Wednesday, 8 February 2017

मला प्रवास आवडत नाहीत... कंटिन्यूड.


एका प्रकल्पासाठी काही ‍अ‍ॅडिशनल तुकडे खरडले होते. पण प्रकल्प लांबला म्हणताना प्रकाशित करते आहे. मूळची पोस्ट इथे सापडेल. हे त्याचं निव्वळ वाढीव शेपूट आहे.
***

काही जोडमित्रांबरोबरचा एक प्रवास.

जिज्ञासूंसाठी, जोडमित्र म्हणजे - ज्या जोडीतल्या दोन्ही व्यक्ती आपले पहिल्या धारेचे मित्रच असतात. मित्राची बायको किंवा मैत्रिणीचा नवरा (किंवा अजून काही 'नॉन-स्ट्रेट' कॉम्बिनेशन्स) असला अवघड जागचा प्रकार नसतो. अशा प्रवासांत जोडप्याला आपल्या संसाराचं सुखचित्र सदासर्वदा सांभाळत बसायला लागत नाहीत आणि परिणामी बोलण्यातला करकरीतपणा पुष्कळ कमी असतो.

तर अशा दुर्मीळ प्रवासांपैकी एक प्रवास.

एका ठिकाणी एका मित्राकडे पुख्खा झोडणे, मग तिथून दुसर्‍या ठिकाणी तिसर्‍या मित्राला गाठणे, मग सगळे मिळून अजून कुठेतरी घरंगळायला जाणे, असा वायझेड भरगच्च कार्यक्रम होता. पण दोन मित्रजोड्यांच्या हाती स्वतःचे रथ असल्यामुळे प्रकरण साग्रसंगीत चालू असलेलं. काही कारणानं या रथातली काही मंडळी त्या रथात, पुढच्या संकेतस्थळी भेटायच्या आणाभाका असं काहीतरी नेहमीप्रमाणे कडबोळं झालं. त्यात झालं असं, की जोडमित्रांपैकी एका जोडीतली पत्नी-मैत्रीण आणि दुसर्‍या जोडीतला पती-मित्र असं रसायन आमच्या रथात आलं. सारथी पती-मित्र गाडीतला एकुलता एक पुरुष.

वाटेत लागली एक नर्सरी.

'बायकांना अमुक आवडतं' आणि 'पुरुष मेले हे अस्सेच'छापाच्या सेक्सिष्ट कमेंटांना आमच्यात अस्पृश्य मानतात हे जरी खरं असलं, तरी काही ठिकाणी मी मनातल्या मनात शरमिंदी होऊन स्टिरिओटायपांना शरण जात असते हे कबूल केलं पाहिजे. मातीची भांडी आणि बहरलेली झाडं एकत्र विकणारी हमरस्त्याच्या काठची तंबूसदृश दुकानं हे अशांपैकीच एक ठिकाण. वास्तविक तिकडून आणलेली एकूण एक गुलजार झाडं माझ्या आळसापोटी पाण्याविना तडफडवून मी यथावकाश निजधामाला धाडली आहेत (होय, निवडुंगसुद्धा. असो. असो.) आणि तिथून 'अस्सं रंगवू' नि 'ढमकं करू, मग भार्री दिसेल' असले बेत करत आणलेली सगळी किडूकमिडूक कुटिरोद्योगी भांडी काही महिने धूळ खाऊन माळ्याची वाट चालू लागली आहेत, हेही कबूल केलं पाहिजे.

पण तरीही - तरीही - त्या त्या क्षणांचा मोह असतोच.

अशाच सामुदायिक मोहापुढे सारथी पती-मित्रानं गुडघे टेकले आणि गाडी थांबवली. एकदा गाडी थांबवल्यावर मग काही झाडं, काही कुंड्या, काही चित्रविचित्र आकारांच्या घागरी, काही मातीचे दिवे… अशी भरगच्च खरेदी झाली. 'याला द्यायला हुईल..', 'ते तुझ्या नव्या घराला हुईल..', 'हे बाहेर टांगून काय दिसेल नई?' असं चीत्कारत, घासाघीस करत, वर्तमानपत्री प्याकिंगं करत - निघेनिघेस्तोवर तासभर सहज उडाला.

पुढच्या संकेतस्थळी पत्नी-मैत्रिणीचा जोडीदार खोळंबलेला. त्याचे साडेतीन फोन तरी येऊन गेलेले आणि दुर्लक्ष्यून मारलेले. गाडीत बसता बसता मी थोडं अपराधीपणे आणि थोडं मित्राच्या काळजीपोटी धास्तावत तिला विचारलं, "फार वैतागला असेल का गं तुझा नवरा?"

त्यावर एरवी सर्वगुणसंपन्न, मनमिळाऊ आणि आदर्श वर्तन करून मला शरमायला लावणारी आणि नुकतीच हजारेक रुपयांची अक्षरशः माती केलेलीे माझी शालीन सखी उत्स्फूर्तपणे उद्गारली, "नवरा गेला खड्‍ड्यात!"

गाडीत सेकंदभराची टाचणीस्फोट शांतता आणि मग हसण्याचा स्फोट.

चिकार हसलो. तरी पुढे काही समरप्रसंग उद्भवतो का, अशी हलकी धास्ती माझ्या मनात. पण उद्गारकथन होऊनही, तो उद्भवला नाही, तेव्हा मी दोघांनाही मनातल्या मनात बढती देऊन टाकली.

अर्थात. 'नवरा / बायको गेला / गेली खड्ड्यात' असं म्हणून आला क्षण मनसोक्त साजरा करणारे किती जोडमित्र भेटतात आपल्याला एका आयुष्यात?

***

आणि एक परदेशवारी. नवर्‍याच्या एका प्रोजेक्टानिमित्त मैत्रीण तिकडे वर्षभरासाठी गेलेली आणि आम्ही तिच्या शेपटाला धरून मुक्कामाचे पैसे वाचवून भटकंती करायला तत्पर. तिच्या नवर्‍याशी तशी पूर्वमैत्री नव्हती. पण गडी भलता सालस आणि उत्साही निघाला. आम्हांला आडवाटेच्याही गोष्टीही पाहता याव्यात म्हणून पदरचे पैसे आणि वेळ खर्चून धडपडणारा.

मजेचा, अपूर्वाईचा असला; तरी तो प्रचंड दमवणारा प्रवास होता. सकाळी कसंबसं आवरून आठाला बाहेर पडत असू ते रात्री साडेअकरा-बारा वाजता कधीतरी घरंगळत-कुडकुडत घरी पोहोचत असू.

त्या प्रवासातला शेवटचाच टप्पा. आम्ही सगळेच सैलावलेले, दमलेले, पण आनंदलेले. उद्या कुठेही न भटकता गावातल्या गावात चक्कर मारू, गप्पा ठोकू, लोळू आणि सामान आवरू, असा साधासरळ बेत. त्या दिवशी सकाळपासून आमच्या सालस साल्याला कुणाची तरी नजर लागली. 'येताना पुरणपोळ्या का आणल्या नाहीत?' या प्रश्नाच्या निदान तीसेक हजार आवृत्त्या त्यानं निरनिराळ्या प्रकारे आणि निरनिराळ्या सुरात आम्हांला ऐकवल्या. होमसिकनेस असेल; आम्ही जाणार आणि मग पुढे रिकामा, परदेशातला, थंडीतला वीकान्त पुढे ठाकणार म्हणून आलेलं धास्तावलेपण असेल; आठेक दिवसांत झालेल्या मैत्रीतून आलेला मोकळेपणा असेल…. पण ऐकेचना. मला एकीकडून त्याचा डिफेन्स मेकॅनिझम कळत होता. पण मीही प्रवासाच्या अखेरच्या टप्प्यात. डोकं चढायला लागलं.

याचा एकच धोशा - 'ये० पु० पो० का आ० ना०?'

मैत्रीण बिचारी कानकोंडी झालेली.

शेवटी काय किडा चावला मला कुणास ठाऊक. दुसर्‍या दिवशी रामप्रहरी जनता साखरझोपेतून उठायच्या आत गरम कपडे चढवून कोपर्‍यावरचा अफगाणी वाणी गाठला. चण्याची डाळ, गूळ, थोडी वेलची, कढीपत्ता आणि मैदा पैदा केला. त्या साहेबी स्वैपाकघरात पुरण शिजवण्यासाठी पुरेशी मोठी भांडी मिळवणं आणि मग ते प्रकरण वाटणं हे करताना मी मराठी खाद्यसंस्कृतीच्या नावे भ-राग आळवला. पण दोनेक तासांच्या खटपटीनंतर रीजनेबली खाणेबल अशा पुरणाच्या पोळ्या आणि बटाट्याची भाजी उत्पन्न केली.

साल्याचा चेहरा बघून सगळ्या खरकट्या उपद्व्यापाचं सार्थक झालं. बाई आणि स्वैपाक आणि सुगरणपणा आणि स्त्रीवाद यांच्याशी संबंधित सगळे स्टिरिओटाइप्स पुरून स्वतःच्या हातचं कौशल्य जोपासल्याचंही.

आता बहुतेक तो आणि मी मिळून एखादं पोळी-भाजी केंद्र सुरू करू. देशात की परदेशात, ते अजून ठरायचंय!

Saturday, 4 February 2017

मग फुलं उमलतील

एकच एक लालबुंद तीक्ष्ण रेशीमधागा
ओवलेला सगळ्यातून.
दिसतोही लोभस तो.
कुठल्याच रंगाशी विजोड दिसत नाही.
मृगाचा किडा सोडावा कुठेही आणि त्याची रेशमी, जिवंत चमचम भरून घ्यावी नजरेत,
तरी मन भरूच नये
तसं काहीतरी.
एरवी सुटं सुटं होऊन,
घरंगळून गेलं असतं वाटेत
हळूहळू,
असं बरंच काही साधंसुधं-सुती,
काही कलाबतूसारखं भरजरी,
काही दणकट दमदार उत्कट वासाचं,
काही थोडं अप्रिय,
काही कृत्रिम पोताचं,
काही अंगासरशी घट्ट वेढून बसेल असं...
सगळं त्या धाग्यात
जोडलं गेलेलं.
सगळीभरून सळसळत गेलेला चमकदार सर्प असावा,
पार दिसेनासा झाला तरी ऊर धपापत राहावा,
थांबूच नये,
तसं काहीतरी.
दचका भरवणारं, पण अतीव आकर्षक.
सोसत नाही...
आता हळूहळू
धाग्यानेही विरत, सुटवंग होत जावं.
सुटं करून वाटभर विखरून टाकावं
सगळं ओवून घेतलेलं.
गाठी सुटाव्यात.
रंग फिके व्हावेत, ओसरावेत.
वेढे सैल पडावेत.
धाग्यानं धागा उरू नये...
मग
फुलं उमलतील.

Thursday, 19 January 2017

थँक्स शरलॉक, गुड बाय!

हा समीक्षालेख नाही. समीक्षा करायला काहीएक तटस्थता कमवावी लागते, ती निदान या बाबतीत तरी माझ्यापाशी नाही. किंबहुना ती गमावण्याच्या प्रक्रियेबद्दल आभार मानण्यासाठीच हे टिपण आहे.


एखाद्या गोष्टीला पूर्ण - कधीकधी अगदी पक्षपाती होऊन! - न्याय देऊन हवा असेल, तर मी त्या गोष्टीत भावनिकरीत्या गुंतणं आवश्यक असतं. गोष्टीत घटना काही का घडेनात - त्यातली माणसं जिवंत, हाडामांसाची, आपलं स्वयंभू भावविश्व असलेली, लेखकाला आणि वाचका-प्रेक्षकाला बिलकूल न जुमानणारी भासावी लागतात. त्यांच्या आनंदादुःखाच्या कल्पनांनी मलाही सुखदुःख व्हावं लागतं. थोडी मी त्यांच्यात, थोडी ती माझ्यात येऊन रुजायला लागतात. असं झालं, की मग गोष्ट माझी होते. मी त्यांची भाषा शिकते. त्यांच्या जगातल्या बारीकसारीक तपशिलांकडे निरखून-पारखून-पुन्हापुन्हा वळून-वाकून पाहते. त्याबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या निर्णयांचे आणि अनिर्णयांचे अन्वयार्थ लावून पाहते. त्यामागच्या गुंतागुंती समजून घेऊ पाहते. कुणाची बाजू घेते मनातल्या मनात, कुणावर चिडते. कुणाचा लटका राग येतो, कुणाला पाहून पाठीतून भीतीची थंड शिरशिरी दौडत जाते.


सगळं खोटं, कबूलाय. पण खोटं आणि खरं, या तशाही अतिशय सापेक्ष संज्ञा नव्हेत का?


हे सगळं अर्थातच 'शरलॉक'च्या बाबतीत झालं. माझ्या डोक्यात आहेत याची कल्पनाही न देता दडून असलेले अनेक प्रश्न मला त्या गोष्टीनं अलगद दाखवले. काही सोडवून दिले, काही सोडवायला पुरेशी गुंतागुंत असलेला पैस तयार करून दिला, काहींसाठी पैस आखायला लागणारी आयुधं आणि ताकद आणि हिंमत दिली. काही सैल, ढोबळ चुकाही केल्या. पण त्या होईस्तोवर मी गोष्टीत पुरती गुरफटले होते. गोष्टीमागची गोष्ट रचू पाहायला पुष्कळ माया सोडून तिनं मला थोडी माफी दिली होती, मीही तिला सहज माफ केलं. भलेही ती रहस्यंं सोडवणारी आणि सनसनाटी पोलीस-टाइम्सी प्रकारातली का असेना, बघणार्‍याची नजर जर सूक्ष्म असेल; तर तिला गोष्टीमागची माणसं नीट दिसतात. कॅमेर्‍याच्या डोळ्याचा सर्वस्पर्शी वापर करून घेत, शब्दबंबाळपणा टाळत, पात्रांच्या इतिहासभूगोलाच्या खुणा गोष्टीतून बघता बघता अवतरायला लागतात. त्यांचा गोष्टीवर आणि गोष्टीचा त्यांच्यावर परिणाम होत असतो. एक जिवंत धपापणारं जग श्वास घ्यायला लागतं...

हे सगळं होताना मी अनुभवलं.


पात्रांच्या मोडण्या-वाढण्या-घडण्यासोबत मीही पावलं टाकली.  एखाद्या दीर्घ ऐसपैस ग्रंथाच्या काठाकाठानं रानोमाळ भटकावं; पायवाटा-घळी-डोह समजून घ्यावेत; खुद्द ग्रंथाच्या कथानकाइतकंच आजूबाजूचं विस्तीर्ण, आडवंंतिडवं रान निरखावं-पचवावं; थोडी डायवर्जनं घ्यावीत; आत फेरफटका मारून पुन्हा धारेला लागावं... असं मी अनेक वार, अनेक बाबतींत केलं. इंग्रजी समाजाच्या चालीरीती आणि त्यांच्या आधुनिक पॉपकल्चरची चव, पुस्तकांमधून न भेटणार्‍या भाषेमधल्या नजाकती, अभिनयामधले बारकावे, हीच पात्रं यापूर्वी रंगवणारे अभिनेते आणि त्यांच्या आवृत्त्यांमधली खुमारी, छायांकनाच्या जगातली निरनिराळी तंत्रं, फॅनफिक्शनसारख्या अनवट गोष्टींशी झालेला परिचय, त्यानिमित्ताने सामोरं आलेलं संपूर्ण निराळं जग, त्याचा मराठी साहित्याशी घातलेला ताळमेळ, संगीताचा निराळा पोत, टम्ब्लरसारख्या ठिकाणी नांदणारी फॅनडम्स आणि त्यांची पॉडकास्ट्स, त्यातल्या गप्पांचा पोत आणि तीव्रता, त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे विषय आणि त्यांची भाषिक - सामाजिक -राजकीय -लिंगभावविषयक सजगता, या सगळ्यांंशी आपल्या अनुभवविश्वाशी सांगड घालताना मनात येणार्‍या तुलना, गंड, त्यांवर मात करायला केलेले युक्तिवाद आणि बदल आणि प्रयत्न.... आणि पुन्हा-पुन्हा-पुन्हा-पुन्हा कथानकाच्या धारेला लागत आशा-निराशा अनुभवत अशी वळणं-वाकणं घेत राहणं.


हा एक समृद्ध करणारा अनुभव होता. अर्थात, माझ्या कल्पनारम्य जिवंत मेंदूच्या अस्तित्वाशिवाय हे शक्यच नव्हतं. पण - हे असं एखाद्या टीव्ही मालिकेच्या बाबतीतही होऊ शकतं, हे मी अलीकडे विसरलेच होते. 'शरलॉक'नं तो एक जुनाच पायंडा नव्यानं पाडून दिला. यापुढच्या अशा सगळ्याच चांगल्या गोष्टींमध्ये मी इतकी गुंतीनच असं नाही. उपलब्ध वेळाची आणि आपल्या मूड्सची आणि आपल्या रसविषयांची कुंपणं मला पडणार आहेतच. आणि तरीही, माझ्याच जिवंतपणाचा पुरावा मला नव्यानं मिळून, मी थोडी अधिक माणसाळले मात्र आहेच.


आपल्याला अशा प्रकारे माणसाळवणार्‍या कोणत्याही गोष्टीचे, गाण्याचे, माणसाचे, वस्तूचे, चित्राचे, जागेचे, भाषेचे वा संकल्पनेचे आभार मानायचे असतात.

त्याला स्मरून - थँक्स शरलॉक, गुड बाय!

Wednesday, 18 January 2017

बाई - विजयाबाईंचा कॅलिडोस्कोपिक वेध



बाई : एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास
संपादन : अंबरीश मिश्र
राजहंस प्रकाशन


एखाद्याचं आत्मवृत्त ('लमाण' - डॉ. श्रीराम लागू) किंवा निरनिराळ्या व्यक्तिसापेक्ष कोनांतून इतरांनी रेखाटलेलं त्याचं व्यक्तिचित्र ('तें आणि आम्ही') या दोन्ही घाटांची पुस्तकं मराठी नाट्यवर्तुळात आहेत. खुद्द विजयाबाईंचं आत्मचरित्र 'झिम्मा' काही वर्षांपूर्वीच प्रकाशित झालं आहे. 'बाई' मात्र या बाबतीत काहीसं संमिश्र आहे. पुस्तकाचे तीन विभाग आहेत. बाईंचं घराणं, बाईंची गँग आणि बाईंचा स्नेहपरिवार. त्यात निरनिराळ्या गोष्टी आहेत. विजया राजाध्यक्ष आणि महेश एलकुंचवार यांनी विजयाबाईंची घेतलेली एक दीर्घ मुलाखत आहे. किशोरी आमोणकर यांनी बाईंवर लिहिलेलं एक टिपण आहे. विजयाबाईंच्या सहकलाकारांनी (भास्कर चंदावरकर, महेश एलकुंचवार), त्यांच्या आप्तांनी त्यांच्याबद्दल लिहिलेले लेख आहेत. त्यांत काटेकोर, अलिप्त परीक्षण आहे; तसाच आत्मीय भावही आहे. विजयाबाईंच्या शिष्यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेले लेख आहेत. तशीच स्वतः विजयाबाईंनी वेळोवेळी रेखाटलेली व्यक्तिचित्रं आणि काही कामाची टिपणंही आहेत. हा संमिश्र घाट हेच या पुस्तकाचं वेगळेपण आहे. त्यामुळे त्याला एखाद्या कॅलिडोस्कोपचं रूप आलेलं आहे.


विजयाबाईंचं कोणतंही लहानसं काम, त्यांचं भाषण किंवा त्यांची लहानशी मुलाखतही पाहणार्‍या माणसाच्या नजरेतून त्यांची बोटं सुटत नाहीत. त्या बोलत असतात, ते अर्थातच अतिशय महत्त्वाचं, नेमकं असंच असतं. पण ऐकणार्‍याची नजर त्यांच्या हातांच्या बोटांवर खिळून राहते. तंत्रविद्या जाणणार्‍या एखाद्या गूढ स्त्रीनं आपल्याला तिच्या वर्तुळात खेचून घेण्यासाठी कराव्यात, तशा त्या हालचाली. भारून टाकणार्‍या, झांजावणार्‍या, समारंभी लवाजमा असलेल्या दिमाखदार खेळाची आठवण व्हावी, असं विजयाबाईंचं व्यक्तिमत्त्व त्यांतून दिसत राहतं. बघणार्‍याची नजर खिळवून ठेवणारी, 'लार्जर दॅन लाइफ' भासणारी, हीच जादू चिमटीत पकडणारं असं या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे. जांभळ्या किनखापी पार्श्वभूमीवर तीव्र गुलाबी रंगाची झळाळती उधळण करणारी 'बाई' ही ठसठशीत प्रवाही अक्षरं. त्यातलाही 'बा' पूर्ण न दिसणारा आणि त्यामुळे पहिल्या कटाक्षात 'आई' या शब्दाची आठवण करून देणारा.



सुभाष अवचटांचं हे मुखपृष्ठ आपलं काम चोख करतं. पुढे पुस्तकातही किरमिजी रंगाच्या ठसठशीत खुणा मांडणीतून भेटत राहतात आणि पुस्तकाला देखणं रूप देतात.


या पुस्तकाला एखाद्या भावगीताचं सुनीतसौंदर्य आहे असा दावा करणार्‍या संपादक अंबरीश मिश्र यांची प्रस्तावना वाचताना मात्र थोडं बिचकायला होतं. 'झिम्मा'नंतर हे पुस्तक अधिक काय देऊ शकेल या प्रश्नाचं उत्तर या प्रस्तावनेतून हाती लागेल अशी अपेक्षा असते. पण दुर्दैवानं ती पुरी होत नाही. पुस्तकातल्या अनेक लेखांची एक आढावावजा जंत्री तेवढी प्रस्तावनेत आहे. काही वेळा भाबडा भक्तिभाव मजकुरात डोकावतो हे खरं. सुदैवानं तो अळूवडीच्या सारणाप्रमाणं पानभर पसरत नाही या भीषण उपमेपलीकडे ही प्रस्तावना जात नाही.  


भास्कर चंदावरकर यांचा दीर्घ लेख अतिशय तटस्थ म्हणावा असा. विजयाबाईंच्या नाट्यकारकिर्दीचा आढावा घेताना त्यांची नजर अगदी वेगळ्या गोष्टी टिपते. बाईंच्या नाटकांमधली बदलत गेलेली दृश्यात्मकता किंवा निरनिराळ्या राजकीय जाणिवांची नाटकं करताना त्यांनी त्यातून काय मिळवलं आणि काय दिलं याचा हिशेब. त्यांना आलेल्या अपयशाची नोंद जशी या लेखात आहे, तसंच त्यांच्या झगझगीत यशामागे कोणता हट्ट असेल आणि त्यानं काय नुकसान झालं असेल, त्याबद्दलचा अंदाजही. या लेखात एक अतिशय सूचक वाक्य येतं : … ही संपूर्ण निर्मितिप्रक्रिया मी सुरक्षित अंतरावरून अनुभवलेली आहे…. मी जेव्हा ते सुरक्षित अंतर सोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मलाही त्याची झळ लागलेली आहे! याच वाक्याचं बोट धरून पुढे त्याचा विस्तार करत जावा, असा महेश एलकुंचवार यांचा बाईंबद्दलचा लेख. एक नाटककार आणि एक दिग्दर्शक यांच्यातल्या समृद्ध देवाणघेवाणीची चुणूक या लेखातून मिळते. एकमेकांसोबत काम करण्यातून प्रचंड समृद्ध करणारं काही गवसणं, त्यानं भारून जाणं, काही ना काही निमित्तांनी लांब जाणं, निराश होणं, प्रगल्भ व्यक्तीनं त्यांतल्या अपरिहार्यता स्वीकारून देवाणघेवाण सुरू ठेवणं… असे अंतराच्या खेळाचे अनेक तुकडे या लेखातून दिसतात. हे दोन्ही लेख पुरेशा तटस्थपणे बाईंकडे पाहतात. त्यांनी प्रायोगिक रंगभूमीवर अजून काम करायला हवं होतं, असं सुचवतात आणि मग त्याखेरीजही जे साधलं त्यातला मोठेपणा स्वीकारतात.


दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे बाईंची मुलाखत. अशा प्रकारची दीर्घ मुलाखत हे या प्रकारच्या पुस्तकाचं वैशिष्ट्यच मानायला हवं. बाईंच्या कामामागच्या प्रेरणा, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांतून हाती आलेलं यशापयश, त्यामागची कारणं आणि त्यांचे परिणाम….असे अनेक प्रश्न आणि त्यांतून उलगडत जाणारे बारकावे या मुलाखतीत आहेत. 'मी खर्‍या अर्थी प्रोफेशनल कधी झाले नाही. मी सतत आई, सून, बायको आणि हे सगळं सांभाळून काम करणारी बाई राहिले' असं चकित करणारं एक वाक्य या मुलाखतीत येतं. दिवसाचे सोळा-सोळा तास काम करणारी, चारेक तास झोप घेऊन तालमीच्या हरेक दिवसाची टिपणं काढणारी, नाटक स्वीकारल्यावर त्यात सर्वस्वानं झोकून देणारी, नाटकात योग्य वातावरण उभं राहावं यासाठी आपल्या सांस्कृतिक मर्यादा ओलांडत माणसं समजून घेऊ पाहणारी ही बाई जर स्वतःचं मूल्यमापन असं करत असेल, तर तिचा परिपूर्णतेचा ध्यास काय तीव्रतेचा असेल, असा प्रश्न वाचताना पडतो. मात्र या मुलाखतीबद्दल एक मोठी तक्रारही आहे. सहसा अशा मुलाखती ध्वनिमुद्रित केल्या जातात आणि नंतर त्यांची अक्षरप्रत (transcript) तयार केली जाते. तशाच प्रकारची ही मुलाखत आहे. मात्र बोलण्याच्या ओघात माणूस एकाहून अधिक भाषांमध्ये बोलतो, बोलताना संदर्भ थोडे मागेपुढे होतात, समजून घेतले जातात. अक्षरप्रत तयार करताना त्या मजकुरावर प्राथमिक संस्करण करणं अपेक्षित असतं. ते न केल्यास - युअर फिजीक हॅज टू रिअ‍ॅक्ट टू इमोशन. आय फील अ माईंड दॅट इज सेन्सिटिव्ह कॅन रिअ‍ॅक्ट. हे फार महत्त्वाचं आहे. अभिनयाच्या दृष्टीनं, अभिनयाच्या शिक्षणाच्या दृष्टीनं, डोंट सी, लुक, आय काँटॅक्ट महत्त्वाचा. कारण देअर इज नथिंग लाइक अ‍ॅक्टिंग, इट इज रिअ‍ॅक्टिंग. डोट हिअर, लिसन, डोंट टॉक... - या प्रकारचा मजकूर तयार होतो. वाचताना त्यामुळे रसभंग होतो. विशेषकरून पुस्तकात इतर तीन अनुवादित लेख असताना, या मुलाखतीवरून मात्र अनुवादकानं एकही हात न फिरवण्याचं नक्की काय कारण असेल, असा प्रश्न सतत पडत राहतो.


तिसरा भाग म्हणजे पीटर ब्रुकनं सादर केलेलं महाभारत पाहून खुद्द विजयाबाईंनी त्यावर लिहिलेलं टिपण. हे टिपण म्हणजे या पुस्तकाचा मानबिंदू आहे. सलग १२ तास चालणार्‍या त्या महाभारतातले झगमगाट टाळणारे, पण साधेपणातून महाकाव्याचा भव्य-उदात्त भाव जागा करणारे, अनेक विलक्षण नाट्यक्लृप्त्या वापरून जिवंत केलेले प्रसंग पाहून विजयाबाई लिहितात : .. रंगभूमीचं काल्पनिक जग स्वतःचं असं एक वास्तव आणि सत्याचा एक वेगळाच अर्थ निर्माण करतं. कदाचित त्यात नेहमीचे रूढ नाटकीय डावपेच नसल्यामुळे ते जास्तच परिणामकारक झालं होतं. आपल्या अ-नागर आणि आदिवासी रंगभूमीच्या परंपरेत अशी अनेक उदाहरणं सापडतात. आपल्या शहरी मनाला जे चिकित्सकपणाचं तार्किक वळण लागलेलं आहे; त्यामुळे आपण रंगभूमीच्या कृत्रिम, भपकेबाज आणि दिखाऊ कल्पनांकडे वळतो. त्यात आपण वास्तवाची नक्कल करायला जातो आणि सत्य नेमकं निसटूनच जातं. अस्सल भारतीय पद्धतीनं वास्तववाद समजून घेणार्‍या विजयाबाईंच्या कामाचा आत्माच इथे सापडतो. त्यांची नाटकाबद्दलची संवेदनशीलता आणि ती नेमकेपणानं, साधेपणानं टिपणारी भाषा - हे दोन्ही अनुभवण्यासाठी वाचावंच, असं हे टिपण.


'विजयाबाईंची गँग' या भागात त्यांच्या अनेक शिष्यांचे, सहकलावंतांचे लेख आहेत. हा भाग काहीसा कमी चोख आणि पुनरावृत्त झाल्याचं नोंदलं पाहिजे. बाईंच्या कारकिर्दीचा आढावा, आणि त्यांचा परिपूर्णतेचा ध्यास, त्यांचं दिमाखदार व्यक्तिमत्त्व, त्यांची प्रज्ञा यांमुळे भारून गेल्याचा भाव या दोन्ही गोष्टी आलटून पालटून अनेक लेखांतून दिसत राहतात. एक समान सूत्र याही लेखांतून जाणवतं. ते म्हणजे नाटक या एका गोष्टीसाठी माणसांना सहज आपल्या वर्तुळात ओढून घेणारा, अकृत्रिम प्रेमानं त्यांना जिंकून घेणारा, प्रसंगी त्यांना फटकारणारा आणि तरीही आपलं असं अंतर राखून असणारा विजयाबाईंचा स्वभाव. त्यातून त्यांच्या शिष्यांमध्ये तयार होणारी अधिकारवृत्ती (possessiveness) कधीकधी अतिशय लोभस वाटते, तर कधीकधी करुण. मंगेश कुळकर्णींचा लेख ('मला कधीही गंज चढणार नाहीए') या संदर्भात विशेषकरून वाचावा असा. जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेशपरीक्षेला जायला कुळकर्णींना एक दिवस उशीर झाला. त्यामुळे त्यांचं वर्ष फुकट जाऊ नये, म्हणून स्वतः विजयाबाई कुळकर्णींच्या वतीनं रदबदली करायला कॉलेजात जाऊन पोचल्या, असं नोंदून कुळकर्णींनी बाईंमधल्या आईपणाबद्दल सांगितलं आहे.


विजयाबाईंच्या यजमानांची - फारोख मेहता यांची - एक मिश्किल मुलाखतही याच भागात आहे. तिच्यातला नर्मविनोद अनुवादातही चोख उतरला आहे.


शेवटच्या विभागात आहेत स्वतः विजयाबाईंनी रेखाटलेली व्यक्तिचित्रं. त्यांतलं दामू केंकरे यांची चित्रण अतिशय बहारदार, जवळिकीचं असं. दामू केंकरे यांच्या प्रेमविवाहाच्या वेळी त्यांच्या भावी सासूबाईंनी या लग्नाबद्दल झापलं, ते केंकर्‍यांना नव्हे - तर त्यांच्या जवळच्या मैत्रिणीला - विजयाबाईंना. प्रेम करायचं दामूनं आणि शिव्या खायच्या मी असं विजयाबाई यात मिश्किलपणे म्हणतात. या आणि इतर लेखांतही त्यांचं तटस्थ मिश्किलपणे स्वतःसकट सगळ्यांकडे पाहणं दिसत राहतं.

मुद्रितशोधनातल्या काही बारीक चुका, अनुवाद करताना मूळ वाक्य न लपवणारी काही खड्यासारखी वाक्यं, थोडी पुनरावृत्ती; असे काही बारीकसारीक दोष पुस्तकात आहेत. पण त्यांकडे दुर्लक्ष्य करून वाचावं असं आणि इतकं हे पुस्तक देऊन जातं, यात शंका नाही.


***

'बाई' या अंबरीश मिश्र यांनी संपादित केलेल्या, विजया मेहता यांच्यावरच्या, पुस्तकाचा रसग्रहणात्मक परिचय जानेवारी 2017च्या  'अनुभव'मध्ये प्रकाशित झाला आहे.

***
मुखपृष्ठ : जालावरून साभार

Thursday, 15 December 2016

मला नाही येत कवितेची भाषा

मला कविता लिहिता येत असती, 
तर लिहिली असती मी कविता.
तांबडं फुटतं तेव्हाच्या उजेडात, 
आपला निळा रंग दडवून ठेवणाऱ्या, 
काळ्यासावळ्या गुमसुम खंड्याबद्दल.
मनगटाएवढाले ताकदवान झरे पोटात रिचवत, 
स्वतःत चूर होऊन बसलेल्या, 
खोलावत जाणाऱ्या, 
गूढ, 
ऐसपैस विहिरीबद्दल.
काळ्याशार फरश्यांचा गारवा मुरवत, 
झोपाळ्याच्या कड्या कुरकुरवत, 
खिडकीच्या गजांच्या मंद सावल्या अंगाखांद्यावर झुलवत, 
गुडघ्यावर हनुवटी टेकवून बसलेल्या 
पोक्त घराबद्दल.
विनापाश होत जाण्याच्या वाटेवरल्या कुण्या निस्संगानं 
निरपेक्ष अनपेक्षितपणे हाती दिलेल्या, 
नखाएवढ्या रानफुलाबद्दल.
साध्यासुध्या, 
बोलता-बोलता विचारात पडण्याची ताकद न गमावलेल्या, 
बोलक्या-हसऱ्या-खोल डोळ्यांच्या माणसाबद्दल.
पण काय करू?
मला नाही येत कवितेची भाषा.


Wednesday, 30 November 2016

राजकीय आणि अराजकीय

काही विशिष्ट माणसांबद्दल आज मी थोडी निरीक्षणं मांडणार आहे. आपला आणि राजकारणाचा काय संबंध बुवा (किंवा बाई) असा त्यांचा अतिशय मनापासून आणि निरागस वगैरे समज असतो.

ही माणसं सर्वसाधारणपणे सवर्ण आणि आकर्षक आणि मध्यमवयीन तरुण वगैरे असतात. खाऊन्पिऊन्तृप्त-अंगानं भरलेली-तरीही-शेलाटी (पुरुषमाणसं असल्यास हीच विशेषणं थोडी फिरवून वापरावीत. खाऊन्पिऊन्तृप्त-पोट-किंचित्सुट्लेलं-गृहस्थी देखणेपणा) इत्यादी त्यांचं रुपडं सहसा आढळतं.

त्यांना एखादा बॉयफ्रेंड असतो. किंवा एखादा नवरा. (नाही. पुरुष असल्यास गर्लफ्रेंड किंवा बायको वाचावं. त्यांना बॉयफ्रेंड अथवा नवरा नसू शकतो, त्या प्रकारची 'उत्च्छृंखल' आधुनिकता यांच्यात नसते. माझी पैज लावायची तयारी आहे.) ते पारंपरिक, पारंपरिक देखणे आणि पारंपरिक पुरुषी असतात. (बरोबर, गरज पडल्यास लिंगपालट करून घेणे.) लग्न झालेलं असल्यास त्यांना किमान एक मूल असतं. हे लोक एकाच वेळी अतिशय आधुनिक असतात आणि त्याच वेळी तितक्याच उत्साहाने पारंपरिक. त्यांना टीव्ही सिरियली (पु० असल्यास - क्रिकेट) बघायला आवडतात आणि त्यांची टवाळी करणंही आवडतं. त्यांची मुलं प्रचंड टीव्ही पाहतात. मात्र त्यांच्या मुलांनी चुंबनदृश्यं आणि उघड्या अंगाचे स्त्रीपुरुष, होमोसेक्शुऍलिटीचे कोणतेही उल्लेख आणि गरीब लोकांनी दिलेल्या शिव्या पाहता कामा नयेत याबद्दल ते दक्ष असतात. होय, श्रीमंत लोकांनी दिलेल्या शिव्या चालतात. किंबहुना त्या हव्यातच, शक्यतोवर इंग्रजीतू्नही हव्यात याबद्दलही ते दक्ष आणि कौतुकोत्सुक असतात. त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा आत्मविश्वास आणि विशिष्ट प्रकारचा गंड यांचं एक ठरलेलं मिश्रण असतं. त्यांना सहसा अंकुश चौधरी ते अक्षय कुमार आणि समीर धर्माधिकारी ते सलमान खान या प्रकारचे पुरुष पाहायला आवडतात (पु० अ० - गिरिजा ओक ते चित्रांगदा सेन आणि राधिका आपटे ते माधुरी दीक्षित). त्यांना सहसा उजवे हुकूमशाही प्रवृत्तीचे आणि 'काहीतरी करणारे' नेते आवडतात. काहीतरी म्हणजे नक्की काय, असा प्रश्न विचारला असता, ठाम आणि ठोस आवाजात 'काहीतरी करायला हवंच, अजिबात काही न करण्याहून ते उत्तम' अशा प्रकारचं अत्यंत गोलाकार आणि ठणठणीत निरुपयोगी संतापजनक उत्तर ते देतात.

लग्न करून मूल आणल्यामुळे किंवा एक जोडीदार कमावल्यामुळे आणि तो येनकेनप्रकारेण राखल्यामुळे जगातल्या सगळ्याच गोष्टींचं गुह्य आपल्याला समजलेलं आहे अशीही त्यांची खातरी असते. किंबहुना त्यांच्या अक्षय आत्मविश्वासाचा उगमच या तथाकथित ज्ञानातून होत असतो. त्यांच्या लिंगाचा त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वामध्ये महत्त्वाचा वाटा असतो. आपल्या लिंगाच्या सेंट-परसेंट शुद्धतेची (परस्पर्श नाही अशा अर्थीही आणि परफेक्शन अशा अर्थीही) सिद्धता जितक्या वेळा देता येईल, तितक्या वेळा देत राहणं हाही त्यांच्या एकूण आयुष्याचा एक कम्पल्सरी भाग असतो. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जगातल्या कोणत्याही माणसाला - आणि त्यातही माझ्यासारख्या माणूसघाण्या, परंपराद्वेषी, फाटक्या तोंडाच्या, बाईची इंद्रियं असूनही मासिकपाळीसाठी सॅनिटरी नॅपकिन्स हवेत म्हणून केमिस्टच्या आणि स्त्रीत्वाला ब्रेसियर कंपलसरी म्हणून अंतर्वस्त्रांच्या दुकानाला आश्रय याखेरीज त्या इंद्रियांचा कोणताही दृश्य उपयोग न करणार्या, बाई या नामाभिधाला लांछन ठरणार्‍या माणसाला - यच्चयावत गोष्टींबद्दल अधिकारवाणीने ज्ञान देण्याचा कायमचा अधिकार त्यांना प्राप्त झालेला असतो.

ते घरी आल्यावर कधीही नीट माणसासारखे दिवाणखान्यात तंगड्या पसरून बसत नाहीत. (चाणाक्ष वाचकांच्या लक्ष्यात आलं असेलच, की हे पुरुषांना गैरलागू. ते ही सोडून इतर कुठल्याच पोझिशनमध्ये बसू शकत नाहीत.) त्यांना लगबगीने स्वैपाकघरात जाऊन मदत करायची असते. माझ्या स्वैपाकघरात मी काम करत असताना कुणीही मधे लुडबुडलेलं मला - होय, कुणीही म्हणजे कुणीही. उद्या साक्षात बेनेडिक्ट कम्बरब्याच आला, तरी मी त्याला बाहेर बसवून त्याच्या त्या चांदीच्या सुरईतून मध ओतल्यासारख्या आवाजात मोठ्याने गप्पा मारायला फर्मावीन आणि मी माझं काम एकटीनंच नीट करत ओरडून गप्पांना पिना मारीन आणि कर्णसुख लुटीन. असो. तर माझ्या स्वैपाकघरात इतर कुणी लुडबुडलेलं - चालत नसल्यामुळे मला या सवयीचा सुरुवातीला प्रचंडच ताप होत असे. पण हळूहळू मी त्यावर विजय मिळवला. आपण स्वतःच बाहेरच्या खोलीत पंख्याखाली निवांत पसरायचं आणि त्यांच्या स्त्रीत्वनिर्देशक तथाकथिक मोहक आणि सराईत हालचालींकडे दुर्लक्ष्य करत गप्पा मारायच्या. स्वैपाकात वेळोवेळी लागणार्‍या - मीठ, साखर, दाण्याचं कूट, कॉफी, वेलची, आलं इत्यादी - गोष्टी आधीच नीट लपवून ठेवायच्या. त्या त्यांना न मिळाल्यामुळे त्या काही वेळातच नामोहरम होतात. येताक्षणी स्वैपाकघरात शिरून 'ताबा' घेण्याची त्यांची प्रवृत्ती निदान आपल्या बाबतीत तरी यथावकाश विझते. दिसलं-स्वैपाकघर-ताबा-घे या त्यांच्या गंडाकडे एक प्रकारची मनोरंजक आणि काही प्रमाणात उपयुक्त सवय म्हणून पाहिल्यास फायदा होतो. (मजा म्हणजे हे पुरुषांनाही लागू पडतं. आपण बाहेरच ठिय्या देऊन बसायचं. शक्य तर अर्धोन्लोळित अवस्थाच घ्यायची. चहाची कितीही तल्लफ आली तरी कान म्हणून हलवायचा नाही. यानं यांच्यातली पुरुषमंडळी नरमतात.) पण एकुणात तो संयमपरीक्षेचा प्रकार आहे, यात काडीमात्र शंका नाही.

शक्यतोवर यांच्यासोबत कुठेही प्रवासाला जाऊ नये. कारण प्रवासाला गेल्यावर त्यांना वेळ आणि पैसे वसूल करण्यात मोठा रस असतो. त्यातून शक्ती उरली तर ती त्यांच्या जोडीदाराच्या आणि मुलाच्या खाण्यापिण्याच्या आणि खरेदीच्या गरजा भागवण्यात तिचा मोठा भाग संपतो. आणि खेरीज जी शक्ती उरते, त्यात उर्वरित घरगुती गॉसिपं, राजकारणाबद्दलच्या त्यांच्या थोर समजुतींतून मारलेले ठाम शेरे आणि सेल्फ्या हे सगळं बसवायचं असल्यामुळे दस्तुरखुद्द त्यांना मजा करायला वेळच नसतो. त्यात माझीही मजा चिरडली जातेय याचं त्यांना भानही नसतं. हेही ठीकच आहे. पण त्यांची मजा म्हणजेच यच्चयावत दुनियेने मजा करण्याची आदर्श पद्धती या त्यांच्या ठाम समजामुळे आणि तो लादण्याच्या आत्मविश्वासामुळे माझ्या चिडचिडीला पारावार उरत नाही. असो. यावर तसा कोणताही निवारक उपाय नाही. असे प्रवास टाळणे हाच एक उत्तम उपाय आहे.

यांना तथाकथित व्यभिचारी स्त्रियांबद्दल एक प्रकारचा छुपा राग असतो असंही माझं निरीक्षण मला सांगतं. (बाकीच्या तपशिलांप्रमाणे हेही लिंगसापेक्ष आहेच. पण यांच्या मते पुरुष कधी व्यभिचारी नसतातच.) पण स्त्रीवादानं अलीकडच्या काही दशकांत हातपाय पसरल्यामुळे त्यांची पंचाईत होते आणि त्यांच्यातल्या बायका हल्ली वरवर अशा खुल्या लफडेबाज स्त्रियांचं समर्थन करतात. (त्या बायकांबद्दलचा यांचा राग आणि माझ्याबद्दलचा यांचा राग यांची जातकुळी एकच आहे, हेही माझं निरीक्षण आहे. पण त्याच्या कारणांमध्ये आपण तूर्तास शिरायला नको.) रात्री उशिरा बाहेर राहून आणि तोकडे कपडे घालून मूर्खासारखा बलात्कार करून घेणार्‍या बायकांचाही त्यांना थोडा रागच येतो. बलात्कार्‍याचे लिंग कापावे वगैरे मजेदार्क्रूर सूचना करून ते हा राग समाजमान्य ठिकाणी काढायचा प्रयत्न यथाशक्ती करत असतात. (पुरुषांची स्ट्रॅटेजी थोडी वेगळी असते. 'काळजी वाटते' हे त्यांचं पेटण्ट वाक्य असतं.)

या प्रकारच्या लोकांना माझी भीतीही वाटते आणि माझा एक विशिष्ट तिरस्कारही वाटतो असं माझ्या लक्ष्यात आलेलं आहे. त्यांना माझा आधारही वाटतो, हेही एक चमत्कारिक निरीक्षण. जेव्हा परंपरा धुडकावून आणि लोकांची तमा न बाळगणारे निर्णय घ्यायचे असतात आणि त्यात त्यांना पाठिंबा आणि मदत हवी असते, तेव्हा माझी त्यांना आवश्यकता भासते. पण जेव्हा मी काहीतरी व्यवस्थाविरोधी बोलत असते; चाकोरीच्या बाहेरचं पण त्यांच्या सुखवस्तू अवस्थेच्या अंगलट येऊ शकेलसं आणि आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारं मत मांडत असते; किंवा सरळसरळ त्यांच्या आत्मतृप्तीला कोणत्याही प्रकारे असुरक्षित वाटेल असं काही करत असते, तेव्हा मात्र मी जगातलं सर्वांत विध्वंसक चेटूक करणारी हडळ असते आणि खरंतर मला जाहीरपणे दगडांनी ठेचून मारलं पाहिजे, तेव्हा पार्श्वभूमीला वाद्यांचा गजर होत असला पाहिजे आणि सगळ्या टोळीने क्रूर आनंदी चीत्कार काढले पाहिजेत अशी त्यांची मनोमन खातरीच पटलेली असते; पण तथाकथित आधुनिक नागरी समाजात राहत असल्यामुळे त्यांना दुर्दैवाने तसं करता येत नाही, शिवाय या इच्छा आणि ठाम खातर्‍या बोलूनही दाखवता येत नाहीत, त्यामुळे त्यांची थोडी पंचाईत होते.

राजकारण म्हणजे फक्त मोदी किंवा केजरीवाल किंवा ट्रम्प नव्हे. हे जे काही सूक्ष्मातिसूक्ष्म, तुमच्या बहुतेकदा लक्ष्यातही न येणारं, तरीही सराईतपणे आणि एका विशिष्ट पॅटर्नला अनुसरून तुमच्याकडून स-त-त घडणारं जे आहे; ते राजकारण आहे, हे या लोकांना एकदाच नीट समजावून सांगावं अशी माझी तीव्र इच्छा असते. सध्याच्या ज्वालाग्राही दिवसांत तर फारच. मैत्र्या आणि राजकारण एकत्र आणू नका, रात्री बेरात्री मित्र मदतीला येतात मोदी नाही, असं म्हणण्याची जी चाल सांप्रतकाळी प्रचारात आहे; तिच्या पार्श्वभूमीवर हे ज्ञान पसरवण्याची नितांत गरज आहे.


Saturday, 15 October 2016

मला प्रवास आवडत नाहीत

मला प्रवास आवडत नाहीत. 
मुक्कामी गावाच्या स्वभावापासून ते सहप्रवाशांच्या अकलेपर्यंत सगळंच, गाड्यांचे गोंधळ असताना तासाभरानं आलेल्या लोकलच्या दिशेनं सूर मारावा तसं. डेरिंगबाज, पण यश अनिश्चित. अनेक प्रवास माझ्या झोळीत चरफडीखेरीज आणि आगामी जहरी पूर्वग्रहांखेरीज काहीही बांधून देत नाहीत. अशी आठ्याळ कुंकवं लावून अनेक जागांवर मी कायमची फुली मारली आहे.
पण कोणत्याही थोर नियमाला असावेत, तसे अपवाद याही नियमाला आहेतच. क्वचित कधीतरी ते फळाला येतात.


***
अशीच पुण्यातली एक फेरी. कंटाळा आला, म्हणून उठून वीकान्ताला पुणं गाठलेलं. कुठेही निरुद्देश भटकलो. लाटणी, कानातली, चिंचा, बड्ड्या… असल्या काहीही रॅन्डम चिरकूट खरेद्या केल्या. कुठली-कुठली ऐन गर्दीतली धूळभरली देवळं बघून त्यांच्या गारव्याला टेकलो. पुस्तकांची दुकानं ढुंडाळली. ’गोट्या’, ’चिंगी’ आणि ’खडकावरला अंकुर’ मिळतात का बघू, म्हणून कुठल्या-कुठल्या गल्लीबोळांतून घरंगळत एका दुकानाशी पोचलो.
गृहस्थ मिशाळ, शिडशिडीत आणि उग्र होते. त्यांनी एका डुगडुगत्या स्टुलावर चढून वरच्या कप्प्यातली बरोब्बर पाच पुस्तकं खेचून खाडकन काउंटरवर आपटली. धुळीचा एक खकाणा उडाला. पण हे निर्विकार. सहजी न मिळणारी पुस्तकं हाती आल्यामुळे मी एकूण जुगार जिंकल्याच्या आनंदात. पैसे देऊन निघावं ना? पण जुगार्‍याचा मोह. मोह. त्यांच्या दुकानाची एकूण धुळकटावस्था आणि प्रचंड इंट्रेष्टिंग पुस्तकांच्या जुन्यापान्या आवृत्त्या बघून माझा पाय निघेचना. ते मिशा फेंदारून माझ्याकडे प्रश्नार्थक बघत उभे.
मला काय किडा चावला कुणास ठाऊक, बरेच महिने ज्याचा निष्फळ शोध घेतला, ते कुंडलकराचं “’छोट्याश्या सुट्टीत’ आहे का हो?” असा खडा मारला फेकून.
पूर्ण पाच सेकंद माझ्याकडे टक लावून काका उत्तरले, “आहे. पण ’झ्येरॉक्स’ आहे. चालेल?”
आहे? आहे? आहे?
मी त्यांच्याकडे भूत पाहिल्यासारखं भयचकित नजरेनं पाहिलं असणार. कारण ते किंचित हसल्याचा भास झाला. मग सावरून त्यांना म्हटलं, “चालेल, चालेल. द्या.”
ब्राउन पेपरमध्ये गुंडाळलेलं आणि वरून सेलोटेपा लावून नीट प्याक केलेलं ते पुडकं माझ्या हातात आलं. त्याचे पैसे किती विचारलं, तर म्हणाले, “बावन्न रुपये पन्नास पैसे.”
पन्नास सुट्टे पैसे दिले नसते, तर पुस्तक निर्दयपणे माझ्या हातातून काढून घेऊन त्यांनी वर फळीवर ठेवलं असतं याची मला खातरीच होती. त्यामुळे गपचूप पाकीट उलटंपालटं करून पन्नास रुपये आणि अडीच रुपये टेकवले. मी नशिबावर इतकी चकित होते, की पद्मजाचं ’गर्भश्रीमंतीचं झाड’ आहे का ते विचारायचं मला सुचलंच नाही. मी बहुतेक तरंगतच घरपर्यंत आले असणार.
परत पुण्यात इतक्या वार्‍या झाल्या, पण इतकी चमकदार पुस्तकखरेदी झाल्याची आठवण गाठीला नाही. त्या फेरीचा मुहूर्तच साडेतीनांपैकी एखादा असणार.


***
परदेशातली वारी. महिनोन्‍ महिने आधीपासून नेटानं बुकिंगं केलेली. पॅरीसमधून रात्री निघून सकाळी झ्युरिकला पोचायचं होतं. तेवढाच एक बसचा प्रवास. पण पॅरीसच्या गाडीतळापासूनच नरपटी लागायला सुरुवात.
आपल्या बिचार्‍या यष्ट्यांचे तळही बरे म्हणावेत, असं एक तीन बाजूंनी उंचवटा असलेलं उखीर-वाखीर मैदान. उगाच एखाद-दोन झाडं, थोडा कचरा, बरीच माणसं. तिथे मातीतच बरासा उंचवटा नाहीतर सामानच वापरून टेकलेली. ऑफीसच्या खोपटाला टाळं. रागरंग बघून भिवया कपाळात गेल्या. पण ’बघू तर.’ असं म्हणून थांबलो. बस आल्यावर तिचा किन्नर इंग्रजीतल्या प्रश्नावर नळ सुटल्यासारखं जर्मनमधून बदाबदा उत्तरला, आणि एकदम ’हुर्रे!’ झालं. तीन दिवस पॅरीसकरांनी करायला लावलेल्या ’डम शराज’चा (मी हाच उच्चार लिहिणारे. वाचणार्‍यांनी आपल्याला हवा तो वाचून घ्यावा.) शीण खाडकन उतरला. एकदम साक्षर-सुशिक्षित-नागरी वाटायला लागलं. त्यानं सैलावत गाडीत बसलो. एका ठिकाणी बस बदलायची होती, रात्री तीन वाजता. त्या तयारीत मोबाईलचे गजर लावून गप्पा ठोकत बसलो. ’डायवर फुलॉन जर्मन फाडतोय, पण आपल्याला च्यायला येतेच्चे भाषा, आता बोला ना, आता बोला!’ असल्या पोरकट आनंदात चूर.
अकराच्या सुमारास पहिला स्टॉप आला आणि आमची तंतरली. एक्स्प्रेस हायवेवरून तळेगावजवळ जो टोलनाका लागतो, त्याच्या अलीकडे शुक्रवारी रात्री जास्त गर्दी असते; असला सुनसान स्टॉप. ऐन हायवेवर. ना कसलं ऑफीस आजूबाजूला, ना धड दिवे. बसमधून उतरणारा बाबा पाठीवर सामान लावून झपझप कुठेसा निघूनही गेला. आम्ही इकडे गॅसवर.
आता तीन वाजता जिथे उतरायचं आहे, तिथे तरी कुणी हरीचा लाल असणारेय का, असला जेन्विन प्रश्न पडला. डायवरला विचारलं, तर त्यानं खांदे उडवले. ’काय की बॉ! आत्ता कुठलं ऑफीस उघडं असायला? बसायला जागा असेल. बहुतेक.’ हे उत्तर. तशा आम्ही चौघी होतो एकत्र. त्यामुळे टेन्शनला चारानं भागायला हरकत नव्हती. पण तरी ’श्ट्रासबुर्गला न उतरता म्युन्शनला जाऊ या का सरळ? मग तिकडून जाऊ झ्युरिकला.’ असा बूट निघाल्यावर त्यावर फार भवति न भवति होता तीनेक मिनिटांतच एकमत व्हायला आलं, यावरून एकूण रागरंगाचं त्रैराशिक मांडायला हरकत नाही. तरी आखलेले बेत इतक्या सहजी बदलायची तयारी होईना माझी. झ्युरिकहून पुढच्या ट्रेनचं तिकीट हातात होतं, तेही फुकट गेलं असतं. किती उधळी नि खर्चीक झाले मी, तरी युरोमधून खर्च जरा जास्तच उधळखोर वाटायला लागला. शेवटी एकदा थांब्याचा अंदाज घेऊ नि आयत्या वेळी ठरवू अशी घोषणा करून मी चक्क झोपून गेले.
बरोब्बर तीन वाजता - श्ट्रासबुर्ग.
उठून बाहेर डोकावून पाहिलं, तर बंगळूरच्या स्थानिक बसतळावर आहे तशी रचना असलेले बसथांबे. दिवे-बिवे होते. पण चिटपाखरू नाही. सुनसान. या बाजूला पाहिलं, तर चक्क एकुलती बाई स्टॉपवर.
तिला बघून आम्ही आपापसात चकार चर्चा न करता एकदम उतरलोच. मजा म्हणजे आमच्यातल्या कुणीतरी डायवरला विचारलं एकदा, इथे सेफ आहे ना बाबा, तर त्यावरही त्या बाबानं नजर चुकवत खांदे उडवले!
नि तरी आम्ही ’मरू देत तिच्यायला!’ म्हणून उतरलो. बस निघून गेली, पुढची बस पावणेपाचाला येईलसं सांगून.
आम्ही पाच जणीच तिथे त्या मैलभर परिसरात. मिनिटभर लागलं असेल सेटल व्हायला. सगळ्यांना बसायला जागा नव्हतीच. चक्क ’लोकसत्ते’ची थोडी पानं पसरली आणि आम्हीही पसरलो मग. नावंगावं विचारली आम्ही, आणि तोवर पळायच्या तयारीत असल्यासारखी जय्यत बसलेली ती मुलगी सैलावलीच एकदम.
ती खरीच पळायच्या तयारीत होती, हे पुढच्या दोन तासांत कळलं. ती होती दक्षिण अमेरिकेतली, पेरूची. त्याच बस कंपनीनं घोळ घातल्यामुळे रात्री ११ वाजल्यापासून तिथे एकटीच बसलेली होती. तिला पुढची बस मिळायची होती सकाळी ८ वाजता. ना कंपनीचं ऑफीस. ना वायफाय. ना इंग्रजी बोलणारं कुणी फोनवर उपलब्ध. चिडचिड आणि हताशा आणि स्वीकार. मधून-मधून एक बाप्या समोरून सायकलवरून चक्कर मारून जात होता, म्हणून बारा-साडेबाराला तिनं पायातल्या उंच टाचांच्या चपला बदलून धावायचे बूट चढवले होते. सामान आवरून हाताशी ठेवलं होतं नि त्याला खुन्नस देत तिथे बसून होती. ’आता काही अजून निभणार नाही, झोप - थकवा - दडपण अती होतंय’ अशा टप्प्यावर आमची बस येऊन त्यातून चार बायका उतरल्यामुळे ती एकदम सैलावणे अधिक उत्तेजित होणे अशा अवस्थेला आली होती.
नंतरच्या गप्पांना खरोखरच तोड नाही. ’आता कुणी मवाली फिरकला तर आम्ही काय डरत नाही’छाप वल्गना; तिचं पर्यावरण परिषदेमधलं काम; माणसांकडे किती वर्षं शिल्लक आहेत त्याचे हिशेब; युरोपियन लोक स्वतःला प्रगत म्हणवतात, पण किती तुसडे असतात; त्याहून आपण आशियाई आणि दक्षिण अमेरिकी कसे कुटुंबवत्सल; आम्हांला जर्मन येत असल्याबद्दलचं कुतूहल आणि उगाच-कौतुक; मेथीच्या ठेपल्यांची पाककृती; भारतात आणि पेरूमध्ये येण्याची आमंत्रणं आणि घेण्याची काळजी; प्रवास करत राहण्याचे बेत आणि भेटायचे वादे; मेलायडींची देवाणघेवाण… बस आल्यावरही पाय निघेना. मग त्या डायवरला थांबवून चक्क मिठ्या आणि सेल्फी!
आल्यावर तिला लिहायचं पत्र अनेकदा खोडलं. कितीतरी दिवस ड्राफ्ट पडून आहे. अजुनी तिचा पत्ता आहे जपून ठेवलेला. फोटोही. पण काय लिहू, म्हणजे आम्ही आपापसांत वाटून घेतलेला बाईपणाचा दिलासा तिला सांगता येईल, ते काही कळत नाही.


***
एका शिबिराला म्हणून माणगावला गेलो होतो. माणगावच्या यष्टी ष्ट्यांडातून पुढली बस मिळायची होती. पण माणसं जमा होईस्तो बस येईल असा रागरंग दिसेना. सकाळी आठ-साडेआठाची भूकप्रधान वेळ. आम्ही एस्टी कॅन्टीन गाठलं. सगळं निवांत होतं. हवेतली गुलाबी थंडी भोगत पोर्‍या आणि गल्ल्यावरचा शेट दोघेच गप्पा छाटत बसलेले.
एस्टी कॅन्टीनमधली पुरीभाजी मला मनापासून आवडते. स्वच्छतेचे नखरे मिटून ठेवले, तर ती चमचमीत भाजी आणि त्यावर पेश्शल फर्माईश म्हणून ओतलेली मिसळीची तर्री काहीच्या काही वेऽड लागते. फक्त पुर्‍या गरम हव्यात.
“मिळेल पुरीभाजी?” आशेनं विचारलं.
“टाकतो की. थोडा वेळ लागेल पण.”
आम्ही बसलो. साताठ मिनिटांतच बाहेर हलचल. बस आलीशी वाटली. ’झालंच!’ असा अजिजीचा कटाक्ष टाकत पोरगं पुर्‍या तळतच होतं. पाचेक मिनिटं कसंबसं थांबलो, पण एक बस गेली असती तर अजून खोळंबा झाला असता. म्हणून दोन प्लेटांचे पैसे चुकवून बस गाठली.
’नव्हतं सालं पुर्‍यांवरती नाव आपलं’ म्हणून हळहळत मी खिडकी पकडली. बस सुटता सुटता आतून तीरासारखं ते कॅन्टीनमधलं पोरगं आलं. एका नजरेत मला हेरून, खिडकीतून माझ्या हातात पुरी-भाजीचं गरम पुडकं कोंबलं आणि मी आश्चर्यातून बाहेर येऊन थॅन्क्यू म्हणायच्या आत हसून अंतर्धान पावलंही. बस सुटली. ते पुडकं पिशवीत टाकून आम्ही पुन्हा गप्पांमध्ये. मग स्टॉप हुकला, आम्ही चुकलो, बरंच चालावं लागलं, थोडा कार्यक्रमही चुकला. हे प्रकरण डोक्यातून गेलंच.
शिबिरात जेवणाची व्यवस्था होती. पण स्वैपाकाचे अंदाज चुकले आणि बरेच जणांनी समजूतदारपणे जवळचे चिवडे-बिस्किटं काढली, तेव्हा एकदम हे पाकीट आठवलं.
वाफ धरल्यामुळे गोळा झालेली भाजी नि त्या मऊ पुर्‍या. आईनं बांधून दिलेला डबा खातानाही आले नसतील, इतके मला कृतज्ञतेचे झटकेच्या झटके आले खाताना. वेऽडच.


***
रायगडाच्या पायर्‍या फाफूं करत चढत असताना भाऊ आणि वहिनीनं आत्यांना दिलेली गोड बातमी - नि मग गड कसा सर झाला ते आठवणीतून पार गायब.
गावात पोचायला रात्रीचे दोन वाजले म्हणताना, ’कशा गं एकट्या फिरता तुम्ही?’ म्हणत झापणारा नि मग कुणीतरी आणायला आलेलं दिसेस्तो बस थांबवणारा कंडक्टर.
काठ्या नि दोर्‍यांचा जुगाड करून हे‍ऽऽ एवढाले साबणाचे फुगे हवेवर सोडत बसलेल्या एका जर्मन पोराकडून घासाघीस करून खरेदी केलेल्या वेताच्या काठ्या!
विमानाला उशीर झाला तेव्हा तिथेच लाउंजमध्ये लागलेला ’मैंने प्यार किया’ बघून खिंकाळण्यात इतकी धमाल यायला लागलेली, की ‘कहे तोसे सजना’ लागलं आणि विमान आल्याची घोषणा झाली, म्हणून प्राणांतिक हळहळ…
नि तरी मला प्रवास नाहीच आवडत, म्हणजे माझा किती छळवाद झाला असेल… 
त्याबद्दल परत केव्हातरी.

***
हे या पोस्टमधून राहून गेलेलं शेपूट.

Monday, 3 October 2016

हेही दिवस सरतात

कविता म्हणजे काय करतो आपण? 
आता कवितेनं पाठ फिरवल्यावर सोडवायचे हे प्रश्न. उन्हाळ्याच्या सुट्टीत पाढे लिहिल्यासारखे.
पण पाढे मला तितके काही नावडत नाहीत, नाहीतच. दाहोदरसे, तिहोत्रीदोन, चाळासे, त्रेसड्डासे… वगैरे प्रकरणं तेव्हा न समजता पाठ करून टाकली; तरी चिंचेबरोबर उगाच जिभेवर खडेमिठाचा धारदार खडा घोळवत राहावा आणि जीभ चरचरली तरी मजेशीरच वाटत राहावं, तशी त्यातली गंमत मला अजूनही आवडते. समोरचा माणूस कॅल्सी हुडकेस्तोवर आपण आकडा सांगूनही टाकतो. मग तो आपल्याला चक्क भ्यायला लागला आहे, हे लक्ष्यात येतं आणि तरी आपण निर्विकारपणाचं बेमालूम सोंग काढतो; तेव्हा मला अजूनच मजा येते.
होय, थोडी दुष्ट आहे खरी मी. असो. तर - कविता म्हणजे काय करतो आपण?
या प्रश्नाची उत्तरं कवीगणिक निरनिराळी (आणि कवित्वाच्या निरनिराळ्या तरतमपातळ्यांवरची) असणार आहेत हे कबूल करून टाकलं, तरीही आपली निराळी उत्तरं उरतातच. ती तरी कधी परजायची? तर आत्ताच. उन्हाळ्याच्या दिवसांत.
लोकांना म्हणे आनंद अनावर झाल्यावर कविता होते. मला असं काही झाल्याची आठवण नाही. आनंद झाल्यावर कामाधामाला दांड्या मारून मनसोक्त लोळावं, पुस्तकं नाहीतर स्टेशनरीच्या उधळखोर खरेद्या कराव्यात, काही रांधावं, काही खावं-प्यावं, सिनेमे पाहावेत - असल्या साध्यासरळ ब्याकबेंचर सवयी. आनंदाच्या प्रसंगी कवितेची आठवण होत नाही.
ती होते एकान्तात. प्रवास नामक गोष्टीच्या नावाखाली प्रवासाची निव्वळ लॉजिस्टिकं सोडवता सोडवता क्वचित कधीतरी मनाजोगती खिडकी मिळून जाते आणि खिडकीतून बाहेरच्या पळत्या रस्त्याकडे तंद्री लागते. मग शब्दांच्या माळकाच्या माळका डोक्यात फटाक्यांच्या लडींसारख्या एकामागून एक पेटत राहतात. कितीतरी पत्रं मी अशाच प्रवासात हवेवर लिहून काढली आहेत. मग पुढे त्यांचं पेपरवर्क तेवढं उरतं. अशाच वेळी कविता डोक्यात झुरमुरत राहतात. तशीच दुसरी वेळ म्हणजे - चहूबाजूंनी घेरून आल्यासारखं होतं, तेव्हाची. काही केल्या कशावरच वा कुणावरच रेलता म्हणून येत नाही आणि सगळं अनावर साचत जातं डोक्यात - तेव्हा कविता येते. आपल्याच सोबतीला आपणच जन्माला यावं, तशी माळावरच्या बाभळीसारखी वेडीवाकडी बेबंद उगवत जाते. शब्द भले की बुरे, जमलेले की न जमलेले, समकालीन की जडावलेले… या सगळ्यांचे हिशेब नंतर होत राहतात. पण त्या त्या वेळी कविता एक हक्काचं, जन्मजात, दिलखुश राजेपण बहाल करते. या इथे - इथे माझी सत्ता आहे, इथे मला टेकायला जागा आही. इथून मला कुणी ऊठ म्हणणार नाही - अशी, ध्रुवबाळाच्या जातीची, निरंतर आश्वस्तता कविता देऊन जाते; तेव्हा मी रिकाम्या भरधाव ट्रेनच्या दारात उभी असते आणि पुढे क्षितिजापार पसरत जाणार्‍या रुळांवरही माझंच राज्य असतं.
अधूनमधून सध्यासारखे न संपणारे उन्हाळेही येतात. अशा वेळी छापलेल्या कविता नकोनकोश्या होतात. त्यांना कोर्‍या कापडाचा, काहीसा परका वास असतो. कितीही देखण्या, नव्हाळीच्या, जिवंत असल्या; तरीही त्यांच्यात एक समारंभी तोरा असतो. आपल्याला शरमिंदं, अपुरं वाटायला लावणारा पूर्णत्वाचा रुबाब असतो. तो तोराही सोसेनासा होतो, असे हळवे दिवस. अशा वेळी मित्रांपाशी कविता उधार मागाव्यात. वापरून विटक्या, मऊ झालेल्या, धुऊन सुरकुतल्यावरही अंगचा वास ल्यालेल्या सुती कुडत्यासारख्या, त्या आपले लागेबांधे घेऊन येतात, आपल्यालाही देऊ करतात, उन्हाळे बघता बघता निभावून नेतात.
कधी हवेत निव्वळ वादंग आणि कडू आरोपप्रत्यारोप उरतात. अशा वेळी कवितांनी पाठ फिरवलेली असते. पण मी आता अनुभवानं शिकले आहे, की हेही दिवस सरतात. आपण नेटानं शब्दाला शब्द जोडत, किडूक मिडूक साठवत, रोजचे केरवारे नेटानं करत, कालच्या दिवसाला आजचा दिवस जोडत राहायचं असतं. त्या जोडकामाच्या चिकाटीतच कवितांच्या बिया सांडत-रुजत असतात़ कुठे कुठे. उद्या आपण नसलो, तरी त्यातल्याच एखाद्या कवितेचं झाड उगवणार असतं. उगवतंच.
त्यालाच तर कविता म्हणतो ना आपण?

Thursday, 22 September 2016

इतक्यात वाचलेली पुस्तकं ०१

आणि मग एक दिवस...

(जालावरून साभार)
पुस्तक रंजक आहे, यात शंका नाही. त्याचं सगळं श्रेय नसीरच्या दिलखुलास निवेदनाला आणि धारदार विनोदबुद्धीला. पण त्यातून त्याच्या अभिनयपद्धतीबद्दल काही महत्त्वाचं वाचायला मिळेल, असं म्हणता? सॉरी! 

बहुतांश नटांनी नोंदलेली नटाची लक्षणं नसीरनंही नोंदली आहेत - कमालीचा नार्सिसिझम, असुरक्षितता, ध्यास. त्याच्या वडिलांसोबतचं त्याचं गुंतागुंतीचं नातं; जसपाल या जिवलग मित्रासोबतचं दुधारी नातं; अवघ्या एकोणिसाव्या वर्षी एका पस्तिशीच्या स्त्रीशी केलेला विवाह आणि लगोलग मिळालेलं, न पेलवणारं पितृत्व; ग्रॉटोव्हस्कीच्या कार्यशाळेत झालेला अपेक्षाभंग; रत्नासोबतचं प्रेम; नंतरचं सुखी-समाधानी आयुष्य... याबद्दल नसीरनं विस्तारानं लिहिलं आहे. त्याच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्याला यशानं दिलेल्या हुलकावण्या, सततचा एकटेपणा आणि जगानं नाकारलेलं असणं - हे कोणत्याही नटाच्या आत्मवृत्तात भेटावं असं. हे सगळंच अतिशय रसाळ भाषेत आणि मोकळेपणानं, प्रामाणिकपणानं नोंदलेलं आहे. त्याची तेजतर्रार विनोदबुद्धी पानापानांतून भेटते आणि आपण मनमुराद हसतो.

पण माझं इतक्यावर भागेना. मला मराठीतल्या नटांच्या चोख लेखनाची सवय. लागूंचं ’लमाण’ काय, विजयाबाईंचं ’झिम्मा’ काय, प्रभावळकरांचं ’एका खेळियाने’ काय... फक्त आणि फक्त कामाबद्दलच बोलीन, अशी शपथ वाहिल्यासारखी ही सगळी आत्मवृत्तं. अभिनय, दिग्दर्शन आणि आपलं कार्यक्षेत्रं - यावर काहीएक भाष्य गांभीर्यानं करणारी. त्या जातीचं फारसं काही मला या पुस्तकात मिळालं नाही. मुळात एखादी भूमिका सही-सही वठवणं आणि ती वठवण्याच्या प्रक्रियेबद्दल नेमकेपणानं सांगणं, या दोन निराळ्या गोष्टी आहेत, हे मी अखेर मान्य केलं. जवळजवळ तीनेकशे पानं वाचूनही, मला सतत आठवण येत होती, ती ’साप्ताहिक सकाळ’च्या सदा डुम्बरे-कालीन दिवाळी अंकात माधव वझेंनी घेतलेल्या नसीरच्या मुलाखतीची. ती कितीतरी स्पष्ट, ओघवती आणि तरीही नेमकी होती. मामुली संपादन केलेलं असूनही.

संपादनाचा विषय निघालाच आहे, तर होऊन जाऊ द्या. हे ’पॉप्युलर’ प्रकाशनानं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. ’पॉप्युलर’ हे काहीएक परंपरा असलेलं प्रकाशन आहे, असं म्हणायला हरकत नसावी. पण अनुवाद कसा होतो यावर आपला अंकुश नसेल एक वेळ (नसीरनं सई परांजपेंच्याच नावाचा आग्रह धरला असल्याचा उल्लेख प्रस्तावनेत आहे.), त्यावर संपादनाचा हात फिरवला जायला नको? एखादा शब्द घाईघाईनं खोडावा आणि मग त्यावर काहीही लिहिलं तरी मूळ शब्द अचूक वाचता येऊन रसभंग होत राहावा, तसं अनेक अनुवादित वाक्यं वाचताना होत राहतं. नको तिथे मूळचे परभाषिक शब्द तस्सेच ठेवणं (इन्स्टिट्यूट) आणि नको तिथे संकल्पनांना मराठी अवतार देणं (एकलगीत? ओह, यू मीन सोलो!) सतत दाताखाली येत राहतं. हेही एक वेळ ठीक. पण पुस्तकात चक्क प्रमाणलेखनाच्या चुका सापडाव्यात? ‌‌र्‌हस्व-दीर्घाच्या अगणित चुका, एकजात सगळी शब्दयोगी अव्ययं शब्दांपासून फटकून, बोली भाषेचा हास्यास्पद आग्रह धरताना भलतीकडे पडलेले शिरोबिंदू, ’संयुक्तिक’सारख्या अनेक शब्दांचं चुकीचं लेखन, आणि चक्क काही ठिकाणी राहून गेलेले जादाचे काने? ही हलगर्जीपणाची हद्द आहे.

हरून ऍन्ड द सी ऑफ स्टोरीज्‍



सलमान रश्दींच्या बाकीच्या वादग्रस्ततेशी माझं फार देणंघेणं नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मागणीशी अर्थातच सहमती आहे. पण आतडं असं नाही. हे पुस्तक वाचून सलमान रश्दी माझ्यासाठी एकाएकी त्रिमित झाले. बाकी पुस्तकाच्या चमत्कृतीपूर्ण आणि प्रचंड मजेशीर नि अतिकल्पक गोष्टीबद्दल हवं तितकं लिहिता येईल. पण इथे काही चमकदार गोष्टी तेवढ्या नोंदून ठेवते.

- ’गप’ (हिंदीतलं गप, मराठीतलं नव्हे!) आणि ’चुप’ (हे मात्र दोन्हीपैकी कुठलंही चालेल!) ही दोन राज्यांची नावं. एकीकडे गप्पा, एकीकडे चुप्पी. एकीकडे उजेड, एकीकडे अंधार. एकीकडे ऊब, एकीकडे थंडी. एकीकडे रंग, एकीकडे काळाकुट्ट रंग. एकीकडे... असो!
- गोपी आणि बाघा ही रेंच्या सिनेमातल्या बडबड्या ठगांची नावं बडबड्या माशांना वापरणं.
- बातचीत-बातमतकरो-बोलो-बेजुबान-माली... असल्या हिंदी अर्थपूर्ण नावांची तितकीच अर्थपूर्ण मोडतोड करून वापरणं.
- ’कथासरित्सागर’ - सी ऑफ स्टोरीज! हा संदर्भ लक्ष्यात आला तेव्हा मला एकदम ’युरेका!’ झालं.
- गोष्टी - गोष्टी, ऍज इन, कथा - त्यांच्याबद्दल काय एकेक थोर मुक्ताफळं.... "जुन्या गोष्टींमधूनच तर नव्या गोष्टी जन्माला येतात!",  "गोष्टीमधल्या जगावर कुणाचंही राज्य चालत नाही.", "त्याला काय झालं, गोष्टीत गोष्टी मिसळल्या तर? अशाच तर नव्या गोष्टी तयार होतात!", "चांगली ठणठणीत गोष्ट असली, म्हणजे मग तिच्यात थोडे फेरफार नि इकडम्‌ तिकडम्‌ केलं तरी तिला ढिम्म फरक पडत नाही! अगदी सहज पचवते ती, करून बघा..."  हे वाचून माझा फॅनफिक्शनी मेंदू किती सुखावला-सैलावला-कौतुकावला असेल, याची कल्पनाच केलेली बरी!
- चांगलं सैन्यासारखं सैन्य (पुस्तकातल्या पानांचं!) आणि समोर ठाकलेलं युद्धासारखं युद्ध! पण सैन्य सेनाप्रमुखाचं निमूट ऐकून हल्ला करील म्हणता? छे! ते सैनिक वाद घालतात, चर्चा करतात, एकमेकांचं म्हणणं खोडून काढतात, सेनाप्रमुखाला प्रश्न विचारून भंडावून सोडतात - सऽऽगळ्यांचं समाधान झाल्यावर मगच काय तो हल्लाबिल्ला करतात! नि सेनाप्रमुख? तो चिडेल? तो बेटा, कधी इकडून तर कधी तिकडून पिना मारत सगळ्या वादंगाची मौज लुटत असतो! आणि अशा प्रकारे बोलभांड राज्य आपल्या गप्पिष्ट सवयींसकट मुक्या राज्याला हरवतं!
- "राजपुत्र मूर्ख आहे खरा आमचा थोडा. पण जाऊ द्या ओ! इथे नाहीतरी मुकुटवाल्या मंडळींच्या हातात ठेवलंय काय आम्ही मोठंसं? द्या टाळी!"

असलं बरंच काय काय, बारीक-बारीक आणि महामार्मिक. भाषेच्या ह्याऽऽऽ एवढाल्ल्या गमती. नादमय संवाद. तिरपागडे वेढे दिलेले हरेक तिसर्‍या शब्दाला. समकालीनत्वाची अत्यंत मजेदार सरमिसळ. मस्ट रीड. रिफ्रेशिंग रीड.



स्टॉप व्हॉट यू आर डूइंग ऍन्ड रीड धिस!

(जालावरून साभार)

नाव जरा हिटलरी आहे, कबूल. पण त्यावर जाऊ नका. अनेक मान्यवर लेखकांनी आपापल्या वाचनानुभवावर लिहिलेले निबंध यात आहेत. त्यात संशोधक-चिकित्सक दृष्टीचे लेख आहेत, तसे निखळ स्मरणरंजनात्मक लेखही आहेत. एकूणच वाचणे या गोष्टीची आपण अनुभवलेली जादू हे लोक मन:पूत सांगताहेत.

माझ्या सध्याच्या विचारचक्राला गती देणारं हे पुस्तक होतं. वाचण्याशी असलेले संबंध तपासून पाहणं पार्श्वभूमीला चालू आहे. अशा वेळी अनेक संदर्भपुस्तकांची नावं मिळणं, काही गोष्टी इतरांच्या अनुभवांशी ताडून पाहता येणं, गोष्ट आणि न-गोष्ट या वाचनातला फरक नोंदताना त्याच्याशी संबंधित विदा मिळणं, काही थेटच पुस्तकं वाचायजोगी-शोधायजोगी हाती लागणं… अशा अनेक प्रकारे. पण त्यातला खरा महत्त्वाचा भाग कोणता असेल, तर माझी तळ्यात्मळ्यातावस्था संपवणारा. वाचन महत्त्वाचं आहे, ते हातचं निसटून जाता कामा नये, ही माझी भावना होती. पण तिला कोणता आधार आहे, असं कुणी विचारलं, तर मी निरुत्तर असे. तंत्रज्ञानातले बदल माध्यमबदलात परिणित होणारच, कालचक्राला थांबवणारे तुम्ही कोण, असा आक्रमक प्रश्न आल्यावर मला काही सुचत नसे. आपण निव्वळ स्मरणरंजन म्हणून तर पुस्तकं हातची जाऊ देत नसू, असा प्रश्न डोक्यात वळवळत राही. त्याला एक ठोस उत्तर मिळालं. मागे एकदा एका मित्राशी बोलताना तो एक अतिशय महत्त्वाचं वाक्य बोलून गेला होता. ’आपल्यासारख्या हावरट लोकांना भावनिक भूकही तीव्र असते. ती भागवणारी माणसं कायम सोबत असणं अशक्यच असतं. काही अंशी भूक माणसं भागवतात. पण उत्तम सिनेमे आणि उत्तम पुस्तकं - म्हणजे फिक्शन हो, नाहीतर काढाल कुरुंदकर बाहेर - ही भूक विस्तारतात, सखोल करतात आणि बहुतांशी भागवतात. उगाच का आपल्याला इतकं सगळं हपापून बघा-वाचावं लागतं?’ त्या वाक्याचा एक लहानसा ढग डोक्यात कुठेतरी ब्याकग्राउंडला तरंगत होता. हे पुस्तक वाचताना कधीतरी तो बरोब्बर डोक्याच्या वर येऊन थांबला. आणि एका नियत क्षणी पाऊस पडून मी भिजले. एरवी ज्या शिस्तीला ’सो व्हॉट?’ म्हणून खांदे उडवून दाखवण्यात धन्यता मानली जाते, ती कामापुरती कबूल करून मी अनेक फिक्शनी पुस्तकं नेटानं पुरी केली. मग कुठल्यातरी टप्प्यावर त्यातला ’नेट’ संपला. मी अल्लाद पुस्तकात शिरले.

हे पुस्तक म्हणतं त्यानुसार - अक्षरं म्हणजे अलीबाबाच्या गुहेचं दार असतं. ज्याला ती डीकोड करता येतात; तो दार ओलांडून पल्याड जातो. नवीन जगात दाखल होतो. ते जग जगतो. अशी अनेक जगं, अनेक आयुष्य जगतो. 

मी मधला बराच काळ पासवर्ड विसरले होते. तो मला आठवला. आठवला म्हणण्यापेक्षा - बरेचदा आपली बोटंच पासवर्ड लक्ष्यात ठेवून असतात. तो जाणिवेत न ठेवता नेणिवेत कुठेतरी नेऊन टाकतात. तो परत वर आणायचा, तर गुहेच्या बाहेर चिकाटीनं रेंगाळावं लागतं. - तसं रेंगाळायला या पुस्तकानं ढकललं. आणि बात बन गई.