Showing posts with label प्रेमप्रेमभंगदु:खवगैरे. Show all posts
Showing posts with label प्रेमप्रेमभंगदु:खवगैरे. Show all posts

Saturday, 13 October 2007

तीच तर गंमत...

पुन्हा एकदा मी का लिहितेय त्याचं समर्थन करणार होते॥ पण नको। डझण्ट मेक एनी सेन्स. :)

आत्ता आपण खरोखरच एकमेकांच्या समोर नसतो तर फार बरं झालं असतं। माझा जीव खरोखरच इतका अडकला आहे का तुझ्यात, की हे नुसतेच आकर्षणांचे मोह... हट्टीपणाने घर-दार व्यापून बसलेले... ते पडताळून पाहता आलं असतं. समोर माणूस नसताना, तो तसाच्या तसा जागता राहिला मनात... कुठलंच प्रतीक वा मृत आठवण बनून न राहता... जिवंत संवाद घडला त्याच्याशी तो समोर नसूनही... तर म्हणावं... की होय, माझा जीव गुंतला आहे तुझ्यात.

पण आत्ता?

आत्ता तू रोज दिसतोस. एकमेकांच्या अवस्थांचे अंदाज न लावण्यातच सगळी असेल नसेल तेवढी शक्ती खर्च होऊन जाते. रात्रीला आपण पार कंगाल. विखुरलेल्या स्वत:ला कसंबसं गोळा करून निवार्‌याला जाऊन पडणे एवढं एकच माफक ध्येय जपू शकणारे. कसली स्वप्नं आणि कसली ध्येयं...

म्हणून जमेल तितक्या लवकर तुझ्या डोळ्यांसमोरून उठून जायचंय. तू खरंच मजेत आहेस का..... हा विकृत प्रश्न नको आणि जीवघेणे अंदाज नकोत. स्वत:ची रोज उठून परीक्षा पाहणं नको आणि तुझी घेऊन तुला नापास होताना पाहणं नको. माझी गोची किती अवर्णनीय सुरेख... तू पास झालास तरी मलाच दुखणार आणि नापास झालास तरी स्वत:वर संतापून मीच कळवळणार! आहे की नाही मजा?

काय अर्थ?

कुणास ठाऊक...
आत्ता उद्धृत करायला सौमित्रची एक भीषण सुंदर कविता आठवतेय... पण नको.... कविता नकोत.

असेच वार्‌यावरचे निरुत्तर करणारे अनेक प्रश्न...

आणि आपण नुसते पाहत बसलेले... अगतिकपणे.

तो विचारतो मग स्वत:लाच... ’काय अर्थ?’

तर अर्थ काहीसुद्धा नाही...

जगातल्या सगळ्या कविता साल्या कुठेतरी खोल पुरून टाकल्या पाहिजेत.
कदाचित मी नीट नॉर्मल वागीन.
कुणास ठाऊक. कदाचित नाहीnaahiihii..
मग कदाचित मी स्वत:च लिहीन एखादी कविता नाईलाजानं. काय अर्थ?तर अर्थ काहीसुद्धा नाही!



मरो.......
सालं स्वत:चं असं काहीतरी सापडायला पाहिजे. म्हणजे जगदीशचंद्र बोसांना कशी झाडं सापडली, किंवा व्हॅन गॉगला रंग-रेषा किंवा सौमित्रला शब्द.... स्वत:मधली असेल नसेल तेवढी सगळी मस्ती, सगळी ऊर्जा... आत उसळणारं हे सगळं सगळं... तिथे उधळून टाकायचं...
कधी सापडेल? शोधत राहायला पाहिजे. स्वत:पासून सुटण्याचा तेवढाच एक मार्ग. शोधला पाहिजे. काय वाट्टेल ते झालं तरी शोधला पाहिजे..... मरायच्या क्षणापर्यंत शोधत राहायला पाहिजे.....त्यात हे असे दुखण्या-खुपण्याचे रस्ते अनिवार्यच. त्याची भीती नाही. दुखण्याच्या भीतीनं पाय मागे घेतला असता, तर इथवर आलेच नसते...मला दु:ख हवं, सुख हवं, अपेक्षा हव्यात, अपेक्षापूर्तीच्या अपेक्षा हव्यात आणि अपरिहार्य असतील तर अपेक्षाभंगही... सगळं सगळं हवं. दोन्ही हातांनी भरभरून हवं.. कितीही रक्ताळला जीव तरीही..
’जगातलं एकपण सुख नाही सोडणार...’ असं म्हणाला होतास तू, अगदी फिल्मी उत्कटपणे, दूर क्षितिजापार वगैरे नजर रोखून... आठवतंय? किती शर्थीनं निभावलंस ते! आणि मीही. फक्त आपल्या संदर्भबिंदूंची पाऽऽर उलटापालट झालेली. तीच तर गंमत...

Friday, 22 June 2007

कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...

’रंजिशी सही...’ डोक्यात घुमत असलेलं. कुठल्याही गाण्याबरोबर चालताना अर्ध्या वाटेवर डोकं वाटा चुकायला लागतं तसंच... कधी आपली ’महान’ एकाग्रता चकव्यात गुंतवते, तर कधी गाणंच पायवाट सोडून रानोमाळ भटकायला भाग पाडतं...तशातली गत झालेली. रुना लैलाचा शांत, ठाम घायाळ सूर पाझरतो आहे एका लयीत. त्याची एक नशाच चढल्यासारखं झालेलं...

’कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...’ इथे अडायला झालं.

भरम...?

खरी मी तिच्याही आधी ’तू भी तो कभी मुझको मनाने के लिए आ...’वर जाऊन तिची वाट पाहते नेहमी. पण ’मोहोब्बत का भरम रख...’? म्हणजे? पुढे जाताच येईना.

भरम...

इथे अपरिहार्यपणे मेघनाची आठवण झाली. किती वेगवेगळ्या प्रकारे या भ्रमांचं विश्व साकारलं आहे तिनं. भ्रमांचा आधार आयुष्याला जोडून ठेवणारा आणि त्यांना नाकारताना लागणारी प्रचंड अमानुष ताकद... लख्ख सत्य समोर दिसत असूनही ते नाकारून भ्रमांना कवटाळून बसण्यातली ’अठरावा उंट’मधल्या संजीवची अगतिकता... आणि ’टेलिंग दी ऍबसॉल्यूट ट्रुथ वॉज पार्ट ऑफ माय स्ट्रॅटेजी...’ म्हणून भीषण एकटेपणाला सामोरं जाणारी ’नातिचरामि’मधली मीरा...

भ्रमांच्या मोहक आधाराचं आणि फसवं आभासी सुख देण्याच्या क्षमतेचं किती नेमकं भान आहे तिला...

तशीच गौरीची कालिंदीही.

इतक्या साऱ्या तडजोडी करून जोडत तर काहीच नाही आपण...
तडजोडी मोडताना होणाऱ्या विध्वंसाचं काय?
आणि तडजोडी जगताना होणाऱ्या विध्वंसाचं?

हाही भ्रमांच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा निकराचा प्रयत्नच की...

’तुझ्या कैफात मी आता तुलाही लागलो विसरू,असे समजू नको तू की, तुला मी टाळतो आहे...’ असं म्हणतात सानेकर, तेव्हा हा ’मोहोब्बत का भरम’ असतो त्यांना खुणावणारा? असावा. नाहीतर ’तुझा आभास सोनेरी मला सांभाळतो आहे...’म्हणजे काय?

सरतेशेवटी हे सारे भ्रम?

नात्यांचे...कुणी आपल्यासाठी असण्याचे...कस्मे-वादें निभावण्याचे...प्राणांवर नभ धरण्याच्या आश्वासनांचे...स्वप्नांचे...

असूदेत. खोटे, अल्पजीवी, कधी ना कधी जमिनीवर आदळणारे.. असूदेत. तरीपण मला हवेत. समोरच्या माणसाला नेमकं काय आणि किती कळतं आहे त्याचे अंदाज बांधणंच हातात असतं फक्त...असं म्हणत चरफडत आले आहे मी नेहमीच. तरीही. भ्रमांची ताकद कळते आहे मला आता. मला नको आहे सत्य-बित्य इतक्यात. ते मीरालाच मिळू द्या. तूर्तास तरी आपल्याला नको. आपल्याला आपले भ्रम प्यारे आहेत..


कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिए आ....

क्या बात है!

कधी ना कधी ’येह आखरी शम्माही बुझाने के लिए आ...’वर पोचायचंच आहे...
तोवर ’पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...’ इतकंच खरं...

Saturday, 26 May 2007

प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे...

खरंय...

आपल्याला कित्ती कित्ती वाटलं असं असावं म्हणून, तरी आपल्याला एकाएकी उडता थोडंच येणार असतं? नसतंच.

’आत्त्त्त्ताच्या आत्त्त्त्ता पाऊस हवाय’ असं कित्ती पोटातून वाटत असेल तरी आपल्यासाठी एप्रिलमधे पाऊस येतो थोडाच? नाहीच येऊ शकत.

’जगातल्या सगळ्याच्या सगळ्या संध्याकाळी कुठेतरी सुरक्षित ठिकाणी पुरून आपण विनासंध्याकाळच्या प्रदेशात राहायला जावं’ असं किती मनापासून वाटलं तरी संध्याकाळ चुकवता येते थोडीच? रोजच्या रोज देणेकऱ्यासारखी संध्याकाळ येतेच. ऑफिसातही येते...

’संदीपला खरंच कळत असेल का तो म्हणतो ते सगळं, की बाकी साऱ्यासारखा हाही भ्रमच?’ या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळावं असं किती वाटलं म्हणून ते मिळतं थोडंच? समोरच्या माणसापर्यंत नेमकं काय आणि किती पोचतंय, त्याचे अंदाज करणं तेवढं हातात आहे, हे कितव्यांदातरी कळून घ्यावं लागतंच.

ही मेघना पेठे एवढं सगळं समजूनसुद्धा एखाद्या निगरगट्ट आणि शूर माणसासारखी कसं पेलू शकते जगणं, असा आदरयुक्त अचंबा वाटला तरी आपण तिच्याएवढे शूर होऊ शकतो थोडेच? आपण परत परत त्याच त्या आशाळ तडजोडी करत राहतोच.

आपल्या काळजाच्या देठापासून हवं म्हणून, आपली जिवाजवळची गरज म्हणून ... काही घडत नसतंच.

’आवर्तन’मधली सुरुचीची बहीण नाही का म्हणते प्रॅक्टिकली - ’आपल्याला हवं असणं आणि ते मिळणं यांचा आयुष्यात एकमेकांशी काही संबंध तरी असतो का दीदी? तूच सांग.’

खरंय. नसतोच.

Wednesday, 9 May 2007

रक्तात उतरली होती संध्याकाळ...

प्रेम वाटलं म्हणजे नक्की काय झालं? किंवा गौरी देशपांडेच कोट करायची सरळ तर आपण म्हणूया की ’पुरुषांना आणि स्त्रियांना एकमेकांना पाहून होणाऱ्या स्रावांना प्रेम-बिम म्हणण्याच्या भानगडीत न पडणंच चांगलं.’

पण तरी तुझ्याबद्दल मला किंवा माझ्याबद्दल त्याला ओढ वाटली किंवा काहीतरी हवंसं वाटलं म्हणजे काय झालं? या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात कुठून होत असते? की सुरुवात वगैरे असं काही नसतंच? नुसत्याच गोष्टी घडत जातात, असं?

म्हणजे उदाहरणार्थ तुझे गुलाबी रंगाचे ओठ आठवतात मला. तुझं किंचित चाचरत प्रचंड एक्साईट होऊन बोलणं किंवा एखादी गोष्ट फारशी मनात नसताना ’हॅ हॅ हॅ’ असं मोठ्यांदा कृत्रिम हसून ते गोष्ट उडवून लावणं किंवा तुझी काहीशी बुटकी शिडशिडीत एकरेषीय अंगलट...
हे सगळं फारच शारीर होतंय नाही? पण ’फार शारीर’ किंवा ’कमी शरीर’ असं कुठे काय असतं? मन-बिन म्हणजे तरी काय? या शरीरातल्या पेशींनी एकमुखानं केलेली मागणीच ना? ’शारीर’ या संकल्पनेला बिचकणं थांबवायला हवं. मग कदाचित या सगळ्यातून मला वाटणारा प्रचंड अपराधी भाव संपेल.

कठीण... वेल.... आहेच.

तो आणि मी बोलत असू खूप. फारच ना. सी. फडके पद्धतीत सांगायचं झालं तर तसे उपवर आणि उपवधूही असणारच आम्ही एकमेकांना. उदाहरणार्थ पुस्तकं आणि सिनेमे आणि अंगातला जास्त शहाणपणा आणि ओढून-ताणून आणलेला एकटेपणा आणि कदाचित इम्मॅच्युरिटीही. मला जमू शकणाऱ्या सगळ्या पद्धतीत संवादही साधायचा प्रयत्न केला मी त्याच्याशी. असं समजूनही पाहिलं, की ’येस, या मुलावर आपलं प्रेम आहे’. आणि खरं सांगू, त्या त्या वेळी मला वाटलंही ते खरं...

खरं असणं-नसणं शेवटी वाटण्यावरच अवलंबून असतं की काय? कुणास ठाऊक...

पण इट डिडण्ट वर्क आऊट. तसं तर सारं काही आलबेलच होतं. इथे बिनसलंय, असं काही कुणाला बोट ठेवून म्हणता आलं नसतं. पण ते तसं नाही हे मला कळत गेलं आणि एखाद्याला न समजणारी गोष्ट त्याला ’समजावून देणं’ अशक्य असतं हे माझं मतही दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत गेलं.

तसे स्पर्श वर्ज्य कधी नव्हतेच. म्हणजे थिऑरॉटिकली! कधी कधी हातात हात घेणं वा चारचौघांत वावरताना होणारे स्पर्श विनासंकोच चालवून घेणं हे चालेच. पण कधी स्पर्शाची भाषा वापरून पाहावीशी नाही वाटली मला त्याच्यासोबत. माझी नसलेली तयारी स्पष्टपणे नोंदल्यावर त्यानंही कधी निसटते म्हणूनही स्पर्श केले नाहीत हेही खरंच.
आणि तरीही एखाद्या नियत क्षणी त्याच्यासोबत असताना मला जाणवून गेलेलं माझं सगळं शरीर आठवतंच आहे मला...

पण आमच्या नात्यात हे सारं फारच मुकं राहिलं कायम. ज्या नात्यात त्या ओढीनंच होतात लहान-सहान तपशीलही जिवंत, त्यात आम्ही ते असं मुकाट मिटून टाकावं - हेच किती बोलकं आहे ना?

आणि मग मनात नकळत येत राहिलास तू. आता मागे वळून पाहताना वाटतं, हेही सहज घडलेलं की आपणच घडवून आणलेलं, सहजपणाच्या बनावाखाली? किती सहज-स्वच्छ संगती दिसते ना या साऱ्यांत? आपण कितीही नाकारायची, लपवायची म्हटली तरी ती असतेच आणि देनिस म्हणतो तशी ’कधी ना कधी रहस्याला वाचा फुटतेच...’

संदीपची ती कविता ठाऊक आहे का रे तुला -

मी जाता जाता तुला बोललो काही,
ते खरेच सारे असेल ऐसे नाही
रक्तात उतरली होती संध्याकाळ,
वदवून घेतले तिनेच काहीबाही...

म्हणजे ही रक्तातली संध्याकाळ फक्त? बाकी काही नाही?

मेघना पेठेसारखं नाट्यपूर्ण उत्कटपणे म्हणावंसं वाटतं आहे, ’या इलाही, येह माजरा क्या है...’

Sunday, 22 April 2007

अखियोंके पानीमें रखना वो चिठियाँ ...

काही पत्रं लिहिली जातात, पण इच्छित मुक्कामी पोचतातच असं नाही. कधी पोचतात, पण वाचणाऱ्यापर्यंत पोचतात असं नाही. ही अशीच काही पत्रं. अर्ध्यात राहिलेली.

एक काळ असाही होता, जेव्हा तुला फोन करावा, तुझा फोन यावा असं सतत वाटत असे. आता तसं असत नाही. आपण हल्ली एकमेकांना लिहितोही क्वचित. नुसती भांडणं करण्यापेक्षा नकोच ते, असं वाटून थांबलो का आपण? माहीत नाही.

आपण भेटतो तेव्हाही काही हिशोबांची परतफेडच तर करायची असते फक्त. अपेक्षा असतात. अपेक्षाभंग असतात. मग वाट्टेल तसं अद्वातद्वा बोलणं असतं; नाही तर ओठ आवळून गप्प बसणं तरी असतं. प्रश्न असतात... असंच करायचं आहे का आयुष्यभर? याचसाठी केला होता अट्टाहास?
उत्तरं नसतातच.मग अजून भांडणं, चिडचिड, त्रागा, वैताग ...

खरोखर तुला नाही या साऱ्याचा त्रास होत? की तू इतका विचारच करत नाहीस या साऱ्याचा? तू खरोखरच मला गृहित तर धरून चाललेला नाहीस ना?
मलाच कितीतरी वेळा प्रश्न पडतो, का कुणाला तरी हवं असावं मी? तुला इरिटेट होईल इतक्या वेळा हा प्रश्न मी तुला विचारलेला आहे. होय ना? पण तो मला खरोखरच सतावतो. वाटतं, या मुलाने आपल्या असण्यात फक्त सोय तर नाही ना पहिलेली?
हा तुझ्यावर अन्याय असेलही कदाचित. पण तसा तो व्हायला माझ्याइतकाच तूही कारणीभूत आहेस मित्रा. तुझ्या आयुष्याबद्दल काय ठाऊक आहे मला?
तुझा जन्मदिवस, पत्ता, कुटुंबीयांचे तपशील, रंग-वजन-उंची-पगार हे सारे तपशील कदाचित सांगू शकेन मी. पण एकमेकांशी जोडलं जाणं इतकंच असतं फक्त? तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणालाच सांगता येणं शक्य नाही आणि तुला सांगितल्याशिवाय ज्याची पूर्तताही व्हायची नाही असं काहीतरी माझ्यापाशी असतं. आपण एकमेकांना हा मान, ही जवळीक देऊ करतो तेव्हा इतर कसल्याही तपशिलांनी येणार नाही इतके जवळ येतो. असा एकच क्षण येऊन पुरत नाही. त्या एका क्षणानं खूण पटेल कदाचित एकमेकांची. पण तिथेच थांबत नाही ते. अशा एका क्षणापासून दुसऱ्या क्षणापर्यंत, दुसऱ्यापसून तिसऱ्यापर्यंत ... असे असंख्य प्रवास करायचे असतात.

Am I sounding too romantic or filmy? May be...

हे इतकं बटबटीत आणि फिल्मी वाटत असेल तर मग माझी तोकडी भाषाच त्याला कारणीभूत आहे.
मी मागेही एकदा तुला लिहिलं होतं - कधी कधी सध्या, रोजच्या बोलण्यातून सूर जुळत जतात. समोरचा माणूस जे बोलत असतो, ते आणि तेवढंच बोलत नसतो तो. ऐकू न येणारं, पण जाणवू शकणारं असंही बरंच काही असतं. ते ऐकू यायला लागतं - पटतं, तेव्हा तर आपण अधिकाधिक मोकळे होत जातो.
कधी कधी मात्र असे सूर नाहीच जुळत. किती वचावचा बडबड केली, तरी आपण तस्से कोरडेच राहतो.
अलीकडे मला हे फार जाणवतं. तुझ्या असण्याबद्दल मनातून आनंद- आनंद नाही दाटून येत. आपण एखादी बिझिनेस मीटिंग आटपावी, तसे भेटतो. चार पुस्तकांबद्दल चार ताशेरे झाडतो, दोन टोमणे मारतो, आणि आपापल्या वाटेने चालते होतो.

इतकंच
असायचं होतं का या साऱ्याचं आयुष्य? इतकंच मिळायचं होतं आपल्याला एकमेकांकडून?

माझ्याकडे उत्तरं नाहीत मुला. मला त्रास देणारे प्रश्न मी संगतवार मांडायचा प्रयत्न करते आहे फक्त. मी फार कोरडी आहे स्वभावानं. तुझ्या-माझ्या नात्यात तर फारच. आपल्याकडून कुठून कसल्या प्रेमा-मायेचा अंशही निसटता कामा नये, म्हणून स्वत:वर पहारा देत असल्यासारखी वागते मी. तसेच स्पर्शाबाबतचे माझे संकोच...

या साऱ्याला मी काहीच करू शकत नाही मुला. मी अशी अशी आहे, इतकंच म्हणता येतं फक्त. म्हणून का तू असा रेषा आखून दिल्यासारखा बाहेरचाच झालास?

परवा संध्याकाळी सैरभैर झाल्यासारखी झाले होते मी. उगाच रडायला येत होत. सिनेमा पाहताना मॅडसारखं एकटीनंच रडून घेतलं मी. कारण? ठाऊक नाही. वाटत होतं, किती मोठी मोठी स्वप्नं पाहतो आपण.. आणि प्रत्यक्षात मात्र हातात काहीच मिळत नाही. जेमतेम भाकर तुकडा मिळवण्याचे हिशेब, अजून पैसे मिळवण्याचे काटेकोर क्षुद्र बेत.. घर नि दार... हे काय होऊन बसलंय... असे काहीतरी निराशावादी विचार. आता नवे बेत करायचं वय सरत चालल्याची घाबरवून टाकणारी जाणीव. 'सामान्यपण’ स्वीकारणं फार जड जात होतं...

त्या क्षणी मला इतकं प्रचंड एकटं वाटलं -
आपल्याला जिथे तुटतं आहे, ते कुणालाच - दुसऱ्या कुणालाच - सांगून समजणार नाही अशी भयानक खात्री माझी मलाच. आणि त्याचंही वाईट वाटतंच आहे...
ब्रह्मांड अनुभवलं.

पण तेव्हाही, निसटता प्रयत्न तरी करून पाहू असं म्हणूनही, तू नाही आठवलास.

हे आत्ता. आपण अजुनी एकमेकांच्या आयुष्याशी अधिकृतपणे - समाजमान्य पद्धतीने जोडलेही गेलेलो नसताना.

का रे हे असं होऊन बसलं?
की हे असंच असायचं असतं?
इतकंच?