Wednesday, 24 February 2016

माझ्या भाषेवर माझं प्रेमबिम आहेबिहे?

माझ्या भाषेवर माझं प्रेमबिम आहेबिहे हे वाक्य एकूण पकाऊच. जन्मापासून ज्या गोष्टीला भवतालातली एक म्हणून गृहित धरली, तिच्यावर प्रेम आहे असं एकदम उठून म्हणणं भंपकच. तर प्रेमबिम बाजूला ठेवू या. मला हीच भाषा येते. बस.

याच एका भाषेतून मला जोरकस शिव्या देता येतात. भांडण करताना संतापानं-भीतीनं गुडघे लटपटले, तरी या भाषेतले शब्द दगा देत नाहीत. आपलाच इमानेइतबारे काम करणारा अवयव असावा, तसे आपसूक शब्द सुचत जातात. याच एका भाषेतून मनःपूत प्रेम करता येतं. कविता लिहिता येते. शब्द मनाजोगते तोडलेमोडले नि मला हवे तसे घडवून मांडले तरी या भाषेत मला अपराधी, संकोचल्यासारखं, गंडल्यासारखं वाटत नाही. मस्त मोकळ्याढाकळ्या घरात हक्कानं पाय पसरून बसल्यासारखं वाटतं. मनातले सैरावैरा बेशिस्त अस्ताव्यस्त विचार नीट ओळीत लावताना, ही भाषा माझ्या मेंदूशी नीट जुळवून घेते. माझ्याआतला गोंधळ एका नीटस आकारात मांडून देते. उत्तर देतेच, नवे प्रश्नही काढून देते.

अक्षरं आणि पर्यायानं शब्द म्हणजे साकार नि निराकार वस्तूंची चिन्हं. इतर कुठल्या भाषेतली ही चिन्हं माझ्याकरता चिन्हंच उरतात. वस्तू नि संकल्पना सजीव होऊन त्यांच्यामागे उंबर्‍यात येऊन थांबत नाहीत. मग कोशांच्या मदतीनं चिन्हांचे अर्थ कळले, तरीही झोपताना ब्रा काढायला विसरून जावं, सारखं अस्वस्थपणे कूस वळवत राहावं नि काही केल्या शांतपणे झोप लागूच नये, तसं वाटत राहतं. तीच माझ्या भाषेतली चिन्हं वाचताना मात्र, चिन्हं उरतच नाहीत. बघता बघता चित्रं होतात. नाद होतात. वास होतात. रंग होतात. माणूस, झाड, जंगल, गाव, शहर... सत्य, न्याय, समता, कविता... होतात. एकातून अनंत होतात. जिवंत होतात.

ही एकच भाषा आहे मला अशी. माझे हातपायडोळे असल्यासारखी माझा भाग असलेली. मीच असलेली. ती संपली तर माझ्यातलं काहीतरी संपेल. मी अर्धीमुर्धी अपंग उरेन. म्हणून माझी भाषा नि पर्यायानं माझ्या भाषेत बोलणारे लोक उरावेत असं मला वाटतं. एरवी प्रेमबिम ठीकच.

तशा बाकीही भाषा ठाऊक आहेत मला. पण त्यांच्या-माझ्यात द्वैत आहे. आठवणींना सुरुवात होते त्याच्याही आधीपासून त्या माझा भाग असत्या, तर त्या माझ्या असत्याही. जशी माझी भाषा आहे तशाच. अशा अधिकाधिक भाषा असाव्यात माणसांना. श्रीमंतीच की ती. पण माझ्यापाशी नाहीत. ठीक.

माझा भाचा जी भाषा शिकतो, ती त्याची भाषा असेल; की शिकण्याआधी शिकतो, ती त्याची भाषा असेल? तो कुठली भाषा शिकतो? हा प्रश्न बहुधा चुकीचा आहे. तो कुठली भाषा बोलतो? परवा त्याच्या हातातला पोळीचा घास चुकून ताटात पडला, तर तो उत्स्फूर्तपणे ’च्यायला’ म्हणाला. तो सशाला ससा न म्हणता ’ससुल्ल्या’ म्हणतो, घरातल्या कुत्र्यावर भडकून त्याला ’ए कुतरड्या’ असं म्हणतो. लाडात आला, तर ’मेघना-आत्या’ असं लांबलचक न संबोधता ’आत्तू’ असं म्हणतो. पण त्याला राजकारणही नीटच कळतं. आईबापावर छाप पाडायची असेल, त्यांना नॉनप्लस करायचं असेल, त्यांना कौतुकावायचं असेल, की तो रीतसर एखादं अस्खलित इंग्रजी वाक्य फेकून देतो. त्याला इंग्रजीतून गोष्ट सांगितली, तर बावचळून बघत राहतो. पण त्याला त्याच्या वर्गात वापरली जाणारी आज्ञार्थी इंग्रजी मात्र बरोब्बर कळते.  मग त्याची भाषा कोणती? "उद्या शाळेत रेड कलरे बाबू, मला रेड कलरचं ऍपल दे!" असं म्हणतो नि "तांबडं पेन देऊ?" असं विचारल्यावर शुंभासारखा तोंडाकडे बघत राहतो किंवा "ए! तांबडा! तांबडा म्हंजे?" असं ओरडत खिदळत सुटतो.

कुठली आहे त्याची भाषा? पण हे काही नवं नाही. असे प्रश्न माझ्याही पिढीच्या बाबतीत नि त्याआधीही पडले असतीलच कुणालातरी कधीतरी. तरी अजून माझी भाषा मला आहेचे. मग ती नक्की किती टक्के ’शुद्ध’ असली की  एकसंध नि जिवंत नि रसरशीत नि पूर्ण म्हणायची?

काय की. असल्या शुद्धाशुद्धता नि टक्केवार्‍या वेडगळ. पण तरी एकालगतच्या एक अशा तीन पिढ्यांना तरी एकमेकांच्या बोलण्याचा सारांश कळावा, इतपत तरी सलगता, एकसंधता भाषेच्या प्रवाहात राहावी, अशी अपेक्षा रास्त म्हणायला पाहिजे. अजून तरी माझ्या आजीला मी काय बोलते हे कळतं. (कळतं का?! बहुधा हो. पिढीचा फरक वजा करायचा. "व्हॉट्सॅपवर पिंग आलं." म्हणजे तिच्या डोळ्यासमोर व्हॉट्सॅपचं चित्र तरळत नसेल. पण फोनशी संबंधित काहीतरी व्यत्ययसदृश झेंगट घडलं नि नात आता फोनमध्ये डोकं खुपसून बसणार हे बरोबर कळतं. म्हणजे भाषा कळते का? तर होच.) माझा भाचा काय बोलतो हेही मला अचूक कळतं. अजून तरी.

पण हे आजचं झालं. घराबाहेर नि घरातही माझी भाषा माध्यम म्हणून उरूच नये, अशा दिशेनं बदल होतायत. बदलांना ना नाहीय. ती असू शकतही नाही. पण भाषेत बदल होणं निराळं नि भाषाच न उरणं निराळं. मग हा प्रवाह खंडित व्हायला किती पिढ्या पुरतील? एक. फार तर दोन? दोन पिढ्यांत मी काही मरणार नाही बहुतेक. मी दोन पिढ्यांनंतरही उरेन. म्हणजे - मरता मरता माझ्याशी माझ्या भाषेत बोलायला कुणीच उरायचं नाही? उपर्‍यासारखं दुसर्‍या कुठल्या भाषेच्या आसर्‍याला जावं लागेल... नि इतक्या लांब जायची गरज नाही. आज-उद्यातही होईल हे कदाचित.

बाप रे.

या परावलंबित्वाची भीती वाटते. पूर्णपणे स्वार्थी, खरी, निखळ भीती वाटते. या भीतीपायीच इतर भाषांमध्ये थोडेतरी हातपाय मारले जातात. पॉप कल्चरशी जोडून राहून तरुणपणाशी संबंध बळंच तरी टिकून राहावा म्हणून थोडे कष्ट घेतले जातात, तसेच. तशा इतर भाषा तितक्या परक्या नाहीतही म्हणा. अखेरशेवट कायम माजघरात, रस्त्यावर आणि दप्तरात तीन निरनिराळ्या भाषा बोलणार्‍या लोकांच्या देशातली आहे मी. तितकं तर जमेलच. जमतंच.

पण म्हणून माझ्या - माझ्या हक्काच्या - भाषेवरचा जीव कमी होईल? सॉरी बॉस. तिच्यासाठी होता होईतो हातपाय मारणं आलं. कारण ते माझ्यासाठीच आहे.

म्हणून हे रेषेरेषेचा कीस पाडत नवे शब्द पाडणं. घासून, वापरून पाहणं, प्रमाण-अप्रमाण भाषेबद्दलचे नि नियमांबद्दलचे वाद घालणं, कोश हुडकणं, ते तयार आणि अद्ययावत व्हावेत म्हणून खटपटणं. पाण्यानं उताराकडे धाव घ्यावी तसं आपोआप माझ्या भाषेत आणि माझ्या लिपीत गोष्टी भोगणं, शोषणं, अनुभवणं, मांडणं...

एकुणात प्रश्न प्रेमाचा नाही, अस्तित्वाचाच आहे.

मराठी भाषा दिन आहे २७ फेब्रुवारीला. शुभेच्छा.

***

या लेखाखाली झालेल्या चर्चेतून काही नवीन मुद्दे मिळाले. त्यांची भर घालून हाच लेख दोनेक दिवसांनंतर इथे प्रकाशित केला. त्याखालीही काही मुद्द्यांवरून चर्चा झाली आहे.

Monday, 1 February 2016

यंदा

यंदा मला कुठेतरी मस्त चंपी करून घ्यायला जायचंय.

सगळी जुनी कोरडी त्वचा उतरवून टाकायची आहे. गुंजभरही वजन कमी करून न घेता हलकं हलकं, मऊ व्हायचंय. तेच ते संकल्प, त्याच त्या नॉस्टाल्जिक गोष्टी, त्याच त्या चमकदार बेगडी शब्दांच्या जरतारी माळा, तेच ते आउटिंग आणि तेच ते गेट्टुगेद्री निर्जीव संबंध... सगळं एका मिश्कील हसण्यासोबत एखाद्या तळ्यात सोडून द्यायचंय. हळूहळू तळ्याच्या पोटात ते सगळं गडप होईल नि ’पाथेर पांचाली’मध्ये धरते तशी विश्वासू शेवाळाची अलगद साय त्याच्यावर धरेल. त्याच्याकडे बघताना मीही आतून निवांत, आश्वस्त होत जाईन आणि सैलावून, पाण्यात पाय सोडून बसेन तिथेच. उतरती उन्हं असतील. निवांतपणा असेल, पण शांतता मात्र जिवंत असेल. एखादा चुकार बगळा. हात लांबवला तर सहज बोटाला लागेल अशी एखादी हवेवरची सुरेल हाळी. थोड्या तुरतुरमुंग्या.

’आता थोड्या वेळात परतूच...’ असं म्हणता म्हणता किती वेळ जाईल कुणास ठाऊक. पण अंधार पडेल तोही आपण जागरणं करता करता स्वैपाकघरात जातो नि दिवा न लावता सवयीनं पाणी पिऊन परत येतो, तेव्हा भोवती असतो तसा - मायाळू. मग कुठेही परतावं - ते घरच असेल!

यंदा. नक्की.

Saturday, 28 November 2015

दिवाळी २०१५, अंक दुसरा : साधना


'मिळून सार्‍याजणी' किंवा 'पालकनीती'सारख्या चळवळीतल्याच अंकांचा अपवाद सोडला, इतर भल्या भल्या साहित्यिक दिवाळी अंकांना जे जमलेलं आणि / किंवा सुचलेलं नाही, ते 'साधने'नं सुमारे ५-६ वर्षांपूर्वीच करायला सुरुवात केलेली आहे. ते म्हणजे ऑनलाईन आवृत्ती उपलब्ध करून देणं. नुसती नाही, चकटफू. हे एका प्रकारे पायंडा पाडणारं, इतर अंकांना काही निर्णय घ्यायला भाग पाडणारंच आहे. यंदाचं वर्षही त्याला अपवाद नाही. दिवाळी संपते न संपते, तोच त्यांचा अंक ऑनलाईन आलेला आहे.

यंदाचं त्यांचं मुखपृष्ठ मात्र मला तितकं आकर्षक वाटलं नाही. पण अनुक्रमणिकेनं त्याची दणदणीत भरपाई केली.

कुरुंदकरांचा सॉक्रेटीस आणि विचारस्वातंत्र्य या विषयावरचा लेख, विचारवंतांनी कसं वागावं, या विषयावरच्या रोमिला थापर यांच्या या मुलाखतीचा अनुवाद, पुरस्कारवापसीबद्दलच्या रामचंद्र गुहा यांच्या लेखाचा अनुवाद आणि नयनतारा सहगल यांनी चर्चिल महाविद्यालयात २०११ साली केलेल्या भाषणाचा अनुवाद (साहित्यिक आणि राजकारण) - असे चार खणखणीत आणि पूर्वप्रकाशित लेख या अंकात आहेत. काहीएक भूमिका घेताना, एखाद्या विषयाचा आढावा घेताना, समग्रतेचा आग्रह धरताना, विषयाच्या शक्य तितक्या सगळ्या बाजू प्रकाशात याव्यात यासाठी असे जुने लेख पुन्हा प्रकाशित करणं (भाषांतरित वा मूळ भाषेत) हे कमीपणाचं वा लबाडीचं तर नाहीच; पण काही वेळा अतिशय समर्पक असू शकतं हे सिद्ध करणारी ही निवड आहे. 'ऐसी अक्षरे'च्या नव्वदोत्तरी विशेषांकाबाबतच्या ताज्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर हे फारच लखलखीतपणे जाणवलं.

हे सगळेच लेख वाचावेच असे आहेत, हे सांगणे न लगे.

डॉ. अभय बंग यांचा गांधी कुटीवरचा लेख मात्र मला अजिबात आवडला नाही. तो चक्क भक्तिपर असा आहे. एकीकडे बदलत्या धक्कादायक विचारानंही अस्वस्थ होणार्‍या ग्रीक गणराज्याचं कौतुक आणि एकीकडे गांधीजींच्या कुटीचा देव्हारा करणारा हा लेख. कुछ जम्या नही. खुद्द गांधींनाही हा लेख कितपत आवडला असता, याबद्दल मला मेजर शंका आहे.

या अंकातले खरे स्टार लेख दोन आहेत. एक म्हणजे लक्ष्मीकांत देशमुखांचा खेळ आणि स्त्रीवाद या विषयावरचा लेख. बिली जिन किंग या अमेरिकन टेनिसपटूनं स्त्रीवादाची धुरा खांद्यावर घेत बॉबी रिग्जचा पराभव केला. बॉबीची आधीची बेताल वक्तव्यं लक्षात घेता (“मी बिलीला हरवून स्त्रीवाद चार पावलं मागे नेऊन ठेवीन.” हे सर्वांत सौम्य विधान) त्याला हरवणं बिलीमधल्या स्त्रीकरता अत्यावश्यक होतं. ते तिनं मोठ्या झोकात केलं. दुसरी द्युती चांद ही भारतीय धावपटू. एखादी व्यक्ती स्त्री की पुरुष हे ठरवण्यासाठी केली जाणारी लैंगिकता चाचणी किती अशास्त्रीय, अनावश्यक आणि अपमानास्पद आहे हे दाखवण्यासाठी तिनं खेळाच्या सुप्रीम कोर्टात त्या चाचणीविरुद्ध दाद मागितली. ती नुसती जिंकली नाही, तिनं ही चाचणीच रद्दबातल ठरवली. हा स्त्रियांच्या दृष्टीनं विलक्षण विजय आहे. या दोन उदाहरणांचा आढावा देशमुखांनी विस्तारानं घेतला आहे. या दोन उदाहरणांच्या दरम्यान त्यांच्याइतक्या नशीबवान न ठरलेल्या आणि / किंवा वेगळ्या कारणांनी प्रकाशझोतात आलेल्या स्त्री खेळाडूंबद्दल ते बोलतात. खेळाडूंमधली टेस्टारेरॉनची पातळी, तिचा क्षमतेशी जोडला जाणारा संबंध, टेस्टाटेरॉनच्या पातळीमुळे वा गुणसूत्रांच्या गोंधळामुळे संदिग्ध ठरणारं लिंग, त्याचे खेळाडूंच्या स्पर्धात्मक आणि सामाजिक आयुष्यावर होणारे परिणाम अशा अनेक अंगांना स्पर्श करणारा हा लेख आहे. तो वाचताना मला एकीकडे ज्ञानदा देशपांडेच्या 'बृहत्कथे'वरचा हा लेख आठवत होता, तर दुसरीकडे एका होमोक्युरिअस व्यक्तीचं मित्राला उद्देशून लिहिलेले एक कथात्मक पत्र आठवत होतं - ज्यात खेळ - क्रीडाप्रकार आणि त्याचा लिंगभावाशी असलेला संबंध या गोष्टीबद्दल अतिशय रोचक असे विचार लेखक माडतो.

दुसरा अतिशय रंजक लेख विनय हर्डीकर यांचा - त्यांच्या बहुभाषापटुत्वाबद्दलचा. विनय हर्डीकरांचा साधनेच्याच दोन-तीन वर्षांपूर्वीच्या दिवाळी अंकातला लेख चांगलाच लक्षात होता (साधनेसारख्या नियतकालिकातही माझा पूर्वेतिहास माझ्या आजच्या भूमिकेच्या आड येऊ शकतो काय, असा खेदजनक प्रश्न विचारणारा 'पाचा उत्तराची कहाणी' हा लेख केवळ भारी होता. 'साधने'च्या वेबसाइटवर २०१० च्या दिवाळी अंकात तो मिळेल). त्यामुळे त्यांचा लेख उत्साहानं उघडला. त्यानं अपेक्षाभंग केला नाही. ज्ञानप्रबोधिनीपासून ते इंडियन एक्स्प्रेससाठी केलेली फिरती पत्रकारिता अशा भल्या मोठ्या पटावर हर्डीकरांचे किस्से रंगतात. “एकदा आमच्या पलीकडच्या वाड्यातले माझ्याच वयाचे दोन भाऊ एकमेकाला अशा शिव्या देत होते की, शुद्ध शाकाहारी माणसाच्या जिभेला मटण-प्लेट पाहून पाणी सुटावं, तसं मला झालं होतं!” हे त्यांचं मासलेवाईक वाक्य काय, किंवा हर्डीकरांना कन्नड येतं हे कळल्यावर एका धोरणी राजकारण्यानं त्यांची मागच्या गाडीत केलेली सावध रवानगी काय - सगळाच टोटल म्याडनेस आहे! "संस्कृत या माझ्या मैत्रिणीवर तर स्वतंत्र लेखच लिहिला पाहिजे," हे त्यांनी केलेलं सूतोवाच प्रत्यक्षात उतरावं, इतकीच प्रार्थना.

अतुल देऊळगावकरांचा 'द हिंदू'च्या व्यंगचित्रकारांबद्दलचा लेख आणि बी. केशरशिवम या सरकारी अधिकार्‍यानं गुजरातेतल्या दलितांना त्यांची हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष, हेही वाचण्यासारखे लेख आहेत.

बाकी अंकात अनिल अवचट (बिहारचा दुष्काळ) आहेत, गोविंद तळवलकर (रवींद्रनाथांनी घेतलेली मुसोलिनीची भेट) आहेत, अरुण टिकेकर (ऍंग्लो इंडियन कादंबरीकार) आहेत. पण त्यांत फारसं अनपेक्षित, थोरबीर काही नाही.

कथा-कवितांची संपूर्ण अनुपस्थिती आणि काहीसं सौम्य - आशावादी - समजूतदार संपादकीय या लक्ष वेधून घेणार्‍या गोष्टी.

Thursday, 26 November 2015

दिवाळी २०१५, अंक पहिला : मौज

मोबाईलच्या पडद्यावर न मावेल इतकं दीर्घ काही लिहायचं नि वाचायचं झालं, तर मुख्यधारेतली मराठी माध्यमं कमालीची मर्यादित आहेत. दखल घ्यावी अशी मासिकं नि साप्ताहिकं हातांच्या बोटांवर मोजण्याइतकी. अनियतकालिकांची चळवळ ओसरूनही जमाना झाला. वृत्तपत्रांमध्ये प्रथम प्राधान्य जाहिरातींना आहे – बातम्यांचीही वासलात, तिथे पुरवण्यांमधल्या लेखनाबद्दल काय बोलावं? सोशल मिडियावर हमरीतुमरी हाच एकुलता एक सूर आहे. वेळ घेऊन काही लिहिणं-वाचणं-संवादणं जवळपास दुर्मीळ म्हणावं असं आहे.


अशात दिवाळी अंक तेवढे आहेत. ‘गौरवशाली’ किंवा’ ‘आगळीवेगळी’ असली घिसीपिटी विशेषणं त्या परंपरेला लावा. दर वेळी शंभर वर्षांच्या दिवाळी अंकाच्या इतिहासाचे दाखले देत छाती फुगवा. दर्जाच्या नावानं कुरकुरत त्यांतल्या जाहिरातींना नावं ठेवा... तरीही दिवाळी अंक आहेतच. परंपरा चालू ठेवायची म्हणून काही रडतखडत, काही नव्याची बंडखोर भर घालत, काही खरोखरच गौरवशाली परंपरा चालवत. कथा, संशोधन आणि संदर्भ यांसह केलेलं निराळ्या वाटेवरचं सखोल लेखन, फेसबुकासारख्या माध्यमांना पचवत राहिलेल्या कविता... अशा सगळ्याला एक अवकाश पुरवत.
वर्तमानपत्रात म्हटलं जातं त्यापेक्षा जास्त काहीतरी त्याच्याबद्दल म्हटलं गेलं पाहिजे, असा एक माझाच मला चावलेला जबाबदार किडा. म्हणून ही मालिका.


माझ्या पिढीतल्या अनेकांप्रमाणे माझंही वाचन खंडित स्वरूपाचं होऊन बसलेलं आहे. अनेक नव्या-जुन्या लेखकांशी वा कवींशी मी असायला हवं तितकी नि तशी परिचित उरलेली नाही. प्रयत्न करूनही एक अंक सलग समग्र वाचला जात नाही, इथून तिथे उड्या मारल्या जातात, काही गोष्टी वाचायच्या सुटून जातात हे आहेच. शिवाय वैयक्तिक आवडीनिवडींचा एक घडत गेलेला पोत आहे. तो काही पूर्णत: आधुनिक (की आधुनिकोत्तर?!) आहे असं म्हणता येणार नाही. या सगळ्या मर्यादा या र्‍हस्वलेखनाला असतील, याची वाचणार्‍यानं जाणीव बाळगावी. मतभेद असतील तिथे खंडन करावं, आपलं मत मांडावं.


आपण जवळजवळ अर्धं वर्ष रक्त आटवून जे दिवाळी अंक काढतो-सजवतो, ते कोण वाचतं, त्याबद्दल काय विचार करतं हे जाणून घेणं दिवाळी अंक काढणार्‍यांच्या दृष्टीनं मोलाचं आहे; हे आता दुसर्‍या बाजूला पाय ठेवल्यानंतर मला पक्कं ठाऊक आहे.


***


अंक पहिला: मौज

IMG_20151126_134103_HDR.jpg


‘मौजे’च्या अंकातला सगळ्यांत लक्षणीय विभाग आहे शहरांबद्दलचा. इंट्रेष्टिंग लेख आणि दिवाळी अंकात सहसा न दिसणारी नावं.


ठाण्याच्या गडकरी रंगायतनचे वास्तुरचनाकार (आर्किटेक्ट) असलेले आनंद पंडित – त्यांनी या विभागात लिहिलं आहे. राजकीय आणि प्रशासनिक हस्तक्षेपामुळे वास्तुरचनाकाराचे हात कसे बांधले जातात ते त्यांच्या लेखात दिसतं.


यान गेलच्या पुस्तकाचं भाषांतर करणार्‍या सुलक्षणा महाजन या विभागात दिसल्या नसत्या, तरच मला आश्चर्य वाटलं असतं. मुंबई शहराच्या जिवंत, दिवसेंदिवस गढूळ होत चाललेल्या आणि तरीही बदलाच्या आशेवर जीव धरून असलेल्या रूपाबद्दल त्यांनी लिहिलं आहे. पण त्यांच्या भाषांतरित पुस्तकामुळे असेल – माझ्या त्यांच्या लेखाकडून असलेल्या अपेक्षा थोड्या जास्त होत्या. त्या अपेक्षांच्या मानानं मला त्या स्मरणरंजनातच रमलेल्या वाटल्या. माझ्या अपेक्षाही अतिरेकी असतील कदाचित.


प्रियदर्शिनी कर्वेंचा लेख सुरू होतानाच फार वेळ लागतो. कितीतरी वेळ त्या उत्क्रांती आणि नागरीकरणाचे टप्पे सांगण्यातच दवडतात. माहितीय हो, मुद्द्यावर या... असं होऊन जातं. पण चिकाटी बाळगली, तर पुढे मात्र तो इंट्रेष्टिंग आहे. शहररचनाकारांचा आणि विकासकांचा (आणि पर्यायानं लोकांचा नि लोकप्रतिनिधींचा) दृष्टीकोन कसा असायला हवा नि तो वास्तवात कसा आहे – याकडे त्यांचा लेख लक्ष वेधतो. पैसा, पैशाचं उत्पादकतेशी असलेलं न-नातं आणि शहरीकरणाच्या मिषानं अधिकाधिक ओरबाडशील होत गेलेली आपली पैसाकेंद्रित संस्कृती, यांचा ऊहापोह त्यात आहे.


सचिन कुंडलकरांचा लेख त्यांच्या सध्याच्या लेखनाच्या सुराला धरून आहे. मला शहरं आवडतात, मला बाजाराने दिलेले पर्याय आवडतात, मला तंत्रज्ञान आवडतं, मला वेगवान बदल आणि शहरांनी दिलेला व्यक्तिगत अवकाश आवडतो... अशी प्रामाणिक आणि रोखठोक विधानं त्यांच्याकडून अपेक्षितच. एका प्रकारे ’खेड्याकडे चला-शहरांना गिल्ट द्या’ या पारंपरिक आचरटपणाचा धिक्कार करणं हा एकमात्र कार्यक्रम त्यात असल्यासारखा भासतो. हेच काही वर्षांपूर्वी मला कमालीचं भारी वाटलं असतं – किंबहुना तेव्हा त्यात तो ताजेपणा, प्रामाणिक बंड होतं असं अजूनही वाटतं. पण आता त्यात तोचतोचपणा जाणवतो. चंगळवादाची-बाजाराची दुसरी, कमालीची अन्यायकारक-हिंस्र बाजू या माणसाला जाणवत नसेल का, असा प्रश्न पडतो. ‘राजवाडे ऍण्ड सन्स’ या त्यांच्या ताज्या-रंगारंग-ब्रॅंडपुरस्कारी सिनेमाच्या पार्श्वभूमीवर तर फारच.


सगळं जगच शहरी होईल, अशी भविष्यवाणी वर्तवणारा साधूंचा लेखही या विभागात आहे.


पण मला सर्वांत जास्त आवडली, ती अमोल दिघे या संशोधकाची सुलक्षणा महाजन यांनी घेतलेली मुलाखत. विद्यापीठं आणि विज्ञानाधारित संशोधन संस्था शहरांमध्ये का वाढताना दिसतात, त्यांचे त्या त्या शहरांशी संबंध कसे असतात, त्यांच्यात कोणत्या प्रकारची देवाणघेवाण होते, परदेशांत हे नातं कोणत्या प्रकारचं आहे (विद्यापीठांभोवती जन्मणारी नि त्यांच्याधारे जगणारी मध्यम शहरं), देशात याबाबत कोणता ट्रेंड दिसतो (मध्यम शहरांची गती आणि पैस विद्यापीठांना मानवणं आणि विज्ञान-तंत्रज्ञान-संशोधनाकडे अशाच प्रकारच्या मध्यम शहरांतून विद्यार्थी येणं)... अशी वेगळीच चर्चा त्यात आहे.


बाकी नावं (आणि लेखनही) अपेक्षित म्हणावीत अशीच आहेत. प्रभाकर कोलते, भारत सासणे, अनिल अवचट, मोनिका गजेंद्रगडकर, सुबोध जावडेकर, निळू दामले, विजय कुवळेकर, गोविंद तळवलकर, विजय पाडळकर.... वगैरे वगैरे. विनया जंगले (जंगली प्राणी) आणि अश्विन पुंडलिक (भूगर्भशास्त्र) ही गेल्या दोनेक वर्षांतली ताजी भर. ‘तेंडुलकरांना भेटताना...’ प्रकारातला (आणखी एक) लेख (श्रीनिवास कुलकर्णी) या अंकात आहे. आता तेंडुलकर जाऊनही काही काळ लोटल्यावर या प्रकारच्या स्मरणरंजक लेखनाची कास ‘मौजे’नं धरलेली दिसावी, हा तपशील बोलका आहे. सतीश तांब्यांची कथा ‘मौजे’त दिसणं हा मात्र थोडा आश्चर्याचा भाग! आता तांबे प्रस्थापित (आणि अपेक्षित – प्रेडिक्टेबल अशा अर्थी) कथाकार झालेत की काय, असा एक खवचट विचार मनात येऊन गेला.


‘मौजे’चा कविता विभाग दणदणीत असतो. पण त्याबद्दल काही म्हणायला वेळ लागेल. कविता सावकाशीनं पोचत राहतात.


तीव्रतेनं जाणवलेली आणि एक गोष्ट म्हणजे बर्‍याच दिवाळी अंकांनी चर्चिलेली असहिष्णुता, पुरस्कारवापसी, देशातलं वातावरण यांबद्दल ‘मौज’ मौन बाळगून आहे. प्रस्तावनेत केलेले निसटते उल्लेख सोडले, तर या असंतोषाबद्दल काहीही विधान नाही. मोदींच्या स्मार्ट शहरांविषयीच्या घोषणेचा उल्लेख मात्र आहे - शहरांविषयीच्या विभागाची प्रस्तावना करताना.


सगळ्यांत धक्कादायक, दु:खद भाग म्हणजे मौजे’त चक्क प्रमाणलेखनाच्या सरसकट चुका आहेत. (‘मौजे’त प्रमाणलेखनाच्या चुका??? ‘मौजे’त प्रमाणलेखनाच्या चुका!!!!... असे वाचावे.) ‘र’चे र्‍हस्वदीर्घ उकार उलटेपालटे असणं, ‘उ’हापोह, ‘दि’ड असल्या चुका, ‘सुद्धा’सारखी शब्दयोगी अव्ययं सुटी लिहिलेली असणं... ही अगदी सहज, वरवर पाहता दिसलेली उदाहरणं. प्रमाणलेखनाला एका मर्यादेपलीकडे फार महत्त्व न देणार्‍या, क्वचित भूमिका म्हणून त्याची मोडतोडही करणार्‍या ‘अक्षर’मध्ये हे फार खटकलं नसतं. पण ‘मौजे’त... असो. असो.


तळटीप: अजूनही काही गोष्टी वाचायच्या शिल्लक आहेत. काही वाचूनही त्यावर म्हणायसारखं काही नाही. हा आढावा समग्र नाही-नसेल, त्यात गरज लागेल तसतशी भर पडत राहील, हे ध्यानी असू द्या.

Wednesday, 4 November 2015

रेषेवरची अक्षरे, वर्ष आठवे, अंक सहावा, दिवाळी २०१५

शुभ दीपावली!

... तर तीन वर्षांनंतर 'रेषेवरची अक्षरे'चा एक नवा अंक पुन्हा एकदा तुमच्यासमोर ठेवत आहोत. नोंदी गेल्या तीन वर्षांतल्या अाहेत नि फोरम्सही अाहेत यंदा, त्यामुळे अंक जरा नेहमीपेक्षा ऐसपैस झाला अाहे...

अनुक्रमणिकेतले काही विभागच अपडेट झालेले दिसतील, काहींच्या लिंका अजुनी अपडेट व्हायच्या असतील. दचकू नका. ही उ०सं०डु० नव्हे! यंदा आजपासून येत्या वीकान्तापर्यंत टप्प्याटप्प्यानं अंक प्रकाशित करतो आहोत. आज फक्त कथा आणि कविता प्रकाशित केल्या आहेत... वीकान्ताला पुरा अंक - होय, पीडीएफसकट - तुमच्या हातात असेल. वाचा आणि 'रेषेवरची अक्षरे'चं हे नवं रुपडं कसं वाटलं ते जरूर कळवा. सूचना, सुचवण्या, दाद आणि प्रश्न... सगळ्याचं 'दिल खोल के' स्वागत आहे.

सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. :)

ज्यांच्या दिवाळीवर दुर्दैवाने दुष्काळाचं सावट अाहे त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर देऊ या अाणि ही दिवाळी संयतपणे साजरी करू या.

इथे अंकाची अनुक्रमणिका पाहता येईल.

आणि हे मुखपृष्ठ :


पुन्हा एकदा, हॅप्पी दिवाळी!

Saturday, 10 October 2015

ट्रॅफीक

दोन रस्ते एकमेकांना येऊन मिळतात, 
तिथेच होतो भारीपैकी ट्रॅफीक

फार वर्दळ नसते सुरुवातीला
गजबजती गर्दी तर सोडाच, टोळभैरवही फिरकत नाहीत नाक्याकडे
उगाच एखादं जीव धरून राहिलेलं पिंपळाचं रोपटं
नि गंभीर होऊन गुलुगुलु बोलणारी एखादी अल्पवयीन फ्रेण्डशिप

फ्रेण्डशिप जीव धरू लागते
तसतसा नाकाही जीवही धरू लागतो
एखादी टपोरी पानाची टपरी
मोबाइल रिचार्ज मारणारा एखादा मल्टिपर्पज वाणी
नि गणपत वाण्याचे वारसदार असलेले काही फुटकळ रिक्षावाले

फ्रेण्डशिप हळूहळू सरकू लागते आतल्या गल्लीच्या लपलेल्या तोंडाकडे
तसतसे रस्ते रंगात येतात, सैलावतात
अंग ऐसपैस पसरून एकमेकांना टाळ्या देतात
तेव्हा उगवू लागतो आसमंतात ट्रॅफीक नावाचा प्राणी

चाहूल लागत नाही त्याची तशी
मांजरपावलांनी वाढू लागलेले हॉर्न्स
शाळांच्या नि हापिसाच्या वेळांना उसळणारा नि एरवी गायब होणारा जादुई धूर
कडेकडेनं नजर चुकवून उगवू लागलेली बकाली
जीव धरून राहू लागलेली एखादी भिकारीण
कचकड्याची खेळणी नि थडग्यावरची फुलं विकणारी कळकटलेली स्मार्ट पोरं

चाहूल लागते तेव्हा 
रस्त्यांच्या दोस्तीचं सर्पयुगुल होऊन बसलेलं असतं
आपल्याच मस्तीत प्रणयात चूर होऊन गेलेलं...

मग होतात मागोमाग काही अपघात
येतात ट्रॅफीक सिग्नल्स 
निऑन साइन्स
नि पाठोपाठ रस्ते वितात
एखाद्या फ्लायओव्हरलाही जन्म देतात

त्यांच्यातलं नातं, 
वर्णनाच्याच काय, 
लग्नसंस्थेच्याही परीघाच्या पलीकडे जाऊन पोचलेलं
ट्रॅफीक मात्र होतच राहतो
भारीपैकी.

Monday, 28 September 2015

टप्पा

दर थोड्या वर्षांनी असा एक टप्पा येतो, जेव्हा पुस्तकं, माहिती, माणसं, घटना आणि आपण यांच्यातले संबंध एखाद्या गजबजलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यासारखे किंवा सकाळी साडेनवाच्या सुमारास वाहणार्‍या दादर स्टेशनमधल्या मिडल ब्रिजसारखे असतात. चहू बाजूंनी अंगावर गोष्टी आदळत असतात. आपण दोन्ही हातांनी, पायांनी, डोळ्यांनी, तोंडानं, कानांनी, मेंदूनं - सगळ्या शरीरामनासकट - गोष्टी परतवत-स्वीकारत-शोषत-परावर्तित करत असतो. बाहेरून पाहणार्‍याची नजर एखाद्या पाश्चात्त्य जगातल्या निरीक्षकानं भारतीय केऑसकडे पाहावी तशी. ’इट रिअली फंक्शन्स!’ अशा आश्चर्यासह विस्फारलेली. वरकरणी दिसणार्‍या बेशिस्तीनं भांबावलेली.

पण आपण बेखबर.

आपल्यात आणि जगात एक धुंदावणारी लय सांधलेली असते. कप्पेकरण आणि चर्वितचर्वण आणि प्रक्रिया आणि मतनिश्चिती यांसारख्या रवंथ करण्याजोग्या, श्वास टाकून-मागे रेलून शांतपणे करण्याच्या गोष्टी मुकाट मागे ओळ करून संथ झुलत उभ्या असतात. रंगमंचाच्या पुढच्या भागात मात्र लयबद्ध वेगवान हालचाल आकारत असते.

या टप्प्यात मजेमजेशीर गोष्टी घडतात. दीर्घकालीन आणि जवळचे मित्र मिळून जातात. अगदी जिवाजवळचे नाही - पण जवळचे म्हणता यावेत असे, आणि ज्यांना दीर्घ काळानंतर भेटल्यावरही आपला चेहरा उगाच उजळून निघतो असेही मित्र याच काळात भेटत जातात. पुढच्या निवांत काळासाठी आठवणींची बेगमी होण्याचा हा टप्पा. या काळात एखादा तरी नवा विक्षिप्त छंद जडतो. त्याच्या काठाकाठानं काही मुलखावेगळ्या गोष्टी डोक्यात साचून येतात. खास आपली म्हणावी अशी एखादी आचरट आणि क्रिएटिव थेरी जन्माला येते. एरवीचे छंद आणि दिनक्रम आणि व्यवस्था गप बॅकफूटला जातात आणि नव्या बाहुल्यांसाठी भातुकलीत आपसुख जागा तयार होत जाते. यातच एक लखलखतं तीव्र प्रेमप्रकरण घडतं हे सांगायला नकोच. या काळात ऐकलेल्या सगळ्या गाण्यांची, पाहिलेल्या सिनेमे-नाटकं-सिर्यलींची, वाचलेल्या पुस्तकांची आणि लिहिलेल्या सुरस गोष्टी-कवितांची गुंफणी या प्रेमाच्या माणसाभोवती होते आणि हे गोफ आपल्या माइन्ड पॅलेसच्या तळघरात सुखरूप रवाना होतात. या सगळ्या गोष्टींना त्या त्या काळाचा आणि माणसांचा एक विवक्षित तीव्र गंध असतो. पुढे जेव्हा कधी तळघरात शिरणं होतं, तेव्हा तो गंध क्षणार्धात आपल्याला ऍपरेट करतो आणि अल्लाद त्या दिवसांत नेऊन सोडतो...

हा टप्पा ओसरत जातो, तो वाजत गाजत नव्हे. मुंबईतला पाऊस जसा टप्प्याटप्प्यानं आणि माघारीची चाहूल लागू न देता, कुशल राजकारणी माघार घेत अंतर्धान पावतो, तसाच हा टप्पा काढता पाय घेतो. करण्याजोगी असंख्य कामं नाहीत, कुणाला ’नाही’ म्हणायमधली पंचाईत भेडसावत नाही आणि आजूबाजूला थबक-थबक साचलेलं रूटिन असूनही आपल्याला फारसा कंटाळाही येत नाही हे जाणवतं, तोवर आपण चक्क नियमितपणे व्यायामही करायला लागलेले असतो आणि जागरणं टाळायलाही. मग फिल्मी पद्धतीत मागेबिगे वळूनबिळून पाहताना ’आपण असे वागलो?’ असा एक नवाच कौतुकमिश्रित अचंबा दाटत राहतो आणि आपण पुन्हा थोडेथोडे बनचुके-शिस्तबद्ध-शिष्टाचारी आणि सभ्यबिभ्य होत वाट काटत राहतो.

पुढच्या वळणावर कुणीतरी ’भॉ’ करीलच अशा सुप्त लबाड अपेक्षेसकट.

बादवे, शास्त्रीय संगीतात टप्प्याचं वर्णन कसं करतात ठाऊके? ’टप्पा की विशेषता है इसमें लिए जानेवाले ऊर्जावान तान और असमान लयबद्ध लहज़े...’ द्या टाळी!

Sunday, 19 July 2015

कोरा कागद निळी शाई!


हुंकारभुता बोल काही
अळीमिळी सोडून देई
इतके सारे बोललो तरी
घरभर उरून राही –

       कोरा कागद निळी शाई!

कागदाच्या चल होड्या करू
तो बघ झाला पाऊस सुरू
दिवस गेला लिखा-पढी
सोड की रे अढी-बिढी –

       चल आता मडके भरू!

"कसली अढी कसले काय,
फक्त थोडा रुसलो हाय!"
सगळा धडा पाठ आहे
मान माझी ताठ आहे –

       पण गाण्याचा शेवट नाय?

"ताठ मान हवी खरी
पण आता पुरे तिरीमिरी
म्हणतो राती परतीन घरी
मानगुटीवर बसलेय गाणे -

       गाण्याशिवाय भागणार नाय!"

तेच तर!

हुंकारभुता गाऊ काही
अळीमिळी सोडून देई
नको कागद नको शाई
कोरा कागद निळी शाई? 

       नक्को कागद नक्को शाई!
      


Tuesday, 7 July 2015

परत रेषेवरची अक्षरे

२०१२ मधे 'रेषेवरची अक्षरे'चा शेवटचा अंक काढला तेव्हा ब्लॉगवरचं चांगलं लिखाण आटत चाललंय याचं दुःख तर होतंच. पण तो अंक करताना होणारी ई-पत्रांची देवाणघेवाणचर्चावादविवाद, गॉसिप्स आणि भंकसउलगडत जाणारे नवनवीन ब्लॉग्स... हे सारं संपणार याची खंतही होती.

मधल्या काळात आम्ही ब्लॉग सोडून थोडे थोडे बाहेरख्याली झालो. फोरम्सवर डोकावलो. फेसबुकावर उंडारलो. पोटापाण्यात रमलो. लिहिण्यावाचण्याशी अपराधीपणाचे, मैतरकीचे आणि घरपरतीचे खेळ आलटून पालटून खेळलो. 'रेरे'च्या अंकाबद्दल लोकांनी विचारणा केल्यावर थोडे गडबडलो, शरमलो आणि सुखावलो. 

दरम्यानच्या काळात काही ताजे लेखक आलेकाही जुन्या लेखकांच्या शब्दांना परत धार चढलीबऱ्याच गोष्टींचे संदर्भ बदलले आणि नव्या अर्थाचे शब्दही उगवले. आमची उत्सुकता नव्याने जागी झाली. गेल्या तीन वर्षात मराठी ब्लॉग विश्वात नक्की काय काय झालं याचे हिशेब मांडायला आम्ही चित्रगुप्ताच्या तत्परतेनं पुन्हा सज्ज झालो. 

'रेषेवरची अक्षरेया दिवाळीत पुन्हा येतो आहे!

आम्ही ब्लॉग्सची यादी बनवायला सुरुवात केली आहेच. पण तुमच्या वाचनात काही नवीन चांगले ब्लॉग्स आले असतील, तर ते आम्हांला 'resh.akashare@gmail.com' या पत्त्यावर जरूर कळवा. इंटरनेटचं आभासी विश्व प्रचंडच आहे आणि म्हणूनच 'साथी हाथ बढाना'चं हे एक प्रांजळ आवाहन. 

बाकी, यंदा भेटत राहूच!

Wednesday, 3 June 2015

काय करता! (उर्फ मातृभाषा आणि काही गट)

मातृभाषेबद्दल आस्था असलेल्या माझ्यासारख्या लोकांना एकाच वेळी अनेक निरनिराळ्या आघाड्यांवर झगडावं लागतं.

अ] अतिविशाल गट
एकीकडे नवश्रीमंत, मराठीबद्दल तुच्छता/न्यूनगंड बाळगणारे, अर्धवट आंग्लाळलेले, नवश्रीमंत लोक. या गटातले लोक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालतात. वटपौर्णिमेच्या जोडीनं करवा चौथही साजरा करतात नि ’छान दिसतं’ म्हणून ’मांगमें सिंदूर’ भरतात. शक्यतो लोकांकडून मागून किंवा पायरेटेड कॉपीजमधून पुलं, वपु, मृत्युंजय, स्वामी, सिडने शेल्डन, चेतन भगत वाचतात. प्रशांत दामलेची नि हल्ली ’हर्बेरियम’मधली मराठी नाटकं बघतात. चर्चाबिर्चांबद्दल यांना पोटातून भीती कम तिरस्कार असतो, पण हे तसं उघडपणे म्हणू धजत नाहीत. या गटाला आपण अतिविशाल गट म्हणू.

आ] डांबरीकरण गट
दुसरीकडे प्रश्नांचं घातक सुलभीकरण करणारे, न्यूनगंडातून येणारा उद्धटपणा बाळगणारे, दस्तावेजीकरण-संशोधन-अभ्यास यांची गरजच काय, असा प्रश्न विचारणारे लोक. यांच्यातल्या बहुसंख्यांच्या ’ण’ नि ’न’च्या वापराबद्दल नाक मुरडण्याची प्रथा ’अ.वि.’ गटात आहे. (पण ’न’ नि ’ण’चा तथाकथित थारेपालट ही काही या गटात असण्याची पूर्वअट नाही). यांची मुलं तूर्तास इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नसतात. पण पहिलीपासून इंग्रजी सुरू झाल्यानंतर हेच लोक सर्वाधिक सुखावलेले असतात. ’मराठी माणूसच मराठी माणसाचा पाय ओढतो’ अशी तक्रार हे जगातल्या कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरादाखल करू शकतात. दीर्घकालीन, वास्तवादी आणि किचकट उत्तरं यांना सहन होत नाहीत. त्यावर ते हमखास बिथरतात. या गटाला आपण डांबरीकरण गट म्हणू.

इ] चर्चील गट
तिसरीकडे निष्क्रिय, उदासीन, स्थितिवादी, इंटुक लोक. यांना संस्कृत, इंग्रजी किंवा युरोपियन भाषा यांपैकी एका तरी भाषेबद्दल मातृभाषेपेक्षाही जास्त प्रेम असतं. हे सहसा फिल्मफेस्टिवल्समधून किंवा प्रायोगिक नाटकांना भेटतात. काहीही लोकप्रिय झालं की ते वाईट, निकस असणारच, असा यांचा ठाम विश्वास असतो. यांचीही मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांत असतात. पण ’त्याबरोबर आम्ही त्यांना उत्तमोत्तम मराठी साहित्याची ओळख करून देतो’ असं पालुपद जोडायला ते विसरत नाहीत. ’ष’चा अचूक उच्चार; चीज, वाईन, मोदक अशी अभूतपूर्व रेंज असलेल्या पदार्थांतली जाणकारी; गर्दीबद्दल कमाल तुच्छता नि तिरस्कार; ग्रेसबद्दल भक्तीच्या पातळीवरचं प्रेम; न कंटाळता कितीही चर्चा ही यांची खास लक्षणं. या गटाला आपण चर्चील गट म्हणू.

काही पोटगटही असतात. ’मरू दे ना च्यायला, आपल्याला काय करायचंय?’ हे घोषवाक्य असणारा ’आपल्याला काये’ गट; मराठीबद्दल प्रामाणिक, निरागस, घोर अज्ञान असणारा, फक्त क्रियापद तेवढं मराठी वापरून बोलणारा ’पत्र नव्हे मित्र’ गट; ’विलायती शब्दांचं आक्रमण होता कामा नये’ असा अभिनिवेश बाळगून ’मोबाइल नाही, भ्रमणध्वनी म्हणा’ असा हट्ट धरून बसणारा ’सावरकर बुद्रुक’ गट...

माझ्यासारख्या लोकांना वेळ बघून या सगळ्या आघाड्यांवर दोन हात करावे लागतात. कधी एका गटाला पाठीवर घेतलं, तर दुसर्‍याच्या तात्कालिक आश्रयाला जावं लागतं. कधी एकाला सहानुभूती दर्शवली, तर दुसर्‍याला ठेचावं लागतं. कधी सगळ्यांनाच थोडं चुचकारावं लागतं. कधी सगळ्यांना एकाच वेळी अंगावर - शिंगावर घ्यावं लागतं. कुणाशीच कायमस्वरूपी पातिव्रत्य ठेवून चालत नाही. कुणाशीच हाडवैर घेण्यात रस नसतो.

कारण शेवटी हे सगळे लोक तोंडानं काहीही बरळत असोत, शेवटी बोलतात माझ्याच भाषेत - मराठीत. काय करता!
***
(हा लेख पूर्वप्रकाशित आहे. पण ब्लॉगवर आणून टाकायचा राहून गेला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गटनावं डॉ. विवेक बेळे यांच्या नाटकांमधल्या थोर आणि आचरट नावांवरून सुचलेली आहेत.)