Showing posts with label सिनेमा. Show all posts
Showing posts with label सिनेमा. Show all posts

Friday, 20 December 2024

बुजरी गाणी ११

हे गाणं आपल्या नॉस्टाल्जियाचा भाग असल्यामुळेच आपल्याला आवडत असणार, एरवी यात काय आहे, अशी मी स्वतःची समजूत काढत असे. कारण पडद्यावर चित्ते, वाघ, झेब्रे इत्यादींची आठवण करून देणारी टाइट्समधली शिल्पा शेट्टी आणि केसाळ छाती दाखवणारा अक्षयकुमार. त्यांच्या नाचाच्या मुद्रांचा - खरं तर हातवाऱ्यांचा, let's be realistic! - गाण्याच्या बोलांशी काहीही संबंध नाहीय. पूर्ण गाणंभर ते एकमेकांवर शरीराच्या मांसल भागांनिशी धडका देणे, घासणे, कुरवाळणे, जवळ येणे-लांब जाणे... अशा गोष्टी करतात. 'शरीराचा आवेग नावरे आवरीता' हेच काय ते कोरिओग्राफीमधलं विधान आहे. 

पण तरीही... गाणं नुसतं ऐकलं, तर ते कमालीचं गोड आहे. 

शब्दांत एक प्रकारची चलबिचल, अनिश्चितता आहे. 'या माणसावर जीव जडलाय खरा, पण हा देईल ना साथ, की दुसऱ्या कुणाला जवळ करेल लहर फिरल्यावर?', 'बोलून दाखवू का हिला मनातले मोह? की लाजून दूर करेल?'... अशा शंकाकुशंका बोलून दाखवणारे - न दाखवणारे दोन नवे प्रेमिक. आणि त्या हळुवार संकोचांना आणि आवेगांना साथ दिल्यासारखी गाण्याची सुरावट. 

कडव्याची सुरुवात अगदी खालच्या सुरात, मनातलं गूज बोलून दाखवावं हलकेच, अशी तिच्या आवाजात होते. मग तिथून तिचा हात हातात घेऊन दाणदाण पायऱ्या चढून वर जावं तसा गायक वर जातो आणि खड्या आवाजात तिला उत्तर देतो. तिथून तिनं लाजून त्याला पुन्हा थोडं खाली आडोशाला न्यावं, तशी धीम्या सुरातली कबुली... ध्रुपद... पुन्हा हाच खेळ.  अशी जुगलबंदी या गाण्यात कुमार सानू आणि अलका याज्ञिक मनसोक्त रंगवतात.

पडद्यावर हे हाताळू शकणारा कुणी दिग्दर्शक मिळाला असता, तर हे गाणं कुठच्या कुठे गेलं असतं, अशी चुटपुट वाटल्याशिवाय राहत नाही.

~



चुरा के दिल मेरा गोरिया चली - २

उड़ा के निंदिया कहाँ तू चली 

पागल हुआ दीवाना हुआ 

कैसी ये दिल की लगी 

चुरा के दिल तेरा चली मैं चली 

मुझे क्या पता कहाँ मैं चली 

मंज़िल मेरी बस तू ही तू 

तेरी गली मैं चली... चुरा के दिल मेरा...

अभी तो लगे हैं चाहतों के मेले 

अभी दिल मेरा धड़कनों से खेले 

किसी मोड़ पे मैं तुमको पुकारूं 

बहाना कोई बना तो ना लोगे 

...अगर मैं बता दूं मेरे दिल में क्या है 

...तुम मुझसे निगाहें चुरा तो ना लोगे 

...अगर बढ़ गयी है बेताबियां 

...कहीं मुझसे दामन छुड़ा तो ना लोगे 

कहता है दिल धड़कते हुए 

तुम सनम हमारे हम तुम्हारे हुए 

मंज़िल मेरी बस तू ही तू - २

तेरी गली मैं चली...

चुरा के दिल मेरा गोरिया चली

चुरा के दिल तेरा चली मैं चली...

नही बेवफ़ा तुम ये मुझको खबर है 

बदलती रुतों से मगर मुझको डर है 

नई हसरतों की नई सेज पर तुम 

नया फूल कोई सजा तो ना लोगे 

...वफ़ाएं तो मुझसे बहुत तुमने की है 

...मगर इस जहाँ में हसीं और भी हैं 

...कसम मेरी खा कर इतना बता दो 

...किसी और से दिल लगा तो ना लोगे 

धीरे धीरे चोरी चोरी आके मिल 

टूट ना जाये प्यार भरा दिल 

मंज़िल मेरी बस तू ही तू - २

तेरी गली मैं चली 

चुरा के दिल मेरा गोरिया चली 

~

गाण्याचे बोल इंटरनेटवरून ढापलेले असल्यामुळे चूक-भूल-देणे-घेणे.

Sunday, 21 July 2024

थँक्स टू हिंदी सिनेमे ०४

लग्नामधली गाणी हा बॉलिवुडमधला एक हुकमी एक्का. भरपूर गजरे ल्यायलेल्या, दागदागिन्यांनी मढलेल्या, खिदळणार्या, लाजणार्या , हसणार्याहसवणार्या खूप बायका, खूप रंग आणि रोषणाई वापरून केलेल्या सजावटी, आणि सनईचे सूर. रॉकी और रानी की प्रेमकहानीमधल्या तेरी कुडमायी के दिन आ गयेबघताना त्यातलं करणजोहरीय सौंदर्यशास्त्राला अनुसरून असलेलं, काहीसं बटबटीत, पण तरीही निव्वळ वेगळेपणामुळे टवटवीत वाटणारं रोल रिव्हर्सल जाणवलं आणि एकापाठोपाठ एक गाणी आठवत गेली. त्यातलेही निरनिराळे प्रकार दिसत गेले.

एक प्रकार म्हणजे सरळच लग्न ठरलं आहे, वा उद्यावर वा आत्तावर येऊन ठेपलं आहे, डोळ्यांत स्वप्नं आहेत, मनात उत्कंठा आणि आतुरता, आणि आईबापापासून विरहाचं दुःख. पण मजा अशी, की बॉलिवुडचा स्वभाव हिंदी आणि त्यामुळे उत्तर भारताला जवळचा. त्यातलं विरहाचं दुःख बाबुल का अंगनासोडून जाण्याचं. आईला तितकासा भाव गीतकारही देत नाही. बाबुल की गलीयाँ छोड चली’! अर्थात, अगदी माहेराला महत्त्व असलेल्या महाराष्ट्रातही कितीतरी ठिकाणी वधूच्या आईला लग्न बघायचीही परवानगी नसत असे, म्हणताना... ठीकच म्हणायचं! अशा गाण्यांमध्ये विशेषतः नवर्या मुलीवर शुभेच्छांची नुसती खैरात असते. तिला खुशीयाँमिळाव्यात म्हणून दुवाएँ’; तिच्या पदरात चंद्र, तारे; तिचा चेहरा कसा चंद्राच्या तुकड्यासारखा, तिची कांती कशी दुधासारखी, झूमर असं, झुमका तसा, बिंदी अशी, कंगन तसं, हातावर मेंदी कशी, पायातले पैंजण कसे... एक ना दोन. नवर्या मुलीचं काम नुसतं गोरेपान नितळ खांदे आणि कर्दळीसारख्या पोटर्या उघड्या टाकून नाजूक हातांनी हळद-चंदन लावून घेण्याचं नाहीतर पॅसिव्हली साजशृंगार करून घेत, आरशासमोर बसून लाजत, सुंदर दिसत हळूच हसण्याबिसण्याचं. मेंदीला मोठाच भाव. बहनों ने रोशनी कर ली मेहंदी से जला के उंगलीयाँकाय किंवा चक्क मेहंदी लगाके रखना, डोली सजाके रखना’. साजण येईल तेव्हा त्याच्याकरता तय्यार राहायचं, बस. अॅक्टिव्ह रोलची जबाबदारी पियाच्या गळ्यात घालून या नवर्या मस्त मोकळ्या झालेल्या असतात. डोळ्यांत विरहाचं माफक पाणी, पण मुख्यत्वे तिकडची स्वप्नं. मेरे बन्नो की आयेगी बारातपासून बन्नो तेरी अखियाँ सुरमेदानीपर्यंत आणि मेहंदी है रचनेवाली, हाथोंमें गहरी लालीपासून नवराई माझी लाडाची लाडाची गोपर्यंत. छलका छलका रे कलसी का पानीपासून हम तो भये परदेसपर्यंत. इथल्या सख्यांच्या, आईबापाच्या विरहाचं दुःख आहे. पण त्याला तरी काय इलाज! मैं तो भूल चली बाबुल का देस, पिया का घर प्यारा लगे...

राजीतल्या उंगली पकड के तूने चलना सिखाया था नामध्ये याला अपवाद होता. कारण नवरी मुलगी फक्त नवरी मुलगी नव्हती. पण असे अपवाद नियम सिद्ध करण्यापुरतेच. बाकी बहुतेक वेळा साजनजी घर आये दूल्हन क्यों शर्माये’…

यात नवर्या मुलीला शंभरातून पन्नास वेळा तरी ह-म-खा-स बन्नो हे नामाधिधान लावलेलं असतं. मग तिला सल्लेबिल्लेही दिलेले असतात. ते पोक्त आजीबाईछाप सल्ले असतातच. पण फक्त तितकेच असतात असंच काही नाही. देखो बन्नो मान न जाना, मुखडा उनको ना दिखलाना, पहले सौ बातें मनवाना, केहना बोलो, कर के सलामी, बन मैं करूंगा तेरी गुलामी...असाही व्यावहारिक वळसा असतो. वास्तविक नवर्या मुलाला तसं परफॉर्मन्सचं किती प्रेशर असतं. नवर्या मुलीला जाऊन निदान पहिल्या रात्री तरी मेलेल्या माशासारखे भाव सलज्ज डोळ्यात घेऊन पुतळा होऊन बसायचं असतं. करायचं ते नवरा मुलगा करणार असतो. पण ज्याला काही करून मर्दानगी सिद्ध करायची असते, त्याचं काय? त्या बिचार्याला सल्लेबिल्ले देण्याची काही पद्धत बॉलिवुडमध्ये नाही.

नवर्या मुलीच्या मनात नुसतीच प्रियाची ओढ असते असंही नाही. शृंगाराची स्पष्ट आतुरताही असते. जिया जले जान जलेच्या शब्दांत उघडच अंग अंग में जलती हैं, दर्द की चिंगारीयाँ, मसले फूलों की मेहक में तितलीयोँ की क्यारियाँ...असं होतं, ते काय उगाच? ‘रुकमणी रुकमणी, शादी के बाद क्या क्या हुआ...हा त्याचाच एक अवतार. धीरे धीरे खटिया पे खटखट होने लगी...यात कल्पनेला वावबीव तरी कुठे आहे?! थेट मुद्द्याला हात!

अलीकडे लापता लेडीजमध्ये नवर्या मुलीच्या पोटातली अनिश्चिततेची भीतीही सुरेख चितारली होती. आंगन में पेड वहाँ होगा के नही, होगा तो झूला उसपे होगा की नही…’ इथपासून ते नवरा घोरत तर नसेल... इथपर्यंत.

पण कायम सिनेमाची नायिकाच नवरी मुलगी असेल असंही काही नाही. मैत्रिणीच्या नाहीतर बहिणीच्या लग्नात मिरवणारी आगाऊ नायिका आणि हीरोचा तसलाच आगाऊ कारा मित्र हा बॉलिवुडमधल्या प्रेमकथांमधला एक हमखास ट्रोप. हम आप के हैं कौनमधली जूते दे दो पैसे ले लोतशातलंच.

पण हम आप के हैं कौनअसल्या गाण्यांची बॅंकच बाळगून आहे म्हणा. लग्नातल्या गाण्याचा कुठलाही प्रकार सांगा, तो त्यात सापडणारच. आगाऊ बहीण आणि भाऊ यांची चेष्टामस्करी आणि पुढे प्रेमात पडायची तयारी? ‘जूते दे दो पैसे ले लो’. नायिकेचंच लग्न आणि नायक विरहानं व्याकूळ? ‘मुझ से जुदा हो कर’. लग्नासाठी उतावीळ लेक? ‘माईनी माई मुंडेर पे तेरे...लग्नातली नवरा-नवरींची चेष्टामस्करी आणि दुवाएँ? ‘वाह वाह रामजी’. चावट आणि वाह्यात मस्करी? आहे की. दीदी तेरा देवर’. अगदी गलोलीनं नितंबावर फुलं फेकून मारण्यापर्यंत सबकुछ. विहीण आणि व्याह्यांमधली चेष्टा? काळजी सोडा, तेही आहे – ‘आज हमारे दिल में...

तर – ‘हम आप केचं सोडून देऊ!

आपलं स्वतःचं लग्न जमवण्याच्या भानगडीत इतरांची लग्नं मनापासून अटेंड करणारे स्मार्ट लोक बॉलिवुडमध्ये चिकार. हम दिल दे चुके..मधलं आँखों की गुस्ताखीयाँ..’, ‘कभी खुशी कभी गममधलं बन्नो की सहेली रेशम की डोरी’ (पाहा, इथेही बन्नो आहेच!), ‘प्यार तो होनाही थामधलं आज है सगाई’…. अशी कित्तीतरी गाणी मिळतील. या गाण्यांमधला मूड प्रसन्न, उजळ, रंगीत असतो. नायिका आगाऊ असते थोडी, पण नायकानं थोडी मर्दगिरी केल्यावर तिच्या डोळ्यांत एकदम लाज उमटून जाते. नायकनायिकांना इतर लोक सतत कट केल्यागत एकत्र आणत असतात. कधी तिच्या नि त्याच्या ओढण्यांची गाठ, कधी त्याच्या कुर्त्याच्या बटणात तिची ओढणी, कधी दोघांना एका फेट्याच्या कापडात एकत्र आणपूरी कायनात दोनों को... असो!

अजून एक प्रकार म्हणजे असफल प्रेम आणि त्याचं वा तिचं लग्न अटेंड करावं लागणं. या सिच्युएशनमध्ये एकट्या राहिलेल्या इसमाला (वा इसमीला) कम्माल म्हणजे कम्माल अॅटिट्यूड आलेला असतो. एकतर माझं काय व्हायचं ते होवो, तुझं भलं होवोअसा स्वार्थत्यागाचा उमाळा, किंवा मग नुसते अर्थपूर्ण दुःखी टोकदार कटाक्षच कटाक्ष... पॅसिव्ह अग्रेसिव्ह वागण्याची पार हद्द. या प्रकारातलं मूळपुरुष गाणं म्हणजे अजीब दास्ताँ है ये’. आता झालंय ना त्याचं लग्न? मग का उगा त्याच्या हृदयाला डागण्या देतीस बाई? जा ना गप निघून. पण नाही. असं केलं तर ती नायिका कसली! राजा की आयेगी बारात...त्यातलंच. तुमबिन जीवन कैसा जीवनमध्ये बैलगाडीच्या मागून विद्ध-संतप्त चेहर्यानं चालणारा जया भादुरीचा प्रियकर आठवा. किंवा स्वतः मरणार असल्यामुळे प्रेमपात्राला नीटस नवरा गाठून देऊन वर तिला त्याच्या प्रेमात पाडणारा 'माही वे'मधला शारुख. किंवा मग अलीकडच्या सुना है के उन को शिकायत बहुत हैमधली गंगूबाई... काय तो कफन पेहन के कुर्बान होण्याचा भाव... हाय अल्ला!

याचाच एक पोटप्रकार म्हणजे लग्न करायचं, पण मनात मात्र प्रियकर किंवा प्रेयसी. वीर-झारातलं मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ...किंवा देवदासमधलं हमेशा तुमको चाहा’. पण देवदाससगळाच तसा... पुनश्च असो!

अजून एक खास प्रकार म्हणजे निव्वळ चावटपणा. मेरे हाथों में नौ नौ चूडीयाँ हैंमधली कल चोली सिलाई आज तंग हो गईम्हणत धुंद होऊन नाचणारी श्रीदेवी, ‘इश्शकजादेमधल्या मेरा आशिक छल्ला वल्लातला पैजामे से लडते हुए रात बितानेवाला आशिकही काही उदाहरणं. रुकमणी रुकमणीत्यांपैकीच, आणि लग्नातलं नसलं तरी डोहाळे पुरवता न येणार्या बावळट साजणाची चेष्टा करणारं दीदी तेरा देवर दिवानाही त्यांपैकीच. होता होईतो पुरुषांना बघा-ऐकायला मनाई करून खास स्त्रीवर्गाला गोळा करून शृंगारविषयक चावट चेष्टामस्कर्या करणं हा या गाण्यांचा विशेष हेतू.

अशी कितीतरी गाणी निरनिराळ्या कारणांनी लक्षात राहून गेलेली, आवडलेली. पण या ठरीव साच्यांमधली असूनही त्यांना बगल देऊन जाणारी, वेगळेपणानं ठसलेली गाणी अगदी क्वचित.

सत्यातलं सपनों में मिलती हैत्यांपैकी एक. ते गाणं अगदी मुंबई पद्धतीच्या लग्नाचं आहे. नवरा-नवरी समोर स्टेजवर आणि प्रेक्षक खाली खुर्च्यांमध्ये बसलेले. पुरुष एकतर निवांत बसलेले तरी नाहीतर पार कायच्या काय हालचाली करून नाचम्हणायला जड जाईल, असा नाच करणारे. निखळ पुरुषी ऊर्जा. निळाशार सोनेरी बुंदक्यांचा आणि गुलाबी काठाचा शालू नेसलेली शेफाली छाया त्या गाण्यात बघून घ्यावी. काय तिचा चार्म! मागे येणार्या नवर्याला लटक्या रागानं रिकाम्या रिक्षाची उपमा काय देते, मध्येच लाडात येऊन त्याच्या थोबाडीत काय मारते, कमाल लालित्यानिशी ठुमकते काय... ते सगळं गाणं तिच्याभोवती फिरतं. साथीला आशाचा मुरलेला खट्याळ आवाज आणि बॅकग्राउंडमध्ये कुठेतरी स्वप्नदृश्यातली शालीन उर्मिला.

बॉम्बेतलं केहना ही क्यावास्तविक प्रेमात पडू बघणार्या नायक-नायिकांचंच. पण मणिरत्नम आणि रेहमान अशा एक सोडून दोन-दोन परिसांचा स्पर्श त्याला झालेला असल्यामुळे ते कुठल्या कुठे गेलं आहे. भित्र्या हरणीसारखी पण अनुरक्त झालेल्या प्रेमिकेची भिरभिरती-लाजरी नजर... तबल्याचा दिलखेचक ठेका... सोनेरी झालरी लावलेल्या झिरझिरीत ओढण्या ल्यालेल्या बायकापोरीउंचच उंच अवकाश असलेल्या इमारती... आणि स्वप्नील छायाप्रकाशाचा खेळ.

बधाई होमधलं सजन बडे सेंटीअसंच मजेशीर. त्यातल्या लग्नात वावरणारे नीना गुप्ता आणि गजराज राव चाळिशी-पन्नाशीच्या आसपासचे. पण नीना गुप्ता गरोदर असल्यामुळे स्वतःच्या पौरुषाच्या कामगिरीवर निहायत खूश असलेला गजराव राव तिला नव्याच कौतुकानं न्याहाळणारा. कधी गच्चीवरून खालच्या तिच्याकडे प्रेमभरानं बघणारा, तर कधी जिन्यावरून उतरणार्या पत्नीच्या पूर्ण स्त्रीदेहाचा दिमाख विस्फारल्या, चकित नजरेनं बघणारा. कधी हळूचकन तिच्या पोटाची अलाबला घेणारा. कधी आईची करडी नजर जाणवून गोरामोरा होणारा... त्यातला त्या दोघांमधला चोरटा पण लोभस शृंगार बघताना खूप मजा आली होती, किंचित भरूनही आलं होतं.

गँग्स ऑफ वास्सेपूरमधलं तार बिजली से पतले हमारे पियाहे अजून एक रत्न. त्याला लोकसंगीताची डूब आहे आणि लग्नातल्या मेहंदी-संगीत समारंभाचा अस्सल ढोलक ठेका. तशा गाण्याबजावण्यात भांड्यावर चमचा वाजवत ठेका धरतात असं स्नेहा खानविलकरला कुणीतरी म्हटलं म्हणून तिनं गाण्यात टटक टटक टटक टटक...असे शब्दच चपखलपणे वापरले आहेत. विधवा सासू आणि विधवा थोरली जाऊ नव्या सुनेच्या स्वागतासाठी कौतुकानं गाताहेत, हवेत आनंद आहे, शब्दांमुळे आलेली हलकी मस्करी आहे, हसर्या मुद्रा आहेत... पण सासर्याच्या आठवणीनं कातर झालेल्या सासूला बघून चमकलेली नवी सून बघता बघता तिला सावरून घेते. तिची त्या घराचं होऊन जाण्यातली परिपक्वता आणि पाठीमागच्या गाण्यातल्या सुरातली विद्धता... त्या गाण्यातली मूळ मिश्किली ओलांडून ते गाणं कुठल्या कुठे उंचीवर निघून जातं. हुमा कुरेशीचं कौतुक करायचं, की रिचा चढ्ढाचं, की स्नेहा खानविलकरचं, शारदाबाईंचं की अनुराग कश्यपचं... कळेनासं होतं.

मीरा नायरचा मॉन्सून वेडिंगलग्नातच घडणारा. त्यातलं दिल्लीकर श्रीमंती लग्न आणि त्यातले नात्यांचे अस्सल भारतीय गुंते लक्षात राहतातच. पण श्रेयनामावली सुरू असताना वाजणारं कावा कावाबघताना आपण सिनेमातल्या कंत्राटदाराचं आणि मोलकरणीचं झेंडूच्या केशरी रंगांत न्हालेलं लग्नही आठवून खूश होत राहतो, ही त्या सिनेमाची प्रसन्न खासियत.

ही काही समग्र यादी नव्हे. तशी ती बॉलिवुडबाबत शक्यही नाही. अजून तासभर गप्पा ठोकत बसलो तर अजून अशीच पन्नासेक गाणी आपण सहज काढू शकू. तूर्त ही आवडलेल्या चंदेरी लग्नगाण्यांची आठवण नुसती...

अशीच एक आठवण एकदा पार्टीतली गाणी या प्रकाराची काढायची आहे, एकदा वयात आल्या-आल्या तारुण्यानं मुसमुसून गात सुटणार्या नायक-नायिकांच्या गाण्यांची... इरादे काय, चिकार आहेत. फिर कभी.

Wednesday, 6 September 2023

मराठी नट्या ०३

सगळ्यांत पहिल्यांदा तिला कधी पाहिलं हे आता मला नीटसं आठवत नाही. अर्थात, मुक्ताला ही दाद वाटणं शक्य नाही. तिला बघावं आणि ती लक्ष्यात राहू नये, अशी तिच्या अभिनयाची शैलीच नाही. चार्म्स आणि हेक्सेस आणि स्पेल्सची आतिषबाजी करत एखाद्या जादुगारणीनं एखाद्या द्वंद्वात एंट्री घ्यावी, तशी तिची शैली. भक्ती बर्वेंना बघताना मला कायम मुक्ताची आठवण येत आली आहे. हे वाक्य उलट असायला हवं, ना? आय नो. पण मी भक्ती बर्वेंना रंगमंचावर बघितलेलं नाही. आणि माझ्या डोक्यात मुक्ताच इतकी 'छाई हुई' आहे, की आहे बाबा हे असंच, उलट. तर – भक्ती बर्वेंच्या अभिनयात ही एक "बघ हं, आता मी कशी गंमत करणार आहे!" असं सांगणारा एक सूक्ष्म पण झगझगीत धागा आहेसा मला वाटतो. अचूक तीच छटा मुक्ताच्या कामात आहे. त्यामुळेच तिचं 'चारचौघी'तलं काम बघायला जाण्यापूर्वी मी किंचित धास्तावले होते. पण... छे! हे पुष्कळ पुढचं.

तर – तिला अगदी सुरुवातीला पाहिल्याचं आठवतं, ते टीव्हीवर. 'पिंपळपान'मध्ये सानियाच्या 'आवर्तन'वर आधारित असलेल्या कथानकात – स्वरूप या काहीशा बोल्ड, अमेरिकेत वाढलेल्या बहिणीच्या भूमिकेत. स्वरूपचा प्रॅक्टिकल आणि प्रेमळ सूर तिनं अचूक पकडला होता. पण त्या भूमिकेत काही मेस्मरायझिंग नव्हतं. उलट त्याआधी 'घडलंय बिघडलंय'मध्ये ती आणि आतिशा नाईक पाणवठ्यावर जाणार्‍या दोन गावरान बायकांची सोंगं काढत असत. त्यात आतिशा नाईक वयाला साजेसं लुगडं नेसून असे. तर मुक्ता – गावातल्या सेमी-तरुण पोरी परकर नेसून त्यावर शर्ट घालतात, तसल्या अवतारात. शर्ट आणि परकर, कमरेवर घागर, घट्ट वळलेल्या वेणीला रिबीन, तरी लटा काढलेल्या. आणि दोघींच्याही चेहर्‍यावर अत्यंत बेरकी – स्मार्ट – मापंकाढू भाव. ती आणि आतिशा अक्षरशः हैदोस घालायच्या त्यात. मग तिचं संजय मोने आणि जितेंद्र जोशीबरोबरचं 'हम तो तेरे आशिक है' पाहिलं होतं. त्यात ती मुस्लीम मुलीच्या भूमिकेत होती. जितू आणि मुक्ता दोघं एकत्र असतील, तर काय होईल, अशा कल्पनेनं चेकाळून नाटकाला गेलेल्या मला, तितकीशी मजा आली नव्हती. त्यात नाटकाचा भाग होता, तसा 'मुक्ता जरा स्वतःच्या प्रेमात आहे का?' अशी शंका चाटून जाणंही होतं. ती पहिली धोक्याची सूचना. पण ती कायम धक्के देतच राहिली. 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' नावाची (बहुधा सतीश राजवाडेची) मालिका होती. त्यात तिनं तिच्या 'मुंबई पुणे मुंबई'मधलाच, शहरी, लग्नानंतरच्या तडजोडींना बिचकणार्‍या आधुनिक मुलीचाच पार्ट कंटिन्यू केला होता. पण काय लाजवाब केला होता! स्वप्नील जोशी आणि ती यांचे प्रसंग दोन चांगले नट एकत्र आले की व्हायचेच, तितपत चांगले व्हायचे. पण तिच्या वडलांच्या भूमिकेत असलेल्या विनय आपटेंबरोबर?! काहीच्या काहीच केमिस्ट्री. आईवेगळी, एकुलती एक लेक. तिला तिचा बाप लग्नाआधी पोळ्या करायला लावतो असा एक प्रसंग होता. कधीही स्वैपाकाला हात न लावलेल्या मुलीचं अशा वेळी जे होईल तेच तिचं होतं. त्यात बापाची दंडेली. पण बापावर प्रेम आहेच. त्या सगळ्यानं उडणारा तिचा भडका, फ्रस्टेशन, बापाच्या बोलण्यात काहीतरी रास्त असल्याचा भाव, चिडचिड, रडू कोसळणं.... हे सगळं अक्षरशः अ – फा – ट होतं. विनय आपटेंना दाद द्यावी की तिच्याकडे बघावं हे न कळून चिडचिड झाली होती माझी, इतकी खास त्यांची केमिस्ट्री. 'कबड्डी कबड्डी'मधलं तिचं काम कबड्डीपटू मुलीचं. विनय आपटे बापाच्या भूमिकेत. दारुड्या भावाचं कबड्डीचं वेड नि त्यातून झालेली त्याची फरफट सोसणारा तो माणूस कबड्डीच्या पूर्ण विरोधात. त्यातून झालेली पोरीची नि बापाची जुगलबंदी होती त्यात. एखाद्या खेळाडूचेच असावेतसे न ठरणारे पाय, अंगातली न संपणारी ऊर्जा, उसळतं बंड... असं सगळं असलेली ती भूमिका मुक्तानं कहर केली होती. तीनेकदा तरी मी ते नाटक पाहिलं. तसंच 'फायनल ड्राफ्ट'ही. ते तर तिचं 'घरचं' नाटक. ती, मिलिंद फाटक, रसिका, नि गिरीश जोशी स्ट्रगलच्या काळात एकत्र राहत म्हणे. त्यामुळे तिचं गिरीशबरोबर ट्यूनिंग असणार यात शंका नव्हतीच. त्यातलीही भूमिका अशीच खास. गावातून आलेली, थापेबाज, बेरकी, पण अंगात लिहायचा किडा असलेली, काहीतरी सच्चं सांगण्याजोगं जवळ असलेली तरुण मुलगी. तिचा बनचुका, आयुष्याचं दार लावून कोरडा झालेला, जगण्यातला रस हरवून गेलेला शिक्षक. त्या दोघांच्यातली देवाणघेवाण होताना ठिणग्या उडाल्याचा भास होई. त्या नाटकाच्या एका प्रयोगात अत्यंत इंटेन्स प्रसंग चालू असताना प्रेक्षकांतलं कुणीतरी बोलायचं थांबेचना. शेवटी गिरीश जोशी बेअरिंग सोडून, थांबून, थेट तिकडे बघून म्हणला, "हे असं नाही चालू शकत. मी थांबतोय. तुम्ही बाहेर जा. मगच मी सुरू करीन." त्यात एक फायनॅलिटी होती. त्या बाई बाहेर पडल्या. त्यात दहा मिनिटं तरी गेली असतील. तोवर मुक्ता तिच्या भांबावलेल्या-चिडलेल्या-हट्टी मुद्रेत तशीच्या तशी पुतळा होऊन थांबलेली. "हां, सुरू करू." या गिरीश जोशीच्या एका वाक्यासरशी फ्रीज केलेली फ्रेम सुरू व्हावी, तशी सुरू. मी नाटकाइतकीच या हुकुमतीच्या दर्शनानं अवाक झाले होते.

नंतर तिला पाहिल्याचं आठवतं ते 'एक डाव धोबीपछाड' या वाह्यात सिनेमात. त्यात ती अशोक सराफांनी रंगवलेल्या एका श्रीमंत बापाची आईवेगळी लेक होती. नसलेल्या आईचा वास्ता देऊन, बापाला कसं गुंडाळायचं याचं रामबाण शास्त्र बनवणारी ती पोरगी. तिच्या बोलण्यातला गावरान लहेजा, छानछोकीची हौस असल्यानं नि तंत्रज्ञानाच्या एक्स्पोजरमुळे आलेले चुकीच्या उच्चारांतले इंग्रजी शब्द नि त्यातला स्टाईलमारूपणा, बेरकीपणा... एकुणात तर्‍हतर्‍हेच्या पुरुषांना खेळवण्यातलं कौशल्य नि ते आपल्याकडे आहे याचं भान... असं सगळं त्या कामात ठासून भरलेलं होतं. अशोक सराफांबरोबरचे तिचे प्रसंग बघणं म्हणजे... काय टायमिंग, काय प्लेसिंग, काय सफाईदार मेळ... असो. याबद्दल मी कितीही वेळ बोलू शकीन. दुसरी अशीच भूमिका म्हणजे तिचं 'जोगवा'मधलं उपेंद्र लिमयेबरोबरचं काम. केसांत जट आल्यामुळे देवदासी झालेली ती मुलगी. अंधश्रद्धेपोटीच लुगडं नेसून तृतीयपंथी म्हणून फिरणार्‍या उपेंद्र लिमयेशी तिचं सूत जुळतं. 'जीव रंगला' या गाण्यात त्या दोघांची शारीरिक जवळीक घडताना दिसते. अजय-अतुलचं संगीत, दिग्दर्शक राजीव पाटलांनी वापरलेल्या जुन्या घराच्या माडीच्या पावसाळी चौकटी, आणि अर्थात उपेंद्र लिमये – या सगळ्यांची कामगिरी थोरच आहे. पण मुक्ता – उफ्फ्! त्याच्या पोलक्याची बटणं काढून त्याच्या रुंद छातीवर हात फिरवताना तिचं बिचकणं आणि अखेर मोहाला शरण जाणं नि तेव्हाची तिची मुद्रा... देवा, इतका अस्सल शृंगार पडद्यावर पाहिल्याची आठवण मला नाही. 

मुक्तावर इतकं प्रेम असल्यामुळे आणि तिच्यातल्या त्या भक्ती-बर्वे-धाग्याची धास्ती असल्यामुळे 'चारचौघी' बघायला जाताना मला किंचित ताण होता. इतक्या सुंदर, भावखाऊ भूमिकेत, इतक्या वर्षांनी रंगमंचावर येताना आपलं पाणी सिद्ध करून दाखवण्याच्या दडपणाखाली तिच्याकडून काही अधिक-उणं होऊ नये अशी ती धाकधूक. अतिप्रेमापोटी आलेली. पण बाई आल्या, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं! नवर्‍याच्या विश्वासघातानं आलेलं हबकलेपण, त्यातून आईपाशी उलटा कांगावा करणं, उद्ध्वस्त होणं, आईनं झापल्यावर भानावर येणं, हळूहळू स्वतःचा करारी सूर शोधत जाणं, कणखर होणं... दृष्ट लागण्याजोगं सगळं. त्यात ती तिच्या नवर्‍याशी फोनवर बोलते असा एक मोठा प्रसंग आहे. त्या प्रसंगातला तिचा संताप, नवर्‍याबरोबरच्या शृंगाराच्या आठवणीनं आलेली कासाविशी, दुसर्‍या बाईच्या कल्पनेनं आलेला घायाळपणा, मुलीच्या आवाजानिशी एकाएकी बेभान होऊन रडकुंडीला येणं.. मध्ये बोलणार्‍या आईवर तिरमिरून तिला गप्प करणं... त्या प्रसंगानंतर पहिल्या अंकाचा पडदा पडतो. तो पडदा पडला नसता, तर पुढचं नाटक बघणं जड जावं – असा तो परफॉर्मन्स. रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे... या सगळ्या लोकांची तितकीच जबरदस्त, सहज साथ – हा शब्द त्या तिघींना अन्यायकारक आहे, मला कल्पना आहे, पण त्यांच्याबद्दल लिहिण्याची ही जागा नाहीय – आणि नाटकातली भाषा-आशय... हेही तितकंच मोठं आहे, खरं आहे. पण त्यातली मुक्ता – एखाद्या कोंदणात अचूक शोभणार्‍या हिर्‍यावर एकच प्रकाशतिरीप पडल्यावर तो लखलखतो, तशी ती त्या प्रसंगात झळाळून उठते.

अलिबागजवळ एका कौटुंबिक ट्रिपला गेलो असताना तिथे मुक्ताही आली होती. तीन दिवस सतत दिसत राही ती आजूबाजूला. सुरूंच्या बनातल्या एका टेकाडावर, समुद्राकडे टक लावून, एकटीच निवांत बसलेली दिसायची. तिची तंद्री भंगावीशी वाटली नाही. अखेर आपल्याला इतक्या आवडणार्‍या एखाद्या कलावंताला "तू जाम भारी आहेस!" यापल्याड काय सांगणार, नि त्यावर तो काय म्हणणार, असा नेहमीचाच पेच. त्यापोटी बोलायला जाणं टाळलं. तिच्या सगळ्या भूमिकांमागे आता मला तिची समुद्राकडे बघणारी शांत मुद्रा एखाद्या बॅकड्रॉपसारखी आठवत राहते, हे मला त्याबद्दल मिळालेलं बक्षीस.

मराठी नट्या ०२

आपण दुसऱ्या कुणाला दमदाटी करताना वरच्या दाताखाली खालचा ओठ आवळतो आणि डोकं खाली झुकवतो झटक्यानं, तसं करणारा एक टारगट दादागिरी-भाव रसिकाच्या चेहऱ्यात लपलेला आहे, असा कायम भास होई मला. बघता बघता ती 'क्या बे?' असं म्हणून टगेगिरी करायला लागेल, असं वाटायला लावणारा. मी तिची जी-जी कामं पाहिली, त्यांतली बहुतांश या छटेच्या जवळची होती म्हणूनही असेल. पण ते तितकंच नव्हतं. तिच्या व्यक्तिमत्त्वातच ते काहीतरी होतं असावं.

तिचं 'उंच माझा झोका गं' हे नाटक माझ्याकडून हुकलं. मग एकदम 'प्रपंच'मधली अलकीच. त्या भूमिकेतली रसिका डोक्यात गच्च रुतून राहिली. एकत्र कुटुंबातली मुलगी, नाटकात रस असणारी, स्वतंत्र मतं असलेली, ती बेदरकारपणे मांडायला न कचरणारी, रूढार्थानं बाईपणाच्या झुली चढवायला नकार देणारी, ढगळ्या पुरुषी शर्टपॅंटीत वावरणारी. त्या भूमिकेत 'तसं' काहीही नव्हतं, पण मला कायम ते काम बघताना तेंडुलकरांच्या 'मित्रा'ची आठवण यायची मात्र. मित्रामधली बंडखोरी अलकाच्या भूमिकेत होती. 'सुरणाची भाSजी'चा सूर लावणारी, "आई, अगं एकवीस वर्षांचीय फक्त आपली लतिका. लग्न?" म्हणून कळवळणारी, मंग्यासोबत लग्नाविषयी बोलताना-न बोलताना तिच्या नेहमीच्या नुराला न साजेसा कोवळा गोंधळ घालणारी अलका मला कायम आधी आठवते. रसिकाच्या सगळ्या आठवणीतच अलकाची आठवण वेगळी न काढता येईलशी विरघळून गेली आहे, असं जाणवतं. 

त्याच सुमारास तिचं 'सुपरहिट नंबर वन' नाटक पाहिलं. त्यात ती आणि उपेंद्र दोघं अतिरेकी होते! तिच्या त्या रावडी कामानं तिची प्रतिमा ठसलीच माझ्या डोक्यात. 'व्हाइट लिली नाइट रायडर' पुष्कळ नंतरचं. त्यातलं तिचं काम निराळं होतं. पण तोवर मीही बंडखोरीच्या वयातून त्या भूमिकेच्या वयाच्या जरा जास्त जवळ गेले होते, म्हणूनही असेल. अतीव आवडलं ते लेखन आणि कामही. जोडीदार नको असं नाही, पण आर्थिक-सामाजिक तडजोडी करण्याची गरज संपल्यामुळे, इंटरनेट स्मार्टफोन्ससह बहुमितीय ओळखींशी झगडत असल्यामुळे... जोडीदार शोधताना निराळ्याच अडचणी पेलणारी आमची पिढी. त्याबद्दलचं ते नाटक आवडलं. आणि त्यातली रसिकाची आडमुठी-किंचित छुप्या प्रकारे हळवी लिलीही आवडली. इतकी आवडली, की रसिका गेल्यानंतर सोनाली कुलकर्णीनं केलेलं ते काम बघायला मी परत गेले, पण कपाळाला आठ्या घालूनच. जणू दोष शोधायलाच. पण सोकुनं त्या भूमिकेला दिलेल्या छटा इतक्या वेगळ्या नि ताज्या होत्या की आवडलं ते काम. पण रसिकाशी निष्ठा इतकी, की 'हं, चांगलं केलंय.' असं ग्रजिंगलीच मान्य करता आलं.

'एक हसीना थी' आला नि रसिका हिंदीतच शिरली. त्या कामासाठी तिची निवड 'सुपरहिट नंबर वन'चा प्रयोग बघून झाली होती असं कळल्यावर मलाच उगाच जाम भारी वाटलेलं. कारण जेमतेम आठदहा प्रेक्षक असलेल्या चार-पाच प्रयोगांतला एक मी पाहिलेला. तिला हिंदीत बिनधास्तपणे वावरताना बघून जाम बरं वाटायचं, 'अर्थात! ती नाही तर कोण!' असं वाटायचं. 'भूलभुलैया'तली केरसुणीनं हूल देऊन अक्षय कुमारला हाकलायची ॲडिशन तिनं घेतलेली असणार आणि सेटवर लोक हसून वेडे झाले असणार, असं मला पाहताक्षणी वाटलं होतं. अजूनही वाटतं. 

पण हिंदीतली रसिका नंतरच्या काळातली. त्याआधी 'प्रभात' नामक एका मराठी वाहिनीवर तीच बारा-पंधरा नाटकं आलटून पालटून लागायची काही वर्षं. त्यात रसिका असलेलं 'गंमत-जंमत' हे नाटक असायचं. त्यात किती प्रकारच्या भूमिका केल्या होत्या तिनं! त्या टीव्हीवर पडीक असल्यामुळे मनमुराद बघता यायच्या. त्यातली तिची 'राड्डो'चं घड्याळ मिरवणारी नवश्रीमंत महिला आणि दाताच्या फणी पुढे असलेली बाई विशेष आठवते. त्यात तिची रेंज दिसे. चकित वाटायचं या जाडजूड देहाच्या, आडव्या बांध्याच्या मुलीचा आत्मविश्वास आणि शरीरावरची पकड बघताना. 'खबरदार'मध्ये ती संजय नार्वेकरची आई होती. कष्टकरी नऊवारी पातळ आणि कजागपणा यांचं मिश्रण रसिकाला कायच्या काय शोभून दिसलं होतं. 

नाटक चालू असताना फोनवर बोलणाऱ्या नि बोलता बोलता चक्क स्टेजवरच्या रसिकाला हातानं 'एक मिनिट हं, झालंच.' अशी खूण करणाऱ्या एका प्रेक्षकाची तिनं हतबल संतापानं केलेली, अवधूत गुप्तेच्या कार्यक्रमातली नक्कल थोर होती. या विषयावर ती आणि तिचा नवरा एक स्वतंत्र प्रयोग सादर करू शकतील कदाचित, असं वाटून गेलं होतं.

एकदा आशियाई चित्रपट महोत्सवाच्या दिवसात 'प्लाझा'बाहेर रेंगाळताना मला रसिका नि मुक्ता दोघी एकदम सुटकेसा खरेदी करताना दिसल्या. मला इ त क्या बेहद्द आवडणाऱ्या दोन नट्या एकत्र समोर बघून काही सुचलंच नाही बोलायला. तसंही जाऊन सांगणार काय, 'तुम्ही किती भारी आहात!' असं?! मग त्या दोघी प्लॅस्टिकचं हसू हसणार. नकोच ते. असं वाटून मी उलट फिरून तिथून निघून गेले. 

रसिका गेल्याचं कळल्यावर बाकी कशापेक्षाही माझी मेजर चिडचिड झाली होती. That was not fair. तिला किती काम करायचं होतं अजून. याला काय अर्थ होता? तिला कुणीतरी उलटी दमदाटी करून थांबवून घ्यायला पाहिजे होतं. पण तिला दम देणारं होतं कोण?

मराठी नट्या ०१

नटांच्या अभिनयाबद्दल भरभरून लिहितात, तसं नट्यांच्या बाबतीत होत नाही. नटी म्हटलं की मधुबाला-टाईपचं सौंदर्य आठवण्याची प्रथा आहे. पण मराठीत कसली एकाचढ एक नट्यांची परंपरा आहे! नि रूढ सौंदर्यबिंदर्य राहिलं बाजूला – बघणार्या माणसावर फुंकर टाकून मंतरून टाकणारा अभिनय नि वावर नि व्यक्तिमत्त्व असलेल्या नट्या. रेंज आणि इंटेन्सिटी आणि सूक्ष्मातिसूक्ष्म भाव दाखवण्याची क्षमता वागवणार्या. शबाना आझमी ‘Why actress? I am an actor.’ म्हणते तसं त्यांना नट्या न म्हणता कलाकार म्हणावं नि लिंगभेदासह येणारी कमनीय सौंदर्याची अपेक्षा साफ पुसून टाकावी, असा मोह होतो.
~
लीना भागवत त्यांपैकी एक. माझी कायमची तक्रार आहे, की आपण लीना भागवत या बाईच्या अभिनयकौशल्याचं पुरेसं अप्रूप बाळगलेलं नाही, कौतुक केलेलं नाही. मी कमी ठिकाणी पाहिलं आहे तिला. सगळी मिळून तीन नाटकं. त्यांतलं एक तर रेकॉर्डेड. टीव्हीवरच्या दोन-तीन मालिका. पण माझ्यावर त्या बाईनं जादू केली आहे.


रूढ अर्थानं सुंदरबिंदर तर ती नाहीच. काळीसावळी बाई. खळी पडते तिला. पण त्या खळीकडे लक्ष्य जावं, अशी कामं तिनं केलेली पाहिली नाहीत. ती कायम सर्वसामान्य मुलगी वा बाई असते. ‘अधांतर’मध्ये तिनं मंजूची भूमिका केली आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय चाळ. निवर्तलेल्या गिरणी कामगाराचं घर. मंजूचा नवराही गिरणीकामगार. पण ती आणि नवरा दोघेही आईकडे राहत असलेले. फटकळ, स्ट्रीटस्मार्ट मंजूला आईनं बिजवराकडे उजवून दिल्याचा सल आहे. पण आपलं आपण बघावं लागतं ही स्वार्थी जाणीवही. गाऊनमधला वावर, बोलता-बोलता फणकार्
यानं केसांचा अंबाडा बांधून टाकायची लकब, कोकणी ब्राह्मणेतर घर मुंबईच्या चाळीत वसलं की तोंडी येणारी बोली... लीना भागवतनं केलेल्या मंजूखेरीज दुसर्या कुणालाही डोळ्यासमोर आणणं शक्य नाही. अर्थात, हे ‘अधांतर’च्या सगळ्याच पात्रयोजनेबद्दल तितकंच खरं आहे, पण त्यानं भागवतबाईंचं पुण्य कमी होऊ नये. ‘नाय’चा तिचा उच्चार आणि जहाल नजर या दोन्ही गोष्टींना तुलना नाही. असंच तिचं काम ‘पाऊस येता येता...’ या मराठी मालिकेत बघितलं होतं. माझ्या आठवणीनुसार दैनंदिन साबणवड्या सुरू होण्याच्या जस्ट आधीच्या दिवसांतली ती मालिका होती. त्यातही ती एका कनिष्ठमध्यमवर्गीय विवाहितेचं काम करत असे. आपल्या बहुधा फेमिनिस्ट नणंदेला उद्देशून तिनं उच्चारलेलं “राह्यलं. फडकवा – स्त्रीस्वातंत्र्याचे झें-डे!” हे वाक्य मला अजुनी आठवतं. त्यातली तुच्छता, जाणतेपणा, राग... सगळंच एकमेवाद्वितीय होतं. तशीच तिनं पालेकरांच्या ‘कैरी’मध्ये केलेली मोलकरणीची भूमिका. किती कमी संवाद आहेत तिला! पण तिचा नुसता वावर – चवचालपणा, नागडा स्वार्थ, देहाचा पुरेपूर वापर करणारी मानसिकता, नायिकेच्या नवर्याला पदराला गुंडाळून घेतल्याचा ताठा... या सगळ्याचा गाळीव अर्क तिच्या वावरात आहे. लीना भागवत पडद्यावर दिसत असली की ती तीन-पदरी मंगळसूत्राची फॅशन आणणार्या जान्हवी नामक नायिकेची मालिकाही मी चुपचाप थांबून बघायचे. नवर्याच्या आत्यंतिक प्रेमात असलेली, पण सासूच्या धाकामुळे त्याला चोरून भेटत असणारी, भाबडी, धांदरट, प्रेमळ बाई अशी तिची भूमिका होती. लीना भागवत त्या फडतूस मालिकेतले काही क्षण बहारदार करून सोडायची. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतलं तिचं काम याच धाटणीचं होतं. मध्यमवयीन, संसारी, प्रेमळ गृहिणीचं. निव्वळ लीना भागवत – मुक्ता बर्वे एकत्र दिसल्यावर काय होईल, या उत्सुकतेपोटी ती मालिका बघितली जायची. तेंडुलकरांच्या ‘अशी पाखरे येती’चा नव्या संचातला प्रयोग मी पाहिला होता. त्यात ती सरू होती. नि काय होती! अहाहा...

ती होती म्हणून तिचं नि मंगेश कदमचं काम असलेलं एक नाटक बघायला गेले. त्यात हे थो हो र ह जोडपं मंचावर काहीतरी बोलत होतं. मग शशांक केतकर नावाची नुकतीच मराठी मालिकेतून लोकप्रिय झालेली एक पुटकुळी येऊन स्टेजवर फुटली. लोकांनी प्रेक्षागारातून ‘श्री! श्री!’ – हे त्याचं मालिकेतलं नाव – अर्थात – अश्या चकित-भारावलेल्या हाका मारल्या नि आपण अशा प्रेक्षकांत असायची लाज वाटून मी उठून आले. असो.

अजूनही ‘भाडिप’ची डोक्यात जाणारी कांदेपोहे-स्फुटमालिका बघितली जाते, त्याला कारण ही बाई. कर्तृत्वाचा काही संबंध नसता निव्वळ राहत्या शहरामुळे आलेला आत्मविश्वास, आगाऊपणा, भोचकपणा, मानभावीपणा... लीना नाही दाखवणार तर कोण?!

‘दिल के करीब’मध्ये सुलेखा तळवलकरनं तिची एक मुलाखत घेतली आहे, त्यात ती मंगेश कदम आणि तिच्या लग्नाविषयी, तिच्या कामाविषयी, कामाविषयीच्या तिच्या दृष्टीकोनाविषयी बोलते. ती मुलाखत बघून अलीकडच्या काळात लीना भागवत बघण्याची माझी तहान काही अंशी शमली. पण तिला तिच्या स्वभावामुळे तिच्या योग्यतेचं काम मिळत नसणार, असंही वाटून गेलं. तिनं आजवर जे केलंय त्याहून वेगळं काही न केलं, तर तिच्यावर आपल्याला जे येतं, तेच करत राहिल्याचा आरोप होऊ शकेल. तिचा वकूब पुष्कळ आहे. तिनं नि मराठी नाटक-सिनेमावाल्यांनीही ओळखावा तो.

बुजरी गाणी १०

कसल्यातरी आघातानं एकाएकी मोठं होऊन बसावं लागलेल्या लोकांचं वाढलेलं वय निराळं कळतं. त्या वाढलेल्या वयात राठपणा असतो, पण त्यासोबत येणारी सुंदर नैसर्गिक प्रगल्भता नसते. नुसताच जगाला फसवू शकणारा मुखवटा असतो. काही कारणानं त्याला तडा गेला, की वाढता वाढता थबकून राहिलेलं कोवळं मूल भांबावून बाहेर डोकावू लागतं. नजरेत वयाला न जुमानणारी आर्तता येते. ती या गाण्यातल्या नायकाच्या नजरेत आहे.

‘अग्निपथ’च्या नायकाची गोष्ट ही हिंदी सिनेमाच्या नायकाची स्टॅंडर्ड गोष्ट – बापाच्या खुनाचा सूड घेऊ पाहणाऱ्या मुलाची. सगळ्यांना चिरपरिचित असलेली. पण गाण्यात सुडाचा प्रवासबिवास नाही. निखळ मूलपण आहे.

सगळी घासून गुळगुळीत झालेली दृश्यं दिसतात गाण्यात. लहानपणीच्या आनंदाशी लागेबांधे असलेली. फुगे हातात घेऊन उडवणं, समुद्रकिनारी धावत सुटणं, साबणाचे फुगे उडवणं, आकाशपाळण्यात बसणं, फॅमिली फोटो काढून घेणं... सगळी मूलपणाशी निगडित असलेली ठरीव-साचेबद्ध सुखं. पण त्यात किती आर्तता भरली जाते सोनू निगमच्या सुरांनी आणि हृतिकच्या नजरेनी! त्याची धाकटी बहीण त्याला इतक्या वर्षांनी प्रथमच भेटलीय. तिला मिठीत घेतल्यापासून ते पार गाण्याच्या शेवटापर्यंत हृतिकच्या नजरेतला अविश्वास काही केल्या लपत नाही. जणू या साध्या-साध्या सुखांवर त्याचा हक्क नाहीचेय. कुणीतरी येऊन त्याचं स्वप्न मोडून टाकेल नि त्याला जाग येईल, म्हणून सावधपणी सुखाची चव चाखावी, असा तो गाणंभर वावरताना दिसतो.

गाण्यात त्याची प्रेयसी असलेली प्रियांका चोप्राही आहे. पण हृतिक आणि ती यांच्यातला रोमान्स कुठेच नाही. ती जणू त्या बहीणभावांना जवळ आणू पाहणारी मैत्रीण आहे निव्वळ. नायकाची बहीण, नायक, आणि नायिका या तिघांचा ग्रुप फोटो काढताना एका क्षणी नायकाचा अवघडलेपणा फुटून जातो नि ते हसून एकमेकांकडे प्रेमभरानं बघतात, त्या क्षणी एकाएकी ते तिघंही कुटुंब होऊन जातात.

तो त्याच्या लहानग्या बहिणीचा लहानपण हरपून गेलेला भाऊ होतो. तिच्यासोबत अडखळत साबणाचे फुगे काढतो, ते न जमून स्वतःलाच हसतो. तिला पाळण्यात बसवल्यावर, उंच गेलेल्या तिच्याकडे कौतुकभरल्या नजरेनं पाहताना, तो तिचा बापही होतो; तेव्हा ‘ये लम्हां कहाँ था मेरा....’ असं विचारणारा सोनू निगमपण आपल्याला उंच उंच घेऊन जातो...

सुरात आणि दृश्यात इतकी आर्त कोवळीक भरणारं हे गाणं फार फार आवडतं.

~


अभी मुझ में कहीं बाकी थोडी सी है जिंदगी
जगी धडकन नई, जाना जिंदा हूँ मैं तो अभी
कुछ ऐसी लगन, इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा
अब है सामने, इसे छू लूँ जरा, मर जाऊँ या जी लूँ जरा
खुशियाँ चूम लूँ, या रो लूँ जरा, मर जाऊँ या जी लूँ जरा

धूप में जलते हुए तन को, छाया पेड की मिल गई
रूठे बच्चे की हंसी जैसे, फुसलाने से फिर खिल गई
कुछ ऐसा ही अब महसूस दिल को हो रहा है
बरसों पुराने जख्म पे मरहम लगा सा है
कुछ ऐसा रहम, इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा

डोर से टूटी पतंग जैसी, थी ये जिंदगानी मेरी
आज हो कल हो मेरा ना हो, हर दिन थी कहानी मेरी
इक बंधन नया पीछे से अब मुझको बुलाये
आने वाले कल की क्यों फिक्र मुझको सता जाये
एक ऐसी चुभन, इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा

~
नुक्ते आणि चांदबिंदी टंकायकरता कळपाट बदलण्याचा कंटाळा केल्यामुळे आणि हिंदी प्रमाणलेखनाचं अज्ञान असल्यामुळे चूक-भूल-देणे-घेणे.


Monday, 4 September 2023

बुजरी गाणी ०९

हे गाणं सगळ्यांत आधी मुंबईतल्या पावसाचं आहे. मग त्यातल्या प्रेमिकांचं.
भेटायचं ठरलंय. सगळीभर उत्कंठा, हुरहुर, अधीरता भरून राहिल्यासारखी. आणि पाऊस. आणि आधी पिवळ्याधम्मक फ्रॉकमधली नि मग जांभळ्या-पांढऱ्या कुर्त्यातली सोनाली बेंद्रे. आणि तसाच लालबुंद शर्टातला अक्षय खन्ना. दोघेही कोवळे, नखशिखान्त भिजलेले-ओले, आतुर.
त्यानं तिला काहीतरी नाजूकशी भेटवस्तू निवडताना मनातल्या तिलाच पसंती विचारावी आणि तिनंही ती नाक उडवत सांगावी. सजून तयार होताना तिच्या मनातल्या त्यानं तिच्या गालांवर हलकेच ओठ टेकावेत...
नि तरी भेट अजून घडायचीच आहे बरं का. वाटेत मुंबईचा पाऊस आडवा आला आहे!
तुंबून पडलेल्या टॅक्स्या, रस्त्यांवरचे खड्डे, रिक्षातून उतरून धक्का मारावा लागणं, बसनं एखाद्या खड्ड्यात चाक घालून अंगावर चिखलाची चिळकांडी उडवणं... असा शहरी पाऊस. चक्क रोडरोलर चालवत-गवळ्याच्या सायकलवरून-कुणाकुणाच्या स्कूटरच्या साइडकारमधून-हातगाडीवरून... कुणाकुणाकडून लिफ्ट्स घेत घेत केलेला प्रवास. मुंबईचा ट्रेडमार्क म्हणता येतील अशा यच्चयावत गोष्टी... मिश्कील हसणाऱ्या कोळणींपासून ते लोकल रेल्वेच्या स्टेशनांपर्यंत, नि मरीन ड्राइव्हवरच्या लाटांपासून ते हातात न ठरणाऱ्या छत्रीपर्यंत. नाही म्हणायला यात क्रिकेट नाही. पण ती उणीव पावसात फुटबॉल खेळणाऱ्या पोरांनी भरून काढलीय.
सगळ्या अडचणींवर मात करत, बंद पडलेल्या शहराला न जुमानता, कधी हट्टानं तर कधी चुचकारत, भिजत-हसत.. दोघं एकमेकांना संकेतस्थळी भेटतात नि आपल्यालाच एकदम भारी वाटून जातं!
२६ जुलै घडण्यापूर्वीच्या काळातलं हे गाणं. 'दर वर्षी एकदा गाड्या बंद पडतातच. उसमें क्या हय!' असं म्हणत पावसाला कोलणाऱ्या मुंबईकरांचं. त्यामुळे आणि त्यातल्या प्रेमिकांच्या कशा-कशानंही न विरजणाऱ्या उत्फुल्ल मूडमुळे हे गाणं टवटवीत - चिरतरुण - हसरं भासतं. हिंदी गाण्यांतल्या पावसाची आठवण निघताक्षणीच तत्काळ दाराशी येऊन 'हॅलो!' करतं.
आता त्याचीही आठवण काढून झाली. आता तरी पाऊस यावा बा.

सावन बरसे, तरसे दिल, क्यों ना निकले घर से दिल
बरखा में भी दिल प्यासा है, ये प्यार नहीं तो क्या है
देखो कैसा बेकरार है भरे बाजार में
यार एक यार के इंतजार में
एक मोहब्बत का दीवाना, ढूंढता सा फिरे
कोई चाहत का नज़राना, दिलरुबा के लिये
छमछम चले पागल पवन,
आये मज़ा भीगे बलम
भीगे बलम, फिसले कदम, बरखा बाहर में
एक हसीना इधर देखो कैसी बेचैन है
रास्तेपर लगे कैसे उस के दो नैन है
सच पूछिये तो मेरे यार,
दोनों के दिल बेइख्तियार
बेइख्तियार, है पहली बार, पहली बहार में
(शब्द इंटरनेटवरून ढापले आहेत, चूकभूलदेणेघेणे.)