Showing posts with label साहित्यादि. Show all posts
Showing posts with label साहित्यादि. Show all posts

Monday, 15 July 2024

एक मोठी रेष...

सुनीताबाईंबद्दल मी नव्यानं काय लिहिणार? त्यांचं सगळं आयुष्य महाराष्ट्राच्या पुढ्यात आहे. त्यातला निरलस कष्टाळूपणा, कठोर तत्त्वनिष्ठा, धारदार संवेदनशीलता, कमालीचं औदार्य, शास्त्रकाट्याची कसोटी लावणारी न्यायबुद्धी, कोवळं कविताप्रेम, परिपूर्णतावादी वृत्ती, पुलंच्या कामाचं त्यांनी केलेलं व्यवस्थापन, जीएंशी असलेली त्यांची अपूर्वाईची पत्रमैत्री... सगळंच आपण अनेक दशकं जवळून पाहिलेलं, आदरानं-अप्रूपानं अनुभवलेलं. त्याबद्दल नव्यानं सांगण्याजोगं काही नाही. ते अधिक जवळून बघण्याचं भाग्य मिळालेले, अधिक नेमकीपणी सांगता येणारे, अधिक काळ त्यांना पाहिलेले... अनेक लोक आहेत. मी त्यांच्याहून वेगळं काय सांगणार?

मी वेगळं सांगू शकीन ते बहुतेक माझ्या मनातल्या त्यांच्या प्रतिमेबद्दल आणि त्यातून मला मिळालेल्या गोष्टींबद्दल. 

सुनीताबाईंचं लेखन मी वाचलं ते पुलंच्या भक्तीत पूर्णतः बुडून गेल्यावर. ऐन घडणीच्या वयात. चौदा-पंधराव्या वर्षी. आम्हांला दहावीत असताना ‘आहे मनोहर तरी’मधला एक अंश मराठीच्या पुस्तकात अभ्यासाला होता. त्या निमित्तानं ‘आहे मनोहर तरी’ हातात आलं आणि मला माझ्या पिंडाला मानवणारं, अगदी जवळचं वाटणारं काहीतरी मिळाल्याचा भास झाला. त्या लेखनातली बंडखोरी, स्वातंत्र्यावरचं प्रेम आणि त्याकरता किंमत मोजण्याची तयारी, अतिशय नाजूक आणि सूक्ष्म भावनांचे पदर उलगडून बघण्याची हातोटी आणि त्यामागची अपरिहार्यता... हे सगळं माझ्या तोवरच्या वाचनापेक्षा पूर्ण वेगळं होतं. माझ्या संवेदनाखोर स्वभावाला ते लेखन फार जवळचं वाटलं. 

त्यापेक्षाही निराळी आणखी एक गोष्ट घडली, असं आता जाणवतं. 

आपण घडतो त्यात निरनिराळ्या बाबींचा हात असतो. प्रत्यक्ष आयुष्यातली उदाहरणं आणि बरावाईट वारसा असतो, तसाच नजरेसमोर वावरणार्‍या – समाजातल्या इतर प्रतिष्ठित उदाहरणांचाही भाग असतो. त्यातल्या कुणाचे प्रभाव आपण आपल्यावर पाडून घ्यायचे हे निवडणारे आपणच असतो. पण मुळात अशा प्रकारची उदाहरणं भोवतालात असावी लागतात. 

सुनीताबाई तशा होत्या. 

त्यांचं स्वतःचं कर्तृत्व आणि गुणवत्ता नाकारण्याची आजघडीला कुणाचीही छाती होणार नाही. पण 'आहे मनोहर तरी' प्रकाशित झाल्याच्या अल्याडपल्याडच्या काळात पुलंची लोकप्रियता वादातीतपणे त्यांच्याहून मोठी होती. पुल या नावाला एक जादुई वलय होतं. तसं तर ते आजही आहेच. तेव्हा ते किती प्रभावी असेल, याची कल्पना आपण सहजगत्या करू शकतो. पुलंना आणि त्यांची पत्नी म्हणून सुनीताबाईंना मराठी माणसांच्या जगात मानाची जागा होती. मंगला गोडबोलेंनी सुनीताबाईंच्या चरित्रामध्ये पुल आणि सुनीताबाई यांना 'महाराष्ट्राचं फर्स्ट कपल' अशी अतिशय चपखल संज्ञा वापरली आहे. खरोखरच त्या दोघांचं स्थान तसंच होतं. अशा ठिकाणी असणार्‍या सुनीताबाईंनी आपल्या लोकप्रिय कलावंत नवर्‍याच्या सोबत संसाराची धुरा निमूट वाहिली असती आणि मनोभावे त्याच्यासह मिरवलं असतं, तरीही त्यांचा उदो-उदोच झाला असता. पण त्यांनी हा सहज मिळू शकणारा मान नाकारला. त्यांनी या भूमिकेच्या बरोबर उलट वागून दाखवलं. 

'आहे मनोहर तरी'मधून त्यांनी नवरा म्हणून पुलंच्या वागण्याचं रोखठोक विश्लेषण केलं. आणि पुलंचे दोष त्यांच्या पदरात घातले. वास्तविक पुल हे अशा पिंडाचे होते, की त्यांनी सुनीताबाईंच्या कोणत्याही निर्णयांना कधीही काडीमात्र विरोध केला नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड येणं तर त्यांच्या स्वभावात नव्हतंच, पण सुनीताबाईंनी स्वतः पुलंच्या बाबतीत घेतलेले निर्णयही त्यांनी विनातक्रार मानले. या व्यवस्थेत सुनीताबाईंची दोन्ही अंगांनी सोयच होती. स्वातंत्र्य तर होतंच, शिवाय कर्कशा न व्हावं लागण्याची सोयही होती. ही व्यावहारिक सोय वापरून मूलभूत प्रश्नांना बगल देता येणं एखादीला सहज शक्य झालं असतं. पण सुनीताबाईंनी तसं केलेलं दिसत नाही. त्यांनी पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या चौकटीबद्दलच प्रश्न उपस्थित केले. 'वेळोवेळी मी माझे आणि भाईच्याही आयुष्याबाबतचे निर्णय घेत गेले, हे जरी माझ्या पथ्यावर पडत असलं, तरी भाई मात्र वेळोवेळी एखाद्या जाणत्या सहचरासारखं न वागता एखाद्या लहान मुलासारखं आत्मकेंद्री पद्धतीनं वागला आहे,' या आशयाचा सल त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता मोकळेपणी बोलून टाकला. पुलंना गाडी चालवता येत नसतानाही निव्वळ पुरुष असल्यामुळे त्यांना मिळालेल्या ‘शिकिवनाऱ्या बाबा'च्या उपाधीबद्दलचा किस्सा प्रसिद्ध आहे. पण उल्लेखनीय बाब म्हणजे, त्यात पुलंबद्दल कुठलाही कडवट सूर नव्हता. पुलंच्या प्रतिभेबद्दल सुनीताबाईंना आदर आणि अप्रूप होतं. तिला निगुतीनं जपण्याचं काम सुनीताबाईंनी जन्मभर केलं. पण आश्चर्य म्हणजे, पुलंच्या, एखाद्या लहान मुलासारख्या आत्मकेंद्री परावलंबित्वाबद्दल तक्रार नोंदवतानाही पुलंबद्दल त्यांच्या मनात करुणा होती. त्वेष वा राग नव्हता. लग्नगाठीतून जन्माला येणारे स्त्रीवरचे अन्याय हे पुरुषसत्ताक व्यवस्थेची फळं कशी असतात, याबद्दलचं किंचित कडसर - कडवट नव्हे - भान त्या प्रकटनात भरून राहिलं होतं. दलित लेखकांना उद्देशूनही त्यांनी त्या आशयाचे प्रश्न विचारले होते. ‘तुम्ही शोषित. आम्ही स्त्रियाही शोषित. तुम्हांला तरी आमची दुःखं कळतील असं वाटलं होतं…’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.  त्या पुस्तकातली 'आहे मनोहर तरी गमते उदास'मधल्या उदासरम्य भावाची एक छटा त्यातूनही आलेली होती. 

दुसरं म्हणजे स्त्री म्हणून स्वतःला पडलेल्या शारीर मोहांबद्दल लिहिणं. सुनीताबाई चळवळीत काम करत असताना त्यांना भय्या या आपल्या मित्राविषयी मोह पडला आणि काहीही चुकीचं पाऊल न उचलता त्या मोहातून पार झाल्या, याला कारण भय्याचा भलेपणा, असं त्यांनी प्रामाणिकपणानं नोंदवलं.      

पुल-सुनीताबाईंना मूल नव्हतं. अगदी सुरुवातीच्या काळात एका अगदी साध्याश्या प्रसंगी मन दुखावलं जाण्याचं निमित्त झालं आणि सुनीताबाईंनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला. पुढे कारणाकारणांनी ते राहतच गेलं. हा किती मोठा निर्णय! पण सुनीताबाईंच्या त्या निर्णयामागे कुठलाही अभिनिवेश जाणवत नाही. व्यक्तिस्वातंत्र्याचा बडिवार न माजवता ते अगदी विनासायास वागवणार्‍या व्यक्तीची सहजता त्यात दिसते. तसंच लग्नसंस्थेबद्दलच्या त्यांच्या चिंतनाचंही. ‘मला त्या बाह्य बंधनाची गरज नव्हती. भाईला हवं होतं, म्हणून लग्न केलं; त्याला ते नको असतं, तर मी सहज घटस्फोट देऊ शकले असते,’ असं त्या शांतपणे म्हणून गेल्या. त्यांना स्वतःच्या असामान्यत्वाची लख्ख जाणीव होती, पण त्याच वेळी पुलंच्या स्वभावातल्या मूलपणाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना सोडून जाण्यातलं क्रौर्यही जाणवत होतं. त्या काळातल्या - आणि खरं तर आजच्याही - स्त्रीस्वातंत्र्याच्या रूढ कल्पना पाहिल्या, तर कितीही मोठा सर्जनशील कलावंत का असेना, पण अशा कलावंत नवर्‍याच्या कारकिर्दीची व्यवस्था पाहणारी स्त्री, हे वर्णन त्यांच्यासारख्या स्वतंत्र विचारांच्या कर्तृत्ववान व्यक्तीला किती बोचणारं-सलणारं ठरू शकेल! पण त्यामध्ये त्यांनी कधीही कुठलंही शरमिंधेपण बाळगलेलं दिसत नाही. एखाद्या कवितेची निर्मिती मिरवावी तितक्याच अभिमानानं त्यांनी स्वतः निरीक्षणं करून बसवलेल्या तूप कढवण्यासारख्या खास कौशल्यांबद्दलही लिहिलं. मन लावून केलेलं, दर्जा राखून केलेलं कुठलंही काम श्रेष्ठच या मूल्यावरचा ठाम विश्वास त्यामागे होता. हे अशाच एखाद्या व्यक्तीला जमेल, जिच्या विचारांमध्ये लखलखीत स्पष्टता आहे. सुनीताबाईंनी ते सहजगत्या तोलून धरलं होतं. 

हे जगावेगळं होतं.   

सुनीताबाईंनी आपल्या नवर्‍याच्या प्रतिमेची तमा न बाळगता असं जाहीर लिहिण्यामुळे - आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पुलंनी ते अत्यंत उमदेपणानं स्वीकारण्यामुळे - फार वेगळा पायंडा पडला. अजिबात कडवट न होता, पण कुठलीही तडजोड न करता केलेला, स्त्रीवादी विचाराचा फार उन्नत आविष्कार बघायला मिळाला; तोही समाजात मानाच्या स्थानी विराजमान असलेल्या एका जोडप्याकडून. याचं मोल माझ्यासारख्या लोकांच्या दृष्टीनं फार मोठं होतं. स्वतंत्र विचार करणाऱ्या स्त्रीचं आणि ते कुठल्याही अहंकाराशिवाय स्वीकारणाऱ्या पुरुषाचं असंही सहजीवन असू शकतं, असा एक महत्त्वाचा धडा त्यातून मला मिळाला. 

पुढे सुनीताबाईंचं लिहिणं, त्यांची प्रश्नोपनिषद विणत नेणारी शैली, मित्रांच्या काळजी-प्रेमापोटी अतीव कोवळी होऊ शकणारी आणि स्वतःला प्रश्न विचारताना मात्र धारदार शस्त्राचं रूप धारण करणारी  त्यांची संवेदनशक्ती... या गोष्टी वाचनात आल्या. अधिकाधिक आवडत गेल्या. जी. ए. आणि सुनीताबाई या दोघांच्या पत्रव्यवहाराच्या रूपानं निराळ्याच उंचीवरच्या मैत्रीचा आविष्कार बघायला मिळाला, अतिशय कृतज्ञ वाटलं. पण ती सगळी पुढची गोष्ट.   

पुलंच्या नाटकाची रॉयल्टी बुडवून नाटकांचे दडपून प्रयोग होत असत. अशा प्रयोगात सामील होणाऱ्या भल्या-भल्या लोकांना सुनीताबाईंनी कोर्टाच्या नोटिसा बजावल्या. मग ते प्रसिद्ध नट असोत वा पुलंचे मित्र असोत. तसंच दुसऱ्या टोकाचं उदाहरण म्हणजे त्यांनी दिलेल्या एका देणगीचं. पी. एल. फाउंडेशनला भराव्या लागणाऱ्या कराच्या दृष्टीनं विचार करता ही देणगी पुढच्या आर्थिक वर्षात देणं सोयीचं होतं, म्हणून त्यांनी देणगी उशिरा दिली, पण देणगी देण्याचा निर्णय झाल्यापासूनच्या प्रत्येक दिवसाचं व्याजही देणगीत जमा करूनच. एकदा एखाद्या मूल्याविषयी संपूर्ण विचार करून त्याचा स्वीकार केला, की त्याच्या अंमलबजावणीत मागेपुढे पाहणं नाही. पदरी वाईटपणा येवो वा चांगुलपणा येवो. 

न भिता आणि स्वच्छ विचार करता आला, की तो कुठल्याही टोकापर्यंत नेता येण्याचं धैर्य मिळत असेल? कुणास ठाऊक. मला तो विश्वास त्यांच्या लिहिण्यातून मिळाला खरा. त्यांचं स्थान बघता, तो त्यांच्यामुळे अनेकांना मिळाला असणार. 

त्या स्वतः सिद्धहस्त प्रतिभावंत लेखक होत्या, असं म्हणता येत नाही. त्यांनी स्वतःही तसं कधी मानलं नाही. पण तसं नसताही, आपली योग्यता आणि आपल्या मर्यादा नीट समजून घेतल्या आणि स्वतःशी निर्भयपणे प्रामाणिक राहिलं, तर किती प्रकारे निर्मितिशील असता येतं, याचा वस्तुपाठच जणू त्यांनी त्यांच्या जगण्यातून घालून दिला. इतर अनेक लेखकांबद्दल वाटतो तसा सहज मित्रभाव त्यांच्याबद्दल वाटत नाही, एक प्रकारचा धाक वाटतो. त्यांनी जगताना आखून दिलेली रेष तितकी मोठी होती, याचंच ते द्योतक मानलं पाहिजे! 

बाकी कशापेक्षाही हे मला त्यांचं मोठं योगदान वाटतं.

(लोकरंग, लोकसत्ता, १४ जुलै २०२४)

Wednesday, 28 November 2018

या भवनातील गीत पुराणे...

पुलंसंबंधी काही नकारात्मक म्हणणं मोठं कर्मकठीण आहे.

एकतर माणूस अतिशय म्हणजे अतिशयच चांगला कलावंत - किंवा स्वतः पुलंच्या शब्दांत म्हणायचं तर खेळिया. अनेक क्षेत्रांत केलेला संचार. भाषेवरची जबरदस्त हुकूमत. लोकांना मोहवून टाकणारं बहुविध साहित्य. मी स्वतःच पुलंच्या साहित्याची इतकी पारायणं केलेली आहेत, की आता नव्यानं वाचायला घेतलं इतक्या वर्षांनी, तर पुढची ओळ आपसूख आठवते. बरं, माणूस नुसताच कलावंत म्हणून चांगला नाही, तर माणूस म्हणूनही जिंदादिल आणि उमदा. दातृत्व? पुष्कळ. उत्तम वेव्हारे जोडून उदास विचारे वेचलेलं धन. सरकारी ठोकशाहीविरुद्ध उभं ठाकण्याचं कर्तृत्व? दोनदा दाखवलेलं. एकदा अणीबाणीच्या कालखंडात प्रचारसभांमध्ये भाग घेऊन. एकदा 'लोकशाही हवी आहे, ठोकशाही नको' असं महाराष्ट्रभूषण या सरकारी पुरस्काराचा स्वीकार करताना सरकारला खडसावून. माणसांत मिसळून माणसांवर प्रेम करण्याची अफाट ताकद. पत्नीनं मतभेद आणि नाराजी व्यक्त केली, उमदेपणानं नम्र स्वीकार. मुख्य धारेतली लोकप्रियता लाभली. तिचा वापर करून दलित साहित्याचं जाहीर कौतुक. कोणत्या आधारावर या माणसाचं उणं काढणार? जागाच नाही. त्यांच्या जन्मशताब्दीवर्षात - त्यांना जाऊन जवळजवळ वीस वर्षं उलटून गेली, मधल्या वर्षांत काळानं कूस पालटली, जग कधी नव्हे इतकं जवळ आलं नि आमूलाग्र बदललं, तरीही या माणसाची लोकप्रियता अबाधित. पुस्तकं आपली खपतातच आहेत.

सगळं दृष्ट लागावं असंच तर आहे.

तरीही अलीकडेच एका गोतावळ्यात वय वर्षं वीसहून लहान असलेल्या एका मुलाकडून पुलंच्या साहित्यातली उद्धृतं सतत ऐकण्याचा योग आला आणि चक्रावायला झालं. पुलंच्या मृत्युवर्षाच्या आसपास जन्माला आलेला हा मुलगा. त्याची भाषा मराठी आहे खरी. पण त्याखेरीज पुलंच्यात आणि त्याच्यात कोणताही समान दुवा नाही. थिसियसच्या जहाजाचं उदाहरण खरं मानायचं, तर मधल्या काळात भाषेच्याही पेशी आमूलाग्र बदलून गेलेल्या. जरी भाषेचं नाव मराठी असंच असलं, तरीही तिची चौकट, ठेवण, वापर सगळंच आरपार बदललेलं. पुलंनी ज्या मध्यमवर्गीय माणसाचं आत्मचरित्र निरनिराळ्या प्रकारे हयातभर रेखाटलं, त्याच्या आयुष्याशी या मुलाच्या आयुष्याचा काय संबंध आहे? चाळ, कचेर्‍या, गजरा-नाटक-शालू-शेले-व्याख्यानं या सांस्कृतिक बाबींशी असलेले लागेबांधे, पोस्ट आणि तत्सम संस्था... सगळं अंतर्धान पावलं आहे वा हळूहळू अंतर्धान पावत चाललं आहे.

मग हा मुलगा पुलंचे त्याच्या आयुष्याशी असंबद्ध असलेले उतारे हे असे वेळोवेळी फेकतो आहे, आळवतो आहे, त्यांचा आनंद लुटतो आहे - ते नक्की कशातून? आणि ते इतकं अस्थानी-कुरूप आणि कोड्यात टाकणारं का वाटतं आहे मला?

या प्रश्नांच्या उत्तरासाठी पुन्हा पुल वाचायला घेतले. आश्चर्य म्हणजे, त्यांचं काहीच मनास येईना. ते कमालीचे कालबाह्य वाटायला लागले. त्यांच्या साहित्याचा सांधा 'आज'शी जुळतोसं वाटेना. लिंगभावाबद्दल कमालीचा असंवेदनशील, असंतुलित असलेला त्यांचा विनोद खुपायला लागला. लोकांना काय वाटतं आहे याचा कानोसा घेण्यासाठी तसं म्हणायचा प्रयत्न केला मात्र - लोक अंगावर धावून यायला लागले आणि मी हबकले. पुलंवर प्रेम तर मीही भरभरून केलं आहे, करते. तरीही त्यांच्या साहित्याची अशी चिकित्सा करणं म्हणजे घरावर दगड मारून घ्यायला आमंत्रण देण्यापैकीच असणार आहे, हे नीटच लक्ष्यात आलं. मुळात पुलंच्या साहित्याबद्दल प्रश्नचिन्हासकट काहीतरी म्हणायला लागलात, की लगेच तुमच्या हेतूबद्दल शंका घेतली जाणार अशा प्रकारची आणि अशा प्रमाणातली पुलंची लोकप्रियता - किंवा खरंतर त्यांच्याबद्दलची भक्ती - दिसायला लागली.

मग ही चिकित्सा करून बघणं जास्त-जास्तच महत्त्वाचं वाटायला लागलं.

~~~

पुलंनी कुणाबद्दल लिहिलं?

दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळातला मराठी शहरी मध्यमवर्गीय पुरुष पुलंच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होता. 'असा मी असामी' किंवा 'बटाट्याची चाळ' या कथनात्मक काल्पनिक लेखनात तर तो उघडपणे आहेच. पण वेळोवेळी लिहिल्या गेलेल्या त्यांच्या इतर लेखांमध्ये, व्यक्तिचित्रांमागच्या लेखकाच्या आवाजामध्ये, प्रवासवर्णनांमधला 'मी' म्हणून शहरी मध्यमवर्गीय पुरुषाचा स्वर ऐकू येतो. मी अंतर्बाह्य शहरी प्राणी आहेहे खुद्द पुलंचंच विधान आहे. ज्या मंडळींची मतं मराठी साहित्यात अनुकरणीय गणली जातात, पीअर प्रेशरसारखं काम करतात, अशी मंडळीही कायम बहुतकरून शहरी आणि उच्चवर्णीय होती; त्यामुळे पुलंच्या लोकप्रियतेचं अनुकरण पुढे निमशहरांतून आणि गावांतून झालेलं असणं शक्य आहे. मात्र पुलंचं साहित्यविश्व शहरी लोकांपुरतं मर्यादित होतं, इतकं तरी म्हणणं भाग आहे.

सहस्रकानं कूस बदलण्याच्या सुमारास या शहरी मध्यमवर्गीय जगाचं चित्र बदलायला लागलं. चाळी जाऊन हाउसिंग सोसायट्या अवतरल्या. कोकण रेल्वेनं लाल डब्याला स्पर्धेतून भिरकावून दिलं. चारचाकी गाडी, फोन आणि एसी या एके काळी अप्रूपाच्या आणि अपूर्वाईच्या असलेल्या, श्रीमंती समजल्या जाणार्‍या वस्तू सहजी कुणापाशीही दिसू लागली. कारकुनांनी कात टाकली. सरकारी कचेर्‍यांमधला मराठी मध्यमवर्ग वेगानं आयटीत मजुरी करण्याकडे सरकू लागला. परदेशवार्‍या सहजसाध्य झाल्या. स्मार्टफोन्स आणि इंटरनेट रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले. मराठी शहरी मध्यमवर्गीय पुरुषाचं सगळं भवताल आणि परिणामतः तो स्वतःही आधीचा उरला नाही.

भवतालातल्या या बदलांमुळे मला पुलंचं साहित्य कालबाह्य वाटू लागलं का?

मनाशी आलं खरं. पण हे उत्तर फारच ढोबळ ठरलं असतं. साहित्यिक आपल्या साहित्यातून कोणता काळ रंगवतो, या गोष्टीनुसार त्याचं कालसुसंगत असणं का ठरावं? पेशवेकालीन व्यक्तिरेखांवर आज 'श्रीमंत गोपिकाबाईची बखर' लिहिणारे आनंद विनायक जातेगांवकर म्हणा, किंवा भविष्यकालीन समाजाचं काल्पनिक चित्र 'उद्या'तून रेखाटणारे नंदा खरे म्हणा - एक जण वरकरणी भूतकाळाबद्दल लिहितो आहे, या कारणामुळे तो कालबाह्य ठरणार नाही आणि एक जण वरकरणी भविष्यकाळाबद्दल लिहितो आहे, या कारणामुळे तो भविष्यवेधी नव्हे. त्यांच्या कालसुसंगत असण्याची वा नसण्याची कारणं निराळी असतील. फक्त मजकुरातला काळ न पाहता, त्या काळाबद्दल, त्या काळाच्या वर्तमानाशी असलेल्या नात्याबद्दल, कारण-परिणामांबद्दल लेखक प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काय म्हणतो आहे, त्यावरून तो कालसुसंगत आहे की नाही हे ठरेल. थोडक्यात, लेखकाला त्याला हवा तो लेखनकाळ निवडण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य असतं. तो काही त्याच्या कालसुसंगत असण्याचा निकष नव्हे.

या निकषाचा आधार घेता पुलंचं साहित्य कालबाह्य नव्हे, असंबद्ध तर नव्हेच नव्हे.

पण पुलंच्या साहित्याचा भाग असलेल्या अनेक गोष्टी आजच्या वाचकांनी पाहिलेल्या-अनुभवलेल्या नाहीत, हे तरीही उरतंच. 'बटाट्याच्या चाळी'तला रामा गडी, 'व्यक्ती आणि वल्ली'मधल्या नंदा प्रधानच्या इंदूचा थेरडा, परदेशी जाण्यासाठी करण्याचा बोटीतला प्रवास... अशी अनेक उदाहरणं देता येतील. फार लांब कशाला जा, गेल्या पंधराएक वर्षांत लाल डब्ब्याला पाय न लावलेली कितीक तरुण शहरी माणसं सापडतील. तरी, ज्यांनी आयुष्यात एकदा तरी एस.टी.चा प्रवास केला आहे, त्यांना 'म्हैस'मधला विनोद कळेल. पण ज्यांनी एस. टी.ला कधी पायच लावलेला नाही, त्यांच्याकरता 'म्हैस'मधले कितीतरी संदर्भ अनाकलनीय ठरतील. त्या अर्थी पुलंच्या साहित्याच्या कालबाह्यतेला हळूहळू का होईना, सुरुवात झाली आहे. 'माझे पौष्टिक जीवन'मधला 'कि-हिं-क-ह-व-ह-डि-ही' असं ठणकावणारा बावज्या बोहोरीकर मी कधीही पाहिलेला नाही. तसाच 'जलशृंखला योग' हे नाव कुठून आलं आहे, हे जाणण्यासाठी सामायिक संडास, त्यांच्या दुरुस्तीची घरमालकावर असलेली जबाबदारी आणि त्यातून तयार होणारी विवक्षित परिस्थिती हे सगळं चाळीत राहून अनुभवलेलं नाही. घरमालकांस पत्रमधला विनोद माझ्यापर्यंत पोचणं कठीणच आहे. माझ्या आकलनात काहीतरी कमतरता राहून जाणार. मानवी प्रवृत्ती अमर असल्यामुळे, कल्पनेचं आयुध वापरून आणि पुलंच्या चित्रदर्शी-जिवंत भाषेचा आधार घेत मी अनेक गोष्टींचा आनंद तरीही लुटू शकले. इक्ष्वाकू कुळातल्या राजकुमारांची वर्णनं काय, किंवा निमकराच्या खानावळीतील डुकराची भजीही निर्बुद्ध भाषांतराची उडवलेली रेवडी काय, पुलंचं काही लेखन अजुनी सदाबहार आहे. पण तरीही - सत्तर सालात पुलंच्या लेखनाला वाचकानं दिलेली दाद आणि आज मी देत असलेली दाद, यात फरक पडला आहे, हे मान्य करावंच लागेल.

साहित्याच्या आस्वादाकरता प्रत्यक्ष अनुभवाची काय गरज, असं एक प्रतिपादन केलं जातं. उदाहरणार्थ, काही प्रकारच्या साहित्यात काल्पनिक विश्व चितारलेलं असतं. जे. के. रोलिंगचं हॅरी पॉटरविश्व हे याचं अत्यंत चपखल उदाहरण. जादू, जादूच्या छड्या, मंत्र, चेटक्यांची शाळा... हे सगळे कल्पनेतले घटक हॅरी पॉटरच्या जगाचा अविभाज्य आणि अनिवार्य भाग आहेत, पण ते वास्तवात अस्तित्वात नाहीत. तरीही सर्व वयाच्या, अनेक भाषांच्या, अनेक देशांमधल्या वाचकांना हॅरी पॉटरची ओढ वाटते. 'हॅरी पॉटर' हे अभिजात साहित्यात मोडत नसेल, तर ऑन्त्वान् द सान्तेक्झ्युपेरीच्या 'द लिटिल प्रिन्स'चं उदाहरण देता येईल. तीन ज्वालामुखी असलेला लिटिल प्रिन्सचा छोटुकला ग्रह वास्तवात अस्तित्वात नाही. तरीही लिटिल प्रिन्स कित्येक वर्षं जगभरातल्या वाचकांना भुरळ घालतोच आहे. ही सरळ सरळ फॅन्टसीची उदाहरणं. त्याहून थोडं वेगळं उदाहरण घ्यायचं, तर श्री. ना. पेंडशांच्या 'तुंबाडचे खोत'चं. त्यामधलं तुंबाड कल्पनेतलं आहे. ते पेंडशांच्या अंतःचक्षूंखेरीज इतर कुणीही पाहिलेलं असणं शक्य नाही. तरीही वाचकाच्या नजरेला ते कल्पनेनं पाहता येतंच. जयंत पवारांच्या 'वरणभात लोन्चा कोन नाय कोनचा' या कथासंग्रहातल्या सगळ्याच कथांमध्ये अद्भुत अतिवास्तवाचा एक धागा आहे. त्यामुळे त्या कथा कमी परिणामकारक ठरतात का? तर नाहीच. हे प्रतिपादन मान्यच आहे.

इथे आपल्याला पुलंची लेखक म्हणून असलेली जातकुळी नीट तपासून पाहण्याची गरज आहे.

लेखक नक्की काय आणि कसं सांगू पाहतो आहे, याचा विचार करून त्यांची ढोबळ वर्गवारी करू गेलं असता त्यांचे तीन प्रकार दिसतात. काल्पनिक गोष्ट सांगणारे अर्थात फिक्शन लिहिणारे लेखक. एखाद्या बाबीचा चहूअंगांनी विचार करून तिची खोलवर छाननी करणारे लेखक. सद्यकालीन परिस्थितीचं वर्णन करून त्यावर आपली मल्लिनाथी उर्फ शेरा नोंदवणारे लेखक. तिन्ही भाग तसे पाणबंद नव्हेत हे उघडच आहे. पण पुल यांपैकी कोणत्या भागात बसतात ते आपण ढोबळ मानानं बघू.

पुल काही गोष्ट सांगणारे साहित्यिक नव्हेत. त्यांनी थेट कथा वा कादंबर्‍या लिहिलेल्या नाहीत. त्यांची नाटकंही बहुतांश वेळा कोणत्या ना कोणत्या परकीय नाटकाचं रूपांतर अशाच स्वरूपाची आहेत हे लक्ष्यात घेण्यासारखं आहे. मुख्य आहेत ती प्रवासवर्णनं, वास्तव आयुष्यातली वा काल्पनिक व्यक्तिचित्रं, निरनिराळ्या लेखांतून मध्यमवर्गीय आयुष्याचं नाना प्रकारे केलेलं वर्णन, त्याबद्दलचे खास त्यांचे असे शेरे. या सगळ्या साहित्यात स्वतंत्रपणे गोष्ट रचण्याची ऊर्मी दिसत नाही. दिसते ती एक प्रकारची कॉमेंटरी. समालोचन. लालित्यपूर्ण आणि रंजक, पण समालोचन. त्या समालोचनात लेखकाला दिसणार्‍या चित्राचं हुबेहूब वर्णन आहे आणि समालोचकाचा विशिष्ट नजरियाही आहे. तो विलक्षण लोभस आहे यात वादच नाही. पण ती काही रचलेली कथा नव्हे. लेखक आणि वाचक ज्या एका सामाजिक परिस्थितीचा भाग आहेत, त्या परिस्थितीतल्या एका विवक्षित जागेवरून दिसणार्‍या एका मर्यादित तुकड्याचं रंजक, लालित्यपूर्ण वर्णन आणि त्याबद्दलचे शेरे आहेत. ते समालोचन आहे, त्यामुळे लेखक आणि वाचक दोघेही एकाच काळात वावरत आहेत हे गृहीतकही आहे.

पुल विचारवंत-लेखकही नव्हेत. त्यांच्या काही पुस्तकांतून काही विशिष्ट विधानं केली जात असतात. विषयाच्या अनुषंगानं काही विचार मांडले जात असतात. ते विचार काही प्रमाणात कालातीतही असतात. त्यात अनेकदा चिंतनशील भाग येतो. पण नरहर कुरुंदकरांसारख्या लेखकाशी पुलंशी तुलना केली, की पुलंची निराळी जातकुळी लख्ख दिसायला लागते. एखादा प्रश्न वा एखादी साहित्यकृती वा एखादी परिस्थिती समग्रपणे न्याहाळून तिच्या निरनिराळ्या बाजूंची छाननी करणं, प्रश्न विचारणं, काही एका निष्कर्षावर पोचणं, निष्कर्षाचं समर्थन करणं वा तो विश्लेषणासकट खोडून काढणं आणि पर्यायी उत्तर मांडणं... असं पुलंनी कधीही केलेलं दिसत नाही, तो त्यांचा पिंडच नाही. त्यांना बहुतेकदा आपल्या नायकाची - पक्षी : स्वतःची आजूबाजूच्या परिस्थितीनं उडवलेली त्रेधातिरपीट दाखवून मनसोक्त हसायचं असतं. ललित समालोचन असं याचं वर्णन करता येईल. स्टॅंडप कॉमेडी करणारे अनेक लोक या प्रकाराचा आणि अशाच विषयांचा अवलंब करताना दिसतात. पुलही त्यांच्या मंत्रमुग्ध करणार्‍या आणि वैविध्यपूर्ण एकपात्री प्रयोगांसाठी प्रसिद्ध होते, हा काही योगायोग नाही. आजही 'त्यांचं लिखाण वाचायला कंटाळा येतो, पण ऐकायला मजा येते' अशी कबुली देणारे अनेक जण सापडतात. पुल स्वतःला लेखक म्हणवत नसत. परफॉर्मर उर्फ खेळिया म्हणवत असत, याची नोंद करून आपण पुढे जाऊ.

तर - अशा लालित्यपूर्ण रंजनात्मक वर्णन करणार्‍या समालोचक लेखकाचं समकालीन असणं कळीचं नसतं का?

माझ्या मते, असतं. तो त्याच्या लेखनाच्या परिणामकारकतेचा एक महत्त्वाचा भाग असतो.

थोडा विचार करून पाहा, आज पुलंच्या किती व्यक्तिरेखा आपल्याला येता-जाता भेटतात? 'मॅन / वुमन नेक्स्ट डोअर' म्हणाव्यात अशा असतात? आयटीत काम करणार्‍या कॉर्पोरेट मजुराचं आणि पुलंच्या कोचरेकर मास्तरांचं विश्व किती वेगळं आहे! घरा-कुटुंबाबाबतची कर्तव्यं, करियरमध्ये यशस्वी होण्याची निकड आणि मुक्त स्त्री असण्याचं पिअर प्रेशर ही सगळी दडपणं वागवणार्‍या आजच्या बाईचं आणि त्या चौकोनी कुटुंबातल्या गृहिणीचं काय नातं आहे?

'असा मी असामी'तले धोंडोपंत जोशी चाळीतून ब्लॉकमध्ये गेले आणि त्यांच्या ठरीव आयुष्यात एकाएकी नवनवीन पर्यायांची गर्दी उडाली. हीच पर्यायांची भाऊगर्दी धोंडोपंतांच्या उत्तरायुष्याहून आज कितीतरी पटींनी वाढलेली आहे. धोंडोपंत चाळीतून ब्लॉकमध्ये गेल्यानंच काहीसे भांबावलेले होते. आज धोंडोंपंतांचा नातू आपल्याला भेटला, तर तो बहुतेक मुंबईत राहत नसेलच. तो अमेरिकेत असेल, गेला बाजार बंगळुरात तरी नक्कीच. त्याच्या समोर बहुधा ऐन तिशीतच मिडलाईफ क्रायसिस आ वासून उभा असेल. धोंडोपंतांचं तर सोडाच, धोंडोपंतांची विकेट उडवणारा शंकर्‍याही त्याच्यासमोर हतबुद्ध होत असेल. निव्वळ ब्लॉकच्या जागी अमेरिका, हिंदी सिनेमाच्या जागी इंग्रजी सिनेमा, कॅक्टसच्या जागी शेअर्ड गार्डनिंग, सरोज खरेच्या जागी आंतरराष्ट्रीय इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक... इतकं एकास एक असलेलं हे रूपांतर नाही. भौमितिक वेगानं वाढत गेलेल्या ओळखी आणि निवडीचे पर्याय. मुलांच्या शिक्षणाचं माध्यम, शालेय शिक्षणापासून ते त्यांच्या संभाव्य करियरनिवडीपर्यंत करण्याच्या आर्थिक तरतुदी, लैंगिक कल ठरवण्याचे अनंत आणि सक्तीचे पर्याय, आपल्या मुलांच्या लैंगिक कलांविषयीचे सावध आणि खुले पवित्रे, धार्मिक आणि जातीय ओळखींशी जुळवून घेण्याचे वांशिक आणि राष्ट्रीय ओळखींचे सांधे...  या सगळ्या पर्यायांशी आट्यापाट्या खेळताना शंकर्‍याच्या मुलाचीच विकेट उडत असणार, असं मानायला जागा आहे. तो आणि धोंडोपंतांना जन्माला घालणारे पुलं यांच्यामधलं नातं आज किती जवळचं - किती दूरचं आहे?

त्या दोघांच्यात कमालीचं अंतर पडलं आहे इतकं तरी आपल्याला कबूल करावंच लागेल.

~~~

पुलंबद्दलच्या प्रेमादरातून बाहेर पडल्यानंतर मला खुपायला लागलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पुलंच्या साहित्यातलं बायांचं चित्रण. पुलंचा नायक का-य-म एक मराठी शहरी मध्यमवर्गीय पुरुष असतो. नुसतं तितकंच नव्हे. 'बटाट्याच्या चाळी'त - किंवा खरंतर पुलंच्या कोणत्याही ओरिजनल साहित्यात - भेटणार्‍या स्त्रिया मुद्दामहून निरखण्यासारख्या आहेत. अनेकदा त्यांचा आवाज थेट ऐकू न येता मुख्य कथानकाच्या पार्श्वभूमीला येत असतो. जर कधी आवाज मोठ्यांदा आलाच, तर तो विनोदाचा विषय असतो. त्यांच्या अनेक लेखांमध्ये येणारं धर्मपत्नीचं पात्र हे नवर्‍याला गप्प करणारं, व्यावहारिक शहाणपणाची मात्रा अधिक असणारं, आपलं ते खरं करणारं असं किंवा मग चक्क बावळट, चेष्टेचा विषय असणारं असतं आणि पुलंचा नायक हे सोशीकपणे, काहीशा विनोदी धाटणीनं स्वीकारून पुढे जात असतो. 'अतिविशाल महिला मंडळा'बद्दलच्या त्यांच्या विनोदावर टीका झालेली मी ऐकली होती. पण कधी इतकी मनावर घेतली नव्हती. पुढे सुनीताबाईंचा थांबा लागला. पुलंच्या साहित्यानं भारून जाण्याचा काळ उलटून गेला. अघळपघळमधली अभया थोपटे वाचताना माझ्या भिवया वर गेल्या. अभयाच्या भाषेला पुरुषी घाट आहेपासून ते बाई मर्द आहेपर्यंत सगळेच शेरे मला लाल रंगात दिसायला लागले. तरुण मुलींना साहित्या-अभ्यासात-राजकारणात मत असलं, तर त्या पुरुषी असतात नाहीतर मग नुसत्याच सुंदर नि माठ तरी असतात, या स्टिरिओटाईपनं लक्ष्य वेधून घेतलं. पुलंच्या लेखनातल्या यच्चयावत मध्यमवयीन स्त्रियाही स्वैपाकघराची वेस न ओलांडणार्‍या नि ओलांडल्यास विनोदाचं कारण ठरणार्‍या तरी होत्या, नाहीतर बेगडी समाजकार्य करणार्‍या आणि आकारानं विशाल असलेल्या तरी. मुख्याध्यापिका म्हणून सरोज खरे आली खरी, पण ती लिपस्टिक सांभाळण्यासाठी ओठाला ओठ न लावता बोलणारी. पुलंचं हे पुरुषप्रधान समाजाचा प्रतिनिधी असल्यासारखं, त्या व्यवस्थेला कोणत्याही प्रकारचा प्रश्न न करता, कधी बोलून, तर कधी न बोलता खतपाणी घालत लिहीत जाणं मला नंतरनंतर अधिकाधिक खटकत गेलं. त्याबद्दल निषेधाचा शब्द उच्चारणं तर सोडाच, पण असल्या विनोदाला न हसल्यामुळेही बाई स्त्रीवादी दिसतेयहे कुत्सितपणे उच्चारलेलं वा अनुच्चारित वाक्य ऐकावं लागतं असा माझा आज-आत्ताचाही अनुभव आहे. खुद्द पुलंच्या काळात अशा प्रकारचा निषेध झाला नाही, याचं आश्चर्य वाटत नाही ते म्हणूनच. असले विनोद हा संस्कृतीनं स्वीकारून टाकलेला भागच असावा. पुलंनी त्याविरुद्ध कधीही शब्द तर उच्चारला नाहीच. पण आपल्या लेखनातून असा विनोद अगदी सहजमान्य असल्यागत वापरला, त्याचं उदात्तीकरणही केलं, असं आता लक्ष्यात येतं.

'व्यक्ती आणि वल्ली'मध्ये एकही स्त्री नाही. लेखकाला आपल्या एका आयुष्यात सगळंच्या सगळं जग कवेत घेता येणं अशक्य आहे, हे मान्य केलं, तरीही 'व्यक्ती आणि वल्ली'चा स्त्रीपात्रविरहितपणा चकित करतो. माणसांना निरखण्यात आनंद मानणार्‍या पुलंना बाई असलेली एकही वल्ली भेटू नये हा पुलंच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या मुशीत घडलेल्या नजरेचा दोष, की वल्लीपणाची मिजास आणि बाईपण एकत्र नांदूच न देणार्‍या संस्कृतीचा, हे कळेनासं होतं.

हे वास्तविक आपल्याला शिंग फुटल्यावर आपल्याच एखाद्या प्रेमळ आजोबांवर चिडण्यासारखं आहे, कबूल आहे. तरीही माझं वैतागणं रास्त नाही, असं मात्र मला म्हणवत नाही.

असो. तर - माझ्यासारख्या आणि माझ्याहून वयानं लहान असलेल्या अनेक जणांमध्ये अजूनही पुलंची लोकप्रियता इतकी अफाट आणि इतकी तीव्र कशी?

~~~

या प्रश्नाला दोन बाजू आहेत.

एक तर पुलंचा समर्थ उत्तराधिकारी ठरेल असा लेखक आपल्याकडे नाही. बहुतांश लेखकांचे कुणी ना कुणी वारसदार असतात. लोकप्रियतेत, भूमिकांत, भाषाप्रभुत्वात थोडाफार फरक अर्थातच असतो; पण परंपरेच्या साखळीमधला हा पुढचा दुवा, असं म्हणण्याइतकं साम्यही असतं. विभावरी शिरूरकर-गौरी देशपांडे-मेघना पेठे-कविता महाजन अशी एक ढोबळ साखळी दिसते. थोड्याफार मतभेदांसकट मान्यही असते. त्या प्रकारे पुलंनंतर कोण या प्रश्नाचं काही उत्तर मिळत नाही. त्यांच्या शैलीची छाप अनेकांवर पडलेली दिसते. पण ते काही पुलंचे वारसदार नव्हेत. पुलंचा वारसा पेलणं अतिशय कठीण आहे. संगीतापासून नाटकापर्यंत आणि चित्रपटांपासून टीव्हीपर्यंत चौफेर आणि लीलया संचार असणा‍र्‍या या लेखकाचा वारसदार होण्याची जबाबदारी प्रचंड मोठी आणि क्षमता नसलेल्या लोकांना दडपवून टाकणारी आहे. त्यामुळेच निरागस, सुलभीकरण करणारं, शहरी, उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्याचं दर्जेदार आणि लोभस चित्रण हवं असल्यास, पुलंना पर्याय नाही.

इथे दोन नावांची आठवण निघणं अपरिहार्य आहे. आचार्य अत्रे हे त्यांतलं पहिलं नाव. अत्र्यांनाही महाराष्ट्रात कमालीची लोकप्रियता लाभली. त्यांच्या सर्वार्थानं प्रचंड असलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या आठवणी अजूनही काढल्या जातात. पण विनोदाचा आणि विविधक्षेत्रसंचाराचा समान धागा असला, तरी अत्रे आणि पुलं यांच्यात जातकुळीचा मोठाच फरक होता. पत्रकारिता आणि राजकारण यांच्या मुशीतला अत्र्यांचा विनोद अनेकदा बीभत्स पातळी गाठत असे. आपल्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर त्यांनी ते लांछन लीलया पेलून नेलं असावं. पुल त्या बाबतीत अत्यंत सोज्ज्वळ, घरगुती ऊबदारपणा जपून असलेले, मध्यमवर्गीय पापभीरूपणाला जवळचे वाटणारे. दुसरं नाव चिं. वि. जोशी यांचं. त्यांच्या चिमणराव आणि गुंड्याभाऊवर मराठी माणसांनी अतिशय प्रेम केलं. या प्रेमाला खरा बहर आला, तो चिंविंच्या लेखनकाळात नव्हे, तर दूरदर्शनवरची चिमणराव-गुंड्याभाऊ मालिका प्रदर्शित झाल्यानंतर. चिंविंना त्यांच्या हयातीत पुलंसारखी भरभरून लोकप्रियता लाभली नाही. खरंतर त्यांचा विनोद अधिक रेखीव आणि जिवंत व्यक्तिरेखाटन करणारा, संवादी, पुलंच्या शब्दप्रधान विनोदाहून अगदी वेगळी अशी घटनाप्रधान नि काहीशी फार्सिकल शैली असलेला, कथनात्मक होता. चिंविंची चिमणराव-मालिका जणू टीव्हीसाठी लिहिल्यासारखीच होती आणि दिलीप प्रभावळकरांच्या चिमणरावानं तिला पुरेपूर न्यायही दिला. पुलंच्या निबंधवजा घाटात लिहिलेल्या वल्लींवर वा 'बटाट्याच्या चाळी'वर कथाप्रधान टीव्ही मालिका झाली नाही. पुलंच्या स्वतःच्या जबरदस्त सादरीकरणाच्या छायेतून त्या कलाकृती कधीही बाहेर पडल्या नाहीत, हे जसं त्याचं कारण आहे; तसाच त्या कलाकृतींचा ललितनिबंधवजा घाटही त्याला कारणीभूत आहे. चिंविंचं लेखन मात्र दृश्यमाध्यमाला पूरक असं होतं. पण एकूण साक्षरतेचं वाढत जाणारं प्रमाण, मध्यमवर्गाच्या नि टीव्हीच्या उदयाचा-बहराचा काळ आणि चिंविंचा लेखनकाळ यांची वेळ जुळून आली नाही, हे खरं. 

ही दोन्ही नावं पुलंच्या पूर्वसुरींची. पुलंच्या नंतरचं, ही चौकट व्यापणारं आणि चौकट अद्ययावत करत जाणारं, एकही मोठं, लक्षणीय नाव आठवत नाही. पण त्यामागच्या कारणांत शिरायचं झालं तर नव्या लेखाची सुरुवात करावी लागेल.

कारणं काही का असेनात; सोपं, आकर्षक आणि मध्यमवर्गीयांना चुचकारणारं लेखन करणारे पुल हाच एक पर्याय वाचकांपाशी उरल्याचा भास तयार झाला खरा.

दुसरी बाजू बघायची, तर थोडं खोलात शिरावं लागतं. कालचा मध्यमवर्ग आज खरं तर मध्यमवर्ग उरलेलाच नाही. क्रयशक्तीचे निकष लावायचे झाले, तर त्याला उच्चमध्यमवर्गीय असं म्हणणं हेसुद्धा मध्यमवर्गीय या संज्ञेची कमालीची ओढाताण करण्यासारखं आहे. मध्यमवर्ग या संज्ञेत बसणार्‍या समाजाचाही पोत बदललेला आहे. त्यातली निमशहरी लोकांची संख्या वाढत गेली आहे. जातीय टक्केवारी बदलली आहे. खेरीज आपण वर म्हटल्याप्रमाणे या नवमध्यमवर्गापुढची निर्णयांची आणि प्रलोभनांची निव्वळ संख्या, त्यातून उद्भवत गेलेली ओढाताण नि व्याकूळता, आणि जगण्यातला एकूणच गोंधळ... हे सगळं कित्येक पटींनी वाढलेलं आहे. अशा वेळी एक मनोरंजक, आकलनाला सोपा आणि अनेकांच्या आवडीनिवडींचा लसावि असू शकेल असा लेखक म्हणून पुलं हा जणू आदर्श साचाच आहे. 'तुका म्हणे त्यातल्या त्यात'प्रकारे भाषेमुळे जवळचं आणि आकर्षक वाटणारं, गोंजारणारं, हसवणारं पुलंच लेखन आवडणं-ऐकणं-वाचणं-त्याबद्दल बोलणं प्रतिष्ठेचं आहे. त्यात सवयीतून आलेला सोपेपणा आहे, परंपरांचा सुखासीन पिंजरा न सोडता मिळणारी करमणूक आहे, आणि त्याखेरीज आयता मिळणारा सुसंस्कृतपणाचा शिक्का आहे. कोणत्याही प्रकारचे कष्ट नाहीत, प्रश्न नाहीत, पेच नाहीत.

पुलं कधीच अस्वस्थ करणारे प्रश्न विचारणारे लेखक नव्हते. 'बटाट्याची चाळ', 'हसवणूक', 'व्यक्ती आणि वल्ली' ही त्यांची सर्वाधिक लोकप्रिय पुस्तकं पाहिली, तर स्मरणरंजन आणि एका विशिष्ट प्रकारच्या समाजघडीबद्दलचा जिव्हाळा त्यात उघड उघड दिसतो. त्यांतला विनोद अतिशय सूक्ष्म निरीक्षण मांडणारा, मार्मिक आणि रंजक आहे यात प्रश्नच नाही. पण ही पुस्तकं वाचकाला अस्वस्थ करण्यापेक्षाही स्वस्थ करण्याकडेच अधिक लक्ष्य देतात. पुढे-पुढे पुलंनी लिहिलेल्या 'वंगचित्रे'सारख्या पुस्तकांतून त्यांचा सूर प्रगल्भ होत गेलेला जाणवतो. निरीक्षणातून विनोदनिर्मिती न होता प्रश्न पडताना दिसतात. भाषा विनोदाचं शस्त्र न घेता चिंतनशीलता लेऊन येते आणि तरीही आपलं जिवंत प्रवाहीपण कदापि सोडत नाही. पण 'वंगचित्रे' हे काही पुलंच्या लेखक म्हणून ऐन बहराच्या काळातलं पुस्तक नाही. तसंच 'हसवणूक'कार पुलंवर लोकांनी जितकं प्रेम केलं, तितकं प्रेम 'वंगचित्रे'कार पुलंवर केलं नाही. ऐन बहरातल्या पुलंमधल्या लेखकानं अतिशय लोभसवाण्या प्रकारे मध्यमवर्गीय माणसाचा अपराधभाव दूर केला, त्याच्या गोंधळाला हतबलतेतून येणार्‍या विनोदाची ढाल पुरवली. नंतरच्या लेखनातलं त्यांचं चिंतन मात्र लोकांपर्यंत तितकंसं पोचलंच नाही. 

त्यांच्या सगळ्या कारकिर्दीत हा विरोधाभास दिसतो. आपल्या निर्मितीतून मिळवलेली श्रीमंती समाजाला परत देऊन टाकणं (बाबा आमट्यांच्या आनंदवनाशी असलेले ऋणानुबंध), दलित साहित्याचं भरभरून जाहीर कौतुक करणं ('बलुतं'चं केलेलं कौतुक), पत्नीच्या जाहीर नाराजीचा अतिशय उमदेपणानं स्वीकार करणं (आहे मनोहर तरीबद्दलची संयत, उमदी प्रतिक्रिया), साहित्यातल्या नव्या प्रवाहांचं मनापासून स्वागत आणि प्रसार करणं (बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांवरचा कार्यक्रम) हे एका बाजूला. तर दुसर्‍या बाजूला उच्चवर्णीय, शहरी, मध्यमवर्गीय, पुरुषी मानसिकता बाळगणार्‍या संस्कृतीचे साचे कदापि न सोडणं (त्यांच्या लिहिण्यातून कायम दिसणारं स्मरणरंजन आणि परंपरेबद्दलचं प्रेम), नवचित्रकला-नवनाट्य यांसारख्या गोष्टींची यथेच्छ टर उडवणं ('असा मी असामी'तला नानू सरंजामे किंवा 'खुरच्या'), राजकारणासारख्या तथाकथित गलिच्छ स्पर्धेपासून कटाक्षानं दूर राहणं (अणीबाणीनंतरच्या निवडणुकीत प्रचाराला उतरून नंतर मात्र राजकारणातून माघार घेणं). या दोन्ही बाजूंमध्ये एक मूलभूत विसंगती होती. पण यांपैकी दुसरी बाजूच प्रचंड लोकप्रिय ठरली. तिची छाया पुलंच्या प्रतिमेवरून कधीही दूर झाली नाही. ही पुलंची मर्यादा आहे की लोकांचा दोष? की दोन्हीचं दुर्दैवी रसायन?

आज जगण्यातले गोंधळ वाढलेले असतानाही लोकांना पुलंच्या चाळकरी विनोदाचा तोच जुना, आयता साचा विरंगुळ्यासाठी हवाहवासा वाटतो. तसं नसतं, तर पुलंना आपल्या जातकुळीचा वाटणारा पी. जी. वुडहाउस त्याच्या स्वतःच्या मायदेशात केव्हाच जुना आणि वंदनीय होऊन बसलेला  असताना, आपल्याकडे पुलंचं इतकं कौतुक अजूनही का असावं? नि त्याचा दोष पुलंना देणं कितपत बरोबर? निरनिराळ्या प्रकारच्या अस्मितांचे गोंधळ माजलेले असताना आणि नव्या नीतिमूल्यांच्या निकषांवर जुने नायक अपुरे-बुटके ठरत असतानाही बहुतांश लोकांना वाचा-बघायला मात्र रमा-माधवांचं प्रेम, सतीचं उदात्तीकरण, राजपूत स्त्रियांचा जोहार... हेच आवडतं. त्याचाच हाही एक भाग नव्हे का?

पण म्हणून लेखकाच्या या रूपाबद्दल, त्याच्या लेखनातल्या या विधानाबद्दल चर्चा करायचीच नाही? अशी चिकित्सा करू पाहणं हा वाचक म्हणून थेट आपला कृतघ्नपणा किंवा अकलेची दिवाळखोरीच?

कठीण आहे...

काहीही असलं, तरी पुलंबद्दलच्या या अतिरेकी कौतुकामुळे सर्वसामान्य मराठी वाचकाचं नुकसानच झालं. मी आणि माझा शत्रुपक्षमध्ये नायकाच्या खांद्यावर पडलेल्या शिमिटाच्या गिलाव्याच्या लपक्याला नवचित्रकलाअसं संबोधणाऱ्या पुलंचा आदर्श मानून आजही अनेक जण ते ॲबस्ट्रॅक्ट वगैरे आपल्याला नाही बा कळतअसं आनंदानं आणि अभिमानानं सांगतात. हे स्वतःलाच एका विशिष्ट प्रकारच्या अभिरुचीच्या कुंपणात बंदिस्त करून घेणंच होतं. पुलंच्या राक्षसी लोकप्रियतेनं त्याला प्रतिष्ठाही बहाल केली. पुलंपेक्षा निराळ्या जातकुळीचा, धारदार आणि वाचकाकडे डोकं चालवण्याची मागणी करणारा विनोद इथे कधी रुजला नाही. स्मरणरंजनात्मक उमाळे काढणार्‍यांची आणि पुलंच्या शैलीच्या बर्‍यावाईट नकला करणार्‍यांची संख्या तेवढी फोफावून बसली. 'पुलं म्हंजे काय, प्रश्नच नाही!' किंवा 'आम्हांला तुमच्यासारखे नाही ते प्रश्न पडत नाहीत. आमच्या देवानं लिहून ठेवलंय, ते आम्ही वाचतो, सुखानं झोपतो.' किंवा 'पुलंना प्रश्न विचारता? तुमची काय लिहायची लायकी आहे हो?' असे प्रश्न विचारत आणि वर्षांमागून वर्षं त्याच त्या पिढीजाद विनोदांवर इमाने-इतबारे हसत लोक महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची कौतुकं करत राहिले.

पुल असताना हे होणं एक वेळ समजण्यासारखं आहे. पण आता पुलाखालून इतकं पाणी वाहून गेलेलं असताना पुलंचीच वाक्यं सटासट फेकणार्‍या त्या मुलाला 'तू ही जुनी-अपुरी पासोडी घेऊन किती काळ बसणार आहेस बाबा!', असा प्रश्न मी विचारायला हवा होता का? की काळच ते काम करेल?

पूर्वप्रकाशन : मुक्त शब्द, दिवाळी २०१८

संदर्भ आणि टिपा:
१. मूळ चर्चेचा दुवा. इथल्या अनेक मतांचा हा लेख लिहिताना अतिशय उपयोग झाला आहे.
२. मूळ प्रकाशित लेखात इथे काही बारीक दुरुस्त्या केल्या आहेत.
३. वुडहाउसबद्दलच्या लेखाचा दुवा.