Wednesday, 24 October 2018

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट


अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट
आनंद विंगकर, लोकवाङ्मय गृह प्रकाशन
या गोष्टीची कोरड्या सुरात समीक्षकी चीरफाड करायला मला लगेच जमणार नाही. घुटक्याघुटक्यात, कोरडेपणी, एका हातानं व्हॉट्सअ‍ॅप वा फेसबुक चाळत करण्याच्या, चैनीच्या वाचनाला विटून तिला हात घातला होता. तिनं पुरेपूर दान पदरात घातलं. कादंबरी पुरी होईस्तोवर ती मला बाजूला ठेवता आली नाही. रडं आवरता आलं नाही. हसू फुटायचं राहिलं नाही. रात्रभर रडून, पहाट होताना शिणून, शांत होऊन आभाळ बघावं, तसा - एकाच वेळी जड आणि हलकं, पारोसं आणि तरी डोक्यावरून आंघोळ केल्यासारखं लख्ख वाटायला लावणारा - भाव गोष्ट संपताना मला व्यापून राहिला. अशा प्रकारच्या उत्स्फूर्त भावनिक प्रतिसादाला शरमण्याची एक सर्वमान्य प्रथा आहे. पण ती बाजूला सारून मला हे बोलायचं आहे. या गोष्टीतल्या जिवंत माणसांनी, प्राण्यापक्ष्यांनी, झाडांनी आणि मातीनं मला त्यांच्याशी बांधून घेतलं, जिवाजवळचं काही उलगडून दाखवलं. माझा परकेपणा, उपरेपणा, खडूसपणा, कडवटपणा…. थोडा का होईना, विझवून टाकला. ही एक फार तालेवार आणि जिवंत गोष्ट आहे, इतकं तरी मी तत्काळ म्हणणं लागतेच.
**
यापूर्वीच्या पुस्तकाबद्दलच्या चर्चेमध्ये मी असं म्हटलं होतं, की मला ग्रामीण साहित्य वाचायचा कंटाळा येतो. खरंच येतो. त्याचा एक ठरून गेलेला साचा आहे. मान्सूनवर अवलंबून असलेली शेती. सरकारी यंत्रणांची मदत संपूर्णतः गायब. जातिव्यवस्थेसारखे, पुरुषप्रधान समाजाला पुजलेले शतकानुशतकांपासूनचे प्रश्न. त्याला जागतिकीकरणानं दिलेला एक अधिकचा वेढा. भ्रष्टाचार आणि मानवी हलकटपणाच्या नाना परी. या सगळ्यातून पिचत गेलेली एखादी व्यक्ती, एखादं कुटुंब, एखादं गाव. याच गोष्टीच्या नाना आवृत्त्या वाचनात आल्या आणि वैतागायला झालं. अफगाणी बायकांची दुःखंही खरीच असतात. पण अफगाणी बायका, इराणी निरागस मुलं, हलाखीतलं बालपण सांगणारी शोषितांची आत्मवृत्तं यांच्या साचेबद्धपणाचा वीट येतोच. तशातलंच माझं वैतागणं. पण या पुस्तकानं साचा मोडला.
फक्त कर्जबाजारी शेतकरी जोडप्यानं केलेली आत्महत्या आणि एक काळाकुट्ट दुष्ट सावकार, इतकंच नाही गोष्टीत. सरंजामी व्यवस्था अंगात भिनलेली आणि तरी माणूसपणा शाबूत असलेली माणसं आहेत. स्थलांतरित, परभाषक माणसं आहेत. आता बौद्ध झालेली महार माणसं आहेत. अपंग माणसं आहेत आणि धडकी माणसं आहेत. शहरी माणसं आहेत. सगळीच स्खलनशील आहेत. माणसात-प्राण्यात-मातीत जीव गुंतवण्याइतकी जिवंत आहेत. काही भाग काळा-करडा असेल त्यांच्यातला. तरी काही हिरवाही आहे. प्राणी आणि पक्षी आहेत. शरीर आणि शरीराच्या मागण्या असलेले. त्यापल्याडची अनाम, मुकी जाण असलेले. आणि त्यापलीकडचा निसर्ग आहे. आपसांत बांधलं जातं त्यांच्यात काही. काही तुटतं. जगण्याच्या प्रवाहात सामावून जात पुन्हा ईर्ष्येनं वाहतं होऊ पाहतं. होतंही.
निवेदक एकाच एका सुरात, एकाच एका भाषेत बोलत नाही. कधी वर्तमानपत्रातली बातमी देतो. कधी पुस्तकी प्रमाण भाषेत बोलत त्रयस्थ निरीक्षणं नोंदतो. कधी पात्रांच्या मनात शिरून क्लोजप्स टिपत राहतो. निवेदनाच्या ओघात अप्रमाण, स्थानिक शब्द वापरतो आणि चित्रदर्शी संदर्भ पुरवून त्यांचे अर्थही डोक्यात रुजवून टाकतो. कधी तो कसलाही आव न आणता गोष्ट सांगतो सरळ. कधी गोष्टीतून बाहेर येतो आणि चौथ्या भिंतीवर उभा ठाकून आपल्याशी गोष्टीच्या शेवटाबद्दल चर्चा करतो. चार भिंतींच्या स्टुडिओत चालणारं क्लोजपीय शूटिंग थांबवून कॅमेर्‍यानं आपलं कॅमेरापण ओळखून बाहेर झेपावावं आणि लाँग शॉट्स टिपावेत, तसे लाँगशॉट्स टिपतो कधी. गावकीचे. भावकीचे. त्यांना आतूनबाहेरून वेढून घेत घोळसणार्‍या निसर्ग नामक व्यवस्थेचे. कधी सदसद्विवेकी आवाज होऊन, काय होऊन हवं आहे त्याला गोष्टीत, ते सांगतो. ते न होण्याची अपरिहार्यता कळल्यावर हताश होतो. तरीही आपल्या पात्रांमधला चिवट जिवटपणा हेरतो, वापरतो, कामाला लावतो, गोष्ट घडवतो आणि तरीही गोष्टीला ताशीव-घडीवपण येऊ न देता वाहतेपण राखतो.
गोष्टीत पारंपरिक संकेत आहेत अनेक. अनिष्टाची चाहूल लागते काही घटनांतून . पिंडाला कावळे शिवतात वा शिवत नाहीत. कुत्री भेसूर रडतात गळे काढून. अवकाळी पाऊस येतो. पुरुषाचं आणि स्त्रीचं मीलन होतं वा अभद्रपणे अर्ध्यावर विझून जातं. एखाद्या काळरात्री अगम्य-अनाकलनीय शहाणपण ल्यालेले अद्भुताच्या सीमीवरचे अतिवृद्ध येऊन डोक्यावर हात फिरवून जातात. बदल घडवू पाहणारे काही उत्प्रेरक घटक असतात. प्रियकर आणि प्रेयसीची कहाणी सुफळ-संपूर्ण होणार की अधुरी राहणार अशी हुरहुर दाटते. या सगळ्या बाबी कमालीच्या प्रेडिक्टेबल असूनही – एक फार उत्कंठावर्धक, जिवंत आणि शहाणी गोष्ट घडवतात.
हे फार विलक्षण आहे.
**
शेत किंवा पीक या गोष्टींशी वृत्तपत्राखेरीज कधीही काहीही संबंध न आलेली मी एक सुखवस्तू शहरी व्यक्ती. ‘मला ग्रामीण साहित्य नाही बॉ आवडत’ असं नाक मुरडून म्हणण्याची सवलत मला आयुष्यानं दिली आहे. आजच्या भयावह विस्तारलेल्या आणि धावपळीला बांधलेल्या माझ्या जगात, माझ्या ताटात येणार्‍या अन्नाचे स्रोत असलेल्या या माणसांशी मला जोडून घेणारं दुसरं काय शिल्लक आहे?
कदाचित फक्त गोष्टच आहे.
गोष्टीची ही ताकद अभंग राहो. आपल्याला अशा गोष्टी सांगणारे अनेक आवाज चिरंतन राहोत.

21 Lessons for the 21st Century

21 Lessons for the 21st Century
- Yuval Noah Harari


हे या पुस्तकाचं परीक्षण नाही, परिचयही नाहीच. पुस्तक वाचताना-वाचून डोक्यात आलेल्या गोष्टी एका ठिकाणी नोंदवणं आहे फक्त. मुळात पुस्तकाचा विषयच इतका डेंजर असताना, आपण त्याबद्दल काय बरंवाईट बोलणार, असा एक किंचिद्गंड मला आहेच. पण हरारी म्हणतो आहे ते खरं असेल – आणि नसेल तरीही – हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. एकसिवाव्या शतकातल्या,बदलत्या पर्यावरणाच्या, अणुस्फोटांच्या उंबर्‍यावरच्या आणि अल्गोरिदम्सनी आपलं आयुष्य काबीज करण्याच्या अलीकडच्या काळात आपण नक्की काय करायचंय, हा आपल्या सगळ्यांपुढचाच प्रश्न आहे. काही जणांना असा प्रश्न आहे हे स्वीकारणंच नकोसं वाटत असेल, शक्य आहे. पण म्हणून प्रश्न नाहीसा होत नाही,सगळ्यांसाठी तर नाहीच नाही. त्यामुळे हरारीइतक्या आत्मविश्वासानं आणि अकलेनं जरी नाही, तरी त्याच्या काही शतांश टक्क्यांनी तरी या प्रश्नावर माझाही हक्क आहेच, असं स्वतःला ठणकावून सांगून मी हे ’21 अपेक्षित’ वाचायला घेतलं.

**

अशा प्रकारच्या पुस्तकांबद्दल सहसा अभ्यासकांचं मत काहीसं तुच्छतेचं असतं. अशा प्रकारची पुस्तकं म्हणजे मोठे प्रश्न सोपे करून मांडणारी पुस्तकं. पण याच पुस्तकात एके ठिकाणी लेखक स्वतःच असं म्हणतो, की (माझ्या शब्दांत) ‘विज्ञान करणं महत्त्वाचं आहेच. पण ते सगळ्या माणसांपर्यंत पोचणंही महत्त्वाचं आहे. विज्ञानकथेच्या माध्यमातून? हो, जरूर. का नाही? जबाबदार विज्ञानकथा लिहिणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण विज्ञान आपल्या आयुष्य कधी नव्हे इतकं बदलून टाकणार आहे आणि त्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहीत असायला हवं’. हे इतकं खरं आणि बरोबर आहे, की आपण अभ्यासकांच्या हस्तिदंती तुच्छतेचा मुद्दा निकाली काढू. म्हणजे विदा आणि पुरावे हवेतच. त्यावाचून कुणी काही बोलू नये, हे मान्य आहेच. (या पुस्तकाचा एक पंचमांश भाग संदर्भ देण्यात खर्ची पडतो हे इथे नोंदायला हवं.) पण ते दिल्यावरही सोप्या भाषेत काही लिहिण्याकडे कुणी तुच्छतेनं पाहत असेल, तर धन्यवाद मंडळी, तुमचा गणपती पुढे जाऊ द्या.

**

हरारीबुवा नक्की काय म्हणतात, त्याचा मला समजलेला सारांश.

माणसासमोर तीन मोठी आव्हानं आहेत. अल्गोरिदम्सच्या अचूकपणावर आणि सर्वव्यापी ताकदीवर भिस्त ठेवून आपलं जग चालवायला त्यांच्या हातात दिलं जाईल आणि आयुष्यभर रोज नव्या गोष्टी शिकण्यासाठी मानसिक-शारीरिक दृष्ट्या तयार नसलेली आपण माणसं बहुतांश निरुपयोगी-बिनमहत्त्वाची-बिनकामाची उरू हे पहिलं तंत्रज्ञानविषयक आव्हान. निरनिराळ्या इझमांच्या गोष्टी स्वतःला सांगत एकमेकांशी लढणारे आपण एखादं अणुयुद्ध करू आणि निसर्गाचं सोडा एक वेळ, पण निदान मानवजातीचा तरी अंत घडवून आणू हे दुसरं राजकीय आव्हान. आणि या दोन आव्हानांना सामोरा जायला वेळही मिळेल की नाही असा प्रश्न उपस्थित करणारं, प्रदूषणातून पर्यावरणातल्या मोठ्या बदलांना आमंत्रण देणारं आणि त्यायोगे अनेक ज्ञाताज्ञात धोक्यांच्या शक्यता पोटी घेऊन असणारं पर्यावरणविषयक आव्हान.

या तिन्ही आव्हानांचं काय करायचं हे आपल्यापैकी कुणालाच धड कळत नाहीय. मुळात आव्हानांचं स्वरूप जागतिक आहे. पण जागतिक दृष्ट्या काहीएक धोरण ठरवू शकेल अशी एकही ताकदवान संस्था आपल्याकडे आज नाही. आपण राष्ट्र नामक तुकडे आहोत. धर्म, पंथ,तत्त्वज्ञानं, वाद उर्फ इझम्स या गोष्टी किती बेगडी आणि अपुर्‍या आहेत, यावर आपलं एकमत होईलही एक वेळ. पण आज जगभर लोक ज्याच्या आसर्‍याला जाताना दिसताहेत तो बेताल राष्ट्रवादही अपुरा आहे आणि उदारमतवाद या ज्या विचारप्रणालीनं आजवर अजिंक्य राहून निरनिराळ्या शाह्या, वाद, धर्म आणि तत्त्वज्ञानांचा पराभव केला, ती उदारमतवादी भांडवलशाहीचा बुरखा ल्यालेली लोकशाहीही अपुरी आहे.

आपला आतला आवाज ओळखा आणि त्याचा कौल घेऊन काय करायचं ते ठरवा, हे मार्गदर्शक सूत्र आजवर कामी येत राहिलं आहे वेळोवेळी. पण ‘आपण’ असं आपण ज्याला संबोधतो, त्या 'आपलं' कौल देणारं मनही स्वतंत्र नाहीच मुळात, असं जर लक्ष्यात आलं, तर काय करणार?

लक्ष्यात घ्या, मन ही एक जैवरासायनिक यंत्रणा आहे. तिच्यावर आपला ताबा नाही. ताबाच काय, आपल्याला अजून तिचं अस्तित्वही धड शोधता आलेलं नाही. या जैवरासायनिक यंत्रणेवर नाना संस्कार घडले आहेत उत्क्रांतिकाळात. निरनिराळ्या आदिम भावना खोलवर रुजल्या आहेत, आत्मसंरक्षणाच्या जय्यत तयारीत राहताना. त्याखेरीज अनेक कृत्रिम संकल्पनांची पुटं चढली आहेत. आपल्याला हव्या आहेतशा वाटणार्‍या अनेक गोष्टी आपल्याला हव्या वाटायला 'हव्यात' – अशा कृत्रिम संस्काराचा राप चढला आहे मनावर.

आता अल्गोरिदम्सच्या सर्वव्यापी आव्हानासमोर उभं ठाकताना कसं ओळखणार आपण आपल्याला काय हवं आहे ते आणि काय आपल्याला हवं आहे असं आपल्याला 'भासवलं' जात आहे ते?

पोस्ट-ट्रूथचा जमानाय हा.

इथे हरारीबुवा एक क्लासिक वळसा देतात. की –

भिऊ नका गडे हो. पोस्ट-ट्रूथचा जमाना नव्हता कधी? तर कायमच होताच. कायमच राज्यकर्त्यांनी खोटेपणाचा सहारा घेतलाच आहे. त्यात नवं काही नाही.

याच्याशी लढायचं की नाही, हा तुमचा प्रश्न आहे. अल्गोरिदम्सच्या हाती सगळं देऊन टाकून तुम्हांला ‘तुम्ही खूशच आहात’ असं त्यांच्याकडून ‘वाटवून’ही घ्यायचं आहे? ओके. तुमचा प्रश्न. नका लढू. पण लढायचं असेलच आपल्या मनावर, इच्छांवर आणि पर्यायानं आपल्या आयुष्यावर ताबा राहावा म्हणून, तर? कसं?

इथे हरारी चक्क विपस्सनेकडे वळतो. आपण स्वतःच्या जाणिवेला ओळखणं किती महत्त्वाचं आहे हे त्यानं इथवर सांगितलेलंच असतं. आता विपस्सनेमधला धर्माचा आणि अध्यात्माचा भाग वगळून, निव्वळ तंत्र म्हणून, त्याकडे कसं बघता येईल नि त्यातून काय साधता येईल, त्याबद्दल तो बोलतो. स्वानुभवाच्या आधारे.

**

Was Vipassana an anti-climax for me? To be honest, yes, for some time. पण ते फार काळ टिकलं नाही. हा माणूस अतिशय प्रामाणिकपणे, अनेक संदर्भ पुरवत, आपल्याकडे आणि आपल्या समूहाकडेही अतिशय नर्मविनोदी परीक्षणात्मक नजरेनं पाहत बोलतो आहे. जगभरातल्या राजकारणाचे, इतिहासाचे, धर्मशास्त्रांचे, पुराणांचे आणि अद्ययावत सामाजिक-आर्थिक-राजकीय-शास्त्रीय मतमतांतरांचे पुरावे नोंदत बोलतो आहे. गोष्टी तपासून पाहण्याचं आवाहन करतो आहे. तपास करायचा झालाच, तर त्यासाठीचं साधन देऊ करतो आहे. हे छान आहे.

वाचनीय तर आहेच, चिंतनीयही आहे. अस्वस्थ आणि आश्वस्त दोन्ही करणारं आहे.

**

अलीकडे वाचनात, बघण्यात आणि ऐकण्यात येत असलेल्या अनेक पुस्तकांचे, विचारांचे आणि गोष्टींचे संदर्भ येऊन या पुस्तकाच्या धारेला लागत होते. The Three Body Problem (Liu Cixin) ही चिनी विज्ञानकथा, मकरंद साठ्यांचं अस्मिताविषयक विवेचन, www.zenhabits.net हा Lio Babauta चा ब्लॉग, Tristan Harrisचं Time Well Spent हे तंत्रज्ञानविषयक म्हणणं, Michael Pollanचं अन्नविषयक विवेचन.... हे सगळंच या पुस्तकाला समांतर असं काही म्हणतं. जिज्ञासूंनी हे जरूर गुगलून पाहावं.

Wednesday, 26 September 2018

पुस्तक एक, पुस्तकं अनेक

कोणतंही पुस्तक वाचताना आपण फक्त तेवढं एकच पुस्तक वाचत नसतो. त्या-त्या जातकुळीची आणि पूर्णतः निराळी, वाचलेली आणि न वाचलेली पुस्तकं आणि लेख आणि स्फुटं आणि चर्चाधागे आठवत राहतात. त्या सगळ्यांनी मिळून आपल्या डोक्यात तयार केलेल्या जाळ्यात हेही पुस्तक जाऊन बसतं. क्वचित काही न वाचलेल्या-न पाहिलेल्या गोष्टींची नावं पुरवतं.  आपलं आकलन आणि आकलनाची असोशीही अधिक दाट, गहिरी करतं.

***

पशुवैद्य विनया जंगलेंचं 'मुक्या वेदना, बोलक्या संवेदना' वाचत होते. प्राण्यांवर उपचार करताना लेखिकेला आलेले अनेक सुरस आणि चमत्कारिक अनुभव त्यात आहेत. लेखिकेचं सुसंस्कृत, जिद्दी आणि प्राण्यांवर अतूट माया करणारं व्यक्तिमत्त्व या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसतं. प्राण्यांबद्दलच्या कोणत्याही पुस्तकात असतं, तसं माणसाच्या अंदाधुंद विकासाबद्दलचं आणि त्यासमोर असहायपणे आटत चाललेल्या प्राणिविश्वाबद्दलचं चिंतेचं अस्तर याही पुस्तकाला आहे.


पुस्तक वाचनीय आहेच.

ते वाचताना सर्कशीतले रिंगमास्टर दामू धोत्रे यांनी लिहिलेलं 'वाघसिंह - माझे सखेसोबती' हे अद्भुत आत्मचरित्र आठवत होतं. त्या पुस्तकातला एक प्रसंग शाळेत तिसरीत मराठीच्या पुस्तकात होता. सर्कशीचा खेळ चालू असताना, प्राण्यांच्या पिंजऱ्यात लेखक उभा असताना दिवे गेले आणि अंधार पसरला. लेखकानं प्रसंगावधान राखून 'प्रकाश... प्रकाश' एवढी एकच विनवणी खड्या आवाजात केली. बॅटऱ्या आणि टॉर्च सर्वदूर पसरण्यापूर्वीचे दिवस. मोबाईल नि जनरेटर्स तर दूरच.  क्षणार्धात कुण्या प्रसंगावधानी प्रेक्षकानं खिशातली माचीस काढून काडी शिलगावली. ते पाहून असंख्य विडीकाडीप्रेमी लोकांनी त्याचं अनुकरण केलं. लुकलुकत्या, विझत्या-पेटत्या शेकडो ज्योती. त्या प्रकाशात लेखक शांतपणे पिंजऱ्यातून बाहेर पडला. तो प्रसंग आणि कुण्या चित्रकारानं काढलेलं अंधारात लुकलुकणाऱ्या शेकडो काड्यांचं चित्र मला अजुनी लख्ख आठवतं. असे अनेक प्रसंग असले ते पुस्तक.

त्या मानानं विलास मनोहर यांचं 'नेगल' पुष्कळ लोकप्रिय. मीही त्याची असंख्य पारायणं केली आहेत. पुढे हेमलकसाला जाऊन आमट्यांचा प्रकल्प पाहिला तोही आमट्यांच्या कामानं प्रभावित होऊन नव्हे, तर नेगलच्या प्रेमापोटीच. आदिवासींसाठी काम करत असताना, आदिवासींनी भुकेपोटी शिकार करून मारलेल्या प्राण्यांची पिल्लं सांभाळण्यातून या प्रकल्पाला सुरुवात झाली. अर्थातच ते काम दुय्यम महत्त्वाचं होतं. पण पूर्वायुष्यात चक्क शिकारी असलेल्या लेखकाचं प्राणिप्रेमी व्यक्तीत झालेलं परिवर्तन 'नेगल'मध्ये आहे. त्यातली कितीतरी प्राण्यांची शब्दचित्रं इतकी जिवंत, अस्सल उतरली आहेत, की पुस्तकांमधल्या जिवाभावाच्या पात्रांची यादी करायची झाली, तर मी नेगल-नेगली, राणी अस्वल, पिलू माकड या मंडळींचा एखाद्दा विचार नक्की करीन.

डॉ. पूर्णपात्रे यांचं त्यांच्या लाडक्या सिंहिणीवरचं 'सोनाली' हे पुस्तकही लहानपणी वाचलेलं. पण त्याचा माझ्यावर खास ठसा नाही.

अलीकडे वाचलेलं रमेश देसाईंचं 'वाघ आणि माणूस' हे पुस्तकही रसाळ. वाघ आणि सिंह या प्राण्यांबद्दलची काहीशी विकीपिडीय पण गप्पिष्ट माहिती आणि काही प्राणिप्रेमी मंडळींच्या चटका लावून जाणाऱ्या प्रकल्पांच्या गोष्टी, असं काहीसं हे पुस्तक.

व्यंकटेश माडगूळकरांचं 'सत्तांतर' या सगळ्या माहितीवजा-किस्सेवजा पुस्तकांपेक्षा कितीतरी उंच गेलेलं. साहित्यकृती झालेलं. एका वानरटोळीचं शब्दचित्र इतकं त्याचं वर्णन पुरेसं नव्हे. त्यात एक पूर्ण जीवनचक्र आहे. 'बनगरवाडी'च्या तोडीचं.

'ऐसी अक्षरे' या संस्थळावर गवि या सदस्यानं उघडलेला एक जबरी धागाही कायमचा लक्ष्यात राहीलसा. या गृहस्थाच्या एसीच्या सज्जावर दुर्मीळ जातीच्या गव्हाणी घुबडाईनं अंडी घातली. या इसमानं त्या घुबडांना हुसकावून तर लावलं नाहीच. उलट सेन्सर्स बसवलेला एक कॅमेरा लावून ठेवून पिल्लांच्या वाढीचं अलगद चित्रण केलं. धागा अपडेट करत, चित्रण डकवत, पिल्लांच्या वाढीची बित्तंबातमी वाचकांना पुरवली आणि ही लाडाची घुबडाई घरटं सोडून जाईस्तो कितीतरी वाचकांचा जीव गुंतवून ठेवला.

'साकार' नामक ब्लॉग चालवणाऱ्या अर्निका परांजपेनं हत्तींच्या शुश्रूषा केंद्राला भेट देऊन लिहिलेला अनुभवही मी कदापि विसरू शकत नाही. आपल्याच वयाची मुलगी निव्वळ पुस्तकं वाचण्यापुरतं प्राणिप्रेम न दाखवता अशा एखाद्या प्रकल्पात जाऊम हत्तींशी मैत्री करते आहे, हे वाचणं चकित करणारं होतं माझ्यासाठी.

त्यावरून 'एका रानवेड्याची शोधयात्रा' हे कृष्णमेघ कुंटेचं पुस्तक आठवलं. कर्नाटकच्या जंगलात जाऊन राहणाऱ्या एका कलंदर जंगल अभ्यासक मुलाचं हे पुस्तक. पुढे त्याच्या वडलांची नर्मदा परिक्रमेवरची पुस्तकं हाती आली, ती कृष्णमेघच्या अस्सल अनुभवापुढे निव्वळ भरताड वाटली हा माझ्या नास्तिक नजरेचा दोष की त्या अनुभवाच्या जिवंतपणाचा? कुणास ठाऊक.

'देर्सू उझाला' हे जयंत कुलकर्णींनी भाषांतरित केलेलं पुस्तक रूढार्थानं प्राण्यांबद्दलचं नव्हे. पण निसर्गाशी एकरूप पावलेल्या - इतक्या, की शहरातलं वास्तव्य न सोसून जंगलात जाऊन प्राण सोडणाऱ्या - देर्सू या मानवप्राण्याबद्दलचं ते पुस्तक. त्यातली रौद्र निसर्गवर्णनं आणि त्या पार्श्वभूमीवरचा ओबडधोबड, निर्मळ देर्सू.

त्यावरून गो. नी. दांडेकरांचं 'माचीवरला बुधा' आठवणं क्रमप्राप्त होतं. पण आता मी भरकटतेय!

विनया जंगलेंच्या पुस्तकानं संतोष शिंत्रेंच्या 'गुलाबी सिर - दी पिंक हेडेड् डक' या कथेची आठवण करून दिलीच. शिवाय इंग्रजीतल्या अशा कितीतरी पुस्तकांचे संदर्भ आणून वाटेत टाकले. अजून जेन गुडालबद्दल वाचायचं राहिलंच आहे. तसंच उंटांचा सांभाळ करणाऱ्या रायला जमातीसाठी काम करणाऱ्या इल्सेबद्दलही.

पुस्तक एक, पुस्तकं अनेक. 

Saturday, 18 August 2018

ये कधीही

एखादा लहानसा डुगडुगणारा शब्द
हलक्या हातांनी काढून
त्या जागी चपखल बसणारी
चपटीशी ठिकरी घट्ट बसवून देतोस
आणि स्वतःशीच समाधानानं इवलं हसतोस
तेव्हा तुझ्यासाठीही बांधत असतोस एक कोपरा
माझ्या कवितेत.
तसं बेघर होऊ नये कुणीच कधीच.
पण एखाद्या काळ्यानिळ्या, ठसठसत्या संध्याकाळी
आभाळ घेरून आलेलं असताना
रात्री पथारी पसरायपुरती ओसरी
ऊन-ऊन चंद्राचे चौथ-दोन चौथ
केशरी निखाऱ्याचा मूठभर शेक
आहे तुझाही.
मी तुला आसरा देऊ केला
असं म्हणायला नको.
तुझ्याही हक्काचीच आहे कविता.
ये कधीही.

Wednesday, 18 July 2018

टू देनिस विथ लव्ह...

मला अमुक फार आवडते आणि मला तमुक अजिबात आवडत नाही... असारीतसर देनिसच्या टेम्प्लेटात लिहिण्याचा एक लेख बरीच वर्षे माझ्या शॉपिंग कार्टच्या आतबाहेर करतो आहे. चैनच ती. पण मनुष्याने मोहाला नेहमी शरण जावे या कुणाच्याशा मोहक सुविचाराला शरण जाऊन मी तो अखेर लिहिते आहे.

***

लागलेली शाईपेने आणि त्यांची झळझळीत निळी शाई; पिवळसर रंगाच्याजाडसर कागदांच्याबिनओळीच्या आणि लालबुंद पुठ्ठा-बांधणीतल्या अटकर बांध्याच्या वह्यामऊ लुसलुशीत सुताच्या आणि डोळे विस्फारायला लावणारी ठसठशीत वाहती चित्रे असणार्‍या कलमकारी नक्षीच्या साड्या; संध्याकाळचे कलते मऊ ऊन धसमुसळेपणाने सांडणारी आणि झाडांच्या पोपटी शेंड्यांकडे थोड्या शिष्टपणे पण न राहवून डोकावून पाहणारी रुंद काळ्याशार कडाप्प्याची एखादी खिडकी... हे सगळेच मला फार फार आवडते. पण त्यात सांगण्यासारखे मोठे काय आहेसुखासीन माणसाला हे सारे आवडायचेच.

खरे महत्त्वाचे आहेते मला काय आवडत नाही हे बिनविषारी ठामपणाने सांगता येणे. ठामपणा सोपा आहेबिनविषारीपणा मात्र... असो.

तर लग्ना-मुंजीला जाणे मला अजिबात आवडत नाही. तिथे पंगतीत बसून जेवायला मिळणार असेलतर थोडीतरी माफी मिळेल. पण रांगेत उभे राहून स्वतःच्या हाताने स्वतःच वाढून घेण्याचे जेवण असेलतर त्यात दिलनवाजखुशबहार आणि तत्सम नावाच्या भाज्या आणि जेवणाशी सुतराम संबंध नसलेली व तिथे त्या अवस्थेत खायलाही पूर्णतः गैरसोयीची असणारी पाणीपुरीसारखी एखादी अजागळपणे खोचून ठेवलेली डिश असणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असते आणि माझा इलाज चालणार असेलतर अशा ठिकाणी जाणे मला अजिबात आवडत नाही. त्याहून घरातल्या पितळी पातेल्यात उरलेला थोडा भात लाल तिखटाची भुकटी आणि गोडेतेल घालून, हाताने कालवून पातेल्यातूनच खाणे मला मानवेल.

नीट शिस्तीने लावलेलीधुळीचा कणही नसलेलीपुस्तकांचे कणे सैनिकी शिस्तीने नांदवणारी इतरांच्या पुस्तकांची कपाटेही मला आवडत नाहीत. ती पाहून मनात उगीचच्या उगीच अपराधीपणाचे झरे वाहू लागतात आणि सोन्यासारखा रिकामा असलेला येता शनिवार खर्चून पुस्तके आवरावीत की कायअशा प्रकारचा विचार डोके कुरतडू लागतो.

आपण जेवता-जेवता उठूनखरकटा हात लांब ठेवण्याची कसरत करत दुसर्‍या कुणाला वाढणेही मला आवडत नाहीतसेच मी शांतपणाने जेवत असता सत्राशेसाठ वेळा हे देऊते वाढूकसं झालंयखा की आणिक...’ अशी आग्रहाच्या नि अगत्याच्या रकान्यात लपून घुसडलेली कटकटही मला आवडत नाही. मी मला हवे असेल ते आणि तेवढे न लाजताइतरत्र कुठेही उष्टे-खरकटे हात न लावता वाढून घेईन आणि मनापासून जेवीन याची खातरी बाळगावी.

मजकुरात उगीचच्या उगीच दिलेली एकाहून अधिकची उद्गारचिन्हे आणि टिंबे मला आवडत नाहीत. बरेच वय झालेले असूनही जेवताना सगळे ताट सारवल्याप्रमाणे बरबटवून ठेवणार्‍या माणसांच्या ताटासारखाच तो मजकूर भासतो. त्याहून शुद्धलेखनातल्या ठोक ढळढळीत चुका मला मानवतातत्यांत निदान काहीतरी अस्फुट-उमलते-हळवे-हुरहुरते सांगण्याचा आव तरी असत नाही.

नाटका-सिनेमाला आत जाण्यासाठी आपली वाट पाहत कुणीतरी खोळंबले आहे याची यत्किंचितही पर्वा न करता हटकून उशिरा येणारी आणि आल्यावर माझ्या व्याकुळतेला हसत हसतजणू काही घडलेच नाही अशा आविर्भावात आत घुसणारी माणसे मला अजिबात आवडत नाहीततशीच एकट्याने सिनेमानाटकाला जाणे हा गुन्हा असून सोबत कुणा मनुष्यप्राण्याला नेलेच पाहिजे अशी समजूत असणारी व त्यापायी आपल्याला सोबत ओढून नेऊ पाहणारी माणसेही मला आवडत नाहीत. त्यांच्याशी मध्यांतरात कराव्या लागणार असलेल्या आडनिड्या आणि अवघडलेल्या संभाषणाचा मला भयंकर धसका आहे. अशा ठिकाणी लहान मुलांना गप्प न करणारी आणि आपल्या मोबाईलवर निर्लज्जपणे मोठ्यांदा संभाषणे ठोकणारी माणसे तर सगळ्यांच्याच तिरस्काराची धनी असतात. पण फोनवर वत्साप वा तत्सम टंकनचाळे करत आपला मोबाईल मागच्या यच्चयावत रांगांच्या डोळ्यांवर प्रोजेक्ट करणारे प्रेक्षक मला सहन होत नाहीत. परिणामी सभागृहात आपलाही मोबाईल एका हाताने झाकून, मान तिरकी करूनहळूचकन मजकूर वाचण्याची सवय मला लागली आहे आणि असे करताना मी ढढ्ढमगोळा दिसत असणार ते सोडा.

असल्या बिनविषारी नावडींची आणि सुखलोलुप आवडींची माळ लावतफाटकेतुटके गाउन नेसून वा गळपट्टी चावत बसण्याच्या सवयीमुळे ताणून आकार बदललेले जीर्णशीर्ण टीशर्ट अडकवून,भिंतीला तंगड्या लावून लोळत गप्पा मारत बसायला मात्र मला फार फार फार आवडते. जी माणसे अगदी शनिवारच्या सोन्यासारख्या सकाळी येऊन माझा वेळ खात बसलीतरी मला जराही वैताग येत नाहीअशा काही मोजक्या माणसांसोबत तर फारच.

फक्त अशी माणसे भयंकर बिझ्झी आणि भावखाऊपणे दुर्मीळ असतातहे मात्र चांगला लालभडक गरमागरम राग येण्याइतके.... असो.

Sunday, 8 July 2018

रस्ते

रस्ते लक्ष्यात राहणे, रस्ते नीट कळणे आणि ते दुसर्‍याला समजावून सांगता येणे या सगळ्या प्रकाराबद्दलच मला एक जबरदस्त भयगंड आहे.

माझ्या स्वतःच्या जन्मापासूनच्या गावात रस्त्यावरून अत्यंत निवांतपणे कुठूनतरी कुठेतरी जात असताना बहुधा माझ्या सहज आत्मविश्वासामुळे चकून एका निरागस बाईने मला तलावपाळीला कसं जायचं ते विचारलं. मी स्वतः तिथून मिनिमम रिक्षाभाड्याइतक्या - खरं तर त्याहूनही कमी, पण रिक्षावाले तितके पैसे घेतातच. त्यामुळे असो. तर - अंतरावर होते. पण मला रस्ता काही केल्या सांगता येईना. बरं, मला ठाऊक नाही, हे सांगण्याची लाज वाटली. वास्तविक त्या बाईला काय माझ्या तोंडाकडे बघून माझं जन्मस्थळ कळण्याची आणि ती त्यावरून मला फिदिफिदि हसण्याची शक्यता नव्हती. पण गंड हा गंड असतो. त्यामुळे मी घाईघाईनं माझा जन्माचा साथी असलेला मोबाईल काढून एकदम त्यात कुणीतरी पेटलेलं असल्यासारख्या हालचाली केल्या आणि 'सॉरी हं, जरा घाईत ए' असं पुटपुटून चक्क पळ काढला.

अजुनी रस्त्यावर समोरून कुणी पत्ता हुडकणार्‍या भिरभिर्‍या नजरेचं येताना दिसलं की मला एकदम दचकायला होतं.

असेच मुंबईहून पुण्याला जाताना - किंवा खरंतर कुठूनही कुठेही बाय रोड जाताना. पण पुण्याचं नाव घेतलं की अ‍ॅडेड अ‍ॅडव्हांटेज मिळतो. शिव्यांना एक प्रकारचं मुळातून बळ मिळतं. त्यामुळे पुणं. तर ते असो. तर - मुंबईहून पुण्याला जाताना पलीकडून फोन करून 'तू आत्ता कुठे पोचल्येस' हे विचारणारे लोक आणि त्याहून म्हणजे, या आचरट प्रश्नाला छातीठोक आणि अचूक उत्तर देणारे लोक. हे लोक निव्वळ थोर असतात. एकतर वाहन हलायला लागलं, खिडकीतून वाराबिरा लागायला लागला, कानात गाणी खुपसली... की मला लग्गेच पेंग यायला लागते. एरवी दोन-दोन तास बिछान्यात आराधना करावे लागणारे कमनिशिबी प्राणी आम्ही, पण चालत्या वाहनात खिडकी मिळाली रे मिळाली, की निद्रादेवी की कोण ती बाई डायरेक्ट मांडीवर येऊन बसते. परिणामी असल्या प्रवासात पनवेल पार होण्यापूर्वीच मी ढगात असते. फोनमुळे जागं होऊन, बाहेर पाहून, आसमंताचा क्षणार्धात अंदाज घेऊन आपले अचूक अक्षांश-रेखांश मला नाही बा कळत. एकदा तर असली पृच्छा करणार्‍या एका मित्राला मी 'वाकडच्या जवळ आल्येशी वाटत्ये' असं मोघम उत्तर देऊन मोकळी झाले. तो बिचारा वेळेचा अंदाज घेऊन आणायला येऊन थांबला असणार. कारण तासाभरात त्याचा हैराणावस्थेत परत फोन. 'कुठे आहेस???' मी आजूबाजूला बघत्ये, तर लोक फूडमॉलला उतरण्याच्या तयारीत.

आमची मैत्री अजून आहे. पण त्याचं श्रेय मित्राच्या सहनशक्तीला आहे, असंच म्हणावं लागेल.

आपल्या गावातले नसलेले लोक आपल्या चारचाकी गाड्या घेऊन आपल्या गावात येतात आणि आपल्याला गाडीत घालून कुठे कुठे जाऊ बघतात, हाही मला असाच भयंकर घाबरवणारा प्रसंग असतो. मला एकटीला माझ्या अकरा नंबरच्या बसनं न चुकता कुठेही जाऊन पोचण्याचा आत्मविश्वास येण्यासाठी मला त्या ठिकाणी किमान साडेचार वेळा कुणाच्याही मदतीविना जाण्याचा सराव लागतो. त्यात लोकांना आत्मविश्वासानं रस्ते सांगण्यासाठी लागणारा धीर मिळवा. त्याला चारचाकीसाठीच्या रस्तानियमांनी - वन वे वगैरे भानगडी - गुणा. वर थोडं फुटकळ 'तिथे पार्किंगला जागा मिळते का?' या प्रश्नाच्या उत्तरासाठी लागणारं अवधान. हे सगळं नसेल, तर ते असण्याचं उसनं अवसान. नि मग होणार्‍या चुका निस्तरण्यासाठी लागणारा शिवसैनिकी उसना - त्यामुळे अधिकचा नि केविलवाणा - उर्मटपणा.

काय अवस्था होत असेल माझी? ती भोगण्याहून 'मला गाडी लागते' हे उत्तर तोंडावर फेकून देणं सोपं असतं.

फारच लहानपणापासून लोकल ट्रेन्समध्ये वावरण्याची सवय असल्यामुळे स्टेशनावरून फिरताना मी अगदीच पंढरपुरावरून आत्ताच आल्यासारखे गबाळे भाव चेहर्‍यावर घेऊन फिरत नाही इतकंच. आपला बावळटपणा झाकण्यासाठीचा आत्मविश्वास मला आईबापाकडून मिळाला आहे. पण दादर स्टेशनला सोमवारी सकाळी दहा वाजता मला जर कुणी गाठलं, नि कबूतरखाना कुठे असं विचारलं, तर मी मोबाईल-पेटलेलं काहीतरी-हालचाली करण्याचीच शक्यता जास्त आहे. बाकी दादर स्टेशन हा खरा म्हणजे एका संपूर्ण नव्या लेखाचाच विषय आहे. त्यामुळे आपण घाईघाईनं तो बदलू. पण मुद्दा असा आहे, की स्टेशनात नुकत्याच आलेल्या रिकाम्या चालत्या ट्रेनमध्ये उडी मारून घुसणं आणि खिडकीची जागा धरणं मला जमेल. फक्त ती खिडकी बरोबर उलट्या दिशेची निघणार नाही, याची मात्र खातरी नाही, इतकं माझं दिशाज्ञान थोर आहे. व्हीटीच्या दिशेनं तोंड करून उभं राहिल्यावर उजव्या हाताचे प्लॅटफॉर्म्स हे बहुधा क्रमांक एकचे असतात हे घोकून आणि मग शक्यतोवर मूकाभिनय न करता वेळच्या वेळी आठवून वापरण्यातच माझं बहुतांश दिशाज्ञान खर्ची पडलेलं आहे.

त्याहून रिक्षानं फिरण्याचा पर्याय मला मानवतो.

एकतर रिक्षात बसल्यावर आपल्याला रस्ते कळले काय, न कळले काय, परिस्थितीत काही फरक पडण्याचा संभाव असत नाही. रिक्षावाला हाच सर्वज्ञ आणि सर्वाधिकारी असतो. काही लोक रिक्षा 'कुठून कुठे कशी घ्या' हे रिक्षावाल्याला सांगतात, त्याचा अहंकार दुखावला गेल्यावर त्याच्याशी एक परिसंवादवजा भांडण रंगवतात आणि पत्त्यापाशी पोचताना अचूक समेवर भांडण गुंडाळून लिलया उतरून जातात. माझा तयांना नमस्कार आहे. मी असलं काहीही करण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण बहुतेकदा मला आपण जिकडे जाणार आहोत, त्या वाटेवर कोणते भाग लागणार आहेत, हेही धड ठाऊक असत नाही. अशा वेळी उगाच रिक्षावाल्याला आव्हान कशाला द्या? निवांत बसून वारा खावा, पाणी प्यावं, रिक्षा थांबली की उतरून जावं. ते आपला विश्वासघात करत नाहीत.

विश्वासघातावरून आठवलं, अजून एक जमात असते. आपल्याला रिक्षावाला लांबच्या रस्त्याने नेऊन दोन-पाच रुपये अधिक उकळणार आहे, हा दृढ विश्वास असलेल्या लोकांची. त्यांना रिक्षात बसल्या बसल्या स्वस्थता म्हणून नसते. ते सतत संशयीपणे बाहेर डोकावून बघत असतात. आता रस्ता ठाऊक असताना तरी हे ठीक आहे. पण नवीन गावात गेल्यावर, रस्त्याची घंटा माहिती नसताना? कशाच्या जोरावर? त्या दोन-पाच रुपयांनी रिक्षावाला मलबार हिलला बंगला का उठवणार असतो? पण नाही. हे सीटच्या कडेवर कसेबसे बूड टेकलेले. नजर बाहेर. मनात संशय.

माझी याच्या बरोब्बर उलट अवस्था असते. अनेकदा तर नवीन गावातला पत्ता समजून घेण्याचे निष्फळ कष्ट सांडण्यापेक्षाही 'रिक्षावाल्याला काय सांगायचं?' एवढा एकच कळीचा प्रश्न विचारून घेतला, तरी आपल्या सर्व समस्या सुटतात, असं माझ्या लक्ष्यात आल्यामुळे रिक्षावाला माझा गुरू आहे, इतकं मी निश्चित केलेलं आहे.

काही लोकांना गावातल्या गावात गाडीतून हिंडताना आपण कुठे आहोत, आत्ता या क्षणी दंगल झाली आणि चालकाला कुणी भोसकला तर आपण आपल्या घरी कसे पोचणार, गाड्याच नसतील तर पायदळ वापरून जवळात जवळ रस्ता कोणता... याची गणितं मनातल्या मनात करण्याची सवय असते. असो बापडी. पण हे लोक आपले सहप्रवासी असायला लागले की पंचाईत येते. माझ्या एका ऑफीस कॅबमधला सहप्रवासी अशांपैकी होता. मी पिकप झाल्या झाल्या अत्यानंदानं हातातली कादंबरी उघडून त्यात गडप होण्यास आतुर असे, तर हा सत्तत मला 'बाहेर बघ. आपण कुठे आहोत, लक्ष्यात येतंय का?' असे आचरट प्रश्न विचारण्यात मग्न. माझा भयंकर चरफडाट होई. 'मला नाही रे बाबा ठाऊक. अमृतसरला नाहीयोत ना आपण? बास मग. पोचीन मी वेळ आली तर धड घरी.' अशी दुरुत्तरं देऊनही काही उपयोग होत नव्हता. शेवटी एकदा चालकाला फितूर करवून घेतला आणि त्याला घुमव घुमव घुमवला. चालकालाही रस्ता ठाऊक नसल्याची बतावणी, माझी नैसर्गिक माठावस्था आणि या इसमाचा उडालेला गोंधळ - यांमुळे त्याचा होता - नव्हता तो आत्मविश्वास गाळात गेला आणि त्यानं कॅब बदलून घेतली.

अलीकडे जीपीएस नावाची मजेशीर गोष्ट आलेली असल्यामुळे असल्या लोकांच्या माथेफिरूपणात भरच पडलेली आहे. 'वेळ पडली तर बघता येईल की नकाशा', असा दिलासा असल्यामुळे मी मात्र माझं दिशाअज्ञान आणि भयगंड झाकण्यासाठीचा उर्मटपणा साग्रसंगीत जपून आहे. माझ्या वाटेला जाऊ नका...  ;-)

Friday, 29 June 2018

मला समारंभ दचकवतात

मला घरगुती समारंभ दचकवतात.

आमंत्रणाच्या पायरीला ते खरेच निरुपद्रवी वाटू शकतात. कधी-कधी तर 'का बरं आपण यांना इतकं बिचकतो?' असा अचंबाही थोडा वेळ वाटावा, इतकी गोडगुलाबी-लालसोनेरी मजाबिजा त्यांत असल्याचं एकूण वातावरण असतं. पण जसजशी नव्हाळीची पंधरावीस मिनिटं उलटत जातात, तसतसा डोक्यातला काटा कंटाळा, वैताग, राग, दमणूक, व्याकुळता असे आकडे दाखवायला लागतो...

शंभरातल्या नव्व्याण्णव वेळा तिथे आपल्याला जन्मानं मिळालेली तरी माणसं असतात किंवा त्यांच्या बाबतीत आपलं निवडस्वातंत्र्य शून्य असतं. (ते त्याहूनही कमी असू शकतं, जोडप्यांच्या बाबतीत. पण ते एक वेगळंच प्रकरण आहे. त्या जमातीचे स्वतःचे असे स्वतंत्र फायदे-तोटे असल्यामुळे त्यात मी तूर्त पडणार नाही.) तर - आपलं निवडीचं स्वातंत्र्य शून्य असल्याचं दर्शवणारी बहुतांश माणसं भोवताली असतात. ही माणसं त्रासदायकच असतात असं नव्हे. त्यांचं असं काहीतरी उपयुक्ततामूल्य असतंच. पण त्या घडीला आपल्याला त्या उपयुक्ततेशी घंटा काही देणंघेणं असत नाही, आणि तरीही आपण अडकलेले असतो. त्या हतबलतेचा एक सूक्ष्म सल आपल्याला हळूहळू घेरू लागतो. लोक आनंदानं वा निरुपायानं एकमेकांशी मजेच्या वा उपचारापुरत्या गप्पा ठोकत असतात. आपण मात्र 'आपण इथे नक्की काय करतोय?' या प्रश्नाच्या दिशेनं वाटचाल करायला सुरुवात केलेली असते. फोनची बॅटरीही वेगानं कमी होत असल्याचं लक्ष्यात येण्याची हीच ती वेळ. बॅटरीचा इंडिकेटर बघून एकदम काळजात धस्स होतं. पॉवर बँक नाही हे लक्ष्यात येऊन नैराश्याची दुसरी लाट येते. ती कशीबशी जिरवून आपण इकडेतिकडे पाहतो. मस्ती करायला एरवीपेक्षा मोकळी जागा, पालकांचं मर्यादित लक्ष्य, इतर काही मीलनोत्सुक समवयस्क सामाजिक सदस्य, गोड आणि तेलकट चरायला मुबलक चारा... असं सगळं लाभलेली पोरं मनोभावे पिसाळून इतस्ततः मोकाट सुटलेली असतात.  वयोवृद्ध आणि वयोपरत्वे थकलेले लोक कृतकृत्य, चिंताग्रस्त आणि करुण या तिन्ही भावांचं मिश्रण चेहर्‍यावर मिरवत असतात. वयोवृद्ध असतील पण थकलेले नसतील, असे लोक आपली भयंकर उपद्रवक्षमता म्यान केल्यागत दाखवत इकडून तिकडे विजेच्या वेगानं सळसळत असतात. क्षणात इथे तर क्षणात तिथे, घटकेत स्टेजपाशी तर पुढच्या क्षणी दारात स्वागताला... अशी, एखाद्या मायावी राक्षसिणीलाही लाजवील, अशी त्यांची हालचाल असते. त्यांची उपद्रवक्षमता आपल्यावर पाजळली जाऊ नये, म्हणून आपण बसल्या खुर्चीतच थोडा आडोसा मिळवण्याचा माफक प्रयत्न करतो. बसली खुर्ची, हे एक निराळंच प्रकरण असतं. अंगावरचे, सूत सोडून इतर कोणत्याही छळवादी धाग्याचे कपडे आपल्या अंगाला टोचत असतानाच त्या खुर्चीवरून मात्र सुळुसुळु सटकत असतात. जरा आरामदायी आसन साधलं की बूड तरी बाहेर सांडतं नाहीतर आख्खे आपणच त्या खुर्चीतून घसरू लागतो. पोरांनी चरलेले ते तेलकट आणि गोड पदार्थ आपल्याला लाभलेले नसतील, तर 'आपण इथे काय करतोय?' या प्रश्नाचं उत्तर पोट देतं आणि कंटाळ्याची जागा वैताग घेतो. ते पदार्थ जर लाभले असतील, तर मात्र अधिकच कठीण अवस्था. तोवरच्या कंटाळ्यानं आलेला अनिवार थकवा आणि पोटात गेलेलं जडान्न मिळून भयावह परिस्थिती होते. त्या क्षणी साक्षात पॉवर बँकही तितकीशी मनोरम वाटत नाही. अंगांगाला हवी असते, ती फक्त साडेतीन हाताची जागा. देहाची जुडी जिथे अंथरावी, असा एक निवारा. तो इतक्यात मिळणार नाही; वाटेत काही न थकलेली वयोवृद्ध मंडळी, काही उत्साही तरुण मंडळी, काही ट्रेनस्टेशनं, नशीब वाईट असेल तर मेगाब्लॉक... इत्यादी लागणार आहे... हे साक्षात्कार झाले, की आपण स्वतःवरच पिसाळतो. कुठल्या दळभद्री क्षणी आपण यायला 'हो' म्हणून बसलो, हे स्वतःला खोदून-खोदून विचारतो. उत्तर मिळत नाही. अखेरचा प्रयत्न म्हणून आपण फोनची बॅटरी गेली खड्ड्यात असं म्हणून फोन उघडतो. वेळ आणि रिमोट आपल्यापाशी असताना जगातल्या कोणत्याही टीव्हीवर कायम सूर्यवंशम, बिग बॉस आणि संसदेच्या कामकाजाचं प्रसारणच लागलेलं असतंं; या न्यायानं तेव्हा फोनवरही काडीमात्र टाईमपास होऊ शकत नाही. एरवी फेसबुकी आणि वत्सापी आणि संस्थळी भांडायला सरसावलेले यच्चयावत लोक घरी पंखे सोडून निवांत घोरत असतात वा शहाण्यासारखे एखाद्या पिक्चरला तरी गेलेले असतात. माणूस अखेर एकटाच असतो या चिरंतन सत्यापाशी आपल्याला व्याकूळ अवस्थेत सोडून फोनही राम म्हणतो. आपण नशिबापुढे हात टेकतो.

पुढचं काही आठवण्यात हशील नाही. कधीतरी घर दिसतं खरं. पण तोवर एका सोन्यासारख्या मोकळ्याढाकळ्या दिवसाची माती झालेली असते. 'सगळे भेटले पण....' असा एक गळी सूर काढून त्या मातीला आकार देण्याची केविलवाणी धडपड करायचं बळ माझ्यात नाही. त्यामुळेही असेल...

मला घरगुती समारंभ दचकवतात.

Tuesday, 19 June 2018

गोष्टीचं गाणं

बुद्धाला गोष्टींचं भारी वावडं.
रडू आलं, हसू आलं, जर्रा जरी रागेजलं-
लगेच म्हणतो, सावध मुली, गोष्टींचं हे कातडं.
गोष्टी रंगवून देतात
गोष्टी गुंगवून टाकतात
गोष्टी विणतात रेशमाचं जाळं
गोष्टीच्या आरशात मृगजळाचं तळं
बघता बघता पाय त्यात फसत जातात
गोष्टी म्हणे तुझी दृष्टी गिळत जातात...
आंधळेपण नको मुली, वेळीच सोडव आतडं.
बुद्धाला गोष्टींचं भारी बाई वावडं.

बुद्ध मोठा शहाणा असेल त्याच्या घरी
झापडबंद माझी नजर गोष्टीत केवढी खरी
गोष्टी फक्त रंगवत नाहीत
नव्या वाटा चितारतात
गोष्टी फक्त गुंगवत नाहीत
कातरवेळी कुशीत घेतात
गोष्टी समजून गातात गाणं
गोष्टी रचतात हसरं जगणं
बघता बघता शून्यापोटी समष्टी पेरतात
गोष्टी मला कोवळी दृष्टी देत जातात.
गोष्टीत हसीन, गोष्टीत रडीन,
दहा दिशांनी जगून घेईन
बुद्धालाही रंगवीन गोष्टीत -
असेना का त्या वेड्याला गोष्टीचंही वावडं!

Friday, 25 May 2018

पुस्तकी टिपणे : ०२

खरेदी केलेल्या वा संग्रहातल्या पुस्तकांचे फोटू डकवू डकवू लोकांना जळवण्याच्या काळात आमचे तत्त्वज्ञान तसे मागासच. परंतु आम्ही त्यास चिकटून आहोत.
आमच्या मते :
- घराच्या दर्शनी भागात पुस्तके ठेवावी लागल्यासच व्याकरण, शब्दकोश, तत्त्वज्ञान, चर्चा-समीक्षकी मुलाखती, कविता अशा प्रकारची ठेवावीत. कादंबर्‍या, कथा, निरनिराळ्या विषयांतली ललित पुस्तके, इतर कोणतीही पुस्तके - ज्यांच्याबद्दलची जनमानसातली आवड+क्रेझ+अकारण उत्सुकता+लेटेस्ट फॅशन आणि ज्यांच्याबद्दलची तुमची आवड+क्रेझ+आपुलकी यांचे प्रमाण सारखे असेल - बैठकीच्या खोलीतून सहसा दिसणार नाहीत, अशा प्रकारे आवरून ठेवावीत. तसे न केल्यास दोन परिणाम संभवतात. 'ही सगळी पुस्तकं वाचून झाल्येत तुझी?' असा अडाणी प्रश्न. किंवा मग 'मी नेतो हे. वाचायला पायजे माण्साने.'छाप उद्धट आक्रमण. त्यामुळे हा नियम प्राथमिक महत्त्वाचा.
- चुकून एखादे जिव्हाळ्याचे पुस्तक बाहेर राहिले आणि कुणी 'कसे आहे रे हे' अशी पृच्छा केलीच (या प्रकारची पृच्छा करणारे लोक सहसा एकीकडे हाताने पुस्तकाची पाने पलटवत असतात. जसा काही एका दृष्टिक्षेपात त्यांना पुस्तकाचा आवाका कळणार आहे आणि त्यांच्या मताची निव्वळ खातरजमा करून घेण्यासाठी ते तुम्हांला तुमचे मत विचारताहेत), तर 'छे, बंडल आहे एकदम.' (तुच्छतापूर्ण आवाजात) किंवा 'हम्म्म्म्म.... डिपेण्ड्स..' (विचारमग्न मुद्रा करून), 'ठीकाय... पण तू बोअर होशील... फार चावलीय बाई...' (आवाजात उसन्या तुच्छतेने युक्त असा जिव्हाळा आणून) असे एखादे वाक्य फेकावे.
- शक्यतो पुस्तकांना कव्हरे घालावीत. मग ती वर्तमानपत्राची का असेनात. कव्हर जितके अनाकर्षक असेल, तितके उत्तम, जेणेकरून लोक उत्सुकतेने माना वाकड्या करकरून - किंवा आगाऊपणाने ('हम्म... तेलविहिरी. वाचाय्ला इतका वेळ कसा रे मिळतो?') - पुस्तकाबद्दल भोचक प्रश्न विचारणार नाहीत.
- इतके सगळे करूनही कुणी चिकाटीने पुस्तक मागतच राहिले, तर कधीतरी ते द्यावे लागते. कधी कधी वाचनाचा तात्कालिक किडा चावलेले लोक हावरटासारखे एकदम दहा-बारा पुस्तके उसनी नेऊ पाहतात. त्यांना वेळीच ठेचावे लागते. अशा वेळी शक्य तितका तुसडेपणा करून 'मला तमक्याला द्यायचे आहे, झाले की लगेच दे', 'हे झाले की परत दे, मग दुसरे देईन' किंवा 'हे नाही तुला आवडणार...' असे काहीतरी बोलण्याचे कौशल्य आत्मसात करून ठेवावे.
- पुस्तक नेणार्‍यांतले पुष्कळसे लोक ते सोईस्कर विसरून जातात, 'देऊ की, आहे नीट ठेवलेलं. काय घाई आहे?' असे आपल्यालाच उद्दामपणे विचारतात, किंवा चक्क 'कुठेतरी गेलं रे ते. तमक्या त्या ह्यानी नेलं वाट्टं..' असे निर्लज्जपणी सांगतात. अशा लोकांची आपल्या ब्ल्याकलिस्टीत कायमची नोंद करून ठेवावी.
- काही लोक मात्र आठवणीने पुस्तक परत आणून देतात (कधीकधी भोचकपणे ब्राउन कलरचे कव्हर घालून देतात. बहुधा हे लोक गटणे वर्गातले.), बरे वाटले - नाही वाटले ते भरभरून सांगतात, त्यांच्याकडे असलेले एखादे विशेष पुस्तक आपल्याला देऊ करतात. अशी माणसे कुठल्याही लक्षणांखेरीज प्रथमभेटीतच ओळखणे सरावाने जमते. त्यांच्याशीच देवघेव व्यवहार करावेत. बाकी जग आपल्याला हळूहळू शिष्ट म्हणून ओळखू लागतेच, त्यांच्याकडे चश्मिष्ट+शिष्ट नजरेने चश्म्याच्या कडेवरून पाहून दुर्लक्ष्य करावे.
- अलीकडे पुस्तकांच्या फुकट मऊप्रती मागण्याची टूम आहे. बरे, मागण्याची पद्धतही खास. 'हा आमचा मेलायडी. आम्हांलापण धाडा.' असा हुकूमच करतात. अशा लोकांना एकेकदा मऊप्रत धाडावी. पुन्हा अशी विनंती (हुकूम) झाल्यास आधीच्या पुस्तकावर चाचणीवजा प्रश्न विचारावेत. वाचन झाल्याचे दिसले, तरच पुढले धाडावे. नाहीतर 'बाहेर आहे', 'मेल जात नाही', 'फाईलसाइज जाम आहे' असे बिनदिक्कत दडपून द्यावे. गूगल देवाने सर्वांना दिले आहे. ज्याला हौस आणि खाज असेल, त्याला मऊ प्रत मिळावयाची राहत नाही हे पक्के ध्यानी धरावे.
पुस्तके आणि आपण सुखी राहावे.

Sunday, 6 May 2018

एकच अणकुचीदार दगड

एखादा अणकुचीदार दगड उचलून
तिरीमिरीत भिरकावीन तुझ्या कपाळावर
लालबुंद रक्ताची धार लागेल
चकित होऊन पाहत राहशील तू काही क्षण

ते क्षण कुलूपबंद करून ठेवीन
समजूतदार, अचल, स्थितप्रज्ञ भव्य कपाळ घेऊन
जेव्हा जेव्हा उभा ठाकशील,
त्या त्या सगळ्या वेळांना
मी त्या चकित भावांचा स्क्रीनशॉट ठेवणीतून काढून बघत राहीन

पुन्हा पुन्हा विचारशील एकच प्रश्न
मी उत्तरणारच नाही
हळूहळू तडे जातील तुझ्या बर्फगार सज्जनपणाला
तीक्ष्ण रागाच्या चमकत्या धारदार कळ्या उमलतील

हलकेच पुढे होऊन खुडून घेईन त्यांच्या पाकळ्या माझ्या ओठांनी
रागलोभप्रेमद्वेषमत्सरविरक्तीस्थितप्रज्ञाआसक्ती...
सगळ्यांच्या सीमा एकमेकींत मिसळत जातील

एकच एक उत्कट रसायन उकळू लागेल आपल्या दोघांच्याही प्रदेशांत
धडका घेईल आपल्या भिंतींवर
सगळे शहाणपणाचे बंधारे कोसळू लागतील कडकडा

महापूर येईल लालबुंद
वाहून जातील संभ्रमांची शहरंच्या शहरं
खळाळत्या पाण्याचा आवेग सगळं पोटात घेईल.

एकच अणकुचीदार दगड
बस.