Thursday, 6 December 2007

शो मस्ट गो ऑन, यू नो!

कविता. युद्ध. शृंगार. लालभडक मत्सर. रक्तपात-दंगली-खून. चळवळी-क्रांत्या आणि पुन्हा पुन्हा जन्म घेणारी कविता. एकाच चिरंतन तत्त्वाचं अव्याहत चक्र जणू...

आपल्या सगळ्यांमधलं हे जे स्पिरिट असतं ना, त्याला संस्कारांनी खूप आकार-उकार देतो आपण. वेळोवेळी काबूत ठेवतो स्वत:चेच सगळे अनावर विकार. तो संयम महत्त्वाचा खराच. पण निरोगी जिवाचं हे तडफडणारं स्पिरिट असतं ना, ते असं शांत नाही बसत. 'माझ्यात काय कमी आहे, म्हणून मी जाऊ देईन ही जगण्याची संधी' असं ज्या त्वेषानं म्हणत असेल एखादा निरोगी, चपळ, सुदृढ, नीती-अनीती न जाणणारा एखादा चित्ता भक्ष्यावर तुटून पडताना; त्याच त्वेषानं जागी होते मनातली ईर्ष्या. नीती-अनीती न जाणताच.

"मला तू हवा आहेस आणि तुलाही मी, मग का मानायचे हे संयमांचे बांध? हा कसला निसर्गाचा अपमान?"

असा रोखठोक प्रश्न यमी यमाला विचारते. ते रक्ताने भाऊ-बहीण असल्यामुळे त्यांना शरीर संबंध शास्त्रानं निषिद्ध सांगितलेला.
हाच प्रश्न विचारते निर्भयपणे लोपामुद्रा अगस्तीला. त्याला संयमानं शरीराची वासना जिंकायची आहे, म्हणून तो तिला शरीरसुख देऊ इच्छित नाही, तो तिचा पती असूनही.
हाच प्रश्न विचारते इंद्राणी इंद्राला. त्याला आता तिच्यात रस नाही उरलेला. एकेकाळी त्यांनी धुंद प्रणय अनुभवलेला असूनही. त्याचं सारं लक्ष जिंकलेलं जग वसवण्यात लागलेलं.
हाच प्रश्न विचारते अंबा भीष्माला. ती स्वत:चं क्रुद्ध तारुण्य घेउन उभी आणि तो मात्र कुरुकुलासाठी सगळ्या कोवळ्या भावना होमून मोकळा झालेला.

पुरुष आणि प्रकृती यांच्यातला हा सनातन वाद. पार वेदकाळापासून चालत आलेला.

आपल्यातला हा वाट्टेल त्या परिस्थितीत जगू पाहणारा लसलसता, फोफावणारा, संस्कृतीला जणू जन्म देणारा कोंब खरा? की संयमाचा-संस्काराचा, संस्कृतीला घडवणारा-आकार देणारा बांध खरा?

कदाचित दोन्हीही. कुणास ठाऊक...

तुला फार आवडणारा कर्ण. त्याचंही तसंच नव्हे का?
तसा कर्ण कुणालाही आवडतोच. कुठल्याही न्यायी, स्वाभिमानी माणसाला आवडावा असाच आहे तो. वाट्याला आलेलं सगळं मुकाट पचवून नशिबालाच मान खाली घालायला लावणारा. अबोलपणे सगळे सगळे मान-अपमान हसत जगून जाणारा.

पण मला कृष्ण जास्त जवळचा वाटत आला आहे नेहमीच.
त्याचं ते सगळं उधळून कुठल्याही गोष्टीत स्वत:ला अर्पून घेणं मोहवतं मला. उतू जाणार्‌य़ा दुधासारखं त्याचं व्यक्तिमत्त्व... अस्सल कलावंतासारखं स्वत:ला जगण्याच्या उल्हासात होमू पाहणारं.. उतू जाणार्‍या दुधासारखं... होमून टाकणारं... किती अर्थपूर्ण शब्द वापरले आहेत दुर्गाबाईंनी... तसाच आहे तो. गोकुळात यशोदेचा आणि राधेचा. मग रुक्मिणी-सत्यभामेचा. मग भीमार्जुनांचा. मग यादवांचा. एकातून दुसरं व्यक्तिमत्त्व जणू उमलत जातं त्याचं. बासरी, रथाचे बंध, तत्त्वज्ञान आणि धनुष्यही. सगळंच कसं उत्कट-संपूर्ण-भरभरून केलेलं. संयम विसरून.

याउलट कर्ण. परिस्थितीनं त्याला धगधगणारा संयमच शिकवला फक्त. सतत स्वत:मधल्या तेजाला आवर घालत जगण्याची मुलखावेगळी सक्ती. जणू सगळा ज्वालामुखी कोंडून धरलेला असावा छातीत असा कोंडून धरलेला अनावर आवेग.

दोन्ही जणू एकाच शक्तीची रूपं. एक उसळणारं. एक बांधलेलं.

हाच का तो बेसिक फरक? द्रविड आणि तेंडुलकरमधला? नसीर आणि अमिताभमधला?

तुझ्या आणि माझ्यामधला?

कोण महत्त्वाचं? कोण बरोबर? कोण खरं?

कदाचित दोन्हीही खरेच. कुणास ठाऊक...

आपण आपापले हट्ट हट्टानं लावून धरायला हवेत मात्र! शो मस्ट गो ऑन, यू नो!

Monday, 3 December 2007

I'm just being foolishly absurd!

अशीही काही युद्धे खेळावी लागतात,
ज्यात निर्णायक पावलांनी आणि निर्विकार चेहर्‌यानं
पराभव एखाद्या डोंबासारखा उभा असतो
पुढच्याच टप्प्यावर.
आपण प्रॅक्टिकल शहाणपणा इत्यादी दाखवून
साळसूद माघार घ्यायची आहे की
पाठ फिरवण्याचा प्रॅक्टिकल निर्णय घेणार्‌या
आपल्याच सूर्याजी पिसाळांची मानवी मजबुरी क्षमाशीलपणे स्वीकारत,
बेमुर्वतपणे रक्तबंबाळ होत
पुढे घुसून ताठ मानेने मरायचे आहे
इतकाच वाव उरतो निवडीला.
युद्ध जिंकणे वा हरणे अशा वेळी अगदीच बिनमहत्त्वाचे झालेले.
डोळ्यांत उतरलेले गरम लालबुंद आवेगी रक्त
आणि डोक्यात उरलेले
'मागे फिरायचे नाही-' इतकेच तुटक वेडसर शब्द.
बाकी सगळे आपल्या जगातले नव्हेच.
अशा वेळी रक्तातला वेडसर मुरारबाजी जिंकतो
की रक्तातच दबा धरून बसलेल्या डार्विनच्या बिलंदर पेशी जिंकतात...
इतकेच पाहायचे खरे तर.
अशा वेळी काय करतात
ते खरे तर मला अजूनही उमगलेले नाही.
जीव वाचवून मुकाट खरीदावेत
शहाण्या रसिकासारखे
पिंजर्‌यातले लव्हबर्डस् इत्यादी
की झाला-न झालेसा
स्वप्नांचा राजवर्खी उदास स्पर्श जपावा
बोटांवरला?
प्रश्न मोठे भाग्याचे...
या असल्या प्रश्नांची उत्तरे देता येणे दूरच राहिले,
असले प्रश्न पाडून घेणेही आचरट आणि आत्मघातकी मानले जाते तुझ्या जगात.
माफ कर मित्रा...
I'm just being foolishly absurd!

Sunday, 11 November 2007

एक फिल्म फेस्टिवल उर्फ कथेसारखं काहीतरी

हा कितवा बरं फेस्टिवल तिचा? मारे "आय नीड अ फेस्टिवल. गॉड नोज्‌ आय नीड वन..." असं घोकत होती खरी ती गेला महिनाभर. पण तरी येणारेय का मजा खरोखर, की नुसतीच ’मज्जा येतेय नाही’ची स्वत:शीच केलेली नौटंकी हा बारीकसा किडा तिला बर्‌याचदा चावून गेला होताच. तरी त्याला तस्सं मागे सारत, मारे सुट्टी-बिट्टी घेऊन, घरी फिल्डिंग लावून तिनं आठ दिवस सिनेमे बघायचा घाट घातला होता. "जावं का आजपासून... की आजचा दिवस निवांत झोपावं घरी जाऊन..." हे डोक्यातलं निरुत्साही चक्र बंद करून टाकत ती शुक्रवारी संध्याकाळी परस्पर ऑफिसातूनच थेटरात पोचली, तेव्हा मात्र फेस्टिवलच्या उत्साहाचा वारा नाही म्हणता म्हणता तिला लागलाच.

तसं सगळं काही सालाबादप्रमाणेच तर होतं.

फुकट पासावर हक्कानं आलेले पत्रकार. स्पॉन्सरर्सच्या पासांतून आलेला हाय-प्रोफाईल्‌ एथनिक लवाजमा. घरातल्या कर्त्या बायांनी सगळ्या धबडग्यातून सवड काढून वर्षाकाठी एकदाच एखाद्या लग्नकार्यात भेटावं आणि वर्षाची बेगमी करून घ्यावी तश्श्या नियमितपणे आणि घरगुतीपणे फेस्टिवलमधे भेटणारे साधेसुधे इंटुक रसिक. कॉलेज बंक करून आलेली उसळत्या उत्साहातली कारटी. कुणाचं लक्ष आपल्याकडे जातंय का याकडे एक डोळा ठेवून असलेली आणि मग कुणी ओळखीचं स्मित केलंच तर जेमतेम हसल्यासारखं करणारी सेलिब्रिटी स्टेटसच्या काठावरची काही व्यक्तिमत्त्वं. अभ्यासूपणे सिनेमे पाहणारे तंत्रज्ञ. तावातावानं चर्चा-बिर्चा करणारे समीक्षक. लगबगीत असणारे छापपाडू आयोजक. आणि आश्चर्यकारक सहनशीलता नि कार्यक्षमता दाखवत या सगळ्या ’अशक्य’ जमावाला हाकणारे कार्यकर्ते.

सगळं तसंच.

तरी त्यातल्या तोचतोचपणावर तिचा सध्याचा खास ट्रेडमार्क असलेली चिडचिड न करता हवेतल्या उल्हासाला प्रतिसाद देत ती जरा मनाविरुद्धच खुशाललीय, हे तिचं तिला जाणवलं, तोवर ओपनिंग फिल्म सुरूही झाली होती. मग फेस्टिवलनं ताबा घेतला तिचा...

***
हा फेस्टिवलचा माहौल आणि त्यातली ’ती’. मीच आहे की ही... मला प्रचंड आश्चर्य वाटतं. शिवाय कथेसारखं काहीतरी लिहितेय की काय मी, असंही एक अंगावर पाल पडल्यासारखं पोट-आश्चर्य वाटून जातं. ही बया आली कुठून? आणि माझ्या घरचं थोडं झालेलं असताना, मी हे व्याह्यांचं घोडं का नाचवायचं? घरी जा... मला काहीही पडलेली नाहीय असं तिरसट उत्तर तोंडावर येतं. पण मग एकदम वाटतं, हे जर कथेसारखं काहीतरी असेल, तर ’ती’ माझ्यापेक्षा वेगळी असणार. तिचे प्रश्नही वेगळे आणि कदाचित उत्तरंही. शिवाय तिच्या आयुष्यात काहीतरी घडतंय, हे काय कमी महत्त्वाचं आहे? कथा आहे, तर सुरुवात-मध्य-शेवट असं काहीतरी असेल आणि कदाचित निष्कर्षवजा उत्तरंही असतील. "माझी" नव्हेत, पण माझ्यासारखीच. तिच्या उत्तरांबद्दलची उत्सुकता मला एकाच वेळी एकदम उतावीळ आणि सहनशील करून टाकते...

***
तशी मजा-बिजा यायला एकदम आदर्श परिस्थिती. सकाळी उठून बाहेर पडायचं तेच मुळी ’आज कुणाचे बरं सिनेमे पाहू या’ असा गोड प्रश्न मनाशी घेऊन. अर्थात सगळेच क्लासिक्स पाहायला मिळतील हा गैरसमज नव्हता उरला तिच्याजवळ इतक्या फेस्टिवल्सच्या अनुभवानंतर. हेही तसं नव्या मैत्र्या सुरू करण्यासारखंच, हे जाणून होती ती. सुरुवात करताना पुरेश्या उत्साहात आणि शक्य तेवढ्या निर्मळ मनानं करायची. मग आपण किती दुखावतो, किती सुखावतो, काय कमावतो आणि काय गमावतो हे सगळं आपण स्वत: सोडून इतर बर्‌याचशा अनकण्ट्रोलेबल घटकांवर अवलंबून. त्यातल्या त्यात तपासून पाहता येण्यासारखं तेवढं पाहायचं - उदाहरणार्थ शक्यतोवर नवा इंडियन सिनेमा नको. तो हमखास क्रॉसओव्हर विषयावरचा तथाकथित विनोदी वगैरे तरी असणार, नाहीतर मग ’विश्वीकरणाच्या झंझावातात भारतीय मूल्यं जपायला हवीत’ असा गळे काढणारा तरी असणार. अपवाद असतातच म्हणा. पण ठोकताळे केव्हाही सुरक्षित.

’पडेल ती किंमत मोजून बेहोश निरोगी मजा की धोपटमार्गानं जाऊन सुरक्षितता-स्थैर्य’ या वादात कायम मित्राशी भांडणार्‌या आपणही जगता जगता बदललो की काय, या विचारानं ती कळवळली आणि मग इतके दिवस न दिसलेली नवीच मजबूरी समजून आल्यासारखी झाली तिला. मित्राची असं नव्हे, एकंदरीतच माणसाची. नेहमी मित्र आठवल्यावर स्वत:चाच राग येऊन होणारा तिचा चरफडाट या वेळी झाला नाही, तेव्हा ती चक्क गडबडलीच. आनंदाचा वा सुखाचा आधार होतो माणसाला असं नाही, कधी कधी माणसं स्वत:च्या सतत चरफडण्याच्या-चिडचिडण्याच्या सवयीचाही आधार करून घेतात. तसंच झालंय बहुधा आपल्याला हा एक नवाच साक्षात्कार झाला तिला.

त्या आश्चर्या-आनंदात मग ती चक्क एक कानडी सिनेमा पाहायला थेटरात शिरली. अपेक्षेप्रमाणे तो पुरेसा बटबटीत आणि साचेबंद निघत गेलाही! शिवाय त्यातली नर्स अगदी आदर्श अनाथ बाईनं असायला हवं, तश्शी सोज्ज्वळ-सडी-सुसंस्कृत-सेवाभावी-सुस्वरूप आणि शिवाय कलकत्ता साड्या नेसून वर कुंकूही लावणारी होती. तिला आणि तिची सेवा घेऊन तिला मुलीसारखं वगैरे मानणार्‌या त्या बाबाला पाहताना परत एक सूक्ष्म राग साचत गेला तिच्याआत. त्या बाबासाठी स्वार्थत्याग करून, वर त्याच्या पाया-बिया पडून ती क्षितिजाकडे निघून गेली तेव्हा तर उपरोधिक तोंडं करून तिनं मैत्रिणीला पार वैताग आणला.

"कुणी कसं वागावं हा ज्याचा त्याचा निर्णय नाही का? तिच्या सोज्ज्वळ चाकोरीबद्ध वागण्याबद्दल तू चिडचिड करून काय होणारेय कुणास ठाऊक..." या मैत्रिणीच्या शेर्‌यावर मात्र परत एकदा थांबून विचार करणं भाग पडलं तिला. आणि मग ’आजच दिवस साक्षात्काराचाच’ हे मनोमन मान्य करत तिनं थेटरासमोरच्या टपरीकडे मोर्चा वळवला...

***
एवढी चिडचिड का करत असेल ’ती’, मला मनापासून प्रश्न पडतो. आपल्यासारखाच तिचाही सो-कॉल्ड प्रेमभंग वगैरे झाला असेल? पण अशी चिडचिड करून काय होणार? जी आदर्श संभाव्य उत्तरं आहेत ती शोधलीच आहेत की नाही बाई आपण? मग आता किती टाचा घासून रडलं म्हणून काय बरं होणार? नुसतंच स्वत:चं आयुष्य थांबवून धरल्याचं पाप की नाही? असे अनेक प्रश्न एकदम घाईघाईत मला पडून जातात. या कथेत तिला हे प्रश्न स्वत:लाच पडल्याचं दाखवून तिची चांगली पंचाईत करण्याचा एक माफक दुष्ट विचारही येऊन जातो मनात.

पण मग एकदम वाटतं, ’ती’ माझ्यासारखीच असं मीच म्हटलं होतं... पण म्हणजे मीही नुसतंच आयुष्य थांबवून धरलंय....? तिला निदान त्याचा साक्षात्कार तरी झालाय... माझं काय?

समाधानकारक स्पष्टीकरणं आणि समर्थनं देता येत नाहीत तेव्हा मात्र माझा नाईलाज होतो. माझीच कथा आणि वर मलाच कोंडीत पकडणार? हॅट! कथेसारखं काहीतरी लिहिण्याचं पाप करतेच आहे मी, तर मग मला थोडा तरी फायदा मिळायला नको का?! मग मी सरळ फेस्टिवलमधल्या इतर काही इंटरेस्टिंग गोष्टींकडे लक्ष वेधून घेतल्यासारखं करून पळ काढायचं ठरवते...

***
काही अर्थपूर्ण-एक्सायटिंग आणि काही कंटाळवाणेही सिनेमे, त्यावरच्या निरर्थक चर्चा आणि क्वचित प्रसंगी होणारे असले साक्षात्कार सोडले तर इतरही बर्‌याच गोष्टी फेस्टिवलमधे असतात. सिनेमा बुडवून बाहेर कट्ट्यावर बसून करायची भंकस ही त्यातली एक प्रमुख आकर्षक गोष्ट. सगळं काही आतल्या आत कोंडून टाकून वर निर्विकार राहण्याच्या तिच्या सध्याच्या प्रयत्नांना तर विशेष सूट होणारी. दिवसाच्या - वा रात्रीच्याही - कुठल्याही प्रहरी कटिंग मागवून, गॉसिप्स करून, क्वचित एखाद्याच समजूतदार वाक्यातून सगळ्या फ्रस्टेशन्सवर फुंकर घालून दोस्ती देऊ करणारी ही भंकस. यंदाच्या फेस्टिवलमधी तिनं ती मनापासून एन्जॉय केली.

झालंच तर एकमेकांना टाळू पाहणार्‌या दोन माणसांना एकमेकांवर सोडून, आपण समोर दात काढत उभं राहण्यातली गंमत. आपल्याला फारसं सोईचं नसलेलं कुणी आपल्याला भेटलंच, तर आपण त्या गावचेच नाही असा चेहरा करून वेळ निभावून नेणं... महारटाळ पत्रकार परिषदांमधे काईच्या काईच अचाट आचरट प्रश्न विचारून मग सरळ गायब होणं... ओपनिंग आणि क्लोजिंग सेरिमनीत व्यासपीठावर चालणारा अभूतपूर्व विनोदी गोंधळ...

आणि खेरीज काही अंतर्मुख वगैरे करणारे सिनेमेही.

नाही म्हणता म्हणता खरंच मजा येत गेली की तिला. इतकी, की निव्वळ स्वत:ची कीव करून एक सिनेमा घळघळा रडत पाहणारी ती, बाहेर पडल्यावर स्वत:लाच चक्रम आणि हट्टी म्हणण्याइतकी निवळली. एका डेन्जरस पकाऊ समीक्षिकेला टाळण्यासाठी चार पत्रकारांनी जिवाच्या आकांतानं केलेली पळापळ पाहून खुदकन हसा-बिसायलाही आलं तिला.

जुन्या मित्र-मैत्रिणींच्या कोंडाळ्यात ५-६ दिवस असे खतरनाक वेगात संपले आणि दुसर्‌या दिवशी ऑफिसला जायचंय, हे तिच्या लक्षात आलं तेव्हा ती एकदम गळपटलीच. सगळे साक्षात्कार आणि लाईफ-बिईफबद्दलचे समंजस फण्डे जमेस धरूनही तिला धैर्य काही गोळा करता येईना. परत एकदा तेच सगळं. तेच चेहरे, तीच टाळाटाळ, तोच रोज उठून नव्यानं होणारा मनस्ताप. काय करावं काही सुचेचना. त्याच तिरीमिरीत "मला भूक लागलीय, चल काहीतरी खाऊ या" असा वैताग निर्वाणीचा सूर लावत तिनं मैत्रिणीला कटकट केली, तेव्हा तिला परत एकदा मित्राचे ठाम शब्द आठवले - काही भूक-बिक लागली नाहीय तुला. डोकं फिरलं की भूक लागलीय हे एक सोप्पं उत्तर फेकून मोकळी होतेस तू, हे तुझ्या लक्षात आलंय का?

यावर मात्र न भूतो न भविष्यति असा तिळपापड झाला तिच्या अंगाचा आणि ती ऑलमोस्ट हिस्टेरिकली ओरडली मैत्रिणीवर - "दुसरं-तिसरं काही नाही, मला भूकच लागलीय." "पण मी कुठे काय म्हणतेय, जाऊ या ना..." असं डिफेन्सिव्हली पुटपुटणार्‌या मैत्रिणीला कळलंच नाही तिच्या उद्रेकाचं कारण.

या टोटल फिल्मी अनावर आठवणी-बिठवणींतून कसं बाहेर पडायचं ते न कळून ती पार हताश झाली...

***
असं काही आपण तर नाही बुवा केलेलं... मी नीट आठवून म्हणते स्वत:शीच. ’काय तरी एकेक चमत्कारिक माणसं.. नाही जमली एखादी गोष्ट मनासारखी. ठीकाय.. इतका मनस्ताप कशाला करून घ्यावा..’ असली भोचक प्रतिक्रिया माझ्याही डोक्यात सहजच जाते उमटून.

पण खरा वाईट भाग हा, की हे सगळं तिथेच थांबत नाही. आपण असं काही केलेलं नाही हे खरंच. पण असं काही करू शकलो असतो नक्कीच, हे विसरता येत नाही. "मनस्तापाच्या आणि समजूतदारपणाच्या गोष्टी कुणाला सांगता? माझ्यातला असला-नसलेला सगळा जीव उधळून केलाय मी हा जिवावरचा उत्कट मूर्खपणा. इतक्या सहज सोडून द्यायला काय लिपस्टिकची शेड आहे ती चार दुकानांत न मिळणारी? व्हाय डोण्ट यू पीपल अंडरस्टॅण्ड, इट्स नॉट अबाउट एनीबडी एल्स बट माय ओन इण्टेन्सिटी...." हा माझाच व्याकुळ संताप परत एकदा जिवंत होऊन उभा राहतो माझ्यासमोर.

मग मात्र मी थोबाडात मारल्यागत गप होऊन जाते... ’तिची’ गोष्ट शेवटापर्यंत न्यायला हवी.. त्यातूनच मिळतील कदाचित काही उत्तरं.. काही नवे रस्ते, याही खात्री पटायला लागलेली मला हळूहळू...

***
हजार समजावणीच्या क्षणांनी आणि निर्धारी, स्वाभिनामी संकल्पांनी न दिलेला तो क्षण प्रत्यक्षात तिच्या आयुष्यात आला तो अगदी अनपेक्षित साधेपणानं.

कुठलीही परिपूर्ण कलाकृती एक उदास संपूर्ण आनंद देऊ करते अनुभवणार्‌याला. सगळं काही उमगलेलं, त्यामागची अपरिहार्यता कळून चुकलेली, तरीही ’गमते उदास’ हे आहेच आणि विचारशक्तीला-संवेदनेला मात्र एखाद्या दुधारी शस्त्रासारखी लखलखती धार चढलेली.

एका औटघटकेच्या पण उत्कट नात्यावरचा सिनेमा होता तो. जेमतेम काही तासांचं आयुष्य लाभलेल्या, पण त्या दोघांच्या मनात चिरंतन होऊन राहिलेल्या नात्याची ती गोष्ट. ती पाहून कितीतरी वेळ उलटून गेला तरी तिनं दिलेलं ताजेपण तस्सं शिल्लक होतं तिच्याआत. तिचा मित्रही तर तस्सा ताजा शिल्लक होता तिच्याआत. तिच्या संतापालाही न पुसता आलेले त्याचे ठसे तस्से उमटून होते तिच्या मातीत...

आता त्या नात्याला जिवंत भविष्य नाही, हे मान्य करता करताच त्या नात्यानं दिलेली श्रीमंतीही लख्ख दिसून आली तिला. ऐन प्रेमाच्या दिवसांत केलेल्या एका रोमॅण्टिक कवितेचे शब्द नव्यानंच आठवले -

तुला पत्र लिहिलं होतं,
तेव्हाही चंद्र असाच खिडकीबाहेर थांबून राहिलेला.
आजही तसाच.
चंद्रसाहेब दिसत राहणार,
चंद्रसाहेब असत राहणार.
पण इथल्या दगडी फरसबंदीवर उमटलेले तुझ्या पावलांचे ठसे,
अवेळच्या पावसाचं त्यांत साठून राहिलेलं हे पाणी,
आणि त्यात सांडलेले हे चंद्राचे काही लखलखते तुकडे.
दर पावसात,
दर पौर्णिमेला...
चंद्रसाहेब दिसत राहणार,
चंद्रसाहेब असत राहणार.
जगातल्या सगळ्या तुटल्या- न तुटलेल्या, अनेकार्थांनी श्रीमंत करून जाणार्‌या नात्यांचे चंद्र असेच असत असणार आहेत... हे मनोमन स्वीकारून टाकलं तिनं.
तिचा यंदाचा फेस्टिवल ’सुफळ संपूर्ण’ झाला...

Tuesday, 6 November 2007

रायटर्स ब्लॉक


बिनओळींच्या कागदावर लिहिण्यातली गंमत काही औरच.


कोरा करकरीत कागद आणि आपण. अधेमधे साधा ओळींचाही आसरा नाही. आपण संपूर्ण निराधार. समोर काहीतरी अफाट सुंदर अंतहीन पसरलेलं असावं अशी मन दडपून टाकणारी, पाऽऽर एकटं वाटायला लावणारी भावना. ’सर्वांगानं भिडावं - काय होईल ते होईल’ अशी उद्धट ओढ आणि ’आपण नेहमीसारखी माती खाणार...’ अशी नर्व्हस करून टाकणारी बर्फगार भीतीही...


कोर्‌या कॅनव्हाससमोर उभ्या राहिलेल्या चित्रकाराला किंवा सोत्कंठ प्रेक्षागारासमोर उभ्या ठाकलेल्या एकाकी नटाला नेमकं काय वाटत असेल याचा शतांशानं का होईना, पण अनुभव देऊन जातो हा कोरा कागद.


ती गंमत रेखीव कागदात नाही. आई-बापांनी आखून दिलेल्या रस्त्यावर निमूटपणे चालून नीट शहाण्यासारखं यशस्वी-बिशस्वीही व्हावं तसं वाटतं ओळी आखलेल्या कागदावर लिहिताना...


कधी कधी एखाद्या भाग्यवान क्षणी मनासारखं पांढर्‌यावर काळं होतंही. अशा वेळी मला हटकून ’रंगीला’मधल्या त्या वल्ली दिग्दर्शकाची आठवण येते. "अपनी कॉम्पिटिशन यहाँके डिरेक्टर्ससे हैंही नही..." असं म्हणणारा, पैसे वाचवण्यासाठी निर्मात्यानं बसच्या ऐवजी रिक्षा देऊ केल्यावर भन्नाट उखडणारा तो दिग्दर्शक खरा तर त्या कथानकात कुठेच महत्त्वाचा नव्हे. पण त्याचं ते मनस्वी आर्टिस्टपण दोन-चार फटकार्‌यातूनही नीट लक्षात राहून जातं. सिनेमातला सिनेमा संपल्यावर प्रेक्षकांनी केलेला पसंतीचा जल्लोष म्हणजे आपल्या हक्काची दाद आहे, अशा थाटात स्वत:वरच खूश झालेली त्याची ती मुद्रा... ’मोहम्मद बिन तुघलक’ हेच एक नाव त्याला शोभेल! वाटेवरल्या धोक्यांची आणि त्यात पणाला लागलेल्या सर्स्वस्वाची लख्ख जाणीव, ते सारं पार करून येताना आलेला आत्मविश्वास आणि कलाकाराच्याच मुद्रेवर उमटू शकेल अशी लोभस धन्यता...


एखाद्या दुर्मीळ भाग्यक्षणी तो दिग्दर्शक होऊन जाण्याइतके नशीबवान ठरतोही आपण. नाही असं नाही. पण असे क्षण दुर्मीळच... एरवी संवेद म्हणतो तशी " आणि शब्द सापडलेच नाही तर? अर्थांचे कोलाज परत मागाल मला सारे?" अशी अवस्था.


आत्ममग्न समाधानाचे क्षण विलक्षण दुर्लभ आणि तसेच क्षणभंगुरही. तेवढ्या औटघटकेच्या श्रीमंत सोनेरी स्पॉटलाईटमधून बाहेर पडल्यावर सगळेच सामान्य ब्लॅकाउट्स. सगळी आभासी जादू हिरावून घेणारे. "शी:, हे लिहिलं आपण?" असा स्वत:चाच अविश्वासयुक्त राग आणि प्रामाणिक शरम. "बास झाला आचरटपणा" असा घोर, प्रामाणिक निश्चय ही अशा वेळा साधून येणारी नियमित बाब.


तरीही बेशरमपणे परत एकदा पांढर्‌य़ावर काळे करण्याची वेळ येतेच. तेव्हा आपल्याच बेशरमपणाचा, लोचटपणाचा, नाईलाजाचा जो बेक्क्कार तिटकारा वाटतो, त्याची तुलना कशाशीच होणार नाही.


आतलं सगळं बेगुमानपणे बाहेर उधळून टाकण्याची तीव्र गरज आणि "पुरे झाला फजिता..." असा ठाम कठोर आवाज स्वत:चाच. दोन्ही एकाच वेळी.


यालाही ’रायटर्स ब्लॉक’ म्हणतात? कुणास ठाउक...

Wednesday, 31 October 2007

शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरऽऽऽळ होत जातात...

सांस्कृतिक कार्यक्रम तसे गावाला नवे नव्हेतच. गाणं, नाटक, चर्चा-बिर्चा, मुलाखती, व्याख्यानं... सगळ्यात तशी वरघटून गेलेली मी. पण परवाच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला जाताना मात्र बर्‌याच दिवसांनी जुन्या घरी परतल्याचा ’फील’ यावा, तसं झालं. प्रत्यक्षात अप्रूप-कौतुक किती होतं मला कार्यक्रमाचं कुणास ठाऊक.. ’फॉर ओल्ड टाईम्स सेक...’ प्रकारच्या हुरहुरत्या-निसटत्या आनंदाचाच भाग जास्त असल्यासारखा...

नाटकाच्या जादूनं इतकं भारल्यासारखं व्हायचं, की साधं ग्रीन-रूममधे शिरतानाही बेक्कार धडधडायचं छातीत. त्याला कितीसे दिवस झाले? ए. सी., पर्फ्यूम्स, मेक-अप आणि चहा यांचा तो विलक्षण उत्तेजक गंध. आनंद, एक्साईटमेंट आणि एक विचित्र दडपण यांनी वाढलेले छातीचे ठोके. तिथल्या मंद-सोनेरी प्रकाशातला, धीरगंभीरपणे मेक-अप उतरवणारा वीरेन्द्र प्रधान आणि त्याचा शांत आत्ममग्न चेहरा. इतका लख्ख कोरला गेला आहे तो डोक्यात, की अजुनी ’स्ट्र’ला त्याचाच चेहरा दिला जातो आपसूक...

प्रमुख पाहुणे म्हणजे आपल्या बापाची जहागीर असल्याच्या थाटात उत्सुक चाहत्यांवर डाफरणारे मंडळाचे दीडशहाणे कार्यकर्ते आणि त्यांना शहाजोगपणे बाजूला सारून, चुपचाप आत घुसून आशुतोष गोवारीकरला गाठणारी मी. त्याच्या रोखठोक प्रामाणिक मुलाखतीचे रंग डोक्यात पुरते ताजे. त्याच्या किंचित मिश्कील, प्रश्नार्थक मुद्रेला तसंच हसर्‌या नजरेचं उत्तर देत त्याला विचारलं होतं, द्याल का सही? ’हात्तेरेकी!’ असं म्हणून त्यानं झोकात सही करून दिली तेव्हा त्याच्यावरही क्षणभर विश्वासच नव्हता बसला...

तसाच मारे जागा धरून ठेवायला म्हणून घाईघाईत गाठलेला सेवासंघातला सानेकरांच्या गज़लांचा कार्यक्रम आणि जेमतेम साडेतीन प्रेक्षकांनी ’भरलेला’ तो भला मोठा हॉल. आयोजक, माझ्यासारखे कुणी तीन-साडेतीन अतिहौशी रसिक आणि चक्क वाती वळायला येऊन बसलेल्या एक ’ए’कारान्त आजीबाई. आयोजकांच्या वतीनं मलाच मनापसून शरमल्यासारखं झालेलं. आणि तरी आश्चर्यकारक चढत्या गतीनं रंगत गेलेला तो कार्यक्रम. त्यातल्या ’तुझ्या डोळ्यांमधे गहिर्‌या, असा मी हिंडतो आहे’नं किती काळ साथ पुरवलीय...

शनिवारची रिकामी संध्याकाळ बळेच भरून टाकायला ’मॅजेस्टिक’मधे टाकलेली चक्कर आणि काउंटरपाशी गप्पा मारणारे चक्क आख्खे जिवंत खरे-खुरे सामंत. त्यांच्या हातात त्यांचंच कोरं पुस्तक कोंबत त्यांची सही मागितली, तेव्हा ’अरेच्चा, मला ओळखता की काय’ असं काहीसं पुटपुटत त्यांनी नाव विचारलं. आणि ते सांगितल्यावर ’वा, वा... पेठे व्हा’ असं म्हणाले. त्या सगळ्या अनपेक्षितपणाच्या आनंदात मित्राशी झालेलं एक मोठ्ठं भांडण आपणहून मिटवून टाकलेलं आणि ती उदास रिकामी संध्याकाळ पाहता पाहता रंगीत-झगमगती होऊन गेलेली...

’ग्रहणम्‌’ नावाचा एक अप्रतिम सुरेख सिनेमा फेस्टिवलमधे पाहिलेला. बाईच्या आयुष्याचे सगळे चढ-उतार आणि त्याबद्दलची तिची सोशीक सखोल समजूत... हे सगळं टिपलं होतं त्यानं त्या लहानश्या कथानकात. तेही काळ्या-पांधर्‌या रंगांत. त्याचं जाडेभरडेपण अधोरेखित करून दाखवायला म्हणून त्यानं अखेरीस वापरलेल्या काही लख्ख रंगीत, उजळ फ्रेम्स... काय माध्यमावरची पकड म्हणावी ही, अशा कौतुकात थेटराबाहेर पडत असतानाच समोर उभा राहून हसतमुखानं अभिनंदनं स्वीकारणारा दिग्दर्शक. अगदी आपल्या वयाचाच असावा इतका पोरगेलासा ताजा-हसरा चेहरा. परवा-परवापर्यंत त्याचं कार्ड जपून ठेवलं होतं नकळत...

आभारप्रदर्शन ऐकून उगाच रसभंग होईल याची प्रामाणिक भीती आणि म्हणून उद्धटपणाचा आरोप पत्करून मेघना पेठेची मुलाखत ऐकून घाईघईत काढलेला पळ. तेव्हा खुद्द तिची सही घ्यायला जायचीही भीतीच वाटली होती, इतका अनाघ्रात ताजा अनुभव रक्तात साठवलेला. मग तो सगळा अनुभव कागदावर ओतेपर्यंत कुणाशी बोलायलाही जमलं नव्हतं धड...

आणि तरीही...

परवा सौमित्रची मुलाखत ऐकायला जाताना मलाच माझा उत्साह लटका वाटणारा. तिथे जाऊनही मी ’हॅट, मराठी पुस्तकांच्या दुकानाचा वर्धापनदिन आणि जमलेली सगळी टाळकी पेन्शनीत निघालेली, मरणार वाटतं खरंच भाषा माझी..’ असल्या व्यर्थ चिंतेत चूर. सौमित्र आणि प्रभावळकर अशी स्टार दुक्कल समोर असूनही मी मुलाखतकार बाईंच्या शाळा-मास्तरू प्रश्नांवर उखडलेली. सौमित्रनं सादर केलेली कविताही चक्क ’बिलंदर सराईत परफॉर्मन्स’ वाटला मला...

घरी परतताना ’वा, मजा आली’ असं म्हणायचं असल्यास, तशी मुभा होतीच. पण का कुणास ठाऊक, असं म्हणायला जीभ रेटेना... एक्साईट होण्याच्या स्वत:च्या संपून गेलेल्या क्षमतांवर, उलटणार्‌या दिवसांसोबत स्वत:त येत गेलेल्या निबरपणावर चरफडावं; की ’आता असे उठल्या-सुटल्या कशानंही भारावून नाही जात आपण... शहाणे-बिहाणे झालो की चक्क’ अशी स्वत:चीच पाठ थोपटावी ते कळेचना...

संदीपचे शब्द आठवले परत एकदा (!) - ’शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरऽऽऽळ होत जातात...’

तसंच की काय हे?

वाढत्या वयासोबत येत गेलेली ही ’सो कॉल्ड’ मॅच्युरिटी की नुसतंच मद्दड कातडीचं निबरपण...

की एकाच नाण्याच्या दोन अपरिहार्य बाजू?

Monday, 29 October 2007

तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा


'आपला' पुरुष हवा असं म्हणते बाई
तेव्हा काय अभिप्रेत असावं तिला -
या प्रश्नाची लाख अलवार उत्तरं झिरपत गेली मनात,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

नजरेतली उनाड फुलपा़खरी मिश्किली सहज वाचत जाणारा मित्र
शरीराच्या अनवट वाटांनी अज्ञातातले प्रदेश उलगडत नेणारा प्रियकर
स्वामित्वाच्या रगेल अधिकाराचं उद्धट-आश्वासक आव्हान पुढ्यात फेकणारा शुद्ध नर
आणि भिजल्या नजरेची कोवळीशार जपणूक पावलांखाली अंथरणारा बापही.
ही सगळी नाती रुजत गेली तुझ्या-माझ्यामधल्या मातीत,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.


तुझ्या स्वप्नील नजरेत बिनदिक्कत हरवून जाताना
तु़झ्या मोहासाठी लालभडक मत्सराशीही रुबरु होत जाताना
निर्लज्ज होऊन तु़झ्या स्पर्शाला साठवताना - आठवताना
तुला कुशीत घेऊन लपवून ठेवावं सगळ्या जगाच्या नजरेपासून
असं आईपण माझ्या गर्भात रुजवत जाताना
बाई आणि आईही जागत गेली माझ्याआत,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

आणि आता,
थेट 'शोले'मधल्या त्या सुप्रसिद्ध सीनची आठवण यावी
तशी ही नात्यांची छिन्नविच्छिन्न कलेवरं आपल्या दोघांमध्ये ओळीनं अंथरलेली.
भयचकित हुंदका गोठून राहावा ओठांवर
आणि सगळ्या बेडर उल्हासावर दु:खाची काळीशार सावली धरलेली.
तरीही सगळ्या पडझडीत क्षीणपणे जीव धरून राहावी कोवळी ठकुरायन
तशी एकमेकांबद्दलची ओलसर काळजी अजुनी जीव धरून राहिलेली.
तिचं कसं होणार हा एक यक्षप्रश्न तेवढा उरलेला
आता तुझ्या-माझ्यामधल्या उजाड़ प्रदेशात,
या सगळ्या विध्वंसासकट
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

प्रदेश उजाड खरेच...
पण या आणि अशा अनुभवांना पचवत जाते,
तेव्हाच तर बाई ’आपला’ पुरुष मागू पाहते...
आपसूक मिळून गेलेलं एक कसदार उत्तर.
कसल्याच दु:खांची क्षिती न बाळगता
तुला ’आपलं’ म्हटलं तेव्हा.

'आपला' पुरुष हवा असं म्हणते बाई
तेव्हा काय अभिप्रेत असतं तिला -
या प्रश्नाची लाख अलवार उत्तरं झिरपत गेली मनात,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

Monday, 22 October 2007

दिवाळी अंकांना मराठीपणाचे (आणखी) एक व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल काय?

दर वर्षी त्यांच्या दर्जावर चर्चा रंगतात. वाद-विवाद झडतात. ही समृद्धी नसून उधळपट्टी आणि पर्यायानं सूज कशी आहे याचे आलेख हिरिरीनं मांडले जातात. तरी भरपूर नवे-जुने दिवाळी अंक निघतात, खपतात, त्यांच्या भिश्या रंगतात, ते वाचले जातात, निर्यात होतात, दुकानांतून - वाचनालयांतून - घरोघरी - देशी - परदेशी - रद्दीवाल्याकडे - तिथून पुन्हा एखाद्या हौशी वाचकाकडे... रिसायकल होत राहतात. दुसर्‌या कुठल्या भाषेत या अशा वार्षिकांची परंपरा नाही. अनियतकालिकांची चळवळ क्षीण होऊन गेल्यानंतरही हे सो-कॉल्ड स्वस्त साहित्य अजूनही जीव धरून आहे. त्या त्या काळातल्या महत्त्वाच्या साहित्य प्रवाहांचं प्रतिबिंब अजूनही लख्खपणे दाखवतं आहे.

’खरं साहित्य कुठे फळतंय ते त्या ’yz’ ना माहीतच नाहीये’ हे संवेदचं वाक्य खरंच. कारण एरवी साहित्यातल्या अनेक प्रवाहांचं प्रतिबिंब दाखवणार्‌या दिवाळी अंकांनीही ब्लॉगविश्वाची दखल घेतलेली नाहीच! आता निव्वळ ’आठवणींचे कढ’ किंवा ’स्वरचित कविता छापण्याची हौस’ या प्राथमिक अवस्थांतून ब्लॉगविश्व काहीसं बाहेर पडत असलं तरीही.

तरीही... तरीही त्यांचं मोल कमी होत नाही. वर्षानुवर्षं दर्जा टिकवून असणार्‌या - चाकोरीबाहेरचे दमदार विषय देणार्‌या ’अक्षर’पासून खानदानी बैठक सांभाळून असणार्‌या ’मौजे’पर्यंत... धूमकेतूसारख्या लख्ख चमकून लुप्त झालेल्या ’चार्वाक’पासून संपादिकेचा आगळावेगळा ठसा घेऊन येणार्‌या ’शब्द’पर्यंत... काहीश्या बोजड म्हणता येतील अश्या चर्चांनी विद्वत्त्जड-भारदस्त वाटणारे ’सत्याग्रही’-’युगांतर’ आणि टिपिकल पुणेरी बाजाचा पण, काटेकोरपणे दर्जा आणि वेगळेपण सांभाळून असणारा ’साप्ताहिक सकाळ’...

किती नावं घेतली तरी काही ना काही सुटून जाणारच...

या निमित्तानं तुम्हीही लिहा दिवाळी अंकांवर. टॅग करणं तसं निमित्तमात्रच. मी या मंडळींना टॅग करतेय.. पण ’खो’ तुमच्यापर्यंत पोचण्याआधीही तुम्ही लिहू शकताच!

नंदन
अभिजीत कुलकर्णी

ट्युलिप

Saturday, 20 October 2007

गणपती बाप्पा मोरया!

गणपती आणि इन जनरलच देव-धर्म-संस्कृती-सण-समारंभ-सोहळे यांच्याबद्दल नाराजीचा सूर लावल्यामुळे कुणाच्या भावना दुखावणार वगैरे असतील तर पुढे वाचू नका. हा मजकूर तुमच्यासाठी नाही.

मी प्रामाणिकपणे प्रयत्न करून पाहिलाय, की आपल्यालाही चार लोकांसारखं गणपती आल्यानंतर उत्साही वगैरे वाटावं. पण तसं होत नाही. आधीच पावसाची नवलाई संपून ’पुरे आता, टळा’ या प्रकारचा मूड झालेला असतो. रिपरिपणारा पाऊस, खड्डे, चिखल, रस्त्यावरून तुंबलेलं पाणी आणि त्यात तरंगणारा कचरा... आणि मग शिवाय गणपती.

गणपती, त्याचा लडिवाळ आकार, त्याचं बुद्धीची देवता वगैरे असणं आणि संस्कृती-बिंस्कृती सगळं ठीक आहे, पण आता मला नाही त्यात फारशी मजा वाटत, तर कुणाची काही हरकत आहे का? पण नाही. एकदा गणपती हा शब्द उच्चारला की तुमच्या भावना कश्या उचंबळून इत्यादी आल्याच पाहिजेत. नाहीतर तुम्ही उद्धट. बरं, तेवढ्यावर भागत नाही. आपण ज्यांना वर्षाकाठी फक्त एकदाच पाहतो अशा नातेवाईक कम परिचितांकडे जा, त्यांच्या थर्माकोलच्या भीषण सजावटी पहा, तळलेल्या पोह्यांचा (किंवा मक्याचा) भयानक गोड चिवडा आणि ते पिठूळ लागणारे, त्रिकोणी खोक्यातून येणारे (यात काय मस्णी गोम आहे कुणास ठाऊक), ’काजू मोदक’ नावाचा अपमान करणारे गोळे खा आणि कोरे कपडे चिखलापासून सांभाळायची कसरत करत दिवसाकाठी साधारण तेरा-साडेतेरा घरं घ्या. काय डोंबलाची गंमत?

हां, आता कुणाला बोंबलायची हौस फिटवून घ्यायची असेल, तरी मी समजू शकते. पण मला तीही हौस नाही. मॅडसारखं देवाच्या पुढ्यात उभं राहून ’येई हो विठ्ठले...’ किंवा ’गरुडावर बैसोऽऽऽऽऽऽऽऽनी’ ओरडण्यात नाही बुवा मज्जा वाटत. ते नाही तर नाही, ब्राह्मणी पद्धतीत शांतपणे अथर्वशीर्षाची आवर्तनंही करून पाहिलियेत मी. पण ह्यॅ:! पार मूर्खासारखं वाटतं. एकच एक स्तोत्र आपलं परत परत परत परत म्हणायचं. काय अर्थ?

मोदक या कम्पल्सरी लोकप्रिय पक्वान्नाचंही मला प्रेम नाही. एखादा बरा लागतो गरम असेल (उकड लुसलुशीत शिजली असेल, सारण खमंग असेल आणि तूप रवाळ-ताजं असेल) तर. पण तेवढ्यासाठी तो गणपती आणि आरत्या नावाचा तासंतास ताटकळवणारा प्रकार आणि बेक्कार ध्वनिप्रदूषण सोसायचं? एवढे काही छान नाही लागत मोदक.

भरीत भर म्हणून तो टिळकांनी माथी मारून ठेवलेला सार्वजनिक गणपती नावाचा प्रकार. कसली जागृती आणि आणि कसलं काय! ’ओ’ येईस्तोवर केलेल्या त्या फिरत्या लाइटिंगमधे सौंदर्य असतं, की त्या निर्बुद्ध हलत्या पुतळ्यांच्यात? की तिथे केलेल्या दारूबंदी इत्यादी देखाव्यात?

यात विरुद्ध बाजूनं बोलण्यासारखेही बरेच मुद्दे आहेत. सार्वजनिक उन्मादाला वाट काढून देण्याची गरज, सांस्कृतिक भूक भागवण्याची सोय, विचार न करता माथा झुकवण्यामधली सोईस्कर मानसिक शांती, ’साजरं’ करण्यासाठी निमित्त इत्यादी इत्यादी. थोडीफार फिरवाफिरवी केली तर ते गोकुळाष्टमी, नवरात्र, दिवाळी या सगळ्या सणांनाही लागू पडतात. पण अर्थपूर्णता संपून गेलेली प्रतीकं निव्वळ कर्मकाडातल्या गंमतीसाठी जपणं मला करायचं नसेल, किंवा मुळात मला त्यात फारशी गंमत येत नसेल, तर ती न करण्याचं, तिच्या विरोधात बोलण्याचं स्वातंत्र्य मला असणार आहे की नाही हा मुद्दा आहे. की तिथेही भावना दुखावल्या अशी सोईस्कर बोंब आपण मारणार आहोत?

Saturday, 13 October 2007

तीच तर गंमत...

पुन्हा एकदा मी का लिहितेय त्याचं समर्थन करणार होते॥ पण नको। डझण्ट मेक एनी सेन्स. :)

आत्ता आपण खरोखरच एकमेकांच्या समोर नसतो तर फार बरं झालं असतं। माझा जीव खरोखरच इतका अडकला आहे का तुझ्यात, की हे नुसतेच आकर्षणांचे मोह... हट्टीपणाने घर-दार व्यापून बसलेले... ते पडताळून पाहता आलं असतं. समोर माणूस नसताना, तो तसाच्या तसा जागता राहिला मनात... कुठलंच प्रतीक वा मृत आठवण बनून न राहता... जिवंत संवाद घडला त्याच्याशी तो समोर नसूनही... तर म्हणावं... की होय, माझा जीव गुंतला आहे तुझ्यात.

पण आत्ता?

आत्ता तू रोज दिसतोस. एकमेकांच्या अवस्थांचे अंदाज न लावण्यातच सगळी असेल नसेल तेवढी शक्ती खर्च होऊन जाते. रात्रीला आपण पार कंगाल. विखुरलेल्या स्वत:ला कसंबसं गोळा करून निवार्‌याला जाऊन पडणे एवढं एकच माफक ध्येय जपू शकणारे. कसली स्वप्नं आणि कसली ध्येयं...

म्हणून जमेल तितक्या लवकर तुझ्या डोळ्यांसमोरून उठून जायचंय. तू खरंच मजेत आहेस का..... हा विकृत प्रश्न नको आणि जीवघेणे अंदाज नकोत. स्वत:ची रोज उठून परीक्षा पाहणं नको आणि तुझी घेऊन तुला नापास होताना पाहणं नको. माझी गोची किती अवर्णनीय सुरेख... तू पास झालास तरी मलाच दुखणार आणि नापास झालास तरी स्वत:वर संतापून मीच कळवळणार! आहे की नाही मजा?

काय अर्थ?

कुणास ठाऊक...
आत्ता उद्धृत करायला सौमित्रची एक भीषण सुंदर कविता आठवतेय... पण नको.... कविता नकोत.

असेच वार्‌यावरचे निरुत्तर करणारे अनेक प्रश्न...

आणि आपण नुसते पाहत बसलेले... अगतिकपणे.

तो विचारतो मग स्वत:लाच... ’काय अर्थ?’

तर अर्थ काहीसुद्धा नाही...

जगातल्या सगळ्या कविता साल्या कुठेतरी खोल पुरून टाकल्या पाहिजेत.
कदाचित मी नीट नॉर्मल वागीन.
कुणास ठाऊक. कदाचित नाहीnaahiihii..
मग कदाचित मी स्वत:च लिहीन एखादी कविता नाईलाजानं. काय अर्थ?तर अर्थ काहीसुद्धा नाही!



मरो.......
सालं स्वत:चं असं काहीतरी सापडायला पाहिजे. म्हणजे जगदीशचंद्र बोसांना कशी झाडं सापडली, किंवा व्हॅन गॉगला रंग-रेषा किंवा सौमित्रला शब्द.... स्वत:मधली असेल नसेल तेवढी सगळी मस्ती, सगळी ऊर्जा... आत उसळणारं हे सगळं सगळं... तिथे उधळून टाकायचं...
कधी सापडेल? शोधत राहायला पाहिजे. स्वत:पासून सुटण्याचा तेवढाच एक मार्ग. शोधला पाहिजे. काय वाट्टेल ते झालं तरी शोधला पाहिजे..... मरायच्या क्षणापर्यंत शोधत राहायला पाहिजे.....त्यात हे असे दुखण्या-खुपण्याचे रस्ते अनिवार्यच. त्याची भीती नाही. दुखण्याच्या भीतीनं पाय मागे घेतला असता, तर इथवर आलेच नसते...मला दु:ख हवं, सुख हवं, अपेक्षा हव्यात, अपेक्षापूर्तीच्या अपेक्षा हव्यात आणि अपरिहार्य असतील तर अपेक्षाभंगही... सगळं सगळं हवं. दोन्ही हातांनी भरभरून हवं.. कितीही रक्ताळला जीव तरीही..
’जगातलं एकपण सुख नाही सोडणार...’ असं म्हणाला होतास तू, अगदी फिल्मी उत्कटपणे, दूर क्षितिजापार वगैरे नजर रोखून... आठवतंय? किती शर्थीनं निभावलंस ते! आणि मीही. फक्त आपल्या संदर्भबिंदूंची पाऽऽर उलटापालट झालेली. तीच तर गंमत...

Thursday, 11 October 2007

बाकी सारे तसे आलबेलच...

तसा दुष्काळ नाही

आणि वादळ-बिदळही.
सूर्य उगवतो, चंद्र मावळतो,
दुपारींमागून संध्याकाळी,
संध्याकाळींमागून रात्री,
एका लयीत उलगडत जातात.
पाऊस-बिऊसही पडतो सालाबादप्रमाणे नियमित.
सारे तसे आलबेलच.


काही झाडे मात्र अबोलपणे सुकत जातात.
पानांचा जगण्यातला रस संपून
त्यांनी झाडाची बोटे अलगद सोडून द्यावीत,
ऊन-पाऊस सोसत मुकाट उभे राहण्याखेरीज
खोडालाही काही सुचूच नये,
फुला-फळांनीही आतल्या आत घट्ट मिटून घ्यावे स्वत:ला
एखाद्या गरिबाघरच्या अपंग वेडसर मुलासारखे
निमूट समंजसपणे,
तसेच.
तसेच घडत जाते सगळे
काही झाडांच्या बाबतीत.


तसा दुष्काळ नाही आणि वादळ-बिदळही..
सूर्य-चंद्र, दिवस-रात्र, उन्हाळे-पावसाळे...
पाऊसही पडतो नितिमत्तेचे सारे संकेत पाळत सालाबादप्रमाणे नियमित.


काही झाडे मात्र या सगळ्यातून निर्विकारपणे उठून गेलेली.
बाकी सारे तसे आलबेलच.

***


उद्मेखून तुला टाळत कामा-बिमाचे कृत्रिमपणे उभे करत नेलेले ढीग। तुझ्यातून आरपार पाहत लोकांशी मारलेल्या गप्पा. महत्प्रयासानं का होईना, पण चेहरा पुरता कोरा करून निभावलेल्या काही सोशल वेळा. कडेकोट बंद करून घेणं निर्दयपणे.


तेव्हा तुला प्रथम इतकं निर्लज्जपणे हताश झालेलं, त्यातून मला खवचटपणे टोमणे मारताना पाहिलं। तेव्हा चुकचुकली होती पहिली शंकेची पाल. वाटलं, मित्रा, तू नसणार आहेस. लेट मे गेट यूज्ड टु इट... का दोन दगडांवर पाय ठेवायला पाहतो आहेस?


पण इतकं सोपं थोडंच असतं? अजून बर्‌याच वाटा काटायच्या शिल्लक...


***


मीटिंग्ज्‌, रिपोर्ट्‌स, टारगेट्स आणि अचीव्हमेंट्स। आयुष्य कसं यथासांग यशस्वीपणे आणि बिनबोभाट चाललंय असं स्वत:लाच समजावत राहण्याचे रस्ते आपल्याला मिळाल्यासारखे. शक्यतोवर एकमेकांना टाळणं, गोष्टी ऐकून न ऐकल्यासारख्या करणं, समोरसमोर यायची वेळ आलीच तर दात काढून ती साजरी करणं या सगळ्या आयुधांचा वापर करण्यात आपण एकदम तरबेजच झाल्यासारखे.


अशात कधीतरी एकदा भंकस करत असताना कुणीतरी तुझ्या मनगटावरच्या ओरखड्यावरून तुझी यथेच्छ चेष्टा करायला घेतली। ’मी इथे असणं बरोबर नाही’ असं म्हणून धडाम्‌दिशी तिथून उठून जाण्याचं स्वातंत्र्य घेतल्यास गैरसमज होण्याची शक्यता असल्यामुळे मी चुपचाप पुतळा होऊन जागच्या जागीच गप. ’लाज तर वाटतेय, पण एरवी माझ्या अनुपस्थितीत हसत बेदरकारपणे उडवून लावली असती अशी गोष्ट आता नको इतकी अवघड होऊन बसलीय...’ अशातली तुझी गत. खोटं कशाला बोलू, उठून जाता येत नाही म्हटल्यावर, आय स्टार्टेड एन्जॉइंग इट. शेवटी तुझा गोरामोरा चेहरा न पाहवून, मीपण मस्करीत भाग घेतल्यासारखं केलं आणि हसत हसत उठून चालती झाले.


तेव्हा तुला हायसं वाटल्याची नोंद घेतली होती, पण मी हसत उठून गेल्यावर तुझा झालेला, कळे-न कळेसा अपेक्षाभंग? असूयेचा धागाही नाही उरलेला... अशी हताशा? प्रामाणिक खरं-खुरं दु:ख? कुणास ठाऊक। तेव्हा हे सगळं नोंदायचं राहूनच गेलं....


***


असाच कधीतरी धीर करून माझ्या डेस्काशी गप्पा मारायला आला होतास तू. मीपण निर्ढावून निवांत गप्पा मारल्या काफ्फा आणि मिलेनाच्या पत्रांवर. मराठी नाटकांवर. शाहरुखच्या इण्टेन्सिटीवर. इंग्रजी वृत्तपत्रांवर.


बोलता बोलता सहज बोलल्यासारखं करत म्हणालास - आमच्या घरी इंग्रजी पेपर फक्त मीच वाचतो. नाटकं-बिटकं काय आम्हांला आवडत नाहीत। आणि पुस्तक वगैरे तर माफीच....


तेव्हा कुणीतरी कानफटीत मारावी तसा माझा चेहरा झाल्याचा माझा मलाच नीट आठवतो। म्हणजे एखादी गोष्ट मोडून बाहेर पडण्याचे गट्स नाहीत आपल्यात, तर त्याचा दोष बरोबरच्या माणसाच्या सो-कॉल्ड सामान्यपणाला देणार तू? आणि अशा तुला मी इतकं माझं म्हणावं? आत्ताच्या आत्ता इथून उठून चालतं व्हावं, वणवणावं उन्हातान्हातून, किंवा निवांतपणे झोपावं घरी जाऊन... कुठेही असावं, पण इथे असू नये असा लालभडक संताप आल्याचा आठवतो स्वत:चाच.


मग अशा अनेक वेळा येत गेल्या आणि मी बोलणंही टाळायला लागले नकळत...


***


तरीही तुझ्या वाढदिवसाला तुला चार जणांसारखं ’हॅपी बर्थडे’ म्हणणं नाहीच जमलं मला। ’काय देऊ’ असं विचारलंच मी. पुरेसे आढेवेढे घेऊन माझ्यावरच उपकार करत असल्यासारखा ’पुस्तक दे, पण नाव नको घालू, म्हणजे मी निवांतपणे वाचीन...’ असं म्हणालास, तेव्हा वाटलं, आता कसं, अगदी शेवटची वीट रचून कुणीतरी पुरं चिणून टाकावं तसं सगळं नीट पुरं झालं!


***


नीती-अनीतीच्या सर्वमान्य संकेतांमधले आणि असल्या कुंपणावरच्या बेईमानीमधले वाद तर पहिल्या दिवसापासून घालत आलो आपण.


आता प्रात्यक्षिकांतून तावून-सुलाखून बाहेर पडण्याचे दिवस।


हे सगळं इतकं अवघड असणारेय हेही ठाऊक होतंच. पण तरीही वाटा काटून संपवण्याचे दिवस.


तुझा आणि तुझ्यापेक्षाही स्वत:चा इतका कडकडून राग राग करतानाही एक मात्र येतं मनाशी अजूनही। वाटतं, या सगळ्या भ्याड तडजोडींच्या पलीकडे एक दिवस असा येईल, जेव्हा तुला स्वत:ला जाब द्यावा लागेल... तेव्हा काय होईल तुझं? तेव्हाच्या तुझ्या भीषण एकटेपणाच्या जाणिवेनं पोटात अक्षरश: खड्डा पडतो...


सालं हे तुझ्या काळजीनं पोटात खड्डा पडणं थांबेल ना, तर बर्‌याच गोष्टी सोप्या होतील...


अर्थात बर्‌याच गोष्टी बिनबोभाट मरूनही जातील...


चालायचंच. इतक्या सगळ्या पसार्‌यात काही झाडं जगली काय अन्‌ मेली काय...


बाकी सगळं आलबेल असल्याशी कारण... ते तसं आहेक