Tuesday 3 April 2018

चार दिवस, चार कविता

आपण एखादी कविता वाचतो, ऐकतो; तेव्हा तिच्यातले शाब्दिक खेळभाषाशैली, अलंकारांची गंमत... इतकंच अनुभवत नसतो फक्त. आपल्या आयुष्यातला कुठलातरी अनुभव, कुठलातरी काळ, कुठलीतरी आठवण त्या कवितेशी नातं सांगत असते. कविता ऐकता-वाचताना नकळत पार्श्वभूमीमधून जागी होऊन पुढे येऊन उभी राहत असतो. तिच्याशी आपण कवितेचं मॅपिंग करतो. दोन्ही आपल्या डोक्यात एकजीव होऊन जातात.  मग तिथून पुढे कधीही कविता ऐकली, की आपल्या डोक्यात हे सगळं एकसंधच जागं होतं. एखादी कविता मी जेव्हा वाचून वा म्हणून दाखवते, तेव्हा मी माझ्या डोक्यात तिला लगडून असलेल्या अनुभवाबद्दलही सांगितलं तर? 

मी तसं केल्यामुळे इतरांच्याही कविताविषयक आठवणीत माझी आठवण ओवली जाईल

मला माहीत नाही. ते पाहायचं होतं म्हणून हा प्रयोग फेसबुकावर केला. तो इथे एकत्र करून ठेवते आहे.

***

सखे गं सये

मैत्र हे या कवितांमागचं सूत्र आहे.

प्रतिमा कुलकर्णींच्या सगळ्याच मालिका फार आवडीनं, समरसून पाहिल्या. इतकं साधंसरळ, आपल्या आयुष्यातलाच तुकडा वाटेलसंजिवंत काही टीव्हीवर हल्ली मिळणं तर अशक्यच आहे. पण तेव्हाही तो तसा अपवादात्मकच अनुभव होता. त्यांपैकी अंकुरही शेवटची मालिका. सुखासुखी चाललेलं, तृप्त गृहिणीचं आयुष्य तसं कुठलंच मोठं फिल्मी कारण घडलेलं नसताना सोडून देऊन निघालेल्या एका बाईची गोष्ट होती ती. आत्मशोध, आत्मभान, स्वाभिमान वगैरे ठरीव रस्त्याला ती गेलीच असती, पण प्रतिमा कुलकर्णींच्या शैलीत ते पाहायला मजा आली असती फार. तोवरच्या त्यांच्या सगळ्या मालिकांमध्ये एकत्र कुटुंब, प्रेमळ-समंजस वडीलधारी माणसं अशी सूत्रं होती आणि घर मोडून बाहेर पडणारी बाई पहिल्यांदाच गोष्टीची नायिका म्हणून दिसत होती. शिवाय सीमा देशमुख ही मला अतिशय आवडणारी पण फार कमी दिसणारी नटी त्यात बर्‍यापैकी मोठ्या भूमिकेत होती. त्यामुळेही उत्सुकता. पण त्या बाईचं काय होतं, हे काही कळायलाच नाही. जेमतेम काही आठवडे प्रदर्शित होऊन, मग ती मालिका अर्ध्यातच बंद पडली.

त्या मालिकेचं शीर्षकगीत म्हणून मिळालेली ही कविता. तिची आठवण काढताना लक्ष्यात आलं, आपण ही कविता कधीच वाचलेली नाहीकायम ऐकलीच आहे. आठवणीतही ती कायम ऐकूचयेते. जात्यावर बसून संथ, गोड सुरात सूर मिसळत गाणार्‍या बायकांचं चित्र डोळ्यासमोर उभं राहावं; अशी तिची चाल आहे. दुःखाचं भांडवल न करणारी, हसरी, हातात हात गुंफून घेणारी आणि तरीही स्वतःत मश्गूल असलेली.

अलीकडे इंटरनेटरूपी स्फोट आयुष्यात झाल्यावर अनेक नवनवीन मैत्रं मिळाली. त्यांतल्या बोलभांड, आक्रस्ताळ्या, कर्तबगार, आगाऊउत्कट, खट, ढालगज, खंबीर, खमक्या, बिनधास्त, सातमजली खिदळू शकणार्‍या आणि शहाण्यासुरत्या अशा अनेक मैत्रिणींशी गप्पा ठोकताना मागे हे गाणं वाजत असल्याचा भास मला कायम होत आला आहे. 

# सखे गं सये

सखे गं सये, गाऊ या आता

आनंदाची गाणी गं

आतल्या आत, पिऊन टाकू

डोळ्यांतले पाणी गं

पाण्यावर त्या, एक नव्याचा

फुटेल अंकुर गं

विसावयाला, एक नव्याने

मिळेल माहेर गं...

माहेरी जाऊन, एकदा फिरून

लहान होऊ या गं

धरून आईच्या बोटाला, नवे

पाऊल टाकू या गं

मायेच्या गावा, मळभ सारे

क्षणात विरेल गं

मनातले जे, येईल ओठी

होईल सुरेल गं

तेजाची भाषा, नवीन आशा

डोळ्यांत हसेल गं

भल्याआडचे, बुरेही तेव्हा

सहज दिसेल गं
  
राजहंस तो, सहज ओळखी

मोत्यांमधले पाणी गं

फक्त विणकरा, ऐकू येती

धोट्यामधली गाणी गं

निःशब्दाच्या, कुशीत अलगद

गूज नव्याचे रुजते गं

स्वागत करण्या, त्याचे अन् मग

सृष्टी सारी सजते गं

तुला नि मला, दावील दिशा

एक स्वतःचा तारा गं

शोधून त्याला, जिंकून घेऊ

खेळ हा सारा गं...


-   मिलिंद जोशी, ‘अंकुरचं शीर्षक गीत, झी टीव्ही मराठी, 

***

मैत्रीच्या भुताचे दशावतार किंवा असंच काहीतरी

ही कविता मला वाचल्या वाचल्या कळली नाही. पण त्या शब्दरचनेचा आपला असा एक नाद, ताल होता. तो आकर्षक वाटला. त्याहून हॉन्टिंग् वाटला, तो 'सावध स्तोत्रांच्या फैरी' हा प्रयोग. त्या देठासकट कविता डोक्यात राहून गेली. ती सदेह भेटली, पुष्कळ वर्षांनंतर. 

तनमनधन अर्पून एक काम करत होते. अनेकांनी मिळून करायचं असलेलं एक काम. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे काम तर इंट्रेष्टिंग, आव्हानात्मक होतंच. पण ज्यांच्यासोबत ते करायचं, ते लोकही घट्ट मित्र झालेले. एकमेकांवर विसंबणं, नात्यावरच्या परिणामांची पर्वा न करण्याची चैन परवडून आपले मुद्दे लावून धरणं, त्यासाठी भांडणं, एकमेकांना गृहीत धरणं, नंतरच्या चिंतनबैठकांत भांडणं पेल्यात बुडवून पुन्हा खिदळणं .. या, मला अस्सल मैत्रीचा अविभाज्य भाग वाटणाऱ्या, गोष्टीही कामाचाच भाग असल्यासारख्या. त्यामुळे एरवी आपण स्वतःचा हळवेपणा जपण्यासाठी जी अंतरं बाळगण्याची खबरदारी घ्यायला शिकलेले असतो, ती अंतरंही मी कापून टाकलेली. अखेरच्या टप्प्यावर एक भांडण असं झालं, की मी एका बाजूला आणि इतर सगळे एका बाजूला. हेही ठीकच होतं. खरं भोसकून गेलं, ते माझ्या हेतूंबद्दलच शंका घेणं, त्यांत इतर कुणी अवाक्षरानं हस्तक्षेप न करणं आणि या तांत्रिक मतभेदाआड आपण आपल्यातलं किती काय-काय कायमचं ठार करतो आहोत, याची तत्किंचितही तमा न बाळगणं. 

मैत्री असते खरी. पण ती दुहेरीच असते असं नव्हे. म्हणून तर लोक अस्तासमयी स्तोत्रांच्या सावध फैरी झाडून अंतरं बाळगून असतात, याचा साक्षात्कार होऊन मला ही कविता नीटच 'झाली'! तिच्या पहिल्या सहा कडव्यांत - अशाच कसल्याश्या धक्क्याबद्दलचा अविश्वास आहे. अजूनही झालंय त्याचा स्वीकार मन करत नाहीय. स्वतःशीच सवालजवाब सुरू आहेत. पण सातव्या कडव्यात कवीला एकदम यातली अपरिहार्यता कळते नि तो एकतर्फी उत्कटतेचे परिणाम स्वीकारतो. उदार, मोकळा स्वीकार नाही तो. कडवट चव आहे त्याला. पण मोठं होताना तीही चव अपरिहार्यच.

# मैत्रीच्या भुताचे दशावतार किंवा असंच काहीतरी

ते नाते कधीच नव्हते
मैत्रीचे कसले बंध?
वार्‍याला अजून स्मरतो
सुकल्या जाईचा गंध

मी उगीच भावुक होतो
मैत्रीस समजून नाते
वार्‍याशी खेळुन सुकते
रानात तृणाचे पाते

कुठल्या नियमाच्याधारे
मैत्रीचे नाते व्हावे?
वाहणे सुकेना म्हणुनी
पाण्याने पारा व्हावे

मौनाने स्पष्ट करावा
मस्तकात भिनला पारा
तुज मात्र सोडून भगवा
वाटला अबोली तारा?

वागेन कसाहि कधीही
हे बंधन अतूट गमते
डोहात ठरेना तारा
अन रिती अंजली भिजते

का मला कधी ना कळले
मैत्रीचा नसतो रस्ता
मग धूमकेतू दुरूनी
सूर्याशी आला नसता

त्या रस्त्यावर भर दिवसा
मी मुक्त मनाने हसलो
फसलो मी, कळले मी त्या
सूर्याला मित्र समजलो

मग हेही मला उमगले
सूर्याला नाही वैरी
त्याच्या अस्ताशी झडती
स्तोत्रांच्या सावध फैरी

तेव्हा मैत्रीची सारी
व्याख्या एकेरी झाली
एकाची मैत्री झाली
एकाने मैत्री केली

ना कधी गायली कोणी
मैत्रीची सहस्र नावे
मंतरल्या काळासाठी
'भूत' एवढेच म्हणावे

- ए सेन मॅन

***

#तेव्हा काय कराल?

ही कविताही मला पहिल्या वाचनात भिडली नाही. त्यातली हताश, हसरी, अपार खिन्नता तेवढी नोंदून घेतली. पण 'काय घडलं असेल या मित्रांच्यात?' असा प्रश्न अनुत्तरित राहिला आणि मी तिचा नाद सोडून दिला.

पुढे आमची भेट व्हायची होती.

कधीकधी काही मैत्र्या इतक्या घट्ट होतात, की मित्रांचं स्वतंत्र अस्तित्व आपण जणू विसरूनच जातो. तशातली ती मैत्री. सतत बारा महिने चोवीस तास चालणाऱ्या गप्पा. सल. स्वप्नं. दुखऱ्या आणि हसऱ्या जागा. खवचटपणा. टारगटपणा. उद्धटपणा. हलकटपणा. एकटेपणाच्या आणि दुकटेपणीच्या भित्या. सगळंच एकमेकांशी शेअरलेलं. एकमेकांच्या निर्मितिप्रक्रियांमध्येही पाय घालून असण्याइतकी जवळीक. असा मित्र एकाएकी, कोणत्याही दृश्य कारणाविना, स्पष्टीकरणाविना, उत्तराविना आयुष्यातून चालता झाला, तर काय करायचं असतं

माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. धक्का, अविश्वास, अपराधभाव, संताप, आत्मटीका, दुःख, कुतूहल, मित्राचं त्याही टप्प्यावर समर्थन करू पाहणं, स्वतःचाही राग येणं, आत्मविश्वास गमावणं, अहंचा फणा निघणं, त्याच्या जोरावर शंकाकुशंकांवर मात करणं, दुखऱ्या जागा होत्या का नव्हत्याशा करत पान उलटून टाकणं... असं सगळं पायरीपायरीनं बयाजवार झालं. 

आणि एके दिवशी गृहस्थाचं पत्र दत्त म्हणून उभं. मधली वर्षं जणू उलटलीच नाहीत, अशा आविर्भावात. पुन्हा अविश्वास ते स्वीकार व्हाया संताप असा प्रवास करून त्याला जे उत्तर लिहिलं, त्यात ही कविता लिहिली. 

नक्की काय झालं असेल, हा प्रश्न तसा फारसा महत्त्वाचा नसतोच हे आम्ही एव्हाना शिकलो होतो.

#तेव्हा काय कराल?

मित्र दारात येतो, घरात येत नाही,
मित्र बोलत राहतो... कळू देत नाही,
मित्र ओळख नाकारतो दिवसाच्या कोलाहलात,
मित्र आठवण नाकारतो रात्री एकटं असतानाही

मित्र शत्रूसारखाच होत जातो दिवसागणिक...
आणि पूर्ण विचारान्ती, नाही आवेगात क्षणिक.
दु:ख त्याचे खरे, नुसत्या दुराव्याचे नाही,
असूयेचे गाणे म्हणे असेच जन्म घेई

अशा मित्रास तहान लागेल सहवासाची, तो दाबेल,
अशा मित्रास जायचे असेल पुढे पुढे, तो जिंकेल,
अशा मित्रास तुम्ही द्याल हिरवा चारा, तो फसणार नाही,
मित्रासाठी व्हाल तुम्हीच निवारा, तो थांबणार नाही

तो चालत सुटेल अशा वेगात,
की तुम्ही ऐलतीराशी तर तो क्षितिजापार,
जाताना नेईल तुमचे असे एकच गाणे,
की तुम्ही निराधार... तर तो निर्विकार

मित्र जसजसा होत जाईल शत्रू, तसे तुम्ही काय कराल?

मित्र ओळख नाकारेल.... दुखावले जाल, पण मग घ्याल समजुतीने.
मित्र आठवण नाकारेल एकान्तातही... हराल तुम्ही समग्रतेने.
मित्र जाऊ लागेल क्षितिजापार, तुम्ही हसाल नुसते

आणि क्षितिजापार असलेल्या लाटेवर, मित्रावर
उतरेल दिवस-रात्रीच्या पलीकडची सायंकाळ
आणि मग जेव्हा मित्र हलेल, हरेल,
बोलावेल तुम्हांला पुन्हा एकदा,
कवळेल तुम्हांला पुन्हा एकदा,
अशा बोलीत, की जणू हीच तुमची पहिली भेट!

...तेव्हा काय कराल?
सांगा! तेव्हां काय कराल?

-    डॉ. आशुतोष जावडेकर, साधना, दिवाळी २००८

***

समोर हिरवंगार जंगल

एरवी अनुभव भेटतो आणि मग नेपथ्यात निर्जीव असलेली कविता सजीव होऊन त्या अनुभवाच्या हात हात घालून नव्यानं भेटते. 

पण या कवितेच्या बाबतीत हे पार उलटंपालटं होतं कायम. 

नंतर भांडणाची फिल्म पाहिली तर आपण शरमेनं मरून जाऊ अशा पातळीचं, खूप आक्रस्ताळं भांडून, शिव्याशाप देऊन, हात आवरून धरून, रडकुंडीला येतो आपण पार. आता या माणसाचं तोंडही पाहणं नको. बस करू या. अशी अवस्था. पण कडेलोटाच्या क्षणी भीती वाटते खूप. मग मागे फिरून, शरम गिळून, पुन्हा धरू पाहतो आपण समोरच्या माणसाचा हात. राग नि शरम नि असहायतेचं-अपमानाचं रडू नि प्रेम हे सगळं एकमेकांत ओळखू न येण्याइतकं मिसळून गेलेलं. समोरच्याचीही अवस्था फार निराळी असते असं नव्हे. पण आपण आपल्यातच इतके चूर, की कशाची शुद्धच नसते. 

नशीब बरं असेल, तर कधीतरी भांडण संपतं.

अशा भांडणांनंतर एकमेकांच्या कुशीत विसावताना फक्त अपरंपार दमणूक जाणवत असते. बाकी काही जाणवत नाही, म्हणावंसं वाटत नाही, करावंसं वाटत नाही. खूप रडून गेल्यावर पुढेही काही वेळ येत राहतात, तसे कोरडे हुंदके येत राहतात फक्त. असा एक हुंदका येतो नि तो आपला नसल्याचं लक्ष्यात येतं, तेव्हा मात्र हलकंसं हसू फुटतं.

ही माझी कविता पुन्हा वाचताना मला कायम त्याच जातीचं हलकंसं हसू फुटत आलं आहे.

# समोर हिरवंगार जंगल

कोण चूक कोण बरोबर काय न्याय काय अन्याय कसले हिशेब कसले जाब कसले जबाब -
दे सगळे हलकेच सोडून
नि पाहा समोर पसरलाय अथांग वैराण प्रदेश दगडधोंड्यांचा नि उन्हातान्हाचा नि सपाट उजाड माळरानांचा नि लालबुंद सोनेरी सूर्यास्तांचा आपल्यासाठी - एकेकट्या असलेल्या आपल्यासाठी.
छातीत दाटून गच्च झालेला तो भीतीचा नि दुःखाचा हुंदका हळूहळू अगदी हळूहळू सैल करत ने,
पाहा, माझ्या स्पर्शातून कळेल तुझ्या आतल्या सगळ्या सगळ्या भित्यांना आणि शंकांना आणि प्रश्नांना, की त्यांना एकटं वाटायची गरज नाहीय आता.
अजून एका जिवालाही हे सगळं प्राणांतिक वाटतंय.
त्या सगळ्या प्रश्नांना सापडू देत अजून काही प्रश्न, मग निघून जातील ते एकमेकांच्या सोबतीनं इथेच कुठेतरी.
मग आपण उरू
आणि हे सारं उरेलच तरीही.
एकटे असू आपण दुकटे असूनही.
पण आता संध्याकाळीतली हुरहूर जाईल निवून.
हातात एक घामेजलेला हात असेल
आणि समोर हिरवंगार जंगल.

No comments:

Post a Comment