Thursday, 16 April 2026

शहरनोंदी ०५

एफ०एस०आय० हा शहरांमधला एक परवलीचा शब्द. एखाद्या जागेचं क्षेत्रफळ आणि त्यावर करता येणारं बांधकाम यांच्यातलं ते गुणोत्तर. वरकरणी साधंसरळ गणित. पण माणसांच्या मानानं जागा मर्यादित असल्यामुळे शहरांमध्ये त्या गणिताला अनन्यसाधारण महत्त्व येतं. राहणारी आणि बांधणारी अशी दोन्ही प्रकारची माणसं अधिकाधिक एफ०एस०आय० पदरात पाडून घेता यावा आणि पाय थोडेसे जास्त पसरता यावेत म्हणून नाना प्रकारच्या लटपटी-खटपटी करतात. 


मुळात एफ०एस०आय०चं उद्दिष्ट काय? ‘औट हात तुझी जागा’ असं तुकारामानंच म्हणून ठेवलेलं असताना हा हव्यास कशाला?! तर माणसाच्या प्रेताला साडेतीन हात जागा पुरत असली, तरी शरीर-मन जितं-जागतं असताना त्याला तितकी जागा पुरत नाही. त्याचं आरोग्य नेटकं राहायला हवं असेल, तर त्याला घरात आणि घराबाहेरही थोडी अधिकची जमीन, थोडंसं आकाश लागतं. 


जॉन कॅलहूनचा उंदरांवरचा एक प्रयोग प्रसिद्ध आहे. त्याने 

अमर्यादित अन्न आणि सुरक्षित जागा देऊन काही उंदीर निरीक्षणाखाली ठेवले. उंदरांकरता ती जागा म्हणजे स्वर्गच होता. नैसर्गिक शत्रू नाहीत, अन्नाची टंचाईही नाही. लोकसंख्या भसाभस वाढत गेली. एका विशिष्ट संख्येला पोचल्यानंतर मात्र उंदरांच्या वर्तनात बदल झाला. प्रणय थांबला, सलोख्याचे संबंध संपले, हाणामाऱ्या होऊ लागल्या. एका टप्प्यावर तर उंदीर उंदरांनाच खाऊ लागले. सगळं ठीक होतं. ठीक नव्हता तो एफ०एस०आय०. त्यानं उंदरांचा अंत केला. 


मानवी समाजाचं असं होऊ नये, म्हणून नागरी संस्था वस्त्यांवर हे कृत्रिम नियंत्रण घालतात. मैदानं राखणं, बागा वा जलाशय जोपासणं, दोन इमारतींमध्ये मोकळी जागा ठेवणं, पादचाऱ्यांसाठी सुरक्षित पदपाथ राखणं… या तरतुदीही त्याकरताच. जेणेकरून माणसांना माणसांपासून थोडातरी सुटा अवकाश मिळावा. त्यांच्यातले संबंध सुरळीत-सुखकर राहावेत. 


या उद्दिष्टाची बूज शहरं राखतात का, हा प्रश्न विचारणं आज आवश्यक होऊन बसलं आहे. जुन्या इमारती पाडून तिथे चिकार मजल्यांच्या आणि चिंचोळ्या व्हरांड्यांच्या उंच इमारती उभारल्यामुळे आपल्याला काही टक्के जागा अधिक मिळते, बिल्डरांना विक्रीसाठी फ्लॅट्स मिळतात, अवघा आनंदीआनंद होतो. पण रस्त्यांची रुंदी वाढणार असते थोडीच? ती तितकीच राहते. त्यात भर म्हणून पार्किंगला जागा न मिळालेल्या वाढीव गाड्याही रस्त्यावरच मुक्कामाला येतात. रुंदी अजूनच आटते. मग रस्ते रुंद करण्यासाठी इतर इमारतींची आवारं काबीज केली जातात. झाडं तोडली जातात. फुटपाथांचा बळी जातो. इतक्यानं भागत नाही. सार्वजनिक अवकाशातल्या मोकळ्या जागांवर बिल्डर लॉबीचा डोळा असतोच. पण तेच काही एकटे दोषी म्हणता येत नाहीत. रस्त्यांवर सणासमारंभांचे आणि अगदी लग्नांचेही मांडव पडत असतात. त्याकरता जमेल तिथून जमतील तशा विजेच्या जोडण्या घेतल्या जातात. त्यातच एखाद्या दगडाचा शेंदूर फासून तिथे दिवाबत्ती सुरू होते. पुढेमागे लोक तिथे घरातल्या देवादिकांच्या अधिकच्या तसबिरी आणून सोडू लागतात. आरत्या होऊ लागतात, एखादी शेड् टाकली जाते. हळूच कधीतरी पक्कं बांधकाम होतं. धार्मिक भावना जपण्यासाठी ते यथावकाश जिरवून घेतलं जातं. नियम ‘मॅनेज’ होतात. लचका तुटतो तो सार्वजनिक अवकाशाचा.


या सगळ्याचे लाभार्थी आपणच असतो. पण हा खरंच लाभ असतो का? की आपण त्याची किंमत निराळ्या ठिकाणी चुकवत असतो? ही सगळी अमानुष-हावरी घुसमट आणि त्यातून होणारं आपलंच शोषण सुधीर पटवर्धन कितीतरी वर्षं त्यांच्या चित्रांतून मांडतायत. आपली नजर जागी कधी होणार आहे?


लोकमत, ३ मार्च २०२६

No comments:

Post a Comment