Tuesday, 11 May 2021

दिङ्मूढ

आपल्यातला ओबडधोबड, अर्धकच्चा जिवंतपणा लोपून 
बघता बघता त्याची जागा घेते एक सराईत सवारी.
भल्याभल्यांना नाही लागत चाहूल.
ऐकू येतात थेट टापाच.
कितीकांना तर त्यांचीच पडते भूल.
हालचालींमधल्या सावध, श्वापदी, 
काळीज लक्कन घशात आणून सोडणाऱ्या
भीतीच्या अणकुचीदार पकडीतून निसटत राहण्याहून,
सोपं वाटतं सेफगेममध्ये दुडकत रमलेलं पाऊल.
फार थोड्यांना दिसतात यातले धोके.
तरीही सवयींचे प्रदेश सोडवत नाहीत, सुटत नाहीत.
पण दिवसाच्या ढळढळीत उजेडात दिवाभीतासारखी दडून बसलेली थोडी शरम,
रात्रीबेरात्री उतरते त्यांच्या अंगणात.
चखणा म्हणून बघावी थोडी चाखून,
इतकीच.
या सगळ्यांहून निराळा
एखादाच कुणी,
अभागी भाग्यवंत
सरावाची आणि सवयींची मैदानं धीरानं मागे टाकून
कसल्याशा अनामिक ओढीनं निघतो
सगळे पाश सोडवून.
कुणास ठाऊक कसल्या धपापत्या स्वप्नाच्या मागावर?
हेमिंग्वेच्या म्हाताऱ्यानं दिलेला शाप विसरून.
शाप की वर?
किनाऱ्यावर आपण दिङ्मूढ होऊन.

Sunday, 9 May 2021

पुस्तके साठत जातात : १

'पुस्तके साठत जातात' नावाची काळसेकरांची एक कविता आहे. तशी साठत गेली आहेत पुस्तकं. पुस्तकांच्या गठ्ठ्यातले कणे बघून एका नजरेत हवं ते पुस्तक बाहेर काढणाऱ्या मला एका पुस्तकासाठी ही उलथापालथ करावी लागली, तेव्हा एक नवाच किडा चावला. लहानपणी अधाश्यानं चवढव न बघता टोपलीभर अन्न चुटकीसरशी फस्त करावं तशी फस्त केलेली पुस्तकं आता निराळी दिसतात का, हे बघण्याचा किडा. पुस्तकं तीच असली तरी आपण तेच नाही. लहान तर नाहीच, उत्कट ताजे-टवटवीतही नाही. तेव्हा भिडलेलं आताही भिडेलच असं नाही. तसंच बेहोशीत वाचलेलं काही अंगावरून वाहून गेलं असेल गद्धेपंचविशीत, आता कदाचित निराळं दिसेल. असं काय-काय वाटत राहिलं. दोन दिवस 'अंगावर काढून' तरीही वाटत राहिलं.

म्हणून घरातल्याच नव्याजुन्या पुस्तकांवरून हात फिरवताना खरडलेल्या नोंदी.

~

माझ्याकडच्या प्रतीवर २०१६ सालातली तारीख लिहिलेली आहे, म्हणजे निदान पाच वर्षं तरी माझ्याकडे उर्मिला पवारांचं 'आयदान' आहे. मी ते कधीतरी वाचल्याचंही मला पक्कं आठवतं. पण पुस्तकात काय आहे याबद्दल डोकं पार कोरं करकरीत. वाचायला घेतलं तरीही वाचल्याचं अजिबात आठवेना. जरा हबकायलाच झालं. पण असे शोध लागणारच, याची खूणगाठ बांधली आणि नव्यानं वाचल्यासारखं वाचलं. 

सगळ्यांत जास्त तीव्रतेनं काय जाणवलं असेल, तर लेखिकेचं स्वतःला कॅज्युअली हसू शकणं. आपल्या फजित्या, चेष्टा, अपमान, आबाळ, काबाडकष्ट... या सगळ्यांकडे पाहण्याची साधीसरळ, मिश्किल नजर आहे बाईंकडे. जातीय अपमान झाल्याच्या आठवणी कमी नाहीत. पण त्याबद्दलही कुठे कडवटपणा बाळगलेला नाही. 'असं अमुक एक माणूस वागलाच कसा?' असा अविश्वास, त्यातून बसलेला धक्का, अपमानानं जळत राहणं... या कशाचाही मागमूस नाही. खणखणीत आत्मविश्वास असलेल्या माणसालाच हे जमू शकतं. 

सांस्कृतिक फरकांकडे बघणारा, उच्चनीचतेचं हलकं पण पक्कं भान असलेला, सपाट पुस्तकीपणा लेखिकेपाशी नाही. तिच्या बिवलकर या शिक्षिकेची थुंकी या गोष्टीकडे बघणारी ब्राह्मणी अधिक 'पुस्तकी शास्रीय' नजर एकीकडे, तर तोंडात खोबऱ्याचा तुकडा चावून, त्याला सुटलेलं दूध आलेल्या पाहुण्याच्या अंगाखांद्याला रगडून, त्याला गरम पाण्यानं न्हाऊमाखू घालणं ही प्रेम व्यक्त करण्याची घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेली रीत एकीकडे. या दोन्ही एकाशेजारी एक मांडताना लेखिका काहीही गुळगुळीत साचेबद्ध पुस्तकी बोलत नाही. 'सुशिक्षित' झाल्यावर कुठेही थुंकण्याची सवय सुटली हे सांगते, बस. कुठल्याश्या आदिवासी जमातीतले लोक विशिष्ट जातीची फळं एकत्र जमून चावून चोथा करतात आणि मग त्या एकत्रित चोथ्यापासून दारू तयार केली जाते, हा मधल्या काळात मी कुठेतरी टिपलेला माहितीचा कण नकळत आठवला.

कोकणातल्या दरिद्री महाराघरच्या खाद्यसंस्कृतीचे तटस्थ नजरेनं टिपलेले तपशील हा फार काळ लक्ष्यात राहील असा आणखी एक भाग. त्यात सवर्ण अन्न आणि दलिताघरचं अन्न यांतल्या सुबत्तेतले मूलभूत भेद नोंदणं आहे, त्याला असलेली विखारी जातिभेदाची किनार आणि त्यातून भोगावी लागलेले अपमान आहेत, परवडणाऱ्या अन्नाचं निकृष्टपण आणि वासा-चवींचा वाढत गेलेला उग्रावा आहे, हे अन्न कमावताना - विशेषतः बायांनी - केलेल्या अमानवी कष्टांचं तपशीलवार चित्रणही आहे. 

लेखिकेचं लग्नानंतरचं शहरातलं मोकळं-सुटवंग जगणं, शिक्षणासह तीव्र होत गेलेलं आत्मभान, लिहिण्यानं सापडत गेलेला सूर, टोकदार होत गेलेला स्त्रीवादी दृष्टीकोन... हे सगळं अपेक्षितच. पण साठनंतरच्या काही दशकांमधल्या आणि बाबरी मशीद प्रकरण होण्यापूर्वीच्या मुंबई शहरात जगलेल्या माणसांच्या मोकळ्या वातावरणात गेलेल्या आयुष्याचा मला किंचित हेवा मात्र वाटला. त्यानं मला चकित व्हायला झालं.

~

पुन्हा वाचायला घेतलेलं शांता गोखल्यांचं 'रीटा वेलिणकर' वाचताना हा हेवा अधिकच गडद होत गेला. 

'रीटा' न आठवण्याचा प्रश्नच नव्हता, नाही. त्यांतली वाक्यंच्या वाक्यं तशीच्या तशी आठवून येत राहिली पुढे वाचण्याआधीच. पण पुस्तकानं मला तरीही गच्च धरून मात्र ठेवलं. त्यातला चिरेबंदीपणा, जहालपणा, शारीरिक गरजांतून येणारं डळमळीतपण निभावून पार होताना रीटानं सर्वार्थांनी कमावलेली प्रगाढ, प्रसन्न शांतता आणि एखाद्या दगडी, थंडगार बांधकामातून खेळवलेलं जिवंत पाणी प्रकटावं, तसं तिच्याभोवतीच्या जिवलग स्त्रियांनी तिच्याभोवती जवळिकीनं केलेलं कडं... सगळं काही तेच, तस्संच खणखणीत. उणं नाही. उलट बदलेल्या मुंबई शहरात आणि स्त्रीवादाची गरज पटवून द्यावी लागत असतानाच्या विपरीत, बधीर आयुष्यात अधिकच अर्थपूर्ण.

~


पुस्तके साठत जातात, जावोत.

Wednesday, 21 April 2021

बोलाफुलाची

एखादा लहानसा नजरानजरीचा क्षण 
सुकलेल्या फुलासारखा.
हळूच खिशात लपवून ठेवायला,
विरघळून जाईस्तो
दिवसचे दिवस बोटांनी चाचपून बघायला,
खूश खूश होऊन 
पुन्हा पुन्हा जगायला,
आवडतं मला.
तुला पुरतात, 
दिसल्या न दिसल्याशा सोबती.
वळून पाहावं,
तर होत्या की नव्हत्या होऊन जाणाऱ्या.
दिवसचे दिवस हुलकावणी देणाऱ्या
गाण्याच्या चालीसारख्या
निसटत्या.
सांग,
कशी पडावी गाठ,
फुलाची 
अन्
बोलाची?

Thursday, 15 April 2021

अपूर्णब्रह्म

दाताखाली आलेल्या घासातला रस

चवीचवीनं गिळत असताना

हातातल्या तुकड्याची ऑटोपायलट मोडवर

प्राणपणानं राखण करताना

पोटातला खड्डा भरत असल्याची

सुखद जाणीव अंगभर अनुभवताना

आपण आहोत आणि नाही त्या क्षणात

हे डोकावून जातं डोक्यात.

तरी चव कळतच राहते.

रस पाझरताना कळतोच गळ्याखाली.

आणि खड्डा भरल्यानं बरंही वाटतं –

तरी काहीच बरं वाटत नाही जगात,

तेव्हा होत असेल का अन्नाचं ब्रह्म?

Saturday, 10 April 2021

आता उद्वेगाची कविता

उद्वेगाची कविता लिहिण्याची हिंमत होत नाही.
'माण्साने' नावाचा अंगार खोदून गेलेल्या माणसानंतर आपण अधिक काय म्हणू शकत असतो?
एकदाचं खरंच माणसानं म्हटलेलं सगळं-सगळं व्हावं,
नि मग चिखलातून एखादं बी रुजून वर यावं इतकं मात्र वाटतं.
आपण चिखल व्हावं
बीच्या पायाच्या पायाच्या पायाच्या तळाशी धुमसणारा, दडपला गेलेला, धपापणारा.
बीच्या पायाच्या पायाच्या पायाच्या तळाशी उबदार, मऊ, जिवंत अंथरलेला..
आपल्यातून उद्वेग उगवू नये,
बीनं उगवावं. 
आता उद्वेगाची कविता लिहिण्याची हिंमत होत नाही.

Thursday, 11 March 2021

इस मोड़ से जाते हैं...

इथेच कुठेतरी आहे ती वाट.
दोन भिंतींच्या मधल्या सापटीत लपून बसलेली. 
तोंडावर एक अजस्र सिमेंटी शिळा घेऊन.
नुसतीच गद्य नाही ती.
त्या शिळेला बघून दचकायला होतं एकेकदा.
धीरानं पाय टाकताना बिचकायलाही.
पण तिच्या रंगरूपाला न बिचकता अलगद तिच्या कुशीत शिरलं,
की जोडीनं फुललेले दोन पळस अवचित सामोरे येतात -
लालबुंद.
मग दिसतेच ती.
लपतछपत लचकतमुरडत नाजूक वळणं घेत जाताना.
तिच्या सोबतीनं पोचतो आपण,
ते एकदम निरोपाच्याच वेळेशी.
पुढे सगळा वैराण माळच.
वाटेवर मात्र...
असो.
पळसाची खूण मनात रुजवून ठेव.
सापडेल मग.
वाट 
आणि
पुढचं 
सगळं...

Tuesday, 2 March 2021

कासवकाळ

अधूनमधून माझ्यातलं कासव डोकं वर काढतं. एकदा त्यानं डोकं वर काढलं की मला गुपचूप पाय पोटाशी घेऊन मान आक्रसून घेऊन कुठल्यातरी अंधाऱ्या कोपऱ्यात दडून बसण्याची अनावर हुक्की येते. खूप इंट्रेस्टिंग कामं, माणसं, कार्यक्रम, मजेच्या संधी, आमंत्रणं असतात. पण कासव पुन्हा तळाकडे सूर मारेस्तो मला कशात गम्य नसतं. आहे मनोहर तरी गमतो मज एकांतवास. दिवसचे दिवस पारोसं लोळून पुस्तकं फस्त करणे, देशोदेशींच्या मालिका बिंजणे, घरातले स्वैपाकघरापासून पुस्तककपाटापर्यंतचे कोपरे आवरणे, टीव्हीवर एकसमयावच्छेदेकरून चारेक सिनेमे लीलया पाहणे आणि एकही आवडतं गाणं वा प्रसंग हुकू न देणे, घरातल्यांसह टीव्हीतल्या गदळ वा अ-गदळ कंटेंटवर मनसोक्त कमेंटा करणे, लाख वेळा पिसून कोपरे झिजलेली गाणी ऐकणे, मोबाईलमधून तासंतास एकास एक गप्पांची लड पेटती ठेवणे... अशा अनेक मजेमजेशीर गोष्टी करता येतात. आपण इतक्या वर्षांचे झालो पण आपल्याला काही जमेना, आपल्याला समंजसपणा येईना, आपल्याला स्वतःचा पैसा स्वतःला नीट मॅनेज करता येईना... अशी कसलीही कल्पित वा सत्य दुःखं करून, उदास गाणी लावून, एकंदर स्वतःचा राग करतो आहोतसं दाखवून, प्रत्यक्षात स्वतःचे लाड करण्यासारख्या निराळ्या मजेशीर गोष्टीही करता येतात. पण लोकसंपर्क ही मात्र त्यांपैकी एक नव्हे. कटाक्षाने नव्हे. कुणी मला या दिवसांत फोन करू नये. मी तो उचलणार तर नाहीच, पण त्याबद्दल मला पश्चात्तापही वाटणार नाही. दाताचं काम चालू असेल, तेव्हाच फक्त टेक्स्ट करणाऱ्या मायक्रॉफ्टच्या बरोबर उलटा असा माझा अवतार असतो. सगळं काही टेक्स्टवर. कुणाशी बोलण्याचे श्रम मला कल्पनेतही सहन होत नाहीत. अशा वेळी घरातलं इंटरनेट हरपू नये, बस. बाकी सगळं निवार्य. हां, पाहुणे सोडून. या कासवकाळात दार वाजल्यानंतर दाराला सर्वांत जवळ असलेली व्यक्ती मी नसेन, तर ते उघडण्याचाही मला कंटाळा येतो. अशा वेळी कुणा पाहुण्यानं अजिबात टपकू नये. त्याला मिळणाऱ्या चहाइतका फुळकवणी चहा त्रिखंडात दुसरा असणार नाही. कॉफी मिळण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. 

Thursday, 25 February 2021

सुरी

'आसमाँनमें... टॅडॅड्यॅंव्.. लाखों तारें...' असं तब्बेतीत गाणाऱ्या नि पोलिसानं शर्टाची इस्त्री घालवली तरी मनावर न घेता दिलखुलासपणे 'क्या साब!' असं विचारणाऱ्या खबऱ्यासारखी स्मार्ट असायची इथली गरिबी.
आता तिच्यात एक कडूपणा आलाय. 
आपण कुठल्या प्रवाहाच्या धारेला लागलो आहोत हेही न कळता चणे नाहीतर कचऱ्याच्या पिशव्या विकू पाहणाऱ्या करकरीत वृद्ध चेहऱ्यांवरचा निष्प्राण भाव झाकोळतो आता अधूनमधून तिच्या चेहऱ्यावर.
गर्दीला त्याची दाद नाही नि आहेही.
पण धावण्याला पर्याय नाही.
'उद्या धावायला बंदी झाली तर?' अशा धास्तीची थंडगार सुरी आहे प्रत्येकाच्या मानेला टेकलेली.

ऐकत राहायला हवं

कुणाचं काही ऐकू नयेसं वाटतं. 
कुणी काही बोलू लागलं तर त्यावर आवाज चढवून आपणच बोलत राहावं वाटतं.
नव्हे, तसं केल्यावाचून राहवतच नाही. 
फक्त आपलाच आवाज ऐकू येत राहतो मोठ्यांदा.
नि तरी समाधान होत नाही,
तहान शमत नाही,
जीव शांतवत नाही.
कशानं हे असं?
कसला राग येतो?
कसले अपमान सलतात?
असतात का ते खरेच अपमान?
आपण स्वतःला मानत असू, तर कोण करू शकतं आपला अपमान?
मग छाताडावर बारामहिनेचोवीसघंटे नाचणारे हे कोणते अपमान?
हे माझ्या मनातच तर जन्माला आलेले नाहीत?
अपमान करणाऱ्यांचा राग?
की या अपमानाच्या भुतांची भीती?
स्वला गाडू पाहणारी?
कसली भीती?
जवळच्यांपासून स्वतःला तोडणारी?
एकटं करणारी?
एकटं राहायला भाग पाडणारी?
कशी करू मात तीवर?
वेळ जाऊ देऊ?
पण धुमसत राहीन मी फक्त.
अधिकाधिक.
राख होऊन उरायचंय का मला?
जगण्याच्या-उरण्याच्या लसलसत्या इच्छेहून का अधिक आहे माझी धुमसण्याची इच्छा?
नाही ना?
मग सोडायला हवी.
भीतीकडे हलकेच मान वर करून बघायला हवं.
जरा थारावला जीव की कशाला भ्यालो आपण, असं हसूही येईल.
मग नाही येणार राग.
मग आजूबाजूचं जग दिसेल.
आपलं.
तोवर मी शांत राहायला हवं. 
कुणाचं काही ऐकू नयेसं वाटलं,
तरी ऐकत राहायला हवं.

Thursday, 4 February 2021

माझ्या स्वैपाकघरात

ओट्यावरचं पाणी निपटून ओटा काळा नितळ करावा.
निवडून, धुऊन, निथळून घेतलेला चवळईचा ताजा पाला सुरीनं बाऽऽरीक चिरावा.
चिरताना कायच्याकाय आठवत राहतं -
इराणी स्वैपाकघरातलं पालेभाज्यांचा भुस्सा करण्याचं ते मजेशीर चक्रीवालं यंत्र,
खारवलेली लिंबं आणि दह्यात मुरवलेल्या मटणाच्या फोडी घालून एकजीव शिजणारी ती रटरटती भाजी,
तिच्यात बुडवून खायला त्या पावासारख्या, पण मर्यादेनंच फुलून आलेल्या गुबगुबीत खमंग खमिरी रोटीचा तुकडा...
आपण कुठे खाल्लीय ती कधी?
कधीतरी एखाद्दा आसुसून बोललो असू त्याबद्दल.
पण तिचा वास येतो मला एकदम...
कधी चहाचं आधण पुरतं उकळण्याआधीच घाईनं त्यात किसलेलं आलं पडतं.
मग उकळी, झाकण, मुरवण...
सगळं बयाजवार करूनही चहाला आल्याचा वास कसा तो नाहीच येत.
'हं. करा घाई.' असं ऐकूच येतं मला तुझ्या आवाजात.
मग चहा होतो तिखट्ट...
कधी मिक्सरचं भांडं धुऊन पुसून आवरताना
बुडाशी ते पुरतं स्वच्छ वाटत नाही.
मग कितीही दमणूक झाली असली तरी त्याच्याच एका पकडीनं ते सगळं प्रकरण सुटं केलं जातं,
खरवडून, घासून, पुसून..
सगळं लख्ख होऊन जागच्या जागी जातं.
आपलं आपल्याला कौतुक वाटत नसतंच काही.
पण मग कौतुकाची निसटती नजर कुणाची ती?
माझी की तुझी?
कधी कोथिंबीर निवडताना हाताची बोटं हुंगली जातात कुणाच्या नकळत.
'मेहके हुए धनिये का ज़िक्र करनेवाली कविता' आपल्या प्रेयसीसाठी लिहू इच्छिणारा पाश आठवतो पाठोपाठ.
आणि मग -
कोथिंबिरीच्या वासासाठी महिनोन् महिने आसुसणं तुझं.
भास, आठवणी, इच्छा, आणि या सगळ्यांचं एखाद्या पिशाच्चासारखं असण्या-नसण्याच्या सीमेवरचं -
चिमटीत न येणारं, निसटत राहणारं, घायाळ करणारं..
अपुरेपण.
सगळं खदखदत राहतं एकजीव होऊन
माझ्या स्वैपाकघरात.