Thursday 12 September 2019

विंगेतली घरं

एखादं घर आपलं वाटायसाठी त्या घरात प्रत्यक्ष राहावं लागतं थोडंच? पुस्तकातली घरं तर बोलूनचालून कल्पनेत रंगवलेली आणि त्यामुळे काहीशी स्वप्नील, अतिरंजित असणारचपण सिनेमातली घरंती तर नजरेला स्वच्छ दिसतातनि तरी त्यांतरेंगाळणारा वास कळतोतिथे उकडत असेलकी गार वाटत असेल तेही कळतंआपल्याच घरात एका विशिष्ट वेळी पडणाऱ्या उन्हाच्या मऊ तुकड्यासारखेच तुकडे ती घरंही देऊ करतात.
असल्या घरांच्या आठवणी काढायला बसलंकी मला सगळ्यांत आधी आठवतंते गोलमालमधलं त्या बहीणभावंडांचं घर. कसं अगदी बहीणभावंडांनाच पुरेलसंअटकर मापाचं नि तरी दोघांना स्वतंत्र अवकाश देणारं घर आहे ते. त्यात राहणार्‍या माणसांच्या मापानंच बेतलेले असावेतसे पलंग नि खुर्च्या. नि शिवाय आणीबाणीच्या वेळी त्यांच्या तोतया आईचं हे थोरलं बूड घरात शिरवून देणारी स्वैपाकघराची चपखल खिडकी. आईबाप नसलेल्या त्या भावंडांना त्या घरात अजिबात एकटं-पोरकं वाटलं नसणारअशी खातरजमा ते घर नक्की करून देत असणार.
प्रतिमा कुलकर्णींच्या प्रपंचमधलं घर तसंही त्याच्या खास लोकेशनमुळे ग्लॅमरस आहे. पण त्या घराचं खासपण माझ्या दृष्टीनं त्याच्या लोकेशनमध्ये नाही. तिथे कमालीच्या प्रामाणिकपणानं घर रचून देणारी त्या मालिकेतली जिवंत-चिरंजीव पात्रं त्या घराला खासपण बहाल करून गेली आहेत. अण्णांचा झोपाळाअगदी साधासा दिवाण नि लोड-तक्क्ये असलेली माजघरवजा खोलीपेटीचे सूर मिरवणार्‍या मागीलदारच्या किंचित खासगी ओसर्‍यानाटकाच्या तालमी नि नाना रंगांच्या गप्पा रंगवू देणारे अनेक साधेसुधे-खासगी-काळोखे कोपरे नि आवार. पुढे श्रीयुत गंगाधर टिपरेमध्ये तेच घर वापरल्यामुळे त्या घराची गोडी माझ्याकरता जरा विटलीच. त्याही कारणानं ती मालिका मला पुरेशी आवडली नाही कधी. प्रपंचमधल्या घराच्या ठसठशीत व्यक्तिमत्त्वाच्या मानानं ४०५ आनंदवनमधली सोसायटी आणि तिथले ब्लॉक अगदीच सरधोपट होते.
यश चोप्रांच्या सिनेमांमधली बटबटीत परीकथीय घरं कधीच आवडली नाहीत. पण दिलवाले दुल्हनिया…’मधला तो पंजाबातला वाडा मात्र त्याला अपवाद म्हणायचा. कायम लपून प्रेम करायला गुप्त गच्च्याआपल्या माणसांना भेटायची संधी देणार्‍या ओसर्‍या नि पडव्या नि जिने नि व्हरांडेत्यांतही कुणी वडीलधारं समोर टपकलंच तर सुमडीत आडोसा घेऊ देणारे कोनाडे नि कोपरे... असं सगळं बयाजवार त्या वाड्यात असणारच. वर संध्याकाळी हुरहुरून कुणाकरता उदासबिदास व्हायचं असल्यास मोठ्ठाले कट्टे असलेल्या नि सूर्यास्त नि सूर्यफुलं नि शेतं दाखवणार्‍या हवेशीर खिडक्याही असणार. कोकणातल्या पारंपरिक नेपथ्याला सरावलेल्या मला हे पंजाबी घर नव्हाळीचं होतं नि शिवाय योग्य त्या वयात भेटलंपुढे दिलवाले...ची जादू ओसरून गेल्यावरही तो वाडा लक्ष्यात राहिला तो राहिलाच. हम दिल दे चुके सनममधल्या अतिरिक्त चांदोबाशैलीतल्या त्या गच्च्या-संपृक्त बेगडी घराची भूल मला पडली नाहीयात पुस्तकांच्या अक्षरशः चळतींमध्ये उभं राहून किस केल्यावर बाळ होईल?’ असा अडाणी प्रश्न विचारणार्‍या नंदिनीचा जितका वाटा होता, तितकाच दिलवाले...मधून आधीच आपल्याश्या वाटलेल्या त्या वाड्याचाही होताच.
तितका सुखकारक नि रोम्यांटिक नसूनही खूप आवडलेला बंगला खोसला का घोसलामधला. खरंतर त्या घरातलं सगळंच किती चिमुकलं आहे! घरातली मुलं मोठी झालीत नि त्यांना आता हे जुनं घर पुरेनासं झालं आहे हे त्या घरातल्या मंडळींच्या वावरातून स्पष्ट दिसतं. असं वाटतंया ताडमाड कार्ट्यांचे पाय इथल्या बिछान्यांतून नक्की बाहेर येत असणार नि सकाळी घाईच्या वेळी हमखास एकमेकांवर टकरी होऊन चिडचिडाटही होत असणार. शिवाय आंघोळीला नि कधी-कधी संडासलाही आधी कुणी जायचं यावरून हाणामार्‍या होतच असणार. पण तरी त्या घरात त्या वरकरणी विजोड वाटणार्‍या मंडळींना सांधणारं काहीतरी आहे खास. तिथल्या भिंतींना अमृतांजन आणि घर गळल्यामुळे आलेली नि सुकलेली बुरशी आणि जुना झालेला डिस्टेंपर आणि वर्षानुवर्षांच्या फोडण्या असा सगळा संमिश्र वास असेलपण दिल्लीतल्या थंडीत त्या घरी शिरल्यावर मस्तपैकी ऊबदारही वाटत असेल. ते घर सोडून नव्या टोलेजंग बंगल्यात जाताना सिनेमाच्या अखेरीस मंडळींना नक्की भरून आलं असणार.
अशी कितीतरी घरं. डेल्ही सिक्समधलं ते गिचडीबाज गच्च्या असलेलंकबुतरं नि लोणची नि वाळवणं नि लग्न न करता घरात थांबून राहिलेरी देखणी-अबोल आत्या असणारं घर. हम हैं राही प्यार केमधला तो साधासरळ मध्यमवर्गीय बंगला नि काचेचं छप्पर असलेली गच्चीतली बरसाती. ‘रंगीलामधलं खाली भाडेकरू नि वर मालक असणारं कनिष्ठ मध्यमवर्गीय एकांडं घर नि त्याच्या पायर्‍यांवर रात्री-बेरात्री मिली आणि मुन्नानं मारलेल्या गप्पा. बॉम्बेमधलं मुंबईतल्या जुन्याउंच छताच्या इमारतींचा छायाप्रकाश अचूक पकडणारंतावदानं-गच्चीगॅलरीचिमुकलं स्वैपाघर नि च-ह-क्क-ह चार खुंट्या नि छत असलेला लाकडी पलंग मिरवणारं मुरत गेलेलं घर...
मी ज्या बारा-पंधरा खर्‍याखुर्‍या घरांमधून बाडबिस्तरा हलवला आहेत्यांच्याइतकीच जवळचीघरासारखी झालेली ही घरं. सिनेमे नि पुस्तकं नि नाटकं नि सिर्यलीत कसले रमताअसा गद्य प्रश्न विचारणार्‍या लोकांची घरं उन्हात बांधून मी मिळवलेलीनो मेंटेनन्स, चकटफू घरं.. 

Sunday 8 September 2019

इतक्यात वाचलेली पुस्तकं

One foot on the ground: A life told through the body
Shanta Gokhale
Speaking Tiger Publication


जेव्हा एखादा लेखक शरीराबद्दल बोलतो, तेव्हा तो ओशाळतोय का, त्याला पोटातून गुदगुल्या झाल्यासारखा आनंद होतोय का, तो उत्तेजित होतोय का, तो मूर्तिभंजन करू इच्छितो आहे का, किती जोरानं आणि कोणती किंमत भरून… हे सगळं त्याच्या सुरामधून उघड-उघड कळत असतं आणि त्यावरून मजकुराचा आवाका नि दिशा ठरत असते. शांताबाईंच्या आत्मचरित्राची चौकटच मुळी शरीर ही आहे. ही चौकट वापरून त्यांचा सूर इतका सहज, मोकळा, अलिप्त, ठाम आणि सूक्ष्मपणे तिरकस आहे; की सांगण्याचं बरंचंसं काम हा सूरच करतो. त्यात अवघडलेपणा अजिबातच नाही. जे सांगितलं जातं आहे, त्यापल्याडचा विचारही करण्याची गरज नाही, मुभा तर नाहीच नाही असा अदृश्य धाक वाचकाला घालणारा चिरेबंदीपणा आहे. 
दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्थळवर्णनाचा अट्टाहास न करताही त्यांच्या कथनातून जिवंत झालेली दादर आणि आसपासच्या परिसरातली सुमारे सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीची मुंबई. कसल्याही प्रकारचे भावुक कढ न काढता, शब्दबंबाळ न होता, अपरिहार्यपणे आणि आपसुख उभं राहत गेलेलं असं नेपथ्य फार कमी वेळा बघायला मिळतं. (कथनातून दिसलेल्या मुंबईची आठवण काढायची झाली, तर त्यांच्याच दोन मराठी कादंबऱ्या - त्या वर्षी, रीटा वेलिणकर, आणि त्यांनी अनुवादित केलेली जेरी पिंटोची 'एम ॲन्ड बिग हूम' ही कादंबरी आठवते.)
तिसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा सूक्ष्म, धारदार, भेदक विनोद. स्त्रीपुरुषामधल्या सामाजिक असमतोलाची नेमकी जाणीव, त्याबद्दलची अप्रीती आणि तुच्छता, शब्दाच्या अचूक निवडीचं भान, आणि प्रखर आत्मविश्वासातून येणारा निस्संकोचपणा - हे सगळं त्यांच्या विनोदातून भेटतं. एकत्र कुटुंबातल्या नात्यांतली विसंगती वर्णन करणारा  'अग्गंबाई, वन्सं मुतल्या!' हा किस्सा हा त्याचा निव्वळ एक मासला.
हे पुस्तक मराठीतही असायलाच्च हवं नि ते खुद्द शांताबाईंनीच लिहायला हवं असं अगदी मनापासून वाटतं.
***

नाइन्टीन नाइन्टी
सचिन कुंडलकर
रोहन प्रकाशन


नव्वदीत मराठी मध्यमवर्गीय समाजाचा पोत बदलायला सुरुवात झाल्यावर त्यापूर्वीच्या अनेक गृहीतकांमधली विसंगती आणि छद्म हळूहळू ठळक व्हायला लागली. या पुस्तकातून कुंडलकरांचा रोख त्यांकडे आहे हे स्पष्ट जाणवतं. अशा विसंगती प्रकाशात आणायला, यशस्वीपणे आणि परिणामकारकपणे आणायला, एक प्रकारचा मूर्तिभंजक बिनधास्तपणा लागतो. पण त्याचबरोबर आपण ज्या दोषांवर टीका करतो आहोत, त्याच दोषांच्या सापळ्यात आपला पाय अडकत तर नाही ना, हे सतत तपासून बघणारा सावध डोळसपणाही लागतो. पहिली बाब कुंडलकरांकडे आहे, हे अभिनंदनीय आहे. पण दुर्दैवाने दुसरी बाब मात्र नाही. परिणामी त्यांची अभूतपूर्व कसरत होत असलेली जाणवते. आपल्यापूर्वीच्या पिढ्यांनी लिहून ठेवलेल्या गोष्टी वाचण्याची जवळजवळ सक्ती म्हणावी अशी अपेक्षा केली जाते म्हणून होणारी रास्त चिडचिड आणि त्याच वाचनाच्या सवयीतून मिळालेल्या गोष्टींबद्दलची कृतज्ञता - हे या गोचीचं एक उदाहरण. नॉस्टाल्जिया, स्वैपाक, मूल्यं.. अशा अनेकानेक बाबतींतल्या अगदी अश्शाच गोचीची अनेक उदाहरणं पुस्तकभर विखुरलेली दिसतात.
पण त्याचबरोबर 'ज्याचे कुणी नसते, त्याचा हिंदी सिनेमा असतो' हे आणि अशी अनेक दाणेदार वाक्यंही ते सहज लिहून जातात. चकित करतात. आज तिसरं सहस्रक सुरू होऊन वीस वर्षं व्हायला आली तरीही मध्यमवर्गीय जाणिवांना 'बोल्ड' वाटणाऱ्या अनेक गोष्टींविषयी सहज मोकळेपणानं लिहितात. गॅजेट्स, इंटरनेट, माध्यमं, एकटेपण, शरीर, नैराश्य यांसारख्या अनेक विषयांवर नवं-ताजं बोलतात. परिणामी प्रचंड परस्परविरोधी अडगळसदृश गोष्टींचा खच, त्यातच नेमड्रॉपिंगचा अकारण पसारा, आणि मधूनच लक्कन चमकून जाणारी हिरकणीसारखी काही वाक्यं हा 'नाइन्टीन नाइन्टी'चा साधारण साचा म्हणून उरतो.
बाकी कुंडलकरांच्या ब्लॉगचं आणि सदरलेखनाचं हे संकलन आहे याची कल्पना आहे. पण त्यातून सदरामधल्या काही वादग्रस्त गोष्टी टाळलेल्या स्पष्ट दिसताहेत. मग एकंदर घाटाचा विचार न करता, ब्लॉगवर लिहिलेली एक कथा तशीच घुसडून का बरं छापली असावी? विचार करकरूनही त्यामागचं कारण कळलं नाही.
***

टाहोरा
अनिल साबळे
लोकवाङ्मय गृह प्रकाशन


या कवितांबद्दल काही समीक्षात्मक म्हणण्याची माझी लायकी नाही, इच्छा नाही. निव्वळ त्यांकडे लक्ष्य वेधून घेण्यासाठी हे टिपण.
अगदी साधे, अनलंकृत शब्द. पाऊस. मधमाश्या. अस्वलं. मोर. वासरं. निळ्या भणभणणाऱ्या माश्या. पाणी. भूक. जंगलाशी अभिन्नजीव असणं. शाळा शिकण्यातल्या तडजोडी आणि कोंडमारे. व्यवस्थांनी जंगलाचा गळा आवळत नेल्यावर, व्यवस्थेमधल्या भ्रष्टाचारानं भूक उघडीवाघडी केल्यावर, मायबापाच्या-निसर्गाच्या-जंगलझाडीच्या मायेपासून अपरिहार्यपणे सुटं होत गेल्यावर -  कवितेमधून दुःख उमटू शकणं.
हे सगळं या कवितांमध्ये आहे. एक कविता उद्धृत करते आणि गप्प होते -

समोर कोरा कागद असला तरी
कविता सुचत नाही
पोतंभर पिठाची कणीक मळताना
कविता सुचते... पण तेव्हा
हात पिठात बुडलेले असताना
मला तरी लिहिता येत नाही
अर्धवट भिजलेलं पीठ सोडून कविता.
मऊसूत मळलेल्या कणकेचे
गोल गोळे करताना
शब्द ओठावर दाटून येतात
उतू आलेल्या वरणासारखे
मुलं पोटभर जेवून आश्रमशाळेत बसली म्हणजे
मी धरतो आंब्याच्या सावलीची वाट
पुस्तक छातीवर मांडून
मी घनदाट झोपतो
तीनची बस गोंगाट करीत आली म्हणजे
धडपडत उठतो. तोंडावर पाणी शिंपून
मी चालू लागतो आश्रमशाळेकडे
संध्याकाळी घरी येताना
पायाला चिकटून येतात
भाताची शुभ्रं शितं
नव्या शब्दांसारखी
कविता तर अशीच असते
पोटभर जेवलेल्या मुलांसारखी.

***
The testaments
Margaret Atwood
Penguin Random House UK


मूळ कलाकृती साहित्यातली, तिच्यावर आधारित टीव्हीमालिका, त्या टीव्हीमालिकेतल्या घडामोडी पचवून-वापरून परत लेखकानं आपला शिक्का उमटवत पुढे नेलेलं कथानक - हे आज-आत्ताच घडू शकणारं, माध्यमांमधली अंतरं मिटवून-गिळून टाकणारं अजब वास्तव ॲटवुडच्या या कादंबरीतून भेटलं. आता 'The handmaid's tale'वरच्या मालिकेच्या चौथ्या पर्वाला पुनश्च लेखकाला शरण जाणं भाग आहे, हे लक्ष्यात आल्यावर मनापासून हसायला आलं. ॲटवुड नामक लोभस-लबाड हडळीला मनोमन एक नमस्कार ठोकला.
या कादंबरीची नायिका सर्वसामान्य नाही. पण सर्वंकष सत्तेला रूढार्थाने आव्हान देणारी भव्योदात्त व्यक्तीही नाही. ती माणूस आहे. चिवट आहे. तगून राहायसाठी काय वाट्टेल ते करणारी, त्याचं समर्थन करणारी, आणि आपण समर्थन करतो आहोत हे जाणून असणारी डोळस व्यक्ती आहे. शोषल्या जाणाऱ्या, जीवनासक्त माणसांच्या मनोव्यापारांमधलं प्रचंड क्रौर्य, आपसांतल्या राजकारणांना येणारी धार, मांजरपावलांनी आपल्याआत वस्तीला येत जाणारं हीण हे ॲटवुडचं होम पिच. ते या कथानकाच्या पूर्वार्धात सर्वार्थानं अवतरलं आहे. आपण जगायचं की नैतिकता जगवायची या द्वंद्वात रूढ नीतिमूल्यांचं हास्यास्पद, अर्थहीन, असंगत होत जाणं बघताना हबकून जायला होतं. तो या पुस्तकातला जबरदस्त भाग.
उत्तरार्ध मात्र त्या मानाने काहीसा कमअस्सल. गोष्टीची आपल्यावरची पकड कुठेही ढिली होत नाही, उत्कंठा कमी होत नाही, घटनांचं जाळं अविश्वासार्ह वाटत नाही, वाचताना श्वास रोखला जातोच. ॲटवुडचं ते कौशल्य वादातीत आहे. पण त्या सगळ्या भागाला एखाद्या भाराभागवतीय कुमारवयीन साहसकथेच्या शेवटाचे रंग आहेत. आधीच्या पुस्तकात आणि याही कथानकाच्या पूर्वार्धात मानेवर सुरी ठेवणारी आणि भयानं गोठवून टाकणारी वातावरणातली गुदमर हरपली आहे.
अर्थात - तरीही आज आणि उद्याच्या सीमेवरचे, गृहीतकंच खोलवर तपासणारे अनेक प्रश्न पडतातच. लोकशाही, मानवी हक्क, व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्रीपुरुषसमता यांसारखी, आज आपण गृहीत धरून चालतो ती मूल्यं खरोखरच कालातीत आहेत? की उद्याच्या युगात ती लोपूही शकतील? नि तरीही माणसं जगू पाहतील मिळालेल्या अवकाशात तितक्याच समरसतेनं? उत्तरांसाठी कदाचित फार थांबायला लागणार नाहीसं दिसतं, हा खरा डेंजरस भाग.