Thursday, 4 October 2007

मला कंटाळा आलाय

बेक्कार खूप निष्क्रिय सुस्त उदासवाणा वांझोटा कंटाळा आलाय.

तो गेला की मग लिहा-बिहायचं बघू.

Tuesday, 2 October 2007

जे जे उत्तम...

नंदन, टॅग केल्याबद्दल मनापासून आभार.


’जे जे उत्तम...’मागची नंदनची भूमिका इतकी नेमक्या शब्दांत मांडलेली आहे, की ती तशीच्या तशीच इथे देते:

(पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.)


***


आपण रस्त्याने जाताना कुणी वळून तर पाहिले, पण नुसतेही पाहणार नव्हते, आणि अखेर आपल्या येण्याजाण्याने हवा तरी इकडची तिकडे हलते की नाही असेच वाटायला लागते. कुणाचे काही कारणाने लक्ष जावे असे आपल्यात काही नाही ही शंका जरी मधूनमधून आलेली असली तरी तारुण्यसुलभ आशेने तिच्याकडे दुर्लक्ष करायला पहिलेले असते; पण तो आशावाद किती मूर्ख आहे हे मनापासून आणि उपकार करायच्या हेतूने गळी उतरवण्यात आप्तेष्ट आणि मित्रमैत्रिणींना जेव्हा अपेक्षेबाहेर यश येते, तेव्हा (आपणच शोधून काढलीय जणू, अशी!) एक कल्पना काही काळ आधारभूत होते: आपल्या भल्या-बुर्‌या कसल्याही बाह्य रूपाच्या आत डोकावू शकणार्‌या कुणा विशेष संवेदनाक्षम आणि काकदृष्टीच्या अंतर्ज्ञानी व्यक्तीला आपल्या मनाचे आणि बुद्धीचे गुण दिसतील (जे आपल्यात आहेत असे सगळ्यांना वाटते) आणि ती आपल्याला जवळ करील. अर्थात ’ती’ व्यक्ती म्हणजे एक पुल्लिंगी माणूस, (आणि कल्पनाच करायची तर का नाही?) देखणा, हुशार, श्रीमंत इ. इ. अशी माफक अपेक्षा (मूर्खासारखी)! पण तिच्यातही राम नाही हे (खरे तर मूर्ख नसल्यामुळे) उमजते आणि मग उरते एक नैसर्गिक ऊर्मी: स्त्रीलिंगी मनुष्य म्हणून जी एक मर्दुमकी - म्हणजेच औरतकी - गाजवता येण्यासारखी आहे, ती बिनबोभाट गाजवावी. ह्या ऊर्मीमागेही आशाळभूत विश्वास असतो, की आपण निर्माण केलेल्या त्या माणसाला तरी (काही काळ) आई म्हणजे बिनतोड परिपूर्णता, असे वाटेल! पण त्यासाठी हरतर्‌हेच्या तडजोडी करूनही जेव्हा सगळी वासलात लागते तेव्हा आधीच माफक असलेला आत्मविश्वास संपूर्ण नष्ट होतो. खांदे पाडून, मान कासवासारखी आत घेऊन, शक्य तितक्या निरुपद्रवीपणे आयुष्य काटताना एकच मागणी उरलेली असते: इतका काळ जसा कुणाच्या नजरेस न पडता काढला तसा उरलेलाही काढून कुणाला तोशीस न पडता होत्याचे नव्हते होऊन जावे.


आयुष्याच्या अशा आखीव आणि ’सुरक्षित’ टप्प्यावर जेव्हा ध्यानीमनी नसता जाणवते, की ज्यांच्याबद्दल विचार करायचे कैक वर्षांपूर्वी सोडून दिले होते ती ’अंतर्ज्ञानी’ माणसे जगात आहेत, इतकेच नाही तर सरळ पुढ्यात उभी राहून विचारताहेत, की तुमच्या मनाची आणि बुद्धीचे जे गुण (ते आपल्या ठायी आहेत ही समजूतही तोपर्यंत सोडून दिलेली असते) आम्हांला दिसताहेत त्यांचे तुम्ही काय करताहात? तेव्हा मग चाकोरीत स्तब्ध उभे राहून स्वत:संबंधे पुनर्विचार करायचा येऊन पडतो.


हे कठीण, कारण आयुष्याची इतकी वर्षे आपण फुकट घालवली की काय, या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर द्यायची तयारी करायला लागते. बहुतांश लोकांनी ठरावीक मार्गाने वाटचाल करण्यात ज्यांचे भले असते अशांनी आखून दिलेल्या मार्गाने आपण आजवर का चालत आलो? आणि तेही त्याच्यात आपले फारसे भले दिसत नसताना? कुठलेही प्रश्न न विचारता पुढे जाणार्‌या आळशी अथवा अंध अथवा हतबल अथवा प्रवाहपतित जनांच्या ओघामागून आपण पावलामागे पाऊल का टाकत राहिलो? काही रूढ कौटुंबिक वा सामाजिक संकेतांत ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत त्यांची हुकूमशाही का सहन करत आलो? त्या नव्या ’अंतर्ज्ञानी’ मित्रांनी विचारलेल्या प्रश्नाचे प्रतिध्वनीच जणू, असे हे सारे प्रश्नही जेव्हा मनात अखंड आणि कर्कशपणे निनादू लागतात, उत्तरांसाठी हटून बसतात, तेव्हा आजवर मुकाट काटली त्याव्यतिरिक्त दुसरी वाट कुठे आहे का याचा शोध घेणेही भाग पडते.


- ’मुक्काम’, गौरी देशपांडे


***


मी या मंडळींना टॅग करतेय -




मॅड्‌झ

Friday, 31 August 2007

देणार्‌याने देत जावे...


"...आपल्या संवेदना व भावना तीव्र आहेत, आपल्याला अनुभवाच्या अर्थाचा विचार बर्‌यापैकी करता येतो, कल्पनाशक्तीची व भाषेची देणगीही अगदीच वाईट नाही, मूल्यभाव सूक्ष्म आहे, वगैरे गोष्टींचे भान मला फार लवकर आले. पण त्याच वेळी असेही कळले की निसर्गाने आपल्याला या सर्व शक्तींना सामावून घेणारी व त्यांच्यापलीकडचा अज्ञात प्रदेश उजळवून टाकणारी नवनिर्मितिक्षम शक्ती दिलेली नाही. त्या प्रदेशातल्या अंधूक आकृती क्वचित भासमान होतात; क्वचित त्यांच्या निगूढ गीतांचे सूर ऐकू आल्यासारखे वाटतात. पण तितकेच वाटते, त्या सार्वभौम शक्तीपासून असे वंचित राहण्याचा शाप जर द्यायचा होता, तर आधीचे सर्व दान कशाला दिले? मग ध्यानात आले की त्या दानाच्या बळावर आपल्याला दुसर्‌याच्या निर्मितीत सावलीसारखी सोबत करता येईल; कदाचित ’झाडू संतांचे मार्ग’ म्हणतात तशा रीतीने कलावंतांच्या वाटा साफ व स्पष्ट करता येतील. तेच आपले श्रेय असेल आणि ते कमी मोलाचे नाही. आपण जीव ओतू तितके ते वाढेल. संपादन-प्रकाशनाच्या कामात मी ते शोधले आहे, अगदी जिवानिशी शोधले आहे आणि त्यातला आनंद घेतला आहे..."


खरे पाहता तुमचे जाणे जाणवावे असा आपला थेट संबंध कधी आलाच नाही. तो येण्याची शक्यताही नव्हती.


तुमचे क्षेत्र साहित्याचे. वाचणारी माणसे कुठल्याही युगात वाचतातच आणि न वाचणारी कधीच वाचत नाहीत हे जरी खरे असले तरी, आमचे युग वाचण्या-बिचण्यासारख्या ’निरुपयोगी’ आणि ’अनुत्पादक’ गोष्टीकडे सहजसाध्य तुच्छतेने पाहणारे. औचित्य सांभाळणे हा तुमचा वृत्तिविशेष. आणि गरज पडली तर नेसूंचे सोडून डोक्याला गुंडाळण्यातही काही वावगे नाही असे मानणारी आमची पिढी. केल्या कामाचेही श्रेय घेण्याचे तुमच्या जिवावर येई. आणि ’नो पब्लिसिटी इज बॅड पब्लिसिटी’ हे तर आमचे ब्रीदवाक्य. अशा दिवसांत तुम्ही सार्वजनिक आयुष्यातून जवळ जवळ निवृत्तच झाला होता यातही नवल करण्यासारखे काही नाहीच.


तरी तुमचे जाणे इतके जाणवत राहावे, असे आणि इतके तुम्ही माझ्या मनात कसे रुजून राहिलात, असे कोडे पडले आहे.


वाचण्याच्या आवडीचे सवयीत आणि पुढे गरजेत रूपांतर होत गेले तसतशी पुस्तके जमा होत गेली माझ्याजवळ. कुण्या वडीलधार्‌या माणसाने माझी पुस्तके पाहताना सहज म्हटले, ’अरे, ’मौजे’ची पुस्तके बरीच दिसतात की.’ तेव्हा त्या अडनिड्या वयात मी ’मौजे’च्या देखणेपणाची प्रथमच जाणतेपणी दखल घेतली आठवते. नीटस देखणी, नजरेला सुखावणारी मांडणी. पानांचा तो विशिष्ट पिवळसर रंग. (कुणीतरी अडाण्यासारखे ’ही पुस्तके पिवळी पडलेली आहेत’ असे म्हटले तेव्हा त्याची कीव तर वाटली होतीच. पण नकळत ’का बरे आवडतो हा रंग’ असा चाळाही सुरू झाला मनाशी. काही पुस्तकांच्या भगभगीत पांढर्‌या पानांच्या तुलनेत त्या लोभस पिवळसर पानांत एक अनाक्रमण, आकर्षक साधेपणा असतो. सेपिया टोनसारखा? कुणास ठाऊक...) राजमुद्रेसारखा ’मौजे’चा तो शिक्का. म्हटले तर प्रथमदर्शनी जुनाट वाटेलसा. पण त्या जुनेपणातच खानदान आणि भारदस्त आकर्षण घेऊन असणारा. अर्थपूर्ण आणि सुरेख मुखपृष्ठे. शुद्धलेखनाचा आणि मुद्रणाचा विलक्षण अचूकपणा. (एकदा कधीतरी एका अक्षराला द्यायचा राहून गेलेला काना सापडला होता, तेव्हा मी आधी आश्चर्यानं शब्दकोश पाहून आपल्याला ठाऊक असलेला शब्दच बरोबर आहे ना, अशी खात्री करून घेतलेली आठवते! हो, ’मौजे’च्या पुस्तकातला शब्द कसा चुकीचा असेल?!) आणि या सर्वांवर ताण म्हणजे एकाहून एक सरस दर्जा असलेल्या, चाकोरीबाहेरच्या वाटांवरच्या साहित्यकृती. मराठीच्या साहित्यविश्वात मैलाचे दगड ठरतील अशा तर कित्येक...
तसेच ’मौजे’चे दिवाळी अंक. वर्षानुवर्षे जपावेत असले चिरेबंदी साहित्य असलेले ते अंक. कधी कुणाच्या कविता आवडीनं वाचण्याचा मला कंटाळा. पण ’मौजे’तल्या कविता आवर्जून वाचाव्याशा वाटत गेल्या आणि मग नकळत कविता वाचण्यातला आनंद रुजत गेला मनात...


खरं तर तुमचा माझ्याशी आलेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध काय तो इतकाच. ’सत्यकथा’ ही गोष्ट मला तरी ’स्वातंत्र्यलढा’ किंवा ’आणीबाणी’ या गोष्टींसारखी आणि या गोष्टींइतकीच अपरिचित. फार दंतकथा असणारी, फार दूरची आणि त्यामुळे ’माफक रोमांचक’ या विशेषणापलीकडे न जाणारी.


मराठी साहित्यानं कात टाकण्याच्या त्या दिवसांत म्हणे ’सत्यकथे’नं सार्‌या चाकोरीबाहेरच्या लेखकांना हक्काचं व्यासपीठ दिलं. सगळ्या वादांत, विरोधाच्या गदारोळात, टिंगलटवाळीतही खंबीर आणि सक्रिय पाठिंबा दिला. प्रसंगी ’प्रस्थापितांचा संकुचित संप्रदाय’ अशी हेटाळणी ऐकूनही अभिजात प्रयोगशील साहित्याचा आग्रह सोडला नाही, तसाच विरोधी मतप्रवाहांची दखल घेण्याचा सर्वसमावेशक सुसंस्कृतपणाही सोडला नाही. म्हणे...


या सार्‌या ऐकल्या-वाचलेल्या, सांगोवांगीच्या गोष्टी. मला प्रत्यक्ष दिसत राहिला तो ’मौजे’बद्दलचा पुस्तक जगातला सकारण आदर आणि दबदबा. मनोहर जोशी-विजय तेंडुलकर वादातही ’घडला तो प्रकार दुर्दैवी होता. पुरस्कार कुणाच्या हस्ते द्यावा हे मी संस्थेला सांगणं उचित नाही’ इतक्याच मोजक्या शब्दांत तुम्ही सुसंस्कृतपणे व्यक्त केलेली प्रतिक्रिया. निरनिरळ्या कुळांच्या, वयांच्या आणि प्रवृत्तीच्या लेखक-कलावंतांनी तुमच्याविषयी वेळोवेळी प्रकट केलेली आदराची आणि आपुलकीची वादातीत भावना. लेखनासारख्या व्यक्तिनिष्ठ सर्जनप्रक्रियेतही तुमचा मोलाचा हातभार लागल्याबद्दल व्यक्त केलेली सुंदर कृतज्ञता. प्रत्यक्ष साहित्यनिर्मिती न करताही तुमच्या अक्षरश: अजोड कामासाठी तुम्हाला साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळावे हा कुणीकुणी कृतज्ञभावाने केलेला आग्रह. तुमच्या नावे लिहिल्या गेलेल्या कित्येक अर्पणपत्रिका...


या सार्‌याबद्दल आभार मानणेही काहीसे अपुरे, औपचारिक आणि उथळ वाटेल.


तुमच्या सर्जनाच्या अभिव्यक्तीसाठी इतका वेगळा, विधायक रस्ता शोधलात तुम्ही. आणि किती देऊन गेलात... तुम्हीच तुमच्या एका पत्रात म्हटले आहे तसे चंद्रबिंबाची कळा वाढवून गेलात... तुमचेच शब्द परत एकद उद्धृत करून थांबणे औचित्याला धरून होईल...
"...काल संध्याकाळी चांदणे सुंदर पडले होते. गच्चीवर त्यात बसावे असे फार मनात आले, पण गेलो नाही. अशा नीरव चांदण्यात एकटेपणा सोसत नाही... वाटते, चांदण्याचे दूध मिसळून मऊ झालेल्या शांततेत सर्वांगी न्हाऊन निघावे व विरघळून जावे, किंवा तळ्यातल्या कुमुदाप्रमाणे शरीर-मनाच्या पाकळी-पाकळीने उमलत जावे आणि त्या चांदण्याला किंवा चंद्रबिंबाला अभिमुख होऊन भरून यावे आणि अंतर्बाह्य निवून गात्रागात्रांत ती सुगंधी चापेगौर शीतलता भिनवून घ्यावी, किंवा दुरून एखाद्या मधुर घंटेचा मंद वलयांकित निनाद ऐकावा, किंवा सनईसारख्या गोड व आर्त स्वराचे कण रंध्रारंध्राचे कान करून ऐकावे... आणि हे जडकठोर शरीर त्या सुखात न कळता विरून जावे... आत्म्याची क्षीण ज्योत चंद्रबिंबात विलीन होऊन त्याची कळा वाढली तर वाढावी... आपण उरूच नये..."

Saturday, 11 August 2007

बरेच काही उगवून आलेले...

तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूंच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले...


***

अगदी सुरुवातीच्या काळातली कधीतरीची ही गोष्ट. ’नऊ तासांपलीकडे मी तुमचं काहीही देणं लागत नाही’ अशा बाणेदार आणि शुगर कोटेड्‌ तुसडेपणातून जमतील तेवढ्याच गप्पा मारणं सोडून मी जरा जरा माणसांत यायला लागले होते तेव्हाची. घरी परत जाताना गाडीत कुठल्याश्या देव-आनंद-कालीन गाण्यावर खूश होऊन मी मारे आवाज वगैरे वाढवला. त्यावर स्पष्ट नाराजी नोंदवणारं तुझं ’च्‌च्‌’ ऐकून, मागे वळून भिवया उंचावल्या असाव्यात मी. तेव्हा म्हणाला होतास, "हे बरंय... नाही आवडत एखादी गोष्ट असं म्हणायचीपण चोरी! थेट माझ्या अभिरुचीवरच उठणार म्हण की..."

तुझी मळल्या वाटेबद्दलची बेफिकिरी तेव्हाच नोंदली मी.

मग कधीतरी संदीपच्या 'पाडू' कवितांबद्दल त्याला शिव्या घालत होते मी, तेव्हा बोलता बोलता सहज बोलल्यासारखा, "'पाडू' तर 'पाडू', पण आपल्यात आहे का कवितांचा जाहीर कार्यक्रम करण्याची हिंमत? आपण फक्त पगाराचे आकडे फुगवण्यात काय ती खर्डेघाशी दाखवणार. कविता करायला आणि त्यावर जगायला जिगर लागते...बसून शिव्या देणं सोपं असतं," असा शांतपणे टाकलेला बॉम्ब.

मी भिवया उंचावायलाही विसरून गेले असणार...

***

हे नेमकं कधीचं ते मला आठवत नाही. ’बोलायला नको होतं ते बोलून तर बसलो आहोत, आता या टोपीतून कोणकोणते ससे बाहेर येतात ते पाहायचं’ असा हताश मूड सोडून आपण जरा गप्पा-टप्पा करायला परत सुरुवात केली होती त्या काळात असावं. मी ते सगळं ’सिगारेट’ प्रकरण तुझ्या पुढ्यात आणून टाकलं होतं, म्हटलं तर निरागसपणे, म्हटलं तर थोडा अंदाज घेण्याच्या पवित्र्यात. काय तरी प्रेक्षणीय गोची होती खरंच! एकीकडून तू हा सगळ्या आचरट प्रकारातली गंमत समंजस मित्रासारखी समजून पोटात घालावीस ही अपेक्षा आणि दुसरीकडून तुला भडकवण्याच्या माझ्या क्षमतेचा झालेला मनस्वी विकृत आनंद... तुझंही तेच! माझं हे असले आचरट प्रकार करून पाहणं आवडतं आहे, समजतं आहे कुठेतरी आणि तरी पोटातून वाटलेली काळजी दडवता येत नाहीय...
खरं तर निघायची वेळ ऑलमोस्ट उलटून गेलेली, पण जाणार कशी मी? मी विचारलेल्या एका बिनतोड सवालाचं उत्तर दिलं नव्हतंस तू! ’लिही ना उत्तर, थांबलेय मी’ असं म्हणून मी तुझ्या मागे उभी राहिले, तेव्हा अजूनच कोंडीत पकडल्यासारखी अवस्था तुझी. ’तू जा इकडून, मी लिहितो’ असं म्हणून मला हाकललंस आणि ते वाक्य उच्चारलंस स्वत:शीच हताश होऊन पुटपुटल्यासारखं -

"कधीतरी विचार करावा माणसानं थोडा..."

पुढच्या सार्‌या पडझडीची स्वच्छ जाणीव व्हावी अशा सुरात, स्वत:च्या वाहवत जाण्याला आणि त्यातल्या अपरिहार्यतेला उद्देशून उच्चारलेलं ते वाक्य. कुणी पाहू-ऐकून विटाळू नये असं आणि इतकं खाजगी.

ते ऐकलं आणि डोक्यातली सगळी अटीतटी, राग, तडफड संपून फक्त एक उदास आनंद तेवढा उरला मनात...

***

’मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा...’ अशातली गत असतानाही हट्टानं दिवसचे दिवस भिजून लुटलेला पाऊस. यशराज फिल्म्सची हिरॉईन असल्याच्या थाटात चंद्राकडे दिमाखानं पाहत रचलेल्या कविता. सिनेमे पाहण्यात बुडवून टाकलेल्या संध्याकाळी. पुस्तकं, नाटकं, मित्रमंडळी...

आणि तरीही ग्रेस म्हणतो तसा ’बुबुळांच्या शुभ्रतेत रुतलेला चंद्र’ आपला अभंगच...

***

’पळून जायचं नाही’ या तुझ्या वेडगळ आव्हानासमोर मूर्खासारखी मान तुकवून आपण आयुष्य परत चालू केलेलं. ’जमतंय की आपल्याला’ अशा आश्चर्यात मी दंग असताना तू चक्क म्हणावंस, "मी जातो दुसरीकडे कुठेतरी..."? ठिकाय, आपली त्यालाही ना नाही! पण ’मला इथे काहीच मिळत नाहीय माझ्या मनासारखं, मी जातो...’ या तुझ्या कांगावखोर प्रस्तावावर बॉसनं तुला काय म्हणावं?

’प्रूव्ह युअरसेल्फ ऍण्ड देन गो. पळून जाण्यात काय गंमत आहे?’

हा हा हा!!!

तू अर्थातच थोबाडीत मारल्यासारखा गप्प! तुझा चुपचाप थांबण्याचा निर्णय ऐकून त्या बॉसला बिचार्‌याला वाटलं असेल, काय भन्नाट तत्त्वज्ञान ऐकवलं आपण...त्याला काय ठाऊक ही कहाणीमागची कहाणी?
हे रामायण ऐकून हसावं की रडावं ते मला कळेना. स्वत:शी नसती युद्धं खेळण्यातून सुटका होता होता राहिली म्हणून नाराज व्हावं की तुझी पुरती जिरवणार्‌या या काव्यात्म न्यायावर खूश व्हावं असला भन्नाट प्रश्न माझ्यासमोर.

पण तुझा "सही जिरली ना माझी?" असा प्रश्न घेऊन असलेला गंमतीदार चेहरा बघून मग जे हसायला यायला लागलं, ते आवरेचना...

***

अलीकडे तसे आपण एकमेकांना आणि एकमेकांपासून जपून असतो. तशी भंकस, मस्करी, गप्पा-टप्पा, मस्ती आणि हमरीतुमरीवर येऊन केलेली भांडणं अजूनही चालतात आपली. समोरच्या माणसाला नेमका कसला राग येईल हे उमजून मुद्दामहून त्याचा अदमास घेत काडी टाकणं, तो अपेक्षेप्रमाणे भडकला की मनमुराद हसणं, चिडणं, चिडवणं...

पण एक आवर्तन पुरं झालं आहे आता.

आता प्रदेश पावलांना पूर्वीइतके अपरिचित नाही राहिलेले.

बरेच ऊष्ण गतिमान प्रवाह आता वरच्या संथ-शांत प्रवाहाखाली.

पोटातून अपार माया. भावी विध्वंसाची बीजं पाहताना दाटून येणारी काळजी. एकमेकांचं पोरपण जपण्यासाठी केलेली धडपड. न दिसणार्‌या शेवटाची भीती आणि अनामिक आकर्षणही...

’मी दोन ओळींच्या मधे कधीच काहीच पेरत नाही’ असं कितीही ठामपणे म्हणालास तू, तरी -

मधल्या काळात बरेच काही उगवून आलेले...

Thursday, 19 July 2007

तुम्ही कधी तुमचा एको पॉईंट शोधलाय...?

(शीर्षक: ’...आणि तरीही मी’मधल्या सौमित्रच्या ’एको पॉईंट’ ह्या कवितेवरून.)

"काहीतरी मोठ्ठं-भव्य-दिव्य कर ग..."माझी चिल्लर स्वप्नं ऐकून माझा एक मित्र कळवळून म्हणाला होता!

तेव्हा त्याच्याशी वाद घालणं राहून गेलं होतं. पण ते वाक्य आणि त्याच्यामागची त्याची सच्ची कळकळ डोक्यातून पुसली गेली नव्हती, नाही. तसंच त्याचं कुठेतरी काहीतरी चुकतंय, ही खात्रीही.

तर... हे काही प्रश्न मित्राला -

खरं आहे. काहीतरी मोठ्ठं-भव्य-दिव्य करायला हवंय.

पण ’मोठ्ठं-भव्य-दिव्य’ म्हणजे नक्की काय रे? त्याच्या व्याख्या केल्या आहेस का तू तुझ्यापाशी नक्की? उदाहरणार्थ अमुक इतक्या माणसांवर सत्ता गाजवू शकलो आपण म्हणजे मोठ्ठं? (हे फारच ढोबळ झालं नाही?! बरं, आपण जरा वेगळ्या शब्दांत मांडू - ) अमुक इतक्या माणसांच्या आयुष्याला आकार देण्याची ताकद मिळाली म्हणजे मोठ्ठं? किंवा अमुक इतके पैसे कमवले आणि उर्वरित आयुष्य अधिकाधिक मिळवत राहण्याची बेगमी केली म्हणजे मोठ्ठं? किंवा जगातल्या अमुक इतक्या ठिकाणी आपलं नाव छापून आलं, आपण अमुक इतक्या लोकांना माहीत झालो, म्हणजे मोठ्ठं? परदेशात शिकण्याची, काम करण्याची संधी मिळाली म्हणजे मोठ्ठं? याआधी कुणीच न केलेलं काही आपल्या हातून घडलं म्हणजे मोठ्ठं?

काय? मोठ्ठं म्हणजे नक्की काय?

खरं सांगू? हे निकष नाहीतच एखादी गोष्ट ग्रॅण्ड असण्याचे. मला चढणारी झिंग, माझं समाधान, माझ्या जिवाला लाभणारी स्वस्थता हे खरे निकष. मग जगातली कितीही मोठ्ठी गोष्ट माझ्यासाठी फडतूस ठरू शकते. आणि जगाच्या लेखी कितीही क्षुद्र असलेली गोष्ट माझ्यासाठी स्वप्नवत ठरू शकते.

माझा जीव किती तीव्रतेने, खोलवर गुंततो आहे...
माझ्या टीचभर आयुष्यातलं काय काय पणाला लागतं आहे...
मी किती बेभान सावधपणे खेळात उतरते आहे...
It matters...

हां, आपल्याला खुणावणारे असले खेळ शोधायलाच लागतात आयुष्यात. त्यातून सुटका नसते. ते शोधण्याचे रस्ते, त्यातल्या अडचणी, पुन्हा पुन्हा घेरत राहणारी निराशा आणि तिला वारत पुढे चालत राहण्याची आपली मस्ती... मिळेल... पुढच्या वळणावर असेल... असे स्वत:ला समजावताना येणारे वैफल्य आणि स्वत:च्या शहाणपणाबद्दल येणार्‍या रास्त शंका... हे सगळे अपरिहार्यच.

’मोठ्ठं-भव्य-दिव्य’ या गोष्टीच्या व्याख्या मात्र आपल्या आपण ठरवायच्या.
आपला एको पॉईंट आपला आपणच शोधायचा.

What say?

Thursday, 5 July 2007

दोन ब्लॅकाउट्सच्या मधल्या प्रवेशासारखी एक संध्याकाळ!

पावसानं गच्च दाटून अधिकच काळोखी, कातर केलेली संध्याकाळ. आधीच कासावीस वेळ. त्यात ही न कोसळणारी गुदमर. समोर पसरलेला लांबलचक हिरवागच्च शेताडीचा पट्टा. त्याला लागून असलेली जडावलेली गप्प गप्प खाडी. साऱ्याच्या निरंतरपणात भर टाकणारे पार क्षितिजापर्यंत वगैरे जाणारे आगीनगाडीचे फिलॉसॉफिकल रूळ आणि ऐन जुलैचा वेडसर वारा. या सगळ्याला अपुरेपण येऊ नये म्हणून की काय - चक्क चुकार बगळ्यांची एक पांढरीशुभ्र माळ.

सोबतीला एकटेपण. आसमंतात भरून राहिलेलं. कधी कोसळेल अंगावर त्याचा नेम नाही, पण तूर्तास तरी दबा धरून असलेलं. पावसासारखंच काळोखी करून.

आपल्या जिवात नेमकं काय चाललं आहे हे कळण्याची सुतराम शक्यता नसलेली गर्दी पार्श्वभूमीला पसरलेली. आपापल्या क्युबिकल्समधे, आपापल्या फोन्सवर, पीसींसमोर मश्गूल. त्यांच्यात आणि आपल्यात फक्त एका काचेच्या दरवाज्याचं अंतर. मागे स्वत:ला कामात बुडवून घेतली इमारत आणि आपण असे वारा अंगावर घेत सज्जात उभे.

मागचं-पुढचं सगळं काही क्षणांपुरतं नि:संदर्भ करून टाकत. काळाच्या मागच्या तुकड्यावर जे घडलं आहे त्याची जबाबदारी खांद्यावर पेलत, येणाऱ्या वाटेवर काय असणार आहे याबद्दल उत्सुक, पण पुरते बेखबर. सावध आणि बेसावधही. पूर्ण त्या क्षणाचे होऊन जाऊ पाहणारे. वर्तमानाच्या सतत धावत्या, निसटत्या तुकड्यावर जिवाच्या कराराने पाय घट्ट रोवून उभे असलेले.

धडधडणाऱ्या निर्दय शहराच्या कुशीत मिळून गेलेली ही शांत-निवांत-जिवंत संध्याकाळ.

यापरता अधिक आनंदाचा क्षण काय असू शकतो?

एन्जॉय...

Friday, 22 June 2007

कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...

’रंजिशी सही...’ डोक्यात घुमत असलेलं. कुठल्याही गाण्याबरोबर चालताना अर्ध्या वाटेवर डोकं वाटा चुकायला लागतं तसंच... कधी आपली ’महान’ एकाग्रता चकव्यात गुंतवते, तर कधी गाणंच पायवाट सोडून रानोमाळ भटकायला भाग पाडतं...तशातली गत झालेली. रुना लैलाचा शांत, ठाम घायाळ सूर पाझरतो आहे एका लयीत. त्याची एक नशाच चढल्यासारखं झालेलं...

’कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...’ इथे अडायला झालं.

भरम...?

खरी मी तिच्याही आधी ’तू भी तो कभी मुझको मनाने के लिए आ...’वर जाऊन तिची वाट पाहते नेहमी. पण ’मोहोब्बत का भरम रख...’? म्हणजे? पुढे जाताच येईना.

भरम...

इथे अपरिहार्यपणे मेघनाची आठवण झाली. किती वेगवेगळ्या प्रकारे या भ्रमांचं विश्व साकारलं आहे तिनं. भ्रमांचा आधार आयुष्याला जोडून ठेवणारा आणि त्यांना नाकारताना लागणारी प्रचंड अमानुष ताकद... लख्ख सत्य समोर दिसत असूनही ते नाकारून भ्रमांना कवटाळून बसण्यातली ’अठरावा उंट’मधल्या संजीवची अगतिकता... आणि ’टेलिंग दी ऍबसॉल्यूट ट्रुथ वॉज पार्ट ऑफ माय स्ट्रॅटेजी...’ म्हणून भीषण एकटेपणाला सामोरं जाणारी ’नातिचरामि’मधली मीरा...

भ्रमांच्या मोहक आधाराचं आणि फसवं आभासी सुख देण्याच्या क्षमतेचं किती नेमकं भान आहे तिला...

तशीच गौरीची कालिंदीही.

इतक्या साऱ्या तडजोडी करून जोडत तर काहीच नाही आपण...
तडजोडी मोडताना होणाऱ्या विध्वंसाचं काय?
आणि तडजोडी जगताना होणाऱ्या विध्वंसाचं?

हाही भ्रमांच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा निकराचा प्रयत्नच की...

’तुझ्या कैफात मी आता तुलाही लागलो विसरू,असे समजू नको तू की, तुला मी टाळतो आहे...’ असं म्हणतात सानेकर, तेव्हा हा ’मोहोब्बत का भरम’ असतो त्यांना खुणावणारा? असावा. नाहीतर ’तुझा आभास सोनेरी मला सांभाळतो आहे...’म्हणजे काय?

सरतेशेवटी हे सारे भ्रम?

नात्यांचे...कुणी आपल्यासाठी असण्याचे...कस्मे-वादें निभावण्याचे...प्राणांवर नभ धरण्याच्या आश्वासनांचे...स्वप्नांचे...

असूदेत. खोटे, अल्पजीवी, कधी ना कधी जमिनीवर आदळणारे.. असूदेत. तरीपण मला हवेत. समोरच्या माणसाला नेमकं काय आणि किती कळतं आहे त्याचे अंदाज बांधणंच हातात असतं फक्त...असं म्हणत चरफडत आले आहे मी नेहमीच. तरीही. भ्रमांची ताकद कळते आहे मला आता. मला नको आहे सत्य-बित्य इतक्यात. ते मीरालाच मिळू द्या. तूर्तास तरी आपल्याला नको. आपल्याला आपले भ्रम प्यारे आहेत..


कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिए आ....

क्या बात है!

कधी ना कधी ’येह आखरी शम्माही बुझाने के लिए आ...’वर पोचायचंच आहे...
तोवर ’पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...’ इतकंच खरं...

Saturday, 26 May 2007

प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे...

खरंय...

आपल्याला कित्ती कित्ती वाटलं असं असावं म्हणून, तरी आपल्याला एकाएकी उडता थोडंच येणार असतं? नसतंच.

’आत्त्त्त्ताच्या आत्त्त्त्ता पाऊस हवाय’ असं कित्ती पोटातून वाटत असेल तरी आपल्यासाठी एप्रिलमधे पाऊस येतो थोडाच? नाहीच येऊ शकत.

’जगातल्या सगळ्याच्या सगळ्या संध्याकाळी कुठेतरी सुरक्षित ठिकाणी पुरून आपण विनासंध्याकाळच्या प्रदेशात राहायला जावं’ असं किती मनापासून वाटलं तरी संध्याकाळ चुकवता येते थोडीच? रोजच्या रोज देणेकऱ्यासारखी संध्याकाळ येतेच. ऑफिसातही येते...

’संदीपला खरंच कळत असेल का तो म्हणतो ते सगळं, की बाकी साऱ्यासारखा हाही भ्रमच?’ या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळावं असं किती वाटलं म्हणून ते मिळतं थोडंच? समोरच्या माणसापर्यंत नेमकं काय आणि किती पोचतंय, त्याचे अंदाज करणं तेवढं हातात आहे, हे कितव्यांदातरी कळून घ्यावं लागतंच.

ही मेघना पेठे एवढं सगळं समजूनसुद्धा एखाद्या निगरगट्ट आणि शूर माणसासारखी कसं पेलू शकते जगणं, असा आदरयुक्त अचंबा वाटला तरी आपण तिच्याएवढे शूर होऊ शकतो थोडेच? आपण परत परत त्याच त्या आशाळ तडजोडी करत राहतोच.

आपल्या काळजाच्या देठापासून हवं म्हणून, आपली जिवाजवळची गरज म्हणून ... काही घडत नसतंच.

’आवर्तन’मधली सुरुचीची बहीण नाही का म्हणते प्रॅक्टिकली - ’आपल्याला हवं असणं आणि ते मिळणं यांचा आयुष्यात एकमेकांशी काही संबंध तरी असतो का दीदी? तूच सांग.’

खरंय. नसतोच.

Monday, 14 May 2007

रिश्तोंकी परछाईयाँ...

"भंकस ही कधीपण क्रिएटिव्हच असते..दर वेळी नवीन करावी लागते ना ती!"

"हे काय च्यायला, तुम्ही एखादी गोष्ट शिकवणार, म्हणून काय आयुष्यभराचे राजे? जमणार नाही."

असली त्याची मुक्ताफळं ऐकून सुरुवातीला मी त्याला सिरियसली घेतलंच नाही. तसा फारसा नव्हताच तो ऑफिसात. आधी हात मोडला म्हणून, मग पाय मोडला म्हणून; साहेब जवळ जवळ चार महिने रजेवरच होते. नंतरच आमची जरा जरा ओळख व्हायला लागली. संध्याकाळी फारच वैतागला तर गप्पा मारायला म्हणून येत असे तो माझ्या डेस्कजवळ. कॉलेजमधली मस्ती, फिल्म फेस्टिवल, नाटकं, संदीप, कंटाळा.... असल्या कसल्याही गप्पा. मग हळूहळू त्याचं एखादं वाक्यं नकळत डोक्यात राहून जायला लागलं.

”’आपण’ का नाही लिहित काहीतरी?"

"शोधा म्हणजे सापडेल. पण काय शोधायचं ते माहीत नाही, असंच झालंय ना ’आपलं’?"

"मग? पुढे काय शिकायचा विचार आहे ’आपला’? हे टीचर्स ट्रेनिंग का काय ते ’आपण’ नाही करणारे का?"

हा ’आपण’चा खास वापर - समोरच्याला ऑफ गार्ड पकडणारा. ही त्याची खास लकब लक्षात यायला लागली, तेव्हाच त्याला ’हॅपी गो लकी’ म्हणून टाईपकास्ट करायचं मी बंद केलं असावं. निमित्त त्याचं झालं. पण मग आजूबाजूची सगळीच, मी द्विमित म्हणून फुली मारून टाकलेली, माणसं माझ्या लेखी हळूहळू त्रिमित व्हायला लागली ती त्याच सुमारास.

सतत पॅटर्नल वागून समोरच्याला पंखाखाली घेऊ पाहणारा एक मित्र. त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर राहून त्याच्या आक्रमक पालकत्वाचा राग येऊ न देता त्यातली फक्त आस्था तेवढी उचलायला शिकत होते. मात्र त्यातही त्याचं समोरच्या माणसाबद्दलचे आडाखे बांधणं थांबत नाही हे जाणवलं तेव्हा मला ’जग उफराटं आहे’ असा धक्कादायक साक्षात्कार झाल्याचा आठवतो...!

नवीन काहीही करा-शिकायचा प्रचंड उत्साह असलेला एक मित्र. त्याचं फ़्रस्टेशन आणि ’क्या यार, कम से कम सपने तो बडे देखने चाहिये...तभी तो कुछ कर सकते हैं..’मधून लख्ख दिसणारा त्याचा निरागस स्वप्नाळूपणा. तो पाहूनच मी माझ्या निष्क्रिय कडवटपणाला दटावायला लागले नकळत.

जाड भिंगांचा चष्मा आणि चेहऱ्यावरचे ’बाळू’छाप निरागस भाव घेऊन असलेला एक मित्र. बोलता बोलता कधी विकेट काढेल याचा काही नेम नाही मात्र. ऐकणारा पार गारच.

पुरुष हा विषय आयुष्यातून एका समंजस शहाणपणाने बंद करूनही कडवट न झालेली एक मैत्रीण...

इतक्या सरळपणे - खरं तर मूर्ख म्हणावं इतक्या सरळपणे - वागून इतकी वर्षं कसे टिकले असतील इथे, असं आश्चर्य मला नेहमी वाटायला लावणारे फिलॉसॉफर बॉस...

ज्याला पाहून मला न चुकता दर वेळी भारत सासणेंच्या ’रंगराजाचा अजगर’ या कथेची आठवण येते, असली राजकारणं खेळणारा एक टीम लीडर. पण तशीच त्याची अंगावर घेतलेले पंगे एन्जॉय करत निभावून नेण्याची खुजलीही....

ही आणि अशी कितीतरी माणसं. जिवंत. आपापला इतिहास-भूगोल घेऊन येणारी. माझ्या असण्यावर रिऍक्ट होणारी. मला रिऍक्ट व्हायला भाग पाडणारी. एकाच वेळी प्रेमळपणे काही देऊ करणारी आणि त्याच वेळी आपल्या निखळ स्वार्थानं मला चकित करून टाकणारी...

त्यांच्या असण्याचं भान मला त्यानं पुरवलं. त्याचा तसा उद्देश होता असं अजिबातच नव्हे. कदाचित त्याचा अंगभूत चांगुलपणा असेल किंवा स्वत:चा अहंकार सुखावण्याची गरजही. किंवा दोन्ही. किंवा या दोन्हीबरोबर कुठेतरी काठ शोधायची माझी आत्ताची गरज.

काहीतरी झालं खरं.

म्हणूनच परवा तो बोलता बोलता सहज बोलून गेला ते वाक्य तेव्हा मी चमकले.

" तुला असं नाही वाटत मी बरेच दिवस तुझ्याशी बोलून या सगळ्याची तयारी करून घेतोय...? It's time to get married..."

म्हणजे? तू कोण माझ्या आयुष्यात काहीतरी ठरवायला येणारा? मी तो हक्क अद्याप दिलेला नाही कुणाला. इतकी माझी काळजी का करावी कुणी? मला नाही आवडत कुणी इतकं पर्सनल झालेलं...
अशा संतप्त, कडवट प्रतिक्रिया उमटून गेल्या डोक्यात. पण मागोमाग आवंढाही आला एकदम. पुढे-मागे काही बोलताच येईना. तो क्षण तसाच रेटून नेताना पुरेवाट झाली...

आणि मग कळलंच मला एकदम - इतके दिवस या माणसांना खोटी खोटी, आपल्या आयुष्यात नसलेली, निव्वळ सोईपुरती माणसं समजत होतो आपण. ते तसं नाहीय.

One can't afford to treat the world like a lifeless thing. It's a whole, live, throbbing life... react to it.

Thanks friend, for making me see it. Thanks.

Wednesday, 9 May 2007

रक्तात उतरली होती संध्याकाळ...

प्रेम वाटलं म्हणजे नक्की काय झालं? किंवा गौरी देशपांडेच कोट करायची सरळ तर आपण म्हणूया की ’पुरुषांना आणि स्त्रियांना एकमेकांना पाहून होणाऱ्या स्रावांना प्रेम-बिम म्हणण्याच्या भानगडीत न पडणंच चांगलं.’

पण तरी तुझ्याबद्दल मला किंवा माझ्याबद्दल त्याला ओढ वाटली किंवा काहीतरी हवंसं वाटलं म्हणजे काय झालं? या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात कुठून होत असते? की सुरुवात वगैरे असं काही नसतंच? नुसत्याच गोष्टी घडत जातात, असं?

म्हणजे उदाहरणार्थ तुझे गुलाबी रंगाचे ओठ आठवतात मला. तुझं किंचित चाचरत प्रचंड एक्साईट होऊन बोलणं किंवा एखादी गोष्ट फारशी मनात नसताना ’हॅ हॅ हॅ’ असं मोठ्यांदा कृत्रिम हसून ते गोष्ट उडवून लावणं किंवा तुझी काहीशी बुटकी शिडशिडीत एकरेषीय अंगलट...
हे सगळं फारच शारीर होतंय नाही? पण ’फार शारीर’ किंवा ’कमी शरीर’ असं कुठे काय असतं? मन-बिन म्हणजे तरी काय? या शरीरातल्या पेशींनी एकमुखानं केलेली मागणीच ना? ’शारीर’ या संकल्पनेला बिचकणं थांबवायला हवं. मग कदाचित या सगळ्यातून मला वाटणारा प्रचंड अपराधी भाव संपेल.

कठीण... वेल.... आहेच.

तो आणि मी बोलत असू खूप. फारच ना. सी. फडके पद्धतीत सांगायचं झालं तर तसे उपवर आणि उपवधूही असणारच आम्ही एकमेकांना. उदाहरणार्थ पुस्तकं आणि सिनेमे आणि अंगातला जास्त शहाणपणा आणि ओढून-ताणून आणलेला एकटेपणा आणि कदाचित इम्मॅच्युरिटीही. मला जमू शकणाऱ्या सगळ्या पद्धतीत संवादही साधायचा प्रयत्न केला मी त्याच्याशी. असं समजूनही पाहिलं, की ’येस, या मुलावर आपलं प्रेम आहे’. आणि खरं सांगू, त्या त्या वेळी मला वाटलंही ते खरं...

खरं असणं-नसणं शेवटी वाटण्यावरच अवलंबून असतं की काय? कुणास ठाऊक...

पण इट डिडण्ट वर्क आऊट. तसं तर सारं काही आलबेलच होतं. इथे बिनसलंय, असं काही कुणाला बोट ठेवून म्हणता आलं नसतं. पण ते तसं नाही हे मला कळत गेलं आणि एखाद्याला न समजणारी गोष्ट त्याला ’समजावून देणं’ अशक्य असतं हे माझं मतही दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत गेलं.

तसे स्पर्श वर्ज्य कधी नव्हतेच. म्हणजे थिऑरॉटिकली! कधी कधी हातात हात घेणं वा चारचौघांत वावरताना होणारे स्पर्श विनासंकोच चालवून घेणं हे चालेच. पण कधी स्पर्शाची भाषा वापरून पाहावीशी नाही वाटली मला त्याच्यासोबत. माझी नसलेली तयारी स्पष्टपणे नोंदल्यावर त्यानंही कधी निसटते म्हणूनही स्पर्श केले नाहीत हेही खरंच.
आणि तरीही एखाद्या नियत क्षणी त्याच्यासोबत असताना मला जाणवून गेलेलं माझं सगळं शरीर आठवतंच आहे मला...

पण आमच्या नात्यात हे सारं फारच मुकं राहिलं कायम. ज्या नात्यात त्या ओढीनंच होतात लहान-सहान तपशीलही जिवंत, त्यात आम्ही ते असं मुकाट मिटून टाकावं - हेच किती बोलकं आहे ना?

आणि मग मनात नकळत येत राहिलास तू. आता मागे वळून पाहताना वाटतं, हेही सहज घडलेलं की आपणच घडवून आणलेलं, सहजपणाच्या बनावाखाली? किती सहज-स्वच्छ संगती दिसते ना या साऱ्यांत? आपण कितीही नाकारायची, लपवायची म्हटली तरी ती असतेच आणि देनिस म्हणतो तशी ’कधी ना कधी रहस्याला वाचा फुटतेच...’

संदीपची ती कविता ठाऊक आहे का रे तुला -

मी जाता जाता तुला बोललो काही,
ते खरेच सारे असेल ऐसे नाही
रक्तात उतरली होती संध्याकाळ,
वदवून घेतले तिनेच काहीबाही...

म्हणजे ही रक्तातली संध्याकाळ फक्त? बाकी काही नाही?

मेघना पेठेसारखं नाट्यपूर्ण उत्कटपणे म्हणावंसं वाटतं आहे, ’या इलाही, येह माजरा क्या है...’