Monday 1 July 2024

आजीची गोष्ट ०१

आपल्याला आपले आईवडील आणि इतर नातेवाईक कुटुंबातल्या जुन्या आठवणी सांगतात. त्यात अर्थातच त्यांचे स्वतःचे बरेवाईट पूर्वग्रहआवडीनिवडीकाही प्रमाणात हितसंबंधही असतात. त्यामुळे त्या आठवणींच्या काचेतून आपल्याला दिसणार्‍या गोष्टी पूर्णतः नितळ नव्हेत हे खरंच. पण आपणही या चित्राचे पुढचे वाहकच असतो. आपलंही गुंतलेपण गृहीत धरता आलं आणि किंचित त्रयस्थपणा कमावता आलातर काचेची जातकुळीही थोडीफार ओळखता येऊ लागते. मग त्यातून दिसणार्‍या चित्राचे रंगही हळूहळू स्पष्ट होत जातात.

आईच्या आईच्या काही आठवणी नोंदून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या वाचण्यापूर्वी हा व्याप्तिनिर्देश वा मर्यादा वा डिस्क्लेमर लक्षात ठेवणं आवश्यक.

या आठवणींचं मोल तसं आमच्या कुटुंबाखेरीज इतर कुणाला नव्हे. पण असं म्हटलंतरी आपलं कुटुंब म्हणजे आपण तिघं-चौघंच फक्त नसतो. त्यापल्याड पुष्कळ गोतावळा असतो. त्यातल्या कुणाकुणाला यात रस असू शकेल. शिवाय कितीही व्यक्तिगत म्हटलंतरी त्यातून त्या काळाबद्दलचे थोडे मजेशीरथोडे उपयुक्तथोडे रसाळथोडे उद्बोधक तपशील सापडतात. बघू, काय मिळतं.

आजीचं नाव रंगू. तिचं नवर्‍यानं ठेवलेलं नाव ‘सरस्वती’ होतं. मला आजीनं भेट दिलेल्या चित्रकलेच्या पुस्तकावर तिनं तिचं नाव लिहिलेलं आहे. पण तिला तिच्या माहेरचे सगळे जण रंगू म्हणायचे.

रंगूला तिच्याहून मोठी दोन भावंडं - दोन बहिणीतर धाकटी तीन भावंडं - एक बहीण आणि दोन भाऊ. एकूण सहा भावंडं. आजी गेली तेव्हा ती जेमतेम ५९ वर्षांची होतीम्हणजे तिचं जन्मसाल १९३२ धरलं आणि तिच्या आगचीमागची भावंडं मिळून आठ-नऊ वर्षं धरलीतर तिच्या वडलांचं लग्न २५ सालच्या आसपासबरोबर शंभरेक वर्षांपूर्वी झालं असणार. आजी जेमतेम आठ वर्षांची असतानाच तिची आई गेली. वडलांनी पुन्हा लग्न केलं नाही. त्या सगळ्या भावंडांना सांभाळलंते आजीच्या आजीनं. 

तिचंही नाव सरस्वती.

आजीच्या या आजीची गोष्ट भलतीच सुरस आहे. तिचं लग्न म्हणे दुसरेपणावर झालं होतं. तत्कालीन लग्नांची नि बाळंतपणाची वयं धरून अंदाज करत करत मागे गेलंतर तिचं लग्न १९०० सालाच्या सुमारास कधीतरी झालं असावं. नवरा पंढरपुराकडे कुठेसा जज्ज होता. जज्ज हा हुद्दा ऐकून मी थोडी चकित झाले होते. पण या सगळ्या ऐकीवच गोष्टी. खरंच जज्ज होता की कुठलं सरकारदरबारचं पद होतंकुणाला ठाऊक. पण बर्‍याशा हुद्द्यावर असावा. बायकोच्या पदरात एक मुलगा घालून तो वारला. मुंबईत आलेली प्लेगची साथ १८९६ सालची. तिथून पुढची वीस-पंचवीस वर्षं प्लेग महाराष्ट्रात धुमाकूळ घालतच होता. त्यात तिचा नवरा वारला असेल कापण त्या काळात माणसं मरायला तशी थोडकी निमित्तं पुरी होत असावीत. कशानं तडकाफडकी वारलाकुणाला माहीत. इतकंच माहीतकी त्याच्यामागे त्याच्या कुटुंबाची पुरती वाताहत झाली. बायकोला तिच्या माहेरचं कुणी बघणारं नव्हतं असावं. नवर्‍याच्या नावे कोकणातल्या आयनी मेट्याला थोडकी जमीन आणि जुनं घर आहेइतक्या माहितीवर वर्षाच्या आतल्या तान्ह्या पोराला पोटाशी घेऊनबैलगाडी जोडून ती पंढरपुराहून एकटीच कोकणात आली. सोबत घरातलं जमेल ते किडूकमिडूक बांधून आणलं होतं, म्हणतातपण होतं-नव्हतं ते त्या प्रवासात चोरापोरी गेलं. कोकणात पोचलीतेव्हा जमीन भाऊबंदकीतल्या कुणीकुणी लाटलेली. मग तिनं खोताकडे तक्रार गुदरली. रीतसर पंचनामे झाले आणि तिला तिच्या नवर्‍याच्या नावचा जमिनीचा तुकडा आणि घर मिळालं.

तिची गोष्ट ऐकताना माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. किती वर्षांची असेल ती मुलगीएकटंच पोर पदरातम्हणजे जेमतेम पंधरा-वीस वर्षांची पोर असेल. नवरा मरून गेलेलापाठीशी कुणी नातेवाईक नाहीतम्हणजे निराधारच. ती कधी कोकणात आली तरी असेल का त्यापूर्वीकी कोकणातलीच होती आणि नंतर नांदायला नवर्‍यामागे लांब पंढरपुरासारख्या देशावरच्या गावी गेली असेलसगळेच अंदाज. ती अगदी कोकणातली असली असं म्हटलंतरी त्या वयात अंगावरचं पितं पोर घेऊन एकटीनं इतका लांबचा प्रवास करायचा... येऊन भाऊबंदकीशी दोन हात करायचेकुणी अंगावर हात टाकलापोराचा जीव घेऊ पाहिला… तर ती काय करणार होतीयेताना कुणाची सोबत पाहिली असेल तिनंकुणाच्या जिवावर निर्णय घेतले असतीलकुणाच्या आधारानं हिंमत बांधली असेलसमजत नाही.

आयनी मेटं हे रत्नागिरीतलं डोंगरी गाव जोडगाव खरं तर. आयनी हे एक गाव आणि मेटं हे दुसरं. क्रांतिकारक अनंत कान्हेर्‍यांचं गाव म्हणून ते प्रसिद्ध आहे. पंढरपुरापासून अडीचशे किलोमीटर अंतर. आता नकाशात आयनी मेटं शोधलंतर आयनीच्या जवळून जगबुडी नदी गेलेली दिसते आणि आयनीच्या समोरच्या बाजूला पेंडशांनी प्रसिद्ध करून टाकलेलं तुंबाड. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी आयनी मेटं दुर्गमच असणार.

अशा गावात ती मुलगी घर धरून राहिली. ती आली तेव्हा घराची अवस्था काय असेलती कुठे राहिली असेलतिला पहिले काही दिवस कुणी जेवू-खाऊ घातलं असेलकुणाकडे तक्रार करायचीसाक्षीपुरावे कसे करायचे… हे तिला कसं कळलं असेलतिला कुणी धमकावलं-बिमकावलं तर नसेल?

त्या गावात तिनं मुलाला वाढवलं. तो काय शिकला होताकाय करत असेमाहीत नाही. थोडकी शेती आणि गुरं असावीत घरची. कारण तो मुलगा म्हणजे रंगूचे वडील - रानात गुरं चरायला नेत असेतो मुलगाही त्याच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून असावा. गाव अक्षरशः डोंगरात वसलेलं. आजूबाजूला गच्च रान. पुढे जाऊन जगबुडीला मिळणारा पर्‍ह्या म्हणजे ओढा घराजवळच्या घळीतूनच वाहणारा. तिकडे म्हसरांना पाणी पाजायला नेलं असताना एक वानर माणसाएवढा हुप्प्याच म्हणे त्याच्या मानगुटीवर येऊन बसला. तर त्यानं वानराचे पाय धरून त्याला खाली ओढलं आणि तसंच्या तसं पर्‍ह्यातल्या मोठ्या धोंडीवर आपटलं. हुप्प्या तिथल्या तिथे ठार. तसाच एक किस्सा त्याच्या शूरवीर म्हशीचाही ऐकलेला. म्हसरं चरताहेत आणि हा तिथल्या एका कातळावर बसलेला. जवळच्याच जाळीत वाघाची चाहूल लागली. वाघ नजरेला पडल्यावर त्या मुलाची जागचं हलायची हिंमत होईना. असा बराच वेळ गेला. ज्या क्षणी त्या जाळीतून वाघरानं बाहेर झेप घेतलीत्याच क्षणी पलीकडच्या म्हशीनं वाघावर झेप घेतली. बरोबर मोठाच कळप होता गुरांचा. त्यांनीही जिवाच्या आकांतानं वाघरावर उलटा हल्ला केला. मुलगा त्या रणधुमाळीत जागच्या जागी खिळलेला. अखेर वाघानं शेपूट घालून काढता पाय घेतला, तेव्हा मुलगा सुखरूप घरी परतला.

या आठवणींत कुणी-कुणी अर्थात पदरची भर घातली असणार. पण मुदलात काहीतरी असल्याखेरीज ती घालता येणं कठीण. बाकी काही नव्हेतरी तेव्हाचं किर्र जंगलातलं - डोंगरात वसलेलं आयनी गाव आणि ही जिगरबाज मायलेकरं, यांची कल्पना मात्र करता येते.

आजीची ही आजी कोकणात आली तेव्हाच सोवळी होती. लाल आलवणचोळीविहीन जगणंबोडकं डोकं. मुलाचं लग्न करून दिल्यावर तरी तिला चार दिवस सुखाचे दिसावेतपण ते नशिबात नव्हतं. तिच्यामागचे संसाराचे व्यापताप कधी संपलेच नाहीत. पोराचं लग्न करून दिलंपण सुनेशी पटत नसे. त्यामुळे सुनेच्या माहेरच्या गावी, जवळच बोरघरात त्यानं किडूकमिडूक किराणाचं दुकान घातलं आणि वेगळी चूल मांडली. आयनीच्या घरात आजी एकटी आपली आपण राही. पण सहा पोरं मागे ठेवून सून निवर्तली आणि वेगळं बिर्‍हाड संपलं. मुलानं पुढे दुसरं लग्न केलं नाही की ते होऊ शकलं नाहीकुणाला ठाऊक. थोडकी जमीन नि राहतं घर तेवढं गाठीला. कुणाचा आधार नाही. गरिबी मी म्हणत असणारच. त्याला कोण मुलगी देणार

त्या सहाही नातवंडांचं आजीच्या आजीनं केलं.

आजीकडे एक मोठा पेटारा होता. त्या पेटार्‍यावरच ती निजत असे. घर आणि जमीन मिळवण्यासाठी कागद कनवटीला लावून ती एकटी चिपळुणापर्यंत चालत जात असे. तिच्या त्या कज्जेदलाल्यांची कागदपत्रं तिनं त्या पेटार्‍यात मरेपर्यंत जिवापाड सांभाळली. “आता घर नि जमीन सगळं आपल्या नावावर आहे, आता करायचं काय ते जपून?” असं म्हणून ती गेल्यावर तिच्या नातवानं त्या रद्दीला काडी लावली. असो.

माझ्या मावशीला तिच्या लहानपणी आजोळी गेल्यावर पणजीआजीला बघितल्याचं आठवतं. म्हणजे त्या जिगरबाज बाईनं पणतवंडंही पाहिली.

बाईचं सोनं झालं.

क्रमशः

(भाग ०२)

No comments:

Post a Comment