Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Friday, 14 March 2025

शांत काळोखाचे तुकडे

आमचं घर तेव्हा शहरातल्या टेकडीसदृश भागात होतं. त्यातही चौथा मजला. एका बाजूच्या खिडकीतून उतारावरची एक सरकारी इमारत आणि तिचं प्रशस्त आवार दिसायचं. त्यात झाडं चिकार. जांभळाची, आंब्याची, वडाची, शिरीषाची जुनी-मोठाली-गर्द झाडं. तिथून पोपटांचे थवे उडताना दिसायचे. पूर्वेकडच्या खिडकीतून डोंगर. सूर्योदय तर दिसायचाच. पण त्याहून जास्त अप्रूप वाटायचं ते त्या दिशेनं अपरात्रीच्या वा पहाटेच्या शांततेत ऐकू येणार्‍या ट्रेनच्या भोंग्याचं. गच्चीवरून सगळं शहर दिसायचं. मामा-भाच्याच्या डोंगरापासून ते तेव्हा नव्यानं बांधल्या जाणार्‍या महापालिकेच्या इमारतीपर्यंत आणि त्यालगतच्या शेताडीपर्यंत. वीसहून जास्त मजले असणार्‍या इमारती मोजक्याच. बाकी सगळं शहर आपल्याहून बुटकं. नजरेच्या एका फेरीत न्याहाळता येणारं. उन्हाळ्यातल्या बहुतेकशा रात्री चटया नेऊन गच्चीत पसरायच्या आणि गप्पा ठोकत लोळायचं. हळूहळू उगवत जाणार्‍या चांदण्या. एखादाच मागे राहिलेला चुकार बगळा. मधूनच येणारी वार्‍याची झुळूक. पौर्णिमेला आख्खाच्या आख्खा गरगरीत चंद्र. कोजागिरीला सोसायटीतले लोक जमून भेळ करायचे, मसाला दूध प्यायचे, आणि गाण्यांच्या भेंड्या खेळायचे. शहरात तेव्हा आकाश विझवून टाकणार्‍या प्रकाशाच्या ओकार्‍या टाकलेल्या नसत. उजेड आणि आवाज असायचा, पण सोबत करणारा. 


दिवाळीच्या आसपास हवेत गारवा यायचा आणि होळीपर्यंत टिकायचा, जूनच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यात पाऊस कोसळू लागायचा, मे-महिन्यात घामाच्या धारा लागायच्या. पण एसीवाचून जगणं शक्य होतं.


रस्ते डांबरी होते. त्यात सिमेंटचा तोबरा भरायचा अद्याप शिल्लक होता. रस्त्यांच्या कडेनं ऐन शहरातही मधूनच माजलेल्या रानाचे हिरवे तुकडे लागायचे. तिथे चिकनखडे, खाजकुयली, एरंड, आणि कसलीकसली अनाम झाडंझुडपं माजलेली असायची. पावसाळ्याच्या सुरुवातीला तिथून हमखास बेडकाचा आवाज यायचा. श्रावणातलं ऊन पडल्यावर अशा रानगट तुकड्यांवर चतुर भिरभिरताना दिसायचे. खूप पाऊस झाला, की चाळींसमोरच्या अंगणांमधून पाणी तुंबायचं आणि मोरीत गांडुळं दिसायला लागायची. लोक खडेमीठ घालून त्यांना तडफडवून मारायला धावायचे.

.

ऑफीस टाईमचे दोन-अडीच तास सोडून प्रवास केला, तर रेल्वे-बसमध्ये बसायला खिडकीची जागाही मिळू शकायची. स्टेशनाबाहेरचं एखाद्या किलोमीटरचं वर्तुळ रिक्षावाल्यांनी गिर्‍हाइकांवर नि गिर्‍हाइकांनी रिक्षांवर झडप घालण्यासाठी राखीव नसे. त्यासाठी रांग लावण्याची बावळट पद्धत होती. लोक गावी जाण्याकरता एसटीची तिकिटं काढायचे. गर्दीच्या दिवसांत त्याकरता एसटीत काम करणार्‍या कुणाचीतरी ओळख काढून ज्यादा गाड्यांची तिकिटं मिळवायचे. अर्थात, गर्दीचे दिवस अशी एक वेगळी कॅटेगरी तेव्हा होती. एसटीचा तेव्हा 'लाल डब्बा' झाला नव्हता, तसंच सर्विस रोड्स आणि बारक्या गल्ल्यांची हक्काची पार्किंगंही झाली नव्हती. तितक्या चारचाक्याच नव्हत्या. त्यामुळे निदान मुंबईतल्या मुंबईत कुठूनही कुठेही तासा-दीड तासात पोचता यायचं. पावसामुळे लोकल ट्रेन्स बंद पडणं आणि अपघातामुळे वा कुणा नेत्याच्या भाषणामुळे रहदारी तुंबणं ह्या तशा क्वचित घडणार्‍या घटना होत्या.  


माघी गणपती आणि नवरात्रातली देवी शहरात तेव्हाही बसत. पण त्यांची ठिकाणं मोजकीच आणि ठरलेली असायची. तिथल्या जत्रा अपूर्वाईच्या वाटायच्या. त्यातल्या कागदी पिपाण्या, पत्र्याच्या बेडक्या, वेताचे उघडमीट करणारे साप आणि धनुष्यबाण, मोठाल्या चक्र्या… हे सगळं वर्षाकाठी एखाद्दुसर्‍या वेळीच दिसायचं. रामनवमीला लोक सुंठवडा खायचे आणि तिन्हीसांजेला देवासमोर दिवा लावताना रामरक्षा पुटपुटायचे. रामाच्या देवळातला राम तेव्हा शालीन आणि सोज्ज्वळ ‘रामराणा’ होता, रामरक्षेची ‘पब्लिक अ‍ॅक्टिविटी’ अद्याप व्हायची होती. 


घरोघरी लॅंडलाईन फोन आले होते. पण  बाहेरगावी फोन करायचा, तर रात्री नऊनंतर सवलतीच्या दरात बोलता यायचं, त्यामुळे तेव्हा बाहेर पडून एसटीडी बूथ गाठला जायचा. परदेशी फोनबिन अपूर्वाईचीच गोष्ट. कुणीकुणी पेजर्स लटकवून शायनिंग मारणारे लोक दिसायचे. मोबाईल फोन येऊ लागले होते, पण सगळी भिस्त मिस्ड कॉल्स आणि एसेमेसवर असायची. 


सिंगल स्क्रीन थिएटर्स जिवंत होती. फटाक्यांची माळ लावल्यावर ती जशी पुढे पेटत-तडतडत आणि मागे विझत-जळलेली दारू सोडत जाते, त्या धर्तीवर वाढत्या शहराच्या वेशीपल्याड उघडणार्‍या आणि मागे ओसाड पडत जाणार्‍या मॉल्सच्या माळेचा जन्म नुकता कुठे होऊ लागला होता. त्यामुळे पॉपकॉर्न्सच्या किमती सिनेमाच्या तिकिटापेक्षा कमी असायच्या.    


ही सगळी मुंबईपासून जेमतेम पाऊण तासाच्या अंतरावर असलेल्या उपनगरी भागातली गोष्ट. काळाच्या पोटातही फार लांबची नाही बरं का, जेमतेम वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. 


पार 'बटाट्याच्या चाळी'तलं शेवटाकडचं कढकाढू चिंतन वाटतं ना हे? आय नो. मला कल्पना आहे. हे सगळं निव्वळ स्मरणरंजनामुळे छान-छान वाटत असेल अशी एक शक्यता नाकारता येत नाही.


आपल्या भारतीय मनाला गतकातरतेची चूष तशीही असतेच. आपल्याला कायम त्रेतायुगातल्या गोष्टी आदर्श आणि थोर्थोर; तर सध्याचं सगळंच भ्रष्ट भासत असतं. या खास भारतीय घडणीचाही थोडा भाग असेल. शहरी-सवर्ण-सुशिक्षित-कमावत्या अशा माझ्या सांस्कृतिक भांडवलामुळे ‘भरल्या-पोटी माझं सुख दुखतंय' असंही थोडं असू शकेल. सगळंच थोडथोडं शक्य आहे, थोडं खरंही आहे. सगळं नकारात्मकच आहे, असंही नाही. निदान माझ्यासारखं थोडंफार सांस्कृतिक भांडवल असलेल्या लोकांच्या हाती थोडा पैसा खेळू लागला आहे, बरीच वैद्यकीय प्रगती झाली आहे, जनसंपर्काच्या सोयी वेगवान झाल्या आहेत, त्यांनी अंतराच्या मर्यादाही ओलांडल्या आहेत, संधींची रेलचेल झालेली आहे, शिक्षणाला अनेकानेकानेक वाटा फुटल्या आहेत, परदेशगमन सोपं झालं आहे, आईबापांना त्यांच्या नोकर्‍यांच्या अखेरच्या काळात मिळणारे पगार पोरांना पहिल्या नोकरीत मिळू लागले आहेत. हे सगळं आहेच. 


असेलही माझी बोच निखळ स्मरणरंजनी. पण सार्वजनिक अवकाशाचं काय? माझ्या आजूबाजूचा, अवघ्या पाव शतकाच्या कालावधीत आमूलाग्र बदलून गेलेला शहरी अवकाश तर खरा आहे? तो मला भेदरवून, घुसमटवून, चिरडून टाकतो आहे. 


मला लक्ष वेधायचं आहे ते भयानक वेगानं काँक्रिटाइज झालेल्या, उजेडानं लखलखलेल्या, आवाजानं दणाणून गेलेल्या, अमानुष गर्दीनं वेढल्या गेलेल्या, रहदारीनं-सांडपाण्यानं तुंबणार्‍या आपल्या सार्वजनिक अवकाशाकडे. मी गावाकडच्या 'निसर्गरम्य' अवकाशाबद्दल बोलत नाहीय. वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच्या शहरांबद्दल बोलतेय. ती आत्ता-आत्तापर्यंत वेगवान, पण सौम्य आणि जैविक होती. ती विषम विकासानं बरबटत, अमानुष, बकाल, कृत्रिम होत गेली आहेत; दिवसेंदिवस अधिकाधिक वेगानं होताहेत. 


गेल्या सहस्रकापर्यंत हडप करायला, विकायला, नफा करून घ्यायला भौतिक आणि मालकी हक्क असलेल्या गोष्टी लागायच्या. भूखंड लाटले जायचे. आता भूखंडच काय, साधी खेळाची मैदानं, बागा, खाड्यांकाठची कांदळवनं, आणि तळ्यांच्या काठी स्वतंत्र जैवसाखळी वागवणार्‍या पाणथळ जागाही हडप करून संपलेल्या आहेत. पिण्याचं पाणी तर कधीच विकायला निघालं. शहरांमध्ये मास्क लावून फिरण्याची सवय कोव्हिडकाळानं लोकांना आयती लावून दिली, त्यामुळे शुद्ध हवा हीदेखील चैनीचीच बाब झाली आहे. मग बळकावायला उरलं काय? 


आता अमूर्त आणि विकत न घेता येण्याजोग्या गोष्टी बळकावल्या जातायत. नाही पटत? विचार करून बघा.


बिनदिक्कत कुठेही आणि कितीही आवाज करा. कुणीही तुम्हांला जाब विचारू शकत नाही. तुमच्या भागातल्या नगरसेवकाचा उजवा हात असलेल्या कुणा अमुकजी तमुकजी साहेबांच्या वाढदिवशी रात्री बारा वाजता फटाके वाजवून शुभेच्छा द्यायच्यात? अवकाश तुमचाच आहे. गणपती, नवरात्र, आणि थर्टीफर्स्ट तर हक्काचेच होते. सव्वीस जानेवारी नि पंधरा ऑगस्टची देशभक्ती लाउडस्पीकरवरून 'ए मेरे वतन के लोगों' आळवल्याशिवाय पूर्वीही साजरी होत नसे. पण आता सार्वजनिक अवकाशात असताना आपला गळता मोबाईल आपल्या कानातल्या बोंड्यांपुरता ठेवावा ही अपेक्षा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्कांवरचं आक्रमण वाटतं. साधा मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळचा वॉक? इच्छा असो वा असो, ठिकठिकाणी स्पीकर्स लावून फिरता फिरता कानावर गाणी पडतील अशी सोय केलेली असते. तेवढ्यावर थांबायची गरज नाही. घरी हळद आहे? आणवा डॉल्बीची भिंत. गल्लीत सत्यनारायण घालायचाय? बसवा भटजीला पूजा सांगायला माइकच्या बोंडक्यापाशी. सगळ्या गल्लीवर करा पुण्याची बरसात. होऊ द्या खर्च! शांतता आपल्याच तीर्थरूपांची आहे. 


बचाबच उजेड करा. दुकानांसमोर मोठाली झाडं आहेत? सुमडीत रात्रीबेरात्री एखादं इंजेक्षन टोचा. महिन्या-दोन महिन्यात झाड वठून मरतंय. तुम्ही दुकानावर रोषणाई करून गिर्‍हाईक खेचायला मोकळे. ते जमत नसेल, तर झाडावर अंदाधुंद लायटिंग तरी करा. इतकी सोय दिलीय निसर्गानं, ती वापरा. एखादी मोठीशी इमारत पुनर्विकसनासाठी घेतलीय? त्याच्या बाहेरच्या भिंती मोठाल्या चोवीस-तास-चमकत्या जाहिरातींसाठी वापरून टाका. झगमगवून टाका रस्ते अहोरात्र. आयुष्यातला अंधार मिटवून टाका. प्रकाशाकडे चला. महामार्ग आणि उड्डाणपूल तर बोलूनचालून गाड्यांतून जाणार्‍या लोकांना जाहिराती दाखवण्यासाठीच असतात, एरवी इतक्या रहदारीत तुंबलेलं असताना त्यांचा वेळ जायचा कसा? सगळीच्या सगळी दर्शनी जागा जाहिरातींसाठी विका, झगमगवा. उजळून टाका आसमंत. निऑन साइन्स लावा, फ्लड लाइट्स सोडा, लेझर किरण वापरा. चंद्र आणि ताऱ्यांसारख्या मागास गोष्टी इथं कुणाला बघायच्या आहेत? 


लोकांपाशी असलेला स्वस्थ वेळ हीदेखील आता एक हडपण्यायोग्य कमॉडिटी आहे. कसं करायचं हे माहितीय? प्रादेशिक भाषांमधून सिरियली आणवा तिन्हीत्रिकाळ चालणार्‍या. त्याही आपल्या समृद्ध सोनेरी पुराणांवर आधारित असलेल्या वा आध्यात्मिक सत्पुरुषांच्या चमत्कारांचं दर्शन घडवणार्‍या असतील तर सोन्याहून पिवळं. गल्लोगल्ली दिवाळीपहाटसदृश पण शक्य तितक्या फुकट्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी होऊ द्या. तसंही आपल्याला कुठे द्यायचं आहे सभागृहाचं भाडं? रस्त्यावरच तर मांडव ठोकायचा आहे. त्यातूनही वेळ उरला, तर रिअ‍ॅलिटी शोज घडवा, रील्स बनवा, सेल्फी पॉइंट बांधवा. गुडमॉर्निंगयुक्त व्हॉट्सॅप, इंस्टा-ट्विटर, फेसबुक आणि ओटीटी आहेतच. अवघा आनंदकल्लोळ उसळू द्या… 


हे औपरोधिक-अतिरंजित वाटेल. थोडं अंगावर येणारं, थोडं उगाच भीती दाखवणारंही. पण आपल्या आजूबाजूचा भवताल निरखून बघा, नि यांतलं काहीही खोटं असेल तर सांगा. 


इतक्यावर थांबणार नाही हे. असं वाटतं, हळूहळू जिथे काहीही करायचं नाहीय - ऐकाबोलायचं-लिहावाचायचं-बघानाचायचं-खायचंप्यायचं नाहीय - असे शांत काळोखाचे तुकडे विकायला निघतील. किमान काही जणांच्या तरी खिशाला त्यांचं भाडं परवडेलच. अशा परवडणार्‍या लोकांच्यात आपण असू, इतकी खातरजमा करून घेतली की झालं. मग एकविसाव्या शतकात सगळी धमाल आहे. 


अरुण कोलटकरांच्या कवितेतल्याप्रमाणे 'बघता बघता वस्तूंच्या रक्तात साखर होऊन’ जाण्याकडे आपला प्रवास भरधाव सुरू आहे.


(लोकरंंग, लोकसत्ता, जानेवारी २०२५)

Friday, 21 June 2024

व्हॉट्सॅपचं स्टेटस आणि निवडणुका

मी व्हॉट्सॅपचं स्टेटस हा प्रकार अजिबात वापरत नसे. 

पण गेल्या फेब्रुवारीत एक मित्र भेटला होता. तेव्हा राममंदिरप्रकरण भलतंच जोरात होतं. मोदीच्या आणि भाजपच्या धर्माधारित प्रचाराच्या विरोधकांना निवडणुकीबद्दल अजिबात अपेक्षा नव्हत्या. आजूबाजूचे एरवी शहाणेसुरते म्हणावेत असे, शिकलेसवरलेले लोकही पूर्ण ताळतंत्र सोडून रामाच्या भजनी लागलेले होते. शिक्षण, महिला सुरक्षा, अर्थकारण, बेरोजगारी.. यांबद्दल बोलणं टॅबू होतं. माध्यमांबद्दल तर विचारूच नका. सेक्युलर लोकांमध्ये अतिशय निराशा होती. मीही राजकारणाचा अजिबात विचार न करता इतर कामात मन रमवू बघत होते. 

तेव्हा तो मित्र मला म्हणाला, की आपल्यासारखे उच्चमध्यमवर्गीय लोक हाताशी असलेल्या सगळ्या साधनांचा वापर करून भूमिका स्पष्ट लिहायला लाजतात. तू मोदीच्या द्वेषमूलक प्रचाराची ठार विरोधक आहेस, पण तू जाहीर लिहितेस-बोलतेस ते मात्र सिनेमाविषयी, पुस्तकांविषयी, खाण्यापिण्याविषयी. राजकारणाविषयी काही बोललीस तर आडवळणानं. असं का? तुला लाज वाटते का तुझ्या राजकीय भूमिकेची? लिहिणंबिहिणं तर सोडच, साधं एक व्हॉट्सअॅप  स्टेटस नाही ठेवू शकत का तू


त्या थेट विचारणेमुळे मी जामच विचारात पडले. त्याचं बरोबरच होतं. या सगळ्या राजकारणाचा आपल्या आयुष्यावर थेट परिणाम होतो हे मला मान्यच होतं. 
मग त्याबद्दल बोलण्यामध्ये लाजण्याजोगं काय होतं? 

तेव्हा फेसबुक बंद करून ठेवलं होतं. त्यामुळे काही मोठं लिहिण्या-बिहिण्याचा प्रश्न नव्हता. ब्लॉगला असलेला वाचक अगदीच तुरळक होता. मग एक प्रयोग म्हणून व्हॉट्सअॅप  स्टेटस वापरायचं असं ठरवलं. थेट आणि स्पष्ट राजकीय भूमिका दर्शवणारं, काहीही तिथे डकवायचं. त्यातून माहिती मिळत असेल, तर उत्तमच. पण त्याखेरीज नुसतं मत, विनोद, शेरा.. असंही काही ठेवायला हरकत नव्हती. मात्र फक्त आणि फक्त निवडणुकीच्या राजकारणाशी प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे जे संबंधित असेल, तेच लावायचं, असं ठरवलं. रोज ठरवून काही ना काही शोधून लावलं.

अतिशय धक्कादायक गोष्टी झाल्या. 

अनपेक्षित ठिकाणी, ऑफिसात, सोसायटीत, नातेवाइकांत... बाण लागले. 'तू राजकारणात पडलीयस का?', 'काय एकदम, प्रचाराला वाटतं?!', 'निवडणूक जास्तच सिरियसली घेतली का?'.. अशा करमणूक झालेल्या प्रतिक्रिया ऐकल्या. एरवी स्वतःला सुशिक्षित जागरुक मध्यमवर्गीय मानणारे काही लोक मी महागाईविरुद्ध बोलल्यामुळे माझ्यावर चक्क चिडलेभांडायला आले, वादायला आले. काहींनी मला विचार तपासून घ्यायला प्रवृत्त केलं, काहींना मी. अनेक जणांच्या बाबतीत आम्ही आपापले तट आणि गड कायम राखले फक्त! 

पण एरवी फोनमधला निव्वळ एक कॉन्टॅक्ट असलेले अनेक जण चॅट विंडोत येऊन बोलूही लागले. आपल्यासारखा विचार करणारं कुणीतरी आहे, असा सोबतीचा, दिलाशाचा भाग त्यात होता. अर्थातच ही सोबत दोहों अंगी झाली. खूप सोबत झाली. 

आम्ही वेळोवेळी, रात्री-अपरात्री एकमेकांपाशी निराशा, राग, तगमग, चिंता, व्याकूळता व्यक्त केली. राजकारणाशी संबंधित राहून काही ना काही, जमेल ते, झेपेल ते काम करण्याचे निश्चय बोलून दाखवले. धीर दिला, घेतला. बातम्या, व्हिडिओ क्लिपा, मीम्स्, पोस्टर्स, व्यंगचित्रं, मतं आणि चर्चा आणि विश्लेषणं, निरनिराळ्या यूट्यूबर्सची चॅनेल्स, पॉडकास्टं... असं किती काय काय दिलं घेतलं. या प्रकारच्या 'माला'ची देवाणघेवाण करणे हे रोजचं एक महत्त्वाचं कामच होऊन बसलं होतं! अतिशय महत्त्वाचं म्हणजे एरवी निव्वळ 'हाय-बाय' करणारे, त्यापलीकडे द्विमित राहिलेले अनेक मुस्लीम सहकारी, दाक्षिणात्य सहकारी माझ्याशी थोड्या का होईना, मोकळेपणाने बोलू लागले... 

कॉंग्रेसचं पूर्वी चुकलेलं नाही का, पुढे चुकणार नाही का, मोदीला पर्याय काय आहे.. हे नेहमीचे प्रश्न होतेच. त्यांना द्यायची ती तर्कशुद्ध उत्तरं दिली. पण त्यापलीकडे जाऊन 'इतकं करून विरोधकांनीही माती खाल्ली तर?' हा प्रश्न मला स्वतःलाही सतावत होता. त्यावर 'ही जोखीम लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या कुणालाही चुकलेली नाही, तेव्हा जी घ्यायची ती विरोधी भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, घेता येईल' असा निस्संदिग्ध आणि वास्तववादी दिलासा आणखी एका मित्रानं दिला. ती या काळातली मूलभूत महत्त्वाची कमाई.    

हे अगदी वरवरचं आहे - मला कल्पना आहे. ही निव्वळ सुरुवातच असू शकते, याचीही कल्पना आहे.

पण मुख्य धारेतल्या माध्यमांनी पूर्ण लोटांगण घातलेलं असताना याची फार मदत झाली, हेही खरंच आहे. म्हैस, मंगळसूत्र, मटण, मुघल.. इथपासून ते 'मी मुळी बायोलॉजिकलच नाही' इथवर लज्जास्पद घसरण झालेली असताना - या सोबतीची गरज होती. 

ती देऊ करायला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कारणीभूत झालेल्या मित्रांचे आणि मित्रेतरांचे आभार मानावेत, म्हणून हे नोंदवून ठेवलं - इतकंच. बाकी मागल्या पानावरून पुढे चालू. :)

Monday, 11 December 2017

स्त्रीवाद वगैरे...

वादात पडणं तसं फार शहाणपणाचं नव्हे. पण कधीकधी आजूबाजूला उठलेला मतामतांचा गल्बला इतका तीव्र असतो आणि तरीही आपल्याला जे म्हणायचं आहे, नेमकं तेच सोडून, इतक्या भलभलत्या गोष्टींवर लोक भलभलतं व्यक्त होत असतात, की आपण तोंड उघडणं ही आपली निकड होऊन बसते. पण संदिग्धपणे हवेत तीर मारून मग ते योग्य ठिकाणी जावेत म्हणून प्रार्थना करत बसणं फारच वेळखाऊ नि बचावात्मकही वाटतं. त्यामुळे थेटच मुद्द्यावर येते. सचिन कुंडलकर यांनी त्यांच्या स्तंभलेखनातून स्त्रीवादाबद्दल व्यक्त केलेली मतं, त्याला सुनील सुकथनकरांनी दिलेलं उत्तर आणि या सगळ्यावर उडालेला धुरळा यांमुळे हात शिवशिवताहेत.

गेली अनेक वर्षं मीही स्त्रीवादाबद्दल संमिश्र भावना मनात वागवल्या आहेत.

मी अशा वर्गात वाढले आणि अजूनही वावरते, जिथे मूलभूत संघर्ष करण्याची वेळ फारशी येत नाही. माझ्यावर बाई म्हणून कोणतेही थेट अन्याय झाले नाहीत. मला माझ्या कुटुंबात वा समाजात कोणतीही थेट बंड करावी लागलेली नाहीत. स्वातंत्र्य या गोष्टीसाठी मला कधीही झगडावं लागलेलं नाही. मला अनेकच गोष्टी आयत्या आणि सहज मिळाल्या. मला शिक्षणासाठी झगडावं लागलेलं नाही. माझ्यावर लग्नाची वा इतर जबरदस्ती झालेली नाही. रस्त्यातून जाताना कुणीसं गलिच्छ नजरेनं पाहण्याचा वा हात लावण्याचा प्रयत्न करण्यापलीकडे माझ्यावर लैंगिक अत्याचार झालेला नाही.

या पार्श्वभूमीमुळे वरवर पाहता स्त्रीच्या दडपणुकीबद्दल मी काही बोलणं खरंतर फारसं सुसंगत असणार नाही.

पण वरवर दिसतं आहे, तितकं हे सहजसोपं नाही. मी आणि माझ्यासारख्या अनेक जणी या परिस्थितीपर्यंत येऊन पोचल्या आहेत, त्यामागे कुणीतरी कधीतरी केलेलं बंड आहे. शिक्षण, मतदान, मनासारखा वेश, आपल्या जीवनाबद्दलचे-शरीराबद्दलचे मूलभूत अधिकार... या --ळ्या गोष्टींसाठी कुणी ना कुणी, कधी ना कधी केलेलं बंड आहे. आज ज्याला लोक आक्रस्ताळेपणा म्हणतात, तशा आक्रस्ताळेपणानं आणि कोण काय म्हणेल याची बूज राखता त्याचा उघडपणे केलेला उच्चार आहे. त्याचे तत्कालीन समाजात जे पडसाद उमटले, ते त्या माणसांनी सोसले आहेत वा परतवले आहेत वा त्यातून मार्ग काढत त्यातून एक नवी पायरी गाठली आहे. मला असाही प्रश्न पडलाच एका टप्प्यावर, की मी हे सगळं रोज का स्मरायचं? 'गायमाउली क्षीरमाउली देते, तिला वंदन करून क्षीरमाउलीचं प्राशन करू या'छाप कृतज्ञतेची टिंगल उडवण्यात मीही अहमहमिकेनं सहभागी झाले आहे. मग या कृतज्ञतेचं महत्त्व काय?

तर - एक म्हणजे मी आणि माझ्यासारखे काही जण-जणी इथवर येऊन पोचले, म्हणजे सगळा समाज इथे येऊन पोचला असा त्याचा अर्थ होत नाही. दोन प्रकारे आपण अजूनही मागे आहोत. एक तर सवर्णेतर आणिकिंवा ग्रामीण आणि / किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय ते अतिगरीब समाजांमध्ये माझ्याइतकी सोयीस्कर आणि सुखवस्तू जागा बाईला आजही लाभत नाही. तिथले लढे अजूनही पुष्कळ प्राथमिक पातळीवरचे, धारदार, मानेवर सुरी ठेवणारे आहेत. गरीब ग्रामीण दलित मुलीला आणि गरीब ग्रामीण दलित मुलाला शिक्षण घ्यायचं असेल, तर ते कुणाला कमी कष्टांत मिळेल हे अजूनही स्वयंस्पष्टच आहे. दुसरं म्हणजे - जरी माझ्यासारख्या लोकांनी भौतिक पातळीवर समानतेची एक दृश्य पातळी गाठलेली असली, तरीही हे चित्र वरवरचं आहे. सांस्कृतिक संदर्भ तपासले असता; थोडं खोलात जाऊन, थोडं कडेला जाऊन तपासलं असता; ढोबळ उदाहरणं घेता जरा आडबाजूचे आणि 'ट्रिकी' प्रश्न तपासले असता - माझ्याही सामाजिक स्तरात संपूर्ण समता आल्याचं दिसत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आधुनिकता आल्यावर मी सहजी सिगारेट ओढू शकते. सहजी अर्ध्या चड्डीत फिरू शकते. पण लग्न करता मला एक मूल दत्तक घ्यायचं झालं, तर मला हे सहजासहजी करता येतं का? कागदोपत्री मला मार्ग सहजसाध्य असला, तरी कायदा चालवणारी वा वापरणारी जी हाडामांसाची माणसं असतात, ती मला पदोपदी अडथळे आणतात. त्याहून कमी धीट आणि साधं उदाहरण द्यायचं झालं, तर पुरणपोळी करता येणं हे बाई म्हणून माझ्यावर असलेलं सांस्कृतिक दडपण आहे असं मी म्हटलं, तर मला भलेभले लोक अजूनही तर्कहीन पद्धतीनं, आपल्या विचारातल्या विसंगतीचा विचारही करता फांदाडतात. मी व्यक्ती म्हणून जरी एकविसाव्या शतकात वावरत असले, तरीही माझ्यासोबतचे अनेक लोक - पर्यायानं माझं अंशतः भवताल मधून मधून अठराव्या वा एकोणिसाव्या शतकात पाय ठेवून असतं आणि याची निराळी दडपणं असतात. सूक्ष्म असतात. प्राणघातक नसतात. पण --ता-. त्यांचा बाऊ मी किती करायचा, हा व्यक्ती म्हणून माझ्या शहाणपणाचा भाग आहे आणि तो व्यक्तीपरत्वे अर्थातच बदलेल. पण परिस्थिती संपूर्णतः समतेची आहे काय? तर ती असावी की नसावी, असणं स्वप्नवत आहे की वास्तववादी हे प्रश्न बाजूला ठेवून आपण इतकं मान्य करू; की स्त्रीपुरुषसमता अस्तित्वात नाही. अशा परिस्थितीत निरनिराळ्या पेचप्रसंगी मला ऐतिहासिक परिस्थितीशी आणि तत्कालीन निर्णयांशी तुलना करून पाहणं क्रमप्राप्त असतं. ती करण्याचे रस्ते मला कृतज्ञतेतून - किंवा कमी भावुक-कमी भाविक शब्द वापरायचा झाला, तर इतिहासाच्या स्मरणातून - मिळतात. त्यामुळे मला ज्योतिबा फुले-सावित्रीबाई फुले, आगरकर, कर्वे इत्यादी लोकांचं स्मरण पुसलं जाणं महत्त्वाचं वाटतं.

आता सगळे जण काही माझ्याइतके शहाणे नि प्रांजळ नसणार. (होय, हसलात तरी चालेल. हा एक सेमी-विनोद होता!) त्यामुळे काही जण या भेदांचा बाऊ करणारे असणार. काही जण या भेदांचं भांडवल करणारे असणार. काही जण त्यातून मिळणार्या सहानुभूतीचा गैरफायदा घेणारे असणार. काही जण ठामपणाला वळसा घालून नुसताच आक्रस्ताळेपणा करणारे असणार. काही जण विचाराचा गाभा समजून घेता निव्वळ शब्दावर बोट ठेवून वाद घालणारे असणार... हे सगळं असणारच. पण मुद्दा असा आहे, की हे फक्त स्त्रीवादी चळवळीतच नव्हे, तर जगातल्या प्रत्येक बदलाच्या चळवळीच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर असणारच! आरक्षणाचा गैरफायदा घेणारे लोक असणार. हुंडाविरोधी कायद्याचा गैरफायदा घेऊन पुरुषांना लुबाडणारे लोक असणार. मानवी स्वभावाचा तो विशेषच आहे. पण त्याचं प्रमाण असं कितीसं आहे? किती सीमित भागात आणि समाजांत आहे? त्यापलीकडे काय दिसतं? खरवडलं असता काय दिसतं? या प्रश्नांचा विचार करता  त्यावर बोट ठेवून आपण नक्की काय सिद्ध आणि साध्य करू पाहतो आहोत?

अर्थातच - प्रश्न विचारण्याला ना नाहीच. तो कोणत्याही माणसाचा अधिकारच आहे. मीही प्रश्न विचारतेच, की लग्न आणि मूल ही जोखडं आहेत, ही भाषा स्त्रीवादानं आता का सोडू नये? पुनरुत्पादन करू पाहणारा एक सजीव म्हणून या गोष्टी मला कराव्याश्या वाटतात, हे स्त्रीवाद्यांनी मान्य करायला काय हरकत आहे? पुरुष या प्राण्याला निव्वळ खलनायक ठरवून आपण निव्वळ भूमिकांमध्ये अदलाबदल करण्यापेक्षा सहजीवनाचा विचार करणारे, वा निदान प्रणयाराधनाबाहेर तरी लिंगनिरपेक्ष होऊ पाहणारे, जीव होण्याकडे आपली वाटचाल असायला नको का? पुरुषाची प्रणयप्रेरणा ही जोवर व्यक्ती म्हणून असलेल्या माझ्या भौतिक वर्तुळावर आक्रमण करत नाही, तोवर मी त्या प्रेरणेला शोषण का म्हणावं? पुरुषाला शारीर इच्छा आहेत आणि त्यानं त्या व्यक्त करणं म्हणजे थेट माझ्यावर बलात्कारच करणं आहे, अशी बोंब ठोकणं मी बंद का करू नये? स्वावलंबन आणि अर्थार्जन हे मी सबलीकरण म्हणून का वापरू नयेत? गेल्या आणि गेल्याच्या गेल्या पिढीत बायांनी केलेला त्याग वा त्यांच्यावर झालेला अन्याय गहाण टाकून मी कुठवर माझं तथाकथित सबलीकरण साधणार आहे? बाजार बाई म्हणून माझ्यावर अन्याय करत असेल, तर माझ्या मित्रावरही तो निराळ्या प्रकारे करतोच आहे हे मी कधी ओळखणार आहे?

हे सगळे प्रश्न मीही विचारतेच आहे. आणि ते कोणत्याही 'वादी' लोकांनी स्वतःला आणि आपापल्या वादाला विचारावेतच. तिथे देव्हारे माजवता उपयोग नाही.


पण कृपा करून काही नमुनेदार लोकांची टर उडवण्याचं निमित्त करून पूर्ण चळवळीलाच मोडीत काढू नये. थोडी जबाबदारी बाळगून लिहावं. सरसकटीकरणाच्या मोहातून अर्कचित्र काढत सुटणं हे लेखक म्हणून किती सवंग आणि आत्मघातकी आहे, हे तर झालंच. पण माणूस म्हणून हे आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेणारं आहे, याबद्दल तरी शंका नसावी

Monday, 25 September 2017

स्वातंत्र्य की सुरक्षितता?

गोंडस आणि वरकरणी तर्कशुद्ध, निष्पक्षपाती वाटणाऱ्या भूमिका पुन्हापुन्हा वाचनात येतात. त्याला असलेली लोकप्रियता दिसते आणि आपलं मत ठासून मांडतच राहणं किती महत्त्वाचं आहे, ते जाणवत राहतं.
आपल्या आजूबाजूचा समाज स्त्रीस्वातंत्र्याच्या बाबतीत संवेदनशील नाही. वैयक्तिक, सामूहिक, सामाजिक आणि अनेकदा संस्थात्मक पातळीवरही हा संवेदनशून्यपणा पुन्हापुन्हा अनुभवाला येतो आहे. सध्या जरा अधिक कर्कशपणे येतो आहे, पण हे आजचंच आहे असं मानण्याचं मात्र कारण नाही.
स्वातंत्र्य हवं की सुरक्षितता हवी हे निर्णय व्यक्तीचे असतात आणि जोवर दुसऱ्या व्यक्तीच्या हक्कांवर अतिक्रमण होत नाही तोवर ते व्यक्तीनं घेण्याला आपण हरकत घेऊ शकत नाही; हा अनेक आधुनिक विचारांचा पायाच आहे. ज्याची फळं तुम्हीआम्ही सगळेच उपभोगतो आहोत. काही जण या स्वातंत्र्याचा गळा स्वतःच्या सोयीसाठी घोटू पाहताहेत. हे फक्त स्त्रियाच अनुभवत नाहीयेत. माहिती अधिकार कार्यकर्ते, काही निर्भीड पत्रकार, विद्यार्थी आंदोलक आणि अशा लढायांच्या वेळी कायमच सर्वप्रथम बळी पडणाऱ्या स्त्रिया - हे सगळेच जण यातली दाहक असुरक्षितता अनुभवताहेत. आज हे लोक जात्यात आहेत, उद्या कोण असेल ठाऊक नाही. अशा वेळी - स्वातंत्र्याहून सुरक्षितताच महत्त्वाची असते, क्रूर श्वापदांच्या जगात तत्त्वनिष्ठ-तर्कशुद्ध मागण्या लावून धरता येत नाहीत, आपण आपल्या भवतालाचं भान बाळगून आपली पावलं जोखली पाहिजेत... अशा प्रकारची मतं मला उघड-उघड प्रतिगामी मतांपेक्षाही जास्त कावेबाज किंवा जास्त मूर्ख यांपैकी एक वाटत राहतात. आणि दोन्हीपैकी कोणत्याही पारड्यात असली, तरीही ती धोकादायकच असतात यात शंका नाही. व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा असा संकोच होत असताना तिच्या पाठीशी आपलं बळ ठामपणे उभं करण्याऐवजी असे अत्याचार ही जणू नैसर्गिक परिस्थितिकीच आहे आणि तिला होता होईतो धक्का न लावता आपण मार्गक्रमण करणंच योग्य आहे असं आपण सुचवतो आहोत, हे यांना कळत नसेल काय? त्यांनाच ठाऊक. हे फक्त व्यक्तींच्या बाबतीत नाही, तर संस्थात्मक पातळीवरूनही होतं आहे. विद्यार्थिनींना मुक्त सुरक्षित अवकाश देण्यासाठी धडपडण्याऐवजी त्यांना वेळांचे निर्बंध घालून चार भिंतींत कोंडू बघणाऱ्या आणि त्याविरुद्ध आवाज उठवल्यावर उलट त्यांचीच मुस्कटदाबी करणाऱ्या शैक्षणिक संस्था, विवाहसंस्था ही जणू एखाद्या शिखरावर तेवत असलेली आणि प्रसंगी काही क्षुद्र व्यक्तींच्या हिताचा बळीही देऊन युगानुयुगे राखायची पवित्र ज्योत असावी अशा आविर्भावात वैवाहिक बलात्काराबद्दल मूग गिळून बसणारी न्यायसंस्था, पुरुषी नजरेच्या अधिक्षेपी नजरेला अटकाव करण्याऐवजी बुरखा वा घूंगट (आणि हो, भोवतालाच्या 'भाना'ची शपथ!) घालून सुरक्षितता संस्थात्मक करू पाहणाऱ्या धर्मसंस्था - हे सगळेच तितकेच दोषी आहेत.
मी अशांच्या मताशी कदापि सहमती व्यक्त करू शकणार नाही. कारण मला माझं निवडीचं स्वातंत्र्य प्यारं आहे. स्वातंत्र्य की सुरक्षितता यांत निवड करण्याचंही.

Friday, 12 December 2014

थॅंक्यू पद्मजा, जस्ट फॉर बीइंग!

पद्मजा गेली.

'बायकांचं ललित लिखाण एकतर आक्रमक कंठाळी उत्कट असतं, नाहीतर गुलजार खवासदृश भावनाप्रधान' असा बोचरा शेरा मारणार्‍या एका मित्राला मी पद्मजा फाटक भेट दिली होती. तेव्हा बर्‍यापैकी वाचन असणारा आणि तरीही पद्मजाच्या लेखनाशी अपरिचित असणारा हा माणूस तिच्या अभिनिवेशरहित मिश्कील मुक्तपणानं हरखून गेला होता. माझं काहीही कर्तृत्व नसताना पद्मजाच्या जिवावर मीच कॉलर ताठ केल्याचं आठवतं!

पण त्याबद्दल तिलाही आक्षेप नसताच. तिला हे फुकटचं भाव खाणं कळलं असतं, तर त्यातली तेवढी दाद बरोब्बर पोचवून घेऊन ती मिश्कीलपणे हसली असती फक्त.

तशी ती फार प्रसिद्ध नव्हती. दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात असेलही. पण तो काळ माझ्या फारच लहानपणी घडून गेलेला. पुढे मी वाचायलाबिचायला लागून मराठीतले लोकप्रिय, वादग्रस्त आणि थोरबीर लेखक ओलांडून तिच्यापर्यंत पोचले, तोवर तिची लोकप्रियता ओसरली होती. माझ्या पिढीत तरी कुणाला तिचं नाव फारसं ठाऊक नसे. तिचं 'आवजो' नावाचं पुस्तक मला मिळालं ते योगायोगानं. आमच्या शाळेत बक्षिसादाखल पुस्तकं देण्याची प्रथा होती. कुणी एक उत्साही शिक्षक जाऊन घाऊक उपदेशपर, नैतिक, सुसंस्कारी आणि बजेटात बसणारी पुस्तकं खरेदी करून आणत. त्यात मला 'आवजो' कसं मिळालं, हे एक नवलच आहे. पण मिळालं खरं. तोवर पुलं आणि वपु आणि श्रीमान योगी यांत अडकलेल्या मला एकदम नवंच कायतरी सापडलं त्यात. अमेरिकेचं प्रवासवर्णन हे अगदी अन्यायकारक वर्णन होईल त्या पुस्तकाचं. अमेरिकन कुटुंबांत राहून पद्मजानं घेतलेले अनुभव, त्यातून प्रातिनिधिक मराठी मध्यमवर्गीय
कुटुंबांना त्यांच्याशी ताडून पाहणं, त्यांच्या धारणा-समज-गैरसमज-पद्धती न्याहाळून पाहणं, टोकदार मिश्कील शेरे नोंदणं आणि काठाकाठानं स्वत:लाही पारदर्शकपणे तपासत राहणं होतं त्यात. तिची स्वतःची नास्तिकवजा प्रार्थनासमाजिष्ट पार्श्वभूमी, तिचं टीव्हीवरचं करियर, तिचं वाचन आणि धारदार बुद्धिमत्ता, तिच्यातली आधुनिक लेकुरवाळी शहरी विवाहिता आणि तिचा रोखठोक प्रामाणिकपणा... हे सगळं त्यातून दिसत राहिलं. मग ते नुसत्या अमेरिकन प्रवासवर्णनांहून बरंच काय काय झालं. आंतरजालीय मराठीच्या स्फोटानं अमेरिका अगदी जवळ येण्यापूर्वीच मला अमेरिकेतल्या बर्‍याच समकालीन गोष्टींबद्दल एक अपूर्वाईरहित दृष्टी मिळाली होती, त्याचं मूळ या पुस्तकात आहे बहुतेक.

त्यानं हरखून मी तिची बाकी पुस्तकं शोधायला घेतली, तर 'गर्भश्रीमंतीचं झाड' हे एक लोकांना ठाऊक असलेलं नाव मिळालं. पण इतकी गाजलेली पुस्तकं 'औटऑफप्रिंट आहे' असं सांगण्यात आपल्याकडच्या लोकांना काय गंमत वाटते कुणास ठाऊक, पुस्तक दुर्मीळ. मग स्नेह्यांच्या कपाटांना क्लेम लावणं आलं. अनेक सव्यापसव्य करून ते पुस्तक मिळालं नि त्यातली गुलमोहर, गोनीदा आणि इरावती अशा कैच्याकै गोष्टींनी खुळावलेली अगदी ताजी पद्मजा भेटली. मग 'सोनेलूमियेर'ची एक पिवळी पडलेली प्रत. त्यातली ड्रायव्हिंग शिकणारी, आंबे हापसणारी आणि अगदी नॉनसमीक्षकी रसिकतेनं रोदँचं प्रदर्शन बघणारी पद्मजा भेटली. तोवर आपण या बाईच्या प्रेमात पडलो आहोत, हे मी कबूल करून चुकले होते. 'राही' आणि 'दिवेलागण' हे तिचे अगदी आडवाटेचे कथासंग्रह. पण तेही मी मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कृपेनं मिळवले. एरवी चरित्रांना नाकं मुरडणारी मी. पण तिच्या प्रेमापोटी मी ताराबाई मोडकांचं तिनं लिहिलेलं चरित्रही वाचलं. मग 'माणूस माझी जात' मिळालं. त्यातली मुंबईकरांची अजब आणि दिसे न दिसेशी नाजूक संवेदनशीलता नोंदणारी पद्मजा मला तोवर सवयीची झाली होती. आधुनिक शहरी आयुष्यात ती मनापासून रमलेली असे. परंपरांशी तिला फार कधी भांडावं लागलं नाही आणि ती तशी भांडलीही नाही. त्यामुळे असेल, किंवा तिचा मूळचा गंमत्या स्वभावच असेल, पण तिच्यात कडवटपणा कसा तो नावाला नसे. माणसांच्या वागण्यातली विसंगती नोंदतानाही ती त्यांच्यातला ओलसर माणूसपणा अचूक टिपून घेई. ती पहाटे लिहायला बसे, तेव्हा तिला डिस्टर्ब न करता अलगद दार ओढून घेणारी तिच्या कॉलनीतली वॉचमनपत्नी काय; किंवा विरार लोकलच्या ऐन गर्दीत धावत्या गाडीत चढणार्‍या बाईला सुखरूप वर खेचून मग काळजीपोटी तिच्या मुस्काटीत देणारी लोकलकरीण काय! एरवी सहज निसटून गेली असती, अशी ही शहरी संवेदनेची रानफुलं बघायची तिला खास नजरच होती.

'हसरी किडणी' हे याहून तसं वेगळं पुस्तक. किडण्या निकामी होणं ही एकच गोष्ट पुरेशी धसकवणारी. त्यात आणि परदेशात शिकायला असताना (मध्यमवयात परदेशात वार्धक्यशास्त्र नावाचा नवाच विषय शिकायला गेलेली असताना!) आपल्या किडण्या कामातून गेल्याचं कळणं. त्यात वैद्यकीय विम्याचं संरक्षण नाही. ट्रान्सप्लाण्टचा खर्च आवाक्याबाहेर. मुलं शिकत असलेली. किडण्यांच्या बरोबरीनं अजून नाना रोगांचे अनपेक्षित हल्ले. यांत कुणाचीही सोकॉल्ड मिश्किली कोळपून गेली असती, तर ते सहज समजण्यासारखं होतं. पण ही बाई उपद्व्यापीच! मित्रपरिवारातून आर्थिक बळ मिळवणं, ते करताना मिंधेपण न येऊ देणं, आजारातून उठल्यावर या पुस्तकाच्या रूपानं आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिद्दीनं लिहिणं - तिचं तिलाच जमू जाणे. त्या पुस्तकात किडणीच्या आजारपणाबद्दलचे सगळे तपशील येतातच. शिवाय आपण एक समाज म्हणून या दुखण्याशी कसे वागतो, आपली वैद्यकीय व्यवस्था कोणत्या प्रतीची आहे, आपल्याकडच्या अनेक थोर पारंपरिक पॅथ्या यासंदर्भात कुठल्या पातळीवर आहेत ही थक्क करून टाकणारी सामाजिक निरीक्षणं तिनं त्यात नोंदली आहेत. खेरीज या निमित्तानं तिला नव्यानं गवसलेली आणि कुटुंबातली गृहीत धरलेली मैत्रं आहेत. आपत्कालात माणसं कशी कसाला लागतात आणि तावूनसुलाखून कशी लखलखून बाहेर पडतात, याचं निरीक्षण करणारा एक पोटप्रकल्प आहे. या पुस्तकानं पोटात घेतलेलं तिचं आत्मचरित्र, सामाजिक-वैद्यकीय निरीक्षणं आणि निव्वळ माहिती - यांच्याशी स्पर्धा करणारं दुसरं पुस्तक मराठीत नाहीच.

त्याची तुलना तिनं माधव नेरूरकरांसोबत लिहिलेल्या 'बाराला दहा कमी' या ग्रंथाशीच करावी लागेल. अण्वस्त्रनिर्मितीचा इतिहास हे या पुस्तकाचं ढोबळ वर्णन. अर्थातच ते अपुरं आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थिती, वैज्ञानिकांबद्दलचे समजगैरसमज, युद्ध आणि अस्त्रं यांबाबत वैज्ञानि़कांच्यात असलेलं-नसलेलं सजगपण, त्यांचे आंतरदेशीय संबंध-मैत्र-जळफळाट-हेवेदावे आणि सहकार्य, महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर या वर्तुळात घडलेल्या घडामोडी आणि प्रत्यक्ष अण्वस्त्रनिर्मितीची गोष्ट. मग त्या भयानक संहारानंतर सर्वसामान्य माणसांवर, राज्यकर्त्यांवर, वैज्ञानिकांवर झालेले परिणाम... हेही पुस्तक गेल्या वर्षीपर्यंत 'औटॉफप्रिंट' होतं. चारेक महिन्यापूर्वी ते 'राजहंस'नं पुन्हा बाजारात आणलं.

बायका आणि दागिन्यांशी असलेले त्यांचे (आणि तिचे स्वतःचे) संबंध, दगडांची झाडं बनवण्याची खास अमेरिकी कला, तिच्या आजारपणात तिला आलेले काही अतींद्रिय अनुभव आणि खास पद्मजा-पद्धतीत शोधलेली त्यांची स्पष्टीकरणं, लहान मुलांचं साहित्य, आइनस्टाइनचं घर... यांवरचं तिचं लिहिणं आजारपणानंतर आणि वाढतं वय जमेस धरूनही विलक्षण ताजं-तरुण होतं. 'स्मायली', 'टेडी बेअर', ओरिगामीत भेटणारा जपानी करकोचा अशा गोष्टींवर लिहून त्यांच्याशी आधुनिक माणसांचे असलेले लडिवाळ संबंध उलगडून दाखवावेत, तर ते तिनंच.

आता वाटतं, आपल्याला तिला हे सगळं सांगता आलं असतं. ते आता राहून गेल्याची खंत करावी का? तर नयेच. कारण आइनस्टाइनच्या डॉक्टरांना भेटायची संधी असतानाही भेटावं की भेटू नये, अशा आट्यापाट्या स्वतःशीच खेळत, संकोचापोटी ती भेट हुकवल्याचं तिनंच एका ठिकाणी नोंदलं आहे. आणि आपल्याला आइनस्टाइन 'आधीच आणि निराळा भेटला' होता की, अशी सारवासारव करत आपल्या संकोचाचं लब्बाड स्पष्टीकरणही दिलं आहे.

तिला माझी गोची बरोबर ठाऊक असणार!

थॅंक्यू पद्मजा, जस्ट फॉर बीइंग. :)

Sunday, 22 December 2013

बोंबील आणि बॅरल


पुनरुत्पादनाच्या प्रेरणेनं पुरुष आणि स्त्रिया सर्वसाधारणतः एकमेकांकडे आकर्षित होतात हे खरं. पण पुनरुत्पादन ही लैंगिक संबंधांची एकमात्र प्रेरणा नाही. त्या क्रियेतून मिळणारा आनंद ही एक महत्त्वाची प्रेरणा आहे. स्त्रीच्या योनीत पुरुषाचं लिंग या संभोगप्रकाराखेरीज इतर सर्व मैथुनप्रकार, गर्भनिरोधक साधनं, कायदेशीर गर्भपात, प्राणिसृष्टीतही आढळणारे समलिंगी संबंध या सार्‍यांच्या अस्तित्वातून हेच सिद्ध होतं की पुनरुत्पादन ही लैंगिक संबंधांची एकमात्र प्रेरणा नाही. असं असताना अमुक एका प्रकारचे संबंध / आकर्षण नैसर्गिक आणि बाकी अनैसर्गिक, असं कसं ठरवणार? असं ठरवण्याला कुठलाही ठोस आधार देता येत नाही. एकदा माणूस नैसर्गिक म्हटला की तो जे जे करेल, ते सगळं नैसर्गिकच. अर्थात कोणत्याही नैसर्गिक गोष्टींवर बंधनं नसावीतच असं म्हणणंही धोक्याचं आहे (हिंसेची प्रेरणा नैसर्गिकच आहे). पण एखादी कृती नैसर्गिक आहे की अनैसर्गिक हा त्या गोष्टीची योग्यायोग्यता ठरवण्याचा आधारच नव्हे. ती कृती करण्यामुळे इतर व्यक्तींच्या स्वातंत्र्याचा संकोच होत नाही ना, त्यांच्यावर अन्याय होत नाही ना याची खातरजमा करणं महत्त्वाचं आहे.
समलिंगी संबंधांना दोन व्यक्तींची परस्परसंमती असेल, तर त्यामुळे इतरांवर काय अन्याय संभवतो? कोणताच नाही.
मग त्याला विरोध करण्याला आधार काय?
माणसाच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणत, समलिंगी संबंध बेकायदेशीर ठरवणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी निषेध करते.

***

मराठीत फॅनफिक्शन तर नाहीच, दर्जेदार इरॉटिकाही नाही. ’शेरलॉक’ ही ’बीबीसी’ची मालिका आणि मुख्यत्वेकरून तिच्यावर लिहिली जाणारी फॅनफिक्शन यांनी मला फॅनफिक्शन, इरॉटिका या प्रकारांची रसभरित ओळख तर करून दिलीच - पण लैंगिकतेचं विविधांगी भान आणून देण्याला त्यांनी बराच हातभार लावला. त्यातल्या एका शृंगारिकेचं भाषांतर करून हे ऋण थोडंसं फेडायचा मानस बरेच दिवस होता. पण काही केल्या झेपत नव्हतं. मातृभाषेत इरॉटिका, नि चांगली इरॉटिका लिहिणं किती अवघड ते लक्षात येऊन अनेकवार हतबल तेवढं व्हायला होत होतं. ते भाषांतर पुरं व्हायला निमित्त झालं, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचं.
त्याबद्दल भूमिका घेताना काहीतरी सकारात्मक कृतीची जोड त्याला असली पाहिजे असा माझा आग्रह होता. त्यासाठी हे भाषांतर पुरं केलं. दमछाक झाली, पण मजाही आली.
हे थोर भाषांतर नाही, मान्य आहे. पण कुठूनतरी सुरुवात करावी लागतेच.

इथे हे भाषांतर उपलब्ध आहे.

शीर्षकाचा संदर्भ: विलास सारंग यांची ’मुक्त शब्द’च्या २०११ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली कथा.

Thursday, 10 January 2013

साहित्यसंमेलन आणि मी

साहित्य संमेलन ही गोष्ट माझ्यासाठी थेट महत्त्वाची नाही. त्यात चालणारे सगळे थेर मला साहित्य या माझ्या आवडत्या गोष्टीबद्दलही उद्वेग आणणारेच असतात. त्यामुळी मी त्यापासून अंतर राखून असते. पण - माझी भाषा, त्यातलं साहित्य आणि त्या साहित्याचा एक लोकमान्य - परंपरागत उत्सव या तीनही गोष्टींबद्दल मत नोंदवण्याचं अगत्य, अधिकार आणि कर्तव्य मी राखून ठेवू इच्छिते, कारण साहित्यातली प्रतीकं माझ्या आयुष्यावर दूरगामी परिणाम घडवून आणू शकतात - आणतात असं मी मानते. म्हणून हे मतप्रदर्शन.

१. साहित्यिक, रसिक आणि त्या दोहोंमधले दुवे (संपादक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते, वाचनालयं, समीक्षक, माध्यमांचे प्रतिनिधी) यांखेरीज इतर कशालाही आणि कुणालाही साहित्य संमेलनात स्थान असू नये. राजकारणी आणि प्रायोजक यांना होता होईतो दूर ठेवलं जावं. हे प्रत्यक्षात अशक्य दिसतं. पण निदान त्यांचा चेहरा तरी साहित्यप्रेमीच असला पाहिजे आणि या चेहर्‍याशी विसंगत अशी कोणतीही कृती करण्यापासून (आपला साहित्यबाह्य कार्यक्रम राबवण्यापासून) त्यांना इतर घटकांनी रोखलं पाहिजे. स्थानिक वैशिष्ट्यांना संमेलनात स्थान देतानाही वरची चौकट मानणं बंधनकारक असलं पाहिजे.

२. साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक असणं लोकशाही प्रक्रियेला धरून आहे. फक्त या प्रक्रियेत मतदानाचा अधिकार आहे त्याहून व्यापक समूहाला असला, तरच ती प्रक्रिया अर्थपूर्ण ठरेल. (सध्याच्या प्रक्रियेत नक्की कोण नि केव्हा मतदान करतं हे मला तरी ठाऊक नाही. त्यात सहभागी होण्याची इच्छा असल्यास, त्याची प्रक्रिया काय, हेही गुलदस्त्यात. जाणकारांनी प्रकाश टाकल्यास मी ऋणी असेन.)

३. तरीही हे संमेलन मुख्य धारेतलं असल्यामुळे त्याविरोधात आवाज उठतील. विद्रोही, दलित, स्त्रीवादी, उपेक्षित, असे आणि वेळोवेळी इतरही असंतोष व्यक्त होतील. ते अपरिहार्य आणि आवश्यक आहे. मात्र या असंतोषाला हिंसक परिमाण मिळता नये, ही शासनाची आणि आपलीही जबाबदारी आहे. (पुष्पाबाईंना जिल्ह्यात प्रवेशबंदी आणि त्याविरोधात संरक्षण द्यायला पोलिसांनी दर्शवलेली असमर्थता हे आपल्याला लाजिरवाणं आहे.)

या मतांच्या पार्श्वभूमीवर -

साहित्यिक आणि समाजसुधारक हमीद दलवाईंच्या घरून निघणार्‍या साहित्य दिंडीला विरोध करणारे स्थानिक मुस्लिम गट आणि संभाजी ब्रिगेडसारख्या अविचारी संघटना;

परशुरामासारख्या जातीय, हिंसक आणि पुरुषप्रधान प्रतीकांचा उद्घोष करणारे संकुचित आयोजक;

साहित्यिकांना बैल संबोधणार्‍या बाळ ठाकरेंचं नाव एका सभागृहाला देण्याला पाठिंबा देणारे राजकीय नेते;

इतर अत्यावश्यक कामांसाठी असलेला राखीव निधी 'लोकप्रतिनिधींचे सांस्कृतिक शिक्षण' या गोंडस नावाखाली राजरोसपणे साहित्य संमेलनाकडे वळवणारी राजकारणी आणि आयोजकांची अभद्र युती -
या सार्‍याचा मी एक मराठी साहित्यरसिक म्हणून निषेध करते.

(तपशिलात काही  चुका असल्यास निदर्शनास आणून देणार्‍यांचं आणि मतभेदांचंही स्वागतच आहे.)

Tuesday, 9 March 2010

हॅपी विमन्स डे, बाय दी वे!

अभिजीतने न दिलेला खो मी घेतला नि हे खरडलं.

बायका फक्त बायका आहेत म्हणून त्या करतील ते ते आपोआपच महान / प्रगतिशील / पुरोगामी ठरतं; या गृहितकाची जिम्मा मी तरी अल्पसंख्याकांचं नेहमीच बरोबर आणि ते कायमच सहानुभूतीस लायक, दलित साहित्य चाकोरीबाहेरचं / गावकुसाबाहेरचं असल्यामुळे थोर, योनी या निषिद्ध शब्दाभोवती आणि अवयवाभोवती फिरणारं नाटक केलं म्हणून ते आपोआपच चांगलं - या आणि असल्या समीकरणांमधेच करते. मग महिलादिनाचं आणि ’त्या होत्या म्हणून आम्ही आहोत’चं प्रयोजन काय?

लेट मी क्लिअर - माझेही या प्रश्नाबाबत मेजर घोळ आहेत. तेच सोडवायचा प्रयत्न चाललाय.

इतिहासात शिरायचं की कसं? मरो, होऊन जाऊ दे. अजूनही बायका स्वेच्छेनं मंगळसूत्रं, मुलंबाळं, घर-संसार, धुणी-भांडी, लिंगभेद आणि बरंच काय काय करतात किंवा करत नाहीत, हे मान्यच. तसंच अजूनही काही ब्राह्मणेतर जातीतल्या पोरानं ब्राह्मण (’ब्राह्मण’च्या जागी कुठलाही उच्चवर्णीय समाज घातला तरी चालेल) पोरगी गटवली, की त्याचा / त्याच्या आप्तांचा इगो कुठेतरी सुखावतोच. मग जातिभेद महान (किंवा गेला बाजार अपरिवर्तनीय वगैरे तरी) आहेत आणि त्यांच्या उच्चाटनाची /  किमान त्यांतून होणार्‍या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शोषणाच्या उच्चाटनाची गरज / शक्यता नाही असं म्हणायचं का?

कुठल्याही समाजात आपलं होणारं शोषण / आपल्यावर होणारा अन्याय या बाबींचा साक्षात्कार सगळ्याच्या सगळ्या शोषितांना एकसमयावच्छेदेकरून झाला, असं कधीच होत नाही. काही लोकांच्या लक्षात आधी येतं, काहींच्या नंतर. काहींच्या शतकानुशतकांनंतरही - किंवा खरं तर, कधीच - लक्षात येत नाही, तर काही जण सुधारकी रेट्याची वाट पाहण्यात वा समकालीन समाजाच्या वेगाशी सामोपचारानं जुळवून घेण्यात अजिबात वेळ दवडत नाहीत. स्वत:च्या आयुष्यातला अन्याय दूर करून मोकळे होतात. हे जे बाकीच्या समाजानं बदलण्याची वाट बघण्याचं नाकारणारे लोक असतात, त्यांचं उदाहरण पाहून बर्‍याच - सगळ्या नाही, बर्‍याच - परप्रकाशित लोकांनाही परिस्थितीचा साक्षात्कार होतो. हे परप्रकाशित लोक संख्येनं पुष्कळ असतात आणि त्यामुळे त्यांच्या बदलण्याचा परिणाम दृश्यस्वरूपात जाणवतो. त्यांच्या बदलातले फायदे-तोटे अधिक स्पष्ट होऊन दिसतात. तेव्हाच त्यांपैकी एखादा फायदेशीर बदल लोकमान्य होतो. ही लोकमान्यताही पहिल्याच टप्प्यात मिळत नाही. निरनिराळी घनता आणि शोषणक्षमता असलेल्या विस्तीर्ण प्रदेशात एखादा द्रवपदार्थ सावकाश झिरपत जावा, त्याची मातीत मुरण्याची तीव्रता, प्रमाण, वेग सगळंच मातीनुसार सापेक्ष असावं, तशी ही प्रक्रिया असते. एकाच वेळी निरनिराळ्या प्रदेशात निरनिराळ्या टप्प्यांवर असणारी.

हे साखळीच्या बाहेरचं एकांडा शिलेदार असणं ते साखळीतलाच एक महत्त्वाचा दुवा म्हणून स्वीकारलं जाणं - या प्रवासाला प्रदीर्घ कालावधी लागतो. आणि तरीही प्रक्रियेचा अंतिम बिंदू म्हणून काळाच्या कुठल्याही तुकड्यावर बोट ठेवता येणं अशक्य असतं.

आता अशा प्रकारे बदलाच्या एका टप्प्यावर असताना, बदल आपल्याला फायदेशीर ठरत असताना बदल सुरू करून देणार्‍या काही स्वयंप्रकाशी लोकांबद्दल कृतज्ञता वाटावी आणि ती व्यक्त करावी; यात राग येण्यासारखं काय आहे? हां, आता त्या कृतज्ञतेला किती वेटेज द्यायचं, आपल्या वाटचालींचे टप्पे यशस्वी मानून धन्य व्हायचं की नाही, आपलं आणि समकालीनांचं एकूणच यशापयश त्यांच्या मापानं तोलायचं की त्याला वर्तमानाचे अधिक कठीण निकष लावायचे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या त्या व्यक्तीच्या तारतम्यानुसार सापेक्ष आहेत.

अंधश्रद्धानिर्मूलनाची चळवळ आवश्यकच. पण एकंदर धर्मसंकल्पनेच्या आवाक्यामध्ये तिचं स्थान किती लहान-किती मोठं हे प्रत्येकाला दिसणार्‍या चित्राच्या समग्रतेवरच अवलंबून नाही का?

हॅपी विमन्स डे, बाय दी वे!

Thursday, 21 May 2009

आणखी एक धार्मिक वगैरे वगैरे


संवेदचं हे एकदम विचारप्रवर्तक वगैरे पोस्ट वाचून मी ही कमेण्ट खरडायला घेतली, पण ती इतकी मोठी झाली, की तिच्या आकाराची लाज वाटून शेवटी मी हे पोस्टायचंच ठरवलं.




खूप वायफळ तात्विक चर्चा करायची झाली, तर ’आपल्या’ धर्मात ’धर्म’ हा शब्द कर्तव्य या अर्थानी कसा वापरलाय आणि त्यामुळे प्रत्येकाचा धर्म निराळा कसा असतो असं कायच्या काय खरडत बसता येईल. पण त्याला काही अर्थ नाही. त्या अर्थानी आपण धर्म हा शब्द वापरायचं केव्हाच सोडून दिलंय. आपण देव आणि धर्म या गोष्टींची सांगड घालतोच घालतो. ’तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म’ या बिनतोड युक्तिवादात वापरलाय त्याच अर्थानं चांगलं (धर्मानं!), नियमबियम पाळून वागायचं मार्गदर्शन करणारी एक संस्था याच अर्थानं आपण तो वापरतो. आपापल्या अपराधीपणावर उत्तरं शोधायला, पांघरुणं घालायला, नियम सुधारून (वाकवून?) घ्यायला, इतरांना (आणि स्वत:लाही) धाक घालायला लोक तो बर्‍याचदा वापरत असतात.



त्या अर्थानं मी आहे का धार्मिक? बहुतेक नाही.



मला पुराणातल्या बर्‍याचश्या गोष्टी माहीत असतात, देव आणि दैवतांचा इतिहास याबद्दल कुतुहल वाटतं. धर्माचा इतिहास संस्कृतीच्या पाऊलखुणा सोबत घेऊन येतो, तो वाचायला मला आवडतं. त्यात लोकांनी आपापल्या फायद्यातोट्यासाठी, कधीकधी नि:स्वार्थीपणे, कधीकधी निव्वळ मूर्खपणानं मारून ठेवलेल्या मेखी (की मेखा?) समजून घ्यायला धमाल येते.




पण देवापुढे - अगदी तिन्हीसांजेलासुद्धा - आपसूक वगैरे माझे हात नाही जोडले जात. खूप उदास असताना, खूप काळजीत असताना, खूप हैराण झालेलं असतानाही, ’आता देवच काय ते बघून घेईल’ असं चुकूनही माझ्या मनाशी येत नाही. देवाची प्रार्थना करावी असं सकाळी - रात्री कधीच वाटत नाही. अंधाराची किती भीती वाटली, तरी रामाबिमाचं नाव माझ्या तोंडात कधीच येत नाही. असली काहीतरी एण्टिटी असेल, इथपासूनच मला टोटल अविश्वास आहे, तर मग ती आपल्याला मदत करेल, असं कसं वाटणार?



म्हणजे मी धार्मिक नसणारच. असं का असेल?



आमचं घर काही तितकं अतिरेकी आधुनिक नव्हे. म्हणजे आमच्या घरी नाही, पण बाबांच्या घरी - गावाला, आणि आजोळीही, गणपती बसतो. आम्ही त्याकरता शक्य असेल तेव्हा गावाला जातो. घरात लहानसा का होईना देव्हारा आहे. नेहमी बाबा, आणि बाबा नसले तर आई देवाची पूजा करते. तिन्हीसांजेला देवापाशी दिवा लावते. फार गडबडीत नसेल, तर कधीमधी रामरक्षा पुटपुटते. शनिवारी बाबांचा उपास असतो. चतुर्थीला घरात खिचडी होते. पाळी चालू असताना आई बाजूला बसत नाही, पण मुद्दामहून देवाला शिवायलाही जात नाही. घरी कधी हळदीकुंकू वगैरे झाल्याचं आठवत नाही. पण हळदीकुंकू घ्यायला आईची ना नसते. आजी घरात असेल, तेव्हा ती हातात एखादी बांगडी चढवून ठेवते. कुठे फिरायला वगैरे गेलो, तर आम्ही तिथली देवळंही बघतो. हात जोडतो, तीर्थप्रसाद घेतो. माझी आणि माझ्या बहिणीची पत्रिका बनवलेली आहे.




असं सगळं असताना देव किंवा त्याला लागून येणारा धर्म मी इतका बेदखल का केला असेल? याचं कारण शोधताना मला नेहमी एक गंमत आठवते.



आपल्याला मतं फुटायला लागतात त्या काळात कधीतरी, म्हणजे दहावी-अकरावीत असताना असणार, माझा मावसभाऊ घरी आला होता. आडव्या-तिडव्या वाचनामुळे, आणि अंगातल्या उद्धटपणामुळे, माझे ज्वलंत - जहाल - स्त्रीवादी - निधर्मी वगैरे विचार तेव्हा जोरात होते. ते मोठ्यामोठ्यानं मांडायची खुमखुमीही होती. सगळ्यांना त्यांचा मूर्खपणा - अन्यायीपणा दाखवून वगैरे द्यायला पाहिजे, असलं काहीतरी अचाट तेव्हा वाटायचं. असल्याच कसल्यातरी वादात मी मोठ्यामोठ्यानं ’देव नसतोच’च्या बाजूनं आणि माझा भाऊ ’देव असतोच’च्या बाजूनं तारस्वरात भांडत होतो. कुठल्यातरी एका पॉईंटला त्याच्या बाजूनं आर्ग्युमेंट्स संपली. ’तुला इतकं वाटतंय ना, देव नाही असं? मग होऊन जाऊ दे. देव्हार्‍यातला देव घे आणि त्याला पाय लावून दाखव. पाहू तुला जमतं का?’ असं आव्हान त्यानं दिलं. मीही ’हात्तेरेकी, त्यात काय, घे!’ असं म्हणत शिस्तीत जाऊन देव्हार्‍यातली देवीची लहानशी पितळी मूर्ती घेऊन जमिनीवर ठेवली, त्यावर पाय दिला आणि त्याच्याकडे विजयी मुद्रेनं पाहिलं. तो अर्थातच निरुत्तर झाला. ’तू आचरट आहेस बाबा खरंच. जरापण भीती नाही...’ असलं कायतरी तो बडबडला आणि तो वाद माझ्यापुरता जिंकून संपला. परत पत्ते सुरू झाले. संपलं.


आई घरातच होती. कशातच मधे न पडता फारसं लक्ष न दिल्यासारखं करत पडल्यापडल्या शांतपणे ऐकत होती. तिनं सगळ्या वादात माझी बाजू घेतली नाही आणि त्याचीही नाही. मला थांबवलंही नाही. नंतर काही प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही. कदाचित प्रतिक्रियेच्या या अभावामुळेच, तिला जणू कळलंच नाहीये, मी काय पराक्रम केला ते, अशा थाटात मी तिला मारे सगळी गोष्ट सांगायला गेले. तर ऐकून म्हणाली, पाय ठेवलास म्हणजे काय थोर साहस केलंस? पितळेची वस्तू ती. ती काय खाणारे तुला? तुझा नसेल विश्वास. तुझ्यापुरता. लोकांचा आहे ना. लोक त्या मूर्तीसमोर हात जोडतात. त्यांच्या विश्वासावर पाय ठेवलास. तूच कर विचार, चूक की बरोबर त्याचा.


विषय संपला. तिला काहीच फरक पडला नाही. नेहमीसारखा संध्याकाळचा दिवा लावणं, हात जोडणं यात काही फरक नाही. माझ्यावरही अजिबात राग दर्शवला नाही. तिच्यापुरता खरंच विषय संपला. तिनं मूर्ती साधी धुतलीही नाही लगेच. काय जनरल आठवड्या-पंधरवड्यानं देव्हार्‍याच्या साफसफाईची वेळ आली, तेव्हाच दिव्यासकट सगळ्या मूर्ती स्वच्छ झाल्या, हे मी मुद्दाम लक्ष ठेवून पाहिलं.


परत मी कधी देव आहे की नाही, या गोष्टीवरून तावातावानं वाद घातल्याचं आठवत नाही. पाळी चालू असताना उद्मेखून देवापाशी दिवा लावायला जाणं आणि ’मुद्दामहून अगोचरपणा नकोय’ वगैरे क्षीण विरोध करणार्‍या आईशी वाद घालणं वगैरे आचरट प्रकारही परत करावेसे वाटले नाहीत. मग ’माझा विश्वास नाही, मी देवापुढे हात जोडणार नाही’ असल्या घोषणाही कधी केल्या नाहीत. हात न जोडून जसा फरक पडत नाही, तसा जोडल्यानंही फरक पडत नाही इतपत तर्क आणि सहिष्णू वृत्ती माझ्यात शिरली असावी. सगळं आपापल्या समाधानाशी आणि विश्वासाशी येऊन थांबतं, हे कुठेतरी जाणवलं असावं.




म्हणूनच अंनिसच्या कामाबद्दल कधी भारावलेपणा वाटल्याचं आठवत नाही. फारशी खोली नसलेलं, लोकांची पिळवणूक बंद करण्याचा प्रयत्न करणारं एक काम, इतपतच महत्त्व त्याला द्यावंसं वाटलं. कायद्यापलीकडे शोषण होत नाही ना, इतकं पाहून लोकांना आपापले विश्वास-श्रद्धा जपायचा हक्क आहे, त्यांना आवश्यक असेल त्या - झेपेल त्या निष्कर्षावर त्यांनी स्वत:च आलं पाहिजे, अशी एक धारणा होऊन बसली. कितीतरी वेळा तर देवावर विश्वास नसलेले लोकही आपला अविश्वास असाच वारसाहक्कानं, विचार न करता कंटिन्यू करत असल्याचं दिसलं. तेव्हा ’आईनं सांगितलं म्हणून मी करते मनोभावे’ या साच्यातला गुरुवारचा उपास आणि असला देवावरचा अविश्वास यांत काय फरक, असं वाटून गंमत वाटली. मग कधीतरी ’धर्मशास्त्राचा इतिहास’, ’विवाहसंस्थेचा इतिहास’ वगैरे वाचलं, तेव्हा तर करमणूकच झाली. आणि या सगळ्या व्यवस्थेतलं शोषण - संधिसाधूपणा असं पुराव्यासह समोर ठेवलं तरीही ज्याला यातल्या कर्मकांडावर विश्वासायचं आहे, ज्यांना त्यातून अनामिक दिलासा मिळतो, ते सगळ्या पुराव्यांकडे डोळेझाक करूनही विश्वास ठेवणारच, याची खात्रीही पटली.



हिंदू असल्याचा अभिमान वगैरे तर मला कधी नव्हताच. हिंदू आहोत म्हणजे काय आहोत, हेच बोंबलायला माहीत नाही, तर अभिमान कसला कपाळाचा? त्यातल्या विशेषत: बायकांकरता खास बनवलेल्या चालींची मात्र शरम वाटायची. पण तसल्या मखलाश्या जगातल्या कुठल्याच धर्मानं करायच्या ठेवलेल्या नाहीत, हे कळलं, त्या कुठल्यातरी टप्प्यावर मी निधर्मी आहे असं स्वत:ला सांगणं मी सोडून दिलं. आकाशातला बाप, प्रेषित किंवा विहीरीत प्रेत टाकून देणं या गोष्टी नाहीतरी मला परक्या वाटतात. तितक्या हिंदू धर्मातल्या संकल्पना मला परक्या वाटत नाहीत म्हणजे हा माझा धर्म. कुठल्याही भोंगळ तत्त्वज्ञानापासून कठोर कर्मकांडापर्यंत आणि चार्वाकापासून ते बुद्धापर्यंत सगळ्यांनाच आपलं म्हणणारा आणि टिकून राहणारा हा लबाड धर्म आता मला कधी क्रूर, कधी मजेशीर, आणि नेहमीच सर्वायवलचं रहस्य जाणणारा वाटतो. त्यात अभिमान कसला नि लाज कसली? गंमत आहे.



पण म्हणजे मी धार्मिक आहे की काय? काय माहीत.