण निर्दय अस्तित्वासाठी?

या युद्धाच्या जखमा वरकरणी सहजपणे वागवत, दर क्षणाला अधिकाधिक मोडत
जगत राहतो आपण गोष्टीनं बाहेर येण्याचं ठरवेपर्यंत.
एखाद्या भुकेल्या अनुभवी श्वापदासारखे, वाट पाहत.

ती बाहेर येते.
आणि आपण अंतर्बाह्य रिकामे.
त्या क्षणी नेमकं काय वाटतं ते कळून घेण्याचंही भान उरत नाही.
नुसता रिकामा आर्त शिणवटा.

ठाऊक आहे तुला, गोष्ट आपल्या आत रुजवत जाताना कसं वाटतं ते?

Tuesday 1 May 2012

समोर हिरवंगार जंगल


कोण चूक कोण बरोबर काय न्याय काय अन्याय कसले हिशेब कसले जाब कसले जबाब -
दे सगळे हलकेच सोडून
नि पाहा समोर पसरलाय अथांग वैराण प्रदेश दगडधोंड्यांचा नि उन्हातान्हाचा नि सपाट उजाड माळरानांचा नि लालबुंद सोनेरी सूर्यास्तांचा आपल्यासाठी - एकेकट्या असलेल्या आपल्यासाठी.
छातीत दाटून गच्च झालेला तो भीतीचा नि दुःखाचा हुंदका हळूहळू अगदी हळूहळू सैल करत ने,
पाहा, माझ्या स्पर्शातून कळेल तुझ्या आतल्या सगळ्या सगळ्या भित्यांना आणि शंकांना आणि प्रश्नांना की त्यांना एकटं वाटायची गरज नाहीय आता,
अजून एका जिवालाही हे सगळं प्राणांतिक वाटतंय.
त्या सगळ्या प्रश्नांना सापडू देत अजून काही प्रश्न, मग निघून जातील ते एकमेकांच्या सोबतीनं इथेच कुठेतरी.
मग आपण उरू
आणि हे सारं उरेलच तरीही.
एकटे असू आपण दुकटे असूनही.
पण आता संध्याकाळीतली हुरहूर जाईल निवून.
हातात एक घामेजलेला हात असेल
आणि समोर हिरवंगार जंगल.

Wednesday 25 April 2012

नाटक - २


नाटकाला जाताना माझं जे काही होतं, त्याच्याकडे न पाहिल्याचा आव आणून, पण अनिमिष नजरेनं तू पाहत राहतेस माझ्याकडे, तेव्हा तुझ्यासारखंच चेहर्‍याआड दडून तुझ्याकडे बघायला बेहद्द आवडतं मला.

तयारीपासूनच सुरुवात होते आपल्या खेळाला. नाटकाला जाणं हा कार्यक्रम असतो माझ्याकरता. मग ते ’साठेचं काय करायचं?’ असो, वा ’सही रे सही’. त्या कार्यक्रमाचं ’नाटक’पण हाच मुळी एक साजरा करण्याचा सोहळा असतो, या माझ्या ठाशीव मताला किती वेळा छेडलं आहेस तू, गमतीगमतीत. मला ठाऊक नसतं असं थोडंच आहे? पण संध्याकाळी नाटकाला जायचंय म्हणताना आपण आपापल्या भूमिकांचं बेअरिंग घेऊन तय्यार असतो.

चापून-चोपून नेसलेली कलकत्ता साडी, अत्तर, नि अर्थात मोगर्‍याचा गजरा.
वा मऊ सुताचा विटकासा भासेलसा - पण अतीव सुखद स्मार्ट कुर्ता नि किमान चार लोकांची तरी नजर वळेलशी वारली पेंटिंग केलेली दिमाखदार शबनम.
वा माझा आवडता हिरवाशार कुर्ता नि त्यावर लाल-केशरी उधळण करणारी कलमकारी वर्कची ओढणी.

आपण कशात सुरेख दिसतो नि मजेत असतो, हे ठाऊक असतं नाही आपल्याला?

मला कुठल्याही परिस्थितीत वेळेआधी पोचायचं असतं नाटकासाठी. मग तू दुपारची झोप अंगावर आलीशी दाखवत मारे आल्याबिल्याचा चहा-बिहा करत काढलेला वेळ, उग्गाच ’अंघोळ करू का, फ्रेश वाटतं ब्वॉ’ची केलेली सराईत बतावणी, आरशासमोर फेर्‍या घालण्याचा आव आणत तीनतीनदा कपडे बदलणं - जसा काही तुला कपड्यांच्यात इंटरेस्टच असतो, नि मग अगदी निघता निघता दाराशी जाऊन ’अर्रे, अत्तर राहिलं बघ’ म्हणत कुलूप हातात घेऊन चपलांसकट घरभर फिरत अत्तर फवारून येणं... सगळं काही आपल्याला ठाऊक असलेलं. पण आपण दर वेळी नव्यानं रंग भरत, नव्या नव्या जागा नि बारकावे शोधत राहतोच.

तुला माहितीय, माझी भिवई पुरेशी वर चढली की डोळ्याच्या कोपर्‍यातून माझ्याकडे पाहत गुणगुणत तू जिना उतरायला घेतेस, तेव्हा तुझे डोळे चक्क लकाकत असतात.

एकदा खाली उतरलं, की मात्र तुझी स्ट्रॅटेजी बदलते. मग लगबगीनं रिक्षा वगैरे शोधून रंगायतनात पोचेपर्यंत आपण आपला आपल्यापाशी थोडा श्वास टाकतो.

तिथल्या आवारातल्या लफ्फेदार रंगीत गर्दीत मिसळत जाताना मात्र तिकिटं काढल्यापासून आपल्यात नि नाटकात जुळलेलं ’खास काहीतरी’ निमूटपणे जपानी पंख्यासारखं मिटून पर्समधे टाकावं लागतं नि आपण तथाकथित रसिकांच्या गर्दीचा केवळ एक अंश होऊन जातो, तेव्हा दर वेळी मी नव्यानं खट्टू होतेच. ते दडवायसाठी कित्ती सराईतपणाचा आव आणून आटोकाट प्रफुल्लित दिसत राहिले, तरी ते तुझ्या नजरेतून सुटत नाही नि गालातल्या गालात हसत चेव आल्यासारखी गर्दीतल्या ओळखीच्या मंडळींना शोधत हाय-हेल्लोचे संतापजनक सोपस्कार करतच राहतेस, तेव्हा मला आपल्यातल्या खेळाचा विसर पडल्यासारखा होतो नि माझं सामाजिक हसणं अधिकाधिक कृत्रिम-नाटकी होत जातं.

हा जणू क्यू असावा, तशी पहिली घंटा होते नि आत शिरायसाठी लोक मारे शिस्तीनं रांग-बिंग लावतात.

आता इतक्या सार्‍या प्रयोगांनंतर तरी या प्रसंगातली रंगत ओसरावी ना? पण नाही, आपल्यातलं नाटक अजून चांगलंच जिवंत आहे याचा पुरावा दिल्यासारखा तुझा रांग-बिंग लावायला ठाम, मूक आणि सातत्यपूर्ण नकार. मला कित्ती वाटलं तरी मी एकटीच काही मी रांगेत उभी राहायला जाणार नाही, हे तुला नीटच माहीत असतं. आजूबाजूची बेशिस्त गर्दी ओसरत, रांग हळूहळू मारुतीच्या शेपटासारखी वाढत जाते, नि माझे तुझ्याकडे टाकलेले कटाक्ष अधिकाधिक तीव्र होत जातात. नाटक चालू होण्याआधी तिथल्या लालसर-सोनसळी प्रकाशात, जिवंत भासणार्‍या शांततेत, रंगायतनातल्या अद्वितीय पडद्याला ’य’व्यांदा प्रेमभरानं न्याहाळत स्वतःपाशी पोचायला तुलाही आवडतंच की. पण माझ्या चेहर्‍यावरची घायकुती पाहायसाठी तू तेही हसत हसत अव्हरतेस, तेव्हा आपल्यातलं हे नाटक तुझ्यासाठी किती नि कसं कसं जिवाजवळचं आहे ते जाणवण्याचा नि त्यामुळे माझ्या चेहर्‍यावरचा रागाचा मुखवटा सरकण्याचा धोका असतो, तो हाच क्षण.

तेवढा निसरडा क्षण पार करून आपण अखेर आत शिरतो, तेव्हा आजूबाजूचं नेपथ्य एकदम फिरत्या रंगमंचासारखं जादुईपणे बदलतं नि आपण अंधाराच्या प्रदेशात प्रवेश करतो. इथून पुढे आपल्यातल्या या खेळाची तंत्रं आणि तीव्रताही बदलणार - उंचावणार आहेत, अनिश्चित - धोकादायक असू शकणार आहेत याचा जणू गर्भित इशारा मिळतो नि आपण एक दीर्घ श्वास घेतो, तो काही फक्त एसीचा नि अत्तरांचा चिरपरिचित संमिश्र वास आल्यामुळे नव्हे.

इथून पुढे आपण आपापले असतो आणि नसतोही.
हळुवार मावळत जाणारा प्रकाश, जिवंत अंधार नि निवेदकाचे मंतरलेले शब्द. पडदा उघडताना आपण कुणाचे कुणी नसलेले.
आपल्यातल्या नाटकाची सूत्रं समोरच्या अदृश्य सूत्रधाराकडे देऊन जणू विंगेतून नाटकातलं नाटक पाहायला लागलेले...

मी तुझ्याआधीच पाहिलेलं नि मला आवडलेलं इत्यादी नाटक असेल, तर या सगळ्याला एक भीषण कडा असते. समोरच्या खेळाचा मालकीहक्क नि जबाबदारीही जणू माझ्याकडे असल्यासारखी असते. नटानं फम्बल केलं, आवाज लागावा तसा लागला नाही, प्रयोग म्हणावा तसा रंगला नाही... माझीच चारचौघांत फजिती होणार असल्यासारखा माझा जीव गोळा होतो नि तुझ्या चेहर्‍यावरच्या प्रशस्तिपत्रकाकडे न राहवून माझं वारंवार लक्ष जात असतं. हे तुला कळल्यापासून होता होईतो तुझी पसंती वा नापसंती तू बेशरमपणे स्वतःपाशीच राखून ठेवतेस, हे माझ्या अलीकडेच लक्षात आलं आहे...

पण प्रयोग देखणा, श्रीमंत आणि तालेवार निघाला की आपण नकळत सैलावतोच.

त्याच नशेत बाहेर पडताना कुणी गाठून एकदम नाटकाशी संबंध नसलेल्या हवापाण्याच्या अश्लील गप्पा मारायला लागू नयेत, म्हणून मी हट्टानं मागे रेंगाळते, तोवर आपल्यातल्या नाटकाच्या शेवटाचे वेध तुला लागलेले असतात नि सगळ्या मिश्किलीचे रंग नकळत उतरून तुझा खरा - विनामुखवट्याचा ओलसर चेहरा डोकावायला लागलेला असतो. पण मग पडदा पडेस्तोवर नाटक चालू ठेवायचंच अशा ईर्ष्येनं, अंधारातून उजेडात येताना मी तुझ्या खांद्याला हलकेच स्पर्श करते नि ’आवडलं?’ असा प्रश्न अल्लाद तुझ्या पुढ्यात टाकते.

आता निर्णय तुझा असतो...

आपल्या भूमिका पाहता पाहता बदललेल्या असतात.

Tuesday 10 April 2012

बरबाद करे अल्फ़ाज़ मेरे...


मला बीबीसीच्या शेरलॉकबद्दल लिहायची भीती वाटतेय. त्यातलं सगळंच मला इतकं जास्त आवडलंय, की माझे शब्द त्याच्यावर उडवून त्या सगळ्याची मी वाट लावीन अशी भीती.

राधिकाचा हा लेख वाचूनसुद्धा या मालिकेकडून माझी फार काही अपेक्षा नव्हती. रहस्यकथेकडून, गुप्तहेरकथेकडून आपण काय अपेक्षा करतो? काय घडलं त्याबद्दल आमच्या डोक्यात पुरेशी उत्सुकता निर्माण करा. मग आम्हांला बिनडोक न समजता आम्हांला पडलेल्या प्रश्नांचं चलाखपणे निरसन करा. घरी जाऊन शांतपणे झोपा. संपलं.

बीबीसीचा शेरलॉक हे सगळं करतो, अगदी झोकात आणि जगावेगळ्या हुशारीनं करतो, पण त्यात त्याचं काही कौतुक नाही. त्याच्या बापानं - आर्थर कॉनन डॉयलनं - ते त्याच्या घटनेत बांधून ठेवलंच आहे. पण त्यातली नाती? इतकी खोल आणि इतकी सूक्ष्म? ती कुठे होती डॉयलच्या पुस्तकात? ती कुठून शोधली या बीबीसीवाल्यांनी? त्यांचं म्हणणं म्हणे असं की ही बेहद्द जवळची मैत्री डॉयलच्या पुस्तकातपण होतीच. आहेच.

बरं, असेल.

पण शेरलॉकच्या अथांग काटेकोर बुद्धीमागे दडलेलं त्याच्यातलं निरागस मूल? आपल्याच भावाच्या छायेत गुदमरलेलं लहानपण सोडवून घेताना त्याच्यातल्या बंडखोरानं काढलेला फणा आणि त्यातून आलेली त्या दोघांमधली ती शाळकरी खुन्नस? तो मुखवटा कधी कधी, टोकाच्या काळजीच्या क्षणी गळून पडतो तेव्हा एकमेकांबद्दल वाटणारी कोरडी-खिन्न तरी अपरिहार्य काळजी? शेरलॉकला कधीच न उमजलेले - न भेटलेले लैंगिक आकर्षणांचे अज्ञात प्रदेश? त्यातून स्त्री या प्राण्याशी वागताना त्याच्यात येणारं ते आक्रमक - अलिप्त चिलखत? आणि तरीही मिसेस हडसनवर भाडोत्री गुंडांनी हल्ला केल्यावर पेटलेली त्याची नजर? एकाच वेळी माणसांना आरपार वाचायची क्षमता असणं आणि तरीही भावनांच्या ओशट लिप्ताळ्यापासून फारकत घेण्याचा त्याचा, कोण जाणे कशातून आलेला, पण पुन्हा पुन्हा कसाला लागणारा निर्णय?

भावनांपासून घटस्फोट घेण्याची भाषा करणारा हा चक्रम माणूस. पण त्याच्यातल्या सगळ्या विरोधाभासांवर प्रेम करणारी माणसं त्याच्याभोवती कशी अचूक जमतात. त्याच्यातल्या उद्धट टीनेजरला प्रसंगी झापतात, त्याच्या विक्षिप्तपणावर वैतागतात, प्रसंगी त्याला हक्कानं पेचात पकडून त्याची मजा पाहतात, त्याच्या नित्य नव्या साहसांमागे नाईलाजानं-आनंदानं-आवडीनं फरफटली जातात, त्याच्या तर्कशक्तीच्या ताकदीनं रोज नव्यानं चकित होतात. पण त्यानं केलेले अपमान, त्याचे टोमणे, त्याचं गृहित धरणं, समजुतीनं स्वीकारत त्याच्याभोवती जणू कडं करून असतात.

घरमालकीणबाई मिसेस हडसन, लॅब असिस्टंट मॉली, डिटेक्टिव्ह इन्स्पेक्टर लेस्ट्राड, शेरलॉकचा भाऊ मायक्रॉफ्ट...

आणि अर्थात जॉन. जॉन हॅमिश वॉटसन.

ही सगळी मंडळी त्याच्यातलं मूल प्रेमानं, लटक्या रागानं, प्रसंगी अचंब्यानं, न्याहाळत - जपत असतात.

मग बीबीसीचा नि मॉफ्टिसचा शेरलॉक त्याच्या बापाच्या रहस्यकथांच्या मूळ सपाट चौकटीतून बाहेर येतो जणू. जिवंत होतो. तुमच्या-आमच्यासारख्या एकविसाव्या शतकात वावरतो. ड्रग्स आणि सिगारेट्स या दोहोंवरही बंदी आणणार्‍या आजच्या लंडनमधे प्रसंगी एका वेळी तीन-तीन निकोटीन पॅचेस वापरतो आणि होम्सच्या लौकिकाला साजेसं अद्ययावत तंत्रज्ञान वापरत आजच्या पोलिसांहूनही मैलभर पुढेच असतो. त्याला अपरिचित असणारे भावनिक गुंते अंगावर घेताना त्याची तिरपीट उडते, तेव्हा त्याच्या कासाविशीच्या कल्पनेनं गुदमरायला होतं, आणि तरी हा तालेवार बुद्धीचा माणूस या गुंत्याला कसा सामोरा जाईल, ते पाहायला सरसावून बसावं लागतंच!

पण तो इथेच थांबत नाही. वाढतो. स्त्री-पुरुषांमधले अगम्य आकर्षणांचे पेच, त्यानं कधीही स्वतःबद्दल न अनुभवलेली साशंकता - बिचकता आत्मविश्वास - चक्क भीतीही... या सार्‍याला सामोरा जातो. आणि सरतेशेवटी आपलं माणूसघाणेपणाचा मुखवटा निदान स्वतःपाशी तरी उतरवून ठेवण्यापर्यंत पोचतो...

हे सगळं कुठे होतं डॉयलच्या पुस्तकात?

अस्सल ब्रिटीश माणसाचं त्याच्या भाषेवरचं प्रेम, ब्रिटीश परंपरांना हट्टानं जपणं, राणीवर आणि लंडन शहरावर घरातल्या एखाद्या वडीलधार्‍या माणसासारखं प्रेम करणं, सतत कुरकुर कुरकुर करणं, त्याच परंपरेला फाटा देत, काळाचं पाऊल ओळखत, समलैंगिकतेला बिचकत का होईना, पण रोजच्या आयुष्याचा भाग म्हणून स्वीकारणं - अगदी त्यांच्या लाडक्या होम्स आणि वॉटसनबद्दल वात्रटपणे भिवया उंचावल्या गेल्या, तरीही तो विनोद सहज एन्जॉय करण्याइतपत... हे सगळं तरी कुठे होतं?

हे सगळं शब्दांच्या निसरड्या आधाराशिवाय म्हणतं कुणी, तेव्हा त्या नि:शब्द सौंदर्याच्या ओझ्याखाली दबून जायला होतं. वाटतं, खरंच का हे सगळं आपल्याला दिसलं, की आपण फक्त कल्पना रचल्या, आरसा पाहण्याच्या तीव्र इच्छेपोटी? त्या आरशातल्या प्रतिबिंबाला बोट लावताना भीती वाटते. डहुळून - निसटून गेलं म्हणजे?

तो इर्शाद कामिल म्हणून गेला आहे ना - जो भी मैं कहना चाहूँ, बरबाद करे अल्फ़ाज़ मेरे.... त्यातली गत.

***

एखाद्या खुळचट टीनएजर पोरीसारखं मला शेरलॉकचं आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक लहान-सहान गोष्टीचं वेड लागलं होतं. रेषेवरची अक्षरेवरच्या या खोमुळे त्याला वाट मिळाली. त्या खोवरचे ए सेन मॅनचेच शब्द इथे देतेय -

तुम्हांलाही कधी भेटले असतीलच की कुठलेतरी साहित्यिक, कलाकार, साहित्यकृती, कलाकृती... त्याबद्दल लिहा ना. त्यांच्याबद्दल, त्यांच्या भेटण्याबद्दल. कसं नि काय लिहायचं ते तुम्हीच ठरवा. वानगीदाखल गायत्रीचं हे ‘कॅराव्हॅजिओ’ या शीर्षकाचं जुनं पोस्ट पाहा. चित्रभाषा या विषयावरची शर्मिलाची ही सुंदर मालिका पाहा, केवळ चित्रभाषा समजून घेण्यासाठी नव्हे, तर अशा कलाभाषांविषयीच्या एका डोळस दृष्टिकोणासाठीही. ही केवळ उदाहारणं. कलाकार / साहित्यिक / कलाकृती / साहित्यकृती जगप्रसिद्धच हवी; अनुभव चाकोरीबाहेरचाच असावा, असे काही आग्रह नाहीत. चटका बसल्यावर बहिणाबाई आठवल्या असतील तरी, आणि जाता जाता कुठल्या मासिकात / ब्लॉगवर वाचलेलं असं भेटलं असलं तरी चालेलच की. लिहिलंत की दुवा प्रतिक्रियेत द्या, म्हणजे ते एकत्रित राहील.

***

माझा खो प्रथमेश, गौरी आणि आतिवास यांना.

Sunday 18 March 2012

वाटा आणि मुक्काम


जे जे म्हणायसाठी तगमग होते जिवाची
ते ते सारं निरर्थक आहे हे कळून घेताना
एकाच वेळी आतून भरून येणारे आपण
क्षितिजापर्यंत रिते होत जाताना
आत शिरलेल्या वाळूच्या कणाभोवती
मुकेपणानं मोती विणत जाताना
आधी कधीच न दिसलेल्या रिकाम्या जागा
अर्थपूर्ण मौनांनी भरल्या जाताना
कुठे चाललेले असतो आपण?
वाटा आणि मुक्काम
सारंच तर एकमेकांत मिसळत गेलेलं...

Wednesday 22 February 2012

पांढर्‍यावर काळं


या नोंदीला तसा काही अर्थ नाही. पण अगदीच निर्मनुष्य शांततेला छेद द्यायचं ठरवलंय मी - कसल्याही स्पष्टीकरणाशिवाय. म्हणून हे पांढर्‍यावर काळं. आपापल्या जबाबदारीवर... इत्यादी.
---
वेगवान, सनसनाटी, धरून ठेवणार्‍या - पण परभाषक - पुस्तकात बुडून गेले असताना एकदम साक्षात्कार झाला: आपण ज्या भाषेत वाचत असतो, त्याच भाषेत डोक्यातला विचारही चालतो. शिरूभाऊ वाचताना आपोआप 'हात् भोसडीच्या!' किंवा कुरुंदकर वाचताना '...आपण हे काळजीपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे' किंवा कोसला वाचताना 'उदाहरणार्थ' ... हे असे फटाफट डोक्यात उगवत असतात - फक्त पुस्तकाच्याच नव्हे, इतर कोणत्याही संदर्भात. म्हणून मग इंग्रजी वाचताना डोक्यातला विचारही इंग्रजी होतो आणि त्या विचाराला पुरेलशी भाषेची तयारी नसेल, तर अर्धवट धेडगुजरी वाक्यसमूह वेळ मारून नेतात.

म्हणजे सकस लिहून व्हायचं असेल, तर त्या भाषेतलं सकस-श्रीमंत वाचणंही अपरिहार्यच.
आणि तरी प्रभाव इत्यादी न पडू देण्याची कसरत.
आणि श्रेष्ठ वाचूनही स्वतःला न्यूनगंड येऊ नये, म्हणून लेखकू 'अहं'ला एक जास्तीचं टोक काढून ठेवायचं.

इज इट वर्थ इट? की हे आपल्याच धोतरात पाय अडकून पडणं फक्त?

नाही, पण हा वाद मी गुंडाळून ठेवलाय, जेव्हा हे पांढर्‍यावर काळं करायला घेतलं तेव्हाच. आता रडीचा डाव नाही.