Thursday, 9 May 2019

सोडियम व्हेपरच्या काविळलेल्या प्रकाशात

सोडियम व्हेपरच्या काविळलेल्या प्रकाशात
वाहत्या रस्त्याकडेला बसकण मारून
काहीतरी विकू पाहणाऱ्या
एकांड्या भय्याची
कीव करू नये कुणी कधी,
एकही गिऱ्हाईक फिरकलं नाही
त्याच्याकडे तासंतास,
तरीही.

दाराशी वसलेल्या झाडांचेच
आयते आकाशकंदील करून
संध्याकाळी लखलखून टाकणाऱ्या
दांडग्या दुकानांच्या
वॉचमनसारखा,
संपूर्ण शरणागतीचा भाव
त्याच्याही चेहऱ्यावर नांदत असला,
तरीही.

ती लक्झरी परवडणार नाही,
अनेकांच्या घामांचा स्पर्श घडून
रोज पवित्र होणाऱ्या,
डोळ्याला भिडणारा डोळा
निर्विकारपणे न्याहाळत
आपखुशीनं फोनच्या सुरईत शिरणाऱ्या,
आणि कानांत गुडद्या सारून
परतीची वाट स्वहस्ते बंद करणाऱ्या
कुणालाही.

ट्रेनच्या दारात लटकताना,
आपल्यासोबत वाहत येणाऱ्या सूर्याचा
नजर खिळवून टाकणारा भीषणरम्य मृत्यू पाहून,
समोरच्या अनोळखी नजरेत
आपली नकळत विस्फारलेली हसरी नजर मिसळून देणाऱ्या
सगळ्यांच्याच आयुष्यात,
येणार असतात तिन्हीसांजा.
काल, आज आणि उद्याही.

Wednesday, 8 May 2019

शहरापाशी जादूचे रस्ते असतात

शहरापाशी जादूचे रस्ते असतात.
गाड्या आणून ओता त्यांवर
कितीही.
जागा वीत राहते पार्किंगसाठी.
झाडंबिडं वठू लागतात एका रात्रीत
निमूट.
कापून काढली जातात.
बिनबोभाट.
रस्ते सिमेंटची आवरणं लेऊन सजून बसतात.
सणासुदीला रांगोळ्यांचे ढीग मिरवतात.
रांगोळी विकणाऱ्या लोकांचे संसारही.
दुसऱ्याच दिवशी सफाई कामगार झाडून टाकतो
भल्या पहाटे
रांगोळी आणि रांगोळीवाल्याची चिरगुटं.
आपोआप.
पाऊस येतो.
रस्ते न्हाऊन घेतात
सचैल.
भरतीचा मुहूर्त साधून गटारं तुंबून घेतात.
भंग्याचा वार्षिक बळी नच मिळाला
तर एखाद्या चुकल्यामाकल्या पांढरपेशा वाटसरूवर भागवतात.
भुकेला मांड्याचा कोंडा करतात.
रस्ते बघत राहतात
निर्विकार.
गोकुळाष्टमीला मैदान होतात.
प्रचारसभेला सभागृह होतात.
क्वचित कधी अनावर पावसाळ्यात
ओढे होतात, नाले होतात, नदी होतात...
एरवी पडून राहतात
इमानी पाळीव ॲलेक्सासारखे
शहराच्या वळचणीला
निपचीत.
उशाला जादू घेऊन.
शहरापाशी जादूचे रस्ते असतात.

Saturday, 27 April 2019

विणीचा काळ विसरून

विणीचा काळ विसरून बारा महिने तेरा काळ घुमत बसणाऱ्या पक्ष्यांनी
उच्छाद मांडलाय सगळीभर.
झाडंबिडं लागत नाहीत त्यांना.
बिल्डिंगांच्या वळचणी, ओस पडलेले उंच भगभगीत चौक, घरांच्या दुर्लक्षित बाल्कन्या...
सिमेंटी स्वभावाचे कसलेही झरोके
चालतात.
थवेच्या थवे
वाण्यांच्या तूरडाळयुक्त भूतदयेचे सडे वेचतात.
खातात, वितात.
उडतात, फडफडतात.
काड्यांची अस्ताव्यस्त जुडीवजा घरटी, अंडी,
करुण आवाजात घूंघूं करत खुरडत फिरणारी सततची भुकेली पिल्लं,
शीट,
तिनंच सांधली जाणारी घरटी...
घडतात, मोडतात.
प्रहरांमागून प्रहर, बहरांमागून बहर
एक बॅच उडाली, दुसरी हजर.
भेदरलेल्या झुंडीच्या अगतिक अस्थिर उग्रतेचा लालबुंद डोळा वटारून पाहणारे पक्षी सगळीभर.
हार्डवायर्ड प्रेरणेनं जागा मिळेल तिथे घुसतात, एकमेकांवर चढतात.
फडफडतात.
जाळ्या ठोकून बंद केलेल्या निर्मम व्हरांड्यांवर
अभिमन्यूचा बिनडोक आवेश घेऊन पुन्हापुन्हा चढाया करतात.
घुसतात, फसतात.
उपाशी तडफडतात.
मरतात.
नव्या दिवशी नव्या जोमानं ट्रेन्स भरून टाकणाऱ्या,
स्मृतीच्या पेशी नसलेल्या प्रवाशांप्रमाणे
नव्या दिवशी पुन्हा नव्याने त्याच जागी चोचीत चोच घालून घुमतात.
दाणे टिपतात, अस्ताव्यस्त पोसतात.
जुगतात, वितात.
खातात, हगतात.
टूथपेस्ट थुंकून ठेवल्यासारखं दिसणारं पांढरंफेक शहर.
पक्ष्यांनी व्यापून टाकलं आहे होतंनव्हतं शहर.

Thursday, 25 April 2019

बसमधला मागच्या खिडकीत बसलेला मुलगा

बसमधला मागच्या खिडकीत बसलेला मुलगा
बोलत असतो फोनवर
रात्रभर.
खुन्नसचं टोक हातात गच्च धरून खिडकीची काच मागेपुढे-मागेपुढे
करत राहताना,
जागेझोपेच्या सीमेवर,
कानांना घासून जात राहतात त्याच्या गुलुगुलु संभाषणाचे ओलसर काठ.
कलत्या सूर्याच्या साक्षीनं हक्काच्या मानेच्या पोकळीत डोकं खुपसून
आवेगानं शब्द आणि स्पर्श लुटू पाहणाऱ्या जोडप्यांच्या सोहळ्यांत
आरोग्यपूर्ण सुखवस्तू नजरांनी कालवलेले
जहरी सांस्कृतिक विटाळ
धुतले जातात हळूहळू.
तळ्यात उतरलेल्या झोपडपट्टीच्या काठावर
घोडे पार्क केल्याच्या थाटात बाइक्स बांधून
रुबाबात
ख्वाजा मेरे ख्वाजा ऐकणाऱ्या
पोरसवदा डोळ्यांच्या गढूळ कोंडाळ्यात बेगुमानपणे उमलत जाणारी आर्त शांतता
रुजत जाते ऐकणाऱ्याच्या मनातही.
पहाटेच्या गार वाऱ्यात
हळूच माघार घेते मागची खिडकी,
तेव्हा वळून एखादं दाणेदार हसू हातावर ठेवायचा मोह होत राहतो,
पण पेंगुळलेले डोळे मिटत असणार नुकते कुठे
दिवसाला भिडण्यापूर्वीच्या
तासाभरात.
अपरंपार अनाकलनीय मायेची एक विराट लाट भिजवून टाकते सगळी पहाट.
दिवस दौडू लागतो.

Wednesday, 24 April 2019

हाताला फुटलेल्या एका नव्या अवयवानं

हाताला फुटलेल्या एका नव्या अवयवानं बोलतो आम्ही आता
फुशारक्या मारतोवाद घालतोभांडतो
शिव्याशाप देतो तळतळून.
कितीही दूरवर पोचणार्‍या गप्पा मारतो दिवसरात्रीच्या कोणत्याही प्रहरी
प्रेमही करतो मनापासून.
एकच लहानशी अट
पलीकडच्या प्राण्यालाही असावं लागतं आमच्याच उत्क्रांतीच्या पायरीवर.
त्यालाही फुटलेला असला पाहिजे हा अवयव.
बस.
यंत्राला ऊर्जा लागतेतसं खावंप्यावंही लागतंच म्हणा.
संडासबिंडासलाही जावं लागतं
धुवायलाओतायला पाणी लागतं.
पण ते सगळं असायचंच.
त्यात फार गुंतू नयेसब मोहमाया है...
अर्थात
काही बग्स आहेतच....
अजूनही क्वचित
दिवस सैल पडतो आणि तरीही पीळ जात नाही कपाळावरच्या आठ्यांतून.
थकवा अंगभरडोळे तारवटून.
गादीवर टेकते पाठपण विसावत नाही सैलावून.
अंथरूण-पांघरूण
गादीउशी.
व्हिक्सची बाटली
पंखाएसी.
स्क्रीन्स चमकदार,
मेसेंजरव्हॉट्सअ‍ॅपफेसबुक बर्करार.
मिटतातही डोळे.
पण सुखाचा अस्फुट हुंकार उमटत नाही अंगांगातून.
कूस वळवतघाम टिपत,
पंखा भर्र फिरवत...
काही केल्या नीज उतरत नाही पापण्यांआडून.
अशा वेळी पुन्हा नवा अवयव हातात घेतो आता
हाताला फुटलेल्या एका नव्या अवयवानं बोलतो आम्ही आता.

Tuesday, 16 April 2019

चोख शांततेचा एक नखभर तुकडा

चोख शांततेचा एक नखभर तुकडाही सापडत नाही आसमंतात
दिवसाच्या कुठल्याही प्रहरी.
एफेम जॉकीची अर्थहीन धेडगुजरी बकबक,
चिरडीला आलेल्या गाड्यांचे हॉर्न्स,
बसच्या पत्र्यावर जिवाच्या आकांताने थपडा मारत प्रवासी गोळा करणारा क्लीनर,
छातीचा ठोका चुकवणारी दीडदोन पुरुष उंचीची स्पीकर्सची भिंत,
‘अगला स्टेशन मुलुंड...’
‘रांडांना दारात हुबं र्‍हाऊन हवा खायाला पायजे...’
ढोलताशेलेझीम.

उरलंच थोडं अवकाश काही तुरळक सांदीफटींतून
आवाजानं न बरबटलेलं
चुकूनमाकून,
तर कुणीतरी घाईघाईनं हवेत सोडून दिलेली फिल्मी संगीताची एखादी सुरेल अश्लील पिचकारी.
जणू शिवीच देतो आहे कुणी अंगावर चालून येणार्‍या या भयाकारी राक्षसाला
अगतिकपणे
आईवरून.

निरवतेची तहान लागलीच कधी कुणाला,
तर उन्हाळ्यातल्या रात्री उत्तम.
दिवे जातात आणि उकाडा असह्य होऊन लोक एमेसीबीला फोन करत सुटतात,
त्याआधीची काही मिनिटं सर्वदूर शांतता असते आसमंतात.
सगळं काही आलबेल असल्याचं भासवणारे
पंख्यांचे भर्र आवाज
एसीच्या यंत्राचा गुरगुराट
फ्रीजचे अव्याहत हुंकार
टीव्हीच्या असंख्य च्यानेलांच्या व्हाईट नॉइजचं गिरमीट
कोमात गेलेलं असतं सगळं.
त्या वेळी छाती भरून मारता येतो एक दम.

फेफडों की बीमारी गेली खड्ड्यात.
पावसाच्या आवाजालाही जिथे असते
‘पूरा शहर पानी में’ची अव्याहत पार्श्वभूमी,
तिथे ओठाशी जळणार्‍या निखार्‍याचा अस्फुट चरचरीत आवाजच फक्त
निरवतेची लालकेशरी मुद्रा उमटवू शकतो मनावर,
हे कळत जातंच इथल्या प्रत्येकाला
कळत नकळत.

Wednesday, 10 April 2019

लग्न न करणार्‍या माणसांना


लग्न न करणार्‍या माणसांना कळतच नाही

आपल्या आईबापाला सावकाश घेरत राहिलेलं म्हातारपण.

नोकरीधंदा असतो लग्न न करणार्‍या माणसांना.
अधिकाधिक स्थैर्य-सुबत्ता-बेफिकिरी...
चैनीच्या सवयीही खिळत गेलेल्या हाडीमाशी.
म्हणावीत तितकी वळणं नसतात थबकायला लावणारी.
केळवणं, ग्रहमकं, रिसेप्शनं...
...डोहाळजेवणं, बारशी, शाळेच्या अ‍ॅडमिशन्स, मुंजी आणि दहाव्याही
नसतात त्यांच्या आयुष्यात थेट.

आईबाप अधिकाधिक कर्मठपणे बघत राहतात मराठी सिरियली
रांधत राहतात त्याच त्या चवीच्या भाज्या आणि आमट्या निरुपायानं मनापासून
नाना युक्त्या लढवतात कावेबाजपणे
आणि
कधीकधी हताशेनं डोळ्यात पाणी आणून खरोखरचं.
करत राहतात नवनवीन स्थळांची वर्णनं न थकता.

आपल्याच अंगाखांद्यावर खेळवलेल्या झाडांची निवांत पानगळ
मुकाट विसरून जाणार्‍या
आणि कावेबाजपणानं दिव्यांचा लखलखाट धारण करत
वस्तूंचे अंतहीन मोह अधिकाधिक निकरानं विकत राहणार्‍या
शहरातल्या रस्त्यांसारखीच,
आईबापांशीही सवयीनं वाढत राहते अनोळख.

याच रस्त्यावर
काचेला नाक लावून सोनेरी मासे
आणि जाळीत बोटं रोवून पिवळेधम्म लवबर्ड्स पाहिले
मन भरेस्तो.
सायकल शिकताना गुडघे फुटले,
ऐन रहदारीत बकुळीची फुलं वेचली वेडगळासारखी,
नाक्यावर तीनतीन तास गप्पा ठोकत रेंगाळलो
रात्री अडीच वाजेस्तो.

ज्या वळणावर खचकन सामोरं येतं हे सगळं,
तिथेच फ्लायओव्हरखाली दिसतो
हळूहळू मरण पावत गेलेला रस्ता.

लग्न करणार्‍या माणसांना कधी भेटतात असली वळणं?

Wednesday, 6 March 2019

शहराला परवडत नाहीत डेडिकेटेड रिसोर्सेस


शहराला परवडत नाहीत डेडिकेटेड रिसोर्सेस.

सूर्यास्त पाहायसाठी मग्न तळ्याचा काठ किंवा प्रेमिकांच्या कूजनासाठी डोंगरातले आडोसे नसतात शहरापाशी राखीव.

रेल्वे क्वार्टर्सच्या मागून डोकावणारा नि शहराच्या दिवेलागणीशी क्षीण स्पर्धा करणारा चंद्राचा तुकडा ट्रेनच्या जाळीदार खिडकीतून बघून माफक हरखतं शहर.

झोपाळलेल्या डोळ्यांनी चहा गाळता-गाळता समोरच्या फांदीवरचं पाखरू बघून खुशालतं आणि आ वासून उभ्या असलेल्या दिवसाकडे वळत निमूट पाठ फिरवतं समजूतदारपणे.

समुद्रावरचा वारा खायचा असेल तर मागची रहदारी ऐकणार्‍या कानांच्या पापण्या मिटून घेण्याची अद्भुत कला अवगत असते त्याला.

कबूलाय,

शहराला ठाऊक नसतं सकाळी कचर्‍याचे डबे जिन्यावरून घसपटत घेऊन जाणार्‍या नि कानात हेडफोन्स खुपसून आपल्याच मस्तीत ओल्या कचर्‍याची घाण विसरू पाहणार्‍या तरुण भंगिणीचं नाव.

बॉम्बस्फोटाचं नाट्यपूर्ण निमित्त न होता निव्वळ गर्दीत पाचपन्नास लोक गुदमरून मेल्याचं ऐकलं तरी एक नाटकी उसासा टाकून खांदे उडवत पुन्हा धावू लागतं शहर.

उत्तररात्री रिक्षातून भरधाव जाणार्‍या कुणा आयटीमजुरणीवर केला कुणी एखादा चुकार बलात्कार,

वा अतिरेकी भासणार्‍या कुणा कोवळ्या दाढीवाल्याला बुकलून ठार केलंच दमल्याभागल्या अश्राप गर्दीनं कधी चुकूनमाकून,

तरी फारसं खंतावत नाही शहर.

त्याच्या रस्त्यांपाशी नांदतच असते

धडधडती-वाहती-तुंबती रहदारी,

क्लोरीनयुक्त पाणी घेऊन वाहणार्‍या जलवाहिन्या,

गू गोळा करत समुद्राकडे निघालेली गटारं,

घामानं थबथबत पण अपघाताचा धोका काही शतांशांनी कमी करत जमिनीखालून रस्ता ओलांडणार्‍या लोकांचे जथ्थे,

आणि जुन्याजाणत्या झाडांची आयमाय काढत निळ्या पत्र्यांआड जमीन पोखरणारं मेट्रोचं उखीरवाखीर कामही,

एकसमयावच्छेदेकरून.

फोनवरून व्हेंडरवर भुंकताभुंकता व्हॉट्सॅपवरचा प्रियकराचा आर्त कोवळा मेसेज बघून जिवणीच्या कोपर्‍यातून हलकेच ओलसर हसणार्‍या

आणि पुन्हा नव्या जोमानं भुंकू लागणार्‍या चटपटीत मल्टिटास्किंग बाईसारखं हे शहर.

शहराला परवडत नाहीत डेडिकेटेड रिसोर्सेस.

Wednesday, 16 January 2019

पुस्तकी नॉस्टाल्जियाचे कढ



(चित्रश्रेय : नीतीन वैद्य)
** 
जादूची अंगठी, रक्तपिपासूंची दरी, सोनेरी पेला, बारा राजपुत्र आणि इतर कथा, दुष्ट जादूगार आणि बोलणारा पोपट, उडता गालिचा, गाणारे झाड... असल्या नावांची चार-चार आण्यांना मिळणारी पुस्तकं आमच्या लहानपणी असत. 'गोष्टींची पुस्तकं' या एका लेबलाखाली मावतील, अशी ती पुस्तकं. इसाप, हातिमताई, सिंहासन-बत्तिशी, विक्रम-वेताळ, सिंदबादच्या सफरी, महारथी कर्ण इत्यादी पुस्तकांना काहीएक कुळशील असायचं. तसलं काही या पुस्तकांना नसे. आकारही थोडका. अक्षरशः सत्तर-ऐंशी पानं, हलका कागद आणि तळहाताएवढा आकार.

मुखपृष्ठावर नावाला धरून चित्र. नाव उडता गालिचा असेल, तर मुखपृष्ठावर गालिचा उडवलेला. बेइमानी नाही. शिवाय आत चित्रबित्रं काढायचे लाड नसत. सरळसोट गोष्टीला सुरुवात. एक किंवा दोन गोष्टींत पुस्तक खतम. राजे-राण्या, सुंदर आणि दुःखी राजकन्या, सावत्र आया, चेटकिणी, दुष्ट राक्षस आणि जादूगार, वयात येणारे राजपुत्र, गरीब सुताराचा सालस पोर, गाणारे बुलबुल इत्यादी मेंबरं हमखास असत. 'हॅन्स ॲन्डरसनच्या परीकथा' आणि 'सुंदर वासालिसा' इत्यादी हाती लागल्यावर आमच्या गोष्टींचे मूळपुरुष ध्यानी येऊन मग त्या पुस्तकांतलं मन उडलं. पण तोवर ती पुस्तकं खूप आवडायची. स्वस्त आणि मुबलक तर मिळायचीच. पण त्यांत एक अजब रसाळपणा होता. तपशील मोजके पण चोख रंगवलेले असत. मुश्ताक, गुलबकावली, बगदाद, तुर्कस्तान, ठकसेन, रूपमती, सारंग, सुलतान... इत्यादी शब्दांशी पहिलीवहिली ओळख या पुस्तकांतून झाली. गोष्टीची भूक या पुस्तकांनी बऱ्याच अंशी भागवली. कोण लेखकबिखक असत कुणास ठाऊक. डोक्याला कितीही ताण दिला तरी अज्जाबात आठवत नाही एकही नाव. पण एके काळी घरात चांगले दोनतीन गठ्ठे या पुस्तकांचेच होते. कुणाकुणाला वाचायला दिले नि अंतर्धान पावले.

आता मधूनच त्यांतलं एखादं दृश्य आठवतं.

कासावीस होऊन तळघरातल्या सोन्यारुप्याच्या अंगठ्यांच्या ढिगात 'ती' साधीशी अंगठी शोधणारी शापित राजकन्या आणि मागे उभी राहून खदखदा हसणारी म्हातारी...

अमावास्येच्या रात्री किर्र जंगलात सोडून दिलेले कोवळे राजपुत्र आणि त्यांचं रक्षण करणारा मायाळू सिंह...

पाण्यातून वाहत निघालेल्या कमळाच्या पानावरून प्रवास करणारा अंगठ्याएवढा टिंगू आणि त्याच्या हातातला गवताच्या पात्याचा बाणेदार भाला...

सुशि आणि तत्सम पुस्तकांनी पुढे डोक्यात जी जागा मिळवली, ती टोटल लहानपणी या पुस्तकांच्या मालकीची होती. सुशिंचं तर नाव तरी आहे. 'अन्याय झाला' अशी खंत व्यक्त करण्याइतपत का होईना, नाव आहे. या पुस्तकांचे लेखक कोण होते कुणाला ठाऊक. परागंदा झाले डोक्यातून. कुणी प्रकाशित केलेली असत, काय अर्थकारण असायचं, लेखकालाच काय, प्रकाशकाला तरी किती मिळायचे... सगळंच अंतर्धान. 

***


लायब्र्यांनाही स्वभाव असतात असं म्हटलं तर फार सरधोपट होईल. पण असतात खरंच. अनेकांना लायब्र्यांमधल्या पिवळ्या पडून जीर्ण व्हायला लागलेल्याएकसाची बायडिंगचे बुरखे घेऊन दामटून बसवलेल्या, जुन्यापान्या पुस्तकांची नफरत असते. त्याच्या अगदी उलट अनाकलनीय आकर्षण वाटत आलं आहे मला तसली पुस्तकं उशापायथ्याशी घेऊन म्हाताऱ्या होत गेलेल्या सेपिया टोनमधल्या लेकुरवाळ्या लायब्र्यांचंच. 

बहुधा झिजत गेलेल्या गुळगुळीत कठड्यांचे लाकडी जिने असतात त्यांना. तेही कधीकाळी गिर्रेबाज वळण मिरवणारे वा निदान सुबक ठेंगण्या आकाराचे तरी असतीलअशा खुणा ठेवून असलेले नि आता जीर्ण होऊन मोडकळीला आलेले. जुन्या गावात मध्यवर्ती जागा असते त्यांची. त्यामुळे आजूबाजूला सगळीकडून कसलीकसली नवनवीन दुकानं नि ऑफिसं थाटून अस्ताव्यस्त वाढून बसलेलं आता गाव. त्यात निव्वळ सवयीनं उभ्या असतात त्या लायब्र्या. एखाद्या सहकारी बॅंकेनी अव्वाच्या सव्वा भाडं देऊ करून एखादा मजला मागितलेला असतोत्याचं दडपण उरावर वागवत. पण करकरत्या जिन्यावरून वर जाताक्षणी पोटात घेणारं उंचाडं छत असतं बहुतेकींना.

जिन्यावरून जीव मुठीत धरून वर जाताना रोखलेला श्वास नकळत सुटतो सैल आणि नजर खेचली जातेच छताकडे. लांबलचक दांड्यांचे मरगळत घरघरणारे पंखेरंग उडालेल्या लहानमोठ्या कपाटांच्या अंधार्‍या अंतहीन बोळकांडीपुस्तकांच्या कार्डांचे नाहीतर रजिस्टरांचे गठ्ठे एकीकडेत्यात आहेत की नाहीतसं जाणवूच नयेशीपोस्टऑफिसातल्या अनादिअनंत प्राचीन कारकुनांच्या गिजबिजत्या वावराची आठवण करून देणारी शिष्टतम कामकरी मंडळीपेपर आणि मासिकं चाळत नि शब्दकोडी सोडवत चुरगळून बसलेले निवांत पेन्शनर-बेकार-विद्यार्थी. आणि अर्थात. सगळीभर भरून उरलेला पुस्तकांच्या सुरस धुळीचा डेंजरसली आकर्षक वास.

अशा लायब्र्यांत आजीव सभासद असलेल्या मेंब्रांनाही तिथे घरच्यासारखं वाटत नसणारच कधीहीइतका उद्धट तिरसट जितक्यास तितकेपणा वातावरणात कोंदलेला असतो. पण त्यातून सराईतपणे वाट काढत हवी ती पुस्तकं अचूक पदरात पाडून घेण्याची कला अंगी बाणलेली मेंबरंच तिथे टिकलेली असतात. 'या मंडळीसाहित्यप्रेम जागवूपुस्तक वाचवू'छाप आडव्या केळ्याच्या आकाराच्या लंबगोल चिकट हास्याकारी पुस्तकप्रेमाचा लवलेशही आसंमतात नसतोतसाच कसल्याच कोरेपणाचाही नसतो. क्वचित एखादी उत्साही तरुण मुलगी देवघेव विभागात चिकटलीचतर चारच संध्याकाळींमध्ये तिच्यावरही तोच तो उर्मट बेफिकीर कोरडेपणाचा थर चढतो आणि तिच्या नव्हाळी तत्परतेला पोटात घेऊन लायब्रीचं तळं पुन्हा संथनिवांत होत सैलावतं.

अशा लायब्र्यांतल्या पुस्तकांवर अर्थात खुणा असतात. कधी उत्साही आणि आगाऊ अभिप्राय चिताडलेले असतात. पानांचे कोपरे दुमडलेले असतात. मधली वा शेवटची पानं गायब असतात. अनेक रसाळरंगीत पुस्तकंच्या पुस्तकंच लांबवलेली असतात. पुस्तकं आपल्या हातात पडेस्तो त्यांचा कोरा वास विरून गेलेला असतो...


तरी अशा लायब्र्यांच्या गुहांतून शिरताना एकाच दिशेनं जाणारी आपली पावलं उमटावीत आणि आपल्या आयुष्यापासून कायमचं पळून जाऊन त्यांच्या पोटात लपून बसता यावं अशी चमत्कारिकदडपवणारीगूढ ओढ मला अजुनी वाटते याचं कारण काय असेल?

***


'इंग्रजी वाचन वाढवाअसा यच्चयावत अ‍ॅडल्टांचा धोशा लहानपणापासून ऐकला. इंग्रजीवर प्रभुत्व नसल्यामुळे आत्मविश्वासात होणारी घट आणि तोटे अनुभवणार्‍या पालकांपासून ते इंग्रजीवरच्या प्रभुत्वाचे फायदे अनुभवणार्‍या हितचिंतकांपर्यंत सगळे जण तो लावून धरत. पण वाचायचं कायतर शरलॉक होम्स. नाहीतर मग प्राइड अ‍ॅन्ड प्रिज्युडाईस. नाहीतर मग एकदम वुडहाऊसच. मी शिव्या खाण्याच्या तयारीनीच हे बोलायचा धीर करत्येपण मला ती भाषा अजिबात आवडत नसे. या पुस्तकांमधल्या भाषेच्या दर्जाबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण ते कोणत्या टप्प्यावर करायचं वाचन आहेयाचं काही भान आजूबाजूला कुणालाच दुर्दैवानं नव्हतं. जे वाचन भाषेचा लुत्फ लुटण्यासाठी करायचंते वाचनाच्या प्राथमिक यत्तेत करत नाहीत हे आमच्याइथल्या अ‍ॅडल्टांना कळत नसावं. त्यामुळे चालायला शिकायचंतेच मुळी हिमालयाच्या पायथ्यापासून वर कड्याकडे बघत-बघतअडखळत... असा काहीसा प्रकार होई नि माझ्यासारख्या आळशी लोकांना इंग्रजी पुस्तकाबद्दल नफरत पैदा होई. मराठी वाचनात प्रावीण्यपातळी पार करून प्राज्ञकडे सूर मारलेला असल्यामुळे सुपरफास्ट प्रवासाच्या चैनीची सवय. त्या पार्श्वभूमीवर एका हातात कोश आणि एका हातात पुस्तक घेऊन रांगत रांगत करायच्या अडखळत्या वाचनातली अधोगती अजिबात मानवत नसेहे तर झालंच. पण त्याहूनही मोठी कारणं आहेत आणि ती मला अजूनही सतावतात.

कोशातून अर्थ पाहण्याला काही एक मर्यादा असतात. जाळीमंदी पिकली करवंदं’ हा शब्दसमूह वाचल्यावर माझ्या डोळ्यासमोर जे साक्षात उभं राहतंते डॅफोडिल्स वाचल्यावर उभं तर राहत नाहीचपण कोश बघूनही मला त्याचा पूर्ण अर्थबोध होत नाही. क-र-वं-दा-ची-जा-ळी या अक्षरसमूहाला माझ्या लेखी एक रंगआकारस्पर्शगंध आहे आणि त्यासोबत येणारी पिकत्या उन्हाळ्याची रणरणती तगमग आहे. त्यामुळे माझा अनुभव ऑलमोस्ट थ्रीडी आहे. या सगळ्यामुळे माझ्या मराठी वाचनाला येणारी मिती माझ्या इंग्रजी वाचनाला येणं शक्यच नाही. फार तर एक फूल आहे बा कसलंतरी’ इतपत आकलन शक्य.

अलीकडे लंडनमध्ये भटकंती केल्यावर 'रिव्हर्स ऑफ लंडनवाचायला मला आलेली बेहद्द मजा पाहून मीच चकित झाले आणि मला माझ्या इंग्रजी वाचनातला हा अडथळा नीटच अंतर्बाह्य कळला.

अर्थात - पुस्तकांतून भेटणारी अनेक ठिकाणं चित्तचक्षूंनीच अनुभवायची असतातअसा चश्मिष्ट सल्ला घेऊन काही लोक धावत येतीलच. त्यांना नम्र नमस्कार करून इतकंच सांगणंकी मूलभूत शब्दसामर्थ्य विकसित झाल्यानंतर अद्भुतरम्य आणि कल्पनारम्य जगाची डोक्यात निर्मिती करण्याचा माझा अजिबात नकार नाही : लिटिल प्रिन्सहॅरी पॉटर आणि इस्किलार या तिन्हींतली जादू मी जाणून आहे. पण या काल्पनिकही अनुभवविश्वांचा पोत माझ्या सवयीच्या लिपीमुळे आणि मातृभाषेमुळे बदलतोहे तरीही सत्यच आहे.

आजही एखाद्या इंग्रजी पुस्तकानं माझा पूर्ण ताबा घेतल्यावर त्याचं मराठीकरणरूपांतरगेला बाजार अनुवाद तरीकरायला हात शिवशिवतात ते माझ्या भाषांतरकार असण्यामुळे होतंकी माझं भाषांतरकार असणंच मुळी एका भाषेतून उगवून येण्याशी आणि इतरत्र तितक्या जोमानं वाढू न शकण्याशी निगडीत आहेहे मला नीटसं ठरवता येत नाही. 


आता शिक्षणाची माध्यमभाषाच इंग्रजी होत गेलेली असतानाभाषांतराचा व्यापार लोकांना अव्यापारेषु वाटत असतानापुढच्या पिढीला मराठी वाचनाची गोडी लावायला कधी नव्हे इतकं आणि बरोब्बर उलट्या टोकानं झगडायला लागत असतानाभाषिक वैविध्यातली समृद्धी भल्याभल्यांना समजत नसताना - आपण शेवटच्या डायनॉसोरांपैकी एक असल्याची सुरस आणि चमत्कारिक भावना होते. पण मराठी की इंग्रजी असा प्रश्न अगदी एटीएम मशीननी जरी विचारलातरी भयाकारी भाषांतराचे धोके पत्करूनही मराठीच्या बटणाकडे हात जातो. मग पुस्तकाचं काय विचारता!

***


हळूहळू घरात साचत जाणारी पुस्तकं हा एक अत्यंत डेंजरस विषय आहे.
सतीश काळसेकरांची एक अपरिमित सुंदर आणि चपखल कविता याच विषयावर आहे. जिज्ञासूंनी शोधून पाहावी. नच मिळाल्यास नाइलाजानं पुढे वाचावं.
शालेय काळात पुस्तकं बक्षीस म्हणून किंवा वाढदिवसाची भेट म्हणून मिळत. आगमन वार्षिक असे. संख्या मर्यादित. लायब्र्या ही व्यवहार्य आणि व्यवहारातली संकल्पना होती. कमरेवर कमावता खिसा फुटल्यावर हे गणित हा-हा म्हणता विस्कटलं. पूर्वी लायब्रीतून तीनेकदा तरी आणून भयंकर जवळचं वाटायला लागल्याखेरीज अमुक एखादं पुस्तक विकत आणण्याइतके पैसेच नसत. ते असायला लागले, नि मग आधी हळू आणि मग चक्रवाढ वेगानं पुस्तकं वाढत गेली. आता दर वेळी नवं पुस्तक खुणावतं; तेव्हा घरातली कोरीकरकरीत न वाचलेली पुस्तकं, वाचूनही फार नावडलेली आणि तरी घरी ठिय्या देऊन बसलेली संभावित पुस्तकं, लायब्र्यांच्या धूळ खात पडलेल्या मेंबरशिपा, फेसबुकवत्सापावर जाणारे दिवसाचे अठ्ठेचाळीस तास, निरनिराळ्या लायब्र्यांनी नेटवर कायदेशीररीत्या चढवलेली मराठी आणि अनेक चतुर टेक्नोलॉजिस्टांनी बेकायदेशीररीत्या चढवलेली असंख्य इंग्रजी पुस्तकं... असं स-ग-ळं एकवार डोक्यात चमकून जातं. तरी ‘हे पुस्तक मात्र हव्वंच्च’ अशी ग्वाही – कुणाकडून कुणास ठाऊक – दिली जाते. अतीच झालं, तर ‘कपड्याकॉस्मेटिकांवर नाही ना उधळत आपण?’ अशी एक उगाच उच्चभ्रू सबब पुढे होते. कधीकधी रद्दीवाल्याकडून वा किलोवर पुस्तकं विकणार्‍या प्रदर्शनांतून ‘काय? फक्त पन्नास रुपये?’ असा अविश्वासाचा सूर मनातल्या मनात काढून खरेदी होते.
पण अखेर पुस्तकं घरी येत राहतातच.
‘आता ही पुस्तकं मला नको आहेत. भिकार आहेत. कालबाह्य आहेत. निरुपयोगी आहेत. तुम्हांला कुणाला हवी तर न्या. नाहीतर मी रद्दीत विकणारे. देणगीबिणगी म्हणून दिली लायब्रीला, तर शेवटी ती पडूनच राहतात कुठेतरी त्यांच्या कोपर्‍यात. रद्दीवाल्याकडून कुणीतरी हौसेनं नेऊन वाचील तरी...’ अशी लांबलचक (जीएप्रणित) स्पष्टीकरणं लोकांना (आणि स्वतःला) देऊनही अशा टाकायला काढलेल्या पुस्तकांच्या चळती सहा-सहा महिने घरात लोळत पडतात.
अमुक पुस्तक नेमकं कुठे आहे याचा आपल्या डोक्यातला हिशेब अचूक असतो, अशी घमेंड मिरवायची सवय असते. कुठल्यातरी एका टप्प्यावर ती घमेंड आपल्याला तोंडघशी पाडते. कुठलंतरी पुस्तक गहाळ असतं आणि ते कुणी वाचायला नेऊन ठार विसरलंय हे काही केल्या आठवत नाही. लोकांच्या हलगर्जीपणाबद्दल थयथयाट करून होतो. पण खरा राग आपला आपल्यालाच आलेला असतो. ‘आपलं पुस्तक, नि आपल्याला पत्ता नाही, अं?’छापाची चिडचिड. मुक्यानं साहायची. कधीतरी चक्क आपल्याकडे पूर्वी असलेल्या पुस्तकाची एक प्रत अधिक विकत घेतली जाते. कारण पूर्वी पुस्तकं डोक्यात जशी गोंदली जायची, तशी अलीकडे जात नाहीत, हे कटू असलं तरी सत्य असतं. हा फटका वर्मी बसतो.
आपण पुस्तकांचा पसारा आवरायला नि लावायला काढतो. अजून काही लापता पुस्तकांचा तलास लागतो. रद्दीसाठी अजून एक चळत निघते. ‘आता ही इथे लोळत राहू देणार नाही, मीच नेऊन देते कशी...’ असा बाणेदारपणा दाखवून रद्दीवाल्याकडे फेरी होते आणि येताना थोडी जीर्ण पुस्तकं कनवटीला लावून आपण परततो.

चालायचंच. काळसेकरांची पुन्हा आठवण काढायची, तर ‘पुस्तके येत राहतात....’

***


काही पुस्तकं आपल्याला वॉन्डसारखं खुणावतात, निवडतात.

असं श्रीनांचं ‘माणूस आणि लेखक’ हे मला जाम आवडणारं आत्मचरित्रात्मक पुस्तक. वास्तविक त्यातही विश्राम बेडेकरांच्या‘एक झाड दोन पक्षी’तल्या सारखा ओढून-ताणून त्रयस्थपणाचा आव आहे क्वचित कुठेकुठे. पण तो गालबोटाइतपतच. बेडेकरांच्या पुस्तकाइतका कोरडेपणा नाही. शिवाय जामच काय-काय धमाल तपशील. विंदांसोबतचा पत्रव्यवहार. कोकणातला प्रादेशिक लेखक म्हणून प्रसिद्धीस आल्यानंतर पावट्याची शेंग असते की कणीस असतं, याबद्दलचा थोर संभ्रम. मुंबई सोडून जाण्याचे फसलेले प्रयत्न. स्वतःचं धन्य-धन्य कौतुक. थक्क करणारा प्रामाणिकपणा. काही विद्ध करणार्‍या आठवणी. मुलीनं पसंत केल्यावरही तिला दुसर्‍यांना भेटून आपल्या परिस्थितीचं भीषण वर्णन करण्यातला नितळ-निरागस गाढवपणा. असली एकेक रत्नं. हे पुस्तक वाचताना ‘लव्हाळी’तल्या सर्वोत्तमचाच विंगेतला अवतार भेटत असल्याचा भास होत राहतो.

परिणामी पुस्तकात दोष असूनही मला ते कमालीचं प्रिय.

पूर्वी ते सहजासहजी मिळत असे. पण माझ्याच नाकउडवूपणापायी ते ‘घेऊ नंतर’ गटात गेलं ते गेलंच. नंतर कधीतरी लायब्रीतून आणून ते वाचलं आणि प्रचंड आवडलं. मग लायब्रीतूनच तीनचारदा आणून पारायणं केली. आता आणूनच टाकू म्हणून दुकानी गेले, पुस्तक‘औटॉफप्रिंट ए हो. नाही मिळत आता.’ अशी तोंड भरून बोळवण.‘एखादी प्रत तरी बघा. जुनीपानी मळकी-फाटकीही चालेल. पण प्लीज बघा.’ अशा विनवण्या करूनही डाळ शिजेना. मग एकदा लायब्रीतलीच प्रत आणवून चक्क झेरॉक्सून घेऊ असं ठरवलं. आणलं तर काय, मधल्या काळात प्रतीची रीतसर बांधणी झालेली. पुस्तक धड पुरतं उघडून वाचायलाही कष्ट पडत होते. झेरॉक्सबिरॉक्स निघणं शक्यच नव्हतं. तोवर बुकगंगा वाहायला लागली होती. तिथेही गळ टाकून ठेवला. पण तिथे ‘नॉट इन स्टॉक’ची लाल पाटी. परचुर्‍यांच्याच दरबारी हस्तेपरहस्ते विचारणा करून पाहिली. ‘अहं, नाही हो. आमच्याकडेच प्रत शिल्लक नाही...’

शेवटी मी हताश होऊन नाद सोडला. लायब्र्या हाच वाचकजातीचा अंतिम आधार आहेत, यावर श्रद्धा ठेवली आणि अधूनमधून प्रत घरी आणवण्याचा प्रघात ठेवला.

एका कामकरी संध्याकाळी कधी नव्हे तो स्टेशनातून घरी चालत यायचा किडा चावला. वास्तविक त्या दिवशी खिशात पैसेही नव्हते. पुस्तकं विकत घेण्याचा काही विचारही नव्हता. पण ठाण्यातल्या‘मॅजेस्टिक’वरून जाताना मला अक्षरशः कुणा कर्णपिशाच्चानं कान फुंकल्यासारखी तळघरात उतरायची बुद्धी झाली आणि मी आपली आत शिरले. आत शिरल्या-शिरल्या नवी पुस्तकं. मग ‘मॅजेस्टिक’ची घरची पुस्तकं. मग शब्दकोश. मग ‘मौजे’चा कप्पा. त्यातच तळाशी ‘परचुरे’ आणि ‘अक्षर’चा संसार. इकडे-तिकडे न बघता थेट‘मौजे’पाशी गेले. खाली ‘माणूस आणि लेखक’ची एकमात्र प्रत नांदत होती.

चकित होण्याच्या पलीकडचे भाव माझ्या चेहर्‍यावर उमटले असणार.

काडीमात्र विचार न करता, कुणीतरी हे पुस्तक आता नाहीसं करणार आहे, अशा भीतीनं मी ते पुस्तक उचललं आणि काउंटर गाठला. ‘ही प्रत मला हवीय. मी पैसे काढून आणते.’ असं म्हणून पुस्तक ठेवून बाहेर आले. एटीएम हुडकून पैसे काढले आणि धावत जाऊन प्रत ताब्यात घेतली.
योगायोगाच्या पलीकडचं काहीतरी त्या पुस्तकाशी जोडलं गेलं आहे आता माझ्या डोक्यात. 

अशीच जीएंच्या ‘माणसे: अरभाट आणि चिल्लर’ची गोष्ट. तोवर मी जीए अजिबात वाचलेले नव्हते. पत्रं तेवढी फार प्रेमानी वाचली होती. काही कथा. बस. त्या दिवसांत एका मित्रानं ते पुस्तक मला दिलं. अतीव आवडलं. अर्धवट-अपुरं वाटलं, तरीही फार आवडलं. प्रत काही नवीबिवी नव्हती. जुनीपानी. शिळीच खरंतर. कारण मित्राला रद्दीवाल्यांचा शौक. तिथून उचललेली ती प्रत.

पुरं केल्यावर पुन्हा उघडलं आणि पहिल्याच पानावरचं, आधी लक्ष्यात न आलेलं नाव बघून मी दचकले. त्यावर चिपळुणात राहणार्‍या माझ्या एका मामीचं नाव होतं. मित्राला खोदून खोदून रद्दीवाल्याचा ठावठिकाणा विचारला. तो मुलुंडमधला कुठलातरी. मी ठाण्यात.

मग मामीला गाठून ते पुस्तक नक्की कुठल्या जत्रेत तिच्यापासून‘बिछडलं’ होतं ते विचारायचा प्रयत्न केला. तिला काहीही आठवेना. रद्दीत टाकल्याचंही आठवेना, हरवल्याचंही आठवेना. नाव तर तिच्याच हस्ताक्षरातलं.
मित्र आणि मामी अशा दोघांनाही सांगून-सवरून ठेंगा देऊन मी ती प्रत रीतसर ढापली.
पुढे कधीतरी आपल्याकडची जुनी पुस्तकं वाचायला देऊन टाकताना त्यावर आपलं नावगाव लिहायचा नि पुस्तकाला जाणीवपूर्वक अज्ञाताच्या प्रवासाला धाडण्याचा अमेरिकी खेळ ऐकूनही मी पुरेशा आनंदाश्चर्यानं चीत्कारले नाही, याला कारण माझ्या बाबतीतला हा योगायोग असणार. 

अशी काही पुस्तकं माझ्या मित्रांच्या बालपणातली. प्रेमानं माझ्याकडे नांदायला धाडलेली. काही माझ्याकडून मित्रांकडे गेलेली. काही पुस्तकं काही देखण्या चित्रांची कव्हरं घालून आलेली. आता मूळची मुखपृष्ठंही विसरून नवेच चेहरे मिरवणारी. योगायोग नव्हेत त्यात, पण आपल्या जवळच्या माणसासाठी आपल्या वस्तूवरचा स्वामित्वभाव सोडून देण्याचा हृद्य धागा आहे. पुस्तकातल्या साहित्यापलीकडचं काहीतरी त्या पुस्तकाला येऊन मिळालं आहे आणि आता दोन्ही वेगवेगळं करता येणं शक्य नाही. कधीतरी ही पुस्तकंही रद्दीत जातील, कुणी सांगावं. त्यांना लगडून असलेल्या आठवणी तरीही उरतील. कुण्या अनाम वाचकाच्या गोष्टीतली गोष्ट होतील..

***

चातुर्मास*, ‘कालनिर्णय’ची मागची पानं, पाककृतींची पुस्तकं, वर्तमानपत्रांच्या पुरवण्या, डॉक्टरांच्या नि ब्यूटीपार्लरांच्या वाट पाहायच्या खोलीतच सापडणारी गुळगुळीत कागदांवरची इंग्रजी-मराठी मासिकं हा साहित्याचा एक दुर्लक्षित पण सुरम्य असा भाग आहे. वर्तमानपत्रांच्या पुरवण्या तरी त्यातल्या त्यात प्रतिष्ठित. इतर मजकुराची मात्र साहित्यात जिम्मा केली जात नाही हे मला कृतघ्न वाटतं. इतर पुस्तकं वाचणे ही आपल्या पाल्याच्या शैक्षणिक वाटचालीतली धोंड आहे अशी समजूत एका विशिष्ट वयात निदान आमच्या आईवडलांच्या पिढीपर्यंत तरी यच्चयावत पालकांना पछाडत असे. अशा वेळी कथाकादंबर्‍यांची रसद तुटून उपासमार होई. विशेषतः त्या काळात – आणि खरं तर कायमच – मला या साहित्यानं अनेकदा हात दिला आहे. 

चातुर्मासामधल्या कहाण्या वाचताना सत्यनारायणाला आलेल्या भटजींसारखा एखादा टकलू इसम मदरशांमधल्या कोर्‍या चेहर्‍याच्या मुलांप्रमाणे निर्बुद्धपणे मागेपुढे झुलत एका विशिष्ट सुरात, योग्य त्या ठिकाणी विराम घेत आणि हेलकावे देत आपल्याला कहाणी ऐकवतो आहे असा भास होई. त्या कहाण्यांमधली ‘निर्मळ मळे, उदकाचे तळे...’, ‘मग तिनं काय करावं? एक पळसाचं पान घ्यावं.’सारखी तालबद्ध वाक्यरचना; ‘झोटिंग’, ‘केनीकुर्डू’, ‘टाकळ्याचं बी’ असे लोकविलक्षण शब्द; आटपाट नगरं आणि आवडत्या-नावडत्या राण्या असलेली अद्भुत विश्वं; आणि ‘पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण’ करणारे ठसठशीत शेवट... चातुर्मासाची पोथी बघून य वर्षं झाली, तरीही मला जसेच्या तसे स्मरतात. 

तशीच ती पाककृतींची पुस्तकं. ताज्या पुस्तकांपेक्षा हळदीचे डाग ल्यालेली, पत्रावळ्या झालेली आणि चांगल्या आजी-वयाच्या बायांनी लिहिलेली पाकृपुस्तकं कादंबर्‍यांसारखी वाचायला बेष्ट. ‘कोंबडीचे अर्धे पिलू’ घ्यायला काय सांगतील, ‘दोन तोळे वेलदोडे’ कुटायला काय सांगतील, ‘चांदीच्या वाटीतून वाढावी आणि सढळ हस्ते तूप सोडावे’ असल्या पेशवाई सूचना काय देतील... नुसती धमाल. उपाशीपोटी मात्र असली पुस्तकं वाचू नयेत, चिडचिड होते.

गुळगुळीत कागदावर छापली जाणारी मराठी मासिकं – त्यातही आपण हे बायकांसाठी छापतो आहोत, अशी क्लॅरिटी असलेल्या संपादकांची – हाही एक उत्तमपैकी करमणूकप्रकार आहे. एकदा तर अशा एका मासिकातली ‘कामात रमलेल्या पतिदेवांसाठी देहाची निगा कशी राखावी’ याचे हातासरशी धडे देणार्‍या एका ललनेची कथा वाचताना माझा नंबर लागला, तरी मी बेशरमपणे त्या गावचीच नसल्याप्रमाणे बसून राहून कथा पूर्ण केली होती. नाहीतर असल्या धमाल कथा घरी कुठून वाचायला मिळणार?! 

‘कालनिर्णय’च्या मागच्या पानांवर हल्ली असली जमाडीजंमत असते की नाही कुणास ठाऊक. मोबाइलांनी मनगटी घड्याळांची तर हकालपट्टी केलीच, तशी आता क्यालेडरांचीही होण्याच्या मार्गावर आहे, याकडे मराठी सारस्वत थोडे लक्ष्य पुरवील काय?!

*योग्य शब्द ‘चतुर्मास’ असा आहे हे मला ठाऊक आहे. पण निदान या पुस्तकाच्या बाबतीत तरी ते विशेषनाम पदाला पावलं असल्यामुळे बदल केलेला नाही.

***
सशाच्या चालीनं आणि विणीनं घरात येऊन हातपाय पसरणारी पुस्तकं जाताना मात्र कासवं होतात. एकेका पुस्तकाच्या दोन प्रती असल्या; तरी एक लहानपणापासून हाताळलेली, नजरेला सवयीचा-नॉस्टाल्जिक करणारा टंक असलेली, कुणाची सही ल्यालेली, खास कुणीतरी भेट दिलेली.. नाना कारणं. इ-प्रतींमुळे जागा वाचते... फुकटच्या फाकट भावुक नि भाविक होऊ नये वाचकानं... आशय खरा महत्त्वाचा... जग कुठे चाललंय... सेंद्रिय प्रेम इज ओव्हर्रेटेड्... असे चटपटीत युक्तिवाद सराईतपणे टाइपणारे हात रेंगाळतात कागदांपाशी. काय असतं असं पुस्तकात? कधी पाय घसरेल ते सांगता येत नाही इतक्या माजलेल्या शेवाळी उपमाउत्प्रेक्षा नि सुविचार टाळून बोलायचं  झालं, तर उसनवारीला पर्याय नाही : पुस्तक पोर्ट-की असतं. चांगलं जगायचं असेल, तर माणसांचे काही भ्रम टिकावेत तशा या पोर्टक्याही टिकाव्यात. टिकतील. टिकोत.

Wednesday, 28 November 2018

या भवनातील गीत पुराणे...

पुलंसंबंधी काही नकारात्मक म्हणणं मोठं कर्मकठीण आहे.

एकतर माणूस अतिशय म्हणजे अतिशयच चांगला कलावंत - किंवा स्वतः पुलंच्या शब्दांत म्हणायचं तर खेळिया. अनेक क्षेत्रांत केलेला संचार. भाषेवरची जबरदस्त हुकूमत. लोकांना मोहवून टाकणारं बहुविध साहित्य. मी स्वतःच पुलंच्या साहित्याची इतकी पारायणं केलेली आहेत, की आता नव्यानं वाचायला घेतलं इतक्या वर्षांनी, तर पुढची ओळ आपसूख आठवते. बरं, माणूस नुसताच कलावंत म्हणून चांगला नाही, तर माणूस म्हणूनही जिंदादिल आणि उमदा. दातृत्व? पुष्कळ. उत्तम वेव्हारे जोडून उदास विचारे वेचलेलं धन. सरकारी ठोकशाहीविरुद्ध उभं ठाकण्याचं कर्तृत्व? दोनदा दाखवलेलं. एकदा अणीबाणीच्या कालखंडात प्रचारसभांमध्ये भाग घेऊन. एकदा 'लोकशाही हवी आहे, ठोकशाही नको' असं महाराष्ट्रभूषण या सरकारी पुरस्काराचा स्वीकार करताना सरकारला खडसावून. माणसांत मिसळून माणसांवर प्रेम करण्याची अफाट ताकद. पत्नीनं मतभेद आणि नाराजी व्यक्त केली, उमदेपणानं नम्र स्वीकार. मुख्य धारेतली लोकप्रियता लाभली. तिचा वापर करून दलित साहित्याचं जाहीर कौतुक. कोणत्या आधारावर या माणसाचं उणं काढणार? जागाच नाही. त्यांच्या जन्मशताब्दीवर्षात - त्यांना जाऊन जवळजवळ वीस वर्षं उलटून गेली, मधल्या वर्षांत काळानं कूस पालटली, जग कधी नव्हे इतकं जवळ आलं नि आमूलाग्र बदललं, तरीही या माणसाची लोकप्रियता अबाधित. पुस्तकं आपली खपतातच आहेत.

सगळं दृष्ट लागावं असंच तर आहे.

तरीही अलीकडेच एका गोतावळ्यात वय वर्षं वीसहून लहान असलेल्या एका मुलाकडून पुलंच्या साहित्यातली उद्धृतं सतत ऐकण्याचा योग आला आणि चक्रावायला झालं. पुलंच्या मृत्युवर्षाच्या आसपास जन्माला आलेला हा मुलगा. त्याची भाषा मराठी आहे खरी. पण त्याखेरीज पुलंच्यात आणि त्याच्यात कोणताही समान दुवा नाही. थिसियसच्या जहाजाचं उदाहरण खरं मानायचं, तर मधल्या काळात भाषेच्याही पेशी आमूलाग्र बदलून गेलेल्या. जरी भाषेचं नाव मराठी असंच असलं, तरीही तिची चौकट, ठेवण, वापर सगळंच आरपार बदललेलं. पुलंनी ज्या मध्यमवर्गीय माणसाचं आत्मचरित्र निरनिराळ्या प्रकारे हयातभर रेखाटलं, त्याच्या आयुष्याशी या मुलाच्या आयुष्याचा काय संबंध आहे? चाळ, कचेर्‍या, गजरा-नाटक-शालू-शेले-व्याख्यानं या सांस्कृतिक बाबींशी असलेले लागेबांधे, पोस्ट आणि तत्सम संस्था... सगळं अंतर्धान पावलं आहे वा हळूहळू अंतर्धान पावत चाललं आहे.

मग हा मुलगा पुलंचे त्याच्या आयुष्याशी असंबद्ध असलेले उतारे हे असे वेळोवेळी फेकतो आहे, आळवतो आहे, त्यांचा आनंद लुटतो आहे - ते नक्की कशातून? आणि ते इतकं अस्थानी-कुरूप आणि कोड्यात टाकणारं का वाटतं आहे मला?

या प्रश्नांच्या उत्तरासाठी पुन्हा पुल वाचायला घेतले. आश्चर्य म्हणजे, त्यांचं काहीच मनास येईना. ते कमालीचे कालबाह्य वाटायला लागले. त्यांच्या साहित्याचा सांधा 'आज'शी जुळतोसं वाटेना. लिंगभावाबद्दल कमालीचा असंवेदनशील, असंतुलित असलेला त्यांचा विनोद खुपायला लागला. लोकांना काय वाटतं आहे याचा कानोसा घेण्यासाठी तसं म्हणायचा प्रयत्न केला मात्र - लोक अंगावर धावून यायला लागले आणि मी हबकले. पुलंवर प्रेम तर मीही भरभरून केलं आहे, करते. तरीही त्यांच्या साहित्याची अशी चिकित्सा करणं म्हणजे घरावर दगड मारून घ्यायला आमंत्रण देण्यापैकीच असणार आहे, हे नीटच लक्ष्यात आलं. मुळात पुलंच्या साहित्याबद्दल प्रश्नचिन्हासकट काहीतरी म्हणायला लागलात, की लगेच तुमच्या हेतूबद्दल शंका घेतली जाणार अशा प्रकारची आणि अशा प्रमाणातली पुलंची लोकप्रियता - किंवा खरंतर त्यांच्याबद्दलची भक्ती - दिसायला लागली.

मग ही चिकित्सा करून बघणं जास्त-जास्तच महत्त्वाचं वाटायला लागलं.

~~~

पुलंनी कुणाबद्दल लिहिलं?

दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळातला मराठी शहरी मध्यमवर्गीय पुरुष पुलंच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होता. 'असा मी असामी' किंवा 'बटाट्याची चाळ' या कथनात्मक काल्पनिक लेखनात तर तो उघडपणे आहेच. पण वेळोवेळी लिहिल्या गेलेल्या त्यांच्या इतर लेखांमध्ये, व्यक्तिचित्रांमागच्या लेखकाच्या आवाजामध्ये, प्रवासवर्णनांमधला 'मी' म्हणून शहरी मध्यमवर्गीय पुरुषाचा स्वर ऐकू येतो. मी अंतर्बाह्य शहरी प्राणी आहेहे खुद्द पुलंचंच विधान आहे. ज्या मंडळींची मतं मराठी साहित्यात अनुकरणीय गणली जातात, पीअर प्रेशरसारखं काम करतात, अशी मंडळीही कायम बहुतकरून शहरी आणि उच्चवर्णीय होती; त्यामुळे पुलंच्या लोकप्रियतेचं अनुकरण पुढे निमशहरांतून आणि गावांतून झालेलं असणं शक्य आहे. मात्र पुलंचं साहित्यविश्व शहरी लोकांपुरतं मर्यादित होतं, इतकं तरी म्हणणं भाग आहे.

सहस्रकानं कूस बदलण्याच्या सुमारास या शहरी मध्यमवर्गीय जगाचं चित्र बदलायला लागलं. चाळी जाऊन हाउसिंग सोसायट्या अवतरल्या. कोकण रेल्वेनं लाल डब्याला स्पर्धेतून भिरकावून दिलं. चारचाकी गाडी, फोन आणि एसी या एके काळी अप्रूपाच्या आणि अपूर्वाईच्या असलेल्या, श्रीमंती समजल्या जाणार्‍या वस्तू सहजी कुणापाशीही दिसू लागली. कारकुनांनी कात टाकली. सरकारी कचेर्‍यांमधला मराठी मध्यमवर्ग वेगानं आयटीत मजुरी करण्याकडे सरकू लागला. परदेशवार्‍या सहजसाध्य झाल्या. स्मार्टफोन्स आणि इंटरनेट रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले. मराठी शहरी मध्यमवर्गीय पुरुषाचं सगळं भवताल आणि परिणामतः तो स्वतःही आधीचा उरला नाही.

भवतालातल्या या बदलांमुळे मला पुलंचं साहित्य कालबाह्य वाटू लागलं का?

मनाशी आलं खरं. पण हे उत्तर फारच ढोबळ ठरलं असतं. साहित्यिक आपल्या साहित्यातून कोणता काळ रंगवतो, या गोष्टीनुसार त्याचं कालसुसंगत असणं का ठरावं? पेशवेकालीन व्यक्तिरेखांवर आज 'श्रीमंत गोपिकाबाईची बखर' लिहिणारे आनंद विनायक जातेगांवकर म्हणा, किंवा भविष्यकालीन समाजाचं काल्पनिक चित्र 'उद्या'तून रेखाटणारे नंदा खरे म्हणा - एक जण वरकरणी भूतकाळाबद्दल लिहितो आहे, या कारणामुळे तो कालबाह्य ठरणार नाही आणि एक जण वरकरणी भविष्यकाळाबद्दल लिहितो आहे, या कारणामुळे तो भविष्यवेधी नव्हे. त्यांच्या कालसुसंगत असण्याची वा नसण्याची कारणं निराळी असतील. फक्त मजकुरातला काळ न पाहता, त्या काळाबद्दल, त्या काळाच्या वर्तमानाशी असलेल्या नात्याबद्दल, कारण-परिणामांबद्दल लेखक प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काय म्हणतो आहे, त्यावरून तो कालसुसंगत आहे की नाही हे ठरेल. थोडक्यात, लेखकाला त्याला हवा तो लेखनकाळ निवडण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य असतं. तो काही त्याच्या कालसुसंगत असण्याचा निकष नव्हे.

या निकषाचा आधार घेता पुलंचं साहित्य कालबाह्य नव्हे, असंबद्ध तर नव्हेच नव्हे.

पण पुलंच्या साहित्याचा भाग असलेल्या अनेक गोष्टी आजच्या वाचकांनी पाहिलेल्या-अनुभवलेल्या नाहीत, हे तरीही उरतंच. 'बटाट्याच्या चाळी'तला रामा गडी, 'व्यक्ती आणि वल्ली'मधल्या नंदा प्रधानच्या इंदूचा थेरडा, परदेशी जाण्यासाठी करण्याचा बोटीतला प्रवास... अशी अनेक उदाहरणं देता येतील. फार लांब कशाला जा, गेल्या पंधराएक वर्षांत लाल डब्ब्याला पाय न लावलेली कितीक तरुण शहरी माणसं सापडतील. तरी, ज्यांनी आयुष्यात एकदा तरी एस.टी.चा प्रवास केला आहे, त्यांना 'म्हैस'मधला विनोद कळेल. पण ज्यांनी एस. टी.ला कधी पायच लावलेला नाही, त्यांच्याकरता 'म्हैस'मधले कितीतरी संदर्भ अनाकलनीय ठरतील. त्या अर्थी पुलंच्या साहित्याच्या कालबाह्यतेला हळूहळू का होईना, सुरुवात झाली आहे. 'माझे पौष्टिक जीवन'मधला 'कि-हिं-क-ह-व-ह-डि-ही' असं ठणकावणारा बावज्या बोहोरीकर मी कधीही पाहिलेला नाही. तसाच 'जलशृंखला योग' हे नाव कुठून आलं आहे, हे जाणण्यासाठी सामायिक संडास, त्यांच्या दुरुस्तीची घरमालकावर असलेली जबाबदारी आणि त्यातून तयार होणारी विवक्षित परिस्थिती हे सगळं चाळीत राहून अनुभवलेलं नाही. घरमालकांस पत्रमधला विनोद माझ्यापर्यंत पोचणं कठीणच आहे. माझ्या आकलनात काहीतरी कमतरता राहून जाणार. मानवी प्रवृत्ती अमर असल्यामुळे, कल्पनेचं आयुध वापरून आणि पुलंच्या चित्रदर्शी-जिवंत भाषेचा आधार घेत मी अनेक गोष्टींचा आनंद तरीही लुटू शकले. इक्ष्वाकू कुळातल्या राजकुमारांची वर्णनं काय, किंवा निमकराच्या खानावळीतील डुकराची भजीही निर्बुद्ध भाषांतराची उडवलेली रेवडी काय, पुलंचं काही लेखन अजुनी सदाबहार आहे. पण तरीही - सत्तर सालात पुलंच्या लेखनाला वाचकानं दिलेली दाद आणि आज मी देत असलेली दाद, यात फरक पडला आहे, हे मान्य करावंच लागेल.

साहित्याच्या आस्वादाकरता प्रत्यक्ष अनुभवाची काय गरज, असं एक प्रतिपादन केलं जातं. उदाहरणार्थ, काही प्रकारच्या साहित्यात काल्पनिक विश्व चितारलेलं असतं. जे. के. रोलिंगचं हॅरी पॉटरविश्व हे याचं अत्यंत चपखल उदाहरण. जादू, जादूच्या छड्या, मंत्र, चेटक्यांची शाळा... हे सगळे कल्पनेतले घटक हॅरी पॉटरच्या जगाचा अविभाज्य आणि अनिवार्य भाग आहेत, पण ते वास्तवात अस्तित्वात नाहीत. तरीही सर्व वयाच्या, अनेक भाषांच्या, अनेक देशांमधल्या वाचकांना हॅरी पॉटरची ओढ वाटते. 'हॅरी पॉटर' हे अभिजात साहित्यात मोडत नसेल, तर ऑन्त्वान् द सान्तेक्झ्युपेरीच्या 'द लिटिल प्रिन्स'चं उदाहरण देता येईल. तीन ज्वालामुखी असलेला लिटिल प्रिन्सचा छोटुकला ग्रह वास्तवात अस्तित्वात नाही. तरीही लिटिल प्रिन्स कित्येक वर्षं जगभरातल्या वाचकांना भुरळ घालतोच आहे. ही सरळ सरळ फॅन्टसीची उदाहरणं. त्याहून थोडं वेगळं उदाहरण घ्यायचं, तर श्री. ना. पेंडशांच्या 'तुंबाडचे खोत'चं. त्यामधलं तुंबाड कल्पनेतलं आहे. ते पेंडशांच्या अंतःचक्षूंखेरीज इतर कुणीही पाहिलेलं असणं शक्य नाही. तरीही वाचकाच्या नजरेला ते कल्पनेनं पाहता येतंच. जयंत पवारांच्या 'वरणभात लोन्चा कोन नाय कोनचा' या कथासंग्रहातल्या सगळ्याच कथांमध्ये अद्भुत अतिवास्तवाचा एक धागा आहे. त्यामुळे त्या कथा कमी परिणामकारक ठरतात का? तर नाहीच. हे प्रतिपादन मान्यच आहे.

इथे आपल्याला पुलंची लेखक म्हणून असलेली जातकुळी नीट तपासून पाहण्याची गरज आहे.

लेखक नक्की काय आणि कसं सांगू पाहतो आहे, याचा विचार करून त्यांची ढोबळ वर्गवारी करू गेलं असता त्यांचे तीन प्रकार दिसतात. काल्पनिक गोष्ट सांगणारे अर्थात फिक्शन लिहिणारे लेखक. एखाद्या बाबीचा चहूअंगांनी विचार करून तिची खोलवर छाननी करणारे लेखक. सद्यकालीन परिस्थितीचं वर्णन करून त्यावर आपली मल्लिनाथी उर्फ शेरा नोंदवणारे लेखक. तिन्ही भाग तसे पाणबंद नव्हेत हे उघडच आहे. पण पुल यांपैकी कोणत्या भागात बसतात ते आपण ढोबळ मानानं बघू.

पुल काही गोष्ट सांगणारे साहित्यिक नव्हेत. त्यांनी थेट कथा वा कादंबर्‍या लिहिलेल्या नाहीत. त्यांची नाटकंही बहुतांश वेळा कोणत्या ना कोणत्या परकीय नाटकाचं रूपांतर अशाच स्वरूपाची आहेत हे लक्ष्यात घेण्यासारखं आहे. मुख्य आहेत ती प्रवासवर्णनं, वास्तव आयुष्यातली वा काल्पनिक व्यक्तिचित्रं, निरनिराळ्या लेखांतून मध्यमवर्गीय आयुष्याचं नाना प्रकारे केलेलं वर्णन, त्याबद्दलचे खास त्यांचे असे शेरे. या सगळ्या साहित्यात स्वतंत्रपणे गोष्ट रचण्याची ऊर्मी दिसत नाही. दिसते ती एक प्रकारची कॉमेंटरी. समालोचन. लालित्यपूर्ण आणि रंजक, पण समालोचन. त्या समालोचनात लेखकाला दिसणार्‍या चित्राचं हुबेहूब वर्णन आहे आणि समालोचकाचा विशिष्ट नजरियाही आहे. तो विलक्षण लोभस आहे यात वादच नाही. पण ती काही रचलेली कथा नव्हे. लेखक आणि वाचक ज्या एका सामाजिक परिस्थितीचा भाग आहेत, त्या परिस्थितीतल्या एका विवक्षित जागेवरून दिसणार्‍या एका मर्यादित तुकड्याचं रंजक, लालित्यपूर्ण वर्णन आणि त्याबद्दलचे शेरे आहेत. ते समालोचन आहे, त्यामुळे लेखक आणि वाचक दोघेही एकाच काळात वावरत आहेत हे गृहीतकही आहे.

पुल विचारवंत-लेखकही नव्हेत. त्यांच्या काही पुस्तकांतून काही विशिष्ट विधानं केली जात असतात. विषयाच्या अनुषंगानं काही विचार मांडले जात असतात. ते विचार काही प्रमाणात कालातीतही असतात. त्यात अनेकदा चिंतनशील भाग येतो. पण नरहर कुरुंदकरांसारख्या लेखकाशी पुलंशी तुलना केली, की पुलंची निराळी जातकुळी लख्ख दिसायला लागते. एखादा प्रश्न वा एखादी साहित्यकृती वा एखादी परिस्थिती समग्रपणे न्याहाळून तिच्या निरनिराळ्या बाजूंची छाननी करणं, प्रश्न विचारणं, काही एका निष्कर्षावर पोचणं, निष्कर्षाचं समर्थन करणं वा तो विश्लेषणासकट खोडून काढणं आणि पर्यायी उत्तर मांडणं... असं पुलंनी कधीही केलेलं दिसत नाही, तो त्यांचा पिंडच नाही. त्यांना बहुतेकदा आपल्या नायकाची - पक्षी : स्वतःची आजूबाजूच्या परिस्थितीनं उडवलेली त्रेधातिरपीट दाखवून मनसोक्त हसायचं असतं. ललित समालोचन असं याचं वर्णन करता येईल. स्टॅंडप कॉमेडी करणारे अनेक लोक या प्रकाराचा आणि अशाच विषयांचा अवलंब करताना दिसतात. पुलही त्यांच्या मंत्रमुग्ध करणार्‍या आणि वैविध्यपूर्ण एकपात्री प्रयोगांसाठी प्रसिद्ध होते, हा काही योगायोग नाही. आजही 'त्यांचं लिखाण वाचायला कंटाळा येतो, पण ऐकायला मजा येते' अशी कबुली देणारे अनेक जण सापडतात. पुल स्वतःला लेखक म्हणवत नसत. परफॉर्मर उर्फ खेळिया म्हणवत असत, याची नोंद करून आपण पुढे जाऊ.

तर - अशा लालित्यपूर्ण रंजनात्मक वर्णन करणार्‍या समालोचक लेखकाचं समकालीन असणं कळीचं नसतं का?

माझ्या मते, असतं. तो त्याच्या लेखनाच्या परिणामकारकतेचा एक महत्त्वाचा भाग असतो.

थोडा विचार करून पाहा, आज पुलंच्या किती व्यक्तिरेखा आपल्याला येता-जाता भेटतात? 'मॅन / वुमन नेक्स्ट डोअर' म्हणाव्यात अशा असतात? आयटीत काम करणार्‍या कॉर्पोरेट मजुराचं आणि पुलंच्या कोचरेकर मास्तरांचं विश्व किती वेगळं आहे! घरा-कुटुंबाबाबतची कर्तव्यं, करियरमध्ये यशस्वी होण्याची निकड आणि मुक्त स्त्री असण्याचं पिअर प्रेशर ही सगळी दडपणं वागवणार्‍या आजच्या बाईचं आणि त्या चौकोनी कुटुंबातल्या गृहिणीचं काय नातं आहे?

'असा मी असामी'तले धोंडोपंत जोशी चाळीतून ब्लॉकमध्ये गेले आणि त्यांच्या ठरीव आयुष्यात एकाएकी नवनवीन पर्यायांची गर्दी उडाली. हीच पर्यायांची भाऊगर्दी धोंडोपंतांच्या उत्तरायुष्याहून आज कितीतरी पटींनी वाढलेली आहे. धोंडोपंत चाळीतून ब्लॉकमध्ये गेल्यानंच काहीसे भांबावलेले होते. आज धोंडोंपंतांचा नातू आपल्याला भेटला, तर तो बहुतेक मुंबईत राहत नसेलच. तो अमेरिकेत असेल, गेला बाजार बंगळुरात तरी नक्कीच. त्याच्या समोर बहुधा ऐन तिशीतच मिडलाईफ क्रायसिस आ वासून उभा असेल. धोंडोपंतांचं तर सोडाच, धोंडोपंतांची विकेट उडवणारा शंकर्‍याही त्याच्यासमोर हतबुद्ध होत असेल. निव्वळ ब्लॉकच्या जागी अमेरिका, हिंदी सिनेमाच्या जागी इंग्रजी सिनेमा, कॅक्टसच्या जागी शेअर्ड गार्डनिंग, सरोज खरेच्या जागी आंतरराष्ट्रीय इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक... इतकं एकास एक असलेलं हे रूपांतर नाही. भौमितिक वेगानं वाढत गेलेल्या ओळखी आणि निवडीचे पर्याय. मुलांच्या शिक्षणाचं माध्यम, शालेय शिक्षणापासून ते त्यांच्या संभाव्य करियरनिवडीपर्यंत करण्याच्या आर्थिक तरतुदी, लैंगिक कल ठरवण्याचे अनंत आणि सक्तीचे पर्याय, आपल्या मुलांच्या लैंगिक कलांविषयीचे सावध आणि खुले पवित्रे, धार्मिक आणि जातीय ओळखींशी जुळवून घेण्याचे वांशिक आणि राष्ट्रीय ओळखींचे सांधे...  या सगळ्या पर्यायांशी आट्यापाट्या खेळताना शंकर्‍याच्या मुलाचीच विकेट उडत असणार, असं मानायला जागा आहे. तो आणि धोंडोपंतांना जन्माला घालणारे पुलं यांच्यामधलं नातं आज किती जवळचं - किती दूरचं आहे?

त्या दोघांच्यात कमालीचं अंतर पडलं आहे इतकं तरी आपल्याला कबूल करावंच लागेल.

~~~

पुलंबद्दलच्या प्रेमादरातून बाहेर पडल्यानंतर मला खुपायला लागलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पुलंच्या साहित्यातलं बायांचं चित्रण. पुलंचा नायक का-य-म एक मराठी शहरी मध्यमवर्गीय पुरुष असतो. नुसतं तितकंच नव्हे. 'बटाट्याच्या चाळी'त - किंवा खरंतर पुलंच्या कोणत्याही ओरिजनल साहित्यात - भेटणार्‍या स्त्रिया मुद्दामहून निरखण्यासारख्या आहेत. अनेकदा त्यांचा आवाज थेट ऐकू न येता मुख्य कथानकाच्या पार्श्वभूमीला येत असतो. जर कधी आवाज मोठ्यांदा आलाच, तर तो विनोदाचा विषय असतो. त्यांच्या अनेक लेखांमध्ये येणारं धर्मपत्नीचं पात्र हे नवर्‍याला गप्प करणारं, व्यावहारिक शहाणपणाची मात्रा अधिक असणारं, आपलं ते खरं करणारं असं किंवा मग चक्क बावळट, चेष्टेचा विषय असणारं असतं आणि पुलंचा नायक हे सोशीकपणे, काहीशा विनोदी धाटणीनं स्वीकारून पुढे जात असतो. 'अतिविशाल महिला मंडळा'बद्दलच्या त्यांच्या विनोदावर टीका झालेली मी ऐकली होती. पण कधी इतकी मनावर घेतली नव्हती. पुढे सुनीताबाईंचा थांबा लागला. पुलंच्या साहित्यानं भारून जाण्याचा काळ उलटून गेला. अघळपघळमधली अभया थोपटे वाचताना माझ्या भिवया वर गेल्या. अभयाच्या भाषेला पुरुषी घाट आहेपासून ते बाई मर्द आहेपर्यंत सगळेच शेरे मला लाल रंगात दिसायला लागले. तरुण मुलींना साहित्या-अभ्यासात-राजकारणात मत असलं, तर त्या पुरुषी असतात नाहीतर मग नुसत्याच सुंदर नि माठ तरी असतात, या स्टिरिओटाईपनं लक्ष्य वेधून घेतलं. पुलंच्या लेखनातल्या यच्चयावत मध्यमवयीन स्त्रियाही स्वैपाकघराची वेस न ओलांडणार्‍या नि ओलांडल्यास विनोदाचं कारण ठरणार्‍या तरी होत्या, नाहीतर बेगडी समाजकार्य करणार्‍या आणि आकारानं विशाल असलेल्या तरी. मुख्याध्यापिका म्हणून सरोज खरे आली खरी, पण ती लिपस्टिक सांभाळण्यासाठी ओठाला ओठ न लावता बोलणारी. पुलंचं हे पुरुषप्रधान समाजाचा प्रतिनिधी असल्यासारखं, त्या व्यवस्थेला कोणत्याही प्रकारचा प्रश्न न करता, कधी बोलून, तर कधी न बोलता खतपाणी घालत लिहीत जाणं मला नंतरनंतर अधिकाधिक खटकत गेलं. त्याबद्दल निषेधाचा शब्द उच्चारणं तर सोडाच, पण असल्या विनोदाला न हसल्यामुळेही बाई स्त्रीवादी दिसतेयहे कुत्सितपणे उच्चारलेलं वा अनुच्चारित वाक्य ऐकावं लागतं असा माझा आज-आत्ताचाही अनुभव आहे. खुद्द पुलंच्या काळात अशा प्रकारचा निषेध झाला नाही, याचं आश्चर्य वाटत नाही ते म्हणूनच. असले विनोद हा संस्कृतीनं स्वीकारून टाकलेला भागच असावा. पुलंनी त्याविरुद्ध कधीही शब्द तर उच्चारला नाहीच. पण आपल्या लेखनातून असा विनोद अगदी सहजमान्य असल्यागत वापरला, त्याचं उदात्तीकरणही केलं, असं आता लक्ष्यात येतं.

'व्यक्ती आणि वल्ली'मध्ये एकही स्त्री नाही. लेखकाला आपल्या एका आयुष्यात सगळंच्या सगळं जग कवेत घेता येणं अशक्य आहे, हे मान्य केलं, तरीही 'व्यक्ती आणि वल्ली'चा स्त्रीपात्रविरहितपणा चकित करतो. माणसांना निरखण्यात आनंद मानणार्‍या पुलंना बाई असलेली एकही वल्ली भेटू नये हा पुलंच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या मुशीत घडलेल्या नजरेचा दोष, की वल्लीपणाची मिजास आणि बाईपण एकत्र नांदूच न देणार्‍या संस्कृतीचा, हे कळेनासं होतं.

हे वास्तविक आपल्याला शिंग फुटल्यावर आपल्याच एखाद्या प्रेमळ आजोबांवर चिडण्यासारखं आहे, कबूल आहे. तरीही माझं वैतागणं रास्त नाही, असं मात्र मला म्हणवत नाही.

असो. तर - माझ्यासारख्या आणि माझ्याहून वयानं लहान असलेल्या अनेक जणांमध्ये अजूनही पुलंची लोकप्रियता इतकी अफाट आणि इतकी तीव्र कशी?

~~~

या प्रश्नाला दोन बाजू आहेत.

एक तर पुलंचा समर्थ उत्तराधिकारी ठरेल असा लेखक आपल्याकडे नाही. बहुतांश लेखकांचे कुणी ना कुणी वारसदार असतात. लोकप्रियतेत, भूमिकांत, भाषाप्रभुत्वात थोडाफार फरक अर्थातच असतो; पण परंपरेच्या साखळीमधला हा पुढचा दुवा, असं म्हणण्याइतकं साम्यही असतं. विभावरी शिरूरकर-गौरी देशपांडे-मेघना पेठे-कविता महाजन अशी एक ढोबळ साखळी दिसते. थोड्याफार मतभेदांसकट मान्यही असते. त्या प्रकारे पुलंनंतर कोण या प्रश्नाचं काही उत्तर मिळत नाही. त्यांच्या शैलीची छाप अनेकांवर पडलेली दिसते. पण ते काही पुलंचे वारसदार नव्हेत. पुलंचा वारसा पेलणं अतिशय कठीण आहे. संगीतापासून नाटकापर्यंत आणि चित्रपटांपासून टीव्हीपर्यंत चौफेर आणि लीलया संचार असणा‍र्‍या या लेखकाचा वारसदार होण्याची जबाबदारी प्रचंड मोठी आणि क्षमता नसलेल्या लोकांना दडपवून टाकणारी आहे. त्यामुळेच निरागस, सुलभीकरण करणारं, शहरी, उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्याचं दर्जेदार आणि लोभस चित्रण हवं असल्यास, पुलंना पर्याय नाही.

इथे दोन नावांची आठवण निघणं अपरिहार्य आहे. आचार्य अत्रे हे त्यांतलं पहिलं नाव. अत्र्यांनाही महाराष्ट्रात कमालीची लोकप्रियता लाभली. त्यांच्या सर्वार्थानं प्रचंड असलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या आठवणी अजूनही काढल्या जातात. पण विनोदाचा आणि विविधक्षेत्रसंचाराचा समान धागा असला, तरी अत्रे आणि पुलं यांच्यात जातकुळीचा मोठाच फरक होता. पत्रकारिता आणि राजकारण यांच्या मुशीतला अत्र्यांचा विनोद अनेकदा बीभत्स पातळी गाठत असे. आपल्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर त्यांनी ते लांछन लीलया पेलून नेलं असावं. पुल त्या बाबतीत अत्यंत सोज्ज्वळ, घरगुती ऊबदारपणा जपून असलेले, मध्यमवर्गीय पापभीरूपणाला जवळचे वाटणारे. दुसरं नाव चिं. वि. जोशी यांचं. त्यांच्या चिमणराव आणि गुंड्याभाऊवर मराठी माणसांनी अतिशय प्रेम केलं. या प्रेमाला खरा बहर आला, तो चिंविंच्या लेखनकाळात नव्हे, तर दूरदर्शनवरची चिमणराव-गुंड्याभाऊ मालिका प्रदर्शित झाल्यानंतर. चिंविंना त्यांच्या हयातीत पुलंसारखी भरभरून लोकप्रियता लाभली नाही. खरंतर त्यांचा विनोद अधिक रेखीव आणि जिवंत व्यक्तिरेखाटन करणारा, संवादी, पुलंच्या शब्दप्रधान विनोदाहून अगदी वेगळी अशी घटनाप्रधान नि काहीशी फार्सिकल शैली असलेला, कथनात्मक होता. चिंविंची चिमणराव-मालिका जणू टीव्हीसाठी लिहिल्यासारखीच होती आणि दिलीप प्रभावळकरांच्या चिमणरावानं तिला पुरेपूर न्यायही दिला. पुलंच्या निबंधवजा घाटात लिहिलेल्या वल्लींवर वा 'बटाट्याच्या चाळी'वर कथाप्रधान टीव्ही मालिका झाली नाही. पुलंच्या स्वतःच्या जबरदस्त सादरीकरणाच्या छायेतून त्या कलाकृती कधीही बाहेर पडल्या नाहीत, हे जसं त्याचं कारण आहे; तसाच त्या कलाकृतींचा ललितनिबंधवजा घाटही त्याला कारणीभूत आहे. चिंविंचं लेखन मात्र दृश्यमाध्यमाला पूरक असं होतं. पण एकूण साक्षरतेचं वाढत जाणारं प्रमाण, मध्यमवर्गाच्या नि टीव्हीच्या उदयाचा-बहराचा काळ आणि चिंविंचा लेखनकाळ यांची वेळ जुळून आली नाही, हे खरं. 

ही दोन्ही नावं पुलंच्या पूर्वसुरींची. पुलंच्या नंतरचं, ही चौकट व्यापणारं आणि चौकट अद्ययावत करत जाणारं, एकही मोठं, लक्षणीय नाव आठवत नाही. पण त्यामागच्या कारणांत शिरायचं झालं तर नव्या लेखाची सुरुवात करावी लागेल.

कारणं काही का असेनात; सोपं, आकर्षक आणि मध्यमवर्गीयांना चुचकारणारं लेखन करणारे पुल हाच एक पर्याय वाचकांपाशी उरल्याचा भास तयार झाला खरा.

दुसरी बाजू बघायची, तर थोडं खोलात शिरावं लागतं. कालचा मध्यमवर्ग आज खरं तर मध्यमवर्ग उरलेलाच नाही. क्रयशक्तीचे निकष लावायचे झाले, तर त्याला उच्चमध्यमवर्गीय असं म्हणणं हेसुद्धा मध्यमवर्गीय या संज्ञेची कमालीची ओढाताण करण्यासारखं आहे. मध्यमवर्ग या संज्ञेत बसणार्‍या समाजाचाही पोत बदललेला आहे. त्यातली निमशहरी लोकांची संख्या वाढत गेली आहे. जातीय टक्केवारी बदलली आहे. खेरीज आपण वर म्हटल्याप्रमाणे या नवमध्यमवर्गापुढची निर्णयांची आणि प्रलोभनांची निव्वळ संख्या, त्यातून उद्भवत गेलेली ओढाताण नि व्याकूळता, आणि जगण्यातला एकूणच गोंधळ... हे सगळं कित्येक पटींनी वाढलेलं आहे. अशा वेळी एक मनोरंजक, आकलनाला सोपा आणि अनेकांच्या आवडीनिवडींचा लसावि असू शकेल असा लेखक म्हणून पुलं हा जणू आदर्श साचाच आहे. 'तुका म्हणे त्यातल्या त्यात'प्रकारे भाषेमुळे जवळचं आणि आकर्षक वाटणारं, गोंजारणारं, हसवणारं पुलंच लेखन आवडणं-ऐकणं-वाचणं-त्याबद्दल बोलणं प्रतिष्ठेचं आहे. त्यात सवयीतून आलेला सोपेपणा आहे, परंपरांचा सुखासीन पिंजरा न सोडता मिळणारी करमणूक आहे, आणि त्याखेरीज आयता मिळणारा सुसंस्कृतपणाचा शिक्का आहे. कोणत्याही प्रकारचे कष्ट नाहीत, प्रश्न नाहीत, पेच नाहीत.

पुलं कधीच अस्वस्थ करणारे प्रश्न विचारणारे लेखक नव्हते. 'बटाट्याची चाळ', 'हसवणूक', 'व्यक्ती आणि वल्ली' ही त्यांची सर्वाधिक लोकप्रिय पुस्तकं पाहिली, तर स्मरणरंजन आणि एका विशिष्ट प्रकारच्या समाजघडीबद्दलचा जिव्हाळा त्यात उघड उघड दिसतो. त्यांतला विनोद अतिशय सूक्ष्म निरीक्षण मांडणारा, मार्मिक आणि रंजक आहे यात प्रश्नच नाही. पण ही पुस्तकं वाचकाला अस्वस्थ करण्यापेक्षाही स्वस्थ करण्याकडेच अधिक लक्ष्य देतात. पुढे-पुढे पुलंनी लिहिलेल्या 'वंगचित्रे'सारख्या पुस्तकांतून त्यांचा सूर प्रगल्भ होत गेलेला जाणवतो. निरीक्षणातून विनोदनिर्मिती न होता प्रश्न पडताना दिसतात. भाषा विनोदाचं शस्त्र न घेता चिंतनशीलता लेऊन येते आणि तरीही आपलं जिवंत प्रवाहीपण कदापि सोडत नाही. पण 'वंगचित्रे' हे काही पुलंच्या लेखक म्हणून ऐन बहराच्या काळातलं पुस्तक नाही. तसंच 'हसवणूक'कार पुलंवर लोकांनी जितकं प्रेम केलं, तितकं प्रेम 'वंगचित्रे'कार पुलंवर केलं नाही. ऐन बहरातल्या पुलंमधल्या लेखकानं अतिशय लोभसवाण्या प्रकारे मध्यमवर्गीय माणसाचा अपराधभाव दूर केला, त्याच्या गोंधळाला हतबलतेतून येणार्‍या विनोदाची ढाल पुरवली. नंतरच्या लेखनातलं त्यांचं चिंतन मात्र लोकांपर्यंत तितकंसं पोचलंच नाही. 

त्यांच्या सगळ्या कारकिर्दीत हा विरोधाभास दिसतो. आपल्या निर्मितीतून मिळवलेली श्रीमंती समाजाला परत देऊन टाकणं (बाबा आमट्यांच्या आनंदवनाशी असलेले ऋणानुबंध), दलित साहित्याचं भरभरून जाहीर कौतुक करणं ('बलुतं'चं केलेलं कौतुक), पत्नीच्या जाहीर नाराजीचा अतिशय उमदेपणानं स्वीकार करणं (आहे मनोहर तरीबद्दलची संयत, उमदी प्रतिक्रिया), साहित्यातल्या नव्या प्रवाहांचं मनापासून स्वागत आणि प्रसार करणं (बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांवरचा कार्यक्रम) हे एका बाजूला. तर दुसर्‍या बाजूला उच्चवर्णीय, शहरी, मध्यमवर्गीय, पुरुषी मानसिकता बाळगणार्‍या संस्कृतीचे साचे कदापि न सोडणं (त्यांच्या लिहिण्यातून कायम दिसणारं स्मरणरंजन आणि परंपरेबद्दलचं प्रेम), नवचित्रकला-नवनाट्य यांसारख्या गोष्टींची यथेच्छ टर उडवणं ('असा मी असामी'तला नानू सरंजामे किंवा 'खुरच्या'), राजकारणासारख्या तथाकथित गलिच्छ स्पर्धेपासून कटाक्षानं दूर राहणं (अणीबाणीनंतरच्या निवडणुकीत प्रचाराला उतरून नंतर मात्र राजकारणातून माघार घेणं). या दोन्ही बाजूंमध्ये एक मूलभूत विसंगती होती. पण यांपैकी दुसरी बाजूच प्रचंड लोकप्रिय ठरली. तिची छाया पुलंच्या प्रतिमेवरून कधीही दूर झाली नाही. ही पुलंची मर्यादा आहे की लोकांचा दोष? की दोन्हीचं दुर्दैवी रसायन?

आज जगण्यातले गोंधळ वाढलेले असतानाही लोकांना पुलंच्या चाळकरी विनोदाचा तोच जुना, आयता साचा विरंगुळ्यासाठी हवाहवासा वाटतो. तसं नसतं, तर पुलंना आपल्या जातकुळीचा वाटणारा पी. जी. वुडहाउस त्याच्या स्वतःच्या मायदेशात केव्हाच जुना आणि वंदनीय होऊन बसलेला  असताना, आपल्याकडे पुलंचं इतकं कौतुक अजूनही का असावं? नि त्याचा दोष पुलंना देणं कितपत बरोबर? निरनिराळ्या प्रकारच्या अस्मितांचे गोंधळ माजलेले असताना आणि नव्या नीतिमूल्यांच्या निकषांवर जुने नायक अपुरे-बुटके ठरत असतानाही बहुतांश लोकांना वाचा-बघायला मात्र रमा-माधवांचं प्रेम, सतीचं उदात्तीकरण, राजपूत स्त्रियांचा जोहार... हेच आवडतं. त्याचाच हाही एक भाग नव्हे का?

पण म्हणून लेखकाच्या या रूपाबद्दल, त्याच्या लेखनातल्या या विधानाबद्दल चर्चा करायचीच नाही? अशी चिकित्सा करू पाहणं हा वाचक म्हणून थेट आपला कृतघ्नपणा किंवा अकलेची दिवाळखोरीच?

कठीण आहे...

काहीही असलं, तरी पुलंबद्दलच्या या अतिरेकी कौतुकामुळे सर्वसामान्य मराठी वाचकाचं नुकसानच झालं. मी आणि माझा शत्रुपक्षमध्ये नायकाच्या खांद्यावर पडलेल्या शिमिटाच्या गिलाव्याच्या लपक्याला नवचित्रकलाअसं संबोधणाऱ्या पुलंचा आदर्श मानून आजही अनेक जण ते ॲबस्ट्रॅक्ट वगैरे आपल्याला नाही बा कळतअसं आनंदानं आणि अभिमानानं सांगतात. हे स्वतःलाच एका विशिष्ट प्रकारच्या अभिरुचीच्या कुंपणात बंदिस्त करून घेणंच होतं. पुलंच्या राक्षसी लोकप्रियतेनं त्याला प्रतिष्ठाही बहाल केली. पुलंपेक्षा निराळ्या जातकुळीचा, धारदार आणि वाचकाकडे डोकं चालवण्याची मागणी करणारा विनोद इथे कधी रुजला नाही. स्मरणरंजनात्मक उमाळे काढणार्‍यांची आणि पुलंच्या शैलीच्या बर्‍यावाईट नकला करणार्‍यांची संख्या तेवढी फोफावून बसली. 'पुलं म्हंजे काय, प्रश्नच नाही!' किंवा 'आम्हांला तुमच्यासारखे नाही ते प्रश्न पडत नाहीत. आमच्या देवानं लिहून ठेवलंय, ते आम्ही वाचतो, सुखानं झोपतो.' किंवा 'पुलंना प्रश्न विचारता? तुमची काय लिहायची लायकी आहे हो?' असे प्रश्न विचारत आणि वर्षांमागून वर्षं त्याच त्या पिढीजाद विनोदांवर इमाने-इतबारे हसत लोक महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची कौतुकं करत राहिले.

पुल असताना हे होणं एक वेळ समजण्यासारखं आहे. पण आता पुलाखालून इतकं पाणी वाहून गेलेलं असताना पुलंचीच वाक्यं सटासट फेकणार्‍या त्या मुलाला 'तू ही जुनी-अपुरी पासोडी घेऊन किती काळ बसणार आहेस बाबा!', असा प्रश्न मी विचारायला हवा होता का? की काळच ते काम करेल?

पूर्वप्रकाशन : मुक्त शब्द, दिवाळी २०१८

संदर्भ आणि टिपा:
१. मूळ चर्चेचा दुवा. इथल्या अनेक मतांचा हा लेख लिहिताना अतिशय उपयोग झाला आहे.
२. मूळ प्रकाशित लेखात इथे काही बारीक दुरुस्त्या केल्या आहेत.
३. वुडहाउसबद्दलच्या लेखाचा दुवा.