Thursday, 16 April 2026

शहरनोंदी ०२

शहरं म्हणे बकाल असतात. तसं ते खरंही आहे. पण बकाल असतात म्हणजे काय असतात? कचरा असतो, गर्दी असते, की वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण? हे सगळं असतंच. पण त्याशिवाय वर थोडंसं काहीतरी, शब्दांत पकडता न येणारंही असतं. नाही पटत? थांबा, पायरी-पायरीनं बघू. 


बकालीसाठी दळणवळणाची सेवा अत्यावश्यक. सर्वप्रथम जर काही बकाल होत असेल, तर तो स्टेशनाभोवतीचा भाग. तिथला काळोख अंतर्धान पावतो. रात्रंदिवस जळते दिवे येतात. पाठोपाठ बिडीकाडी, भुर्जीपाव, सिमकार्ड-रीचार्ज, लॉटरीची तिकिटं… त्यातच घट्टपणी जागा धरून राहिलेली थोडी जुनी कापडचोपडाची दुकानं. एखादं रेस्टॉरंट, एखादा चहावाला, अर्थात एकतरी पानवाला. त्यांच्यापाठोपाठ विशिष्ट प्रकारचा कचरा. भाजीमंडईचा कचरा निराळा असतो. मानवी वस्तीचा निराळा. तशी बकालीच्या कचऱ्याचीही एक विशिष्ट जात असते. पानाच्या पिचकाऱ्या, बिड्यांची थोटकं, लॉटरी तिकिटांच्या चिंध्या, भुर्जीवाल्याच्या थाळ्या बुचकळलेल्या पाण्याचे तिथल्याच गटारात चाललेले ओहोळ... फाटक्या व्यक्तिमत्त्वाचा, पण आपल्या असण्यानंच कळकट वाटायला लावणारा कचरा. त्यातच कुठेतरी आडोसा धरून संसार मांडणारं एखादं बारकं कुटुंब हळूहळू दिसू लागतं आणि बघता बघता तिथल्या सगळ्या अर्थव्यवस्थेत सहजी विरघळून जातं. तिथेच भिकारी, रात्री उशिरा फिरणार्‍या वेश्या, एखादी पोलीस चौकी, रिक्षास्टॅंड, बसस्टॅंड... सगळं बयाजवार असतं. पण तरीही तिथल्या गर्दीला चेहरा नसतो. थांबायला वेळही नसतो. बारा महिने-चोवीस तास, कुठल्याही ‍ऋतूत, कुठल्याही प्रहरात; येणारे लोक येत असतात, जाणारे जात असतात. आसमंताला एक सळसळता यांत्रिक वेग असतो. पण इतक्या वेगात-उद्योगात बुडलेला असूनही तिथल्या गर्दीचा स्वभाव एखाद्या उडाणटप्पू, मवाली, बेछूट, पोरसवद्या तरुणासारखा असतो. निर्विकार चेहऱ्यानं एखाद्या अश्राप जिवाचा खूनही पचवेल आणि नामानिराळी होऊन खांदे उडवत, एखादी बेपर्वा शिवी हासडत चालती होईल, अशी ही गर्दी. 


आहे ना कचरा-गर्दी-प्रदूषण-वेग यांच्यापेक्षा अधिकचं काहीतरी? असतंच. विकासाची पावलं जिथे जिथे जातील, तिथे-तिथे बकाली हलके हलके पसरत जाणाऱ्या बुरशीसारखी उगवत जाते. कशामुळे? कारणं जरा गुंतागुंतीची आहेत. पण तशी ती कुणालाच नको असते. असल्या बकाल भागात लोक अगदी नाईलाज असला तर नि नाईलाज असेपर्यंतच थांबतात. अशा भागापासून सुरक्षित अंतरावर, ’मध्यमवर्गीय’ वस्तीत, हल्ली ’गेटेड कम्युनिटीज’मधून राहू पाहतात. बोहारणी, फेरीवाले, भिकारी, डोंबारी, कडकलक्ष्म्या तर बादच. जेमतेम घरकामाला येणार्‍या मोलकरणी, वॉचमन, झाडूवाले, स्विगीझोमॅटोची सेवा पुरवणारे डिलिवरीबॉइज… यांनाही आपादमस्तक तपासून, वेळी त्यांची झडती घेऊन नि त्यांच्याकरता लिफ्ट्स वेगळ्या ठेवून कामापुरताच प्रवेश देतात. बकालीला भिऊन असल्यासारखे वागतात…   


आज विषमतेच्या जिवावर का होईना, ही विभागणी शहरांना धकवून नेतेय. शहरांना वाढीसाठी आणि चलनवलनासाठी अत्यावश्यक असलेली ऊर्जा मिळतेय. पण हे कसंबसं धकवून नेणंच आहे, सुखानं नांदणं नाही, बहरणं तर नाहीच नाही. बकालीचं हातपाय पसरणंच की हे, वाळवंटासारखं. आजच लोकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधली अमानुष गर्दी, ट्रॅफिक जॅम्स, धूळ-धूर-आवाज… असह्य झालं आहे. लोक अक्षरशः गुदमरताहेत. रोड रेजच्या रूपानं म्हणा, वाढत्या गुन्हेगारीच्या रूपानं म्हणा - हे ठसठसतं गळू वेडंवाकडं फुटू लागलं आहे. ज्या संधी, सोयीसुविधा, समता यांच्या मोहानं लोक शहरांच्या आश्रयाला येतात; त्याच आपण गमावू लागलो आहोत. शहरांचं शहरपणच आटू लागलं आहे. मागे विकासाची निष्प्राण, अजस्र, क्रूर धुडं उरताहेत… 


याहून अधिक मोठी धोक्याची घंटा काय असेल!


लोकमत, २० जानेवारी २०२६

No comments:

Post a Comment