Sunday 21 July 2024

थँक्स टू हिंदी सिनेमे ०४

लग्नामधली गाणी हा बॉलिवुडमधला एक हुकमी एक्का. भरपूर गजरे ल्यायलेल्या, दागदागिन्यांनी मढलेल्या, खिदळणार्या, लाजणार्या , हसणार्याहसवणार्या खूप बायका, खूप रंग आणि रोषणाई वापरून केलेल्या सजावटी, आणि सनईचे सूर. रॉकी और रानी की प्रेमकहानीमधल्या तेरी कुडमायी के दिन आ गयेबघताना त्यातलं करणजोहरीय सौंदर्यशास्त्राला अनुसरून असलेलं, काहीसं बटबटीत, पण तरीही निव्वळ वेगळेपणामुळे टवटवीत वाटणारं रोल रिव्हर्सल जाणवलं आणि एकापाठोपाठ एक गाणी आठवत गेली. त्यातलेही निरनिराळे प्रकार दिसत गेले.

एक प्रकार म्हणजे सरळच लग्न ठरलं आहे, वा उद्यावर वा आत्तावर येऊन ठेपलं आहे, डोळ्यांत स्वप्नं आहेत, मनात उत्कंठा आणि आतुरता, आणि आईबापापासून विरहाचं दुःख. पण मजा अशी, की बॉलिवुडचा स्वभाव हिंदी आणि त्यामुळे उत्तर भारताला जवळचा. त्यातलं विरहाचं दुःख बाबुल का अंगनासोडून जाण्याचं. आईला तितकासा भाव गीतकारही देत नाही. बाबुल की गलीयाँ छोड चली’! अर्थात, अगदी माहेराला महत्त्व असलेल्या महाराष्ट्रातही कितीतरी ठिकाणी वधूच्या आईला लग्न बघायचीही परवानगी नसत असे, म्हणताना... ठीकच म्हणायचं! अशा गाण्यांमध्ये विशेषतः नवर्या मुलीवर शुभेच्छांची नुसती खैरात असते. तिला खुशीयाँमिळाव्यात म्हणून दुवाएँ’; तिच्या पदरात चंद्र, तारे; तिचा चेहरा कसा चंद्राच्या तुकड्यासारखा, तिची कांती कशी दुधासारखी, झूमर असं, झुमका तसा, बिंदी अशी, कंगन तसं, हातावर मेंदी कशी, पायातले पैंजण कसे... एक ना दोन. नवर्या मुलीचं काम नुसतं गोरेपान नितळ खांदे आणि कर्दळीसारख्या पोटर्या उघड्या टाकून नाजूक हातांनी हळद-चंदन लावून घेण्याचं नाहीतर पॅसिव्हली साजशृंगार करून घेत, आरशासमोर बसून लाजत, सुंदर दिसत हळूच हसण्याबिसण्याचं. मेंदीला मोठाच भाव. बहनों ने रोशनी कर ली मेहंदी से जला के उंगलीयाँकाय किंवा चक्क मेहंदी लगाके रखना, डोली सजाके रखना’. साजण येईल तेव्हा त्याच्याकरता तय्यार राहायचं, बस. अॅक्टिव्ह रोलची जबाबदारी पियाच्या गळ्यात घालून या नवर्या मस्त मोकळ्या झालेल्या असतात. डोळ्यांत विरहाचं माफक पाणी, पण मुख्यत्वे तिकडची स्वप्नं. मेरे बन्नो की आयेगी बारातपासून बन्नो तेरी अखियाँ सुरमेदानीपर्यंत आणि मेहंदी है रचनेवाली, हाथोंमें गहरी लालीपासून नवराई माझी लाडाची लाडाची गोपर्यंत. छलका छलका रे कलसी का पानीपासून हम तो भये परदेसपर्यंत. इथल्या सख्यांच्या, आईबापाच्या विरहाचं दुःख आहे. पण त्याला तरी काय इलाज! मैं तो भूल चली बाबुल का देस, पिया का घर प्यारा लगे...

राजीतल्या उंगली पकड के तूने चलना सिखाया था नामध्ये याला अपवाद होता. कारण नवरी मुलगी फक्त नवरी मुलगी नव्हती. पण असे अपवाद नियम सिद्ध करण्यापुरतेच. बाकी बहुतेक वेळा साजनजी घर आये दूल्हन क्यों शर्माये’…

यात नवर्या मुलीला शंभरातून पन्नास वेळा तरी ह-म-खा-स बन्नो हे नामाधिधान लावलेलं असतं. मग तिला सल्लेबिल्लेही दिलेले असतात. ते पोक्त आजीबाईछाप सल्ले असतातच. पण फक्त तितकेच असतात असंच काही नाही. देखो बन्नो मान न जाना, मुखडा उनको ना दिखलाना, पहले सौ बातें मनवाना, केहना बोलो, कर के सलामी, बन मैं करूंगा तेरी गुलामी...असाही व्यावहारिक वळसा असतो. वास्तविक नवर्या मुलाला तसं परफॉर्मन्सचं किती प्रेशर असतं. नवर्या मुलीला जाऊन निदान पहिल्या रात्री तरी मेलेल्या माशासारखे भाव सलज्ज डोळ्यात घेऊन पुतळा होऊन बसायचं असतं. करायचं ते नवरा मुलगा करणार असतो. पण ज्याला काही करून मर्दानगी सिद्ध करायची असते, त्याचं काय? त्या बिचार्याला सल्लेबिल्ले देण्याची काही पद्धत बॉलिवुडमध्ये नाही.

नवर्या मुलीच्या मनात नुसतीच प्रियाची ओढ असते असंही नाही. शृंगाराची स्पष्ट आतुरताही असते. जिया जले जान जलेच्या शब्दांत उघडच अंग अंग में जलती हैं, दर्द की चिंगारीयाँ, मसले फूलों की मेहक में तितलीयोँ की क्यारियाँ...असं होतं, ते काय उगाच? ‘रुकमणी रुकमणी, शादी के बाद क्या क्या हुआ...हा त्याचाच एक अवतार. धीरे धीरे खटिया पे खटखट होने लगी...यात कल्पनेला वावबीव तरी कुठे आहे?! थेट मुद्द्याला हात!

अलीकडे लापता लेडीजमध्ये नवर्या मुलीच्या पोटातली अनिश्चिततेची भीतीही सुरेख चितारली होती. आंगन में पेड वहाँ होगा के नही, होगा तो झूला उसपे होगा की नही…’ इथपासून ते नवरा घोरत तर नसेल... इथपर्यंत.

पण कायम सिनेमाची नायिकाच नवरी मुलगी असेल असंही काही नाही. मैत्रिणीच्या नाहीतर बहिणीच्या लग्नात मिरवणारी आगाऊ नायिका आणि हीरोचा तसलाच आगाऊ कारा मित्र हा बॉलिवुडमधल्या प्रेमकथांमधला एक हमखास ट्रोप. हम आप के हैं कौनमधली जूते दे दो पैसे ले लोतशातलंच.

पण हम आप के हैं कौनअसल्या गाण्यांची बॅंकच बाळगून आहे म्हणा. लग्नातल्या गाण्याचा कुठलाही प्रकार सांगा, तो त्यात सापडणारच. आगाऊ बहीण आणि भाऊ यांची चेष्टामस्करी आणि पुढे प्रेमात पडायची तयारी? ‘जूते दे दो पैसे ले लो’. नायिकेचंच लग्न आणि नायक विरहानं व्याकूळ? ‘मुझ से जुदा हो कर’. लग्नासाठी उतावीळ लेक? ‘माईनी माई मुंडेर पे तेरे...लग्नातली नवरा-नवरींची चेष्टामस्करी आणि दुवाएँ? ‘वाह वाह रामजी’. चावट आणि वाह्यात मस्करी? आहे की. दीदी तेरा देवर’. अगदी गलोलीनं नितंबावर फुलं फेकून मारण्यापर्यंत सबकुछ. विहीण आणि व्याह्यांमधली चेष्टा? काळजी सोडा, तेही आहे – ‘आज हमारे दिल में...

तर – ‘हम आप केचं सोडून देऊ!

आपलं स्वतःचं लग्न जमवण्याच्या भानगडीत इतरांची लग्नं मनापासून अटेंड करणारे स्मार्ट लोक बॉलिवुडमध्ये चिकार. हम दिल दे चुके..मधलं आँखों की गुस्ताखीयाँ..’, ‘कभी खुशी कभी गममधलं बन्नो की सहेली रेशम की डोरी’ (पाहा, इथेही बन्नो आहेच!), ‘प्यार तो होनाही थामधलं आज है सगाई’…. अशी कित्तीतरी गाणी मिळतील. या गाण्यांमधला मूड प्रसन्न, उजळ, रंगीत असतो. नायिका आगाऊ असते थोडी, पण नायकानं थोडी मर्दगिरी केल्यावर तिच्या डोळ्यांत एकदम लाज उमटून जाते. नायकनायिकांना इतर लोक सतत कट केल्यागत एकत्र आणत असतात. कधी तिच्या नि त्याच्या ओढण्यांची गाठ, कधी त्याच्या कुर्त्याच्या बटणात तिची ओढणी, कधी दोघांना एका फेट्याच्या कापडात एकत्र आणपूरी कायनात दोनों को... असो!

अजून एक प्रकार म्हणजे असफल प्रेम आणि त्याचं वा तिचं लग्न अटेंड करावं लागणं. या सिच्युएशनमध्ये एकट्या राहिलेल्या इसमाला (वा इसमीला) कम्माल म्हणजे कम्माल अॅटिट्यूड आलेला असतो. एकतर माझं काय व्हायचं ते होवो, तुझं भलं होवोअसा स्वार्थत्यागाचा उमाळा, किंवा मग नुसते अर्थपूर्ण दुःखी टोकदार कटाक्षच कटाक्ष... पॅसिव्ह अग्रेसिव्ह वागण्याची पार हद्द. या प्रकारातलं मूळपुरुष गाणं म्हणजे अजीब दास्ताँ है ये’. आता झालंय ना त्याचं लग्न? मग का उगा त्याच्या हृदयाला डागण्या देतीस बाई? जा ना गप निघून. पण नाही. असं केलं तर ती नायिका कसली! राजा की आयेगी बारात...त्यातलंच. तुमबिन जीवन कैसा जीवनमध्ये बैलगाडीच्या मागून विद्ध-संतप्त चेहर्यानं चालणारा जया भादुरीचा प्रियकर आठवा. किंवा स्वतः मरणार असल्यामुळे प्रेमपात्राला नीटस नवरा गाठून देऊन वर तिला त्याच्या प्रेमात पाडणारा 'माही वे'मधला शारुख. किंवा मग अलीकडच्या सुना है के उन को शिकायत बहुत हैमधली गंगूबाई... काय तो कफन पेहन के कुर्बान होण्याचा भाव... हाय अल्ला!

याचाच एक पोटप्रकार म्हणजे लग्न करायचं, पण मनात मात्र प्रियकर किंवा प्रेयसी. वीर-झारातलं मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ...किंवा देवदासमधलं हमेशा तुमको चाहा’. पण देवदाससगळाच तसा... पुनश्च असो!

अजून एक खास प्रकार म्हणजे निव्वळ चावटपणा. मेरे हाथों में नौ नौ चूडीयाँ हैंमधली कल चोली सिलाई आज तंग हो गईम्हणत धुंद होऊन नाचणारी श्रीदेवी, ‘इश्शकजादेमधल्या मेरा आशिक छल्ला वल्लातला पैजामे से लडते हुए रात बितानेवाला आशिकही काही उदाहरणं. रुकमणी रुकमणीत्यांपैकीच, आणि लग्नातलं नसलं तरी डोहाळे पुरवता न येणार्या बावळट साजणाची चेष्टा करणारं दीदी तेरा देवर दिवानाही त्यांपैकीच. होता होईतो पुरुषांना बघा-ऐकायला मनाई करून खास स्त्रीवर्गाला गोळा करून शृंगारविषयक चावट चेष्टामस्कर्या करणं हा या गाण्यांचा विशेष हेतू.

अशी कितीतरी गाणी निरनिराळ्या कारणांनी लक्षात राहून गेलेली, आवडलेली. पण या ठरीव साच्यांमधली असूनही त्यांना बगल देऊन जाणारी, वेगळेपणानं ठसलेली गाणी अगदी क्वचित.

सत्यातलं सपनों में मिलती हैत्यांपैकी एक. ते गाणं अगदी मुंबई पद्धतीच्या लग्नाचं आहे. नवरा-नवरी समोर स्टेजवर आणि प्रेक्षक खाली खुर्च्यांमध्ये बसलेले. पुरुष एकतर निवांत बसलेले तरी नाहीतर पार कायच्या काय हालचाली करून नाचम्हणायला जड जाईल, असा नाच करणारे. निखळ पुरुषी ऊर्जा. निळाशार सोनेरी बुंदक्यांचा आणि गुलाबी काठाचा शालू नेसलेली शेफाली छाया त्या गाण्यात बघून घ्यावी. काय तिचा चार्म! मागे येणार्या नवर्याला लटक्या रागानं रिकाम्या रिक्षाची उपमा काय देते, मध्येच लाडात येऊन त्याच्या थोबाडीत काय मारते, कमाल लालित्यानिशी ठुमकते काय... ते सगळं गाणं तिच्याभोवती फिरतं. साथीला आशाचा मुरलेला खट्याळ आवाज आणि बॅकग्राउंडमध्ये कुठेतरी स्वप्नदृश्यातली शालीन उर्मिला.

बॉम्बेतलं केहना ही क्यावास्तविक प्रेमात पडू बघणार्या नायक-नायिकांचंच. पण मणिरत्नम आणि रेहमान अशा एक सोडून दोन-दोन परिसांचा स्पर्श त्याला झालेला असल्यामुळे ते कुठल्या कुठे गेलं आहे. भित्र्या हरणीसारखी पण अनुरक्त झालेल्या प्रेमिकेची भिरभिरती-लाजरी नजर... तबल्याचा दिलखेचक ठेका... सोनेरी झालरी लावलेल्या झिरझिरीत ओढण्या ल्यालेल्या बायकापोरीउंचच उंच अवकाश असलेल्या इमारती... आणि स्वप्नील छायाप्रकाशाचा खेळ.

बधाई होमधलं सजन बडे सेंटीअसंच मजेशीर. त्यातल्या लग्नात वावरणारे नीना गुप्ता आणि गजराज राव चाळिशी-पन्नाशीच्या आसपासचे. पण नीना गुप्ता गरोदर असल्यामुळे स्वतःच्या पौरुषाच्या कामगिरीवर निहायत खूश असलेला गजराव राव तिला नव्याच कौतुकानं न्याहाळणारा. कधी गच्चीवरून खालच्या तिच्याकडे प्रेमभरानं बघणारा, तर कधी जिन्यावरून उतरणार्या पत्नीच्या पूर्ण स्त्रीदेहाचा दिमाख विस्फारल्या, चकित नजरेनं बघणारा. कधी हळूचकन तिच्या पोटाची अलाबला घेणारा. कधी आईची करडी नजर जाणवून गोरामोरा होणारा... त्यातला त्या दोघांमधला चोरटा पण लोभस शृंगार बघताना खूप मजा आली होती, किंचित भरूनही आलं होतं.

गँग्स ऑफ वास्सेपूरमधलं तार बिजली से पतले हमारे पियाहे अजून एक रत्न. त्याला लोकसंगीताची डूब आहे आणि लग्नातल्या मेहंदी-संगीत समारंभाचा अस्सल ढोलक ठेका. तशा गाण्याबजावण्यात भांड्यावर चमचा वाजवत ठेका धरतात असं स्नेहा खानविलकरला कुणीतरी म्हटलं म्हणून तिनं गाण्यात टटक टटक टटक टटक...असे शब्दच चपखलपणे वापरले आहेत. विधवा सासू आणि विधवा थोरली जाऊ नव्या सुनेच्या स्वागतासाठी कौतुकानं गाताहेत, हवेत आनंद आहे, शब्दांमुळे आलेली हलकी मस्करी आहे, हसर्या मुद्रा आहेत... पण सासर्याच्या आठवणीनं कातर झालेल्या सासूला बघून चमकलेली नवी सून बघता बघता तिला सावरून घेते. तिची त्या घराचं होऊन जाण्यातली परिपक्वता आणि पाठीमागच्या गाण्यातल्या सुरातली विद्धता... त्या गाण्यातली मूळ मिश्किली ओलांडून ते गाणं कुठल्या कुठे उंचीवर निघून जातं. हुमा कुरेशीचं कौतुक करायचं, की रिचा चढ्ढाचं, की स्नेहा खानविलकरचं, शारदाबाईंचं की अनुराग कश्यपचं... कळेनासं होतं.

मीरा नायरचा मॉन्सून वेडिंगलग्नातच घडणारा. त्यातलं दिल्लीकर श्रीमंती लग्न आणि त्यातले नात्यांचे अस्सल भारतीय गुंते लक्षात राहतातच. पण श्रेयनामावली सुरू असताना वाजणारं कावा कावाबघताना आपण सिनेमातल्या कंत्राटदाराचं आणि मोलकरणीचं झेंडूच्या केशरी रंगांत न्हालेलं लग्नही आठवून खूश होत राहतो, ही त्या सिनेमाची प्रसन्न खासियत.

ही काही समग्र यादी नव्हे. तशी ती बॉलिवुडबाबत शक्यही नाही. अजून तासभर गप्पा ठोकत बसलो तर अजून अशीच पन्नासेक गाणी आपण सहज काढू शकू. तूर्त ही आवडलेल्या चंदेरी लग्नगाण्यांची आठवण नुसती...

अशीच एक आठवण एकदा पार्टीतली गाणी या प्रकाराची काढायची आहे, एकदा वयात आल्या-आल्या तारुण्यानं मुसमुसून गात सुटणार्या नायक-नायिकांच्या गाण्यांची... इरादे काय, चिकार आहेत. फिर कभी.

Wednesday 17 July 2024

आजीची गोष्ट ०५

(भाग ०४)

तिला शिक्षणाची हौस होती, म्हणजे किती होती! तिच्या लहानपणी तिला फारसं शाळेत जाता आलं नाही. काळही वेगळा, मुलींना शिकवण्याला फारसं महत्त्वच नव्हतं. ती ज्या खेड्यात जन्मली तिथे शाळाही नव्हती तेव्हा चौथीच्या पुढे. शिवाय घरची गरिबी.

सकाळी कामं करून शाळेत जायची, तर जाताना काही खाऊन जाणं जमत नसणार, इतकी कामाची धावपळ. तेव्हा डबा वगैरे नेण्याचा प्रश्नच नव्हता. दुपारी तीन-चार वाजता घरी यायची, तेव्हा तिच्या वाटचा गुरगुट्या भाताचा थिजून गारगुट्ट झालेला वाटीएवढा गोळा केळीच्या पानाखाली झाकून ठेवलेला असायचा. तो जेवताना तिला काय वाटत असेल? कधीच्या काळी केळीचं पान बघायला मिळणार्‍या आम्हां शहरी मुलांना केळीच्या पानावरजेवण्याचं कोण आकर्षण. गरम अन्न केळीच्या पानावर वाढलं की त्या वाफेनं केळीच्या पानावर असलेलं एक मेणसदृश रसायन वितळतं आणि अन्नात मिसळतं. त्याचा विशिष्ट वास अन्नाला येतो. तो वास मला फार आवडतो. पण आजीला त्या वासानं कसंसंच होत असे. घरी काही विशेष समारंभ वगैरे असला, एकत्र जेवणं असली की भांडी घासायला कमी असावीत, म्हणून मुद्दाम केळीची पानं आणवून घेतलेली असायची. पण ती मात्र केळीच्या पानात कदापि जेवायची नाही. तिचं जेवण ताटात. त्या नकोसेपणामागे काय-काय असेल!

इतकं करून शाळेचं शिक्षण जेमतेम चौथी पास. ती राहून गेलेली हौस तिच्यात मूळ धरून राहिली असावी. स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी तर तिनं खूप कष्ट केले. अंकगणितात तिला गती होती. आई सांगते त्यानुसार पार डीएडच्या अभ्यासक्रमातल्या अंकगणिताच्या अडचणी ती सोडवून देत असे. मामाला गणितात फारसा रस नसायचा. शाळेतून घरी आल्यावर तो आजीला बजावून ठेवायचा, “ही रीत बघून ठेव गं गणित सोडवायची. नंतर मी विसरीन. मग तू मला सांगायला हवीस.” मग ती रीत शिकून ठेवून आजी त्याचा अभ्यास घेणार! सातवी-आठवीपासून पुढच्या शिक्षणासाठी मुलांना कुठे नणंदेकडे रत्नागिरीत, कुठे बहिणीकडे भांडूपला राहायला ठेवून त्यांच्या शिक्षणाची सोय होईलसं तिनं पाहिलं. सगळ्यांत मोठी मुलगी हुशार होती. म्हणती तर डॉक्टर होती. पण तिलाच एकटीला शिकवत बसलं, तर बाकीच्या चार मुलांची शिक्षणं कशी व्हायची? या विचारानं मावशीचं मॅट्रिकचं शिक्षण होऊन तिला नीटस नोकरी मिळाल्या मिळाल्या आजीनं पाच मुलांना ठाण्यात बिर्‍हाड थाटून दिलं. तेव्हा एखादा ब्लॉकही स्वस्तात मिळाला असता. पण पाच मुलंच राहायची, सगळ्यात मोठी मुलगी एकोणीस वर्षांची. आजूबाजूला बरीशी सोबत हवी. स्वच्छता हवी. सुरक्षितता हवी. येणंजाणं फार गैरसोयीचं नको. बरं, भाडंही पुढे त्यांचं त्यांना कमावून परवडेलसं हवं. अशा सगळ्या विचारानं तिनं एका चाळीतली तळमजल्यावरची जागा निवडली. पागडी जास्त लागणार होती, तर स्वतःच्या बांगड्या विकल्या.

या सगळ्यातला तिचा धोरणीपणा, निर्णय घेताना न डगमगणं, दूरवरचा विचार करण्याची वृत्ती, व्यावहारिकपणा... हे सगळं तर थक्क करतंच. पण सगळ्याच्या तळाशी असलेली दिसते, ती तिची चांगल्या शिक्षणासाठीची कळकळ.

मुलांपैकी दोन शाळेत जाणारी, दोन कॉलेजच्या वयातली, एक मुलगी नुकती नोकरीला लागलेली. अशा पाचच्या पाचही मुलांना घरापासून दूर स्वतंत्र राहायला ठेवताना तिला काळजी वाटली नसेल? असणारच. लोकांनीपण काहीबाही ऐकवलं असेलच. पण आजीचीच धाकटी बहीण म्हणायची, “लोक काही तुम्ही काय जेवता ते बघाला येत नाहीत की करून घालाला येत नाहीत, आपला आपल्यालाच पिठलंभात कराचा असतो...” आजी तिचीच मोठी बहीण, कुणी काही बोललं असेलच, तर तिनं सरळ काणा डोळा केला असणार! गावातला कुणी एसटीत काम करणारा, कुणी अजून कसला चाकरमानी... तिचं सगळ्यांशी चांगलं. त्यांच्यातलं कुणी-कुणी या मुलांकडे चक्कर टाकून येऊन-जाऊन असायचं. त्यांच्याकरवी ती सतत मुलांसाठी काही ना काही पाठवत असायची. दारच्या अळवाच्या अळवड्यांचे शिजवलेले उंडे, कोहाळ्याच्या वड्या, आंब्याच्या रसाचा आटवून वाळवलेला गोळा, फणसाची साटं, खरवसाचा चीक... गावातल्या दवाखान्यातून सलाईनच्या मोठ्याशा बाटल्या आणून स्वच्छ धुवायची. त्यांची बुडं नि अंग रुंद असायची, तर गळे अगदी निरुंद. त्या बाटल्यांतून घरचं दूध किंचित विरजण घालून तेही पाठवायची.

तेव्हाच्या त्या काळजीनं उडून जाणार्‍या दिवसांतच तिला डायबेटिस सुरू झाला असेल का? काय ठाऊक.

दुर्दैवाची गोष्ट अशी की तिन्ही मामांना शिकण्यात फार गती नव्हती. हे कळेस्तोवर मुलींची शिक्षणाची वयं उलटून त्यांनी बर्‍याश्या नोकर्‍या धरल्या होत्या. पण यानं निराश-बिराश होईल तर ती आजी कसली! तेव्हाच्या आणि त्यापूर्वीच्या कोकणातल्या निम्नमध्यमवर्गीय वा मध्यमवर्गीय ब्राह्मण पुरुषांना एक शाळामास्तरकी, भिक्षुकी, नाहीतर किराणा मालाचं दुकान यापलीकडचा चौथा धंदा सुचलेला दिसत नाही. पण मामांनी रिक्षा चालवण्यापासून ते फिशरी चालवण्यापर्यंत, टेम्पो-ट्रक्स चालवण्यापासून ते पोल्ट्र्या चालवण्यापर्यंत, मासळीचं खत विकण्यापासून ते कौलं विकण्यापर्यंत... स-ग-ळे धंदे केले. सगळ्याला आजीचा सक्रिय पाठिंबा असायचा. पुढे मामानं पुष्कळ टेम्पो दाराशी उभे केले. पण त्याच्या पहिल्या रिक्षा-टेम्पोत चालवणार्‍या मामाच्या शेजारी, एक तृतीयांश सीटवर बसून फिरून आलेली आजी मला आठवते आणि तिचं अजब वाटतं.

आईची नोकरी सुरू झाल्यावर पहिलं मूल तिनं कसंबसं पाळणाघरं, प्रेमळ शेजारणी, वहिनीची आई... असं करून शाळेच्या वयाचं केलं. पण दुसर्‍या मुलाच्या वेळी मात्र हे सगळं करणं तिच्या जिवावर आलं. सासूनं हात वर केलेले. तेव्हा आजीच उभी राहिली. माझी धाकटी बहीण तीन महिन्यांची असताना आजी तिला घेऊन गेली आणि ती साडेतीन वर्षांची – शाळेच्या वयाची होईपर्यंत आजीजवळ राहिली. आईची नोकरी बिनघोर सुरू राहिली. आईबापापासून लांब आहे हो पोर!म्हणून तिची जी काही कोडकौतुकं त्या घरादारानं केली त्याबद्दल निराळं लिहावं लागेल! आजी! तू नि मीच फक्त झोपाळ्यावर बसायचं. बाकी कुण्णी नको!” हे किंवा “आजी! मी तुझ्या मांडीवर झोपणार. तू मागे भिंतीला टेकायचं नाहीस!” या आमच्या दोनवर्षीय बहिणाबाईंनी काढलेल्या फर्मानांच्या कथा अजूनही अर्धवट थट्टेनं – अर्धवट कौतुकानं सांगितल्या जातात, इतकं म्हणणं पुरे आहे!

तिच्या मुलांसाठी आणि मुलीच्या मुलांसाठी तिनं इतकं केलं. मग मुलांच्या मुलींना - नातींना तळ्यासारख्या गावातल्या शाळा थोड्याच पुरणार‍! त्या शाळेच्या वयाच्या झाल्या. मुलांचे गावातले धंदे जोरात. मग पन्नाशीपुढची आजी नि साठीतले आजोबा असे दोघं स्वतः शहरात चार नातींना घेऊन राहिले!

शिक्षणाची हौस... असं मी पुन्हापुन्हा म्हणते आहे खरी. पण आजीला एकूणच हौस पुष्कळ. तिची मुलंबाळं, पैपाहुणा, गडीमाणूस, शिवण, स्वैपाक... वगैरे बारदाना तिला दिवसभराला पुरवत असणार. पण रात्रीच्या जेवणानंतर हातावर पाणी पडलं की अडकित्त्या नि सुपारी घेऊन पुढल्या पडवीत निदान अर्धा तास तरी येऊन बसणं चुकत नसे. पुढल्या पडवीत एक पट्ट्यांची पाठ नि टेकायला हात असलेला, वापरून वापरून मऊ-गुळगुळीत झालेला डौलदार लाकडी बाक होता. त्या बाकात बसायला नि वारा खायलाआजी रात्री येऊन बसायची. तिथे गप्पा रंगायच्या. सारीपाटासारखा कवड्यांनी आणि फाशांनी खेळण्याचा एक खेळ ती आणि शेजारची नलूआजी, आणि आजीच्या दोघी नणंदा खेळत असत. तोही तासंतास चालणारा खेळ. मार्कडाव उर्फ तीनशे चार हा तर आमच्या घरातला फार लाडका डाव. काळ्या बिल्ल्यांचे चोरून लाल बिल्ले केले म्हणून एकमेकांच्या उरावर बसणार्‍या नातवंडांची भांडणं आजीनं बघितली असती, तर ती चिडली असती की आधी ओरडून मग कौतुकानं हळूच हसली असती, असा प्रश्न मला अनेकदा पडून गेला आहे. गावातले डॉक्टर घरी जेवायला असायचे. त्यांनी आणलेला चित्रलॅडिजचा खेळ, कॅरम, कवड्या नाहीतर खुब्या वापरून एकमेकांवर मात करण्याचा फरं-मरं नामक एक मजेशीर खेळअसं सगळं कायम चालू असायचं. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये घरी आलेल्या सगळ्या पोरासोरांसकट थोरांचा पत्त्यांचा डाव पडायचा. त्यात कुणीही खेळायला बसायची मुभा असायची. अट एकच – “खोटं खेळाचं नाही!”

साधं भरतकाम म्हणू नका, नाड्यांचे तुकडे जोडून केलेलं भरतकाम म्हणू नका, व्रतवैकल्यं म्हणू नका, नाटकं म्हणू नका, खेळ म्हणू नका, सासरमाहेरच्या नातेवाइकांना जीव लावून त्यांचं कष्टांनी-पैशांनी करणं म्हणू नका, तीर्थयात्रेपासून ते लग्नामुंजींपर्यंत आईबापापासून लांब असलेल्यानातीला खाकोटीला मारून भटकणं म्हणू नका... आजीची जीवनेच्छाच जबर. त्यात तिला आजोबांची तशीच साथ असायची. एकदा गावात बूड स्थिरावल्यानंतर ते गावाची वेस ओलांडून बाहेर पडायला फारसे उत्सुक नसायचे. पण तुला हवी तितकी तू भटक.” मुलांना मारायचं नाही” हे आजीचं सांगणं. डोक्यात मारून मुलांना इजा होऊ शकते, कानफटीत मारून तेच, पाठीत धबका जोरात बसला तर मूल तोंडावर आपटेल.... म्हणून मग आजोबांनी हिरकूट पैदा केलेला असायचा. मार म्हणजे गुडघ्याच्या खाली, पोटरीवर हिरकुटाची शिपटी, बास! कायम घरातली अंथरुणं घालण्यापासून ते आजी दमली तर तिच्या पायांना रॉकेल लावून मालीश करून देण्यापर्यंत सगळं काही आजोबा करायचे. वेळी विरजलेल्या सायीचं ताक करून, लोणी काढून, तूप कढवण्यापर्यंत सगळं.

त्या दोघांच्यातलं भांडण कधी पाहिलंच नाही, असं आई आणि तिची भावंडं एकमुखानं सांगतात. अनेक वर्षं ते दोघंच जण रात्री एक तरी डाव रमीचा खेळायचे. काहीतरी जादू व्हावी नि त्या दोघांच्या पानांमध्ये आळीपाळीनं डोकावत त्यांचा डाव बघता यावा, असं फार वाटतं.

क्रमशः

Monday 15 July 2024

एक मोठी रेष...

सुनीताबाईंबद्दल मी नव्यानं काय लिहिणार? त्यांचं सगळं आयुष्य महाराष्ट्राच्या पुढ्यात आहे. त्यातला निरलस कष्टाळूपणा, कठोर तत्त्वनिष्ठा, धारदार संवेदनशीलता, कमालीचं औदार्य, शास्त्रकाट्याची कसोटी लावणारी न्यायबुद्धी, कोवळं कविताप्रेम, परिपूर्णतावादी वृत्ती, पुलंच्या कामाचं त्यांनी केलेलं व्यवस्थापन, जीएंशी असलेली त्यांची अपूर्वाईची पत्रमैत्री... सगळंच आपण अनेक दशकं जवळून पाहिलेलं, आदरानं-अप्रूपानं अनुभवलेलं. त्याबद्दल नव्यानं सांगण्याजोगं काही नाही. ते अधिक जवळून बघण्याचं भाग्य मिळालेले, अधिक नेमकीपणी सांगता येणारे, अधिक काळ त्यांना पाहिलेले... अनेक लोक आहेत. मी त्यांच्याहून वेगळं काय सांगणार?

मी वेगळं सांगू शकीन ते बहुतेक माझ्या मनातल्या त्यांच्या प्रतिमेबद्दल आणि त्यातून मला मिळालेल्या गोष्टींबद्दल. 

सुनीताबाईंचं लेखन मी वाचलं ते पुलंच्या भक्तीत पूर्णतः बुडून गेल्यावर. ऐन घडणीच्या वयात. चौदा-पंधराव्या वर्षी. आम्हांला दहावीत असताना ‘आहे मनोहर तरी’मधला एक अंश मराठीच्या पुस्तकात अभ्यासाला होता. त्या निमित्तानं ‘आहे मनोहर तरी’ हातात आलं आणि मला माझ्या पिंडाला मानवणारं, अगदी जवळचं वाटणारं काहीतरी मिळाल्याचा भास झाला. त्या लेखनातली बंडखोरी, स्वातंत्र्यावरचं प्रेम आणि त्याकरता किंमत मोजण्याची तयारी, अतिशय नाजूक आणि सूक्ष्म भावनांचे पदर उलगडून बघण्याची हातोटी आणि त्यामागची अपरिहार्यता... हे सगळं माझ्या तोवरच्या वाचनापेक्षा पूर्ण वेगळं होतं. माझ्या संवेदनाखोर स्वभावाला ते लेखन फार जवळचं वाटलं. 

त्यापेक्षाही निराळी आणखी एक गोष्ट घडली, असं आता जाणवतं. 

आपण घडतो त्यात निरनिराळ्या बाबींचा हात असतो. प्रत्यक्ष आयुष्यातली उदाहरणं आणि बरावाईट वारसा असतो, तसाच नजरेसमोर वावरणार्‍या – समाजातल्या इतर प्रतिष्ठित उदाहरणांचाही भाग असतो. त्यातल्या कुणाचे प्रभाव आपण आपल्यावर पाडून घ्यायचे हे निवडणारे आपणच असतो. पण मुळात अशा प्रकारची उदाहरणं भोवतालात असावी लागतात. 

सुनीताबाई तशा होत्या. 

त्यांचं स्वतःचं कर्तृत्व आणि गुणवत्ता नाकारण्याची आजघडीला कुणाचीही छाती होणार नाही. पण 'आहे मनोहर तरी' प्रकाशित झाल्याच्या अल्याडपल्याडच्या काळात पुलंची लोकप्रियता वादातीतपणे त्यांच्याहून मोठी होती. पुल या नावाला एक जादुई वलय होतं. तसं तर ते आजही आहेच. तेव्हा ते किती प्रभावी असेल, याची कल्पना आपण सहजगत्या करू शकतो. पुलंना आणि त्यांची पत्नी म्हणून सुनीताबाईंना मराठी माणसांच्या जगात मानाची जागा होती. मंगला गोडबोलेंनी सुनीताबाईंच्या चरित्रामध्ये पुल आणि सुनीताबाई यांना 'महाराष्ट्राचं फर्स्ट कपल' अशी अतिशय चपखल संज्ञा वापरली आहे. खरोखरच त्या दोघांचं स्थान तसंच होतं. अशा ठिकाणी असणार्‍या सुनीताबाईंनी आपल्या लोकप्रिय कलावंत नवर्‍याच्या सोबत संसाराची धुरा निमूट वाहिली असती आणि मनोभावे त्याच्यासह मिरवलं असतं, तरीही त्यांचा उदो-उदोच झाला असता. पण त्यांनी हा सहज मिळू शकणारा मान नाकारला. त्यांनी या भूमिकेच्या बरोबर उलट वागून दाखवलं. 

'आहे मनोहर तरी'मधून त्यांनी नवरा म्हणून पुलंच्या वागण्याचं रोखठोक विश्लेषण केलं. आणि पुलंचे दोष त्यांच्या पदरात घातले. वास्तविक पुल हे अशा पिंडाचे होते, की त्यांनी सुनीताबाईंच्या कोणत्याही निर्णयांना कधीही काडीमात्र विरोध केला नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड येणं तर त्यांच्या स्वभावात नव्हतंच, पण सुनीताबाईंनी स्वतः पुलंच्या बाबतीत घेतलेले निर्णयही त्यांनी विनातक्रार मानले. या व्यवस्थेत सुनीताबाईंची दोन्ही अंगांनी सोयच होती. स्वातंत्र्य तर होतंच, शिवाय कर्कशा न व्हावं लागण्याची सोयही होती. ही व्यावहारिक सोय वापरून मूलभूत प्रश्नांना बगल देता येणं एखादीला सहज शक्य झालं असतं. पण सुनीताबाईंनी तसं केलेलं दिसत नाही. त्यांनी पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या चौकटीबद्दलच प्रश्न उपस्थित केले. 'वेळोवेळी मी माझे आणि भाईच्याही आयुष्याबाबतचे निर्णय घेत गेले, हे जरी माझ्या पथ्यावर पडत असलं, तरी भाई मात्र वेळोवेळी एखाद्या जाणत्या सहचरासारखं न वागता एखाद्या लहान मुलासारखं आत्मकेंद्री पद्धतीनं वागला आहे,' या आशयाचा सल त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता मोकळेपणी बोलून टाकला. पुलंना गाडी चालवता येत नसतानाही निव्वळ पुरुष असल्यामुळे त्यांना मिळालेल्या ‘शिकिवनाऱ्या बाबा'च्या उपाधीबद्दलचा किस्सा प्रसिद्ध आहे. पण उल्लेखनीय बाब म्हणजे, त्यात पुलंबद्दल कुठलाही कडवट सूर नव्हता. पुलंच्या प्रतिभेबद्दल सुनीताबाईंना आदर आणि अप्रूप होतं. तिला निगुतीनं जपण्याचं काम सुनीताबाईंनी जन्मभर केलं. पण आश्चर्य म्हणजे, पुलंच्या, एखाद्या लहान मुलासारख्या आत्मकेंद्री परावलंबित्वाबद्दल तक्रार नोंदवतानाही पुलंबद्दल त्यांच्या मनात करुणा होती. त्वेष वा राग नव्हता. लग्नगाठीतून जन्माला येणारे स्त्रीवरचे अन्याय हे पुरुषसत्ताक व्यवस्थेची फळं कशी असतात, याबद्दलचं किंचित कडसर - कडवट नव्हे - भान त्या प्रकटनात भरून राहिलं होतं. दलित लेखकांना उद्देशूनही त्यांनी त्या आशयाचे प्रश्न विचारले होते. ‘तुम्ही शोषित. आम्ही स्त्रियाही शोषित. तुम्हांला तरी आमची दुःखं कळतील असं वाटलं होतं…’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.  त्या पुस्तकातली 'आहे मनोहर तरी गमते उदास'मधल्या उदासरम्य भावाची एक छटा त्यातूनही आलेली होती. 

दुसरं म्हणजे स्त्री म्हणून स्वतःला पडलेल्या शारीर मोहांबद्दल लिहिणं. सुनीताबाई चळवळीत काम करत असताना त्यांना भय्या या आपल्या मित्राविषयी मोह पडला आणि काहीही चुकीचं पाऊल न उचलता त्या मोहातून पार झाल्या, याला कारण भय्याचा भलेपणा, असं त्यांनी प्रामाणिकपणानं नोंदवलं.      

पुल-सुनीताबाईंना मूल नव्हतं. अगदी सुरुवातीच्या काळात एका अगदी साध्याश्या प्रसंगी मन दुखावलं जाण्याचं निमित्त झालं आणि सुनीताबाईंनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला. पुढे कारणाकारणांनी ते राहतच गेलं. हा किती मोठा निर्णय! पण सुनीताबाईंच्या त्या निर्णयामागे कुठलाही अभिनिवेश जाणवत नाही. व्यक्तिस्वातंत्र्याचा बडिवार न माजवता ते अगदी विनासायास वागवणार्‍या व्यक्तीची सहजता त्यात दिसते. तसंच लग्नसंस्थेबद्दलच्या त्यांच्या चिंतनाचंही. ‘मला त्या बाह्य बंधनाची गरज नव्हती. भाईला हवं होतं, म्हणून लग्न केलं; त्याला ते नको असतं, तर मी सहज घटस्फोट देऊ शकले असते,’ असं त्या शांतपणे म्हणून गेल्या. त्यांना स्वतःच्या असामान्यत्वाची लख्ख जाणीव होती, पण त्याच वेळी पुलंच्या स्वभावातल्या मूलपणाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना सोडून जाण्यातलं क्रौर्यही जाणवत होतं. त्या काळातल्या - आणि खरं तर आजच्याही - स्त्रीस्वातंत्र्याच्या रूढ कल्पना पाहिल्या, तर कितीही मोठा सर्जनशील कलावंत का असेना, पण अशा कलावंत नवर्‍याच्या कारकिर्दीची व्यवस्था पाहणारी स्त्री, हे वर्णन त्यांच्यासारख्या स्वतंत्र विचारांच्या कर्तृत्ववान व्यक्तीला किती बोचणारं-सलणारं ठरू शकेल! पण त्यामध्ये त्यांनी कधीही कुठलंही शरमिंधेपण बाळगलेलं दिसत नाही. एखाद्या कवितेची निर्मिती मिरवावी तितक्याच अभिमानानं त्यांनी स्वतः निरीक्षणं करून बसवलेल्या तूप कढवण्यासारख्या खास कौशल्यांबद्दलही लिहिलं. मन लावून केलेलं, दर्जा राखून केलेलं कुठलंही काम श्रेष्ठच या मूल्यावरचा ठाम विश्वास त्यामागे होता. हे अशाच एखाद्या व्यक्तीला जमेल, जिच्या विचारांमध्ये लखलखीत स्पष्टता आहे. सुनीताबाईंनी ते सहजगत्या तोलून धरलं होतं. 

हे जगावेगळं होतं.   

सुनीताबाईंनी आपल्या नवर्‍याच्या प्रतिमेची तमा न बाळगता असं जाहीर लिहिण्यामुळे - आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पुलंनी ते अत्यंत उमदेपणानं स्वीकारण्यामुळे - फार वेगळा पायंडा पडला. अजिबात कडवट न होता, पण कुठलीही तडजोड न करता केलेला, स्त्रीवादी विचाराचा फार उन्नत आविष्कार बघायला मिळाला; तोही समाजात मानाच्या स्थानी विराजमान असलेल्या एका जोडप्याकडून. याचं मोल माझ्यासारख्या लोकांच्या दृष्टीनं फार मोठं होतं. स्वतंत्र विचार करणाऱ्या स्त्रीचं आणि ते कुठल्याही अहंकाराशिवाय स्वीकारणाऱ्या पुरुषाचं असंही सहजीवन असू शकतं, असा एक महत्त्वाचा धडा त्यातून मला मिळाला. 

पुढे सुनीताबाईंचं लिहिणं, त्यांची प्रश्नोपनिषद विणत नेणारी शैली, मित्रांच्या काळजी-प्रेमापोटी अतीव कोवळी होऊ शकणारी आणि स्वतःला प्रश्न विचारताना मात्र धारदार शस्त्राचं रूप धारण करणारी  त्यांची संवेदनशक्ती... या गोष्टी वाचनात आल्या. अधिकाधिक आवडत गेल्या. जी. ए. आणि सुनीताबाई या दोघांच्या पत्रव्यवहाराच्या रूपानं निराळ्याच उंचीवरच्या मैत्रीचा आविष्कार बघायला मिळाला, अतिशय कृतज्ञ वाटलं. पण ती सगळी पुढची गोष्ट.   

पुलंच्या नाटकाची रॉयल्टी बुडवून नाटकांचे दडपून प्रयोग होत असत. अशा प्रयोगात सामील होणाऱ्या भल्या-भल्या लोकांना सुनीताबाईंनी कोर्टाच्या नोटिसा बजावल्या. मग ते प्रसिद्ध नट असोत वा पुलंचे मित्र असोत. तसंच दुसऱ्या टोकाचं उदाहरण म्हणजे त्यांनी दिलेल्या एका देणगीचं. पी. एल. फाउंडेशनला भराव्या लागणाऱ्या कराच्या दृष्टीनं विचार करता ही देणगी पुढच्या आर्थिक वर्षात देणं सोयीचं होतं, म्हणून त्यांनी देणगी उशिरा दिली, पण देणगी देण्याचा निर्णय झाल्यापासूनच्या प्रत्येक दिवसाचं व्याजही देणगीत जमा करूनच. एकदा एखाद्या मूल्याविषयी संपूर्ण विचार करून त्याचा स्वीकार केला, की त्याच्या अंमलबजावणीत मागेपुढे पाहणं नाही. पदरी वाईटपणा येवो वा चांगुलपणा येवो. 

न भिता आणि स्वच्छ विचार करता आला, की तो कुठल्याही टोकापर्यंत नेता येण्याचं धैर्य मिळत असेल? कुणास ठाऊक. मला तो विश्वास त्यांच्या लिहिण्यातून मिळाला खरा. त्यांचं स्थान बघता, तो त्यांच्यामुळे अनेकांना मिळाला असणार. 

त्या स्वतः सिद्धहस्त प्रतिभावंत लेखक होत्या, असं म्हणता येत नाही. त्यांनी स्वतःही तसं कधी मानलं नाही. पण तसं नसताही, आपली योग्यता आणि आपल्या मर्यादा नीट समजून घेतल्या आणि स्वतःशी निर्भयपणे प्रामाणिक राहिलं, तर किती प्रकारे निर्मितिशील असता येतं, याचा वस्तुपाठच जणू त्यांनी त्यांच्या जगण्यातून घालून दिला. इतर अनेक लेखकांबद्दल वाटतो तसा सहज मित्रभाव त्यांच्याबद्दल वाटत नाही, एक प्रकारचा धाक वाटतो. त्यांनी जगताना आखून दिलेली रेष तितकी मोठी होती, याचंच ते द्योतक मानलं पाहिजे! 

बाकी कशापेक्षाही हे मला त्यांचं मोठं योगदान वाटतं.

(लोकरंग, लोकसत्ता, १४ जुलै २०२४)

Monday 8 July 2024

कधीतरी

ध्यानीमनी नसताना,
कधीतरी कुणीतरी गाणं ऐकवतं,
फलक, गुजारिश आणि चांद असलेलं,
अथपासून इतिपर्यंत गुलजार.
टाकतं तिरपा कटाक्ष तेजतर्रार...
जीव उगाचच कातर-कासावीस झालेला असताना,
थांबता थांबत नाही पावसाची संततधार.
ध्यानीमनी नसताना,
सळसळत येतात कुठूनसे कवितांचे जहरी सर्प...
सरता सरत नाहीत ठसठसत्या रात्री -
काळ्यानिळ्या, गप्पगार.

Saturday 6 July 2024

आजीची गोष्ट ०४

(भाग ०३)

०४

ही गोष्ट माझ्या आजीची खरी. पण ती तिच्या एकटीची अर्थातच नव्हे. तिच्याकडे थोडं दुरून बघताना मला बाकीच्या सगळ्या गोष्टीही दिसत राहतात. त्या गोष्टी स्वतंत्र असल्या, तरी सुट्ट्या नव्हेत. त्या आजीच्या गोष्टीशी जोडलेल्या आहेत. किंबहुना तिनंच त्या निरनिराळ्या प्रकारे जोडून घेतलेल्या आहेत.

आधी म्हटल्याप्रमाणे आजीला तीन नणंदा. थोरल्या नणंदेनं आणि तिच्या नवर्‍यानं – राधा आणि अण्णा यांनी आजीचा संसार उभा करून दिलेला. गहू खरेदी करताना तो किती वेळ चावून बघावा नि त्याची गोडी नि चिकटपणा कसा पारखावा या विषयापासून ते आमच्या घरात सगळ्यांना प्रिय असलेल्या पत्त्यातल्या मार्कडावापर्यंत – अशा अण्णा आणि आजी यांच्या पुष्कळ गप्पा होत असत. त्यांची दोस्तीच होती असावी. अण्णांच्या मुली आणि उशिरा झालेल्या मुलग्यामध्ये पुष्कळ अंतर होतं. हा उशिरा झालेला भाचा आणि त्याची मामी – म्हणजे माझी आजी – यांचं अगदी कल्पनातीत गूळपीठ. दर सुट्टीत मामीकडे येणार्‍या या भाच्याचा तिच्यावर फार जीव होता. ती शिवणयंत्रावर बसलेली असली की तिला चहा करून देण्याचं काम त्याचं. त्याच्या चड्ड्या – लंगोट आणि पैरणीही मामीनंच शिवलेल्या असायच्या. तो कटिंग करून द्यायचा आणि मामी शिवून द्यायची. कौतुकाच्या, यशाच्या, दुःखाच्या सगळ्या गोष्टी येऊन तिला सांगायच्या. तो इंजिनिअर झाल्यावर निदान बाहेरच्यांसमोर तरी त्याला घरातल्या नावानं हाक न मारता नीट पूर्ण नावानं हाक मारावी, असं अण्णांना सुचवणारी आजीच.

तिचं लग्न होऊन थोडं स्थिरस्थावर झाल्यावर तिनं आजोबांच्या पालगडातल्या मूळ घराची नीट माहिती करून घ्यायला सुरुवात केली. पालगडला गणपतीत मोठा उत्सव होत असे. अजूनही होत असेल. त्या उत्सवाला आजी दर वर्षी नेमानं हजेरी लावत असे, तिथली नाटकं हौसेनं बघत असे. तिचा तिथल्या अनेकांशी संपर्क असायचा. पुढे माझ्या धाकट्या मामानं ही उत्सवाची रीत पाळली. तो जाईपर्यंत दर वर्षी तोही न चुकता उत्सवाला जात असे. तो तसा कुटुंबातला आजीनंतरचा जनसंपर्क अधिकारीच म्हणायचा! पण हे नंतरचं झालं. आजी पालगडला जायला लागली, तेव्हा तिथे आजोबांच्या सावत्र चुलत भावाकडे उतरावं लागे. ते उभयपक्षी अप्रिय होत असावं. पण आजी जाताना शिध्यासकट सगळं सामान घेऊन जायची. एकदा आजी तिथे गेली असताना अण्णाही यायचे होते. अण्णांना चहा करून द्यायला म्हणून आजी स्वैपाकघरात गेली असता आजीची सावत्र पुतणी कमळी तिला खोचून म्हणली, “दे की काकू तो सकाळच्यातला. इथे उत्सवाला आलं की काम पडतं फार. इतकी कौतुकं कशाला?” त्यावर आजीनं “कमळ्ये, ते या घरचे जावई आहेत. आणि त्यांना ताजा चहा करून द्यायला मी शिधाही घेऊन आल्ये नि माझे हातही.” असं ठाम उत्तर दिलं होतं.  

आजीची दुसरी नणंदही खेडलाच एका सधन कुटुंबात दिलेली. घरची पुष्कळ शेतीवाडी होती. पण नवर्‍याच्या अंगी काही कर्तृत्व नव्हतं. बहुधा त्याला कामाला लावण्याच्या उद्देशानं तिनं त्याला भावाच्या घराजवळ स्वतंत्र बिर्‍हाड करायला लावलं आणि ती तळ्यात आली. धंदा? शेतीवाडी नसलेल्या आणि थोडकं भांडवलं असलेल्या कोकणातल्या ब्राह्मणांना जो आणि जितपत सुचे तोच. किराणा मालाचं दु-का-न. पण नवर्‍याचं यशापयश बघायची संधी तिला मिळालीच नाही. घरात काम करताना कधीतरी तिचा हात विळीवर चांगलाच कापला. तेव्हा गावात दवाखानाही नव्हता. तालुक्याहून एकदा डॉक्टर फेरी मारून जात असे. इंजेक्षन वगैरे कुठलं सुचायला नि मिळायला. तिला धनुर्वात झाला. खेडला नेईपर्यंत ती वाटेतच वारली.  

आजीची तिसरी नणंद – कुशी उर्फ कृष्णा – लग्नानंतर लगेचच काही वर्षांत विधवा झालेली. मूलबाळ नाही. पण तिच्या वागण्याबोलण्यात मिंधेपणा, कमीपणा अजिबात असलेला आठवत नाही. ती रत्नागिरीसारख्या शहराच्या ठिकाणी राहायला असायची हे कारण तर असेलच. पण नवर्‍यामागे काही वर्षांत मरून गेलेली सासरची माणसं आणि मग उत्पन्नाची चिंता न करता मुखत्यारपणी घर सांभाळण्याचं आणि निर्णय घेण्याचं मिळालेलं स्वातंत्र्य हीदेखील कारणं असणार. आजीचं आणि राधाच्या धाकट्या मुलाचं जसं मेतकूट होतं, तसं राधाच्या थोरल्या मुलीच्या मुलांशी कुशीचं. राधाची थोरली लेक कुशीच्या शेजारीच राहायची. त्यामुळे तिची मुलं कुशीसमोरच वाढलेली. तिला त्यांच्याबद्दल विशेष ममत्व होतं. पण फक्त त्यांचंच नव्हे, कुशीनं येणार्‍याजाणार्‍या सगळ्यांचं आनंदानं केलं. आला-गेला, पै-पाहुणा, शिक्षणासाठी म्हणून कुणी येऊन राहिलेला विद्यार्थी, परीक्षेसाठी कुणी आलेला परीक्षार्थी, कसल्या सरकारी कामानं जिल्ह्याच्या ठिकाणी काम घेऊन आलेला कुणी परिचित... असं कुणीही तिच्याकडे पाहुणचार घेऊन जात असे. आजीच्या लेकीही शिक्षणासाठी कुशीच्या घरी राहिलेल्या. मी सगळ्यांचं सगळं केलंअसं ती किंचित अलिप्तपणे पण सूक्ष्म अभिमानानं म्हणतही असे. 

तिच्या म्हातारपणची आठवण उदास करून टाकते.

तिला होईनासं झाल्यावर तिनं तिचं घर विकून टाकलं. तोवर माझी आजी आणि आजोबा दोघंही देवाघरी गेले होते. त्या दोघांपैकी कुणीही असतं, तर घर विकल्यावर तिनं कुठं राहायचं हा प्रश्नच उद्भवता ना. पण ते नव्हते. घर विकल्यावर त्या व्यवहाराचे लाखावारी पैसे जवळ असताना आपल्याला कुणीही – म्हणजे राधाची मुलं-नातवंडं खरं तर – प्रेमानं बघतील, अशी तिची समजूत होती असावी. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. तसं तिला कधी कुणी तोंडावर म्हणालं नाही, पण एकाएकी उपटलेलं वृद्ध माणूस दोन-अडीच खोल्यांत सामावून घेणं थोडं जड गेलं असावं आणि तिला ते जाणवलं असावं. त्यानं ती अंतर्यामी दुखावली गेली. माझ्या आजीची मुलं – आई आणि मावशी – तिचं कर्तव्यभावनेनं करायला तयार असत. आजी असती, तर आपल्या नणंदेला तिनं इकडेतिकडे कुठेही जाऊ दिलं नसतं, ही खात्री त्यांच्या कर्तव्यभावनेच्या मुळाशी होती. पण कुशीला ते मनातून आवडत नसे. एकतर जावयांकडे राहणं म्हणजे... त्यात तिथली नातवंडं सवयीची आणि प्रेमाची नव्हेत आणि त्यांचे संस्कारही जुन्या वळणाचे नव्हेत. तिचे सतत सगळ्यांशी खटके उडत. आधुनिक विचाराच्या आई-मावशीशी वाद घालून तो जिंकायला ती पुरी पडत नसे आणि त्यांना काही पटवूनही देऊ शकत नसे. पण तिचे पीळही बदलण्यातले नव्हते. तुम्ही म्हणजे अगदी पुर्‍या पूर्णत्वाला गेलेल्या आहात हो! आम्हांला तुमच्यासारखं जमलं नाही.” असं ती थोड्या निरुपायानं आणि हताशेनं, कडवट होऊन म्हणत असे, ते मला अजूनही आठवतं. त्यात किंचित असूया मिसळलेली होती का? जन्म एकटीनं मुखत्यारपणी वावरण्यात गेलेला. जमवून घेणं शक्यच नसावं. प्रेमानं, हक्कानं राहवून घेणं तर सोडाच, पण आपण पैसे टाकले, की सगळं नीट होईलही तिची समजूतही खरी झाली नाही. तिला या अपेक्षाभंगाचा आणि नंतरच्या तडजोडीचा मनस्वी त्रास झाला असावा. त्यातूनच तिचं अल्सरचं दुखणं बळावलं असेल का? समजत नाही. व्हॅनिला आईस्क्रीम ती अतिशय आवडीनं खायची, इतकं आठवतं. हा भाचा, तो पुतण्या, असं करत काही वर्षं इथेतिथे राहण्यात गेल्यावर, शेवटी माझा मामा तिला तळ्याच्या घरी – माझ्या आजीच्या घरी घेऊन गेला. त्यामागेही प्रेम होतं असं म्हणवत नाही. ‘आई असती, तर तिनं हेच केलं असतं, ती नसताना मलाही केलं पाहिजेही ठाम कर्तव्यभावना मात्र नक्की होती. तिथेही तिचा वेळ वार्‍याशी भांडण्यात जाई. पुढेपुढे ती भ्रमिष्ट झाली. देहाच्या भुकांविषयी नाही-नाही ते वेडंवाकडं, आचकट-विचकट बोले. मला वृद्धाश्रमात नेऊन टाकाअसा हेका धरून बसल्यावर तिला तिथे नेऊन ठेवलं. तिथेच एकाकी अवस्थेत ती वारली.

नेमानं वर्तमानपत्रं वाचणारी, इकडेतिकडे हिंडाफिरायची मनापासून आवड असलेली, “माधुरी दीक्षित आमच्या रत्नागिरीची आहे हो!असं कौतुकानं सांगणारी ही आत्तेआजी. ती विलक्षण देखणी होती. तिच्या सत्तरीतही तिचा गोरापान-केतकी वर्ण आणि शेलाटा बांधा उठून दिसायचा. पूर्ण चंदेरी झालेल्या केसांचा नीटस अंबाडा बांधणं, नाजूक नक्षी असलेली, पांढरीशुभ्र, स्वच्छ सुती नऊवारी पातळं चापूनचोपून नेसणंतिचं राहणं आणि करणं-सवरणंही मोठं स्वच्छतेचं-निगुतीचं असायचं. नवीन गोष्टी शिकून घेण्याची हौस असायची. आजीकडे माहेरपणाला येताना अननसाच्या मोरंब्यासारखा, तेव्हा कोकणात नवलपरीचा असणारा पदार्थ, ती मुद्दाम करून आणत असे. तिच्या मोठ्याथोरल्या घराच्या पुढल्या अंगणापासून ते परसदारातल्या डेरेदार कृष्णावळ्याच्या अंगणापर्यंत सगळं स्वच्छ लोटून काढलेलं, देखणं सारवलेलं, लखलखीत नेटकं असायचं.  

नवरा पंचविशीत वारला, तेव्हा ती कितीश्या वर्षांची असेल? नवर्‍याकडून तिला मिळालेलं सुख म्हणजे तो गेल्यावर त्याच्या गैरहजेरीत मिळालेली मुखत्यारकी आणि आर्थिक स्वावलंबन – हेच काय ते. विधवा झालेल्या स्त्रियांच्या शरीरसुखाबद्दल बोलण्याचीही पद्धत आपल्याकडे नाही. तिच्याही ते कधी मनातही आलं नसणार. अवघं तरुणपण असं कुणाच्या डोळ्यात न येता, नीट रेषेवरून चालण्यात, शिस्त-वळण-सोज्ज्वळपण सिद्ध करत वावरण्यात, देवाधर्माचे-कीर्तना-पुराणांचे छंद लावून घेण्यात गेलं असेल. तिच्या काळाचा विचार करता तिला दुसरं काही करण्याचा पर्यायही नसावाच. तेव्हा स्वतःच्याही नकळत दाबून ठेवलेल्या देहाच्या भुका म्हातारपणी उसळून आल्या असतील?

तिच्या घरी तिनं स्वतःला पाणी प्यायला म्हणून मातीचा इवला खुजा घेतलेला होता. त्या खुज्याचा देखणा आकार, नाजूक डौलदार तोटी, कमानदार निमुळती मान... हे सगळं मला अजुनी आठवतं. आता माझी मावशीही तसाच खुजा कुठूनसा पैदा करून हौसेनं पाणी प्यायला वापरते. तेवढीच त्या आत्तेआजीची आठवण उरली आहे.

अशाच करड्या रंगाच्या गोष्टी आजीच्या आईच्या आणि बहिणींच्याही...

क्रमशः

 

 

Friday 5 July 2024

आजीची गोष्ट ०३

(भाग ०२)

०३

तिला शिक्षणाची फार हौस. मुलाबाळांना आणि मग नातवंडांना चांगल्या शाळांतून शिकता यावं म्हणून तिनं पुढे नाना खटपटी केल्या. पण तिला स्वतःला मात्र चौथीपेक्षा जास्त शिकायला मिळालं नाही. घरातली सगळी कामं करून, आजीच्या सगळ्या अटी पुरतावून मगच शाळेत जाता यायचं. पण चौथी पास झाली आणि गावातली शाळाच संपली. मग वडलांना शेतात मदत करणं, गुरांमागे जाणं, घरकाम करणं, भावंडांना सांभाळणं.. तिचा तिच्या वडलांवर फार जीव होता. वडील गुरांमागे रानात गेले की काळजीनं तिचा जीव राहत नसे. तीही त्यांच्यामागून रानात जायची! घरी आजी म्हातारी आणि भावंडं लहान, आई नाही. करायला कोण, म्हणून मग तिनं तिचं लग्नही त्या काळाच्या हिशेबात जमेल तितकं लांबवलं आणि एकोणिसाव्या वर्षी बोहल्यावर चढली.

तिला लग्नात मुलाकडच्यांनी दागिन्यांनी मढवलं होतं, शालूही नेसवला होता. पण नंतर कळलं, की मुलाकडे स्वतःचं सत्तेचं काहीच नाही. शालू थोरल्या नणंदेचा, तसे दागिनेही तिचेच. “लग्नात काय घातलंत मला? दोन पातळं नि कुडं!” असं ती आजोबांना मधूनमधून चिडवायची!

लग्न होऊन आल्यावर तिनं आजोबांच्या संसाराला आकार-उकार आणला.

सात-आठ बाळंतपणं आणि पाच मुलं. स्वैपाकपाणी. सोवळंओवळं. सणवार. व्रतवैकल्यं. पैपाहुणा-आला-गेला. गडीमाणसं. दुकानची उस्तवार आणि हिशेबठिशेब.

तिच्या स्वैपाकाला मोलकरणीनं भरलेलं पाणी चालायचं नाही. त्यामुळे ते सोवळ्यात स्वतः भरायचं. आणि मग स्वैपाक. गावात गिरणी पुष्कळ नंतर आली. तोवर जात्यावर दळलेल्या पिठाच्या भाकर्‍या – तांदूळ, ज्वारी, नाहीतर नाचणी. कोकणातल्या आडगावी तेव्हा सगळ्या भाज्याबिज्या सहजी मिळत नसत. परसदारी घोळ, अळू, चाकवत, पोकळा असायचा. भेंडी, काकडी, पडवळ, घोसाळी, कारली या पावसाळी भाज्या. तोंडलीचा मांडव बारा महिन्यांचा. कधी कोबी स्वस्त मिळाला तर तो पातळ चिरून वाळवून ठेवायचा, कधी चाकवत वाळवून ठेवायचा. वर्षभराची कडधान्यं तीनतीन उन्हं देऊन, कडू तेलाचा हात देऊन साठवून ठेवायची. घरी कांडपीण बोलावून डाळी घरी सडून घ्यायच्या, तसेच पोहेही घरी कांडलेले. फणसाच्या आठिळा माती लावून, वाळवून ठेवायच्या. वर्षभराची लोणची आणि मिरच्या. पापड. चिकवड्या. फेण्या.

तिला देवाधर्माचीही चिकार हौस होती. चतुर्मासात लक्ष वाहण्याचे तिचे नेम असायचे आणि चार महिने ठरलेला प्रसाद. बकुळीचा, प्राजक्तीचा, तुळशीचा.. असे लक्ष आणि प्रसादाला स्वतः काढलेल्या गव्हल्यांची खीर. सोळा सोमवारासारखी व्रतं. तिनं एकूण तीनदा सोळा सोमवार केले. या सगळ्याची उद्यापनं आणि स्तोत्रं. हौस मोठी, पण कर्मठपणा मात्र नाही. देवासमोर बसलेली असताना पारोसं नातवंड जाऊन गळ्यात पडलं तर तिला विटाळ होत नसे!

घरी कायम पै-पाहुणा असायचा. दुकानात पहिली काही वर्षं सोळा गावचं रेशनिंग असे. त्यामुळे दुकानात सततची वर्दळ असायची. गावात कामासाठी येणारे कार्‍या माणसांना जेवायला गावात हॉटेलबिटेल नव्हतं. मग सरकारी नोकर, डॉक्टर, तलाठी, मास्तर... यांपैकी कुणी ना कुणी जेवायला असायचं. उन्हाळ्याच्या सुट्टीत कायम खेडच्या नणंदांची नातवंडं, तिच्या बहिणी-भावांची मुलं... असं करत वीसेक मुलंबाळं असायची. तिच्या भावांच्या संसारावर तिचं लक्ष असे. टीबी झाला आणि रोज इंजेक्षन लागतं म्हणून भाचीलाच दोन महिने ठेवून घे, कधी भावजयींचं बाळतंपण कर. कधी म्हातार्‍या वडलांचं माहेरी म्हणावं तसं आस्थेनं-जपणुकीनं होत नाही म्हणून त्यांना विश्रांतीला दोन-दोन महिने आण. कधी थोरल्या बहिणीला थोडा श्वास टाकता यावा म्हणून तिची गतिमंद तरुण मुलगी सांभाळायला महिनाभर ठेव. असं कायम चालायचं. गावातल्या गरीब घरांत कुणी आजारी पडलं, तर मामींकडे बामनाकडचंवाढून घ्यायला कुणीतरी येत असे. मग त्याला केळीच्या पानात मऊभात, लोणचं आणि लोट्यात ताक वाढून द्यायचं. दुकानात येणारे आडगावचे लोक अनेकदा वस्तीला राहायचे नि पहाटे उठून पुढे चालू लागायचे. त्यांनी भाकर बांधून आणलेली असायची, पण त्यांना कांदा-लोणचं वाढून द्यायचं. घरच्यासारखी दुकानच्या मालाचीही उन्हाळी वाळवणं असायची. गडीमाणसं असली, तरी देखरेख असेच. शंभरेक पत्र्याचे डबे कस्तर करून – म्हणजे सीलबंद करून – माडीवर ठेवलेले असायचे. त्याकरता घरी आलेला कल्हईवाला आठेक दिवस राहायचा. तो दुकानचं काम करी. त्याच्या बरोबरीनं काम करून, कल्हई करायला शिकून घेऊन, थोरल्या लेकीला हाताशी घेऊन घरातल्या भांड्यांना स्वतःच कल्हई करणं. चिवडे, लाडू, पेढे, लसणाची चटणी... असं करून दुकानात विकायला ठेवणं... एक ना दोन.

हळूहळू पै-पैसा गाठीशी बांधत तिनं सोनं घेतलं. कमी सोन्यात होतात म्हणून तिनं जाळीच्या पाटल्या केल्या होत्या, म्हणे. नि इतकी हौस असून, शिवणयंत्र घ्यायला पैसे कमी पडतात, म्हणून तिनं बांगड्या विकून टाकल्या. पफकंपनीचं शिवणयंत्र घेतलं.

मला तिच्या या निर्णयाचं फारच नवल वाटतं. ही ५७ सालची कोकणातल्या एका डोंगरी खेड्यातली गोष्ट. निर्णय घेणारी बाई चौथी पास. नवरा सातवी पास. पण दागिने महत्त्वाचे नाहीत, शिवणयंत्र ही गुंतवणूक जास्त महत्त्वाची, दीर्घकालीन फायद्याची आहे, हे तिला कसं सुचलं असेल? यंत्र चालवायला जमलं नाही नि ते तसंच पडून राहिलं तर, अशी भीती वाटली नसेल का? आजोबांनी आढेवेढे घेतले नसतील? तिनं ते त्यांच्या गळी कसं उतरवलं असेल? समजत नाही...

पण तिनं शिवणयंत्र घेतलं आणि चोळ्या–पोलकी, झबली-टोपडी, आणि कोपर्‍या असं शिवणाचं कामही ती घ्यायला लागली. वेळेला ती दिवसात चौदा-चौदा चोळ्या शिवत असे. घरातलं काम उरकून.

इतकं पुरलं नाही, म्हणून ही चौथी पास बाई तिच्या पाचही मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवून असायची. थोरल्या मुलाला गणितात फार गम्य नव्हतं, तर पार मॅट्रिकपर्यंत त्याच्या यत्तेचं अंकगणित स्वतः त्याला शिकवायची. तिची मुलं शिकली ते कुठे रत्नागिरीच्या आत्याकडे दोन वर्षं राहा, कुठे भांडूपच्या मावशीकडे दोन वर्षं राहा... असं करून.

थोरल्या लेकीला अठराव्या वर्षी मुंबईत नोकरी मिळताक्षणी तिनं पाच मुलांना ठाण्यात स्वतंत्र बिर्‍हाड थाटून दिलं. धाकटी लेक शिवणाच्या वर्गाला जायला लागली, थोरला लेक रिक्षा चालवू लागला, तर खालची दोघं ठाण्याच्या शाळेत शिकायला लागली. पाचच जण राहायचे, सगळ्यांत मोठी मुलगी एकोणीस वर्षांची, अविवाहित. हाही त्या काळातला तसा धाडसीच निर्णय. पण तो तिनं घेतला. जागा बर्‍या वस्तीत, सोयीच्या ठिकाणी, स्वच्छ असायला हवी, तर पागडी मोजावी लागणार होती. 

त्याकरता स्वतःच्या बांगड्या तिनं दुसर्‍यांदा विकल्या.

क्रमशः

Tuesday 2 July 2024

आजीची गोष्ट ०२

(भाग ०१)

०२

आजीचं लग्न आयनीतच झालं. घरापुढल्या मांडवात.

लग्नाला किती लोक असतीलतिच्या मोठ्या दोन बहिणींची लग्नं तोवर झालीच असतील. पण मोठी सिंधू तिच्या घरची तशी परवडच होती. त्याबद्दल पुढे कधीतरी. ताईचं घरचं बरं असणार. ती आणि तिचा नवरा असे आले असतील का लग्नालाबहुधा असतील. पाठची वत्सूशिरू आणि बाळू हे दोन भाऊइतकी तरी भावंडं असतील. वडील अर्थात असतील. कनवटीला सुपारी लावून त्यांनी ग्रहमक ठेवलं असेलकसं करतात कन्यादान विधुर पुरुषकाय माहीत. आणि अर्थात आजी. पण ती बोडकी. म्हणजे घरात मागीलदारी कुठेतरी तोंड लपवून खपणारी.

नवर्‍यामुलाकडून तीन लोक नक्की असतील. खुद्द नवरा मुलगा. नवर्‍याची थोरली बहीण. राधा. आणि तिचे यजमान अण्णा. त्यांनीच पुढाकार घेऊन मेव्हण्याचं लग्नकर्तव्य पार पाडायचं मनावर घेतलेलं. नवर्‍याला अजून एक थोरली बहीण कृष्णा नावाची. तिला कुशी म्हणत. तिचं सासर रत्नागिरीत. तिचा नवरा ऐन पंचविशीत वारलेला. त्यामुळे तीही लग्नाला येण्याचा प्रश्नच नाही. पण ती विधवा होईस्तोवर काळ बदललेला असावा किंवा रत्नागिरी तरी थोडं पुढारलेलं असावं. कारण ती बोडकी झाली नाही. त्यामागची गोष्ट तिला विचारायला हवी होती. पण ते राहिलंच. तर - तिनं रत्नागिरीतलं आपलं घर नीट राखलंआला-गेला-पै-पाहुणा-नातंगोतं सांभाळलं. तिचीही गोष्ट चटका लावणारीच. पण तीही पुढे कधीतरी. ती काही लग्नाला आलेली नसणार. आणखी एक बहीण होती, तिचं सासर खेडमधलंच. घर चांगलं शेतीवाडी असलेलं, पण नवरा बशा. तिचीही गोष्ट... असो. तर ती कदाचित असेल. पण थोडक्यात, वर्‍हाड एकूण तीन-चार जणांचंच.

नवरा मुलगा गणेश. त्याचं मूळ गाव पालगड. त्यांच्या वडलांची पालगडात सावकारी होती. हे मी प्रथम ऐकलंतोवर मी ‘श्यामची आई’ वाचलं होतं. श्यामच्या आईचा अपमान करणारा तो हरामखोर वसुली कारकून आजोबांच्या वडलांच्या पदरचा कारकून तर नसेलया शंकेनं मला कितीतरी दिवस अतिशय अतिशय अपराधी वाटत राहिल्याचं आठवतं. पुढे कधीतरी त्या अपराधाचा डंख पुसट होत गेला. असो. तर गणेशचे वडील वारले तेव्हा तो अडीच-तीन वर्षांचा होता. अलीकडच्या काळातही कर्तृत्ववान नवर्‍याची बायको विधवा झाली आणि तिला नवर्‍याच्या पैशाअडक्याची काडीमात्र माहिती नव्हती, त्यामुळे परवड झाली... अशा कहाण्या ऐकू येतात. तेव्हा काय परिस्थिती असेलत्याची निव्वळ कल्पनाच करता येते. त्या परिस्थितीत त्याच्या आईला काय राखायचं सुचलं असेलसोन्याच्या पुतळ्या भरभरून गडवे घरात असतअसं नंतर कधीतरी आजोबा सांगायचेतेव्हा आम्ही आ वासत असू. आजोबांच्या आईचं कौतुक असं की नवरा वारल्यावर एकत्र कुटुंबात मुलांच्या भविष्याची धूळदाण होऊ नये, म्हणून तिला  त्यातला एक गडवा आणि थोडी चांदी नणंदेकडे ठेवायला द्यायचं सुचलं. थोडं सोनं तिनं एका जावयाकडेही दिलं होतं. पण... एनिवे! आजोबांचे आईवडील सहा महिन्यांच्या अंतरानं पाठोपाठ वारले. कसल्याश्या साथीत एका वर्षभराच्या अवधीत घरातली एकूण आठ माणसं मरून गेली. सोन्याच्या कंबरपट्ट्यासकट दागिने ल्यायलेल्या दहा सासुरवाशिणी घरात नांदवणारं ते घर. ब्रिटिश सरकारकडून उत्तम शेतकरीअसा किताब मिळवणारे आजोबांचे सावकार वडील. दारी हौसेनं त्यांनी बाळगलेला छकडा. सगळं उण्यापुर्‍या वर्षभरात होत्याचं नव्हतं झालं.

पुढे लग्नानंतर आजीनं हौसेनं माहिती काढून पालगडला उत्सवाला जायला सुरुवात करेपर्यंत आजोबांच्या आयुष्यातलं पालगड पर्व संपलं. 

त्या सावकारी घरातलं एक नक्षीदार लाकडी कपाट आणि एक पैशांची लाकडी पेटी एवढंच आजीच्या संसारात आलं. अजूनही ते मामाकडे आहे. आता त्या वस्तूंची सगळी रया अर्थात गेली आहे. कंबरभर उंचीची जड लाकडी पेटी, आत मखमलीनं मढवलेले बरेच कप्पे-चोरकप्पे, खण असलेली. ती उघडताना कुलपाच्या सात वळशांनिशी सात घंटा होत, म्हणे. आता घंटा, आतली मखमल, पेटी उघडल्यावर दरवळणारा अत्तराचा वासबीस... जाऊन नुसतीच पेटी उरली आहे. तरी कपाटाच्या दारांवरच्या कोरीव कामातून त्याच्या सरलेल्या वैभवाच्या खुणा दिसतात. त्या वस्तू वगळता आजोबांना घरातलं काहीच लाभलं नाही.

आजोबांची रवानगी कुठल्याशा सावत्र काकाच्या संसारात झाली. "माझं अंथरूण बहुतेकदा ओलं होई, मग ती काकू जेवायला देत नसे, ‘नखं टुपवून’ गाल ओढायची," अशीही एक आठवण आजोबा सांगायचे. मग कधी या नातेवाइकाकडे, कधी त्या. आईवडलांच्या आठवणीच नाहीत. त्यांना तर आईचं माहेर कुठलं, गाव कोण, आडनाव काय... हेही माहीत नाही, असं ते सांगायचे. दोनपाच वर्षं अशीच गेल्यावर त्यांची एक बालविधवा मावशी त्यांना उचलून पुण्याला घेऊन गेली. तिचीही गोष्टच. तिचं तालेवार सासर केळशीला. पण बालविधवा झालेली ती मुलगी त्या घरात सत्तेची मोलकरीणच असणार. ती चक्क उठून पुण्याला गेली. लोकांच्या घरी पोळ्या लाटून ती पोट भरत असे, पण तिनं स्वतंत्र बिर्‍हाड केलं होतं. पुढे होईनासं झाल्यावर तिचा पुतण्या तिला पुन्हा घरी घेऊन गेला. तर - तिनं आजोबांना उचलून आपल्याबरोबर नेलं. माधुकरी मागायची, चार घरी पूजा सांगायची, शाळा शिकायची – असं तिनं त्यांना सातवीपर्यंत शिकवलं. ती मोठी शिस्तीची होती, म्हणे. मोरीत पाण्याची बादली भरलेली हवी. तितकंच नव्हे, पाण्याचा गडवाही त्याशेजारी नीट भरून-झाकूनच ठेवलेला असायला हवा... अशी तिची नेटकी राहणी. आजोबांची सातवी झाल्यावर तिच्याकडचं राहणंही संपलं. पुन्हा परवड. कुठे कधी दुकानाच्या बाहेरच्या फळ्यांवर झोप. पार्ल्याच्या बिस्किटाच्या फॅक्टरीत नोकरी कर... असे तरुणपणापर्यंतचे दिवस. पण त्याही दिवसांची आठवण आजोबा मजेनंच सांगायचे. “आम्ही खिशातून हिरव्या मिरच्या न्यायचो. बिस्किटं खायची आणि मिरचीचा चावा घ्यायचापुन्हा बिस्किटं. की पाणी. पोटभर!असं ते सांगायचेतेव्हा त्यांच्या नजरेत आत्मकरुणेचा लवलेशही नसायचा. निव्वळ स्वतः केलेल्या ट्रिकबद्दल लुकलुकती मजा असायची! हे पुढे त्यांच्या सगळ्या मुलानातवंडांतही आलं. पडलं तरी नाक वर! एनिवे!

राधा नि अण्णांना स्थैर्य आल्यावर त्यांनी गणेशच्या आयुष्याची जबाबदारी घेतली. अण्णा धोरणी आणि जबाबदार गृहस्थ असणार. आजोबांच्या आईनं जावयाकडे ठेवलेल्या सोन्याबाबत जावयानं हात वर केले. पण नणंदेकडे ठेवलेलं सोनं होतं. ते वापरून आजोबांच्या आत्तेभावाला गणेशचं लग्न थाटात करून द्यायचं होतं. पण आण्णांनी ते थोपवलं. 'त्याच्या संसाराला कामी येतील' म्हणून ते पैसे राखून ठेवले. अण्णांचं घर खेडजवळच्या तळे-मांडवे गावात होतं. होयहेही जोडगावच. स्वत अण्णा खेडात राहायचे. कधीतरी  मेव्हणा घरी आला असता, त्याला त्यांनी विचारलं, “ना घर ना दार. कशाला पुण्यामुंबईत हाल काढतोस? त्यापेक्षा इथे राहा.” आजोबा राहिले. तिथल्या अण्णांच्या दुकानात वर्षाला पाचशे रुपये अशा बोलीवर नोकरी केली.

त्यांचं लग्न काढल्यावर तळ्यातल्या त्या घराच्या मागच्या पडवीत अण्णांनी त्यांना बिर्‍हाड थाटून दिलं. पडवीत एका अंगाला एक भाडेकरू होताच. दुसर्‍या अंगाला मेव्हण्याचं बिर्‍हाड. मधलं घर अण्णांसाठी राखलेलं. अण्णांची तब्बेत तशी नाजूकच होती. मग आजोबांचे राखलेले पैसे वापरून त्यांनी आजोबांना दुकानात सात आणे हिस्सा दिला, नऊ आणे हिस्सा भाडेकरूला विकला. दुकानाची जागा आणि त्यामुळे वर्षाकाठी रॉयल्टी आण्णांची. ते सगळ्या व्यवहारावर लक्ष ठेवून असत. 

आजी लग्न होऊन आली ती त्या घरात. 

मला ते घर आठवतं. माजघरातून खाली पडवीत उतरलं की डावीकडे आजीचं बिर्‍हाड. मध्ये लाकडी मांडणीचं कपाट ठेवून त्या अर्ध्या पडवीचे दोन भाग केलेले. शिरल्या शिरल्या बसायची खोलीपुढे आत चूल आणि मोरी. उजवीकडे तसंच शेजार्‍यांचं नलूआजी आणि भाऊआजोबांचं घर. त्यांचं घर पूर्वी कसं होतं ठाऊक नाहीमला आठवतं तेव्हापासून त्या पडवीला पोटपडवी काढून नलूआजीचं स्वैपाकघर केलेलं होतं. दोन्ही घरांच्या मधून मागीलदारी उतरलं की न्हाणीतिच्यापुढे मोठी दगडी द्रोणतसंच खाली उतरत गेलं की चिकूचं झाड आणि मग विहीर. नलूआजीच्या घराच्या उजवीकडून खाली उतरलंतर तिकडेही अजून एक पोटपडवी आणि पुढे त्यांचं न्हाणीघर. माजघरत्यातली बाळंतिणीची खोली वा काळोखाची खोलीजुनं आणि आता वापरात नसलेलं स्वैपाकघर हे सगळं मधलं घर दोन्ही घरं मिळून वापरत. पुढीलदारी ओटीअर्ध्या पडवीत दुकानअर्ध्यात दुकानाचा माल.  

आजोबा तेव्हा रोज अर्धा कप ‘घेत’ असत. कुठली असेलकुठून मिळवत असतीलगावातल्या कुणा मिल्ट्रीवाल्याकडून घेत असतील? काय माहीत! आजोबांबरोबर ही माहितीही गंगार्पण. पुष्कळ मोठं होईपर्यंत याचा पत्ता आईलाही नव्हताइतकं हे गुपचूप प्रकरण असायचं. पण या सवयीपायी नवरा कामातून गेला तरही भीती आजीच्या पोटात असणार. त्यामुळे तिला भागीदारी आणि अण्णांचा आजोबांना असलेला धाक हे दोन्ही मानवलं. तिला स्वतःला अंकगणित अतिशय आवडे. ती लक्ष घालून दुकानचे हिशेब तपासत असे.

त्या घरात आजीनं तिचा संसार तर मांडलाचपण तिची सगळी हौसमौजकर्तृत्वआवडीनिवडी… आणि मुख्य म्हणजे माणसं जोडून घेणारा तिचा स्वभाव या सगळ्याला तिथे धुमारे फुटत गेले.  

क्रमशः

Monday 1 July 2024

आजीची गोष्ट ०१

आपल्याला आपले आईवडील आणि इतर नातेवाईक कुटुंबातल्या जुन्या आठवणी सांगतात. त्यात अर्थातच त्यांचे स्वतःचे बरेवाईट पूर्वग्रहआवडीनिवडीकाही प्रमाणात हितसंबंधही असतात. त्यामुळे त्या आठवणींच्या काचेतून आपल्याला दिसणार्‍या गोष्टी पूर्णतः नितळ नव्हेत हे खरंच. पण आपणही या चित्राचे पुढचे वाहकच असतो. आपलंही गुंतलेपण गृहीत धरता आलं आणि किंचित त्रयस्थपणा कमावता आलातर काचेची जातकुळीही थोडीफार ओळखता येऊ लागते. मग त्यातून दिसणार्‍या चित्राचे रंगही हळूहळू स्पष्ट होत जातात.

आईच्या आईच्या काही आठवणी नोंदून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या वाचण्यापूर्वी हा व्याप्तिनिर्देश वा मर्यादा वा डिस्क्लेमर लक्षात ठेवणं आवश्यक.

या आठवणींचं मोल तसं आमच्या कुटुंबाखेरीज इतर कुणाला नव्हे. पण असं म्हटलंतरी आपलं कुटुंब म्हणजे आपण तिघं-चौघंच फक्त नसतो. त्यापल्याड पुष्कळ गोतावळा असतो. त्यातल्या कुणाकुणाला यात रस असू शकेल. शिवाय कितीही व्यक्तिगत म्हटलंतरी त्यातून त्या काळाबद्दलचे थोडे मजेशीरथोडे उपयुक्तथोडे रसाळथोडे उद्बोधक तपशील सापडतात. बघू, काय मिळतं.

आजीचं नाव रंगू. तिचं नवर्‍यानं ठेवलेलं नाव ‘सरस्वती’ होतं. मला आजीनं भेट दिलेल्या चित्रकलेच्या पुस्तकावर तिनं तिचं नाव लिहिलेलं आहे. पण तिला तिच्या माहेरचे सगळे जण रंगू म्हणायचे.

रंगूला तिच्याहून मोठी दोन भावंडं - दोन बहिणीतर धाकटी तीन भावंडं - एक बहीण आणि दोन भाऊ. एकूण सहा भावंडं. आजी गेली तेव्हा ती जेमतेम ५९ वर्षांची होतीम्हणजे तिचं जन्मसाल १९३२ धरलं आणि तिच्या आगचीमागची भावंडं मिळून आठ-नऊ वर्षं धरलीतर तिच्या वडलांचं लग्न २५ सालच्या आसपासबरोबर शंभरेक वर्षांपूर्वी झालं असणार. आजी जेमतेम आठ वर्षांची असतानाच तिची आई गेली. वडलांनी पुन्हा लग्न केलं नाही. त्या सगळ्या भावंडांना सांभाळलंते आजीच्या आजीनं. 

तिचंही नाव सरस्वती.

आजीच्या या आजीची गोष्ट भलतीच सुरस आहे. तिचं लग्न म्हणे दुसरेपणावर झालं होतं. तत्कालीन लग्नांची नि बाळंतपणाची वयं धरून अंदाज करत करत मागे गेलंतर तिचं लग्न १९०० सालाच्या सुमारास कधीतरी झालं असावं. नवरा पंढरपुराकडे कुठेसा जज्ज होता. जज्ज हा हुद्दा ऐकून मी थोडी चकित झाले होते. पण या सगळ्या ऐकीवच गोष्टी. खरंच जज्ज होता की कुठलं सरकारदरबारचं पद होतंकुणाला ठाऊक. पण बर्‍याशा हुद्द्यावर असावा. बायकोच्या पदरात एक मुलगा घालून तो वारला. मुंबईत आलेली प्लेगची साथ १८९६ सालची. तिथून पुढची वीस-पंचवीस वर्षं प्लेग महाराष्ट्रात धुमाकूळ घालतच होता. त्यात तिचा नवरा वारला असेल कापण त्या काळात माणसं मरायला तशी थोडकी निमित्तं पुरी होत असावीत. कशानं तडकाफडकी वारलाकुणाला माहीत. इतकंच माहीतकी त्याच्यामागे त्याच्या कुटुंबाची पुरती वाताहत झाली. बायकोला तिच्या माहेरचं कुणी बघणारं नव्हतं असावं. नवर्‍याच्या नावे कोकणातल्या आयनी मेट्याला थोडकी जमीन आणि जुनं घर आहेइतक्या माहितीवर वर्षाच्या आतल्या तान्ह्या पोराला पोटाशी घेऊनबैलगाडी जोडून ती पंढरपुराहून एकटीच कोकणात आली. सोबत घरातलं जमेल ते किडूकमिडूक बांधून आणलं होतं, म्हणतातपण होतं-नव्हतं ते त्या प्रवासात चोरापोरी गेलं. कोकणात पोचलीतेव्हा जमीन भाऊबंदकीतल्या कुणीकुणी लाटलेली. मग तिनं खोताकडे तक्रार गुदरली. रीतसर पंचनामे झाले आणि तिला तिच्या नवर्‍याच्या नावचा जमिनीचा तुकडा आणि घर मिळालं.

तिची गोष्ट ऐकताना माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. किती वर्षांची असेल ती मुलगीएकटंच पोर पदरातम्हणजे जेमतेम पंधरा-वीस वर्षांची पोर असेल. नवरा मरून गेलेलापाठीशी कुणी नातेवाईक नाहीतम्हणजे निराधारच. ती कधी कोकणात आली तरी असेल का त्यापूर्वीकी कोकणातलीच होती आणि नंतर नांदायला नवर्‍यामागे लांब पंढरपुरासारख्या देशावरच्या गावी गेली असेलसगळेच अंदाज. ती अगदी कोकणातली असली असं म्हटलंतरी त्या वयात अंगावरचं पितं पोर घेऊन एकटीनं इतका लांबचा प्रवास करायचा... येऊन भाऊबंदकीशी दोन हात करायचेकुणी अंगावर हात टाकलापोराचा जीव घेऊ पाहिला… तर ती काय करणार होतीयेताना कुणाची सोबत पाहिली असेल तिनंकुणाच्या जिवावर निर्णय घेतले असतीलकुणाच्या आधारानं हिंमत बांधली असेलसमजत नाही.

आयनी मेटं हे रत्नागिरीतलं डोंगरी गाव जोडगाव खरं तर. आयनी हे एक गाव आणि मेटं हे दुसरं. क्रांतिकारक अनंत कान्हेर्‍यांचं गाव म्हणून ते प्रसिद्ध आहे. पंढरपुरापासून अडीचशे किलोमीटर अंतर. आता नकाशात आयनी मेटं शोधलंतर आयनीच्या जवळून जगबुडी नदी गेलेली दिसते आणि आयनीच्या समोरच्या बाजूला पेंडशांनी प्रसिद्ध करून टाकलेलं तुंबाड. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी आयनी मेटं दुर्गमच असणार.

अशा गावात ती मुलगी घर धरून राहिली. ती आली तेव्हा घराची अवस्था काय असेलती कुठे राहिली असेलतिला पहिले काही दिवस कुणी जेवू-खाऊ घातलं असेलकुणाकडे तक्रार करायचीसाक्षीपुरावे कसे करायचे… हे तिला कसं कळलं असेलतिला कुणी धमकावलं-बिमकावलं तर नसेल?

त्या गावात तिनं मुलाला वाढवलं. तो काय शिकला होताकाय करत असेमाहीत नाही. थोडकी शेती आणि गुरं असावीत घरची. कारण तो मुलगा म्हणजे रंगूचे वडील - रानात गुरं चरायला नेत असेतो मुलगाही त्याच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून असावा. गाव अक्षरशः डोंगरात वसलेलं. आजूबाजूला गच्च रान. पुढे जाऊन जगबुडीला मिळणारा पर्‍ह्या म्हणजे ओढा घराजवळच्या घळीतूनच वाहणारा. तिकडे म्हसरांना पाणी पाजायला नेलं असताना एक वानर माणसाएवढा हुप्प्याच म्हणे त्याच्या मानगुटीवर येऊन बसला. तर त्यानं वानराचे पाय धरून त्याला खाली ओढलं आणि तसंच्या तसं पर्‍ह्यातल्या मोठ्या धोंडीवर आपटलं. हुप्प्या तिथल्या तिथे ठार. तसाच एक किस्सा त्याच्या शूरवीर म्हशीचाही ऐकलेला. म्हसरं चरताहेत आणि हा तिथल्या एका कातळावर बसलेला. जवळच्याच जाळीत वाघाची चाहूल लागली. वाघ नजरेला पडल्यावर त्या मुलाची जागचं हलायची हिंमत होईना. असा बराच वेळ गेला. ज्या क्षणी त्या जाळीतून वाघरानं बाहेर झेप घेतलीत्याच क्षणी पलीकडच्या म्हशीनं वाघावर झेप घेतली. बरोबर मोठाच कळप होता गुरांचा. त्यांनीही जिवाच्या आकांतानं वाघरावर उलटा हल्ला केला. मुलगा त्या रणधुमाळीत जागच्या जागी खिळलेला. अखेर वाघानं शेपूट घालून काढता पाय घेतला, तेव्हा मुलगा सुखरूप घरी परतला.

या आठवणींत कुणी-कुणी अर्थात पदरची भर घातली असणार. पण मुदलात काहीतरी असल्याखेरीज ती घालता येणं कठीण. बाकी काही नव्हेतरी तेव्हाचं किर्र जंगलातलं - डोंगरात वसलेलं आयनी गाव आणि ही जिगरबाज मायलेकरं, यांची कल्पना मात्र करता येते.

आजीची ही आजी कोकणात आली तेव्हाच सोवळी होती. लाल आलवणचोळीविहीन जगणंबोडकं डोकं. मुलाचं लग्न करून दिल्यावर तरी तिला चार दिवस सुखाचे दिसावेतपण ते नशिबात नव्हतं. तिच्यामागचे संसाराचे व्यापताप कधी संपलेच नाहीत. पोराचं लग्न करून दिलंपण सुनेशी पटत नसे. त्यामुळे सुनेच्या माहेरच्या गावी, जवळच बोरघरात त्यानं किडूकमिडूक किराणाचं दुकान घातलं आणि वेगळी चूल मांडली. आयनीच्या घरात आजी एकटी आपली आपण राही. पण सहा पोरं मागे ठेवून सून निवर्तली आणि वेगळं बिर्‍हाड संपलं. मुलानं पुढे दुसरं लग्न केलं नाही की ते होऊ शकलं नाहीकुणाला ठाऊक. थोडकी जमीन नि राहतं घर तेवढं गाठीला. कुणाचा आधार नाही. गरिबी मी म्हणत असणारच. त्याला कोण मुलगी देणार

त्या सहाही नातवंडांचं आजीच्या आजीनं केलं.

आजीकडे एक मोठा पेटारा होता. त्या पेटार्‍यावरच ती निजत असे. घर आणि जमीन मिळवण्यासाठी कागद कनवटीला लावून ती एकटी चिपळुणापर्यंत चालत जात असे. तिच्या त्या कज्जेदलाल्यांची कागदपत्रं तिनं त्या पेटार्‍यात मरेपर्यंत जिवापाड सांभाळली. “आता घर नि जमीन सगळं आपल्या नावावर आहे, आता करायचं काय ते जपून?” असं म्हणून ती गेल्यावर तिच्या नातवानं त्या रद्दीला काडी लावली. असो.

माझ्या मावशीला तिच्या लहानपणी आजोळी गेल्यावर पणजीआजीला बघितल्याचं आठवतं. म्हणजे त्या जिगरबाज बाईनं पणतवंडंही पाहिली.

बाईचं सोनं झालं.

क्रमशः

(भाग ०२)