Monday, 4 November 2013

खेळघर

आज ’खेळघर’ (रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ) वाचलं. आधीच कबूल करते, माझी प्रतिक्रिया थोडी गोंधळलेली आहे.


मी एका सवर्ण कुटुंबातली, मार्कबिर्कं मिळवणारी, वाचणारी-बिचणारी, मुंबईत राहणारी व्यक्ती. आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचं अमुक इतपत भान नसलं, तर व्यक्तिमत्त्वात फाउल धरतात; त्यामुळे वर्तमानपत्रं नि आता इंटरनेटच्या माध्यमातून अद्ययावत इत्यादी राहायला धडपडणारी. मला आमटे कुटुंबीय ठाऊक असतात. उत्तरोत्तर त्यांना मध्यमवर्गात मिळत गेलेली प्रतिष्ठा आणि त्यांचं बालाजीसदृश पापमुक्ती देणारं स्टेटसही. अवचटांचं मुक्तांगण आणि त्यांची दिवाळी अंकातली प्रथितयश होत गेलेली कचकड्याची साहित्यिकी ठाऊक असते. मला बंगांचं ’सर्च’ही ठाऊक असतं आणि बालमृत्यूंवरच्या संशोधनापेक्षा फेमस झालेलं ’माझा साक्षात्कारी हृदयरोग’सुद्धा. मला समाजवादी पार्श्वभूमी असलेले मित्र असतात. त्यांच्या कुटुंबातला वेगळेपणा आणि माझी सर्वसामान्य नेमस्त हिंदूबिंदू पार्श्वभूमी जमेस धरूनही आमचे प्रश्न आणि आमचं गोंधळलेपण बरंचंसं सारखंच, एकाच टप्प्यावरचं.

अशात गोष्टीबिष्टीत म्हणून तरी एखाद्या माणसाला असली यशस्वी सामाजिक प्रयोगाची परीकथा लिहावीशी वाटते, याचं अप्रूप वाटलं. मजा वाटली. जवळीक वाटली. पण मला तिनं भारून नाही टाकलं.

या लिहिण्यातल्या रचनेत, तिच्या भाषेत किती तुटलेपणा असावा? ती भाषा कुठलीच नाहीय. ना शहराची, ना गावाची. ना बाईची, ना बुवाची. ना पुण्याची, ना मुंबईची. ना ती पात्रानुसार बदलते, ना नेपथ्यानुसार. ती फक्त लेखक नामक प्राण्याची भाषा आहे, इतकंच सारखं कळत राहतं. आयन रॅण्ड जर अमुक एका वयाच्या नंतर वाचली, तर तिच्या गोष्टीतली तीच एकसारखी दिसत राहते नि वैताग-वैताग होतो तसं काहीतरी ही गोष्ट वाचताना होत राहतं. लेखकाची स्वप्नंबिप्नं ठीक आहेत. पण म्हणून ही अशी प्लॅस्टीकची भाषा नि कटाउट्ससारखी माणसं कशी बरं माफ करावीत? केवळ तेवढ्याकरता पुस्तकावर फुली मारावी, असं हे पाप. दुसरं म्हणजे यातल्या कित्तीतरी पात्रांच्या वास्तवातल्या ओरिजिनल स्रोतांची कल्पना सहज करता येते. नि गोष्टीतली पात्रं इतकी कचकड्याची-द्विमित उरतात की डोक्यातला ’हे पात्र कुणावरून रंगवलं असेल बरं’चा चाळा शेवटापर्यंत संपतच नाही. तिसरं आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे तिच्यातला आशावाद. हा आशावाद कमालीचा भोळाभाबडा आणि कृतक आहे. इतका की, "सामाजिक कामामधले हे अमुक चार प्रयोग आणा, त्यात अमुक अमुक दोष होते हे नोंदा, त्याला तेव्हाच्या सामाजिक घडामोडींची एक जनरल बॅकग्राउण्ड द्या, थोडी मार्क्सवाद-लोहिया-डावा विचार-आणीबाणी इत्यादी चवीपुरती चर्चा, आणि मग सरतेशेवटी जनरल शांतिनिकेतन टाईप फुलंबिलं-सर्जनाचा सोहळा-नातेसंबंध हेच प्रगतीचा पाया.. डन! एक मस्त पॉझिटिव्ह गोष्ट तयार आहे बघा..." अशी मुलाखतच जणू लेखक देतो आहे असं चित्रही माझ्या मनानं तत्परतेनं रंगवलं.

तरी मी पुस्तक वाचलं. त्यात रचनेचं नावीन्य आहे. मुलाखती, डायरी, प्रथमपुरुषी निवेदन, तृतीयपुरुषी निवेदन, भाषणं... असे नाना फॉर्म्स आहेत. पण हे काही मला धरून ठेवणारं कारण नाही. मी पुस्तक वाचलं, कारण मलाही गोड शेवट असणारे हिंदी सिनेमे आवडतात. अजून काय इतकं काही संपलेलं नाही, अजून काहीतरी करण्याजोगं मस्त सापडेल, आपली निष्क्रियता आपण संपवू शकू, आपल्याला मजाही येईल, असं मला अजूनही अधूनमधून वाटत असतं. चांगले भारीपैकी धक्के खाऊनही मी अजूनही आवडलेल्या माणसांच्या प्रेमात वेडगळासारखी पडतच असते.

असल्याच वेडगळ प्रयोगाची गोष्ट सांगणारं (की सांगू पाहणारं?) पुस्तक, म्हणून बहुतेक मी ’खेळघर’ वाचलं असणार. म्हटलं ना, मी गोंधळलेय!

Tuesday, 29 October 2013

माझ्या मनातला का...

आज फारा दिसांनी प्रसन्न दिवस सुरू झाला. खिडकीपासची भरार वार्‍याची जागा, कोवळं ऊन आणि ताजातवाना पोपटी मूड. हातात मस्त कोरंकरकरीत पुस्तक.

शुभांगी गोखलेचं ’रावा’ नावाचं पुस्तक. फार काही जगावेगळं, जगात बदल घडवून आणायला निघालेलं, मैलाचा दगडबिगड ठरेलसं नव्हे. आहे आपलं साधंसंच. पण फार फार जवळचं, आत्मीय वाटलं.



मराठी वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमधे अभिनेत्रींनी संवेदनशीलपणे इत्यादि लिहायची आपली समृद्धबिमृद्ध परंपरा आहेच खरी म्हणजे. पण ’कित्ती साधेपणी’ लिहिलं नि जपलेले संस्कार + तरल सर्जनक्षमता दाखवली, तरी त्या लिखाणातली अभिनेत्री काही केल्या लपत नाही असा अनुभव. लिखाण वाईट असतं असं नव्हे, पण ’कित्ती झालं तरी मी पडले नटीऽऽ’चा सूर पार्श्वभूमीला असतोच. या बाईच्या लिहिण्यात मात्र तिचं अभिनेत्री असणं गायबच आहे. खरं तर या लेखांमधले सगळे अनुभव तिच्या दैनंदिन आयुष्यातल्या कामाच्या काठाकाठानं जाणारे. कधी शूटिंगच्या धावपळीत मनसोक्त / आवर्जून / सोसासोसानं / हौसेनं / चोखंदळपणे केल्या जाणार्‍या खरेदीबद्दल नि वस्तुसंग्रहाबद्दल लिहील. कधी शूटिंगच्या धावपळीत सहकलाकारांच्या नि निर्मात्यांनी खिलवलेल्या तृप्त करणार्‍या भोजनाबद्दल ऐकवेल. कधी शूटिंगच्या धावपळीत आपल्या घरापाशी थांबून राहिलेल्या, गळक्या भिंती-आवरायचा माळा-धुवायच्या चादरी वागवत समजूतदारपणे आपली वाट पाहणार्‍या आपल्या घराबद्दल सांगेल. कधी शूटिंगच्या धावपळीत मनापासून काम करताना, एखाद्या सिरियलमधल्या जिवाजवळच्या होऊन गेलेल्या एखाद्या भूमिकेबद्दल हळवी होईल. कधी शूटिंगच्या धावपळीत....

पाहिलंत?! शूटिंग हे तिचं आयुष्य आहे. तुमचं-आमचं ऑफीस असतं, शाळा असते किंवा घरकाम असतं, अगदी तस्संच. त्यातल्या शोकेसी झगमगाटाचा पदर तिनं मुळी पांघरलेलाच नाही. सांप्रतच्या धावपळीच्या, रोज नवे मोह पाडणार्‍या, स्पर्धेच्या मायाजालात आपलं निखळ-नितळ असणं जपू पाहणारी ती एक बाई आहे, बास.

तिची संवेदनशीलता (आयला, या शब्दाच्या तर...!) पुरेपूर महानगरी आहे. म्हणजे सोईस्कर, घडी घालून ठेवता येणारी, थोडीश्शी बेगडी? अहं. महानगरी संवेदनशीलता म्हणजे अनावर आणि अनावश्यक कढ न काढता, भावुकतेच्या उंबर्‍याच्या अलीकडे थांबणारी. पुरेशी कॉस्मोपॉलिटन होत गेलेली, समजूतदार, स्मार्ट, ग्लोबल.

तिचं ललित गद्य वाचताना मी नव्यानं ताजी होत गेले. नसेल तिच्या विस्कळीत ललित लेखनात गोष्टीच्या रचनेचं कौशल्य. पण म्हणून काय झालं? कशी मस्त प्रसन्नता, गाढ समजूत, ताजी कोवळीक आहे... याबद्दल तिचे आभार कसे मानणार? नाटकाच्या रंगपटात जाऊन, आपल्याच अनाकलनीय संकोचांच्या निर्‍या आवरत ’तुमचं लिखाण फार आवडतं बरं का मला’ असं अवघडत म्हणून टाकणं माझ्याच्यानं काही व्हायचं नाही. तिच्यातल्या दिलखुलास लेखिकेलाही ते अन्यायाचंच. म्हणून माझं खुशीपत्र हे इथंच.

मज्जा आली. लिहीत र्‍हावा. 

Thursday, 10 October 2013

सूरजको मैं निगल गया....

खालच्या या जुन्या पोस्टनंतरही बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं आहे. पण कृतज्ञता आहे तशीच. तुझ्यासोबत एक आख्खं युग बघायला मिळाल्याबद्दल.
बाकी प्रश्नोत्तरं होत राहतील. शंकाकुशंका, आरोपप्रत्यारोप, आकडेवारी आणि भूमिकांचं विच्छेदन... होवो.

तूर्तास फक्त एक कृतज्ञ सलाम. मजा आणलीस यार, भरभरून!

सांग ना, काय वाटतं आहे तुला आत्ता?

***

ही कदाचित हे सगळं बोलण्याची योग्य वेळ नाहीय. कुठल्याही बाजूनं बोललं तरी त्याला एक विशिष्ट रंग येण्याचे हे दिवस.

बॅडपॅचचे दिवस. ’सो कॉल्ड’ उतरणीला लागण्याचे दिवस...
वेल... लेट्स नॉट गो इनटु दॅट. ऍट्लीस्ट आत्ता नको. मग ते सगळं आहेच...

एक्झॅक्टली काय वाटतं आहे तुला आत्ता?
येस. ’अभी वहाँ का माहौल कैसा हैं?’ या आचरट प्रश्नाइतकाच हाही एक क्वालिफाईड बिनडोक प्रश्न आहे. मान्य. पण तरी तो पडला आहे मला निरागसपणॆ.

त्या कुठल्याश्या इंग्लंडातल्या पोरीनं तुझ्या जिगरबाज खेळावर फिदा होऊन तुझी ’पापी’ घेतली होती तेव्हा काय वाटलं होतं असेल तुला एक्झॅक्टली, हाही प्रश्न पडतोच की मला. किंवा बाबांना अग्नी देऊन पुढच्या विमानाने परत खेळायला जाणं जरा अमानवीच नसेल वाटलं का तुला, हाही प्रश्न पडतोच मला.
मला हक्क आहे तुला हे आणि असले कितीही बिनडोक प्रश्न विचारण्याचा.

कारण?

कारण अजुनी कोणाला काय आणि किती आचरट वाटेल याचा विचार न करता - किंबहुना तो केला तरी ’काय वाटायचं ते वाटू दे, गेले खड्ड्यात...’ असं म्हणून - तुझ्यावरची निष्ठा स्वत:लाच सिद्ध करून दाखवायला म्हणतेच की मी - "सचिनची शप्पथ - "
किंवा
जुनी मॅच तर सोडाच; पण बिस्किटं किंवा बाईक किंवा अंडी किंवा कसल्याही जाहिरातीत जरी तू दिसलास की रिमोटवरचा हात थांबतोच.
किंवा
’जिनियस काय चाटायचंय?’, ’जिंकून दिलंय का त्याने कधी इंडियाला?’, ’सगळा पैसा हो हा..’ यांपैकी कुठलीही कमेण्ट कितव्यांदाही ऐकल्यावर अजूनसुद्धा अकरावीतल्या भाबड्या पोरासारखी मुद्देसूदपणे भांडायला मी तोंड उघडतेच.
किंवा...
जाऊ दे. मुद्दा काय, तर मला हक्क आहे. माझा मीच तो स्वत:ला देऊन घेतलाय.

तर... काय वाटतं आहे तुला आत्ता?

’अरे जा रे... काय वाट्टेल ते तोंडसुख घ्या आणि वाट्टेल तेवढे जळा. पण त्याला टीमच्या बाहेर बसवायची कुणाच्या बापाची टाप नाही...’ हा माझा कॉन्फिडन्स फोल ठरल्यावर मलाच इतकं भ्रमनिरास झाल्यासारखं, आपल्यावर अन्याय झाल्यासारखं वाटतंय -
तुला काय वाटतं आहे आत्त्ता?

की तुला काहीच फारसं वाटत नाहीय या सगळ्याचं? फक्त एक बॅडपॅच आणि पुन्हा सारं होणार आहे तसंच पहिल्यासारखं एकसंध?

आय डाउट...

स्वत:ला बदलताना आरशात दिसत नसलात, तरी रोज थोडे थोडे - रेषेरेषेनं बदलत असताच की तुम्ही . तूही बदलत गेला आहेस तसाच.


परत एकदा कर्णधारपद घेतलंस तेव्हा.

परत एकदा नाईलाजानं ते उतरवून ठेवलंस तेव्हा.

एखाद्या कारकुनासारखं तोंड वेंगाडून भूखंड मागितलास तेव्हा.
लोकांची मुक्ताफळं तोंड मिटून सहन करत बॅटनं बोलायचं अजून घट्ट ठरवत गेलास तेव्हा.

आणि चिखलफेक सहन न होऊन अखेर तोंड उघडलंस तेव्हाही.

तुझ्यापासून तू पुष्कळ पुढे आला आहेस आता. नाही?

’सूरजको निगलनेवाले सभी’ पुढे येताना अशीच आग ठिणगी-ठिणगीनं हरवत येतात का रे? की उरतो तरीही त्यांच्यात एखादा धपापता जिगरबाज स्फुल्लिंग?

तुझ्यातही आहे? आहे का रे?

सांग ना - काय वाटतं आहे तुला आत्ता?

Friday, 22 February 2013

आत - बाहेर


ही तटबंदी अजिंक्य नाही
मला ठाऊक आहे.
अजाणता किती वेळा आत पाऊल टाकता टाकता राहिला आहात की...
पण म्हणून राजरोस महाद्वार उघडीन तुमच्यासाठी,
असं मात्र नाही.
नाहीच.

तटबंदी आकर्षक खरी.
बुलंद, काळीकभिन्न,
अंगाखांद्यावर अवकाळी पावसाचे अवशेष खेळवत,
दाटून येत
पिंपळपानांचे अंकुर नांदवणारी

तरी -
आत पडझड बरीच.
ती पाहून उठली तुमच्या कपाळावर एक आठी जरी,
वा डोळ्यांत उमटली नापसंतीची दिसे न दिसेशी लकेर -
मग आपल्याला एकमेकांबद्दल आदर उरायचा नाही.
नि एवढा धोका पत्करावा,
इतकी श्रीमंती माझ्या गाठीला नाही.

हां,
बाहेर
मांजरपावलांनी पुढे सरकणारी
किर्र-दमट जंगलं वा उष्ण-रुक्ष वाळवंटं नाहीत,
विस्मृत नगरांचे अवशेष आहेत काही,
बाहेरही.
नि समुद्र आहे...
बाहेर यावा की,
असं म्हणत असलात,
तर गोष्ट वेगळी.

मग तटबंदीला तसाही फारसा अर्थ उरत नाही.
नाही?

Friday, 15 February 2013

ऋणांचे हिशेब


फैज अहमद फैज हा कवी मित्रकृपेनं भेटला. पुरते शब्दार्थ न कळताही भाषेच्या लयीची भूल पडते नि मागून दमदार अर्थ आकर्षण अधिक सखोल करत नेतात, तसं झालं. कवी असण्यातली सगळी वेडं जगून घेणारा हा कवी. बंडखोर, स्वप्नाळू, धुंद प्रेम करणारा, प्रेम पचवून शहाणपणाचं खंतावलेलं पाऊल टाकणारा. तो गायलाही गेला खूप. वेड लागल्यासारखी मी वाचत, ऐकत, समजून घेत सुटले. १३ फेब्रुवारीला या कवीचा जन्मदिन. त्या निमित्तानं हे साहस. 

खरं तर काही ऋणनिर्देश करायला हवेत. पण काही ऋणांतून कधीच मुक्त न होण्यात... वगैरे वगैरे!

हे शब्दश: / अर्थश: भाषांतर नाही. कवितेतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ चिमटीत धरायचा; की कवितेचं कवितापण, तिच्यातला मूड असा प्रश्न अनेकवार पडला. नि फैजच्या शब्दांना हात घालायचं पाप करतोच आहोत, तर न भिता-न कचरता-मनापासून करू, असं म्हणत मी दुसरा पर्याय स्वीकारला. गायत्री नातूनं मागे केलेली चार भाषांतरं आठवून मी खचणारा धीर सावरला. तिचे आभार मानायला हवेत. वाद होऊ शकतो अनेक गाळलेल्या नि घातलेल्या शब्दांवरून. क्रमावरून. प्रतीत होणार्‍या अर्थावरून. कुठे भाषांच्या मर्यादा आहेत, कुठे नादाच्या. मला मर्यादा मान्य आहेत. 'हे सापेक्ष आहे' ही इथे पळवाट म्हणून वापरत नाही, मला खरंच असंच म्हणायचं आहे, की हा कवितेनं 'मला' दिलेला अर्थ आहे नि तो प्रत्येकासाठी निराळा असेल.

असो. पुरे. एकदाच माफी मागते.

ही फैज यांची मूळ कविता:

तुम मेरे पास रहो

तुम मेरे पास रहो
मेरे क़ातिल मेरे दिलदार, मेरे पास रहो
जिस घड़ी रात चले,
आसमानों का लहू पी के सियाह रात चले
मर्हमे-मुश्क लिये नश्तरे-अल्मास लिये
बैन करती हुई, हंसती हुई, गाती निकले
दर्द की कासनी पाजेब बजाती निकले
जिस घड़ी सीनों मे डूबे हुए दिल
आस्तीनों मे निहां हाथों की राह तकने लगे
आस लिये
और बच्चों के बिलखने कि तरह क़ुलकुले-मै
बहरे-नासूदगी मचले तो मनाये न मने
जब कोई बात बनाए न बने
जब न कोई बात चले
जिस घड़ी रात चले
जिस घड़ी मातमी सुनसान, सियाह रात चले
पास रहो
मेरे क़ातिल, मेरे दिलदार, मेरे पास रहो

(इथे नायरा नूरच्या आवाजात नि इथे विद्या शाहच्या आवाजात ती ऐकताही येईल. मला विद्या शाहची आवृत्ती अधिक आवडली.)

थांब इथे.
माझ्यापाशी.

आभाळाच्या रक्तावर पोसलेली धुंद रात्र
काळोखाची लयबद्ध पावलं टाकत येते,
तेव्हा सार्‍या व्यथांवर क्षणमात्र फुंकर पडल्यासारखी होते.
पण तिच्या पायी कसलेले असतात दुःखांचे खळाळणारे चाळ 
आणि हातच्या नक्षत्रांना लक्कन कापून जाणारी हिर्‍याची धार असते.

तेव्हा,
थांब इथे माझ्यापाशी.

एरवी छातीच्या तटबंदीआड मुकाट राहणार्‍या काळजांचा सुटू पाहतो ठाव
लागते कुण्या आश्वासक हातांची ओढ,
स्पर्शांची स्वप्नं पडू लागतात...
तिन्हीसांजेला कळवळून रडणार्‍या पोरासारखा भेसूर सूर असतो ओतल्या जाणार्‍या मद्यालाही,
अवघ्या अर्थाला निरर्थकाचे वेढे पडतात.
काहीच मनासारखं होत नाही
काही केल्या.
दूरवर कुठेच कुणीच काही बोलत नाही.
स्मशानशांतता पेरत रात्रीची काळीशार दमदार पावलं पडू लागतात.

तेव्हा जिवलगा,
थांब इथे.
माझ्यापाशी.

श्रद्धा, याच कवितेचं भाषांतर करायचा खो घेणार का?

Wednesday, 13 February 2013

गोल सेटिंग आणि अप्रेझल वगैरे...

डिस्क्लेमरः
अ) कोणत्याही अर्थाने ही साहित्यकृती नाही. डोक्यातला गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न आहे. लिहिताना गोष्टी अधिक स्पष्ट दिसतात, एका विशिष्ट क्रमानी-काही कप्पे करून मांडता येतात, त्यातून काहीएक उत्तर मिळण्याची आशा निर्माण होते, म्हणून. आपापल्या जबाबदारीवर वाचणे.
आ) 'आयुष्याचा अर्थ काय?' असा प्रश्न चारचौघांत विचारला तर लोक चमत्कारिक + हेटाळणीच्या नजरेनी पाहतात. प्रश्नाला उत्तर मिळणं तर दूरच, आपल्याला लोक गंभीरपणे घेण्याची शक्यताही कमी होते,  त्यामुळे ही शब्दरचना टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. पण प्रश्न साधारण त्याच प्रकारचे आहेत.

दोष
१. आळस / कंटाळा / थोड्या वेळानी करू: समोर करण्याजोगं, ठरवलेलं, मिळवलेलं काम असतानाही रिकाम्या वेळात भलतंच काहीतरी अनुत्पादक करून वेळ संपवला जातो.
२. तेच ते आणि तेच ते: आपल्याला जे बरं जमतं, ते नि त्याच्या कुरणातल्या गोष्टींकडेच लक्ष पुरवलं जातं. नवीन, वेगळ्या - उद्या कदाचित रोचक वाटूही शकतील अशा गोष्टी करून पाहण्याची तीव्र अनिच्छा.
३. व्यापक चित्राचा लोभ आणि धरसोडः आपल्याला अनेक गोष्टींत रस वाटतो, पण कुठलीच एक गोष्ट जीव जाईस्तोवर कष्ट करून तडीस नेता येत नाही. सुरुवात करताना कुठूनतरी करावीच लागणार नि ती भव्यदिव्यव्यापक नसणार हे कागदावर कळतं. पण अशी सुरुवात मात्र अपुरी, टुकार, अनाकर्षक, कंटाळवाणी वाटते.

गुणः
१. अनेक बाजू दिसतातः कुठल्याही गोष्टीच्या अनेक बाजू दिसतात. एकांगी, सोपी भूमिका सहजी घेतली जात नाही.
२. जगण्याचा लोभः निराशेचे कितीही कढ काढले, आता नको-पुरे-मरून जाऊ असे गळे काढले, तरी अजून जगायला अधूनमधून पण सातत्याने मज्जा येते. 'जगायला' हाही बदनाम शब्द. जगायला - पक्षी: भांडायला, हसायला, रडायला, खायला, प्यायला, झोपायला, जागायला, वाचायला, लिहायला, पाहायला, दाखवायला इत्यादी. त्यामुळे दर थोड्या दिवसांनी 'नवीन काहीतरी करून पाहू'चा किडा सुचत राहतो. (हे नवीन आपल्या राखीव कुरणाशी संबंधितच काहीतरी असतं म्हणा. (नवीन पीक माणसाळवण्याऐवजी त्याच पिकाची अजून एक प्रजाती घडवण्याशी याची तुलना व्हावी.) पण ठीक.)
३. मर्यादांची जाणीवः आपण थोर-बीर नाही हे एक नीट पक्कं ठाऊक असतं. त्यामुळे उगा स्वत:बद्दल अनाठायी गोग्गोड कल्पना नाहीत. हे जमतं, हे जमत नाही, अशी ठोक विधानं. (हां, त्यांचेही तोटे असतात. कुरणं वगैरे. प. ठी.)

(इतकं भारूड जमवल्यावर आता तरी मुख्य प्रश्नाला हात घालावा.) काय केलं म्हणजे मजा येईल, येत राहील - त्याचं उत्तर मिळत नाही, म्हणून हे भारूड.
जेवणखाण, निरनिराळ्या चवी, स्वैपाक, खरेद्या, गाणी-सिनेमे-पुस्तकं... यांनी तात्पुरती मजा येते. पण ही मजा दीर्घजीवी असत नाही. उलट एका मर्यादेनंतर आपण मुख्य प्रश्नांकडे डोळेझाक करून नाही त्या अश्लील गोष्टीत शहामृगी पद्धतीत डोकं खुपसून बसलो आहोत अशी जाणीव अजून अजून टोकदार होत जाते आणि गंमत संपत जाते. हेच नातेसंबंध या बहुचर्चित गोष्टीलाही लागू करता येईल अशा टप्प्यावर मी आत्ता आहे. उत्स्फूर्तता, उत्कटता, माणसांमधे बुडी मारण्याची वृत्ती... यांतून हाताला जे लागायचं ते लागलं आहे. आता हा रस्ता पुढे कुठेच जात नाही याचं नकोसं भान आल्यामुळे अस्वस्थता अधिक. माइंड यू, मी आयुष्यातल्या भोगवस्तू वा माणसं नाकारण्याबद्दल बोलत नाहीय. तर त्या भोगण्याच्या पद्धतीबद्दल बोलतेय.

हातून म्हणण्यासारखं काहीही होत नाही. कुणी म्हणण्यासारखं, लोक कोण काही म्हणणारे, लोक गेले फुल्याफुल्यांत... हे मीच मला विचारून-म्हणून झालं आहे. त्यावर टीपी नको. कुणी म्हणण्यासारखं? तर मीच म्हणण्यासारखं. मला माझ्या कामाबद्दल (काम किंवा काहीही. शब्द महत्त्वाचा नाही) भारी वाटेल, काळाच्या छोट्याश्या तुकड्यावर तरी ते उठून दिसत राहील अशी आशा वाटेल - असं काहीतरी - काहीही.

असं काहीतरी करावंसं वाटणं हेही आउटडेटेड-आउटॉफ्फ्याशन आहे, मला कल्पना आहे. पण आता आपल्याला आवडतो सचिन तेंडुलकर तर आवडतो. असेल आउटॉफ्फ्याशन. आपण काय करू शकतो?

कृतिकार्यक्रमः
१. निदान ३ तरी नवीन गोष्टी चालू करून वर्ष संपेपर्यंत सातत्यानी रेटायच्या. त्यातली एखादी तरली तरी चांगभलं.
२. निदान ३ तरी कुरणाबाहेरच्या गोष्टी करून पाहायच्या. वर्षाखेरपर्यंत नाही रेटणार कदाचित. पण करून बघायच्याच.
(तिसरं काही सुचत नाहीये, पण ३ आकडा मस्त वाटतो. बरंच काही करून पाहतोय असं वाटतं. आठवा च्यायला. हां, हे बरंय, स्टॅण्डर्ड.)
३. वजन कमी करणे.

इत्यलम.

Monday, 28 January 2013

टोक काढल्या जाणार्‍या पेन्सिलीसारखे...


टोक काढल्या जाणार्‍या पेन्सिलीसारखे स्वतःला तासत
आपण येऊन पोचतो एका टोकावर.

कंटाळा,
चाकोरीबद्ध कामांचे ढीग,
एकाच वेळी निर्बुद्ध नि क्रूर असू शकणार्‍या लोकांचे जथ्थे...
सगळी फोलपटं सोलत
एकमात्र बिंदूवर रोखले गेलेले आपण.
शरीर, मन, आत्माबित्मा बकवास मुकाट बोथटत गेलेली,
नि तरी या तिन्हीसकट निराळे आपण टोक काढून तय्यार.

फार काही नको,
दोन बिंदू नि त्यांना जोडणारी एक रेघ काढता यावी,
पेन्सिल संपून जाण्याअगोदर.


Thursday, 10 January 2013

साहित्यसंमेलन आणि मी

साहित्य संमेलन ही गोष्ट माझ्यासाठी थेट महत्त्वाची नाही. त्यात चालणारे सगळे थेर मला साहित्य या माझ्या आवडत्या गोष्टीबद्दलही उद्वेग आणणारेच असतात. त्यामुळी मी त्यापासून अंतर राखून असते. पण - माझी भाषा, त्यातलं साहित्य आणि त्या साहित्याचा एक लोकमान्य - परंपरागत उत्सव या तीनही गोष्टींबद्दल मत नोंदवण्याचं अगत्य, अधिकार आणि कर्तव्य मी राखून ठेवू इच्छिते, कारण साहित्यातली प्रतीकं माझ्या आयुष्यावर दूरगामी परिणाम घडवून आणू शकतात - आणतात असं मी मानते. म्हणून हे मतप्रदर्शन.

१. साहित्यिक, रसिक आणि त्या दोहोंमधले दुवे (संपादक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते, वाचनालयं, समीक्षक, माध्यमांचे प्रतिनिधी) यांखेरीज इतर कशालाही आणि कुणालाही साहित्य संमेलनात स्थान असू नये. राजकारणी आणि प्रायोजक यांना होता होईतो दूर ठेवलं जावं. हे प्रत्यक्षात अशक्य दिसतं. पण निदान त्यांचा चेहरा तरी साहित्यप्रेमीच असला पाहिजे आणि या चेहर्‍याशी विसंगत अशी कोणतीही कृती करण्यापासून (आपला साहित्यबाह्य कार्यक्रम राबवण्यापासून) त्यांना इतर घटकांनी रोखलं पाहिजे. स्थानिक वैशिष्ट्यांना संमेलनात स्थान देतानाही वरची चौकट मानणं बंधनकारक असलं पाहिजे.

२. साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक असणं लोकशाही प्रक्रियेला धरून आहे. फक्त या प्रक्रियेत मतदानाचा अधिकार आहे त्याहून व्यापक समूहाला असला, तरच ती प्रक्रिया अर्थपूर्ण ठरेल. (सध्याच्या प्रक्रियेत नक्की कोण नि केव्हा मतदान करतं हे मला तरी ठाऊक नाही. त्यात सहभागी होण्याची इच्छा असल्यास, त्याची प्रक्रिया काय, हेही गुलदस्त्यात. जाणकारांनी प्रकाश टाकल्यास मी ऋणी असेन.)

३. तरीही हे संमेलन मुख्य धारेतलं असल्यामुळे त्याविरोधात आवाज उठतील. विद्रोही, दलित, स्त्रीवादी, उपेक्षित, असे आणि वेळोवेळी इतरही असंतोष व्यक्त होतील. ते अपरिहार्य आणि आवश्यक आहे. मात्र या असंतोषाला हिंसक परिमाण मिळता नये, ही शासनाची आणि आपलीही जबाबदारी आहे. (पुष्पाबाईंना जिल्ह्यात प्रवेशबंदी आणि त्याविरोधात संरक्षण द्यायला पोलिसांनी दर्शवलेली असमर्थता हे आपल्याला लाजिरवाणं आहे.)

या मतांच्या पार्श्वभूमीवर -

साहित्यिक आणि समाजसुधारक हमीद दलवाईंच्या घरून निघणार्‍या साहित्य दिंडीला विरोध करणारे स्थानिक मुस्लिम गट आणि संभाजी ब्रिगेडसारख्या अविचारी संघटना;

परशुरामासारख्या जातीय, हिंसक आणि पुरुषप्रधान प्रतीकांचा उद्घोष करणारे संकुचित आयोजक;

साहित्यिकांना बैल संबोधणार्‍या बाळ ठाकरेंचं नाव एका सभागृहाला देण्याला पाठिंबा देणारे राजकीय नेते;

इतर अत्यावश्यक कामांसाठी असलेला राखीव निधी 'लोकप्रतिनिधींचे सांस्कृतिक शिक्षण' या गोंडस नावाखाली राजरोसपणे साहित्य संमेलनाकडे वळवणारी राजकारणी आणि आयोजकांची अभद्र युती -
या सार्‍याचा मी एक मराठी साहित्यरसिक म्हणून निषेध करते.

(तपशिलात काही  चुका असल्यास निदर्शनास आणून देणार्‍यांचं आणि मतभेदांचंही स्वागतच आहे.)

Saturday, 29 December 2012

टू मिसेस वाल्या कोळी


सगळ्यांच्या पोटी
एकटं असायची भीती. 
नातेवाईक धरून ठेवणं. 
माणसं-बिणसं जोडणं-बिडणं. 
लोकांना रुचेल तसं(च) वागणं. 
सदसद्विवेकाला न रुचेल असं काही घडलं, 
तरी सोबतीच्या धाकानं काणाडोळा करणं.
गोतावळ्यात रुतून बसणं.
वेगळं होता येत नाही म्हटल्यावर,
गोतावळा करेल त्याचं समर्थन करणं.

नाहीतर काय?
आपल्याच नाकात आपलेच पाय.
अपराधभावातून सुटका नाही.
समर्थन करताना 
दुसरा काय नि स्वत: काय,
समजुतीला पारावार नाही. 
जोरदार आणि समजूतदार समर्थन. 
'सारं काही सापेक्ष' असल्याचं स्पष्टीकरण. 
सगळंच सगळ्यांना रुचतं.
स्वत:सकट सार्‍यांना 
जेवणबिवण छान पचतं.

हे असं आहे खरं.
'असं का आहे?' विरून जातं. 
'असंच असतं'ची आळवणी,
मागून 'असंच चालणार' येतं.
विरोध संपला. 
ठिणगी संपली. 
संघर्ष संपला. 
चेतना संपली. 
सारं कसं शांत शांत.
टोटल बोअरिंग. 
एकदम निवांत.
कुणी कुणावर हल्लाबिल्ला केला
तर थोडी सनसनाटी.
स्वसंरक्षणासाठी
एखादी काठी.
सगळ्यांच्याच हाती.
एकटं पडायची भीती,
सगळ्यांच्याच पोटी.

यावर उपाय काय करावा?
एकान्ताचा वसा मनी धरावा.
खुशाल उतावे, खुशाल मातावे
तत्त्वाबित्त्वासाठी खुश्शाल भांडावे.
काही तोडून-मोडून घ्यावे,
काही सोबत जोडून घ्यावे.
काही वेचून फेकून द्यावे.
बरेच काही पोटी धरावे.
माणसे येतील, माणसे जातील,
आपण सुखें एकटे उरावे.
मिळतील थोडे सखे-सोयरे.
भांडा-तंटायला 
एकटे असायला,
न भिणारे.

जुन्या कविता



नव्यानं सुरू झालेल्या दिवसांच्या छाताडावर गुडघे रोवून.
नव्या आयुष्याच्या झिंज्या मुठीत पकडून.
ओळीत लावलेल्या दिनक्रमाची रासवटपणे कॉलर पकडून.
अनोळखी आविर्भावाला एक खणखणीत मुस्काटात खेचून.
फिरवलेल्या पाठीला एक आईवरची शिवी बिनदिक्कत हासडून.
सगळ्या सगळ्या बेईमानीवर थुंकून,
तुझ्या पौरुषावर उमटलेली माझी लाखबंद मोहर तुझ्याकडे परत मागितली -
तर तू कसा दिवाळखोरपणे रस्त्यावर येशील नाही?
जखमी झालेल्या तुला कुशीत घेऊन तुझ्या ओठांवर ओठ टेकू शकेन मी फक्त.
मग तरी उतरेल तुझ्या ओठांवर माझी ओळख?
सांग ना, मित्रा.

***

मातीत बी रुजतं तेव्हा माती असते का सजग?
की सर्जनाच्या आनंदात भिजत असते ती देहामनाच्या पार?
म्हणूनच,
म्हणूनच बीज असं रुजतं तिच्या गर्भात?
अशाच कुठल्यातरी पावसात.
मीही होते देहामनासकटच्या आनंदात अपरंपार.
तेव्हाच रुजत गेलास तू माझ्यात.
असण्या-नसण्याचं भान आलं, तोवर ओटीपोट टपोरलं होतं माझं.
पाहता पाहता आकारत गेलास माझं सर्वस्व व्यापत
आणि मग ते भीषण द्वंद्वही गेलं माझ्यात साकारत.

रुजलेल्या बीजानं अंकुरणं हा त्याचा देहधर्मच.
पण आपण मिळून ठेचून काढायचा ठरवला हा अंकुर.
तेव्हाच लिहिलं गेलं असेल आपलंही भवितव्य त्यासोबत?
ठरवून आयुष्याकडं निकरानं पाठ फिरवावी
तसे माघारी वळलो आपण.
आणि जगण्याची ही लसलसती इच्छा
थोपवून धरली आतल्याआत.
सोपं नाही,
नव्हतंच.
जगण्याचे अंकुर इतक्या सहजासहजी मरत नसतात,
कळायचं होतं आपल्याला.

आपल्याच असण्याच्या भिंतींना वेढत चिरफाळत आत वळलेला तो अंकुर.
आता गर्भपातही संभवत नाही मित्रा.
आणि जन्मही.

***

किती कविता तुझ्या हातात अल्लाद ठेवत गेले
हात पोळले तरी -
आता समजत नाही.
तू कधी स्पर्श तरी केलास का रे त्यांना?
की ती नुसतीच एखादी फॉरवर्डेड मेल होती तुझ्यालेखी?

कुणीतरी कुठेतरी लिहिलेली एक कविता.
त्यात रुजलेले माझे श्वास.
माझे स्पर्श.
दुसर्‍या कुणाची कविता आपल्या आत अशी हिरवाळते,
तेव्हा आपली होते ना ती?

तीच तर तुला पाठवली अनेक वार.
कधी संपृक्त बी.
कधी एखाद्या सुगंधी खोडाचा तुकडा.
कधी नव्हाळलेली ओलसर पानं.
कधी फुटावलेलं एखादं वयोवृद्ध मूळ.
फळांचा ऋतू आपल्यात कधी आलाच नाही,
एकदम मान्य.
पण,
फुलांचा तरी आला का रे?

आता माझी बोटं हिरवी नाहीत.
फक्त पोळल्याच्या काही खुणा.
आणि आपल्या कविता उगवल्यात का कुठेतरी,
की निर्वंश झाला आहे आपल्या जातीचा,
आणि एखाच्या नामशेष होणार्‍या प्रजातीच्या शेवटच्या स्पेसिमेनसारखे
नाहीसे व्हायचे आहे इथून निमूट?
असल्या प्रश्नांनी चिन्हांकित नजर.

तुझ्या बागेत कुठली कुठली झाडं आहेत, बाय दी वे?

***