मावशीबोलीतल्या कविता

संवेदच्या ’खो’ला दिलेलं हे क्षीण उत्तर.

ही कविता कुणाची ते मला ठाऊक नाही. कुठल्याश्या युगोस्लाव्हियन कवीच्या या कवितेचा कुणीसा हिंदीत केलेला अनुवाद मी विजय पाडळकरांच्या एका लेखात वाचला होता. व्हॅन गॉगनं त्याच्या भावाला लिहिलेल्या पत्रांच्या संदर्भात तिचा उल्लेख झाला होता.

कविता डोक्यात घट्ट जाऊन बसली.

अनुवादाचा प्रयत्न केला खरा. पण ‘अनुवाद काही खरा नव्हे गड्या, निदान आपलं काम तरी नक्की नव्हे’ असं आत्मज्ञान देऊनच तो झाला. असो.

ही मूळ कविता -

ऐसा होता है कभी कभी
शरद की रात्री में
जब एशफॉल्ट पर चेस्टनट गिरते है
और दूरकी घाटियोंसे
कुत्तों का भोंकना सुनाई देता है
तब जन्म लेती है
इतने अकथनीय रूपसे लालसा किसी की
जो अच्छा हो, आत्मीय हो
अंतरंग हो, साथी हो
जिसे लिख दे सबकुछ जो हमारे अंतर में है
खत हम जरूर लिखते
लेकिन
वह, जो नही है.

अनुवाद -

कधीकधी होतं असं पानगळीच्या दिवसांत,
रात्रीची नीरव शांतता,
टिपूर चांदणं
आणि दूरवर कुठेतरी भुंकणारी कुत्री...
अशा वेळी एक अनामिक तहान लागते जीव शोषून घेणारी
कुणीतरी असावं –
कुणीतरी जिवाजवळचं,
आपलं म्हणावं असं,
आतड्याचं –
मनात उसळणारं सारं सारं ओतावं ज्याच्या पुढ्यात
असं कुणीतरी.
लिहिलंही असतं म्हणा.
पण –
असं कुणीच तर नाही.

माझा खो गायत्री, श्रद्धा आणि यॉनिंग डॉगला.

6 comments:

a Sane man said...

छान असावी मूळ कविता...अनुवादसुद्धा छान ए की आणि...मला तर तो मधला हिंदी सांधाच कैच्या कै कृत्रिम वाटला...त्या asphalt नि chestnut मध्ये उगा शारदराती खड्यासारख्या आल्यामुळे! पण ते असो, भाव पोहोचलाय इथून तिथे.

Gayatri said...

मला आवडला तुझा भावानुवाद. ’पानगळ’ छान आहे. ’कुणीच तर’ हे थोडंस हिंदाळलेलं वाटलं, पण तरी मोठ्यानं वाचताना चांगलं वाटतंय!

मी खूप आगाऊपणा केला तुझा खो घेताना :( पण एकदा एक कविता निवडली म्हटल्यावर मग भाषांतर तडीपार न्यायलाच हवं होतं. http://bolaacheekadhee.blogspot.com/2010/07/blog-post.html

Meghana Bhuskute said...

ते हिंदाळलेलं वाटतंय खरंच. :(
बाकी तुझा आगाऊपणा भारी आहे हो!

aambat-god said...

अनुवाद खरंच सरस झालाय! मूळ कविताही छान असावी. तुला का नाही वाटला तसा?

Gayatri said...

श्रद्धाला खो दिल्याबद्दल त्रिवार धन्यवाद :)

Samved said...

खरं सांगायचं तर तुझी "मुळ कविता" जास्त छान झालीए. व्हॅन गॉग फार जवळचा माणूस त्यामुळे मुळातल्या कवितेमागचा किंवा त्याही पुढे जाऊन त्याच्या पत्रामागचा विचार हा असा आरश्यासारखा सुस्पष्ट (हे आरश्यासमोर होईलच असं नाही हो दरवेळी)समोर आला म्हणून कुठल्याही संदर्भांची गरज लागली नाही