Friday 10 June 2022

होय, मी हे अजून बघितलं नव्हतं - ३

अमोल उदगीरकरच्या 'न-नायक'चा एक निराळा परिणामही झाला. मधल्या काळात प्रियकर, प्रेमभंग, मैत्र, मैत्रभंग या सगळ्या हार्मोनल भानगडींमध्ये मेनस्ट्रीम हिंदी सिनेमे बघणं या आपल्या अवतारकार्यावरून आपलं लक्ष्य भलतंच विचलित झालं असल्याचा साक्षात्कार झाला, अपराधीपण आलं. परिणामी 'न-नायक' एखाद्या संदर्भग्रंथासारखं हाताशी घेऊन मी राहिलेले सिनेमे बघायला घेतले. या मालिकेतली टिपणं अशी जुन्या, राहून गेलेल्या सिनेमा-मालिकांविषयीची असतील.

। ३

~

रणविजय सिंग हे इरफान खाननं रंगवलेलं 'हासिल'मधलं पात्र. मागासवर्गीय समाजातून आलेला कायद्याचं शिक्षण घेणारा रणविजय 'हासिल'चा हीरो आहे. पण अशा मागास जातीतल्या, डोळ्यांना पोटं असलेल्या कुरूप, दळिद्री पुरुषाला ...भलेही तो शिक्षण का घेत असेना, जिगरबाज का असेना, प्रेमासाठी मरायला तयार का असेना... त्याच्या प्रेमात कोण पडणार? त्यानं मेलंच पाहिजे. आणि तो मरतो. 'सीना तान के'मरतो. तिथेच 'हासिल' संपतो खरा म्हणजे. पण नंतर जे काही होतं पडद्यावर, ते बघताना अधिकच अस्वस्थ व्हायला होतं.

'हासिल'मध्ये महाविद्यालयीन राजकारण आहे हे फारच मोठं अंडरस्टेटमेंट होईल.

शिक्षक आणि शिक्षण नामक निरुपयोगी गोष्टींची तिथे होणारी अ‍ॅबसर्ड कुचेष्टा, राजकारण्यांनी त्याला आणलेलं आखाड्याचं स्वरूप, ओतलेला पैसा, चालवलेला हिंसाचार आणि उपटलेले फायदे... हे सगळं गेली काही वर्षं सिनेमा चित्रित करतो आहे. 'युवा', 'गुलालयांसारख्या सिनेमांच्या केंद्रस्थानी, तर 'सैराट'सारख्या सिनेमाच्या पार्श्वभूमीला हे सातत्यानं दिसत राहतं. तिथल्या हिंसाचाराइतकंच अस्वस्थ करतं, ते त्याही परिस्थितीत जमेल ते तूप आपल्या पानावर ओढून घेण्याचा प्रयत्न करत, मान तुकवत, घाबरत तिथे शिक्षणाचं नाटक मन लावून करणारे सर्वसामान्य विद्यार्थी आणि शिक्षक. 'हासिलअशा सिनेमांपैकी एक.

रणविजय, अनिरुद्ध, निहारिका हा 'हासिल'मधला प्रेमाचा त्रिकोण. पण वरकरणी दिसतो, तसा तो एकाच स्त्रीच्या प्रेमात पडलेले दोन पुरुष असा सर्वसाधारण त्रिकोण नाही. अनिरुद्ध सर्वसामान्य तिकीट तपासनिसाचा कनिष्ठमध्यमवर्गीय मुलगा. अभ्यास, नाटकात अभिनय, चिकणा-गोरापान चेहरा, हळुवार प्रेम वगैरे करणारा. निहारिका ठाकूर घराण्यातली, श्रीमंत घरातली मुलगी. सुंदर, कोवळी, बापाविरुद्ध किंचित बंड करणारी. रणविजय सगळ्या अर्थांनी त्यांच्याहून निराळा. तो मागासवर्गीय आहे, महाविद्यालयीन राजकारणातल्या गुंडगिरीच्या 'अरे'ला 'कारेकरण्याची नुसती हिंमतच नव्हे, तर पलट वार करण्याची खुजलीही त्याच्यात आहे. तो घरातल्या लोकांच्या खुनाचा बदला घेताना जराही डगमगत नाही. त्याला डोकं तर आहेच, पण वाचनानं नवं जगही दिसू लागलं आहे. अनिरुद्ध आणि निहारिका यांच्या सुबक-नेटक्या-रोमॅंटिक जगात जगण्याची, त्याच्यासारख्या माणसाचा बळी घेऊ शकणारी, जीवघेणी आस त्याला आहे. वासनेची जी ठिणगी त्याच्या मनात निहारिकासाठी फुलते आहे, तीच ठिणगी त्याला अनिरुद्धमधल्या 'कलाकारा'कडे आकर्षित करते. त्याला भाई, मुन्ना म्हणून पंखाखाली घ्यायला लावते.

दुसर्‍या बाजूनंं, अन्याय न साहणार्‍या कलावंंत मनाला मळल्या वाटेपल्याड जाणार्‍याबद्दल वाटणारं आकर्षण, अनिरुद्धला रणविजयबद्दल आहे. 

त्या अर्थानं हा त्रिकोण लोकविलक्षण आहे... 

या सगळ्या पार्श्वभूमीवर स्थानिक उच्चवर्णीयांचे राजकीय लागेबांधे, रणविजयच्या महत्त्वाकांक्षा आणि वासना, आणि निहारिका-अनिरुद्धचं प्रेम या सगळ्यात जे काही घडतं, तो 'हासिल'.

त्यातल्या रणविजयच्या पात्राबद्दल पोटात कालवून येतं. पोरींनी धुतकारल्यावर "अब का करे हमरी ऑंखे ऐसी हैं तो...म्हणून कासावीस होणारा, हाणामार्‍या करतानाही पोरीच्या सुंदर केसातली रिबिन खेचून तिला अदबीनं जाऊ देणारा, पोरीचा कपटानं कब्जा घेण्यासाठी तिच्याशी गोड बोलतानाही तोंडात वेलची ठेवण्याची तमीज आणि न्यूनगंड असणारा रणविजय. आपल्यापायी मेलेल्या साथीदारांसाठी रडणारा आणि घरच्यांना रातोरात गौरीशंकरनं ठार केल्यावर गुरासारखा ओरडणारा रणविजय. तसंच त्याला मोह घालणारं अनिरुद्धचं गोरंगोमटं, पुस्तकी, नेमस्त कलाकारपण. त्याच्याबद्दल नि तो जिच्या प्रेमात आहे त्या निहारिकाबद्दलही वाटणारी असूया. त्याचं संरक्षण करावं, त्याला मदत करावी... अशी उफाळून येणारी इच्छा. सरतेशेवटी अनिरुद्धहून सरस-बुलंद पुरुष आपण आहोत, या खातरीपायी तो अनिरुद्धसमोर खुल्लमखुल्ला उभा ठाकतो, तेव्हा त्याच्यातलं कोवळेपण गळून पडतं. तो धुतल्या तांदळासारखा नाहीच. उलट डावपेच ओळखून एक पाऊल पुढे चालणारा आणि त्यात कसलाही विधिनिषेध न बाळगणारा आहे. पण त्याच्यात काहीतरी कोवळं, समाजानं दाबून ठेवलेल्या पायरीवरून कसोशीनं वर येऊ बघणारं, नाजूक आहे. "गाना गा रहे थे, इसलिये नही मारा तुमको!" किंवा "गुरिला वॉर पता हैं, पढते वढते हो की नही सालों?" असं सहजी म्हणून जातो तो. त्याच्यासाठी जीव तुटतो.

आणि त्या पार्श्वभूमीवर नाकासमोर चालणारे, रणविजयची सोईस्कर मदत घेणारे, एरवी हिंसाचारापासून दूर राहू इच्छिणारे अनिरुद्ध नि निहारिका – साली काय नावं निवडलीत! वा! – हळूहळू खलनायकी भासू लागतात... भाबडे खरे, पण रणविजयइतकेच स्वार्थी. फक्त त्याच्याहून देखणे, त्याच्याहून 'वरच्या जातीत' जन्माला आलेले.

पडद्यावरच्या हिंसाचारानंच सगळं बिनसतं असं मानून तो बघणं टाळणारे आपण, अनिरुद्ध आणि निहारिकाच असतो, असं तर तिग्मांशू धुलियाला सुचवायचं नसेल? काय की. सांगता येत नाही.

~

इरफान गेल्यावर बघितलेला त्याचा हा पहिलाच सिनेमा. हे भलतंच मेलोड्रामाटिक वाटेल, आहेचपण माझी हिंमत नव्हती होत त्याला पडद्यावर बघायची. अखेर बघितला तो 'हासिल'. आता कार्य पार पडलं म्हणायचं.

Wednesday 8 June 2022

होय, मी हे अजून बघितलं नव्हतं - २

अमोल उदगीरकरच्या 'न-नायक'चा एक निराळा परिणामही झाला. मधल्या काळात प्रियकर, प्रेमभंग, मैत्र, मैत्रभंग या सगळ्या हार्मोनल भानगडींमध्ये मेनस्ट्रीम हिंदी सिनेमे बघणं या आपल्या अवतारकार्यावरून आपलं लक्ष्य भलतंच विचलित झालं असल्याचा साक्षात्कार झाला, अपराधीपण आलं. परिणामी 'न-नायक' एखाद्या संदर्भग्रंथासारखं हाताशी घेऊन मी राहिलेले सिनेमे बघायला घेतले. या मालिकेतली टिपणं अशी जुन्या, राहून गेलेल्या सिनेमा-मालिकांविषयीची असतील.

| २
~

न्यूटनमला आवडला की नाही? मला सांगता येत नाही.


त्याचा पोत आणि पट कादंबरीसारखा सर्वसमावेशक नि विस्तीर्ण नाही. ना तो काळाच्या भल्या मोठ्या पटावर वसलेला आहे
, ना तो व्यवस्थेच्या यशापयशाची कारणं खोलात जाऊन तपासत. तो एखाद्या लहानश्या पण भेदक कथेसारखा आहे.

नक्षलग्रस्त भागातल्या एका मतदानाच्या दिवसाची गोष्ट. त्या दिवसाच्या रंगमंचावर येतात ती पात्रं, एखाद—दुसर्‍या जोरकस संवादाच्या फटकार्‍यानिशी दिसतील तितके त्यांचे इतिहास-भूगोल, त्यांच्यासमोर आणि भोवताली असलेली परिस्थिती, आणि त्या परिस्थितीला प्रतिक्रिया देताना त्यांनी घेतलेले निर्णय. पार्श्वभूमीला भारतीय लोकशाही नावाचा भला मोठा निष्प्राण, सुस्त भासणारा पट. या कथेदरम्यान पात्रांच्या आयुष्यात जे काही घडतं त्याला त्याचे संदर्भ आहेत. पण ही एकतर्फी वाट नाही. ही पात्रंही त्या पटाला नवनवे अर्थ प्रदान करतात. व्यवस्थेत काम करणारी माणसं आणि व्यवस्था यांच्यातल्या देवाणघेवाणीची ही गोष्ट.

आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागांतल्या मतदानामागे अनेक प्रवाह सळसळत असतात. जंगलाखालच्या जमिनीतल्या खनिजांची समृद्धी, सैन्यानं गावकर्‍यांशी वागताना अवलंबलेले भलेबुरे मार्ग, लोकनेत्यांचा या सगळ्याशी जराही संबंध नसणं, नक्षलवाद्यांची अदृश्य पण सततची दहशत, सगळं काही कागदोपत्री धड होण्यातच रस असलेली एखाद्या अजगरासारखी व्यवस्था, पैशाखेरीज निरनिराळ्या प्रकारचे भ्रष्टाचार, आणि जनतेला काय हवं आहे, या प्रश्नाचा विचार करता या सगळ्या गुंत्याचं आ वासून उभं ठाकणारं निरर्थकपण. हे सगळं न्यूटनअचूक पकडतो.

तसं करताना काही ठसठशीत आणि मानवी पात्रं रेखाटतो. रात्रीच्या अंधारात वापरण्याचे गॉगल्स मिळत नाहीत म्हणून भडकलेला, आपल्या टीममधल्या पोरांच्या जिवाच्या काळजीनं सगळं लवकरात लवकर गुंडाळू बघणरा संरक्षण अधिकारी – पंकज त्रिपाठीनं हे काम केलंय. तर बदल घडवून आणण्याच्यापुस्तकी, भाबड्या आदर्शवादी कल्पना उराशी घेऊन असलेला सणकी निवडणूक अधिकारी न्यूटन कुमार – राजकुमार राव. दोघंही आपापल्या जागी बरोबरच आहेत. त्यांना रागलोभ, हताशा, खवचटपणा, विनोदबुद्धी, सदसद्विवेकबुद्धी... असं सगळंच आहे. त्यांच्यामधली रस्सीखेच हा कथेतला मुख्य संघर्ष. पण रघुवीर यादवांनी रंगवलेला, किंचित-लेखकपण बाळगून असलेला सिनिकल सरकारी कारकून आणि अंजली पाटीलनं रंगवलेली आदिवासी समाजातली तरुणी ही पात्रंही महत्त्वाची आहेत.

कुठल्याश्या जुनाट मासिकातली कथा वाचून एकमेकांचा जीव रिझवणारे सैनिक, सामोपचारानं भांडण सोडवू बघणारा आदिवासी मुखिया. आणि काही प्रसंगांपुरताच भेटून जाणारा, संजय मिश्रानं रंगवलेला निवडणूक प्रशिक्षण अधिकारी. तुम्हारी प्रॉब्लेम क्या है पता है? तुम्हे अपनी इमानदारी का घमंड है.असं न्यूटन कुमारला - त्यानं सुनावलेलं वाक्य सिनेमाच्या शेवटी, न्यूटनकुमारला वक्तशीरपणाबद्दल मिळालेलं प्रमाणपत्र बघताना पुन्हा आठवतं. वर्तुळ पूर्ण होतं.

ही पात्रं लक्ष्यात राहतात. ते त्याचं बलस्थान आहेच. पण या जगड्व्याळ व्यवस्थेची, तिच्या प्रश्नांची, ताकदीची, अपयशाची... काही मोजकी क्षणचित्रं दिसून लुप्त होतात, बस. एक पार्श्वभूमी यापल्याड त्यांना काहीही भवितव्य नाही.

हाच न्यूटनमधला कमकुवत दुवा.

Monday 6 June 2022

होय, मी हे अजून बघितलं नव्हतं - १

अमोल उदगीरकरच्या 'न-नायक'चा एक निराळा परिणामही झाला. मधल्या काळात प्रियकर, प्रेमभंग, मैत्र, मैत्रभंग या सगळ्या हार्मोनल भानगडींमध्ये मेनस्ट्रीम हिंदी सिनेमे बघणं या आपल्या अवतारकार्यावरून आपलं लक्ष्य भलतंच विचलित झालं असल्याचा साक्षात्कार झाला, अपराधीपण आलं. परिणामी 'न-नायक' एखाद्या संदर्भग्रंथासारखं हाताशी घेऊन मी राहिलेले सिनेमे बघायला घेतले. या मालिकेतली टिपणं अशी जुन्या, राहून गेलेल्या सिनेमा-मालिकांविषयीची असतील.
~
ब्लॅक फ्रायडे


अलेक पद्मसींनी दूरदर्शनच्या काळात एक जाहिरात तयार केली होती. उसाच्या रसयंत्रांच्या अस्वच्छ हाताळणीमुळे काविळीसारखे रोग होऊ शकतात, हे दाखवून देणारी. ती इतकी परिणामकारक होती की ती मागे घेण्याची विनंती पद्मसींना करण्यात आली. 
तसंच काहीसं मला कश्यपचा हा सिनेमा बघताना वाटत होतं. 
इतकं रॉ, एखाद्या माहितीपटाच्या शैलीचा वापर करून अस्सलतेचा परिणाम साधणारं, अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीविषयी प्रगल्भ, ठाम, आणि नेमकं विधान करणारं, प्रतिमांचा इतका प्रभावी वापर करणारं, अनेक प्रॉमिसिंग चेहरे समोर आणणारं - इतक्या ज्वालाग्राही नाजूक विषयावरचं - आणि तेही अनेक राजकीय नेत्यांविषयी आणि व्यवस्थांविषयी नावानिशी बोलायला न कचरणारं काही... असा सिनेमा होता होईतो दाबून टाकला जाणं ही सिनेमाच्या अभूतपूर्व थोरवीचीच खूण होती असणार.
बॉम्बस्फोटांनंतर ११ वर्षांनी तयार झालेला सिनेमा त्यानंतर ३ वर्षं रखडला. आज त्यालाही १५ वर्षं झाली. आज सिनेमा बघताना त्याला आजच्या राजकीय परिस्थितीचे संदर्भ जसेच्या तसे लागू पडतात, आणि तो अधिकच अंगावर येतो. 
या विषयावर अनेक परिणामकारक सिनेमे आले आहेत. त्यांपैकी 'वेन्स्डे' आणि 'बॉम्बे' हे माझ्या कायमस्वरूपी बघण्यातले सिनेमे. परिणामकारक, पण काहीसे सोपे. अतिशय प्रभावी आणि सोप्या - काही कळायच्या आत डोक्यात अर्थ पेरून जाणाऱ्या - चित्रचौकटी हे 'बॉम्बे'चं बलस्थान. तर अत्यंत चपखल, बिनतोड, अस्सल युक्तिवाद हे 'वेन्स्डे'चं. पण 'ब्लॅक फ्रायडे' या सगळ्याच्या पार पलीकडे कुठेतरी घेऊन जातो. गुन्हेगाराकडून गुन्हा कबूल करून घेण्यासाठी पोलीस लॉकपमध्ये होणारी मारझोड बघताना ओकणारा पोलीस अधिकारी. आपल्याच शरीराचा तुटलेला तुकडा न कळता, आजूबाजूच्या उद्ध्वस्ततेचाच धक्का सहन न होऊन, भेदरलेले मानवी शरीरावरचे डोळे. चेहऱ्यावरचे रक्ताचे डाग आणि अश्रू न पुसता सांडलेल्या साखरेचे कण वेचून खाणारं मूल. स्फोटांनंतर कानांत भरून राहिलेला भण्ण आवाज. आपण च्युत्या बनलो आहोत या निष्कर्षावर येऊन अखेर शांतता गवसलेला सर्वसाधारण भारतीय मुस्लीम तरुणाचा चेहरा. जगाला आग लावायला निघालेल्या - आणि लावून सहीसलामत फरार राहू शकलेल्या - मेमनचे विकृत संतप्त डोळे... यांतलं काहीच विसरता येत नाही. 
तसाच अत्यंत साटल्यानं आणि सातत्यानं अथपासून इतिपर्यंत सुचवला गेलेला हिंसा-सूड-हिंसा हा कार्यकारणभावही.
या चक्रांची अनेक आवर्तनं आपण पाहिली आहेत. आज आकाराला आलेल्या भारतीय राजकारणातल्या दडपणुकीची कोणती फळं उद्या दिसू लागतील, त्याचं भेसूर चित्र मनाशी उभं राहत जातं. ते पुसू म्हणता पुसता येत नाही.
असं, कधीही जुनं न होणारं काही, जन्माला घालणाऱ्या लोकांना त्या कलाकृतींच्या अमरत्वाचं समाधान वाटत असेल की न सोसणारं दुःख? समजत नाही...