Friday, 14 March 2025
दिसामाजी काहीतरी : अंतर्जनम : देवकी निलयगोडे
शांत काळोखाचे तुकडे
आमचं घर तेव्हा शहरातल्या टेकडीसदृश भागात होतं. त्यातही चौथा मजला. एका बाजूच्या खिडकीतून उतारावरची एक सरकारी इमारत आणि तिचं प्रशस्त आवार दिसायचं. त्यात झाडं चिकार. जांभळाची, आंब्याची, वडाची, शिरीषाची जुनी-मोठाली-गर्द झाडं. तिथून पोपटांचे थवे उडताना दिसायचे. पूर्वेकडच्या खिडकीतून डोंगर. सूर्योदय तर दिसायचाच. पण त्याहून जास्त अप्रूप वाटायचं ते त्या दिशेनं अपरात्रीच्या वा पहाटेच्या शांततेत ऐकू येणार्या ट्रेनच्या भोंग्याचं. गच्चीवरून सगळं शहर दिसायचं. मामा-भाच्याच्या डोंगरापासून ते तेव्हा नव्यानं बांधल्या जाणार्या महापालिकेच्या इमारतीपर्यंत आणि त्यालगतच्या शेताडीपर्यंत. वीसहून जास्त मजले असणार्या इमारती मोजक्याच. बाकी सगळं शहर आपल्याहून बुटकं. नजरेच्या एका फेरीत न्याहाळता येणारं. उन्हाळ्यातल्या बहुतेकशा रात्री चटया नेऊन गच्चीत पसरायच्या आणि गप्पा ठोकत लोळायचं. हळूहळू उगवत जाणार्या चांदण्या. एखादाच मागे राहिलेला चुकार बगळा. मधूनच येणारी वार्याची झुळूक. पौर्णिमेला आख्खाच्या आख्खा गरगरीत चंद्र. कोजागिरीला सोसायटीतले लोक जमून भेळ करायचे, मसाला दूध प्यायचे, आणि गाण्यांच्या भेंड्या खेळायचे. शहरात तेव्हा आकाश विझवून टाकणार्या प्रकाशाच्या ओकार्या टाकलेल्या नसत. उजेड आणि आवाज असायचा, पण सोबत करणारा.
दिवाळीच्या आसपास हवेत गारवा यायचा आणि होळीपर्यंत टिकायचा, जूनच्या पहिल्या-दुसर्या आठवड्यात पाऊस कोसळू लागायचा, मे-महिन्यात घामाच्या धारा लागायच्या. पण एसीवाचून जगणं शक्य होतं.
रस्ते डांबरी होते. त्यात सिमेंटचा तोबरा भरायचा अद्याप शिल्लक होता. रस्त्यांच्या कडेनं ऐन शहरातही मधूनच माजलेल्या रानाचे हिरवे तुकडे लागायचे. तिथे चिकनखडे, खाजकुयली, एरंड, आणि कसलीकसली अनाम झाडंझुडपं माजलेली असायची. पावसाळ्याच्या सुरुवातीला तिथून हमखास बेडकाचा आवाज यायचा. श्रावणातलं ऊन पडल्यावर अशा रानगट तुकड्यांवर चतुर भिरभिरताना दिसायचे. खूप पाऊस झाला, की चाळींसमोरच्या अंगणांमधून पाणी तुंबायचं आणि मोरीत गांडुळं दिसायला लागायची. लोक खडेमीठ घालून त्यांना तडफडवून मारायला धावायचे.
.
ऑफीस टाईमचे दोन-अडीच तास सोडून प्रवास केला, तर रेल्वे-बसमध्ये बसायला खिडकीची जागाही मिळू शकायची. स्टेशनाबाहेरचं एखाद्या किलोमीटरचं वर्तुळ रिक्षावाल्यांनी गिर्हाइकांवर नि गिर्हाइकांनी रिक्षांवर झडप घालण्यासाठी राखीव नसे. त्यासाठी रांग लावण्याची बावळट पद्धत होती. लोक गावी जाण्याकरता एसटीची तिकिटं काढायचे. गर्दीच्या दिवसांत त्याकरता एसटीत काम करणार्या कुणाचीतरी ओळख काढून ज्यादा गाड्यांची तिकिटं मिळवायचे. अर्थात, गर्दीचे दिवस अशी एक वेगळी कॅटेगरी तेव्हा होती. एसटीचा तेव्हा 'लाल डब्बा' झाला नव्हता, तसंच सर्विस रोड्स आणि बारक्या गल्ल्यांची हक्काची पार्किंगंही झाली नव्हती. तितक्या चारचाक्याच नव्हत्या. त्यामुळे निदान मुंबईतल्या मुंबईत कुठूनही कुठेही तासा-दीड तासात पोचता यायचं. पावसामुळे लोकल ट्रेन्स बंद पडणं आणि अपघातामुळे वा कुणा नेत्याच्या भाषणामुळे रहदारी तुंबणं ह्या तशा क्वचित घडणार्या घटना होत्या.
माघी गणपती आणि नवरात्रातली देवी शहरात तेव्हाही बसत. पण त्यांची ठिकाणं मोजकीच आणि ठरलेली असायची. तिथल्या जत्रा अपूर्वाईच्या वाटायच्या. त्यातल्या कागदी पिपाण्या, पत्र्याच्या बेडक्या, वेताचे उघडमीट करणारे साप आणि धनुष्यबाण, मोठाल्या चक्र्या… हे सगळं वर्षाकाठी एखाद्दुसर्या वेळीच दिसायचं. रामनवमीला लोक सुंठवडा खायचे आणि तिन्हीसांजेला देवासमोर दिवा लावताना रामरक्षा पुटपुटायचे. रामाच्या देवळातला राम तेव्हा शालीन आणि सोज्ज्वळ ‘रामराणा’ होता, रामरक्षेची ‘पब्लिक अॅक्टिविटी’ अद्याप व्हायची होती.
घरोघरी लॅंडलाईन फोन आले होते. पण बाहेरगावी फोन करायचा, तर रात्री नऊनंतर सवलतीच्या दरात बोलता यायचं, त्यामुळे तेव्हा बाहेर पडून एसटीडी बूथ गाठला जायचा. परदेशी फोनबिन अपूर्वाईचीच गोष्ट. कुणीकुणी पेजर्स लटकवून शायनिंग मारणारे लोक दिसायचे. मोबाईल फोन येऊ लागले होते, पण सगळी भिस्त मिस्ड कॉल्स आणि एसेमेसवर असायची.
सिंगल स्क्रीन थिएटर्स जिवंत होती. फटाक्यांची माळ लावल्यावर ती जशी पुढे पेटत-तडतडत आणि मागे विझत-जळलेली दारू सोडत जाते, त्या धर्तीवर वाढत्या शहराच्या वेशीपल्याड उघडणार्या आणि मागे ओसाड पडत जाणार्या मॉल्सच्या माळेचा जन्म नुकता कुठे होऊ लागला होता. त्यामुळे पॉपकॉर्न्सच्या किमती सिनेमाच्या तिकिटापेक्षा कमी असायच्या.
ही सगळी मुंबईपासून जेमतेम पाऊण तासाच्या अंतरावर असलेल्या उपनगरी भागातली गोष्ट. काळाच्या पोटातही फार लांबची नाही बरं का, जेमतेम वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट.
पार 'बटाट्याच्या चाळी'तलं शेवटाकडचं कढकाढू चिंतन वाटतं ना हे? आय नो. मला कल्पना आहे. हे सगळं निव्वळ स्मरणरंजनामुळे छान-छान वाटत असेल अशी एक शक्यता नाकारता येत नाही.
आपल्या भारतीय मनाला गतकातरतेची चूष तशीही असतेच. आपल्याला कायम त्रेतायुगातल्या गोष्टी आदर्श आणि थोर्थोर; तर सध्याचं सगळंच भ्रष्ट भासत असतं. या खास भारतीय घडणीचाही थोडा भाग असेल. शहरी-सवर्ण-सुशिक्षित-कमावत्या अशा माझ्या सांस्कृतिक भांडवलामुळे ‘भरल्या-पोटी माझं सुख दुखतंय' असंही थोडं असू शकेल. सगळंच थोडथोडं शक्य आहे, थोडं खरंही आहे. सगळं नकारात्मकच आहे, असंही नाही. निदान माझ्यासारखं थोडंफार सांस्कृतिक भांडवल असलेल्या लोकांच्या हाती थोडा पैसा खेळू लागला आहे, बरीच वैद्यकीय प्रगती झाली आहे, जनसंपर्काच्या सोयी वेगवान झाल्या आहेत, त्यांनी अंतराच्या मर्यादाही ओलांडल्या आहेत, संधींची रेलचेल झालेली आहे, शिक्षणाला अनेकानेकानेक वाटा फुटल्या आहेत, परदेशगमन सोपं झालं आहे, आईबापांना त्यांच्या नोकर्यांच्या अखेरच्या काळात मिळणारे पगार पोरांना पहिल्या नोकरीत मिळू लागले आहेत. हे सगळं आहेच.
असेलही माझी बोच निखळ स्मरणरंजनी. पण सार्वजनिक अवकाशाचं काय? माझ्या आजूबाजूचा, अवघ्या पाव शतकाच्या कालावधीत आमूलाग्र बदलून गेलेला शहरी अवकाश तर खरा आहे? तो मला भेदरवून, घुसमटवून, चिरडून टाकतो आहे.
मला लक्ष वेधायचं आहे ते भयानक वेगानं काँक्रिटाइज झालेल्या, उजेडानं लखलखलेल्या, आवाजानं दणाणून गेलेल्या, अमानुष गर्दीनं वेढल्या गेलेल्या, रहदारीनं-सांडपाण्यानं तुंबणार्या आपल्या सार्वजनिक अवकाशाकडे. मी गावाकडच्या 'निसर्गरम्य' अवकाशाबद्दल बोलत नाहीय. वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच्या शहरांबद्दल बोलतेय. ती आत्ता-आत्तापर्यंत वेगवान, पण सौम्य आणि जैविक होती. ती विषम विकासानं बरबटत, अमानुष, बकाल, कृत्रिम होत गेली आहेत; दिवसेंदिवस अधिकाधिक वेगानं होताहेत.
गेल्या सहस्रकापर्यंत हडप करायला, विकायला, नफा करून घ्यायला भौतिक आणि मालकी हक्क असलेल्या गोष्टी लागायच्या. भूखंड लाटले जायचे. आता भूखंडच काय, साधी खेळाची मैदानं, बागा, खाड्यांकाठची कांदळवनं, आणि तळ्यांच्या काठी स्वतंत्र जैवसाखळी वागवणार्या पाणथळ जागाही हडप करून संपलेल्या आहेत. पिण्याचं पाणी तर कधीच विकायला निघालं. शहरांमध्ये मास्क लावून फिरण्याची सवय कोव्हिडकाळानं लोकांना आयती लावून दिली, त्यामुळे शुद्ध हवा हीदेखील चैनीचीच बाब झाली आहे. मग बळकावायला उरलं काय?
आता अमूर्त आणि विकत न घेता येण्याजोग्या गोष्टी बळकावल्या जातायत. नाही पटत? विचार करून बघा.
बिनदिक्कत कुठेही आणि कितीही आवाज करा. कुणीही तुम्हांला जाब विचारू शकत नाही. तुमच्या भागातल्या नगरसेवकाचा उजवा हात असलेल्या कुणा अमुकजी तमुकजी साहेबांच्या वाढदिवशी रात्री बारा वाजता फटाके वाजवून शुभेच्छा द्यायच्यात? अवकाश तुमचाच आहे. गणपती, नवरात्र, आणि थर्टीफर्स्ट तर हक्काचेच होते. सव्वीस जानेवारी नि पंधरा ऑगस्टची देशभक्ती लाउडस्पीकरवरून 'ए मेरे वतन के लोगों' आळवल्याशिवाय पूर्वीही साजरी होत नसे. पण आता सार्वजनिक अवकाशात असताना आपला गळता मोबाईल आपल्या कानातल्या बोंड्यांपुरता ठेवावा ही अपेक्षा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्कांवरचं आक्रमण वाटतं. साधा मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळचा वॉक? इच्छा असो वा असो, ठिकठिकाणी स्पीकर्स लावून फिरता फिरता कानावर गाणी पडतील अशी सोय केलेली असते. तेवढ्यावर थांबायची गरज नाही. घरी हळद आहे? आणवा डॉल्बीची भिंत. गल्लीत सत्यनारायण घालायचाय? बसवा भटजीला पूजा सांगायला माइकच्या बोंडक्यापाशी. सगळ्या गल्लीवर करा पुण्याची बरसात. होऊ द्या खर्च! शांतता आपल्याच तीर्थरूपांची आहे.
बचाबच उजेड करा. दुकानांसमोर मोठाली झाडं आहेत? सुमडीत रात्रीबेरात्री एखादं इंजेक्षन टोचा. महिन्या-दोन महिन्यात झाड वठून मरतंय. तुम्ही दुकानावर रोषणाई करून गिर्हाईक खेचायला मोकळे. ते जमत नसेल, तर झाडावर अंदाधुंद लायटिंग तरी करा. इतकी सोय दिलीय निसर्गानं, ती वापरा. एखादी मोठीशी इमारत पुनर्विकसनासाठी घेतलीय? त्याच्या बाहेरच्या भिंती मोठाल्या चोवीस-तास-चमकत्या जाहिरातींसाठी वापरून टाका. झगमगवून टाका रस्ते अहोरात्र. आयुष्यातला अंधार मिटवून टाका. प्रकाशाकडे चला. महामार्ग आणि उड्डाणपूल तर बोलूनचालून गाड्यांतून जाणार्या लोकांना जाहिराती दाखवण्यासाठीच असतात, एरवी इतक्या रहदारीत तुंबलेलं असताना त्यांचा वेळ जायचा कसा? सगळीच्या सगळी दर्शनी जागा जाहिरातींसाठी विका, झगमगवा. उजळून टाका आसमंत. निऑन साइन्स लावा, फ्लड लाइट्स सोडा, लेझर किरण वापरा. चंद्र आणि ताऱ्यांसारख्या मागास गोष्टी इथं कुणाला बघायच्या आहेत?
लोकांपाशी असलेला स्वस्थ वेळ हीदेखील आता एक हडपण्यायोग्य कमॉडिटी आहे. कसं करायचं हे माहितीय? प्रादेशिक भाषांमधून सिरियली आणवा तिन्हीत्रिकाळ चालणार्या. त्याही आपल्या समृद्ध सोनेरी पुराणांवर आधारित असलेल्या वा आध्यात्मिक सत्पुरुषांच्या चमत्कारांचं दर्शन घडवणार्या असतील तर सोन्याहून पिवळं. गल्लोगल्ली दिवाळीपहाटसदृश पण शक्य तितक्या फुकट्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी होऊ द्या. तसंही आपल्याला कुठे द्यायचं आहे सभागृहाचं भाडं? रस्त्यावरच तर मांडव ठोकायचा आहे. त्यातूनही वेळ उरला, तर रिअॅलिटी शोज घडवा, रील्स बनवा, सेल्फी पॉइंट बांधवा. गुडमॉर्निंगयुक्त व्हॉट्सॅप, इंस्टा-ट्विटर, फेसबुक आणि ओटीटी आहेतच. अवघा आनंदकल्लोळ उसळू द्या…
हे औपरोधिक-अतिरंजित वाटेल. थोडं अंगावर येणारं, थोडं उगाच भीती दाखवणारंही. पण आपल्या आजूबाजूचा भवताल निरखून बघा, नि यांतलं काहीही खोटं असेल तर सांगा.
इतक्यावर थांबणार नाही हे. असं वाटतं, हळूहळू जिथे काहीही करायचं नाहीय - ऐकाबोलायचं-लिहावाचायचं-बघानाचायचं-खायचंप्यायचं नाहीय - असे शांत काळोखाचे तुकडे विकायला निघतील. किमान काही जणांच्या तरी खिशाला त्यांचं भाडं परवडेलच. अशा परवडणार्या लोकांच्यात आपण असू, इतकी खातरजमा करून घेतली की झालं. मग एकविसाव्या शतकात सगळी धमाल आहे.
अरुण कोलटकरांच्या कवितेतल्याप्रमाणे 'बघता बघता वस्तूंच्या रक्तात साखर होऊन’ जाण्याकडे आपला प्रवास भरधाव सुरू आहे.
Saturday, 28 December 2024
नव्वदीच्या आगेमागे : राहून गेलेले तुकडे ०१
Friday, 20 December 2024
बुजरी गाणी ११
हे गाणं
आपल्या नॉस्टाल्जियाचा भाग असल्यामुळेच आपल्याला आवडत असणार, एरवी यात काय आहे, अशी मी
स्वतःची समजूत काढत असे. कारण पडद्यावर चित्ते, वाघ, झेब्रे इत्यादींची आठवण करून देणारी टाइट्समधली
शिल्पा शेट्टी आणि केसाळ छाती दाखवणारा अक्षयकुमार. त्यांच्या नाचाच्या मुद्रांचा
- खरं तर हातवाऱ्यांचा, let's
be realistic! - गाण्याच्या
बोलांशी काहीही संबंध नाहीय. पूर्ण गाणंभर ते एकमेकांवर शरीराच्या मांसल भागांनिशी
धडका देणे, घासणे, कुरवाळणे, जवळ येणे-लांब जाणे... अशा गोष्टी करतात. 'शरीराचा आवेग नावरे आवरीता' हेच काय ते कोरिओग्राफीमधलं विधान आहे.
पण
तरीही... गाणं नुसतं ऐकलं, तर ते कमालीचं गोड आहे.
शब्दांत एक प्रकारची चलबिचल, अनिश्चितता आहे. 'या माणसावर जीव जडलाय खरा, पण हा देईल ना साथ, की दुसऱ्या कुणाला जवळ करेल लहर फिरल्यावर?', 'बोलून दाखवू का हिला मनातले मोह? की लाजून दूर करेल?'... अशा शंकाकुशंका बोलून दाखवणारे - न दाखवणारे दोन नवे प्रेमिक. आणि त्या हळुवार संकोचांना आणि आवेगांना साथ दिल्यासारखी गाण्याची सुरावट.
कडव्याची सुरुवात अगदी खालच्या सुरात, मनातलं गूज बोलून दाखवावं हलकेच, अशी तिच्या आवाजात होते. मग तिथून तिचा हात हातात
घेऊन दाणदाण पायऱ्या चढून वर जावं तसा गायक वर जातो आणि खड्या आवाजात तिला उत्तर
देतो. तिथून तिनं लाजून त्याला पुन्हा थोडं खाली आडोशाला न्यावं, तशी धीम्या सुरातली कबुली... ध्रुपद... पुन्हा हाच खेळ. अशी
जुगलबंदी या गाण्यात कुमार सानू आणि अलका याज्ञिक मनसोक्त रंगवतात.
पडद्यावर
हे हाताळू शकणारा कुणी दिग्दर्शक मिळाला असता, तर हे
गाणं कुठच्या कुठे गेलं असतं, अशी चुटपुट वाटल्याशिवाय राहत नाही.
~
चुरा के
दिल मेरा गोरिया चली - २
उड़ा के
निंदिया कहाँ तू चली
पागल हुआ
दीवाना हुआ
कैसी ये
दिल की लगी
चुरा के
दिल तेरा चली मैं चली
मुझे
क्या पता कहाँ मैं चली
मंज़िल
मेरी बस तू ही तू
तेरी गली
मैं चली... चुरा के दिल मेरा...
अभी तो
लगे हैं चाहतों के मेले
अभी दिल
मेरा धड़कनों से खेले
किसी मोड़
पे मैं तुमको पुकारूं
बहाना
कोई बना तो ना लोगे
...अगर मैं बता दूं मेरे दिल में क्या
है
...तुम मुझसे निगाहें चुरा तो ना लोगे
...अगर बढ़ गयी है बेताबियां
...कहीं मुझसे दामन छुड़ा तो ना लोगे
कहता है
दिल धड़कते हुए
तुम सनम
हमारे हम तुम्हारे हुए
मंज़िल
मेरी बस तू ही तू - २
तेरी गली
मैं चली...
चुरा के
दिल मेरा गोरिया चली
चुरा के
दिल तेरा चली मैं चली...
नही
बेवफ़ा तुम ये मुझको खबर है
बदलती
रुतों से मगर मुझको डर है
नई
हसरतों की नई सेज पर तुम
नया फूल
कोई सजा तो ना लोगे
...वफ़ाएं तो मुझसे बहुत तुमने की है
...मगर इस जहाँ में हसीं और भी हैं
...कसम मेरी खा कर इतना बता दो
...किसी और से दिल लगा तो ना लोगे
धीरे
धीरे चोरी चोरी आके मिल
टूट ना
जाये प्यार भरा दिल
मंज़िल
मेरी बस तू ही तू - २
तेरी गली
मैं चली
चुरा के
दिल मेरा गोरिया चली
~
Sunday, 20 October 2024
या वाटा वळणावळणांनी
Sunday, 21 July 2024
थँक्स टू हिंदी सिनेमे ०४
लग्नामधली गाणी हा बॉलिवुडमधला एक हुकमी एक्का. भरपूर गजरे ल्यायलेल्या, दागदागिन्यांनी मढलेल्या, खिदळणार्या, लाजणार्या , हसणार्या–हसवणार्या खूप बायका, खूप रंग आणि रोषणाई वापरून केलेल्या सजावटी, आणि सनईचे सूर. ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’मधल्या ‘तेरी कुडमायी के दिन आ गये’ बघताना त्यातलं करणजोहरीय सौंदर्यशास्त्राला अनुसरून असलेलं, काहीसं बटबटीत, पण तरीही निव्वळ वेगळेपणामुळे टवटवीत वाटणारं रोल रिव्हर्सल जाणवलं आणि एकापाठोपाठ एक गाणी आठवत गेली. त्यातलेही निरनिराळे प्रकार दिसत गेले.
एक प्रकार म्हणजे सरळच लग्न ठरलं आहे, वा उद्यावर वा आत्तावर येऊन ठेपलं आहे, डोळ्यांत स्वप्नं आहेत, मनात उत्कंठा आणि आतुरता, आणि आईबापापासून विरहाचं दुःख. पण मजा अशी, की बॉलिवुडचा स्वभाव हिंदी आणि त्यामुळे उत्तर भारताला जवळचा. त्यातलं विरहाचं दुःख ‘बाबुल का अंगना’ सोडून जाण्याचं. आईला तितकासा भाव गीतकारही देत नाही. ‘बाबुल की गलीयाँ छोड चली’! अर्थात, अगदी माहेराला महत्त्व असलेल्या महाराष्ट्रातही कितीतरी ठिकाणी वधूच्या आईला लग्न बघायचीही परवानगी नसत असे, म्हणताना... ठीकच म्हणायचं! अशा गाण्यांमध्ये विशेषतः नवर्या मुलीवर शुभेच्छांची नुसती खैरात असते. तिला ‘खुशीयाँ’ मिळाव्यात म्हणून ‘दुवाएँ’; तिच्या पदरात चंद्र, तारे; तिचा चेहरा कसा चंद्राच्या तुकड्यासारखा, तिची कांती कशी दुधासारखी, झूमर असं, झुमका तसा, बिंदी अशी, कंगन तसं, हातावर मेंदी कशी, पायातले पैंजण कसे... एक ना दोन. नवर्या मुलीचं काम नुसतं गोरेपान नितळ खांदे आणि कर्दळीसारख्या पोटर्या उघड्या टाकून नाजूक हातांनी हळद-चंदन लावून घेण्याचं नाहीतर पॅसिव्हली साजशृंगार करून घेत, आरशासमोर बसून लाजत, सुंदर दिसत हळूच हसण्याबिसण्याचं. मेंदीला मोठाच भाव. ‘बहनों ने रोशनी कर ली मेहंदी से जला के उंगलीयाँ’ काय किंवा चक्क ‘मेहंदी लगाके रखना, डोली सजाके रखना’. साजण येईल तेव्हा त्याच्याकरता तय्यार राहायचं, बस. अॅक्टिव्ह रोलची जबाबदारी पियाच्या गळ्यात घालून या नवर्या मस्त मोकळ्या झालेल्या असतात. डोळ्यांत विरहाचं माफक पाणी, पण मुख्यत्वे तिकडची स्वप्नं. ‘मेरे बन्नो की आयेगी बारात’पासून ‘बन्नो तेरी अखियाँ सुरमेदानी’पर्यंत आणि ‘मेहंदी है रचनेवाली, हाथोंमें गहरी लाली’पासून ‘नवराई माझी लाडाची लाडाची गो’पर्यंत. ‘छलका छलका रे कलसी का पानी’पासून ‘हम तो भये परदेस’पर्यंत. इथल्या सख्यांच्या, आईबापाच्या विरहाचं दुःख आहे. पण त्याला तरी काय इलाज! ‘मैं तो भूल चली बाबुल का देस, पिया का घर प्यारा लगे...’
‘राजी’तल्या ‘उंगली पकड के तूने चलना सिखाया था ना’मध्ये याला अपवाद होता. कारण नवरी मुलगी फक्त नवरी मुलगी नव्हती. पण असे अपवाद नियम सिद्ध करण्यापुरतेच. बाकी बहुतेक वेळा ‘साजनजी घर आये दूल्हन क्यों शर्माये’…
यात नवर्या मुलीला शंभरातून पन्नास वेळा तरी ह-म-खा-स बन्नो हे नामाधिधान लावलेलं असतं. मग तिला सल्लेबिल्लेही दिलेले असतात. ते पोक्त आजीबाईछाप सल्ले असतातच. पण फक्त तितकेच असतात असंच काही नाही. ‘देखो बन्नो मान न जाना, मुखडा उनको ना दिखलाना, पहले सौ बातें मनवाना, केहना बोलो, कर के सलामी, बन मैं करूंगा तेरी गुलामी...’ असाही व्यावहारिक वळसा असतो. वास्तविक नवर्या मुलाला तसं परफॉर्मन्सचं किती प्रेशर असतं. नवर्या मुलीला जाऊन निदान पहिल्या रात्री तरी मेलेल्या माशासारखे भाव सलज्ज डोळ्यात घेऊन पुतळा होऊन बसायचं असतं. करायचं ते नवरा मुलगा करणार असतो. पण ज्याला काही करून मर्दानगी सिद्ध करायची असते, त्याचं काय? त्या बिचार्याला सल्लेबिल्ले देण्याची काही पद्धत बॉलिवुडमध्ये नाही.
नवर्या मुलीच्या मनात नुसतीच प्रियाची ओढ असते असंही नाही. शृंगाराची स्पष्ट आतुरताही असते. ‘जिया जले जान जले’च्या शब्दांत उघडच ‘अंग अंग में जलती हैं, दर्द की चिंगारीयाँ, मसले फूलों की मेहक में तितलीयोँ की क्यारियाँ...’ असं होतं, ते काय उगाच? ‘रुकमणी रुकमणी, शादी के बाद क्या क्या हुआ...’ हा त्याचाच एक अवतार. ‘धीरे धीरे खटिया पे खटखट होने लगी...’ यात कल्पनेला वावबीव तरी कुठे आहे?! थेट मुद्द्याला हात!
अलीकडे ‘लापता लेडीज’मध्ये नवर्या मुलीच्या पोटातली अनिश्चिततेची भीतीही सुरेख चितारली होती. ‘आंगन में पेड वहाँ होगा के नही, होगा तो झूला उसपे होगा की नही…’ इथपासून ते नवरा घोरत तर नसेल... इथपर्यंत.
पण कायम सिनेमाची नायिकाच नवरी मुलगी असेल असंही काही नाही. मैत्रिणीच्या नाहीतर बहिणीच्या लग्नात मिरवणारी आगाऊ नायिका आणि हीरोचा तसलाच आगाऊ कारा मित्र – हा बॉलिवुडमधल्या प्रेमकथांमधला एक हमखास ट्रोप. ‘हम आप के हैं कौन’मधली ‘जूते दे दो पैसे ले लो’ तशातलंच.
पण ‘हम आप के हैं कौन’ असल्या गाण्यांची बॅंकच बाळगून आहे म्हणा. लग्नातल्या गाण्याचा कुठलाही प्रकार सांगा, तो त्यात सापडणारच. आगाऊ बहीण आणि भाऊ यांची चेष्टामस्करी आणि पुढे प्रेमात पडायची तयारी? ‘जूते दे दो पैसे ले लो’. नायिकेचंच लग्न आणि नायक विरहानं व्याकूळ? ‘मुझ से जुदा हो कर’. लग्नासाठी उतावीळ लेक? ‘माईनी माई मुंडेर पे तेरे...’ लग्नातली नवरा-नवरींची चेष्टामस्करी आणि दुवाएँ? ‘वाह वाह रामजी’. चावट आणि वाह्यात मस्करी? आहे की. ‘दीदी तेरा देवर’. अगदी गलोलीनं नितंबावर फुलं फेकून मारण्यापर्यंत सबकुछ. विहीण आणि व्याह्यांमधली चेष्टा? काळजी सोडा, तेही आहे – ‘आज हमारे दिल में...’
तर – ‘हम आप के’चं सोडून देऊ!
आपलं स्वतःचं लग्न जमवण्याच्या भानगडीत इतरांची लग्नं मनापासून अटेंड करणारे स्मार्ट लोक बॉलिवुडमध्ये चिकार. ‘हम दिल दे चुके..’मधलं ‘आँखों की गुस्ताखीयाँ..’, ‘कभी खुशी कभी गम’मधलं ‘बन्नो की सहेली रेशम की डोरी’ (पाहा, इथेही बन्नो आहेच!), ‘प्यार तो होनाही था’मधलं ‘आज है सगाई’…. अशी कित्तीतरी गाणी मिळतील. या गाण्यांमधला मूड प्रसन्न, उजळ, रंगीत असतो. नायिका आगाऊ असते थोडी, पण नायकानं थोडी मर्दगिरी केल्यावर तिच्या डोळ्यांत एकदम लाज उमटून जाते. नायकनायिकांना इतर लोक सतत कट केल्यागत एकत्र आणत असतात. कधी तिच्या नि त्याच्या ओढण्यांची गाठ, कधी त्याच्या कुर्त्याच्या बटणात तिची ओढणी, कधी दोघांना एका फेट्याच्या कापडात एकत्र आण… पूरी कायनात दोनों को... असो!
अजून एक प्रकार म्हणजे असफल प्रेम आणि त्याचं वा तिचं लग्न अटेंड करावं लागणं. या सिच्युएशनमध्ये एकट्या राहिलेल्या इसमाला (वा इसमीला) कम्माल म्हणजे कम्माल अॅटिट्यूड आलेला असतो. एकतर ‘माझं काय व्हायचं ते होवो, तुझं भलं होवो’ असा स्वार्थत्यागाचा उमाळा, किंवा मग नुसते अर्थपूर्ण दुःखी टोकदार कटाक्षच कटाक्ष... पॅसिव्ह अग्रेसिव्ह वागण्याची पार हद्द. या प्रकारातलं मूळपुरुष गाणं म्हणजे ‘अजीब दास्ताँ है ये’. आता झालंय ना त्याचं लग्न? मग का उगा त्याच्या हृदयाला डागण्या देतीस बाई? जा ना गप निघून. पण नाही. असं केलं तर ती नायिका कसली! ‘राजा की आयेगी बारात...’ त्यातलंच. ‘तुमबिन जीवन कैसा जीवन’मध्ये बैलगाडीच्या मागून विद्ध-संतप्त चेहर्यानं चालणारा जया भादुरीचा प्रियकर आठवा. किंवा स्वतः मरणार असल्यामुळे प्रेमपात्राला नीटस नवरा गाठून देऊन वर तिला त्याच्या प्रेमात पाडणारा 'माही वे'मधला शारुख. किंवा मग अलीकडच्या ‘सुना है के उन को शिकायत बहुत है’मधली गंगूबाई... काय तो कफन पेहन के कुर्बान होण्याचा भाव... हाय अल्ला!
याचाच एक पोटप्रकार म्हणजे लग्न करायचं, पण मनात मात्र प्रियकर किंवा प्रेयसी. ‘वीर-झारा’तलं ‘मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ...’ किंवा ‘देवदास’मधलं ‘हमेशा तुमको चाहा’. पण ‘देवदास’ सगळाच तसा... पुनश्च असो!
अजून एक खास प्रकार म्हणजे निव्वळ चावटपणा. ‘मेरे हाथों में नौ नौ चूडीयाँ हैं’मधली ‘कल चोली सिलाई आज तंग हो गई’म्हणत धुंद होऊन नाचणारी श्रीदेवी, ‘इश्शकजादे’मधल्या ‘मेरा आशिक छल्ला वल्ला’तला पैजामे से लडते हुए रात बितानेवाला आशिक… ही काही उदाहरणं. ‘रुकमणी रुकमणी’ त्यांपैकीच, आणि लग्नातलं नसलं तरी डोहाळे पुरवता न येणार्या बावळट साजणाची चेष्टा करणारं ‘दीदी तेरा देवर दिवाना’ही त्यांपैकीच. होता होईतो पुरुषांना बघा-ऐकायला मनाई करून खास स्त्रीवर्गाला गोळा करून शृंगारविषयक चावट चेष्टामस्कर्या करणं हा या गाण्यांचा विशेष हेतू.
अशी कितीतरी गाणी निरनिराळ्या कारणांनी लक्षात राहून गेलेली, आवडलेली. पण या ठरीव साच्यांमधली असूनही त्यांना बगल देऊन जाणारी, वेगळेपणानं ठसलेली गाणी अगदी क्वचित.
‘सत्या’तलं ‘सपनों में मिलती है’ त्यांपैकी एक. ते गाणं अगदी मुंबई पद्धतीच्या लग्नाचं आहे. नवरा-नवरी समोर स्टेजवर आणि प्रेक्षक खाली खुर्च्यांमध्ये बसलेले. पुरुष एकतर निवांत बसलेले तरी नाहीतर पार कायच्या काय हालचाली करून ‘नाच’ म्हणायला जड जाईल, असा नाच करणारे. निखळ पुरुषी ऊर्जा. निळाशार सोनेरी बुंदक्यांचा आणि गुलाबी काठाचा शालू नेसलेली शेफाली छाया त्या गाण्यात बघून घ्यावी. काय तिचा चार्म! मागे येणार्या नवर्याला लटक्या रागानं रिकाम्या रिक्षाची उपमा काय देते, मध्येच लाडात येऊन त्याच्या थोबाडीत काय मारते, कमाल लालित्यानिशी ठुमकते काय... ते सगळं गाणं तिच्याभोवती फिरतं. साथीला आशाचा मुरलेला खट्याळ आवाज आणि बॅकग्राउंडमध्ये कुठेतरी स्वप्नदृश्यातली शालीन उर्मिला.
‘बॉम्बे’तलं ‘केहना ही क्या’ वास्तविक प्रेमात पडू बघणार्या नायक-नायिकांचंच. पण मणिरत्नम आणि रेहमान अशा एक सोडून दोन-दोन परिसांचा स्पर्श त्याला झालेला असल्यामुळे ते कुठल्या कुठे गेलं आहे. भित्र्या हरणीसारखी पण अनुरक्त झालेल्या प्रेमिकेची भिरभिरती-लाजरी नजर... तबल्याचा दिलखेचक ठेका... सोनेरी झालरी लावलेल्या झिरझिरीत ओढण्या ल्यालेल्या बायकापोरी… उंचच उंच अवकाश असलेल्या इमारती... आणि स्वप्नील छायाप्रकाशाचा खेळ.‘बधाई हो’मधलं ‘सजन बडे सेंटी’ असंच मजेशीर. त्यातल्या लग्नात वावरणारे नीना गुप्ता आणि गजराज राव चाळिशी-पन्नाशीच्या आसपासचे. पण नीना गुप्ता गरोदर असल्यामुळे स्वतःच्या पौरुषाच्या कामगिरीवर निहायत खूश असलेला गजराव राव तिला नव्याच कौतुकानं न्याहाळणारा. कधी गच्चीवरून खालच्या तिच्याकडे प्रेमभरानं बघणारा, तर कधी जिन्यावरून उतरणार्या पत्नीच्या पूर्ण स्त्रीदेहाचा दिमाख विस्फारल्या, चकित नजरेनं बघणारा. कधी हळूचकन तिच्या पोटाची अलाबला घेणारा. कधी आईची करडी नजर जाणवून गोरामोरा होणारा... त्यातला त्या दोघांमधला चोरटा पण लोभस शृंगार बघताना खूप मजा आली होती, किंचित भरूनही आलं होतं.‘गँग्स ऑफ वास्सेपूर’मधलं ‘तार बिजली से पतले हमारे पिया’ हे अजून एक रत्न. त्याला लोकसंगीताची डूब आहे आणि लग्नातल्या मेहंदी-संगीत समारंभाचा अस्सल ढोलक ठेका. तशा गाण्याबजावण्यात भांड्यावर चमचा वाजवत ठेका धरतात असं स्नेहा खानविलकरला कुणीतरी म्हटलं म्हणून तिनं गाण्यात ‘टटक टटक टटक टटक...’ असे शब्दच चपखलपणे वापरले आहेत. विधवा सासू आणि विधवा थोरली जाऊ नव्या सुनेच्या स्वागतासाठी कौतुकानं गाताहेत, हवेत आनंद आहे, शब्दांमुळे आलेली हलकी मस्करी आहे, हसर्या मुद्रा आहेत... पण सासर्याच्या आठवणीनं कातर झालेल्या सासूला बघून चमकलेली नवी सून बघता बघता तिला सावरून घेते. तिची त्या घराचं होऊन जाण्यातली परिपक्वता आणि पाठीमागच्या गाण्यातल्या सुरातली विद्धता... त्या गाण्यातली मूळ मिश्किली ओलांडून ते गाणं कुठल्या कुठे उंचीवर निघून जातं. हुमा कुरेशीचं कौतुक करायचं, की रिचा चढ्ढाचं, की स्नेहा खानविलकरचं, शारदाबाईंचं की अनुराग कश्यपचं... कळेनासं होतं.मीरा नायरचा ‘मॉन्सून वेडिंग’ लग्नातच घडणारा. त्यातलं दिल्लीकर श्रीमंती लग्न आणि त्यातले नात्यांचे अस्सल भारतीय गुंते लक्षात राहतातच. पण श्रेयनामावली सुरू असताना वाजणारं ‘कावा कावा’ बघताना आपण सिनेमातल्या कंत्राटदाराचं आणि मोलकरणीचं झेंडूच्या केशरी रंगांत न्हालेलं लग्नही आठवून खूश होत राहतो, ही त्या सिनेमाची प्रसन्न खासियत.
ही काही समग्र यादी नव्हे. तशी ती बॉलिवुडबाबत शक्यही नाही. अजून तासभर गप्पा ठोकत बसलो तर अजून अशीच पन्नासेक गाणी आपण सहज काढू शकू. तूर्त ही आवडलेल्या चंदेरी लग्नगाण्यांची आठवण नुसती...
अशीच एक आठवण एकदा पार्टीतली गाणी या प्रकाराची काढायची आहे, एकदा वयात आल्या-आल्या तारुण्यानं मुसमुसून गात सुटणार्या नायक-नायिकांच्या गाण्यांची... इरादे काय, चिकार आहेत. फिर कभी.