Wednesday, 3 June 2015

काय करता! (उर्फ मातृभाषा आणि काही गट)

मातृभाषेबद्दल आस्था असलेल्या माझ्यासारख्या लोकांना एकाच वेळी अनेक निरनिराळ्या आघाड्यांवर झगडावं लागतं.

अ] अतिविशाल गट
एकीकडे नवश्रीमंत, मराठीबद्दल तुच्छता/न्यूनगंड बाळगणारे, अर्धवट आंग्लाळलेले, नवश्रीमंत लोक. या गटातले लोक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालतात. वटपौर्णिमेच्या जोडीनं करवा चौथही साजरा करतात नि ’छान दिसतं’ म्हणून ’मांगमें सिंदूर’ भरतात. शक्यतो लोकांकडून मागून किंवा पायरेटेड कॉपीजमधून पुलं, वपु, मृत्युंजय, स्वामी, सिडने शेल्डन, चेतन भगत वाचतात. प्रशांत दामलेची नि हल्ली ’हर्बेरियम’मधली मराठी नाटकं बघतात. चर्चाबिर्चांबद्दल यांना पोटातून भीती कम तिरस्कार असतो, पण हे तसं उघडपणे म्हणू धजत नाहीत. या गटाला आपण अतिविशाल गट म्हणू.

आ] डांबरीकरण गट
दुसरीकडे प्रश्नांचं घातक सुलभीकरण करणारे, न्यूनगंडातून येणारा उद्धटपणा बाळगणारे, दस्तावेजीकरण-संशोधन-अभ्यास यांची गरजच काय, असा प्रश्न विचारणारे लोक. यांच्यातल्या बहुसंख्यांच्या ’ण’ नि ’न’च्या वापराबद्दल नाक मुरडण्याची प्रथा ’अ.वि.’ गटात आहे. (पण ’न’ नि ’ण’चा तथाकथित थारेपालट ही काही या गटात असण्याची पूर्वअट नाही). यांची मुलं तूर्तास इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नसतात. पण पहिलीपासून इंग्रजी सुरू झाल्यानंतर हेच लोक सर्वाधिक सुखावलेले असतात. ’मराठी माणूसच मराठी माणसाचा पाय ओढतो’ अशी तक्रार हे जगातल्या कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरादाखल करू शकतात. दीर्घकालीन, वास्तवादी आणि किचकट उत्तरं यांना सहन होत नाहीत. त्यावर ते हमखास बिथरतात. या गटाला आपण डांबरीकरण गट म्हणू.

इ] चर्चील गट
तिसरीकडे निष्क्रिय, उदासीन, स्थितिवादी, इंटुक लोक. यांना संस्कृत, इंग्रजी किंवा युरोपियन भाषा यांपैकी एका तरी भाषेबद्दल मातृभाषेपेक्षाही जास्त प्रेम असतं. हे सहसा फिल्मफेस्टिवल्समधून किंवा प्रायोगिक नाटकांना भेटतात. काहीही लोकप्रिय झालं की ते वाईट, निकस असणारच, असा यांचा ठाम विश्वास असतो. यांचीही मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांत असतात. पण ’त्याबरोबर आम्ही त्यांना उत्तमोत्तम मराठी साहित्याची ओळख करून देतो’ असं पालुपद जोडायला ते विसरत नाहीत. ’ष’चा अचूक उच्चार; चीज, वाईन, मोदक अशी अभूतपूर्व रेंज असलेल्या पदार्थांतली जाणकारी; गर्दीबद्दल कमाल तुच्छता नि तिरस्कार; ग्रेसबद्दल भक्तीच्या पातळीवरचं प्रेम; न कंटाळता कितीही चर्चा ही यांची खास लक्षणं. या गटाला आपण चर्चील गट म्हणू.

काही पोटगटही असतात. ’मरू दे ना च्यायला, आपल्याला काय करायचंय?’ हे घोषवाक्य असणारा ’आपल्याला काये’ गट; मराठीबद्दल प्रामाणिक, निरागस, घोर अज्ञान असणारा, फक्त क्रियापद तेवढं मराठी वापरून बोलणारा ’पत्र नव्हे मित्र’ गट; ’विलायती शब्दांचं आक्रमण होता कामा नये’ असा अभिनिवेश बाळगून ’मोबाइल नाही, भ्रमणध्वनी म्हणा’ असा हट्ट धरून बसणारा ’सावरकर बुद्रुक’ गट...

माझ्यासारख्या लोकांना वेळ बघून या सगळ्या आघाड्यांवर दोन हात करावे लागतात. कधी एका गटाला पाठीवर घेतलं, तर दुसर्‍याच्या तात्कालिक आश्रयाला जावं लागतं. कधी एकाला सहानुभूती दर्शवली, तर दुसर्‍याला ठेचावं लागतं. कधी सगळ्यांनाच थोडं चुचकारावं लागतं. कधी सगळ्यांना एकाच वेळी अंगावर - शिंगावर घ्यावं लागतं. कुणाशीच कायमस्वरूपी पातिव्रत्य ठेवून चालत नाही. कुणाशीच हाडवैर घेण्यात रस नसतो.

कारण शेवटी हे सगळे लोक तोंडानं काहीही बरळत असोत, शेवटी बोलतात माझ्याच भाषेत - मराठीत. काय करता!
***
(हा लेख पूर्वप्रकाशित आहे. पण ब्लॉगवर आणून टाकायचा राहून गेला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गटनावं डॉ. विवेक बेळे यांच्या नाटकांमधल्या थोर आणि आचरट नावांवरून सुचलेली आहेत.)

Sunday, 31 May 2015

"रानी कुठून आलो? गाऊन काय गेलो?"

आज भारांचा  १०५ वा वाढदिवस. ’ऐसी अक्षरे’ या संस्थळावरच्या मित्रांसोबत ’भा. रा. भागवत विशेषांक’ नामक एक मोठा उपक्रम पार पाडला आणि भारांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून प्रकाशित केला. त्याच्या समारोपाची ही नोंद.

अंक जरूर वाचा. एकमेकांना पाठवा. प्रतिक्रिया नोंदवा. नेहमीप्रमाणे सूचनांचं स्वागतच आहे!

हॅप्पी बड्डे, भारा!

***


चित्र: जालावरून साभार
***

खरे तर ऋणनिर्देश करून झाला आहे. मग हे प्रकटन लिहिण्याचे प्रयोजन काय? प्रश्न रास्त आहे.
त्याचे असे आहे, ऋणनिर्देशाचे उपचार कितीही आवश्यक असले, तरी मनात भरून आलेली कृतज्ञतेची - स्नेहाची भावना त्या उपचारातून पुरती व्यक्त होतेच असे नाही. दिव्याला निरोप दिल्यानंतरही त्याची शांत आभा मनात रेंगाळत राहावी, तशी कृतज्ञतेची भावना मनात अजून आहे. ती व्यक्त करण्यासाठी हे प्रकटन.
निरनिराळ्या क्षेत्रांत कामे करणारी वा शाळा-कॉलेजांत शिकणारी, नुकतीच मिसरुडे फुटलेली वा बॉबकट केलेली, लहानमोठी सगळी माणसे काही निमित्ताने घरात जमावीत; वाद-संवाद, गप्पाटप्पा व्हाव्यात; क्वचित थोडी गरमागरमी व्हावी... आवाज चिरडीला यावेत; दबक्या संतापाचे स्फोट व्हावेत आणि पुन्हा कुणी समजुतीने जुळवून घ्यावे; पण भरलेल्या घराला कुटुंबाची एकतानता येऊ नये, असे अनेकदा होते. पण क्वचित कधी, एखाद्या नशीबवान निवांत दुपारी आजोबांची एखादी ठेवणीतली आठवण निघते आणि सारे वाद हळूहळू ओसरतात. घरभर विखुरलेली माणसे नकळत झोपाळ्याभोवती जमतात. बोलण्यात ओलसरपणा येत जातो. आजोबांच्या एखाद्या विशेष किश्शाची उजळणी होते. हसू फुटते. कुणीतरी थोडे हळवे होते, डोळ्यांतून पाणी काढते. त्या हळवेपणाची हलकीशी थट्टाही होते आणि "आजोबा असते, तर म्हणालेस्ते..." अशी सुरुवात करून पुन्हा हशाचा गदारोळ उठतो. काही मंतरलेल्या क्षणांसाठी तरी घर कसल्याशा चिवट धाग्याने घट्ट बांधले जाते...
असे गेला आठवडाभर झाले.
पण गेला आठवडाभरच का? खरे तर भा. रा. भागवत या लेखकाबद्दल असा काहीतरी प्रकल्प करावा, असा बूट निघाल्यापासून जवळपास गेले वर्षभर हे असे पुन्हा पुन्हा होते आहे. पुन्हा पुन्हा होत राहील, असे आश्वासन मिळते आहे. मराठी शब्दावर प्रेम करणाऱ्या अनेक पिढ्यांच्या अनेक वाचकांसाठी या आजोबाने असे एक घर कायमचे बांधून ठेवले आहे, याची जाणीव होते आहे.
या प्रकल्पाची कल्पना वर्षभरापूर्वी सुचली. सलिल बडोदेकर हा एक मित्र आणि मी यांच्यात गप्पा चालल्या होत्या. भागवतांची कितीतरी जुनी, आता कुठे न मिळणारी पुस्तके त्याच्याकडे आहेत. त्याबद्दलचे बोलणे चालले होते. त्यांतली त्यांची अस्सल मराठी भाषा, फ्रेंचांपासून इंग्रजांपर्यंत आणि विज्ञानापासून फॅन्टसीपर्यंत अनेक विषयांना स्पर्श करणारा त्यांचा विषयांचा आवाका, बालसाहित्याचा ध्यास घेतल्याप्रमाणे अखेरपर्यंत केलेले लेखन, प्रसंगी पदराला खार लावून राबवलेले बालसन्मुख उपक्रम, या सगळ्या कारकिर्दीत टिकून राहिलेला प्रसन्न-ताजा-टवटवीत विनोद आणि सर्वज्ञतेच्या अभिनिवेशाचा संपूर्ण अभाव… या साऱ्या गोष्टी आम्ही पुन्हा पुन्हा एकमेकांना बोलून दाखवत होतो. त्यांची सगळी पुस्तके जमवण्याचे बेत रचत होतो. पण बोलता बोलता असे लक्षात आले, की पुस्तके जमवण्यासाठी संदर्भ म्हणून पाहता येईल अशी साधी समग्र साहित्याची सूचीही भागवतांच्या बाबतीत उपलब्ध नाही. त्यांच्या निवडक लेखनाचे संकलन असलेले 'भाराभर गवत' हे पुस्तकही आता कुठे मिळत नाही. इतरही अनेक पुस्तके काळाच्या ओघात लुप्त झाली आहेत.
ही माहिती शोधण्याचे निमित्त झाले. त्यांच्या जाण्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणारा एखादा जाहीर उपक्रम कुठेतरी केला गेला असेलच, अशी खातरी होती. त्या उपक्रमाशी संबंधित लोकांना भेटले वा तत्संबंधी साहित्य मिळवले म्हणजे झाले; मग आपल्याला हवी ती माहिती मिळेलच. पुढे पुस्तके जमवणे सोपे आहे, इतके साधे गणित मनाशी होते. पण आश्चर्य म्हणजे वर्तमानपत्रातील पुरवण्यांमधून प्रकाशित झालेले काही मोजके, प्रासंगिक लेख सोडले; तर मराठीतल्या भावी साहित्यव्यवहारासाठी वाचकांच्या काही पिढ्या घडवणाऱ्या या महत्त्वाच्या लेखकासाठी असा कोणताही उपक्रम झालेला नाही, हे लक्षात आले, तेव्हा काही काळ आम्ही हळहळलो. नेहमीप्रमाणे आपल्या कृतघ्नतेबद्दल कुरकुर केली, 'आपल्याच्याने काही व्हायचे नाही' अशी नकारात्मक खंत व्यक्त केली, आणि ते बोलणे तिथेच संपले.
पण विषय मनातून गेला नाही. आता आंतरजालीय मैत्र्यांच्या या दिवसांत समान रसविषय असणारी मैत्रे मिळणे तितकेसे अवघड उरलेले नाही. पुस्तके, वाचन आणि साहित्य या आवडीच्या विषयावर बोलणारी अनेक मंडळी जालावरून एकमेकांशी घट्ट जोडलेली असतात, एकमेकांना तत्परतेने संदर्भ आणि साहित्यही पुरवत असतात. अशा मित्रांच्या गोतावळ्यातही हा विषय पुन्हा पुन्हा डोके वर काढत राहिला. लोक आपली कृतज्ञता व्यक्त करत राहिले, भागवतांच्या अनेक पात्रांच्या आठवणी प्रेमाने नोंदत राहिले. तेव्हा 'असा उपक्रम आपणच का करू नये?' अशा महत्त्वाकांक्षी विचाराने मनात मूळ धरले.
तो भीत भीत बोलून दाखवला मात्र - खूप जणांकडून खूप प्रोत्साहन देणारे अनेक प्रतिसाद मिळाले. मदत करण्याची इच्छा दर्शवली गेली. अमुक, आदूबाळ, ऋषिकेश, स्नेहल नागोरी, अस्वल, गवि, केतकी आकडे, अमृतवल्ली, विनीत बेरी, सलिल बडोदेकर - असे अनेक मित्र या प्रकल्पात सामील झाले; ते याच टप्प्यावर. मूळ कल्पना २०१४ च्या दिवाळी अंकाच्या एका कोपऱ्यात असा प्रकल्प करण्याची होती. पण भारांच्या कामाचा एकूण आवाका लक्षात घेता 'ऐसी अक्षरे'च्या संपादकांनी आम्हांला एका आख्ख्या अंकाचे संपादकपदच देऊ केले. मग इमेलींच्या माळका लागल्या. फेसबुकावरच्या ओळखी निघाल्या. व्हॉट्सॅपवर चमू घडले. कुणी एकमेकांना पुस्तके पोचती केली, कुणी जिवावर उदार होऊन एकमेकांना पुस्तके उधार दिली. कुणी नव्याने बाजार धुंडाळून जुन्या पुस्तकांच्या प्रती हुडकल्या, कुणी दुर्मीळ पुस्तकांच्या प्रती काढून वाटल्या. कुणी संदर्भ शोधून दिले. कुणी संपर्क शोधून दिले. कुणी भाषांतरे केली. कुणी चित्रे काढली. कुणी कामे वेळेवर व्हावीत म्हणून स्वतःकडे वाईटपणा घेऊन लोकांमागे कामाचे लकडे लावले. कुणी फुरसुंगी-पुण्यात भ्रमंती केली. कुणी आपल्या चुलत-चुलत मित्रांना या प्रकल्पात हक्काने ओढले. कुणी जाऊन मुलाखती घेतल्या. कुणी फोटो काढले. कुणी शब्दांकने केली. कुणी मोठाल्या फायली टंकनासाठी बिनबोभाट आपापसांत वाटून घेतल्या. कुणी आपली महत्त्वाची कामे बाजूला सारली आणि ऐन वेळेला लेख लिहून दिले. कुणी केलेले काम काही तांत्रिक कारणांमुळे फुकट गेले, पण त्याबद्दल जराही कडवटपणा न आणता लोक मन:पूत मदत करतच राहिले.
तेजस मोडक आणि प्रसन्न धांदरफळे या दोघांनी इतका अनौपचारिक आणि संकोच विरघळवून टाकणारा उत्साही प्रतिसाद दिला, की आपण करू घातले आहे, ते अगदी योग्य आणि आवश्यकच आहे, अशी खातरी पटली. आदूबाळाच्या ओळखीने सौ. नीला धडफळे यांच्याकडून संदर्भसूची मिळाली. त्यांची तब्बेत फारशी बरी नसतानाही आम्हांला मदत करण्याचा त्यांचा उत्साह आमच्या निश्चयाला बळ देणाराच होता. पुढच्या टप्प्यात इतरही अनेक मंडळी 'भारा'वलेल्या आमच्या चमूत येत राहिली.
फॅनफिक्शन हा खरे म्हणजे माझ्या विशेष आवडीचा प्रांत. पण फास्टर फेणेवर फॅनफिक लिहिण्याची कल्पना आदूबाळ याची. ती त्याला सुचावी आणि मला सुचू नये, यामुळे काही काळ मी स्वत:चा राग-राग केला. पण कुठवर? थेट भागवतांच्या शैलीत लिहिलेली त्याची झकास फॅनफिक वाचेस्तोवरच! पुढे त्या कथेबद्दल वाटणाऱ्या कौतुकात माझी स्वार्थी खंत कुठल्या कुठे वाहून गेली!
या अंकाची प्रसिद्धी परिणामकारकपणे करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी प्रश्नमंजूषा आणि लेखनस्पर्धा घेण्याची अफलातून कल्पना ऋषिकेशची होती. त्याचे सगळे बाळंतपण त्यानेच केले. त्यात आदूबाळाच्या मित्राची - विनीत बेरी याचीही - मदत झाली. या स्पर्धेत विजयी झालेल्या सदस्यांचे अभिनंदन करण्याची संधी इथे घेतो आहोत.
'ऐसी अक्षरे'चे सगळेच संपादक मंंडळ या काळात सर्वतोपरी मदत पुरवत होते. टंकनापासून ते तांत्रिक मदतीपर्यंत आणि आर्थिक मदतीपासून संपर्क मिळवून देण्यापर्यंत सगळ्या प्रकारची कामे त्यांनी केली. नंदन होडावडेकर याने नेहमीच्या तत्परतेने मुद्रितशोधनाचे मोठेच काम केले. पण हे लोक घरचेच. त्यांचे आभार कसे बरे मानणार?
वाईरकरांच्या चित्रांनी फास्टर फेणेला जिवंत करणाऱ्या भागवतांबद्दलचा प्रकल्प आणि त्यात चित्रे नसावीत? छे! असे शक्य होते काय? अंक नुसत्या मजकुराला वाहिलेला असता कामा नये, हे तेव्हाच ठरले. आशीष पाडलेकर या एका व्यावसायिक चित्रकार मित्राला अ्मुकने साकडे घातले आणि अंकाचे देखणे मुखपृष्ठ मिळवून मोठीच बाजी मारली. एकूण अंकालाच जे देखणे, नीटस रुपडे आले आहे, त्याचे श्रेयही अमुकलाच आहे. त्याचे सुलेखन आणि रेखाटने 'ऐसी अक्षरे'च्या वाचकांना घरचीच आहेत, त्यामुळे 'घर की मुर्गी दाल बराबर' या न्यायाने त्यांचे पुरेसे कौतुक होत नाही, हे तर आहेच. पण वरवर लहानश्या भासणाऱ्या, तरी एकूण रूपावर मोठाच परिणाम करणाऱ्या अनेक बाबी न थकता तपासत राहणे, दुरुस्त करत राहणे, त्यासाठी शांतपणे लोकांकडून कामे करवून घेणे; आणि प्रकल्पाच्या एकंदर वाटचालीबद्दल दिग्दर्शन करत राहणे हे त्याच्याखेरीज इतर कुणाला साधले नसते.
जयंत नारळीकर, दिलीप प्रभावळकर, सुमीत राघवन, सुबोध जावडेकर, निरंजन घाटे, हेमंत कर्णिक, गणेश मतकरी, रघुवीर कूल… ही प्रथितयश आणि प्रसिद्ध मंडळीही भागवतांवरच्या प्रेमाखातर वेळात वेळ काढून या प्रकल्पात सामील झाली, तेव्हा भागवतांच्या पुण्याईचा चकित करून टाकणारा प्रत्यय आम्हांला आला. भागवतांच्या कुटुंबीयांचा संपर्क मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम 'उत्कर्ष' प्रकाशनाच्या सुधाकर जोशी यांनी केले. भागवतांच्या घरी जाताना मनात थोडी धाकधूक होती. कितीही मनमोकळ्या आणि ऋजू स्वभावाचे म्हटले, तरी भा. रा. भागवत एक प्रसिद्ध लेखक. आणि आम्ही कोण? आम्ही फक्त चाहते. आपला मोलाचा वेळ आणि निगुतीने जपलेले आपले संदर्भसाहित्य आम्हांला त्यांच्या कुटुंबीयांनी का बरे देऊ करावे? पण रवीन्द्र भागवत, चंदर भागवत, विद्युत भागवत आणि रेवती भागवत या चौघांनीही आमचे जे प्रेमळ स्वागत केले; त्यात आमचा बिचकलेपणा, संकोच हे कधी कसे वाऱ्यावर उडून गेले ते कळलेही नाही. त्यांनी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा आणि देऊ केलेली हृद्य छायाचित्रे या अंकाचा अतिशय मोलाचा ठेवा होऊन बसली आहेत. त्याबद्दल आभार मानण्याचा प्रयत्न केला असता विद्युतताईंनी काढलेले उद्गार हे असे - "अगं, दादांनाही तुमचा उपक्रम फार आवडला असता. त्यांचं साहित्य इतकं प्रेमानं वाचलं जातं, की ते आता एका प्रकारे तुमचं-आमचं-सगळ्यांचंच आहे. त्याबद्दल कुणी कुणाचे आभार मानायचे?"
खरेच, कुणी कुणाचे आभार मानायचे?
हे काही सर्वंकष काम नव्हे. प्रकल्पात इतर अनेक गोष्टी सामील होऊ शकल्या असत्या. त्या झाल्या नाहीत याची खंत आहेच. अनेक मान्यवरांनी या प्रकल्पाची गरज मान्य केली आणि काही कारणांनी आपल्याकडून मदत होणे शक्य नसल्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली. त्यांची, आणि प्रकल्पाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या अनेकांची, नावेही इथे घेणे शक्य नाही, हेही ठाऊक आहे. पण यापेक्षाही मोठी आहे, ती कृतज्ञतेची भावना.
हे काम भारांच्या पुण्याईखातर झाले. त्यांच्या नावाखातर हे निरनिराळ्या पिढ्यांचे, आवडीनिवडींचे, कर्तृत्वाचे आणि स्वभावांचे लोक काही काळ एकत्र आले. भारांच्या स्मरणरंजनात रंगले…
त्या साऱ्यांसह भागवत आजोबांच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त हा अंक सहर्ष सादर.
मेघना भुस्कुटे आणि 'भारा'वलेले इतर 'भागवत'जन

Thursday, 23 April 2015

इकडील बाकी सर्व ठीक

चेहऱ्यावर हसू चिकटवून ठेवणं सोपं असतं.

सरावानं, अवयव असावा आपला, अशा सराईतपणे ते मोबाईलसारखं वागवता-वापरताही येतं.

माणसांमधे पाय गुंतलेला नसेल, तेव्हा तीही वाचता येतात सहज. आरपार. मग त्यांची कळ समजून, त्यांना न दुखावता, मैत्रीचे हलकेफुलके झुलते पूल बांधून, खेळकर संभाषणं फेकत आणि झेलत, आपला चेहरा हसण्याआड दडवून ठेवणं अगदी सोपं.

अडचण म्हणाल तर -

मुखवटे सरकतात त्या जोखमीच्या जिवंत क्षणी जागे राहून तुम्हांला जोखणारे लोक आजूबाजूला फारसे नाहीतच म्हणून खूश व्हावं, की दिसू द्यावी आपली निराशा आपल्यालाच क्षणभर तरी, हे ठरवता येत नाही, इतकीच.

इतकीच अडचण तूर्तास. 

इकडील बाकी सर्व ठीक. 

कळावे...

Saturday, 27 December 2014

हॅपी न्यू इयर


ब्लॉग या माध्यमप्रकाराकडे छद्मी हसून पाहण्याची सध्याची एक सर्वमान्य पद्धत आहे. व्यक्तिगत अनुभवांचे अर्धकच्चे तपशील, डायरी, प्रेमभंगाचे अभंग, खवासदृश पाडलेल्या कविता, एकांतमैथुनं, लोकसन्मुखतेचं वावडं वगैरे वगैरे लागेबांधे ब्लॉग या गोष्टीला लागूनच येतात, असं एक आहे. तर ते तसं आहेच, हे एक सुरुवातीला मान्य करून ठेवू या. या म्हणण्याचा पुढच्या म्हणण्याशी थेट संबंध शोधायला जाण्यात तसा अर्थ नाही. पण नेपथ्यात वापरलेली प्रॉपर्टी नाटकात प्रत्यक्ष वापरली नाही, तरीही तिचं महत्त्वाचं काम असण्यातून नि दिसण्यातून पार पडत असतं हे माहीत असणार्‍याला त्या म्हणण्याचे अर्थ सापडतील असं धरून चालू.

***

तर - बरेच लोक, बरेच कार्यक्रम, बरीच कामं आणि त्या सगळ्याशी एकसमयावच्छेदेकरून (हा शब्द वापरला की धन्य होण्याची एक नवी परंपरा मराठीत रूढ झालेली आहे. तिला छेद देण्याचा प्रयत्न करतानाच मी तिच्या दिशेनं एक सलाम फेकला आहे. याचाच अर्थ परंपरा म्हणून ती यशस्वीपणे घडली आहे, हे मान्य केलं पाहिजे.) वागताना होत जाणारे आपले असंख्य प्रामाणिक तुकडे असं सध्याचं चित्र आहे.

मी त्यावर नाखूश आहे का?

नाही.

पण माणसांपासून शक्यतोवर फटकून राहून, माणसांइतकी अस्थिर-जिवंत-शक्यताबहुल नसलेली माध्यमं वापरून, जगातलं शक्य तितकं शोषून-चाखून बघण्याची आतापर्यंतची माझी शैली मला मधूनमधून आठवत राहते आहे. त्यात एक धीमेपणा, अखंडपणा, शांतता होती. माझ्या वेगानं गोष्टी स्वीकारण्याची वा नाकारण्याची मुभा होती. मला हवं असेल तेव्हा अंतर्मुख होऊन मौनात जाण्याची सोय होती. आता ते नाही. पुस्तकं आणि इंटरनेट या दोन्ही गोष्टी वापरणार्‍या माणसाला मी करते आहे ती तुलना अधिक जवळून कळेल कदाचित. त्या अर्थानं माणसं इंटरनेटवरच्या संवादी माध्यमांसारखीच असतात असं दिसतं आहे. ती तुम्हांला स्वस्थ बसू देत नाहीत. तुमच्याकडून सतत वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं - अहं, प्रत्युत्तरं? चक. प्रतिक्रिया - प्रतिक्रिया मागतात. तुमच्याकडून बळंच काढूनही घेतात. तुम्हांला थांबू देत नाहीत. त्यांना वाचणार्‍या तुमच्यात होणार्‍या बदलांसह, बदलांमुळे आणि बदलांना न जुमानताही तीही निरंतर बदलत असतात. मागचं पाऊल उचलून पुढे टाकेस्तोवर त्यांच्या असण्याचे आयाम कदाचित बदललेलेही असू शकतात आणि ते तुमच्या मागच्या पावलाशी नक्की कुठल्या प्रकारचं नातं ठेवून असतील ते तुम्हांला सतत जोखत राहावं लागतं; किंवा ते न जोखण्याचे परिणाम स्वीकारायला तयार राहावं लागतं. त्याचेही तुमच्यावर आणि त्यांच्यावर होणारे परिणाम असतातच...

हुह.

हे थकवणारं आहे, प्रश्नच नाही. पण हे विलक्षण दिलचस्प आहे, हेपण आहेच. त्यांतून हाती काय लागतं आहे त्याचे हिशेब होत राहतील. वेळ मिळेल तसतसे. तोवर - पुस्तकं न वाचणारे आणि आधुनिक माध्यमांच्या आणि माणसांच्या तथाकथित झगमगाटात रमणारे लोक उथळ असतात असं विधान सर्वमान्य असण्याच्या दिवसांत त्या विधानाचं पोकळपण तेवढं मी नोंदून ठेवते आहे.

अंतर्मुख होण्याइतकी सवड देणार्‍या, पण तितक्याश्या लोकप्रिय न उरलेल्या, ब्लॉग या माध्यमातून.

हॅपी न्यू इयर.

Friday, 12 December 2014

थॅंक्यू पद्मजा, जस्ट फॉर बीइंग!

पद्मजा गेली.

'बायकांचं ललित लिखाण एकतर आक्रमक कंठाळी उत्कट असतं, नाहीतर गुलजार खवासदृश भावनाप्रधान' असा बोचरा शेरा मारणार्‍या एका मित्राला मी पद्मजा फाटक भेट दिली होती. तेव्हा बर्‍यापैकी वाचन असणारा आणि तरीही पद्मजाच्या लेखनाशी अपरिचित असणारा हा माणूस तिच्या अभिनिवेशरहित मिश्कील मुक्तपणानं हरखून गेला होता. माझं काहीही कर्तृत्व नसताना पद्मजाच्या जिवावर मीच कॉलर ताठ केल्याचं आठवतं!

पण त्याबद्दल तिलाही आक्षेप नसताच. तिला हे फुकटचं भाव खाणं कळलं असतं, तर त्यातली तेवढी दाद बरोब्बर पोचवून घेऊन ती मिश्कीलपणे हसली असती फक्त.

तशी ती फार प्रसिद्ध नव्हती. दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात असेलही. पण तो काळ माझ्या फारच लहानपणी घडून गेलेला. पुढे मी वाचायलाबिचायला लागून मराठीतले लोकप्रिय, वादग्रस्त आणि थोरबीर लेखक ओलांडून तिच्यापर्यंत पोचले, तोवर तिची लोकप्रियता ओसरली होती. माझ्या पिढीत तरी कुणाला तिचं नाव फारसं ठाऊक नसे. तिचं 'आवजो' नावाचं पुस्तक मला मिळालं ते योगायोगानं. आमच्या शाळेत बक्षिसादाखल पुस्तकं देण्याची प्रथा होती. कुणी एक उत्साही शिक्षक जाऊन घाऊक उपदेशपर, नैतिक, सुसंस्कारी आणि बजेटात बसणारी पुस्तकं खरेदी करून आणत. त्यात मला 'आवजो' कसं मिळालं, हे एक नवलच आहे. पण मिळालं खरं. तोवर पुलं आणि वपु आणि श्रीमान योगी यांत अडकलेल्या मला एकदम नवंच कायतरी सापडलं त्यात. अमेरिकेचं प्रवासवर्णन हे अगदी अन्यायकारक वर्णन होईल त्या पुस्तकाचं. अमेरिकन कुटुंबांत राहून पद्मजानं घेतलेले अनुभव, त्यातून प्रातिनिधिक मराठी मध्यमवर्गीय
कुटुंबांना त्यांच्याशी ताडून पाहणं, त्यांच्या धारणा-समज-गैरसमज-पद्धती न्याहाळून पाहणं, टोकदार मिश्कील शेरे नोंदणं आणि काठाकाठानं स्वत:लाही पारदर्शकपणे तपासत राहणं होतं त्यात. तिची स्वतःची नास्तिकवजा प्रार्थनासमाजिष्ट पार्श्वभूमी, तिचं टीव्हीवरचं करियर, तिचं वाचन आणि धारदार बुद्धिमत्ता, तिच्यातली आधुनिक लेकुरवाळी शहरी विवाहिता आणि तिचा रोखठोक प्रामाणिकपणा... हे सगळं त्यातून दिसत राहिलं. मग ते नुसत्या अमेरिकन प्रवासवर्णनांहून बरंच काय काय झालं. आंतरजालीय मराठीच्या स्फोटानं अमेरिका अगदी जवळ येण्यापूर्वीच मला अमेरिकेतल्या बर्‍याच समकालीन गोष्टींबद्दल एक अपूर्वाईरहित दृष्टी मिळाली होती, त्याचं मूळ या पुस्तकात आहे बहुतेक.

त्यानं हरखून मी तिची बाकी पुस्तकं शोधायला घेतली, तर 'गर्भश्रीमंतीचं झाड' हे एक लोकांना ठाऊक असलेलं नाव मिळालं. पण इतकी गाजलेली पुस्तकं 'औटऑफप्रिंट आहे' असं सांगण्यात आपल्याकडच्या लोकांना काय गंमत वाटते कुणास ठाऊक, पुस्तक दुर्मीळ. मग स्नेह्यांच्या कपाटांना क्लेम लावणं आलं. अनेक सव्यापसव्य करून ते पुस्तक मिळालं नि त्यातली गुलमोहर, गोनीदा आणि इरावती अशा कैच्याकै गोष्टींनी खुळावलेली अगदी ताजी पद्मजा भेटली. मग 'सोनेलूमियेर'ची एक पिवळी पडलेली प्रत. त्यातली ड्रायव्हिंग शिकणारी, आंबे हापसणारी आणि अगदी नॉनसमीक्षकी रसिकतेनं रोदँचं प्रदर्शन बघणारी पद्मजा भेटली. तोवर आपण या बाईच्या प्रेमात पडलो आहोत, हे मी कबूल करून चुकले होते. 'राही' आणि 'दिवेलागण' हे तिचे अगदी आडवाटेचे कथासंग्रह. पण तेही मी मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कृपेनं मिळवले. एरवी चरित्रांना नाकं मुरडणारी मी. पण तिच्या प्रेमापोटी मी ताराबाई मोडकांचं तिनं लिहिलेलं चरित्रही वाचलं. मग 'माणूस माझी जात' मिळालं. त्यातली मुंबईकरांची अजब आणि दिसे न दिसेशी नाजूक संवेदनशीलता नोंदणारी पद्मजा मला तोवर सवयीची झाली होती. आधुनिक शहरी आयुष्यात ती मनापासून रमलेली असे. परंपरांशी तिला फार कधी भांडावं लागलं नाही आणि ती तशी भांडलीही नाही. त्यामुळे असेल, किंवा तिचा मूळचा गंमत्या स्वभावच असेल, पण तिच्यात कडवटपणा कसा तो नावाला नसे. माणसांच्या वागण्यातली विसंगती नोंदतानाही ती त्यांच्यातला ओलसर माणूसपणा अचूक टिपून घेई. ती पहाटे लिहायला बसे, तेव्हा तिला डिस्टर्ब न करता अलगद दार ओढून घेणारी तिच्या कॉलनीतली वॉचमनपत्नी काय; किंवा विरार लोकलच्या ऐन गर्दीत धावत्या गाडीत चढणार्‍या बाईला सुखरूप वर खेचून मग काळजीपोटी तिच्या मुस्काटीत देणारी लोकलकरीण काय! एरवी सहज निसटून गेली असती, अशी ही शहरी संवेदनेची रानफुलं बघायची तिला खास नजरच होती.

'हसरी किडणी' हे याहून तसं वेगळं पुस्तक. किडण्या निकामी होणं ही एकच गोष्ट पुरेशी धसकवणारी. त्यात आणि परदेशात शिकायला असताना (मध्यमवयात परदेशात वार्धक्यशास्त्र नावाचा नवाच विषय शिकायला गेलेली असताना!) आपल्या किडण्या कामातून गेल्याचं कळणं. त्यात वैद्यकीय विम्याचं संरक्षण नाही. ट्रान्सप्लाण्टचा खर्च आवाक्याबाहेर. मुलं शिकत असलेली. किडण्यांच्या बरोबरीनं अजून नाना रोगांचे अनपेक्षित हल्ले. यांत कुणाचीही सोकॉल्ड मिश्किली कोळपून गेली असती, तर ते सहज समजण्यासारखं होतं. पण ही बाई उपद्व्यापीच! मित्रपरिवारातून आर्थिक बळ मिळवणं, ते करताना मिंधेपण न येऊ देणं, आजारातून उठल्यावर या पुस्तकाच्या रूपानं आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिद्दीनं लिहिणं - तिचं तिलाच जमू जाणे. त्या पुस्तकात किडणीच्या आजारपणाबद्दलचे सगळे तपशील येतातच. शिवाय आपण एक समाज म्हणून या दुखण्याशी कसे वागतो, आपली वैद्यकीय व्यवस्था कोणत्या प्रतीची आहे, आपल्याकडच्या अनेक थोर पारंपरिक पॅथ्या यासंदर्भात कुठल्या पातळीवर आहेत ही थक्क करून टाकणारी सामाजिक निरीक्षणं तिनं त्यात नोंदली आहेत. खेरीज या निमित्तानं तिला नव्यानं गवसलेली आणि कुटुंबातली गृहीत धरलेली मैत्रं आहेत. आपत्कालात माणसं कशी कसाला लागतात आणि तावूनसुलाखून कशी लखलखून बाहेर पडतात, याचं निरीक्षण करणारा एक पोटप्रकल्प आहे. या पुस्तकानं पोटात घेतलेलं तिचं आत्मचरित्र, सामाजिक-वैद्यकीय निरीक्षणं आणि निव्वळ माहिती - यांच्याशी स्पर्धा करणारं दुसरं पुस्तक मराठीत नाहीच.

त्याची तुलना तिनं माधव नेरूरकरांसोबत लिहिलेल्या 'बाराला दहा कमी' या ग्रंथाशीच करावी लागेल. अण्वस्त्रनिर्मितीचा इतिहास हे या पुस्तकाचं ढोबळ वर्णन. अर्थातच ते अपुरं आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थिती, वैज्ञानिकांबद्दलचे समजगैरसमज, युद्ध आणि अस्त्रं यांबाबत वैज्ञानि़कांच्यात असलेलं-नसलेलं सजगपण, त्यांचे आंतरदेशीय संबंध-मैत्र-जळफळाट-हेवेदावे आणि सहकार्य, महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर या वर्तुळात घडलेल्या घडामोडी आणि प्रत्यक्ष अण्वस्त्रनिर्मितीची गोष्ट. मग त्या भयानक संहारानंतर सर्वसामान्य माणसांवर, राज्यकर्त्यांवर, वैज्ञानिकांवर झालेले परिणाम... हेही पुस्तक गेल्या वर्षीपर्यंत 'औटॉफप्रिंट' होतं. चारेक महिन्यापूर्वी ते 'राजहंस'नं पुन्हा बाजारात आणलं.

बायका आणि दागिन्यांशी असलेले त्यांचे (आणि तिचे स्वतःचे) संबंध, दगडांची झाडं बनवण्याची खास अमेरिकी कला, तिच्या आजारपणात तिला आलेले काही अतींद्रिय अनुभव आणि खास पद्मजा-पद्धतीत शोधलेली त्यांची स्पष्टीकरणं, लहान मुलांचं साहित्य, आइनस्टाइनचं घर... यांवरचं तिचं लिहिणं आजारपणानंतर आणि वाढतं वय जमेस धरूनही विलक्षण ताजं-तरुण होतं. 'स्मायली', 'टेडी बेअर', ओरिगामीत भेटणारा जपानी करकोचा अशा गोष्टींवर लिहून त्यांच्याशी आधुनिक माणसांचे असलेले लडिवाळ संबंध उलगडून दाखवावेत, तर ते तिनंच.

आता वाटतं, आपल्याला तिला हे सगळं सांगता आलं असतं. ते आता राहून गेल्याची खंत करावी का? तर नयेच. कारण आइनस्टाइनच्या डॉक्टरांना भेटायची संधी असतानाही भेटावं की भेटू नये, अशा आट्यापाट्या स्वतःशीच खेळत, संकोचापोटी ती भेट हुकवल्याचं तिनंच एका ठिकाणी नोंदलं आहे. आणि आपल्याला आइनस्टाइन 'आधीच आणि निराळा भेटला' होता की, अशी सारवासारव करत आपल्या संकोचाचं लब्बाड स्पष्टीकरणही दिलं आहे.

तिला माझी गोची बरोबर ठाऊक असणार!

थॅंक्यू पद्मजा, जस्ट फॉर बीइंग. :)

Friday, 5 December 2014

गेलं वर्ष-दीड वर्षं मी काही वाचलेलं नाही

गेलं वर्ष-दीड वर्षं मी काही वाचलेलं नाही.

तांत्रिक दृष्ट्या हे वाक्य चूकच म्हणायला हवं. कारण पोटापाण्यासाठी करण्याचं माझं काम, आयुष्याचा प्रचंड मोठा भाग व्यापून बसलेली मजकूरप्रधान माध्यमं आणि निवळ सवयीनं चाळली वा ढकलली जाणारी पुस्तकं मोजली तरी बरंच वाचन भरेल. 

पण एकूणच पुस्तकांतलं गुंतलेपण बदललं आहे. पूर्वी पुस्तकाचा कणा पाहून ते कुठलं पुस्तक आहे हे अचूक ओळखता येई. पुस्तकं कितीही अस्ताव्यस्त वाढत गेली, तरीही आपल्याला हवं ते पुस्तक काही मिनिटांत अचूक सापडे. कोणती पुस्तकं कुणाकडे गेली आहेत, ते लक्षात राहण्याकरता नोंदी करण्याची गरज भासत नसे. नवं काय वाचण्याजोगं आहे, काय वाचलंच पाहिजे, काय प्रकाशित होऊ घातलं आहे, काय कुठे मिळण्याची शक्यता आहे - याचे हिशेब डोक्यात पृष्ठभागापाशीच असत. आवृत्ती संपलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती बाजारात आली आणि आपल्याला पत्ताच नाही, असे लाजिरवाणे प्रसंग येत नसत. हल्ली... 

असो. हे पुस्तकांच्या सगुण भक्तीविषयी झालं. निर्गुण भक्ती? 

तिथेही बदल घडले आहेतच. प्रेमभंग ताजा असताना प्रियकराचं नाव उघडपणे घेणं जसं ओल्या जखमेवरची खपली काढण्यासारखं भीषण वाटतं, त्या जातीचं पुस्तकांविषयी वाटत असे. आपल्याला प्रचंड आवडणार्‍या पुस्तकाला कुणी नाव ठेवलं, तर त्या माणसावर मनातल्या मनात फुली मारणं. कर्मधर्मसंयोगानं फुलीगोळा शक्य नसला, तर मग एक दीर्घ नि:श्वास सोडून वादाची तयारी. पुस्तकांतल्या व्यक्तींविषयी रक्तामांसाच्या माणसांसारखी आपुलकी. संदर्भासह आणि संदर्भाशिवाय त्यांतली उद्धृतं आठवून येणं. आपण बोलून न दाखवलेली उद्धृतं दुसर्‍या कुणी बोलून दाखवली, तर बोलणार्‍याविषयी अलोट माया उफाळून येणं. 

आता? माझ्या एका आवडत्या लेखकानं दुसर्‍या आवडत्या लेखिकेविषयी बोलताना छद्मी प्रतिक्रिया दिली, तरीही मी समजूतदार, शांत आणि स्वीकारशीलच. अर्थात - साक्षात सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या वेळीही गावाबाहेर असणं, लोकांचा हिस्टेरिया कुतूहलानं टीव्हीवर पाहणं आणि तरी सचिनविषयी कडवट नसणं जिथे मला साधलं आहे, तिथे...

तर हेही असो!

याचं प्रतिबिंब माझ्या लिहिण्यामध्ये पडलं असणारच. (अभिव्यक्ती हा शब्द खोडून, मी लिहिणे हा शब्द वापरला आहे. झालं का!) लिहिण्याच्या जागा बदलल्या आहेत, हे एक. ब्लॉगचं काहीसं आडवाटेचं माफक खाजगीपण आणि फोरम्सवरचा चावडीसदृश गलबला यांच्यातल्या फरकाइतकाच फरक माझ्या लिहिण्यातही पडला आहे, आणि हे फक्त जागांमधल्या बदलांमुळे घडलेलं नाही. किंबहुना परिणाम आणि परिणती या गोष्टींची वर्तुळं माझ्या डोक्यात तितकीशी स्पष्ट आणि नेमकी नाहीत. विषय बदलले आहेत, शैली बदलली आहे. नेव्हल गेझिंग हा तुच्छतादर्शक उद्गार मी पुरेशा गंभीरपणे घ्यायला शिकले आहे. पण म्हणून अभ्यासपूर्ण-माहितीपूर्ण-अललित लेखन म्हणजेच ’खरं’ लेखन हे मी मान्य केलेलं नाही. ’स्पॉण्टॅनियस ओव्हरफ्लो’ असला की पुरे, ही समजूत सोडून मी थोडी पुढे आले आहे, मात्र. त्यामुळे ’तुझिया ओठांवरचा मोहर मम ओठांवर गळला गं’ लिहिणारे करंदीकर मला जितके जवळचे वाटतात, तितकेच गणपतीची सोंड नि श्लीलाश्लीलतेचा कर्दम यांवर विरूपिका लिहिणारे आणि भावनादुखाऊ लोकांना त्या विरूपिकेचं जबाबदार स्पष्टीकरण देणारे करंदीकरही जवळचे वाटतात. भावनांचं ओथंबलेपण आणि तर्ककठोर कोरडेपण, शैलीदारपणा आणि अनलंकृत शैलीविहीनता, प्रयोग आणि परंपरा, ताजेपणा आणि टिकाऊपणा, प्रेम-प्रेमभंग-दारू-जंगल आणि समाज-लोकशाही-पुरोगामित्व या टोकांपेक्षाही त्यांच्या अधल्यामधल्या प्रदेशांत असणार्‍या गोष्टी आता जास्त प्रेमानं न्याहाळल्या जातात.’आपल्याच बापाचं आहे इंटरनेट - आलं मनात, खरड आणि छाप’ या स्वातंत्र्यासह येणारे तोटे आता हळूहळू कळू लागले आहेत. 

नि आता - हे सगळं पुस्तकांपासून सुरू झालं की वाचायच्या पुस्तकांमध्ये केवळ प्रतिबिंबित झालं याबद्दलही मला प्रश्न पडायला लागले आहेत! 

ही गोंधळाची सुरुवात की सुरुवातीचा शेवट? असो. असो.

Wednesday, 7 May 2014

स्वप्नसर्प


जागांशी जडती नाती
नात्यांच्या दुखर्‍या जागा |
पावसात गुंतून राही
मायेचा अवघड धागा ||

माळावर सूर्य उद्याचे
दिवसाची देती ग्वाही |
रात्रींचा हुरहुरवारा
तरी जिवास वेढून राही ||

चढलासे बघ मज सखया
हा मोहफुलांचा अर्क |
देहात फुलांचे दंश
डसला स्वप्नांचा सर्प...

Tuesday, 18 March 2014

परत एकदा


पाय ठेवायला जराही जागा नसताना
इथल्या अधांतरात हरपून जाऊ नये मी,
म्हणून शोधत राहते कवितेची एखादी अर्धीमुर्धी ओळ
माझ्याआत.
ती सापडेस्तोवर
नाकातोंडात काळोख जाऊन
जीव जातो की राहतो असं झालेलं
इगोबिगो गेले खड्ड्यात-
असायचं आहे
राहायचं आहे
हरवायचं नाहीय -
इतकाच जप
आणि जीव खाऊन शोधणारे थरथरते चाचपडते हात.
बोटांना कवितेच्या ओळीचं सुटं टोक लागतं,
तेव्हाही शांत नाही वाटत लगेच.
जीव धपापत राहतो कितीतरी वेळ
एका टोकाला घट्ट धरून
विणत राहते मी कविता
कुठवर
कुणास ठाऊक.
एक क्षण असा -
हात
कविता
आणि
मी
एकच.
आजूबाजूची अंधारी अनिश्चिती बदलून
पहाटेचा कोवळा प्रकाश उमललेला सगळीभर
पावलांखाली घट्ट ओलसर माती.
मी खोल ताजा श्वास भरून घेते छातीत
आणि कवितेचा दिवा सोडून देते
अंधारउजेडाच्या सीमेवर,
अर्धपिक्क्या गाभुळलेल्या आकाशात.
विरत्या चांदण्यांत
पिवळा प्रकाश सांडत
दूर दूर विरत जाणारी आपलीच कविता पाहताना -
नवं होतं सगळं
परत एकदा.

Friday, 17 January 2014

पुन्हा या रस्त्यांवरून


शरीराच्या शरीरावर उमटणार्‍या मुद्रा
तात्पुरत्या आणि आजन्म,
उष्ण आणि जिवंत गरजांनी भारलेल्या,
विलक्षण खर्‍या,
आज-आत्ताच्या क्षणात पाय घट्ट रुतवून धरणार्‍या,
उद्यामध्ये पूर्ण बहरण्याच्या अनंत शक्यतांची बीजं पोटी घेऊन असणार्‍या.
मान्य.
पण त्यातच आहेत आपल्या बहुमितीय प्रसरणशील होऊ शकणार्‍या नात्याला चौकटींचे क्रूर संदर्भ देण्याच्या शक्यताही.
उद्या,
शरीरानं शरीरावर उमटणार्‍या मुद्रा
टळणार नाहीत.
ही अपरिहार्यता
आणि आश्वासनही.
तोवर जगून घेऊ देत मला
आपल्यामधले अशारीर, निवळशंख क्षण.
कसल्याही सस्पर्श देवाणघेवाणी शक्य नसताना
एकमेकांना उद्देशून हवेवर लिहिल्या गेलेल्या कवितांच्या ओळी.
प्रिय व्यक्तींनी दिलेले सल मिटवून टाकता येतील आपल्या कोवळ्या सुरांनी
अशा भाबड्या आशा बाळगत तळ्याच्या काठावरून सोडून दिलेल्या लकेरी.
टक्क जाग्या रात्री एकमेकांना सोबत करत, लखलखत्या आभाळाकडे पाहत
एकमेकांना सांगितलेल्या सुरस आणि चमत्कारिक, पर्युत्सुक सिनेमास्कोपिक गोष्टी.
शब्दांची, अर्थांची आणि मौनांचीही भाषांतरं.
स्पर्शांच्या तहानेइतकं हे सारंही माझ्या आतड्याचं आहे,
हे तुलाही ठाऊक असेलच
असा अनाकलनीय विश्वास...
जगून घेऊ देत.
पुन्हा या रस्त्यांवरून
आपण चालू न चालू...


Friday, 3 January 2014

वाटेवरल्या मुशाफिरास


ही फार आवडलेली एक कविता -

To a Stranger..

PASSING stranger! you do not know how longingly I look upon you,
You must be he I was seeking, or she I was seeking, (it comes to me, as of a dream,)
I have somewhere surely lived a life of joy with you,
All is recall’d as we flit by each other, fluid, affectionate, chaste, matured,
You grew up with me, were a boy with me, or a girl with me,
I ate with you, and slept with you—your body has become not yours only, nor left my body mine only,
You give me the pleasure of your eyes, face, flesh, as we pass—you take of my beard, breast, hands, in return,
I am not to speak to you—I am to think of you when I sit alone, or wake at night alone,
I am to wait—I do not doubt I am to meet you again,
I am to see to it that I do not lose you.

- Walt Whitman

आणि हा तिच्या भाषांतराचा प्रयत्न -

वाटेवरल्या मुशाफिरास -

१.

परिचयाची खूण नाही, नाही वा लवलेशही
स्पंदनांचा मात्र तुझिया भास हो मज प्रत्यही
आसावल्या स्वप्नांतही तू स्वप्न होऊन राहसी
कोण जाणे कोणत्या जन्मातुनी ये ओढ ही?
आज या पिकल्या क्षणी वाटांस वाटा भेटता
गाठ नाही, भेटही पण, स्पर्श होई निसटता
या क्षणातून वाहिले, जे जे उधळले, जे राखले
कोण जाणे कोणत्या जन्मात येईल सांगता?
हेच होते हेच सारे, होय, हे मज लाभलेले
हातांत हातां मन गुंफुनी एकमेकां वाहिलेले
स्तन्य माझे, वीर्य माझे - ओठांतुनी ओठांतही
कोण जाणे कोणत्या जन्मात आपण प्राशिले?
मात्र आता एकट्याने, चालायचे, चालायचे
कातरी वेळांत दचकून तुज पुन्हा आठवायचे
पडतील फिरुनी गाठी अपुल्या, नक्की, मला ही खातरी
निर्धार आता हाच तोवर ना तुला हरवायचे

२.

तुझ्यावर खिळलेल्या माझ्या नजरेतली ही ओढ तुला पुरती ठाऊक नाही.
तुझेच स्पप्न पडत आले आहे मला वारंवार, तुला खरेच ठाऊक नाही.
कुठल्यातरी एका जन्मात नक्की खिदळलो आहो आपण एकमेकांसोबत
आपल्या ओझरत्या स्पर्शाच्या या निसटत्या क्षणातून,
वाहत निघाले आहे आपल्यामधून बरेच काही...
कुठल्यातरी एका जन्मी
ऐकले आहेत आपण एकमेकांच्या नाडीचे ठोके कान लावून
दिले-घेतले आहेत काही चिमणीचे घास, काही ऊबदार श्वास -
इतके की - आता आपल्या शरीरांतही केवळ आपले असे,
फार काही उरले नाही...
वाटेवरच्या या निसटत्या क्षणीही अचूक माझ्यापाशी पोचते आहे तुझी नजर
तुझ्या अंगाचा गंधही पोहोचतो आहे थेट इथवर
तसे तुझे तरी हात मोकळे कुठे आहेत?
माझ्या अंगांगांचे सारे वळसे वेढून बसले आहेतच की तुलाही...
इथून पुढली वाट मात्र एकट्यानेच काटायची आहे.
माझ्या ओठांवर असणार आहे लाखबंद मोहोर,
नि रात्रीलाही तुझ्या आठवणीचाच काय तो आधार आहे.
पण मला ठाऊक आहे -
अमावास्या जरी झाली, तरी उजाडायचे काही राहत नाही
फक्त तोवर हरपू द्यायचे नाही तुला क्षितिजापार...
मग गाठ पडायची काही राहत नाही!