Saturday 28 November 2015

दिवाळी २०१५, अंक दुसरा : साधना


'मिळून सार्‍याजणी' किंवा 'पालकनीती'सारख्या चळवळीतल्याच अंकांचा अपवाद सोडला, इतर भल्या भल्या साहित्यिक दिवाळी अंकांना जे जमलेलं आणि / किंवा सुचलेलं नाही, ते 'साधने'नं सुमारे ५-६ वर्षांपूर्वीच करायला सुरुवात केलेली आहे. ते म्हणजे ऑनलाईन आवृत्ती उपलब्ध करून देणं. नुसती नाही, चकटफू. हे एका प्रकारे पायंडा पाडणारं, इतर अंकांना काही निर्णय घ्यायला भाग पाडणारंच आहे. यंदाचं वर्षही त्याला अपवाद नाही. दिवाळी संपते न संपते, तोच त्यांचा अंक ऑनलाईन आलेला आहे.

यंदाचं त्यांचं मुखपृष्ठ मात्र मला तितकं आकर्षक वाटलं नाही. पण अनुक्रमणिकेनं त्याची दणदणीत भरपाई केली.

कुरुंदकरांचा सॉक्रेटीस आणि विचारस्वातंत्र्य या विषयावरचा लेख, विचारवंतांनी कसं वागावं, या विषयावरच्या रोमिला थापर यांच्या या मुलाखतीचा अनुवाद, पुरस्कारवापसीबद्दलच्या रामचंद्र गुहा यांच्या लेखाचा अनुवाद आणि नयनतारा सहगल यांनी चर्चिल महाविद्यालयात २०११ साली केलेल्या भाषणाचा अनुवाद (साहित्यिक आणि राजकारण) - असे चार खणखणीत आणि पूर्वप्रकाशित लेख या अंकात आहेत. काहीएक भूमिका घेताना, एखाद्या विषयाचा आढावा घेताना, समग्रतेचा आग्रह धरताना, विषयाच्या शक्य तितक्या सगळ्या बाजू प्रकाशात याव्यात यासाठी असे जुने लेख पुन्हा प्रकाशित करणं (भाषांतरित वा मूळ भाषेत) हे कमीपणाचं वा लबाडीचं तर नाहीच; पण काही वेळा अतिशय समर्पक असू शकतं हे सिद्ध करणारी ही निवड आहे. 'ऐसी अक्षरे'च्या नव्वदोत्तरी विशेषांकाबाबतच्या ताज्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर हे फारच लखलखीतपणे जाणवलं.

हे सगळेच लेख वाचावेच असे आहेत, हे सांगणे न लगे.

डॉ. अभय बंग यांचा गांधी कुटीवरचा लेख मात्र मला अजिबात आवडला नाही. तो चक्क भक्तिपर असा आहे. एकीकडे बदलत्या धक्कादायक विचारानंही अस्वस्थ होणार्‍या ग्रीक गणराज्याचं कौतुक आणि एकीकडे गांधीजींच्या कुटीचा देव्हारा करणारा हा लेख. कुछ जम्या नही. खुद्द गांधींनाही हा लेख कितपत आवडला असता, याबद्दल मला मेजर शंका आहे.

या अंकातले खरे स्टार लेख दोन आहेत. एक म्हणजे लक्ष्मीकांत देशमुखांचा खेळ आणि स्त्रीवाद या विषयावरचा लेख. बिली जिन किंग या अमेरिकन टेनिसपटूनं स्त्रीवादाची धुरा खांद्यावर घेत बॉबी रिग्जचा पराभव केला. बॉबीची आधीची बेताल वक्तव्यं लक्षात घेता (“मी बिलीला हरवून स्त्रीवाद चार पावलं मागे नेऊन ठेवीन.” हे सर्वांत सौम्य विधान) त्याला हरवणं बिलीमधल्या स्त्रीकरता अत्यावश्यक होतं. ते तिनं मोठ्या झोकात केलं. दुसरी द्युती चांद ही भारतीय धावपटू. एखादी व्यक्ती स्त्री की पुरुष हे ठरवण्यासाठी केली जाणारी लैंगिकता चाचणी किती अशास्त्रीय, अनावश्यक आणि अपमानास्पद आहे हे दाखवण्यासाठी तिनं खेळाच्या सुप्रीम कोर्टात त्या चाचणीविरुद्ध दाद मागितली. ती नुसती जिंकली नाही, तिनं ही चाचणीच रद्दबातल ठरवली. हा स्त्रियांच्या दृष्टीनं विलक्षण विजय आहे. या दोन उदाहरणांचा आढावा देशमुखांनी विस्तारानं घेतला आहे. या दोन उदाहरणांच्या दरम्यान त्यांच्याइतक्या नशीबवान न ठरलेल्या आणि / किंवा वेगळ्या कारणांनी प्रकाशझोतात आलेल्या स्त्री खेळाडूंबद्दल ते बोलतात. खेळाडूंमधली टेस्टारेरॉनची पातळी, तिचा क्षमतेशी जोडला जाणारा संबंध, टेस्टाटेरॉनच्या पातळीमुळे वा गुणसूत्रांच्या गोंधळामुळे संदिग्ध ठरणारं लिंग, त्याचे खेळाडूंच्या स्पर्धात्मक आणि सामाजिक आयुष्यावर होणारे परिणाम अशा अनेक अंगांना स्पर्श करणारा हा लेख आहे. तो वाचताना मला एकीकडे ज्ञानदा देशपांडेच्या 'बृहत्कथे'वरचा हा लेख आठवत होता, तर दुसरीकडे एका होमोक्युरिअस व्यक्तीचं मित्राला उद्देशून लिहिलेले एक कथात्मक पत्र आठवत होतं - ज्यात खेळ - क्रीडाप्रकार आणि त्याचा लिंगभावाशी असलेला संबंध या गोष्टीबद्दल अतिशय रोचक असे विचार लेखक माडतो.

दुसरा अतिशय रंजक लेख विनय हर्डीकर यांचा - त्यांच्या बहुभाषापटुत्वाबद्दलचा. विनय हर्डीकरांचा साधनेच्याच दोन-तीन वर्षांपूर्वीच्या दिवाळी अंकातला लेख चांगलाच लक्षात होता (साधनेसारख्या नियतकालिकातही माझा पूर्वेतिहास माझ्या आजच्या भूमिकेच्या आड येऊ शकतो काय, असा खेदजनक प्रश्न विचारणारा 'पाचा उत्तराची कहाणी' हा लेख केवळ भारी होता. 'साधने'च्या वेबसाइटवर २०१० च्या दिवाळी अंकात तो मिळेल). त्यामुळे त्यांचा लेख उत्साहानं उघडला. त्यानं अपेक्षाभंग केला नाही. ज्ञानप्रबोधिनीपासून ते इंडियन एक्स्प्रेससाठी केलेली फिरती पत्रकारिता अशा भल्या मोठ्या पटावर हर्डीकरांचे किस्से रंगतात. “एकदा आमच्या पलीकडच्या वाड्यातले माझ्याच वयाचे दोन भाऊ एकमेकाला अशा शिव्या देत होते की, शुद्ध शाकाहारी माणसाच्या जिभेला मटण-प्लेट पाहून पाणी सुटावं, तसं मला झालं होतं!” हे त्यांचं मासलेवाईक वाक्य काय, किंवा हर्डीकरांना कन्नड येतं हे कळल्यावर एका धोरणी राजकारण्यानं त्यांची मागच्या गाडीत केलेली सावध रवानगी काय - सगळाच टोटल म्याडनेस आहे! "संस्कृत या माझ्या मैत्रिणीवर तर स्वतंत्र लेखच लिहिला पाहिजे," हे त्यांनी केलेलं सूतोवाच प्रत्यक्षात उतरावं, इतकीच प्रार्थना.

अतुल देऊळगावकरांचा 'द हिंदू'च्या व्यंगचित्रकारांबद्दलचा लेख आणि बी. केशरशिवम या सरकारी अधिकार्‍यानं गुजरातेतल्या दलितांना त्यांची हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष, हेही वाचण्यासारखे लेख आहेत.

बाकी अंकात अनिल अवचट (बिहारचा दुष्काळ) आहेत, गोविंद तळवलकर (रवींद्रनाथांनी घेतलेली मुसोलिनीची भेट) आहेत, अरुण टिकेकर (ऍंग्लो इंडियन कादंबरीकार) आहेत. पण त्यांत फारसं अनपेक्षित, थोरबीर काही नाही.

कथा-कवितांची संपूर्ण अनुपस्थिती आणि काहीसं सौम्य - आशावादी - समजूतदार संपादकीय या लक्ष वेधून घेणार्‍या गोष्टी.

Thursday 26 November 2015

दिवाळी २०१५, अंक पहिला : मौज

मोबाईलच्या पडद्यावर न मावेल इतकं दीर्घ काही लिहायचं नि वाचायचं झालं, तर मुख्यधारेतली मराठी माध्यमं कमालीची मर्यादित आहेत. दखल घ्यावी अशी मासिकं नि साप्ताहिकं हातांच्या बोटांवर मोजण्याइतकी. अनियतकालिकांची चळवळ ओसरूनही जमाना झाला. वृत्तपत्रांमध्ये प्रथम प्राधान्य जाहिरातींना आहे – बातम्यांचीही वासलात, तिथे पुरवण्यांमधल्या लेखनाबद्दल काय बोलावं? सोशल मिडियावर हमरीतुमरी हाच एकुलता एक सूर आहे. वेळ घेऊन काही लिहिणं-वाचणं-संवादणं जवळपास दुर्मीळ म्हणावं असं आहे.


अशात दिवाळी अंक तेवढे आहेत. ‘गौरवशाली’ किंवा’ ‘आगळीवेगळी’ असली घिसीपिटी विशेषणं त्या परंपरेला लावा. दर वेळी शंभर वर्षांच्या दिवाळी अंकाच्या इतिहासाचे दाखले देत छाती फुगवा. दर्जाच्या नावानं कुरकुरत त्यांतल्या जाहिरातींना नावं ठेवा... तरीही दिवाळी अंक आहेतच. परंपरा चालू ठेवायची म्हणून काही रडतखडत, काही नव्याची बंडखोर भर घालत, काही खरोखरच गौरवशाली परंपरा चालवत. कथा, संशोधन आणि संदर्भ यांसह केलेलं निराळ्या वाटेवरचं सखोल लेखन, फेसबुकासारख्या माध्यमांना पचवत राहिलेल्या कविता... अशा सगळ्याला एक अवकाश पुरवत.
वर्तमानपत्रात म्हटलं जातं त्यापेक्षा जास्त काहीतरी त्याच्याबद्दल म्हटलं गेलं पाहिजे, असा एक माझाच मला चावलेला जबाबदार किडा. म्हणून ही मालिका.


माझ्या पिढीतल्या अनेकांप्रमाणे माझंही वाचन खंडित स्वरूपाचं होऊन बसलेलं आहे. अनेक नव्या-जुन्या लेखकांशी वा कवींशी मी असायला हवं तितकी नि तशी परिचित उरलेली नाही. प्रयत्न करूनही एक अंक सलग समग्र वाचला जात नाही, इथून तिथे उड्या मारल्या जातात, काही गोष्टी वाचायच्या सुटून जातात हे आहेच. शिवाय वैयक्तिक आवडीनिवडींचा एक घडत गेलेला पोत आहे. तो काही पूर्णत: आधुनिक (की आधुनिकोत्तर?!) आहे असं म्हणता येणार नाही. या सगळ्या मर्यादा या र्‍हस्वलेखनाला असतील, याची वाचणार्‍यानं जाणीव बाळगावी. मतभेद असतील तिथे खंडन करावं, आपलं मत मांडावं.


आपण जवळजवळ अर्धं वर्ष रक्त आटवून जे दिवाळी अंक काढतो-सजवतो, ते कोण वाचतं, त्याबद्दल काय विचार करतं हे जाणून घेणं दिवाळी अंक काढणार्‍यांच्या दृष्टीनं मोलाचं आहे; हे आता दुसर्‍या बाजूला पाय ठेवल्यानंतर मला पक्कं ठाऊक आहे.


***


अंक पहिला: मौज

IMG_20151126_134103_HDR.jpg


‘मौजे’च्या अंकातला सगळ्यांत लक्षणीय विभाग आहे शहरांबद्दलचा. इंट्रेष्टिंग लेख आणि दिवाळी अंकात सहसा न दिसणारी नावं.


ठाण्याच्या गडकरी रंगायतनचे वास्तुरचनाकार (आर्किटेक्ट) असलेले आनंद पंडित – त्यांनी या विभागात लिहिलं आहे. राजकीय आणि प्रशासनिक हस्तक्षेपामुळे वास्तुरचनाकाराचे हात कसे बांधले जातात ते त्यांच्या लेखात दिसतं.


यान गेलच्या पुस्तकाचं भाषांतर करणार्‍या सुलक्षणा महाजन या विभागात दिसल्या नसत्या, तरच मला आश्चर्य वाटलं असतं. मुंबई शहराच्या जिवंत, दिवसेंदिवस गढूळ होत चाललेल्या आणि तरीही बदलाच्या आशेवर जीव धरून असलेल्या रूपाबद्दल त्यांनी लिहिलं आहे. पण त्यांच्या भाषांतरित पुस्तकामुळे असेल – माझ्या त्यांच्या लेखाकडून असलेल्या अपेक्षा थोड्या जास्त होत्या. त्या अपेक्षांच्या मानानं मला त्या स्मरणरंजनातच रमलेल्या वाटल्या. माझ्या अपेक्षाही अतिरेकी असतील कदाचित.


प्रियदर्शिनी कर्वेंचा लेख सुरू होतानाच फार वेळ लागतो. कितीतरी वेळ त्या उत्क्रांती आणि नागरीकरणाचे टप्पे सांगण्यातच दवडतात. माहितीय हो, मुद्द्यावर या... असं होऊन जातं. पण चिकाटी बाळगली, तर पुढे मात्र तो इंट्रेष्टिंग आहे. शहररचनाकारांचा आणि विकासकांचा (आणि पर्यायानं लोकांचा नि लोकप्रतिनिधींचा) दृष्टीकोन कसा असायला हवा नि तो वास्तवात कसा आहे – याकडे त्यांचा लेख लक्ष वेधतो. पैसा, पैशाचं उत्पादकतेशी असलेलं न-नातं आणि शहरीकरणाच्या मिषानं अधिकाधिक ओरबाडशील होत गेलेली आपली पैसाकेंद्रित संस्कृती, यांचा ऊहापोह त्यात आहे.


सचिन कुंडलकरांचा लेख त्यांच्या सध्याच्या लेखनाच्या सुराला धरून आहे. मला शहरं आवडतात, मला बाजाराने दिलेले पर्याय आवडतात, मला तंत्रज्ञान आवडतं, मला वेगवान बदल आणि शहरांनी दिलेला व्यक्तिगत अवकाश आवडतो... अशी प्रामाणिक आणि रोखठोक विधानं त्यांच्याकडून अपेक्षितच. एका प्रकारे ’खेड्याकडे चला-शहरांना गिल्ट द्या’ या पारंपरिक आचरटपणाचा धिक्कार करणं हा एकमात्र कार्यक्रम त्यात असल्यासारखा भासतो. हेच काही वर्षांपूर्वी मला कमालीचं भारी वाटलं असतं – किंबहुना तेव्हा त्यात तो ताजेपणा, प्रामाणिक बंड होतं असं अजूनही वाटतं. पण आता त्यात तोचतोचपणा जाणवतो. चंगळवादाची-बाजाराची दुसरी, कमालीची अन्यायकारक-हिंस्र बाजू या माणसाला जाणवत नसेल का, असा प्रश्न पडतो. ‘राजवाडे ऍण्ड सन्स’ या त्यांच्या ताज्या-रंगारंग-ब्रॅंडपुरस्कारी सिनेमाच्या पार्श्वभूमीवर तर फारच.


सगळं जगच शहरी होईल, अशी भविष्यवाणी वर्तवणारा साधूंचा लेखही या विभागात आहे.


पण मला सर्वांत जास्त आवडली, ती अमोल दिघे या संशोधकाची सुलक्षणा महाजन यांनी घेतलेली मुलाखत. विद्यापीठं आणि विज्ञानाधारित संशोधन संस्था शहरांमध्ये का वाढताना दिसतात, त्यांचे त्या त्या शहरांशी संबंध कसे असतात, त्यांच्यात कोणत्या प्रकारची देवाणघेवाण होते, परदेशांत हे नातं कोणत्या प्रकारचं आहे (विद्यापीठांभोवती जन्मणारी नि त्यांच्याधारे जगणारी मध्यम शहरं), देशात याबाबत कोणता ट्रेंड दिसतो (मध्यम शहरांची गती आणि पैस विद्यापीठांना मानवणं आणि विज्ञान-तंत्रज्ञान-संशोधनाकडे अशाच प्रकारच्या मध्यम शहरांतून विद्यार्थी येणं)... अशी वेगळीच चर्चा त्यात आहे.


बाकी नावं (आणि लेखनही) अपेक्षित म्हणावीत अशीच आहेत. प्रभाकर कोलते, भारत सासणे, अनिल अवचट, मोनिका गजेंद्रगडकर, सुबोध जावडेकर, निळू दामले, विजय कुवळेकर, गोविंद तळवलकर, विजय पाडळकर.... वगैरे वगैरे. विनया जंगले (जंगली प्राणी) आणि अश्विन पुंडलिक (भूगर्भशास्त्र) ही गेल्या दोनेक वर्षांतली ताजी भर. ‘तेंडुलकरांना भेटताना...’ प्रकारातला (आणखी एक) लेख (श्रीनिवास कुलकर्णी) या अंकात आहे. आता तेंडुलकर जाऊनही काही काळ लोटल्यावर या प्रकारच्या स्मरणरंजक लेखनाची कास ‘मौजे’नं धरलेली दिसावी, हा तपशील बोलका आहे. सतीश तांब्यांची कथा ‘मौजे’त दिसणं हा मात्र थोडा आश्चर्याचा भाग! आता तांबे प्रस्थापित (आणि अपेक्षित – प्रेडिक्टेबल अशा अर्थी) कथाकार झालेत की काय, असा एक खवचट विचार मनात येऊन गेला.


‘मौजे’चा कविता विभाग दणदणीत असतो. पण त्याबद्दल काही म्हणायला वेळ लागेल. कविता सावकाशीनं पोचत राहतात.


तीव्रतेनं जाणवलेली आणि एक गोष्ट म्हणजे बर्‍याच दिवाळी अंकांनी चर्चिलेली असहिष्णुता, पुरस्कारवापसी, देशातलं वातावरण यांबद्दल ‘मौज’ मौन बाळगून आहे. प्रस्तावनेत केलेले निसटते उल्लेख सोडले, तर या असंतोषाबद्दल काहीही विधान नाही. मोदींच्या स्मार्ट शहरांविषयीच्या घोषणेचा उल्लेख मात्र आहे - शहरांविषयीच्या विभागाची प्रस्तावना करताना.


सगळ्यांत धक्कादायक, दु:खद भाग म्हणजे मौजे’त चक्क प्रमाणलेखनाच्या सरसकट चुका आहेत. (‘मौजे’त प्रमाणलेखनाच्या चुका??? ‘मौजे’त प्रमाणलेखनाच्या चुका!!!!... असे वाचावे.) ‘र’चे र्‍हस्वदीर्घ उकार उलटेपालटे असणं, ‘उ’हापोह, ‘दि’ड असल्या चुका, ‘सुद्धा’सारखी शब्दयोगी अव्ययं सुटी लिहिलेली असणं... ही अगदी सहज, वरवर पाहता दिसलेली उदाहरणं. प्रमाणलेखनाला एका मर्यादेपलीकडे फार महत्त्व न देणार्‍या, क्वचित भूमिका म्हणून त्याची मोडतोडही करणार्‍या ‘अक्षर’मध्ये हे फार खटकलं नसतं. पण ‘मौजे’त... असो. असो.


तळटीप: अजूनही काही गोष्टी वाचायच्या शिल्लक आहेत. काही वाचूनही त्यावर म्हणायसारखं काही नाही. हा आढावा समग्र नाही-नसेल, त्यात गरज लागेल तसतशी भर पडत राहील, हे ध्यानी असू द्या.

Wednesday 4 November 2015

रेषेवरची अक्षरे, वर्ष आठवे, अंक सहावा, दिवाळी २०१५

शुभ दीपावली!

... तर तीन वर्षांनंतर 'रेषेवरची अक्षरे'चा एक नवा अंक पुन्हा एकदा तुमच्यासमोर ठेवत आहोत. नोंदी गेल्या तीन वर्षांतल्या अाहेत नि फोरम्सही अाहेत यंदा, त्यामुळे अंक जरा नेहमीपेक्षा ऐसपैस झाला अाहे...

अनुक्रमणिकेतले काही विभागच अपडेट झालेले दिसतील, काहींच्या लिंका अजुनी अपडेट व्हायच्या असतील. दचकू नका. ही उ०सं०डु० नव्हे! यंदा आजपासून येत्या वीकान्तापर्यंत टप्प्याटप्प्यानं अंक प्रकाशित करतो आहोत. आज फक्त कथा आणि कविता प्रकाशित केल्या आहेत... वीकान्ताला पुरा अंक - होय, पीडीएफसकट - तुमच्या हातात असेल. वाचा आणि 'रेषेवरची अक्षरे'चं हे नवं रुपडं कसं वाटलं ते जरूर कळवा. सूचना, सुचवण्या, दाद आणि प्रश्न... सगळ्याचं 'दिल खोल के' स्वागत आहे.

सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. :)

ज्यांच्या दिवाळीवर दुर्दैवाने दुष्काळाचं सावट अाहे त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर देऊ या अाणि ही दिवाळी संयतपणे साजरी करू या.

इथे अंकाची अनुक्रमणिका पाहता येईल.

आणि हे मुखपृष्ठ :


पुन्हा एकदा, हॅप्पी दिवाळी!

Saturday 10 October 2015

ट्रॅफीक

दोन रस्ते एकमेकांना येऊन मिळतात, 
तिथेच होतो भारीपैकी ट्रॅफीक

फार वर्दळ नसते सुरुवातीला
गजबजती गर्दी तर सोडाच, टोळभैरवही फिरकत नाहीत नाक्याकडे
उगाच एखादं जीव धरून राहिलेलं पिंपळाचं रोपटं
नि गंभीर होऊन गुलुगुलु बोलणारी एखादी अल्पवयीन फ्रेण्डशिप

फ्रेण्डशिप जीव धरू लागते
तसतसा नाकाही जीवही धरू लागतो
एखादी टपोरी पानाची टपरी
मोबाइल रिचार्ज मारणारा एखादा मल्टिपर्पज वाणी
नि गणपत वाण्याचे वारसदार असलेले काही फुटकळ रिक्षावाले

फ्रेण्डशिप हळूहळू सरकू लागते आतल्या गल्लीच्या लपलेल्या तोंडाकडे
तसतसे रस्ते रंगात येतात, सैलावतात
अंग ऐसपैस पसरून एकमेकांना टाळ्या देतात
तेव्हा उगवू लागतो आसमंतात ट्रॅफीक नावाचा प्राणी

चाहूल लागत नाही त्याची तशी
मांजरपावलांनी वाढू लागलेले हॉर्न्स
शाळांच्या नि हापिसाच्या वेळांना उसळणारा नि एरवी गायब होणारा जादुई धूर
कडेकडेनं नजर चुकवून उगवू लागलेली बकाली
जीव धरून राहू लागलेली एखादी भिकारीण
कचकड्याची खेळणी नि थडग्यावरची फुलं विकणारी कळकटलेली स्मार्ट पोरं

चाहूल लागते तेव्हा 
रस्त्यांच्या दोस्तीचं सर्पयुगुल होऊन बसलेलं असतं
आपल्याच मस्तीत प्रणयात चूर होऊन गेलेलं...

मग होतात मागोमाग काही अपघात
येतात ट्रॅफीक सिग्नल्स 
निऑन साइन्स
नि पाठोपाठ रस्ते वितात
एखाद्या फ्लायओव्हरलाही जन्म देतात

त्यांच्यातलं नातं, 
वर्णनाच्याच काय, 
लग्नसंस्थेच्याही परीघाच्या पलीकडे जाऊन पोचलेलं
ट्रॅफीक मात्र होतच राहतो
भारीपैकी.

Monday 28 September 2015

टप्पा

दर थोड्या वर्षांनी असा एक टप्पा येतो, जेव्हा पुस्तकं, माहिती, माणसं, घटना आणि आपण यांच्यातले संबंध एखाद्या गजबजलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यासारखे किंवा सकाळी साडेनवाच्या सुमारास वाहणार्‍या दादर स्टेशनमधल्या मिडल ब्रिजसारखे असतात. चहू बाजूंनी अंगावर गोष्टी आदळत असतात. आपण दोन्ही हातांनी, पायांनी, डोळ्यांनी, तोंडानं, कानांनी, मेंदूनं - सगळ्या शरीरामनासकट - गोष्टी परतवत-स्वीकारत-शोषत-परावर्तित करत असतो. बाहेरून पाहणार्‍याची नजर एखाद्या पाश्चात्त्य जगातल्या निरीक्षकानं भारतीय केऑसकडे पाहावी तशी. ’इट रिअली फंक्शन्स!’ अशा आश्चर्यासह विस्फारलेली. वरकरणी दिसणार्‍या बेशिस्तीनं भांबावलेली.

पण आपण बेखबर.

आपल्यात आणि जगात एक धुंदावणारी लय सांधलेली असते. कप्पेकरण आणि चर्वितचर्वण आणि प्रक्रिया आणि मतनिश्चिती यांसारख्या रवंथ करण्याजोग्या, श्वास टाकून-मागे रेलून शांतपणे करण्याच्या गोष्टी मुकाट मागे ओळ करून संथ झुलत उभ्या असतात. रंगमंचाच्या पुढच्या भागात मात्र लयबद्ध वेगवान हालचाल आकारत असते.

या टप्प्यात मजेमजेशीर गोष्टी घडतात. दीर्घकालीन आणि जवळचे मित्र मिळून जातात. अगदी जिवाजवळचे नाही - पण जवळचे म्हणता यावेत असे, आणि ज्यांना दीर्घ काळानंतर भेटल्यावरही आपला चेहरा उगाच उजळून निघतो असेही मित्र याच काळात भेटत जातात. पुढच्या निवांत काळासाठी आठवणींची बेगमी होण्याचा हा टप्पा. या काळात एखादा तरी नवा विक्षिप्त छंद जडतो. त्याच्या काठाकाठानं काही मुलखावेगळ्या गोष्टी डोक्यात साचून येतात. खास आपली म्हणावी अशी एखादी आचरट आणि क्रिएटिव थेरी जन्माला येते. एरवीचे छंद आणि दिनक्रम आणि व्यवस्था गप बॅकफूटला जातात आणि नव्या बाहुल्यांसाठी भातुकलीत आपसुख जागा तयार होत जाते. यातच एक लखलखतं तीव्र प्रेमप्रकरण घडतं हे सांगायला नकोच. या काळात ऐकलेल्या सगळ्या गाण्यांची, पाहिलेल्या सिनेमे-नाटकं-सिर्यलींची, वाचलेल्या पुस्तकांची आणि लिहिलेल्या सुरस गोष्टी-कवितांची गुंफणी या प्रेमाच्या माणसाभोवती होते आणि हे गोफ आपल्या माइन्ड पॅलेसच्या तळघरात सुखरूप रवाना होतात. या सगळ्या गोष्टींना त्या त्या काळाचा आणि माणसांचा एक विवक्षित तीव्र गंध असतो. पुढे जेव्हा कधी तळघरात शिरणं होतं, तेव्हा तो गंध क्षणार्धात आपल्याला ऍपरेट करतो आणि अल्लाद त्या दिवसांत नेऊन सोडतो...

हा टप्पा ओसरत जातो, तो वाजत गाजत नव्हे. मुंबईतला पाऊस जसा टप्प्याटप्प्यानं आणि माघारीची चाहूल लागू न देता, कुशल राजकारणी माघार घेत अंतर्धान पावतो, तसाच हा टप्पा काढता पाय घेतो. करण्याजोगी असंख्य कामं नाहीत, कुणाला ’नाही’ म्हणायमधली पंचाईत भेडसावत नाही आणि आजूबाजूला थबक-थबक साचलेलं रूटिन असूनही आपल्याला फारसा कंटाळाही येत नाही हे जाणवतं, तोवर आपण चक्क नियमितपणे व्यायामही करायला लागलेले असतो आणि जागरणं टाळायलाही. मग फिल्मी पद्धतीत मागेबिगे वळूनबिळून पाहताना ’आपण असे वागलो?’ असा एक नवाच कौतुकमिश्रित अचंबा दाटत राहतो आणि आपण पुन्हा थोडेथोडे बनचुके-शिस्तबद्ध-शिष्टाचारी आणि सभ्यबिभ्य होत वाट काटत राहतो.

पुढच्या वळणावर कुणीतरी ’भॉ’ करीलच अशा सुप्त लबाड अपेक्षेसकट.

बादवे, शास्त्रीय संगीतात टप्प्याचं वर्णन कसं करतात ठाऊके? ’टप्पा की विशेषता है इसमें लिए जानेवाले ऊर्जावान तान और असमान लयबद्ध लहज़े...’ द्या टाळी!

Sunday 19 July 2015

कोरा कागद निळी शाई!


हुंकारभुता बोल काही
अळीमिळी सोडून देई
इतके सारे बोललो तरी
घरभर उरून राही –

       कोरा कागद निळी शाई!

कागदाच्या चल होड्या करू
तो बघ झाला पाऊस सुरू
दिवस गेला लिखा-पढी
सोड की रे अढी-बिढी –

       चल आता मडके भरू!

"कसली अढी कसले काय,
फक्त थोडा रुसलो हाय!"
सगळा धडा पाठ आहे
मान माझी ताठ आहे –

       पण गाण्याचा शेवट नाय?

"ताठ मान हवी खरी
पण आता पुरे तिरीमिरी
म्हणतो राती परतीन घरी
मानगुटीवर बसलेय गाणे -

       गाण्याशिवाय भागणार नाय!"

तेच तर!

हुंकारभुता गाऊ काही
अळीमिळी सोडून देई
नको कागद नको शाई
कोरा कागद निळी शाई? 

       नक्को कागद नक्को शाई!
      


Tuesday 7 July 2015

परत रेषेवरची अक्षरे

२०१२ मधे 'रेषेवरची अक्षरे'चा शेवटचा अंक काढला तेव्हा ब्लॉगवरचं चांगलं लिखाण आटत चाललंय याचं दुःख तर होतंच. पण तो अंक करताना होणारी ई-पत्रांची देवाणघेवाणचर्चावादविवाद, गॉसिप्स आणि भंकसउलगडत जाणारे नवनवीन ब्लॉग्स... हे सारं संपणार याची खंतही होती.

मधल्या काळात आम्ही ब्लॉग सोडून थोडे थोडे बाहेरख्याली झालो. फोरम्सवर डोकावलो. फेसबुकावर उंडारलो. पोटापाण्यात रमलो. लिहिण्यावाचण्याशी अपराधीपणाचे, मैतरकीचे आणि घरपरतीचे खेळ आलटून पालटून खेळलो. 'रेरे'च्या अंकाबद्दल लोकांनी विचारणा केल्यावर थोडे गडबडलो, शरमलो आणि सुखावलो. 

दरम्यानच्या काळात काही ताजे लेखक आलेकाही जुन्या लेखकांच्या शब्दांना परत धार चढलीबऱ्याच गोष्टींचे संदर्भ बदलले आणि नव्या अर्थाचे शब्दही उगवले. आमची उत्सुकता नव्याने जागी झाली. गेल्या तीन वर्षात मराठी ब्लॉग विश्वात नक्की काय काय झालं याचे हिशेब मांडायला आम्ही चित्रगुप्ताच्या तत्परतेनं पुन्हा सज्ज झालो. 

'रेषेवरची अक्षरेया दिवाळीत पुन्हा येतो आहे!

आम्ही ब्लॉग्सची यादी बनवायला सुरुवात केली आहेच. पण तुमच्या वाचनात काही नवीन चांगले ब्लॉग्स आले असतील, तर ते आम्हांला 'resh.akashare@gmail.com' या पत्त्यावर जरूर कळवा. इंटरनेटचं आभासी विश्व प्रचंडच आहे आणि म्हणूनच 'साथी हाथ बढाना'चं हे एक प्रांजळ आवाहन. 

बाकी, यंदा भेटत राहूच!

Wednesday 3 June 2015

काय करता! (उर्फ मातृभाषा आणि काही गट)

मातृभाषेबद्दल आस्था असलेल्या माझ्यासारख्या लोकांना एकाच वेळी अनेक निरनिराळ्या आघाड्यांवर झगडावं लागतं.

अ] अतिविशाल गट
एकीकडे नवश्रीमंत, मराठीबद्दल तुच्छता/न्यूनगंड बाळगणारे, अर्धवट आंग्लाळलेले, नवश्रीमंत लोक. या गटातले लोक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालतात. वटपौर्णिमेच्या जोडीनं करवा चौथही साजरा करतात नि ’छान दिसतं’ म्हणून ’मांगमें सिंदूर’ भरतात. शक्यतो लोकांकडून मागून किंवा पायरेटेड कॉपीजमधून पुलं, वपु, मृत्युंजय, स्वामी, सिडने शेल्डन, चेतन भगत वाचतात. प्रशांत दामलेची नि हल्ली ’हर्बेरियम’मधली मराठी नाटकं बघतात. चर्चाबिर्चांबद्दल यांना पोटातून भीती कम तिरस्कार असतो, पण हे तसं उघडपणे म्हणू धजत नाहीत. या गटाला आपण अतिविशाल गट म्हणू.

आ] डांबरीकरण गट
दुसरीकडे प्रश्नांचं घातक सुलभीकरण करणारे, न्यूनगंडातून येणारा उद्धटपणा बाळगणारे, दस्तावेजीकरण-संशोधन-अभ्यास यांची गरजच काय, असा प्रश्न विचारणारे लोक. यांच्यातल्या बहुसंख्यांच्या ’ण’ नि ’न’च्या वापराबद्दल नाक मुरडण्याची प्रथा ’अ.वि.’ गटात आहे. (पण ’न’ नि ’ण’चा तथाकथित थारेपालट ही काही या गटात असण्याची पूर्वअट नाही). यांची मुलं तूर्तास इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नसतात. पण पहिलीपासून इंग्रजी सुरू झाल्यानंतर हेच लोक सर्वाधिक सुखावलेले असतात. ’मराठी माणूसच मराठी माणसाचा पाय ओढतो’ अशी तक्रार हे जगातल्या कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरादाखल करू शकतात. दीर्घकालीन, वास्तवादी आणि किचकट उत्तरं यांना सहन होत नाहीत. त्यावर ते हमखास बिथरतात. या गटाला आपण डांबरीकरण गट म्हणू.

इ] चर्चील गट
तिसरीकडे निष्क्रिय, उदासीन, स्थितिवादी, इंटुक लोक. यांना संस्कृत, इंग्रजी किंवा युरोपियन भाषा यांपैकी एका तरी भाषेबद्दल मातृभाषेपेक्षाही जास्त प्रेम असतं. हे सहसा फिल्मफेस्टिवल्समधून किंवा प्रायोगिक नाटकांना भेटतात. काहीही लोकप्रिय झालं की ते वाईट, निकस असणारच, असा यांचा ठाम विश्वास असतो. यांचीही मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांत असतात. पण ’त्याबरोबर आम्ही त्यांना उत्तमोत्तम मराठी साहित्याची ओळख करून देतो’ असं पालुपद जोडायला ते विसरत नाहीत. ’ष’चा अचूक उच्चार; चीज, वाईन, मोदक अशी अभूतपूर्व रेंज असलेल्या पदार्थांतली जाणकारी; गर्दीबद्दल कमाल तुच्छता नि तिरस्कार; ग्रेसबद्दल भक्तीच्या पातळीवरचं प्रेम; न कंटाळता कितीही चर्चा ही यांची खास लक्षणं. या गटाला आपण चर्चील गट म्हणू.

काही पोटगटही असतात. ’मरू दे ना च्यायला, आपल्याला काय करायचंय?’ हे घोषवाक्य असणारा ’आपल्याला काये’ गट; मराठीबद्दल प्रामाणिक, निरागस, घोर अज्ञान असणारा, फक्त क्रियापद तेवढं मराठी वापरून बोलणारा ’पत्र नव्हे मित्र’ गट; ’विलायती शब्दांचं आक्रमण होता कामा नये’ असा अभिनिवेश बाळगून ’मोबाइल नाही, भ्रमणध्वनी म्हणा’ असा हट्ट धरून बसणारा ’सावरकर बुद्रुक’ गट...

माझ्यासारख्या लोकांना वेळ बघून या सगळ्या आघाड्यांवर दोन हात करावे लागतात. कधी एका गटाला पाठीवर घेतलं, तर दुसर्‍याच्या तात्कालिक आश्रयाला जावं लागतं. कधी एकाला सहानुभूती दर्शवली, तर दुसर्‍याला ठेचावं लागतं. कधी सगळ्यांनाच थोडं चुचकारावं लागतं. कधी सगळ्यांना एकाच वेळी अंगावर - शिंगावर घ्यावं लागतं. कुणाशीच कायमस्वरूपी पातिव्रत्य ठेवून चालत नाही. कुणाशीच हाडवैर घेण्यात रस नसतो.

कारण शेवटी हे सगळे लोक तोंडानं काहीही बरळत असोत, शेवटी बोलतात माझ्याच भाषेत - मराठीत. काय करता!
***
(हा लेख पूर्वप्रकाशित आहे. पण ब्लॉगवर आणून टाकायचा राहून गेला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गटनावं डॉ. विवेक बेळे यांच्या नाटकांमधल्या थोर आणि आचरट नावांवरून सुचलेली आहेत.)

Sunday 31 May 2015

"रानी कुठून आलो? गाऊन काय गेलो?"

आज भारांचा  १०५ वा वाढदिवस. ’ऐसी अक्षरे’ या संस्थळावरच्या मित्रांसोबत ’भा. रा. भागवत विशेषांक’ नामक एक मोठा उपक्रम पार पाडला आणि भारांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून प्रकाशित केला. त्याच्या समारोपाची ही नोंद.

अंक जरूर वाचा. एकमेकांना पाठवा. प्रतिक्रिया नोंदवा. नेहमीप्रमाणे सूचनांचं स्वागतच आहे!

हॅप्पी बड्डे, भारा!

***


चित्र: जालावरून साभार
***

खरे तर ऋणनिर्देश करून झाला आहे. मग हे प्रकटन लिहिण्याचे प्रयोजन काय? प्रश्न रास्त आहे.
त्याचे असे आहे, ऋणनिर्देशाचे उपचार कितीही आवश्यक असले, तरी मनात भरून आलेली कृतज्ञतेची - स्नेहाची भावना त्या उपचारातून पुरती व्यक्त होतेच असे नाही. दिव्याला निरोप दिल्यानंतरही त्याची शांत आभा मनात रेंगाळत राहावी, तशी कृतज्ञतेची भावना मनात अजून आहे. ती व्यक्त करण्यासाठी हे प्रकटन.
निरनिराळ्या क्षेत्रांत कामे करणारी वा शाळा-कॉलेजांत शिकणारी, नुकतीच मिसरुडे फुटलेली वा बॉबकट केलेली, लहानमोठी सगळी माणसे काही निमित्ताने घरात जमावीत; वाद-संवाद, गप्पाटप्पा व्हाव्यात; क्वचित थोडी गरमागरमी व्हावी... आवाज चिरडीला यावेत; दबक्या संतापाचे स्फोट व्हावेत आणि पुन्हा कुणी समजुतीने जुळवून घ्यावे; पण भरलेल्या घराला कुटुंबाची एकतानता येऊ नये, असे अनेकदा होते. पण क्वचित कधी, एखाद्या नशीबवान निवांत दुपारी आजोबांची एखादी ठेवणीतली आठवण निघते आणि सारे वाद हळूहळू ओसरतात. घरभर विखुरलेली माणसे नकळत झोपाळ्याभोवती जमतात. बोलण्यात ओलसरपणा येत जातो. आजोबांच्या एखाद्या विशेष किश्शाची उजळणी होते. हसू फुटते. कुणीतरी थोडे हळवे होते, डोळ्यांतून पाणी काढते. त्या हळवेपणाची हलकीशी थट्टाही होते आणि "आजोबा असते, तर म्हणालेस्ते..." अशी सुरुवात करून पुन्हा हशाचा गदारोळ उठतो. काही मंतरलेल्या क्षणांसाठी तरी घर कसल्याशा चिवट धाग्याने घट्ट बांधले जाते...
असे गेला आठवडाभर झाले.
पण गेला आठवडाभरच का? खरे तर भा. रा. भागवत या लेखकाबद्दल असा काहीतरी प्रकल्प करावा, असा बूट निघाल्यापासून जवळपास गेले वर्षभर हे असे पुन्हा पुन्हा होते आहे. पुन्हा पुन्हा होत राहील, असे आश्वासन मिळते आहे. मराठी शब्दावर प्रेम करणाऱ्या अनेक पिढ्यांच्या अनेक वाचकांसाठी या आजोबाने असे एक घर कायमचे बांधून ठेवले आहे, याची जाणीव होते आहे.
या प्रकल्पाची कल्पना वर्षभरापूर्वी सुचली. सलिल बडोदेकर हा एक मित्र आणि मी यांच्यात गप्पा चालल्या होत्या. भागवतांची कितीतरी जुनी, आता कुठे न मिळणारी पुस्तके त्याच्याकडे आहेत. त्याबद्दलचे बोलणे चालले होते. त्यांतली त्यांची अस्सल मराठी भाषा, फ्रेंचांपासून इंग्रजांपर्यंत आणि विज्ञानापासून फॅन्टसीपर्यंत अनेक विषयांना स्पर्श करणारा त्यांचा विषयांचा आवाका, बालसाहित्याचा ध्यास घेतल्याप्रमाणे अखेरपर्यंत केलेले लेखन, प्रसंगी पदराला खार लावून राबवलेले बालसन्मुख उपक्रम, या सगळ्या कारकिर्दीत टिकून राहिलेला प्रसन्न-ताजा-टवटवीत विनोद आणि सर्वज्ञतेच्या अभिनिवेशाचा संपूर्ण अभाव… या साऱ्या गोष्टी आम्ही पुन्हा पुन्हा एकमेकांना बोलून दाखवत होतो. त्यांची सगळी पुस्तके जमवण्याचे बेत रचत होतो. पण बोलता बोलता असे लक्षात आले, की पुस्तके जमवण्यासाठी संदर्भ म्हणून पाहता येईल अशी साधी समग्र साहित्याची सूचीही भागवतांच्या बाबतीत उपलब्ध नाही. त्यांच्या निवडक लेखनाचे संकलन असलेले 'भाराभर गवत' हे पुस्तकही आता कुठे मिळत नाही. इतरही अनेक पुस्तके काळाच्या ओघात लुप्त झाली आहेत.
ही माहिती शोधण्याचे निमित्त झाले. त्यांच्या जाण्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणारा एखादा जाहीर उपक्रम कुठेतरी केला गेला असेलच, अशी खातरी होती. त्या उपक्रमाशी संबंधित लोकांना भेटले वा तत्संबंधी साहित्य मिळवले म्हणजे झाले; मग आपल्याला हवी ती माहिती मिळेलच. पुढे पुस्तके जमवणे सोपे आहे, इतके साधे गणित मनाशी होते. पण आश्चर्य म्हणजे वर्तमानपत्रातील पुरवण्यांमधून प्रकाशित झालेले काही मोजके, प्रासंगिक लेख सोडले; तर मराठीतल्या भावी साहित्यव्यवहारासाठी वाचकांच्या काही पिढ्या घडवणाऱ्या या महत्त्वाच्या लेखकासाठी असा कोणताही उपक्रम झालेला नाही, हे लक्षात आले, तेव्हा काही काळ आम्ही हळहळलो. नेहमीप्रमाणे आपल्या कृतघ्नतेबद्दल कुरकुर केली, 'आपल्याच्याने काही व्हायचे नाही' अशी नकारात्मक खंत व्यक्त केली, आणि ते बोलणे तिथेच संपले.
पण विषय मनातून गेला नाही. आता आंतरजालीय मैत्र्यांच्या या दिवसांत समान रसविषय असणारी मैत्रे मिळणे तितकेसे अवघड उरलेले नाही. पुस्तके, वाचन आणि साहित्य या आवडीच्या विषयावर बोलणारी अनेक मंडळी जालावरून एकमेकांशी घट्ट जोडलेली असतात, एकमेकांना तत्परतेने संदर्भ आणि साहित्यही पुरवत असतात. अशा मित्रांच्या गोतावळ्यातही हा विषय पुन्हा पुन्हा डोके वर काढत राहिला. लोक आपली कृतज्ञता व्यक्त करत राहिले, भागवतांच्या अनेक पात्रांच्या आठवणी प्रेमाने नोंदत राहिले. तेव्हा 'असा उपक्रम आपणच का करू नये?' अशा महत्त्वाकांक्षी विचाराने मनात मूळ धरले.
तो भीत भीत बोलून दाखवला मात्र - खूप जणांकडून खूप प्रोत्साहन देणारे अनेक प्रतिसाद मिळाले. मदत करण्याची इच्छा दर्शवली गेली. अमुक, आदूबाळ, ऋषिकेश, स्नेहल नागोरी, अस्वल, गवि, केतकी आकडे, अमृतवल्ली, विनीत बेरी, सलिल बडोदेकर - असे अनेक मित्र या प्रकल्पात सामील झाले; ते याच टप्प्यावर. मूळ कल्पना २०१४ च्या दिवाळी अंकाच्या एका कोपऱ्यात असा प्रकल्प करण्याची होती. पण भारांच्या कामाचा एकूण आवाका लक्षात घेता 'ऐसी अक्षरे'च्या संपादकांनी आम्हांला एका आख्ख्या अंकाचे संपादकपदच देऊ केले. मग इमेलींच्या माळका लागल्या. फेसबुकावरच्या ओळखी निघाल्या. व्हॉट्सॅपवर चमू घडले. कुणी एकमेकांना पुस्तके पोचती केली, कुणी जिवावर उदार होऊन एकमेकांना पुस्तके उधार दिली. कुणी नव्याने बाजार धुंडाळून जुन्या पुस्तकांच्या प्रती हुडकल्या, कुणी दुर्मीळ पुस्तकांच्या प्रती काढून वाटल्या. कुणी संदर्भ शोधून दिले. कुणी संपर्क शोधून दिले. कुणी भाषांतरे केली. कुणी चित्रे काढली. कुणी कामे वेळेवर व्हावीत म्हणून स्वतःकडे वाईटपणा घेऊन लोकांमागे कामाचे लकडे लावले. कुणी फुरसुंगी-पुण्यात भ्रमंती केली. कुणी आपल्या चुलत-चुलत मित्रांना या प्रकल्पात हक्काने ओढले. कुणी जाऊन मुलाखती घेतल्या. कुणी फोटो काढले. कुणी शब्दांकने केली. कुणी मोठाल्या फायली टंकनासाठी बिनबोभाट आपापसांत वाटून घेतल्या. कुणी आपली महत्त्वाची कामे बाजूला सारली आणि ऐन वेळेला लेख लिहून दिले. कुणी केलेले काम काही तांत्रिक कारणांमुळे फुकट गेले, पण त्याबद्दल जराही कडवटपणा न आणता लोक मन:पूत मदत करतच राहिले.
तेजस मोडक आणि प्रसन्न धांदरफळे या दोघांनी इतका अनौपचारिक आणि संकोच विरघळवून टाकणारा उत्साही प्रतिसाद दिला, की आपण करू घातले आहे, ते अगदी योग्य आणि आवश्यकच आहे, अशी खातरी पटली. आदूबाळाच्या ओळखीने सौ. नीला धडफळे यांच्याकडून संदर्भसूची मिळाली. त्यांची तब्बेत फारशी बरी नसतानाही आम्हांला मदत करण्याचा त्यांचा उत्साह आमच्या निश्चयाला बळ देणाराच होता. पुढच्या टप्प्यात इतरही अनेक मंडळी 'भारा'वलेल्या आमच्या चमूत येत राहिली.
फॅनफिक्शन हा खरे म्हणजे माझ्या विशेष आवडीचा प्रांत. पण फास्टर फेणेवर फॅनफिक लिहिण्याची कल्पना आदूबाळ याची. ती त्याला सुचावी आणि मला सुचू नये, यामुळे काही काळ मी स्वत:चा राग-राग केला. पण कुठवर? थेट भागवतांच्या शैलीत लिहिलेली त्याची झकास फॅनफिक वाचेस्तोवरच! पुढे त्या कथेबद्दल वाटणाऱ्या कौतुकात माझी स्वार्थी खंत कुठल्या कुठे वाहून गेली!
या अंकाची प्रसिद्धी परिणामकारकपणे करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी प्रश्नमंजूषा आणि लेखनस्पर्धा घेण्याची अफलातून कल्पना ऋषिकेशची होती. त्याचे सगळे बाळंतपण त्यानेच केले. त्यात आदूबाळाच्या मित्राची - विनीत बेरी याचीही - मदत झाली. या स्पर्धेत विजयी झालेल्या सदस्यांचे अभिनंदन करण्याची संधी इथे घेतो आहोत.
'ऐसी अक्षरे'चे सगळेच संपादक मंंडळ या काळात सर्वतोपरी मदत पुरवत होते. टंकनापासून ते तांत्रिक मदतीपर्यंत आणि आर्थिक मदतीपासून संपर्क मिळवून देण्यापर्यंत सगळ्या प्रकारची कामे त्यांनी केली. नंदन होडावडेकर याने नेहमीच्या तत्परतेने मुद्रितशोधनाचे मोठेच काम केले. पण हे लोक घरचेच. त्यांचे आभार कसे बरे मानणार?
वाईरकरांच्या चित्रांनी फास्टर फेणेला जिवंत करणाऱ्या भागवतांबद्दलचा प्रकल्प आणि त्यात चित्रे नसावीत? छे! असे शक्य होते काय? अंक नुसत्या मजकुराला वाहिलेला असता कामा नये, हे तेव्हाच ठरले. आशीष पाडलेकर या एका व्यावसायिक चित्रकार मित्राला अ्मुकने साकडे घातले आणि अंकाचे देखणे मुखपृष्ठ मिळवून मोठीच बाजी मारली. एकूण अंकालाच जे देखणे, नीटस रुपडे आले आहे, त्याचे श्रेयही अमुकलाच आहे. त्याचे सुलेखन आणि रेखाटने 'ऐसी अक्षरे'च्या वाचकांना घरचीच आहेत, त्यामुळे 'घर की मुर्गी दाल बराबर' या न्यायाने त्यांचे पुरेसे कौतुक होत नाही, हे तर आहेच. पण वरवर लहानश्या भासणाऱ्या, तरी एकूण रूपावर मोठाच परिणाम करणाऱ्या अनेक बाबी न थकता तपासत राहणे, दुरुस्त करत राहणे, त्यासाठी शांतपणे लोकांकडून कामे करवून घेणे; आणि प्रकल्पाच्या एकंदर वाटचालीबद्दल दिग्दर्शन करत राहणे हे त्याच्याखेरीज इतर कुणाला साधले नसते.
जयंत नारळीकर, दिलीप प्रभावळकर, सुमीत राघवन, सुबोध जावडेकर, निरंजन घाटे, हेमंत कर्णिक, गणेश मतकरी, रघुवीर कूल… ही प्रथितयश आणि प्रसिद्ध मंडळीही भागवतांवरच्या प्रेमाखातर वेळात वेळ काढून या प्रकल्पात सामील झाली, तेव्हा भागवतांच्या पुण्याईचा चकित करून टाकणारा प्रत्यय आम्हांला आला. भागवतांच्या कुटुंबीयांचा संपर्क मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम 'उत्कर्ष' प्रकाशनाच्या सुधाकर जोशी यांनी केले. भागवतांच्या घरी जाताना मनात थोडी धाकधूक होती. कितीही मनमोकळ्या आणि ऋजू स्वभावाचे म्हटले, तरी भा. रा. भागवत एक प्रसिद्ध लेखक. आणि आम्ही कोण? आम्ही फक्त चाहते. आपला मोलाचा वेळ आणि निगुतीने जपलेले आपले संदर्भसाहित्य आम्हांला त्यांच्या कुटुंबीयांनी का बरे देऊ करावे? पण रवीन्द्र भागवत, चंदर भागवत, विद्युत भागवत आणि रेवती भागवत या चौघांनीही आमचे जे प्रेमळ स्वागत केले; त्यात आमचा बिचकलेपणा, संकोच हे कधी कसे वाऱ्यावर उडून गेले ते कळलेही नाही. त्यांनी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा आणि देऊ केलेली हृद्य छायाचित्रे या अंकाचा अतिशय मोलाचा ठेवा होऊन बसली आहेत. त्याबद्दल आभार मानण्याचा प्रयत्न केला असता विद्युतताईंनी काढलेले उद्गार हे असे - "अगं, दादांनाही तुमचा उपक्रम फार आवडला असता. त्यांचं साहित्य इतकं प्रेमानं वाचलं जातं, की ते आता एका प्रकारे तुमचं-आमचं-सगळ्यांचंच आहे. त्याबद्दल कुणी कुणाचे आभार मानायचे?"
खरेच, कुणी कुणाचे आभार मानायचे?
हे काही सर्वंकष काम नव्हे. प्रकल्पात इतर अनेक गोष्टी सामील होऊ शकल्या असत्या. त्या झाल्या नाहीत याची खंत आहेच. अनेक मान्यवरांनी या प्रकल्पाची गरज मान्य केली आणि काही कारणांनी आपल्याकडून मदत होणे शक्य नसल्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली. त्यांची, आणि प्रकल्पाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या अनेकांची, नावेही इथे घेणे शक्य नाही, हेही ठाऊक आहे. पण यापेक्षाही मोठी आहे, ती कृतज्ञतेची भावना.
हे काम भारांच्या पुण्याईखातर झाले. त्यांच्या नावाखातर हे निरनिराळ्या पिढ्यांचे, आवडीनिवडींचे, कर्तृत्वाचे आणि स्वभावांचे लोक काही काळ एकत्र आले. भारांच्या स्मरणरंजनात रंगले…
त्या साऱ्यांसह भागवत आजोबांच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त हा अंक सहर्ष सादर.
मेघना भुस्कुटे आणि 'भारा'वलेले इतर 'भागवत'जन

Thursday 23 April 2015

इकडील बाकी सर्व ठीक

चेहऱ्यावर हसू चिकटवून ठेवणं सोपं असतं.

सरावानं, अवयव असावा आपला, अशा सराईतपणे ते मोबाईलसारखं वागवता-वापरताही येतं.

माणसांमधे पाय गुंतलेला नसेल, तेव्हा तीही वाचता येतात सहज. आरपार. मग त्यांची कळ समजून, त्यांना न दुखावता, मैत्रीचे हलकेफुलके झुलते पूल बांधून, खेळकर संभाषणं फेकत आणि झेलत, आपला चेहरा हसण्याआड दडवून ठेवणं अगदी सोपं.

अडचण म्हणाल तर -

मुखवटे सरकतात त्या जोखमीच्या जिवंत क्षणी जागे राहून तुम्हांला जोखणारे लोक आजूबाजूला फारसे नाहीतच म्हणून खूश व्हावं, की दिसू द्यावी आपली निराशा आपल्यालाच क्षणभर तरी, हे ठरवता येत नाही, इतकीच.

इतकीच अडचण तूर्तास. 

इकडील बाकी सर्व ठीक. 

कळावे...