Wednesday, 23 April 2008

वार्‍याने हलते रान...

सहसा काम करण्यासाठी ही अशी जागा मिळणं दुरापास्त.

दोन्ही टोकांना धडधडणार्‍या शहरांच्या मधे वसलेला हा निवांत पट्टा. कसलेच गज नसलेली मोठ्ठीच्या मोठ्ठी सरकखिडकी. समोर खाडी. खाडीला समांतर जाणारे निर्लेप संन्यस्त रूळ. अद्याप माणूसपणा शाबूत असलेला शांत फलाट. खाडीचं वेळीअवेळी चमचमणारं-ओसरणारं पा़णी.

त्या पाण्यावर जगलेलं हे मोकाट रान. जिवंत, श्वास असणारं.

त्या रानाला चक्क रानाचा असा हिरवा-ओला वासही येई. त्याचा रानगट हिरवेपणा, पावसाळ्यात ओसरून जाणारं त्याचं शहरीपणाचं भान, त्याला अगदी क्वचितच होणारा चुकार माणसाचा स्पर्श आणि तिथले ते काव्यात्म गूढ बगळे. या सार्‍यावर पाऊस कोसळे, तेव्हा तिथल्या जडावलेल्या रानवट शांततेत आपणच उपरे असल्याचं निर्दय-तीक्ष्ण भान देत जात असे ते रान.

रान नजरेच्या पातळीला असतं, तरी त्याचा स्पर्श असा हाताच्या अंतरावर भासला असता. आणि मग त्याची कळे न कळेशी दहशतही वाटली असती कदाचित. पण माझ्या खिडकीनं मला निराळीच जागा बहाल केलेली. एरवी आपल्या भासमय अस्तित्वानंही धडकी भरवू शकले असते असे अनेक सळसळते स्पर्श, खसफसणारे आवाज आणि तो ओलाकंच गंध - सगळंच मला माझ्या खिडकीतून एक निराळीच मिती दिल्यासारखं दिसे.

जिवंत. पण दूरस्थ.

मी पावसाळ्यात गेले तिथे. म्हणूनच बहुधा - त्या खिडकीचं, त्या रुळांचं, त्या रानाचं आणि पावसाचं एक अनाम नातं रुजून राहिलेलं माझ्याआत. आतल्या एसीची पर्वा न करता बिनदिक्कत खिडकी उघडून पाऊस अंगावर घेतला, तेव्हाच जुळत गेली तार कुठेतरी. मग पाऊस ओसरून गवताचा रंग मालवत गेला, तरीही आमची ओळख राहिलीच. मागच्या बाजूच्या अव्याहत धडधडणार्‍या आकर्षक महारस्त्याकडे पाठ फिरवून माझं इमान रानाशीच राहिलं.

पण हे जाणवलं मात्र खूप उशिरा.

***

तेव्हा कुणाशी नीटशी ओळखही नसलेली. समोर तेवणारा कॉम्प्युटर आणि शेजारची खिडकी. इतकंच असत असे जग आठ तासांपुरतं. कितींदा तरी नकळत नजर खिडकीतून बाहेर लागून राही. कोसळत्या पावसाचा जाड धुकट पडदा, आतली बर्फगार यांत्रिक थंडी आणि बर्‍याचदा भिजून ओलेगच्च झालेले निथळणारे कपडे. तरी पावसाआडून गप्प-गंभीर रान खुणावत राही. सगळे अपमान-उपेक्षा-एकटेपणा त्याच्याकडे पाहत असताना मृदावून जात. त्या तिथून पाहताना लोकल ट्रेनही कसली तत्त्वचिंतक स्वभावाची वाटे... मला दिसे ती शहराकडे पाठ फिरवून निघालेली ट्रेन. गर्दीच्या वेळाही नसत. कुणी एखादा वारा पिऊ पाहणारा दारात लटकणारा कलंदर आणि रिकामी धडधडणारी ट्रेन. तिच्याकडे पाहताना अलिप्त शांतसे वाटत जाई. ते गप्प रान आणि तिथून जाणारी ती ट्रेन. त्या रानापाशी आसरा घेण्याची आणि ट्रेनची वाट पाहण्याची सवय कधी लागली कळलंच नाही.

आजूबाजूच्या माणसांना तर पुठ्ठ्याचे कट-आउट्सच मानत असे मी त्या काळात.

रान तेवढं मनात नकळत मूळ धरून राहिलेलं.

***

आमच्यात अंतर कधी पडत गेलं ते आता नीटसं आठवत नाही. खरे तर त्या काळातले रानाचे तपशीलच फारसे आठवत नाहीत. तेव्हा माणसं असायला लागली होती आजूबाजूला.

माझं लक्ष नसतानाच कधीतरी पाऊस ओसरत गेला... रानाचा रंग बदलत गेला. तिथली गंभीर हिरवाई वितळून उन्हाळत गेलं रान हळूहळू. त्याचा तो ओला-पोपटी वास एक दिवस नसलेलाच. त्याचं माणूसघाणेपण संपल्यासारखं. कुणी कुणी चक्क चार-दोन गुरं चारायला आणलेली रानात. पातळ मखमली पंखांची सोनपिवळी फुलपाखरंही चक्क. टायर पिटाळत त्याच्यामागे धावणारी चार कारटी आणि त्यांना उंडारायला एका पायवाटेपुरती जागा करून देणारं रान. हसर्‍या तोंडावळ्याचं. गुरं-पाखरं-पोरं-फुलपाखरं खेळवणारं. माणसाळलेलं.

त्याच्या त्या बदललेल्या चेहर्‍याची दखल जेमतेमच घेण्याइतपत फुरसत होती असावी मला. काम, माणसं आणि मैत्र्याही रुजत गेलेल्या. त्या काळात रानाशी केलेली बेईमानी आणि महारस्त्याकाठचा सज्जाच आठवतो. वाहत्या रस्त्यावरचे फर्र फर्र आवाज - त्या आवाजांना पचवून उरणारी निखालस शांतता - भणाण वारा आणि उडणारी ओढणी - गप्पांच्या साथीनं रिचवलेले असंख्य बेचव चहाचे कप. मोकाट गप्पांचे दिवस.

मानवी नेपथ्यानं जिवंत नटासाठी काही काळ निर्जीव होऊन उरावं तसं उरलं होतं तेव्हा रान. समंजस मित्रासारखं. काही न मागता अबोल साथ पुरवणारं. पण बिनबोलता नकळत बदलत जाणारं.

***

त्याच्या बदलण्याची खरी चरा उमटवणारी दखल घेतली ती तिथल्या मोकाट गवताला एके दिवशी आग लागल्यावर. रान चुपचाप बिनविरोध माघार घेत गेलेलं. आणि मोकळं होत जाणारं माळरान.

धस्स झालं होतं. आणि आपणच आपल्याशी केलेल्या बेईमानीची कडू जाळती जाणीवही.

तोवर वेळ निघून गेली होती पण. हळूहळू रान मागेच सरलं निमूट.

मग काही माणसांचे जथ्थे. काही पालं. काही फरफरणारर्‍या चुली. काही झोळ्यांचे पाळणे. अजून काही माणसं. काही ट्रक. काही घमेली आणि फावडी.

मग थेट वीटभट्ट्याच.

***

आता उरल्यासुरल्या रानावर पाऊस कोसळत असेल. रान पुन्हा एकदा असेल गप्प-गंभीर-उदास. इथेही पाऊसच...

मला आठवताहेत त्यानं दिलेले काजवे. काही चुकार फुलपाखरं. एक लखलखतं दुहेरी गोफाचं इंद्रधनुष्य.
आणि दु:खासारखी सखोल घनगंभीर साथ.

एक आवर्तन पुरं झालेलं आता. माझंही...

रानाला काय आठवत असेल? आता खिडकीत उभं राहून रानाला साथ कोण पुरवत असेल?

Wednesday, 16 April 2008

जोवर फुलांच्या बागा फुलताहेत...

आजच्या संध्याकाळीला भेसूर चेहरा नाही.

नाही. कसलाच तात्पुरता मुखवटाही नाही.
वेळ भरत राहण्याचा, स्वतःपासून पळत राहण्याचा शाप नाही.
दिवस पुरता अर्धमेला झाल्यावरच घराकडे परतण्याचा धाक नाही.

नाही. ही सवयही नाही.

अजुनी संध्याकाळ जिवंत असण्याची संपली नाही माझ्याकरता. म्हणूनच आजच्या संध्याकाळीचं अप्रूप.

सवय? माणसाला कसलीही सवय होते.
घेट्टोमध्ये मरण उद्यावर ढकलत राहण्याची.
मृत नात्यांमध्ये पेंढा भरत राहण्याची.
मरेपर्यंत जगत राहण्याची.

ती सवय. ही सवय नव्हे.

अजून तरी संध्याकाळ म्हणजे अनामिकानं भयभीत होऊन देवाच्या दगडापाशी शरण जाण्याची वेळ झाली नाही माझ्याकरता. म्हणूनच आजच्या संध्याकाळीच अप्रूप.

तश्या संध्याकाळी होत्याच जिवंत माझ्याआत. असल्या-नसल्या सगळ्यासकट अंधारात उडी मारताना. रसरसून पेटून जगताना. वैराण उद्ध्वस्त होत जाताना. गुलाबी फुलांच्या नसतील. धगधगत्या केशरी जाळाच्या असतील. पण जिवंत होत्या. म्हणून तर दर दिवशी त्यांना तोंड देताना थकून जायला होई. वाटे, यातून कधी सुटका होणार की नाही? किती काळ हे असं केसर-जाळाचं आयुष्य? कधीतरी ताकद संपेल. कधीतरी थकून, भिऊन आपण कासवासारखे मिटून घेऊ स्वतःला. एखाद्या संसारी स्त्रीसारखी संध्याकाळीच्या थडग्यावर दिवेलागणीचा दिवा लावून स्वतःची सुटका करून घ्यायला शिकू. कातरवेळ मरून जाईल... निबर होऊ आपण...

तशी आजची संध्याकाळही संपूर्ण जिवंत. पण तिचा चेहरा भेसूर नाही.

माझ्यातली सगळी दमणूक शोषून घेत,
कलत्या उन्हाची जादू पुन्हा बहाल करत,
त्या मऊ प्रकाशाला कोवळे उत्कट सूर पुरवत.
जिवंत पावलांनी, उष्ण-सुखद श्वासांनी,
अंगणात उतरलेली संध्याकाळ.

अपुरेपणाचं भय न दाखवता त्यातल्या जिवंतपणाचं आश्वासन देणारी संध्याकाळ.

अशा निरामय वेळेसाठी कृतज्ञ तरी कुणाचं असायचं असतं?

कदाचित अशा वेळेसाठीच शब्द खोदून गेलेल्या त्या कवीचं.

जोवर फुलांच्या बागा फुलताहेत,
पहाडामागे वारा अडत नाही,
शब्दांपोटी सूर्योदयासारखा अर्थ आहे,
फळे नित्यनेमाने पिकत आहेत,
एखाद्याची महायात्रा पाहून एखादा सहजच नमस्कार करतो आहे,
तोवर आम्हांला एकमेकांशी अबोला धरण्याचा अधिकार नाही...

...या आयुष्यात खोल बुडी मारून आलेला एखादा,
सर्वांना पोटाशी धरणारा कुणीतरी,
आणि ते पोटाशी धरले गेलेले सगळे -
दोघांनाही एकमेकांचाच आधार आहे...

Thursday, 10 April 2008

क्यूँ नये नये से दर्द कि फ़िराक मे तलाश मे...

क्युबिकलमधे हातपाय झाडून त्याला 'एरोबिक्स' म्हणायची सवय लावून घेऊन तसे बरेच दिवस झाले.
ते करताना चेहरापण निर्विकार ठेवता येतो आता.
भिवया उंचावल्या जात नाहीत आणि फिस्सकन हसायला येणार नाही याचीपण ग्यारण्टी देता येते.
जेवायला जाताना अडीच सेंटीमीटरचं स्माइल, 'बाय' म्हणताना दीड सेंटीमीटर पुरे.
येताजाता लोकांना 'हाय' न करता 'ब्लिंक' केलं तरी चालतं.
आपण बरं, आपलं काम बरं.
एन्जॉय माडी...

असलं स्वतःचंच कौतुक करत करत परवा 'जेन फोंडा'गिरी पार पाडली.

आणि आपलं नाक दीड फूट उंचावर ठेवून अलिप्तपणे माणसांतून वाट काढत चालायला शिकलो आपण, अशी शाबासकी स्वतःला देण्याच्या बेसावध क्षणीच एरोबिक्स-बाईनं चांगलं साडेपाच सेंटीमीटरचं हास्य माझ्या दिशेनं फेकलं.

काही कळायच्या आत मी माझ्याच खांद्यावरून मागे पाहिलं.

तिथे कुणीसुद्धा नाही, हे कळल्यावर मात्र मी दचकले.

म्हणजे... मला?
का बाई?
मी काय केलंय?
माफ कर...

असे विचार डोक्यात येतात न येतात तोच तिनं मोर्चा माझ्याकडे वळवला. मी कोण-कुठची, मी कित्ती मनापासून व्यायाम करते (हो? असेल बाई..), माझं स्माईल किती गोड आहे (...) वगैरे वगैरे पायर्‍या यथासांग पार पडल्या आणि मग जवळ जवळ रोज बाईंसोबत कॉफी घेणं आलंच.

कॉफी. थोड्या कोरड्या गप्पा. थोडं हसणं. ओळख. मैत्री...?

शिट्...

नाही नाही म्हणताना किती लोकांशी ओळखी झाल्या अशा.

'ठाणे. प्रमोद महाजन का भाई रहता था वहॉं. पता है?' या माझ्या प्रश्नाला 'मुंबई-ठाने. भारत की पहली लोकल ट्रेन. सन अठ्ठारासो तिरपन,' असं उत्तर देऊन माझी विकेट घेणारा एक बिहारी.

'भुस्कुटे म्हणजे....' असं विचारत हेतुपूर्वक थांबून, मी काहीच बोलत नाही म्हटल्यावर नाईलाजानं कावरंबावरं हसून, पुढे ओळख करून घेणारी एक मराठी मुलगी. अर्थात - महाराष्ट्राचा कोस्टल एलिमेण्ट!

'क्या? अस्सी हजार? तेरे पापा देंगे इतना डिपॉझिट? चल, मैं बात करवाती हूं सस्तेमें...' असं झापणारी एक दिल्लीकर पोरगी.

दुसर्‍याच रात्री कॅबमधून परतताना अंमळ जास्तच वेळ खिडकीतून चंद्र पाहिला, तर 'होमसिक झालीयेस?' असं मराठीतून विचारून मला दचकवणारा एक मराठी कलीग.

या सगळ्यांना निकरानं टाळता टाळता माझ्या जुन्या ऑफीसमधल्या मित्रांशी किती गप्पा मारल्या मी मनातल्या मनात.

माझे सगळे नखरे- सगळी नौटंकी किती सहज चालवून घ्यायचात तुम्ही.
इथे जेवता जेवता तेव्हा खास माझ्यासाठी आणलेल्या खरड्याची चव आठवते आणि जेवण कडू होतं.
आता इथल्या रिकाम्या संध्याकाळच्या गर्भार वेळी बांग ऐकताना त्या सगळ्या जिवंत संध्याकाळींची तलवार टेकलेली राहते गळ्यापाशी.
संध्याकाळ. तिला तरी कशाला बदनाम करावं फक्त?
आठवणींना काय प्रहर असतात?

दोन क्युबिकल्सच्या मधल्या जागेत मला सूर्यनमस्कार घालून दाखवणारा आणि 'बघू नका फक्त. करा. करा,' हे वर ऐकवणारा माझा बॉस.

प्रेझेण्टेशनच्या वेळी माझ्या चेहर्‍यावरचं टेन्शन वाचून एका मित्रानं केलेला मेसेज - 'टेक अ डीप ब्रेथ ऍण्ड से लाउडली - भोसड्यात गेली कंपनी...'

एका आत्यंतिक किचकट प्रॉब्लेमवर काम करावं लागू नये म्हणून माझ्याशी लपाछपी कम् पकडापकडी खेळणारे दोन वेडसर मित्र.

'का कंटाळलीयेस इतकी? चल, आइसक्रीम खाऊया?' असं विचारून मला ऑलमोस्ट रडायला लावणारा एक मित्र.

मला साडी नेसलेली पाहिल्यावर हसून गडबडा लोळण्याची ऍक्टिंग करणारा एक मित्र.

शेवटच्या दिवशी मला एकटीला जराही वेळ न देता अखंड बडबड करणारा, जाताना मला घट्ट मिठी मारणारा एक मित्र.

माझं क्युबिकल.
माझा पीसी.
माझी खिडकी.
खाडीचा खारा वारा.
लांबवरचं जिवंत-निवांत शहर.
तिथवर नेणारे ते फिलॉसॉफिकल रूळ...

उफ्फ्...

आता मात्र नाही.
मी मुद्दामहून तुलना करीन दुष्टपणानं यांची त्यांच्याशी.
मुद्दामहून कुचकटपणानं वागीन.
तुसडेपणा करीन.

पण आता नाही. परत नाही.

कष्टानं उभी केलीय सगळी तटबंदी. आता कुणाला इतक्या सहज सुरुंग नाही लावू देणार.

मग कितीही सेंटीमीटर हसा.
पण लांब असा. सुरक्षित अंतर राखून असा...

Friday, 4 April 2008

वेळ

शब्द म्हणजे निव्वळ चिखल असं वाटण्याची वेळ येतेच,
आजची वेळ त्यातली.

जगातले यच्चयावत हिंदी सिनेमे,
सगळीच्या सगळी आयन रॅण्ड,
पाऊस, संध्याकाळ, भण्ण दुपार.
ही सारी आपल्या रक्तातली निव्वळ बेअक्कल,
असंही वाटण्याची वेळ येतेच.
शब्द म्हणजे निव्वळ चिखल हे कळण्याची वेळ येतेच.

ही विषकन्येसारखी आकर्षक जीवघेणी वेळ.
तिला स्पर्श करण्यासाठीही शब्दांचंच शरीर?
एखाद्या वखवखलेल्या ब्रह्मचारी बैराग्याचं प्राक्तन...
हे देहाला शरण जाण्यातलं वैफल्य?
की शरीराच्या सगळ्या सामर्थ्यांचे उत्सव?

उत्तरं फेकून मारता येतात,
तरी प्रश्न मरत नाहीत.
रस्ते चुकवता येतात,
देणी मात्र चुकत नाहीत...
ही समजूत रक्तात रुजून येण्याची वेळ कधी ना कधी प्रत्येकावर येतेच.
आजची वेळ त्यातली.

शब्द म्हणजे निव्वळ चिखल हे कळण्याची वेळ येतेच.
आजची वेळ त्यातली.

Sunday, 30 March 2008

नाटक

सगळं तसं वाह्यात संतापजनकच.

तुपकट लग्नसमारंभी उत्साह. नाटकाच्या वेळाशी अजिबात देणंघेणं नसल्यासारखी निवांत सरबराई. खाणं-पिणं, साड्यांचे लफ्फेदार पदर, गजरे-अत्तरं आणि भेटीगाठी. आता आलोच आहोत तर बघून टाकू नाटकपण, असा एकंदर नूर आणि आव मात्र संस्कृतीच्या जपणुकीची धुरा वाहायची असल्याचा. साधे मोबाइल्स सायलेण्ट मोडवर टाकण्याचं सौजन्य नाही. मग 'नाटकानंतर भोजनाची विनामूल्य व्यवस्था आहे', 'मंडळाचे सदस्य श्री. अमुक अमुक यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं' आणि 'आपल्यासोबत राहुल द्रविडचे आई-वडीलही नाटकाचा आस्वाद घ्यायला आलेले आहेत...' हे सगळं नाटकाच्या अनाउन्समेण्टसोबत हातासरशी उरकून घेणं आलंच.

अशा ठिकाणी हे इतपत चालायचंच, असं हजार वेळा स्वतःशी घोकूनही माझा चरफडाट थांबत नव्हता. त्यात पडदा उघडला, तरी चार-दोन चालूच राहिलेल्या दिव्यांची आणि नि:संकोच उघडमीट करणार्‍या दाराची भर.

पडदा उघडल्यावरही ही चिडचिड निवळावी असं काही घडेना. बोट ठेवायला तशी जागा नव्हती. चोख पल्लेदार आवाजातले संवाद. सहज वावर. विषयाला साजेसं नीटनेटकं नेपथ्य. आता प्रेक्षागृहात तशी शांतताही. पण कशात काही जीव म्हणून नव्हता. सगळं लक्ष एकवटून त्यात जीव रमवण्याचा प्रयत्न करूनही काही साधेना. हे सगळं कमी झालं म्हणून मधेच एकदा लाइट गेले. एकदा नटाची मिशी सुटली आणि सरळ माफी मागून तो ती लावायला आत निघून गेला.

मी आशा जवळपास सोडून दिलेली.

त्या प्रयोगाबद्दल खरं तर पुष्कळ वाचलं-ऐकलं होतं. त्याच्या विषयाचा वेगळेपणा. आशयाची ताकद. सापेक्षतावाद आणि जागतिक शांततेसारखे ऑलमोस्ट किचकट आणि गंभीर विषय असूनही एकाच पात्रानं ते पेलण्यातला करिष्मा.

पण सगळं समोर मांडलेलं असूनही कलेवरासारखं निष्प्राण. सोन्यासारखी रविवार सकाळ, ट्रॅफिकमध्ये तपःसाधना करून काढलेला दीड तास, न केलेला नाश्ता आणि काहीही कारणाविना डोळ्यांदेखत खचत गेलेल्या अपेक्षा. पाट मांडून रडावं की कसं, असं वाटायला लागलेलं. इतकी निराशाजनक परिस्थिती बदलू शकते असं मला कुणी म्हणालं असतं, तर मी त्याला सरळ आनंद नाडकर्णींकडे शुभार्थी म्हणून काम करायला रवाना केलं असतं.

नेमकं काय बदललं विचाराल, तर ते नाही सांगता येणार. डोक्यात जाणार्‍या मागच्या बाईच्या कुजबुजीपासून पंख्याच्या कुईकुईपर्यंत सगळं तसंच होतं. पण एकदम हवेनं कात टाकली जणू. नटाचा आवाज नेम धरून मारलेल्या एखाद्या भाल्यासारखा आपला वेध घेणारा. त्याची तगमग त्याच्या बोटांच्या अस्वस्थ हालचालींमधून, त्याच्या ओठांच्या सूक्ष्म कंपामधून, त्याच्या डोळ्यांत तरळलेल्या पाण्यातून एखाद्या एक्स्ट्रीम क्लोज् अपसारखी अंगावर येणारी. त्याच्यावर खिळलेले डोळे इकडेतिकडे जाईनात. त्याच्या स्वरातल्या चढ-उतारासोबत श्वास खालीवर व्हायला लागलेला आपलाही.

आसमंत जणू कसल्याश्या अनामिक ताकदीनं भारलेला. नटाचं शरीर-त्याचा चेहरा-त्याचा आवाज. बस. इतकंच उरलेलं सगळ्या जिवंत जगात. सगळ्या नजरा त्या बिंदूशी कसल्याश्या गूढ ताकदीनं खेचलेल्या. ताणलेल्या. त्याच्या एका इशार्‍यावर जणू हे बांधलेले-ताणलेले नाजूक बंध तुटतील, अशा आवेगानं विस्फारलेल्या.

नट?

तो या खेळातलं बाहुलं असेल निव्वळ?

एखाद्या मांत्रिकानं प्रचंड ताकदीनं विश्वातलं अनामिक काही एखाद्या वर्तुळात बांधावं आणि त्या ताकदीचा ताण त्याच्या रंध्रारंध्रात जाणवावा - समोरची ताकद कधीही स्वैर उधळेल आणि उद्ध्वस्त होईल सगळं. कधीही काहीही होऊ शकतं आहे - हा ताण त्याच्या नसानसांतला. आणि तरीही त्याचा तिच्यावरचा ताबा सुटत नाही. तिच्यावर जणू स्वार झालेला तो. तिला हवी तशी नाचवतो आहे आपल्या तालावर. आपल्या शरीरातल्या कणान् कणाच्या ताकदीवर.

भारलं आहे या झटापटीनं आसमंतातल्या सगळ्या चेतन-अचेतनाला...

तो या अनामिक ताकदीला लीलया खेळवतो.

हसवतो. रडवतो. जीव मुठीत धरायला लावतो. सुटकेचा नि:श्वास सोडायला लावतो...

मंतरलेले आपण जागे होतो, तेव्हा पडदा पडणारा. नि:शब्द शांतता. आणि रक्तातली प्रचंड दमणूक.

प्रेक्षागृहातली ही जादू ओसरून लोक भानावर आलेले. 'हे काय घडून गेलं' या आश्चर्यानं बावचळलेले. खुळचट हसणारे. हळूहळू हालचाल करून आपल्याच हातापायांतली ताकद आजमावणारे. पांगणारे.

नट?

चुपचाप मिशी उतरवत होता. रंग पुसत होता. फुललेला श्वास आवरत होता.

म्हटलं नव्हतं? सगळं तसं वाह्यात संतापजनकच.

Thursday, 13 March 2008

आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं?

डोक्याच्या तळाशी खळबळणारे काही प्रश्न आणि नुकतीच घडलेली काही निमित्तं. म्हणून हे इथं मांडते आहे. ब्लॉग लिहिण्याचा - खरं तर लिहिण्याचाच - खटाटोप करणार्‍या सगळ्यांनाच उद्देशून आहेत हे प्रश्न. काही अंदाज. काही बिचकते निष्कर्ष. काही निरं कुतुहल.

सहमत व्हा, विरोध नोंदवा, वेगळी मतं मांडा.... हे फक्त विरजणापुरतं -

आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं हा प्रश्न कधी पडलाय तुम्हांला? लिहिणं आणि आपण यांच्यातले हे विचित्र संबंध नक्की काय आहेत, याचा छडा लावण्याचा फॅसिनेटिंग खेळ कधी खेळावासा वाटलाय?

सहसा असं दिसतं, की प्रचंड उंची गाठणार्‍या कलाकारांना निदान सुरुवातीच्या काळात तरी त्यांच्या माध्यमाखेरीज कशातच फारशी गती नसते. म्हणजे, जर कुठे 'अहं' गोंजारला जात असेल, तर तो तिथे. बाकी सगळीकडे नुसतंच हाड्-तुड् करून घेणं. हरणं. माती खाणं. मग आपोआपच माणूस आपल्या माध्यमाचा आसरा घेतो. तिथे अधिकाधिक रमत जातो. अभिव्यक्तीसाठी चॅनेल सापडत नाही, म्हणून ते माध्यमाकडे ओढले जात असतील, की माध्यमावर इतकी पकड आल्यावर काहीतरी ओकून टाकावं असं वाटत असेल? की दोन्हीही? की अजून काहीतरी निराळंच?

आणि इतक्या सरावाचं, सवयीचं, जवळ जवळ गुलामाइतकं पाळीव-इमानदार माध्यमही जेव्हा चॅनेल म्हणून अपयशी-अपुरं ठरत असेल तेव्हा?

तेव्हा स्वतःवरचा विश्वास उडावा इतकी टोकाची निराशा-चीड-हतबलता येत असेल? की त्याही परिस्थितीत कुठे तगून राहता येईल तर ते तिथेच, असं वाटून माध्यमाच्या कोशात दडी मारून राहावंसं वाटत असेल? अजून निराशा.. अजून चीड... अजून तगमग. आणि तरीही काय होतं आहे स्वतःला ते नाहीच धड गवसत. आत काय तडफडतं आहे, ते नाहीच बाहेर येत.

तेव्हा?

माध्यम आणि त्या माध्यमावर इतक्या अपरिहार्यपणे - एखाद्या अपंग मुलासारखे - अवलंबून असणारे आपण या दोघांचाही तीव्र स्फोटक संताप येत असेल? आणि या ठसठसणार्‍या दुखर्‍या ठणक्यातून उसळून येत असेल काही?

की दर वेळी हे इतकं इण्टेन्स, इतकं झांजावणारं काही नसतंच?कधी नुसताच इगो सुखावणं? माध्यमावरची स्वतःची हुकूमत अनुभवणं? 'सराईतपणा' एन्जॉय करणं?

नक्की काय? की सगळंच?

लिहिणं म्हणजे तुमच्यासाठी नक्की काय?

माझा खो संवेदला.

***


हा खेळ खेळायला चढत्या क्रमानं मजा येतच गेली, येते आहे. खरं तर खेळ अजून संपला नाही. पण आता साखळी लांबत चाललीय. अजून बरीच मंडळी लिहितील. तोवर साखळी एका ठिकाणी सापडावी, म्हणून थोडा खटाटोप -
"आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं?" - संवेद
ठिपक्यांची न बनलेली रेषा... - ट्युलिप
मैंने गीतों को रच कर के भी देख लिया... - राज
I think, therefore... - सेन मॅन
फिर वही रात है... - मॉन्स्यूर के
माझिया मना जरा सांग ना... - विद्या
खो-खो, चिमणी, मंत्रा! - जास्वंदी
मी आणि पिंपळपान - संवादिनी
मी का लिहिते? - यशोधरा
जेव्हां माझ्या ego च्या हातून माझ्या id चं मानगूट सुटतं तेव्हां. - सर्किट

Wednesday, 12 March 2008

ऋतू

इथे सध्या कुठला ऋतू आहे कुणास ठाऊक. पण हवा अगदी नितळ सुरेख आहे. दुपारी अडीचच्या सुमारास घरी परततानाही त्या स्वच्छ सोनेरी हवेची आभा सगळीभर पसरून असते. रस्त्यावर डेरेदार झाडांची कमतरता नाहीच. पण त्यांच्या हिरवेपणात तजेला तरी किती! उन्हानं नुसती झगमगत असतात. त्यांच्या हिरवेपणात ऊन मिसळतं आणि सगळ्याला एक झळझळता अनोखा रंग येतो. अशा कित्तीतरी रेखीव दुपारी काचबंद करून ठेवून द्याव्यात असं वेड्यासारखं वाटून जातं मग. हातातलं पुस्तक, डोक्यातले विचार, बाजूचे लोक... असं सगळं बयाजवार असूनही ती उष्ण सुखद दुपार चढत जाते मला...

दुपारी झाडं मोठी देखणी दिसतात खरी. पण फुलं? ती मात्र उतरत्या दुपारीच भेटावीत. ऐन दुपारी फुलांनी बहरलेल्या एखाद्या वेड्या झाडाला पाहिलं, की त्याच्या सौंदर्याला दाद जाण्याऐवजी त्याची वेड्यासारखी काळजीच वाटते. त्या नाजूक नखर्‍याला सोसवेल का हे लखलखीत धारदार ऊन, असं वाटून डोळे भरून येतात...

याउलट कलत्या दुपारी घराजवळच्या वळणावर ही वेडी फुललेली झाडं नेहमी भेटतात. आणि दर वेळी त्यांना बघून तितकंच मनापासून खूश व्हायला होतं. पानं म्हणशील, तर नाहीतच. नुसतेच गुलाबी पाकळयांचे घोसच्या घोस. रंगही जर्रा म्हणून भडकपणाकडे झुकणारा नव्हे. फिका मऊशार राजस गुलाबी. तुझ्या लाडक्या गावठी गुलाबाची आठवण करून देणारा. ते असं फुलांनी मातलेलं झाड पाहताना आपल्यालाही अगदी वेडं व्हायला होतं.
मनात आपला खुळा गुलमोहोर उभा राहतोच... पण वाटतं, गुलमोहोर एखाद्या भटक्या कलंदर कवीसारखा. त्याच्या केशरी उधळणीत जे बंडखोर उधाण आहे, त्याची सर कशालाच यायची नाही. त्याचे ते लालबुंद तुरे कसे आपल्या नजरेलाही क्षणमात्र का होईना - बंडखोरीची वेडसर स्वप्नं दाखवून जातात. त्या उधाणाला पाहूनच संदीपनं लिहिलं असेल का, 'अस्वस्थ फुलांचे घोस...' असं वाटून जातं...
तसं या गुलाबी नखर्‍याचं नाही. विलक्षण शालीन, शांत-मर्यादशील सौंदर्य नजरही वर न उचलता एखाद्या रेशमी अवगुंठनात उभं असावं तसं याचं रूप. खाली गुलाबी पाकळ्यांचा अक्षरश: सडा. कुणी आपल्याच नादात त्या पाकळ्या तुडवत जातं, तेव्हा त्यातल्या गर्भित श्रीमंतीच्या जाणिवेनं खुळावून जायला होतं...

तसेच ते पिवळ्या फुलांचे घोस.
तशी सोनमोहोराची झाडं आपल्याकडेही असतातच. त्यांच्या हळदी पिवळ्या फुलांचा दिमाख वेगळाच. आधीच उताटल्यासारखी फुलतात ती, आणि त्यात त्यांचा मंद उत्तेजक गंध... पिवळाच असून कॅशिया त्या मानानं किती शालीन. त्याचा सौम्य पिवळसर रंग आणि वार्‍यावर झुलणारे आत्ममग्न घोस.. किती अनाग्रही स्वभाव त्या रंगाचा.
इथल्या पिवळ्या फुलांची जातकुळी या दोघांच्या बरोबर मधली. पातळ नाजूक पाकळ्या आणि तजेलदार सोनपिवळा रंग. अंगातली असेल नसेल तेवढी सगळी ताकद खर्चून मस्ती करणार्‍या वांड पोरासारखी फुललेली फुलंच फुलं. कित्ती बेगुमान स्वभावाची झाली, तरी दिवसभर उन्हाच्या नजरेला बेदरकारपणे नजर देऊन रात्रीला दमत असतील का ही, असं वाटून जातंच.

विलायती शिरिषाचं तसं अप्रूप नव्हेच. एरवी रस्ता पंखाखाली घेतो खरा तो. पण संध्याकाळी त्याच्या मिटलेल्या पानांखालून जाताना उगीच रडायला येईलसं वाटत राहतं. कागदीची गुलबाक्षी रंगाची भरजरी फुलंही आपल्याला तशी सवयीचीच.

माझ्या मुंबईकर नजरेला राहून राहून कौतुकाची वाटतात ती जांभळी किनखापी फुलं. उंचच उंच झाड. फांद्या अगदी संन्यस्त पर्णहीन. आणि त्यावर नाजूक व्हायोलेट रंगाच्या फुलांची पखरण. खाली पाकळ्यांची जांभुळलेली धूळ... त्या निळ्या-जांभळ्या रंगावर विश्वासच बसत नाही एकेकदा. व्यासांच्या त्या निळ्या कमळांचा रंगही असला तर असाच असेल, असं उगाच वाटून जातं...

ऋतू बदलल्यावर काय होईल या सगळ्याचं? बदलत्या ऋतूत निराळी फुलं असतील?

कदाचित फुलं नसतीलही...

खरंच, ऋतू पालटतो, तेव्हा काय होतं?

या उत्सुकतेपोटी तरी जीव रुजावा इथे. कोणास ठाऊक, ऋतू परतेलही...

Sunday, 24 February 2008

जगता जगता...

गर्भाशयातल्या अंधाराची स्पष्ट आठवण नाही उरली जगता जगता.

काही पुसट हृदयखुणा फक्त.
काही अनोख्या शांततेचे निरव प्रदेश.
सगळी दु:खं विसरून विसावावं अशा काही अंधार्‍या ऊबदार जागा.
कसल्याही हक्कांविना पोटाशी घेणारे काही कोवळ्या सावलीचे दगडी पार..

अशा प्रदेशांचे पत्ते नसतात कधीच. चालता चालता अवचित सापडून जाणार्‍या या भाग्यखुणा. पावलांना पुन्हा तहान लागलीच, तरी गवसतीलच याची काहीच शाश्वती न देणार्‍या. गूढ. आकर्षक. आश्वासक...

थेटराच्या अंधारात क्वचित सापडून जातो त्यांचा माग. काळोख उतरतो हलक्या मांजर-पावलांनी. पाहता पाहता क्षुद्र कुजबुजी विरत जातात. उत्सुक गाढ शांतता जन्म घेते आसमंतात. या शांततेला मरणाचा गर्द-भीषण वास नाही. जन्माच्या आतुरतेचा एक कोवळा गंध केवळ. उण्यापुर्‍या काही सेकंदांचं आयुष्य या शांततेचं. भारून टाकणार्‍या दमदार आवाजानं मेंदूचा कब्जा घेण्याआधीचं. या अल्पायुष्यामुळेच असेल तिचं गूढ सौंदर्य कदाचित.. आणि पोटाशी धरणारी जिवंत ऊबही.

कधी गाण्याच्या कोवळ्या सुरात सापडतात अशा प्रदेशांच्या वाटा. गाणी एकेकटी येतात थोडीच? गर्द रानात नेणार्‍या आठवणींच्या गूढ वाटांचं जाळं घेऊन येतात गाणी त्यांच्यासोबत. त्या वाटांवर पाऊल ठेवणं-न ठेवणं हातातलं नव्हेच. केवळ पूर्वसंचिताचं खुणावणारं आव्हान. शब्द, सूर आणि मधले अर्थानं भारलेले मौनाचे तुकडे. एकाच वेळी निवांत आणि कासावीसही करण्याची ताकद असणारे. त्यांच्या आव्हानाला सामोरं जायचं ताठ मानेनं. दोन हात करायचे असेल नसेल ती सगळी ताकद एकवटून आणि मग थकून विसावायचं तिथेच... कुणीच हटकायला नाही येणार तिथं, याचं आश्वासन उशाला घेऊन.

तशा कविता जीवघेण्याच. विषारी संवेदनांची शस्त्रं पोटात बाळगणार्‍या. विषकन्यांसारख्याच विश्वासघातकी आणि आकर्षकही. पण त्यांच्यापाशीही कधी कधी मिळून जातो हा मऊ अंधार. एकेका शब्दाचं बोट धरून हलके हलके उतरत जाव्यात एखाद्या खोल अंधार्‍या विहिरीच्या पायर्‍या, तशा अर्थाच्या तळाशी घेऊन जातात कविता कधी कधी. एखाददा पायाखालचा दगड निसटतोही, नाही असं नाही. मग कपाळमोक्ष चुकत नाही. पण हा धोका पत्करून त्या अंधारात पाऊल ठेवावं अशी लालबुंद रसरशीत स्वप्नं असतात कवितांच्या पोटी दडलेली.. क्वचित कधी बोटांना त्याचा निसटता स्पर्श होतो आणि जन्माला पुरेल अशी धगधगती ऊर्जा पाहता पाहता वस्तीला येते आपल्याआत...

एखाद्या दुर्मीळ भाग्यक्षणी माणसंही घेऊन येतात हे असे प्रदेश त्यांच्या पावलांसोबत. पुरेश्या अंतरावरून माणसं न्याहाळण्याची सुरक्षित सवय स्वतःला लावून घेतलेले आपण बिचकतो मग. काहीश्या अविश्वासानं मागे सरतो. अंग आक्रसून घेतो. पण एका जादूभरल्या क्षणी सगळी अविश्वासाची वर्तुळं विरून जातात आणि कुशीत शिरावं कुणाच्या, तसे नि:संकोचपणे नात्यात शिरतो आपण.

तश्या दुर्मीळच या गोष्टी... पण गर्भाशयाच्या पुसट आठवणी जागवणार्‍या... जगता जगता विसरून गेलेल्या त्या विश्वात परतून नेणार्‍या...

Monday, 11 February 2008

खरंच...

खरंच...
पावलांखालचे प्रदेश बदलत जातात.
सवयींचे संगही अलगद निसटून जातात.
पाहता पाहता आपल्याच स्वप्नांचे रंग बदलत जातात.

खरंच...
नात्यांमध्ये बदल होत जातात.
पण बदलांना वाढ म्हणावं, सूज म्हणावं,
की धीम्या गतीनं मृतावस्थेकडे होणारा अटळ प्रवास,
हे ठरवण्याची ताकद तर असतेच आपल्यात.

खरंच...
तू ही ताकद वापरण्याची हिंमत केली आहेस कधीतरी?
अमानुष ताकदीच्या प्रश्नांची ही भीषण लाट पेलली आहेस तू कधीतरी?
जगता जगता काय होतं इतक्या उत्कट नात्यांचं,
हा जीव शोषून घेणारा प्रश्न पडला आहे तुला एखाद्या बेशरमपणे ठणकणार्‍या संध्याकाळी?

खरंच...
अजून जाणवतात तुला माझे श्वास त्यांच्या धुंदावणार्‍या लयीसकट?
अजून जाणवतो माझा गंध तुझ्या स्वप्नांच्या अगदी निकट?
अजून चढतो माझा रसरशीत रंग तुझ्या अंगावर त्यातल्या सगळ्या सगळ्या छटांसकट?

नाही.
कसल्याच प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असावीत असा हट्ट नाही आता.
इच्छा असतील... पण त्यांच्याही मर्त्यपणाचा स्वीकार आहे आता.
सवयींचे प्रदेश आणि स्वप्नांची माती पाहता पाहता बदलत जाते आपल्याच नकळत हे कळतं आहे आता.

पण खरंच,
सगळ्या विध्वंसासकट
बदलणार्‍या रंगांसकट
जगताना स्वप्नं अपरिहार्यच -

हे शिकलो आहोत का आपण?
खरंच...

Saturday, 9 February 2008

...अफलातूनच!

आपण कुठे येऊन, कुणाबरोबर आणि नक्की काय करतोय असा प्रश्न पडून हिस्टेरिकली हसायला येणं एकूण अफलातूनच.

उदाहरणार्थ ऑफीसमध्ये एका भिकार डॉक्युमेण्टमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करून मी प्रचंड दमलेली. आत्ता चहासाठी ब्रेक घेतल्यास किंवा निवांतपणे गूगल टॉक उघडल्यास नवा मॅनेजर आपल्यावर कितपत खूश होईल हा विचार चेहर्‍यावर दिसू न देता साळसूदपणे कामात दंग.

एवढ्यात एक आंग्लाळलेली बया एक म्युझिक सिस्टिम घेऊन अवतीर्ण होते. 'इट्स टाइम टू एक्झरसाइज्' असं म्हणते आणि गर्दीनं भरलेला, मरगळलेला प्लॅटफॉर्म दूरवरची लोकल पाहून जसा एकदम सळसळतो, तसं अवघ्या ऑफीसमधे एकदम चैतन्य सळसळतं.

काही लोक उघडपणे दात काढत बाहेर पडतात.
काही लोक 'आपल्याला देणंघेणं नाय' अशा मख्ख आविर्भावात मॉनिटरमधे घुसतात.
काही लोक सूर्यफूलसदृश तत्परतेनं तिच्याकडे तोंडं वळवतात.
काही लोक शीपिशली हातातली कामं टाकून, खुर्च्या बाजूला सारून जागीच उभे राहतात.

आणि भर ऑफीसमधे दोन क्युबिकल्सच्या मधल्या जागेत ती एरोबिक्सचा वॉर्म अप् सुरू करते.

जेन फोंडा माझी आई असल्याच्या थाटात निर्विकारपणे आणि सराईतपणे एरोबिक्स करताना मला वाह्यात हसायला यायला लागतं.

आपण कुठे येऊन, कुणाबरोबर आणि नक्की काय करतोय असा प्रश्न पडणं एकंदरीत मस्तच.

उदाहरणार्थ एकाच सिग्नलला तीन प्रदक्षिणा घालूनही मला घर सापडतच नाही. पत्ता तोंडपाठ. पण जायचं कसं विचाराल तर आपली बोलती बंद. बरं, मला नाही तर नाही, रिक्षेवाल्याला तरी माहीत असावं? नपेक्षा त्यानं ते कुणाला तरी विचारावं? पण एकतर तो अभिजात मंदबुद्धी तरी असावा किंवा स्वतःच्याच शहरात कुणाला पत्ता विचारण्यानं त्याचा इगो दुखावणार असावा.

परिणामी आम्ही मारतोय आपल्या गरागर चकरा एकाच सिग्नलला.

शेवटी मी बळंच रिक्षा थांबवून त्याला त्याची दक्षिणा देऊन टाकते आणि ट्रॅफिक पोलिसाकडे मोर्चा वळवते. 'कन्नडा बरुन्दिल्ला' हे माझं कन्नडचं ज्ञान, 'व्हेअर गो?' हे पोलिसाचं इंग्लिशचं ज्ञान आणि आजूबाजूच्या तत्पर लोकांचं कामचलाऊ हिंदी यांच्या बळावर माझी वरात स्वगृही पोचते.

आणि पगार ठरवताना कोळणीला लाजवेलशी हुज्जत घालणार्‍या आणि दिवसभर होता होईल तेवढी उद्धट अडवणूक करणार्‍या एचआरवाल्या मॅनेजरचा फोन येतो - डिड यू रीच सेफली? आय वॉज वरिड् यू नो...

मी नीट सुखरूप पोचलेय. आता कॅबचा पिक अप्-ड्रॉप मिळेपर्यंत मी घरी पोचल्यावर एक मिस्ड् कॉल देत जाईन... हे त्याला पटवून देता देता मला परत अनावर हसायला यायला लागतं.

कुठे येऊन कुणासोबत काय चाललंय!

अशीच एक भयानक उदास संध्याकाळ. आपण म्हणजे एक गरीब खाणकामगार असून एकटेच जन्माला आलो आहोत व एकटेच मरणार आहोत, अशा प्रकारचे भीषण विचार डोक्यात चालू. वेळ सरकता सरकतच नसलेला. आपण असेच मरून गेलो तरी कुणाला काही कळणार नाही, असं वाटण्याच्या सुमंगल मुहूर्तावर जुन्या मित्राचा फोन येतो.

माझे बारा वाजलेले त्याला कळू नयेत म्हणून आटोकाट प्रयत्न करून मी हसरा आवाज काढण्याच्या प्रयत्नात असतानाच साहेब सेण्टी होतात. 'आता गप्पांचा अड्डा बसत नाही. सगळे एकेकटे आपापला जीव रमवत असतात. मला प्रचंड एकटं वाटतं. तिकडे एखादी नोकरी मिळेल काय..' या त्याच्या एकंदर मूडवर मी उत्तरादाखल भली मोठ्ठी उपदेशाची फैर झाडते.

एकटं असण्याची सवय करून घेतली पाहिजे..
नाही तिथे इमोशनल होऊन कसं चालेल..
सेल्फ पिटी बंद करायला कधी शिकणार..

या वाक्यावर मला इतकं हसायला का येतंय ते बिचार्‍याला कळतच नाही.

काही म्हणा, आपण कुठे येऊन, कुणाबरोबर आणि नक्की काय करतोय असा प्रश्न पडून हिस्टेरिकली हसायला येणं एकूण अफलातूनच.