Sunday, 8 March 2009

सर्जनाच्या दर्शनाने सर्जनाची वाट व्हावे

कलावंताला लिंग नसतं असं म्हणतात. पण आज जिवाजवळच्या, सोबत करणार्‍या लेखकांची नावं आठवत गेले, त्यात आश्चर्यकारक प्रमाणात बाया निघाल्या. अपवाद होतेच. चांगले सणसणीत अपवाद होते. पण ते अपवादच. नियम अधोरेखित करणारे.

बाई असणं इतकं निराळं करतं माणसाला? लेखकाला? कलावंतालाही? की आस्वाद घेण्यातली ही आपली मर्यादा? की सवयीचं-सरावाचं तेच आपलं मानण्यातला बथ्थड आळस? की खरंच जैविक-सांस्कृतिक बंध? कुणास ठाऊक.

आजच्या महिलादिनाच्या निमित्तानं या काही कविता. सोबत करणार्‍या.

रंगीबेरंगी इच्छांच्या रथात बसून
दूर निघालेल्या एका उत्कट मुलीची गोष्ट
सांगते आहे मी तुम्हांला.
मुलगी, जिला ऐकू येतो प्रेमाचा ओला आवाज
कृष्णमेघात ओथंबलेल्या पावसासारखा
आणि जिचं आख्खं हृदयच सळसळून हिरवं होतं.
जी सहज विश्वास ठेवते मग अनोळखी तरुणावर
अदृष्टातून येणार्‌या त्याच्या पौरुषाच्या गंधावर
आणि दूर सारून स्वत:चं माहेरघर,
झोकून देते स्वत:ला सरळ त्याच्यावर.
ना वाजंत्री, ना तोरणं, ना विरोध, ना रडणं
अडवू शकत नाही तिला काहीच,
एकदा मन मंतरल्यावर.
स्वप्नांचं सार्थक त्याच्या डोळ्यांत
आणि युगांचे संभव त्याच्या स्पर्शांत.

त्याच्या स्मरणानंही करता येतं तिला साहस
प्रियजनांपासून प्रेमाला लपवण्याचं.
परिचिताचा हात सोडण्याचं,
अज्ञाताला मिठी घालण्याचं.
तिला माहीत नसतात दुखरे तपशील
तिच्या पुरुषाच्या भूतकाळातून सरसरत येणारे -
कालियासारखे हिरव्या हृदयाला विळखे घालत दंश करणारे
जगणं मरणापेक्षाही अवघड करणारे.
त्याच्या फूत्कारांनी भरून जाणारं आयुष्य ठाऊक नाही तिला.
आता तुम्ही थांबवू शकाल?
परतवू शकाल?
दुखवू शकाल?
त्या रंगीबेरंगी इच्छांच्या रथातून जाणार्‌या कुंवार मुलीला?

अरुणा ढेरे (बहुधा मौजेच्या दिवाळी अंकातून)
---

नव्या वाताहतीला सामोरं जाताना
मी पुन्हा धरलं कवितेचं बोट
की, बाई... माझ्या धांदोट्या ठेवायला
असून दे थोडी जागा तुझ्या ओळींमधून
तर ती हसली खळखळून मैत्रिणीसारखी.
तिच्या हसण्यानं फडफडली वहीची पानं
आणि जुन्या वाताहती पुन्हा
सहज उघड्या पडल्या.

वाताहतीला वाताहत म्हणतात हे ठाऊक नव्हतं
तेव्हापासूनचा सगळा इतिहास,
नजीकच्या भूतकाळापर्यंतचा...
काही शिकता येत नाही या इतिहासातून,
टाळता येत नाही कुठलीही वाताहत
किंवा रोखताही येत नाही;
नष्ट करणं ही तर खूप दूरची आणि
दुरापास्त गोष्ट.
आता अनुभवामुळे फार तर
तिच्या रूपाबद्दल अंदाज बांधता येतात
आणि निमूट स्वीकारता येते
होत जाणारी पडझड;
मिसळून जा म्हणता येतं तिला
जुन्या वाताहतींच्या घोळक्यात.

खरं तर सगळी कृती मला पाठ झाली आहे:
सगळ्याच संकटांना संधी मानायचं;
पहाटे तुळशीला पाणी घालायचं:
फळ्यावर रोज नवा सुविचार लिहायचा;
हिंसेचे फुटवे खुडून टाकायचे;
आलेला ऋतू आल्हाददायक म्हणायचा;
तू सोबतच आहेस असं समजायचं;
न्हाऊन वाळवायचे ओले केस;
आरश्यात चेहरा पाहायचा ओळख राहावी म्हणून;
अंगभर बचाव गुंडाळायचा
आणि उतरायचं पुन्हा रस्त्यावर
नव्या वाताहतीला सामोरं जाण्यासाठी.

दर वेळेसारखंच असणार मग सगळं...
कोसळायचं, पुन्हा उभं राहायचं, धडपडायचं;
जे शाबूत राहिलंय ते सारं गोळा करायचं;
मातीत तूस मिसळलं की घट्टपणा येतो घड्याला
तसं सार्‌या वाताहती स्वत:त कालवत
मिसळत मळत घडवत न्यायचा नवा आकार
आणि ओलेपणीच नक्षी कोरावी
तशी लिहून ठेवायची पुन्हा एखादी कविता
नव्या वाताहतीला सामोरं जाण्यासाठी.

कविता महाजन (महाराष्ट्र टाईम्सच्या दिवाळी अंकातून)
---

माझ्या पणजीच्या आजीचे नावसुद्धा मला माहीत नाही.
परकराचे ओचे बांधून गाणी गात
ज्याच्या पारंबीला लोंबकाळून ती झुलली
तो वडसुद्धा मला ठाउक नाही.
ज्या दगडांवर धुतले तिने ऋतुस्नात बोळे,
ज्या नदीचे पाणी झाले लाल, जांभळे, काळे
तो दगड, ती नदीसुद्धा मला माहीत नाही.
जेव्हा पहिल्यांदा कण्हली ती संभोगाच्या कभिन्न रात्री
तो स्वर सुखाचा, की सूर दु:खाचा होता
तेसुद्धा मला ज्ञात नाही.
जन्म देतांना तिनं फ़ोडलेला हंबरडा मी ऐकलेला नाही.
तिला वारंवार फ़ुटलेला पान्हासुध्हा मी चाखलेला नाही.
तिनं शेंदलेल्या घागरीही मी वाहिलेल्या नाहीत.
तिला दिसलेल्या खुणादेखील मी पाहिलेल्या नाहीत.
कसा गेला तिचा जीव जाताना, कशात अडकला ठाउक नाही.
कोण रडले तिच्यासाठी, कोण कुढले उरलेल्यांतले माहीत नाही.
कोणी वेचली तिची विरासत, कोणी उष्टावून फ़ेकून दिली याद नाही.
कोणी कुठले वसे घेतले, कोण उतले, कोण मातले, ज्ञात नाही.

मात्र तिच्या तपशीलांची राख उधळणारा वारा अजूनही वाहातो.
भला मोठा श्वास होऊन माझ्या छातीत अडकतो.
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश....
त्याच असतात पारंब्या कालातीत अश्वत्थांना
अजूनही लोंबकळून झुलतात मुली ज्यांना...
पणजीची आजी नाही म्हणावी तर तसे नाही.
पण तिचे नाव मात्र आता कुणाला ठाउक नाही!

मेघना पेठे [ऑर्कुटवरून (http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=12387259&tid=5305406129799140274&start=1) साभार]

Sunday, 18 January 2009

नाना परीच्या निकडी । खेळ मांडियेला ॥

ही जी चिडचिड होते, ती कशामुळे होते?
एक मिनिट. या सगळ्या प्रकारात आत्मसमर्थन का काय ते होणार. पण शक्यतोवर ते टाळून थोडं लांब जाऊन पाहायचा प्रयत्न आहे. शक्य तितका प्रामाणिक.
तर, ही जी चिडचिड होते, ती कशामुळे होते? आपल्याला हव्या तशा गोष्टी आजूबाजूला नसल्या की चिडचिड होते. हव्या तशा म्हणजे? हव्या तशा गोष्टी म्हणजे स्पेस. म्हणजे काय? आपल्याला एकट्याला निवांत जागा?
नाही, फक्त तितकंच नव्हे. आपल्याला हवं ते, हवं त्याला, हव्या त्या पद्धतीत, हवं तेव्हा बोलण्याचं - जास्त नेमकेपणानं सांगायचं तर, व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य. म्हणजे स्पेस. तर ही स्पेस आपल्याला कुणालाच मिळत नाही आहे. आणि हा फक्त जागा - कमी किंवा अधिक जागा - हा प्रश्न नाही. त्याच्यापलीकडचं काहीतरी आहे.
वर्तुळाच्या परीघामधेच दुसर्‍या वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतला आणि ते दुसरं वर्तुळ पुरं केलं तर काय होतं? परीघ एकमेकांमधे शिरतात. असं एकदा केलं तर ओव्हरलॅपिंग प्लेन तयार होतं.
पण असंच वारंवार अनेकवार परत परत परत केलं तर? तर केऑस तयार होतो.
सध्या आपण केऑसमधे राहतो आहोत. गोंधळ होणं साहजिक आहे.
कुठलं वर्तुळ आधी काढलेलं, कुठलं नंतर काढलेलं, कुठलं ठळक, कुठलं पुसट, कुठलं मोठं, कुठलं लहान - हे सगळे प्रश्न इथे गैरलागू आहेत. जिवंत गरगरती वर्तुळं आहेत. ओव्हरलॅपिंग आहेत. केऑस आहे. चिडचिड आहे.
या सगळ्याला पर्याय नाही.
तर आपण हे मुकाट स्वीकारू या.
आता हे स्वीकारूया बीकारूया प्रकरण कागदावर ठीक आहे.पण ते जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात नाकापाशी होत असतं, चार-दोन धक्के लागत असतात, पाणी अंगावर उडत असतं - तेव्हा काही झक मारायला स्वीकारूया वगैरे आठवत नाही. देधडक बेधडक पद्धतीनं आपण - म्हणजे मी - तोंड सोडून मोकळे होत असतो. मी तरी असंच डील करत आलेली आहे. कधी मी कुणाच्या अंगावर वसकन ओरडते, कधी समोरचा घुम्म बसून राहतो. चालायचंच. कभी बाजी इधर कभी बाजी उधर. एकदा माणूस आपला म्हटला, की असल्या दोन दिल्या-घेतल्याची चिंता करून भागत नाही. त्याच्या - आणि माझ्याही - इमोशनल आउटबर्स्ट्समधे आमची दोघांचीही एनर्जी भरपूर खर्च होत असते. त्यातून डोक्यावर डोकी आपटतात. त्यातून कधीकधी नाही त्या गुंतागुंती होतात, नाही असं नाही. पण एकदम आत्म्याचे दोस्त का काय म्हणतात ते - किंवा दुश्मनही - असल्याच एन्काउण्टर्समधून मिळण्याच्या शक्यतेची शक्यता असते.
ही संधी असते. धोकाही. माणूस कायमचा आपला/परका होत जाण्याची/चा. व्हाइस व्हर्सा.
तर माणसं कितीही बदलली, नवीन असली, तरी या प्रोसेसला काही शॉर्टकट नाही. त्याची काही ग्यारण्टीही नाही. हे असं असं खेळूनच पाहावं लागतं. पाहावंच लागतं. पाहावं लागतंच.
नाहीतर मग बसा मुकाट रिंगणाबाहेर. तर आपण हेही - मुकाट जरी नाही, तरी - स्वीकारू या.
स्वीकारलं की नीट मनापासून खेळता येईल. एकदा खेळच म्हटला, की शांतता कोर्ट चालू आहे स्टाईलमधे आपलं आयुष्य वेगळं आणि खेळ वेगळा या पद्धतीत नीट एन्जॉय करता येईल. स्पेस मिळेल - न मिळेल - पण तिचा आभास तरी निर्माण होईल. कुठलं तरी वर्तुळ पुसता येईल. कुठलं तरी विस्तारता येईल. आपापल्या सिस्टीममधला केऑस नीट मनासारखा एकमेकांच्या अंगावर सोडता येईल. परिणाम काय व्हायचे ते होवोत. काही बंध घट्ट होतील. काही कापले जातील.
आतून दाटलेले आपण रिते - मुक्त होऊ. कदाचित थोडे थोडे एकमेकांना भरूनही देऊ.
तर निकाल काय असायचा तो असो. खेळणं आवश्यक आहे. हे तरी आपण स्वीकारू या. स्वीकारू या?

Tuesday, 13 January 2009

आम्ही लटिके ना बोलू...

एखादा देणेकरी सतत आसपास दिसत राहावा तसंच हे. गप्प, घुमा, निर्विकार चेहर्‍याचा, चिवट देणेकरी. त्याला नजरेसमोरून वारता वारता आपण थकत जातो, पण तो थकत नाही. कुठल्याही जिवंत अनुभवाच्या परीघात हक्कानं येत राहतो तो. निर्लज्जपणाचा आव आणत आपण अधिकाधिक अस्वस्थ.
चंदन-आंघोळीच्या ताज्या गंधापासून ते प्रचंड मानसिक दमणुकीच्या कडेलोट क्षणीही - हे शब्दांत पकडता येईल? वापरता येईल कुठे? - असा धंदेवाईक प्रश्न डोकं वर काढत राहतो आणि आपण आपल्यावरच्याच संतापानं होत राहतो बेभान.
धड भोगता येत नाही, धड मांडता येत नाही अशातली अवस्था. शरम तर वाटतेच आहे. तरीही - एकदाच कोलाजाची एक धेडगुजरी गोधडी विणून नामानिराळं व्हावं का- असा गेंडाकातडी प्रश्न पडतोच. आपण लोचट की हा प्रश्न लोचट - अशी कोडीही नकळत सोडवत बसलेले आपण.
अशाच कितव्यातरी क्षणी हातात येतो एखाद्या अनुभवाचा निसटता तुकडा. आपण धंदेवाईक तानाजी होऊन घोरपडीच्या वरताण नख्या रोवतो. आता शेंडी तुटो वा पारंबी तुटो, वरती पोचायचं आहे बस्स, असं डोळ्यांत उतरलेलं रक्त. तरीही हातात मातीच येते. येऊ शकते.
सर्जनाचे रंग असेही. विटके. मळके. रंगहीन.

Tuesday, 28 October 2008

परत एकदा पहिल्यासारखे, होणे नाही, होणे नाही...

संदर्भहीन आनंदाच्या तहानेत
निष्फळ अंतहीन वणवण
परिचित प्रदेशांच्या चकव्यात
तेच सुतक पुन्हापुन्हा,
पुन्हापुन्हा तेच सण

आपण सध्या जगतोय, ते विकत की फुकट? एक्झॅक्टली कुठल्या गोष्टीसाठी सहन करतात माणसं आपला चिडचिडाट आणि व्हायसा व्हर्सा? रोज उठून थोबाडावर प्लॅस्टिकचं स्मायली ताणून बसवतो आपण, ते नक्की कुठल्या अन्ब्रेकेबल रबरबॅण्डनी? असले आचरट प्रश्न पाडून कपाळावर किमान साडेचार आठ्या बसवलेल्या तिच्याकडे, निदान दिवसाच्या अखेरीला तरी कुणी शहाणा माणूस दोन गोड शब्दांच्या अपेक्षेनं यायचा नाही, इतपत व्यवस्था दिवसभरानं करून ठेवलेली. ती नखभर कारटी गात टीव्हीवर जीव तोडून, त्यावरही जळजळीत ऍसिडिक प्रतिक्रियांची आतषबाजी चालू असे तिची. चेहरा अर्थात हसराच. पण ’आयुष्यावर हसणे थुंकून देतो...’मधलं कडूजहर हसणं. काय बिशाद कुणी जवळ येऊ धजेल. अशात त्या दिवशी टीव्हीसमोर लोळून समोर गळणार्‍या कशावर तरी काहीतरी फूत्कारताना, तिच्या रूममेटनं तिच्या कपाळावर तळवा ठेवला फक्त. त्यावर काहीतरी धारदार बोलण्याआधी तिचे डोळे आपसूक मिटले आणि तिसर्‍या सेकंदाच्या आत तिचं विमान उडालं. निळी स्वप्नील झोप.

जिवंत माणसाचा स्पर्श, माणसाला माणूस लागतं, तुसडेपणा जन्माला पुरत नाही... हे क्लिशेड गुळगुळीत सिद्धान्त तर होतेच. पण पाठोपाठ माणसांच्या गुंतागुंतीत जे जे होऊ शकतं, ते ते सगळं कोपर्‍यावर दबा धरून बसलं असणार, याचीही कडवट जाणीव होती. ’नाहीतरी माणूस नको म्हणून निभत नाही, मग होऊन जाऊ द्या सगळंच रामायण’ला मान तुकवत तिनं इतके दिवस गोठवून ठेवलेलं आपलेपण स्वैर उधळून दिलं, ते त्या रात्री स्वप्नातच कधीतरी असणार. मग अनेक वाटांनी उधळत गेला दोस्ताना. शॉपोहोलिक होऊन केलेल्या खरेद्या, कविता, सिनेमे, भक्त प्रल्हाद सिनेमे, खादाडी, रात्र रात्र जागून मारलेल्या गप्पा, एकमेकींची आजारपणं, पार्ट्या, ओल्या पार्ट्या, शेअर केलेल्या दुखर्‍या जागा, बोचरी भांडणं, अबोले, करकरीत शिव्या, रडारड, गप्पा गप्पा गप्पा. तिचा कडवट अनुभवी उपरोध आणि रूममेटचा नवथर कोवळा उत्साह जगण्यातला. दोहोंची धार बोथटत गेली आणि त्यांच्या घराला जरा जरा माणूसपण येत गेलं. परिघात पाऊल न ठेवताही शेजार निभावणं शिकत गेलं घर. पहिल्या पावसाच्या जळजळीत ससंदर्भ गारव्यामधेही त्याची ऊब टिकत गेली.

पहिला पाऊस एकवार,
मग मात्र साठवण-आठवण
परत एकदा पहिल्यासारखे,
होणे नाही, होणे नाही

घरातल्या बोर्डावर कुठलीशी नवी कविता डकवताना आणि त्यावर उत्साहानं उतू जात रसरसून बडबडताना लक्षात आला तिच्या एकाएकी - काहीतरी वेगळं घडतंय घरात. रूममेटचं लक्ष होतं आणि नव्हतंही. रूममेटची नव्यानं राहायला आलेली जुनी मैत्रीण हातातल्या नेलपेण्टच्या नव्या शेडमधे गुंतलेली. तिचा चेहरा काहीच संबंध नसल्यासारखा कोरा करकरीत. रूममेट काहीशी भांबावून दोन टोकांना यथाशक्ती यथोचित प्रतिक्रिया देण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात. म्हटलं तर तिघींच्याही लक्षात आलं आणि म्हटलं तर कुणाच्याच नाही. तिथून पुढे कविता बोर्डावर टाचणं हे नुसतंच हट्टी कर्मकांड होत गेलं घरासाठी. वाढलेल्या मैत्रिणीला सामावून घेत माणसं घड्या बदलत गेली. दिनक्रम ठरीव आणि परीटघडीचे होत गेले. उबेचे परीघ बदलत गेले. आपापल्या किल्ल्या, ठरलेल्या वेळी ठरावीक स्मितहास्य, एकमेकींकरता रांधून ठेवलेलं जेवण, वीकेण्डच्या शॉपिंगला सोबत.

वरवर शांत असल्याचं दाखवणारी ती आतून चवताळत गेली. रूममेटच्या मैत्रिणीचं लहान असणं नोंदलं तिनं. पण लहानपणाच्या हातात हात घालून येणारी असुरक्षितता नोंदूनही तिनं हट्टानं स्वीकारली नाही. तिला दिसला तो फक्त तिनं कमावलेल्या तिच्या स्नेहशील वर्तुळाचा संकोच. अभावितपणे कुणाचातरी पायावर पाय पडावा आणि मागचा-पुढचा विचार करण्याआधी तोंडातून कचकचीत शिवी उमटावी, तसा धुमसत गेला तिचा स्वाभाविक संताप. रात्र रात्र गाणी ऐकत राहणं, नेटवरचं वर्तुळ आणि वेळही अमर्याद आणि अनारोग्यकारकपणे विस्तारत जाणं, घरातली संभाषणं जाणीवपूर्वक अधिकाधिक अनावश्यक आणि त्रोटक करत नेणं, पुन्हा एकदा सूडावून आतल्याआत मिटत जाणं. मोठं होण्याचं नाकारत जाणं. सार्‍याचा परिणाम झाला नाही असं नाही. रूममेटची दोन टोकांमधली फरफट वाढत गेली. दिवसेंदिवस. तिच्या एकलकोंड्या धुमसत्या वावराला उत्तरादाखल म्हणून रूममेटचं मुक्यानं रडणं दृष्टीला पडलं चुकून, तेव्हा भानावर आली ती चरचरून. निखळ मैत्रीच्या प्रदेशातही हे स्वामित्वाचे दावे असे वेठीला धरू शकतात माणसांना? आपल्यालाही? आपला नितळपणा इतका गमावला आहे आपण? कळेना. कळेना तिला. आपलेच डंख पुसण्याचा प्रामाणिक प्रयत्न तिनं करूनही काही पीळ सुटण्यातले नव्हतेच. घरातली हवा कुंदच होत गेलेली.

पाऊस हवा, ऊन हवं
इंद्रधनुष्य कोरं हवं
पायांखालच्या मातीनंही
रोज नवं जन्मून यावं
आम्ही मात्र तेच जुने
आठवण-पेशी मरत नाही
कोवळेपण जळत जातं,
तरी जगणं सरत नाही

रूममेटच्या मैत्रिणीचं रूममेटवर अनेकार्थांनी अवलंबून असणं दिसत गेलं, तसतसा तिचा समजूतदारपणा काहीसा जून होऊन परतत गेला. रूममेट आणि मैत्रिणीचं नातं, नातं न उरलेलं. दोन वाढती माणसं खूप खूप जवळ येतात आणि त्यांचे विस्ताराचे वेग मात्र स्वाभाविकपणे आपापल्या निरनिराळ्या गती सांभाळून असतात, तेव्हा होते तीच कोंडी. एकाचं विस्तारत जाणं, दुसर्‍याचं आकातांनं तिथंच राहायला पाहणं. पायात पाय रेशीमधागे. ते तुटायला मात्र हवेतच अपरिहार्यपणे. हे लक्षात आलं, तेव्हा ती मुळापासून हादरली. मीच सापडले होते का ऑपरेशन करायला, असा हताश प्रश्न पडला तिला. पण इलाज नव्हताच. मी खलनायिका तर मी खलनायिका, असा कोडगा स्वीकार करत तिनं दोघींच्यात निर्ममपणे पाय घालायला सुरुवात केली.

त्याच काळात कधीतरी पाहिलेली ’सखाराम बाईंडर’ची डीव्हीडी. रविवारची दुपार उलटून गेल्यावर कधीतरी पाहायला सुरुवात केलेली. सुरुवातीला रूममेटची मैत्रीण लक्ष नसल्याचं नाटक करण्यात गुंग. पण तेंडुलकरांनी तिला हाताला धरून मधोमध कधी आणलं, ते तिचं तिलाही कळलं नसणार. सगळा मिळून दीड खोलीचा कारभार आणि घरदार व्यापून उरलेली जगण्याची गरज. लैंगिक इच्छांचे आसूड, संस्कृतीबिंस्कृतीचे कुचकामी लगाम - त्यातून कराकरा दात खात निर्लज्जपणे जगायला उभी ठाकलेली माणसातली पाशवी असुरक्षितता. चंपाला पुरायला मदत करणार्‍या भेसूर लक्ष्मीचं ’रात्र देवाची असते...’ ऐकलं, तेव्हा करकरीत तिन्हीसांजा झालेल्या. घरात काळोख, बाहेर पेटलेली कातरवेळ. ’आपण सगळेच असतो थोडी थोडी लक्ष्मी...’ हे तिच्या तोंडून सुटलेलं वाक्य ऐकून बधिर होऊन बसलेली रूममेटची मैत्रीण आणि कुणाच्या तरी अंत्ययात्रेवरून परतावं, तशी रूममेट घाईघाईनं आंघोळ करायला गेलेली. घर मुकाट.

तिचा परजलेला निर्दय निर्धार. रूममेटची चिंध्या करणारी तडफड. रूममेटच्या मैत्रिणीचा नुसताच जहरी वेडापिसा संताप. सगळंच कडेलोटाच्या टोकावरचं. त्या दिवशी रूममेट मित्रासोबत निघून गेली सिनेमाला, म्हणून भडकलेल्या मैत्रिणीला समजावता समजावता सार्‍याचा कडेलोट झाला. ’मला समजावते आहेस इतक्या मानभावीपणे, का? तू एकटी आहेस म्हणून?’ हा रूममेटच्या मैत्रिणीचा प्रश्न. कोंडीत पकडलेल्या रानमांजरीच्या आवेशातला. तो ऐकला आणि तिचं उरलंसुरलं भान संपलं. उरला तो निव्वळ लालभडक विखार. रूममेटच्या मैत्रिणीनं भानावर येऊन कळवळून अनेकदा मागितलेली माफी, रडणं, पश्चात्ताप, समजावणुकी... काहीच पाझर फोडू शकलं नाही तिला. पाहता पाहता दगड होत गेली ती मैत्रिणीच्या बाबतीत. आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला येण्याचं आमंत्रणही दिलं तिनं, ते फक्त रूममेटला. ’आजारी आहे ग ती. इतका काटेरी राग धरू नकोस...’ची विनवणी तिच्यापर्यंत पोचलीच नाही. तिचा स्वत:चाच इलाज नव्हता जणू.

जिवाच्या तळापासून समजून घेता येतं कुणाला, ते आयुष्यात एकदाच काय? पुढच्या सगळ्या सगळ्या वेळांना माणूस समजूतदार होत जातो की निबर? भोगलेली माणसं हळवी-ओलसर होत जातात की सूडावून अधिकाधिक कठोर? संदर्भ पुसले जातात कधीतरी? पुसता येतात? प्रश्नांना अंत नाहीच.

शब्द पालवत, दु:ख मालवत
रोज रोज तेच मरण
परिचित प्रदेशांच्या चकव्यात
तेच सुतक पुन्हापुन्हा,
रोज रोज तेच सण...

Wednesday, 22 October 2008

एक नवा उपक्रम: रेषेवरची अक्षरे २००८

रेषेवरची अक्षरे २००८

हा दुवा:
http://sites.google.com/site/reshewarachiakshare2008/?pli=1

वाचा नि तुमचं मत जरूर कळवा.
शुभ दीपावली!

Wednesday, 20 August 2008

आवडलेले थोडे काही

संवेदचा खो घेऊन या कविता पोस्ट करतेय -
हरिलाल
खूप उशिरा ओळख पटत जावी एखाद्याची
तसे जाता जाता
एकमेकांना आवडू लागलेले आपण
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?
एखादा पाहुणा नको-नको म्हणत असताना
कोडग्यासारखा राहायला यावा आपल्या घरात
तसा तू माझ्या वस्तीला आलास
आणि खूप मनस्ताप दिलास
तुझ्या आईबाबांसारखाच मलाही.
माझ्यातल्या सगळ्या सवयी,
सगळ्या व्याधी, सगळ्या वेदना पाहून
तुला ओळखीचं वाटलं असेल
कदाचित माझं शरीर,
कदाचित...
तुला श्रीमंत करायचं असेल मला
मला आणखी दु:ख देऊन.
पण तू येण्याच्या खूप आधीपासून
तुझ्यासारखाच खूप वणवणलोय मी
दु:खाच्या शोधात,
इतका...
की तू जेव्हा शिरलास माझ्यात
तेव्हा तुझं दु:ख आणि माझं दु:ख
मला फरकच करता येईना त्यांच्यात.
म्हणूनच लोक
मला तू समजू लागले
आणि तुझा लौकिक इतका
की हळूहळू लोक मलाही ओळखू लागले.
आणि आता
माझ्या भोवताली ही माणसांची गर्दी
'तू' जमवलेली
उद्या ही मला विचारील
'कसा आहेस तू?'
तेव्हा मी तिला काय उत्तर देऊ?
मला माणसामाणसांनी समृद्ध करून जाणारा तू...
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?
मी तुला माझ्यातून जायला सांगत नाही
आणि अजून थोडा थांब म्हणून
राह्यलाही सांगत नाही
इतकी मला आता तुझी सवय झालीय...
आता तुझं असणं-नसणं
माझ्यासाठी एकाच प्रकारचा मनस्ताप!
पण तरी
तू का आवरू लागलायस
माझ्यातलं तुझं एकेक सामान?
का गुंडाळू लागलायस
प्रवेशच्या प्रवेश पानांसकट?
का करू लागलायस बांधाबांध
तासागणिक वर्षांची?

उद्या-परवा
तू अखेरचा पडदा पाडशील आपल्या दोघांत
आणि चालू लागशील दूरची पायवाट
तेव्हा
बाहेर जाताना लहान मूल जसं मागे लागतं...
तसा मी तुझ्या मागे लागू?
मी तुझ्याकडे काही मागू?
प्रयोगागणिक मला लहानाचा मोठा करत जाणारा तू...
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?

उन्हात वणवण फिरताना
मला तुझी आठवण येईलच
आईच्या डोळ्यांत बघताना
माझ्या काळजात धस्स होईलच
तुझा चेहरा विरला तरी
तुझी चाहूल राहीलच...
पण मित्रा, एक सांग...
कुठे जाशील?
काय करशील?
कसा राहशील?
तसा आहेच भणंग मीही
पण जाता-जाता
मला आणखी भणंग करून जाणारा तू...
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?

('गांधी विरुद्ध गांधी'चे शेवटचे तीन प्रयोग चाल्ले असताना)
सौमित्र
***
कुठून करावी सुरुवात
रोज एक चुटपूट ठेवून देते मी
जिभेखाली विरघळवत तास न् तास.

दिवसभर उन्हातान्हात फिरून शिणलेले शब्द,
थंडीवार्‍यात काकडलेल्या ओळी, पाऊसपाण्यात
चिंब परिच्छेद... एकवटून येतात रात्री
एका पत्रासाठी, जे तुला पाठवण्याची
शक्यता आजमावतेय मी दररोज.

कळत नाही, कुठून करावी सुरुवात
पुन्हा स्वतःला रचायला.
की, काही तरी सलग अर्थाचा शब्द
तुझ्या हातावर ठेवायला हवा...!
कविता महाजन
माझा खो नंदन आणि ए सेन मॅनला.

Friday, 1 August 2008

हू दी हेल केअर्स?

फाटक्या कानातून वाहणारं उष्ण रक्त.
त्यातून उद्दाम प्रदीर्घ विस्तारत गेलेली सूर्यफुलांची शेतं.
इतकंच फक्त.
***

हॅरीचा हातात आलेला सातवा भाग. सात हॉरक्रक्सेस.
एक-दोन-तीन-चार-पाच-सहा-सात.
हॅरीच्या डोक्यात अनाहत घुमणारं चक्र. मरायचं किंवा मारायचं या निवडीतली अपरिहार्यता कळल्यावर होणारी तगमग.
ऑफीसमधलं प्र-चं-ड काम. जवळ येणारी डेडलाईन. डोक्यातला कासावीस गदारोळ.
गोष्टीचा शेवट कळला पाहिजे, शेवट कळलाच पाहिजे -
वाचायला सगळी पहाट आणि सकाळ मिळते. गाडीतही वाचता येतंच. पण ऑफीसमधे? तिथे कसं वाचणार? गोष्टीचा शेवट तर लवकरात लवकर कळला पाहिजे.
हॅरीला पूर्ण तयारीनिशी लढायला उतरायचं आहे. लढणं अपरिहार्य आहे, या हतबलतेतून नव्हे. पूर्ण निर्धारानं. सगळे सगळे संदेह - संशय - गंड बाजूला सारून. आपल्या ताकदीवर पुरा विश्वास ठेवून.
मग मरणं की मारणं यांतले हिशेब आपोआप बाजूला राहतील. फक्त निर्णय घेता आला पाहिजे.
हॉलोज की हॉरक्रक्सेस? अमरत्वाचा शाप की मरणाचं वरदान?
अहं, कुठेतरी काहीतरी चुकतं आहे...
काय चुकतं आहे?
हॅरीची ऍन्क्झायटी आणि माझं ऍड्रेनॅलिन एकत्रच वाढत असलेलं. दोन टास्क्सच्या मधे मी स्क्रीनवर चक्क हॅरीची सॉफ्टकॉपी उघडते.
निर्लज्ज? मेबी. हू दी हेल केअर्स?
त्याच्या-माझ्या विश्वांनी परस्परांचा परीघ छेदला आहे.
भासमय विश्व? मेबी. अगेन, हू दी हेल...
जिवानिशी सुटायचं असेल, तर आता आम्हांला आपापली वर्तुळं चालून पुरी करण्यावाचून गत्यंतर नाही.
आता शेवटापर्यंत पोचायचं आहे फक्त.
***

बस्स. बस्स झालं आहे त्याला आता.
ही नाटकी माणसं. त्यांच्या आचरट अपेक्षा. मूर्ख-विकृत साले.
एक त्याची लहानगी बहीण भेटायला हवी आहे आत्ता त्याला...
तिचा मनासारखा निरोप घेतला, की तो पश्चिमेकडे निघून जायला मोकळा.
मग बसा झक मारत. त्याला देणंघेणं नाही. खरंच.
हॉल्डन वेदरफिल्ड त्याचं नाव.
वय? उणंपुरं सोळा वर्षांचं. शरीरातलं गरजांचं उधाण. डोक्यातलं आडव्यातिडव्या विचारांचं. आजूबाजूला पसरलेली तडजोड.
अनाकलनीय आहे हे सगळं त्याला. खोल खोल बुडत चालला आहे तो...
हॉल्डन वेदरफिल्ड मला भेटला, तेव्हा माझं वय त्याच्यापेक्षा बरंच जास्त असलेलं. पण 'तळ्यातली बदकं हिवाळ्यात कुठे जातात?' या त्याच्या प्रश्नानं मला तितक्या सहजासहजी पुढे जाऊन दिलं नाही.
एखाद्या गोडगुलाबी-देवदूती परीकथेतल्या नायकानं झोपण्यापूर्वी निरागसपणे विचारलेला प्रश्न नाही हा. डोण्ट लेट युअरसेल्फ एस्केप फ्रॉम इट.
आत न मावणारा संताप आणि आर्तता त्याच्या प्रश्नात. एक इमर्जन्सी. तिनं मी खिळल्यासारखी झाले.
मी सोईस्कररीत्या विसरून गेले होते, त्या प्रश्नांना त्यानं बिनदिक्कत हात घातलेला.
मला त्याचा इतका भयानक राग का येतो आहे? तो शिवराळ, तो खोटारडा, तो माजोरडा म्हणून?
की थोडा तो माझ्यात आहे, आणि थोडी मी त्याच्यात म्हणून?
आय स्वेअर, असलं काहीतरी बांधलं जातं, तेव्हा सोबत वाट काटण्यावाचून गत्यंतर नसतंच.
होय, मिसरूडही न फुटलेलं कोवळं पोर.
कदाचित खरं - कदाचित खोटं. पण हू दी हेल केअर्स?
शेवटापर्यंत पोचायचं आहे फक्त.
***

बदामच्या राणीला वेड्यात काढणारी ऍलिस.
आपल्या गुलाबकळीला जिवापलीकडे जपणारा लिटिल प्रिन्स.
'थोडासा रुमानी हो जाए'मधला बारिशकर.
वादळात बिनदिक्कत जहाज घालणारा कॅप्टन रॉस.
आवेगानं चक्रधरला बिलगत जगून घेणारी हॅर्टा.
'मी लहान मुलासारखा तुझ्या मागे लागू?' असं काकुळून हरिलालला विचारणारा सौमित्र.
काय खरं? काय खोटं?
प्रेयसीला कान कापून देणारा व्हिन्सेण्ट.
त्याच्या फाटक्या कानातून वाहणारं उष्ण रक्त.
त्यातून माझ्याही आयुष्यात उद्दाम प्रदीर्घ बहरत गेलेली सूर्यफुलांची शेतं.

इतकंच खरं फक्त.

Tuesday, 8 July 2008

इक कविता का वादा है, मिलेगी मुझको..

आतड्याची माणसं आपलं मरण स्वीकारत नाहीत तोवर म्हणे आपण मेलेले नसतोच.
शरीर संपून त्याची राख वा माती होतही असेल कदाचित. पण अस्तित्व मात्र उरतं.
अस्तित्व उरतं म्हणजे काय? आपण उरतो?
आपण म्हणजे जर हे शरीर, हाडकं, रक्त-मांस नसूच - तर आपण काय असतो? आपल्या माणसांच्या ऊष्ण आठवणी? आपण म्हणजे आपल्या कृतींचे कुणीतरी लावलेले अन्वयार्थ केवळ? किती भीषण आहे हे?
'एक दिन अचानक’ म्हणून एक सिनेमा पाहिला होता मृणाल सेनांचा. एक दिवस घरातला कर्ता पुरुष संध्याकाळी घरी परततच नाही. संध्याकाळ उलटते. रात्र होते. काळजीनं कुळकुळत रात्रही संपते. शिळी दमलेली सकाळ. काळजी. पोलिसांकडे नोंदवलेली तक्रार. ठिकठिकाणी केलेली शोधाशोध. कासावीस होऊन केलेली विचारणा. ढुंढाळलेल्या विहिरी. इस्पितळं. स्टेशनं. हाती आलेली रिकामी निराशा.
अशा अनेक संध्याकाळी. रात्री. सकाळी. उदासवाण्या - आशाळभूत.
आता घरानं प्राक्तन स्वीकारलं आहे त्याच्या पुरुषानं त्याच्याकडे पाठ फिरवल्याचं. पण तरीही अद्याप आशा पुरती मेलेली नाही. धुगधुगी आहे तिच्यात अजुनी. अजून कातरवेळेला जीव हुरहुरतो. चपलांची विशिष्ट करकर ऐकू आली, तर मन उशी घेतं. वरणाला फोडणी देताना अजुनी लसूण पडत नाही हातून. ’ह्यांना नाही चाल-’
चितेला अग्नी देताना, शरीराला मूठमाती देताना, अस्थी गंगेत विसर्जित करून पाण्याकडे पाठ फिरवताना हीच हुरहुर विसर्जित होत असेल? असण्याच्या आशांना चूड लागत असेल? अभाव चरचरीतपणे अधोरेखित होत असेल? काय होत असेल नेमकं?
पार्वतीबाईंचं काय झालं असेल?
त्यांचा कर्तासवरता नवरा असाच एकाएकी होत्याचा नव्हता झाला की. आत्ता होता - आत्ता नाही.
चुडा फोडू? भरलं कपाळ पुसू? मंगळसूत्र काढून ठेवू? असं कसं? अजून इकडच्या स्वारीचा देह नाही पाहिला, आणि हे काय भलतंच अभद्र? कुठे असतील ते - मी सधवेची विधवा होऊन त्यांना अपशकुन करू?
बाई आयुष्यभर अशीच जगली...अहेवपणाची लेणी लेऊन.
तिच्या मनात कातरवेळेला काय दाटलं असेल? अशुभाचा निर्वाळा देणारं आपलंच मन तिनं कसं घट्ट केलं असेल? रोज वेणीफणी करताना कुंकवाच्या करंड्यात बोटं थबकत असतील तिची? आणि जर तिला खरीच असेल खात्री सदाशिवभाऊंच्या जिवंत असण्याची, तर तिनं मनोमन साधला असेल संवाद त्यांच्याशी? काय बोलली असेल ती?
तिच्या रक्तामांसाच्या अपेक्षा होत्या जोवर, तोवर भाऊ होतेच. त्यांचं श्राद्ध झालं नव्हतं तोवर...
श्राद्ध.
हेसुद्धा आपल्याच आग्रहाला मूठमाती देण्यासाठी केलेलं कर्मकांड काय? जाणारा जीव जातो. त्याची माती होते. पण मागे राहणाऱ्यांचं काय? जाणाऱ्याच्या अभावानं उभी राहिलेली राक्षसी पोकळी कशी स्वीकारायची त्यांनी? कुठल्या ठाम दगडावर टाच रोवून स्थिर करायचे कापणारे पाय?
म्हणूनच असत असली पाहिजेत कर्मकांडं. दु:खाची कधीही न पुसता येणारी लाखबंद मोहर कपाळी उमटवण्यासाठी.
ज्यांना ही कर्मकांडं लाभत नाहीत, त्यांना खरंच नसेल येत पुरतं मरण? अशी माणसं भाग्यवान म्हणायची की अभागी?
सालं कुणाला न कळवता मरूनच पाहिलं पाहिजे एक दिवस.

Thursday, 3 July 2008

वक्त जाता सुनाई देता है...


कंटाळा. जडशीळ. सुस्त. निर्लज्ज बधिर कंटाळा. बघावं- तिकडे पसरलाय.
व्यायाम?
हो, केला की.
आरोग्यपूर्ण खाणंपिणं?
हो तर. सलाड, पालेभाज्या आणि मोड आलेल्या कडधान्यापर्यंत.
फोनवरच्या निरुद्देश गप्पा?
एकदम बंद. कामाखेरीज एरवी फोन बंद म्हटलं ना.
चांगलं वाचत जावं मग.
अर्थात. स्फूर्तिदायक चरित्र, चेतन भगती पुस्तकं, झालंच तर हॅरी पॉटर. चालू आहे रतीब.
मग येतात कसे उठल्या-सुटल्या कंटाळे तुम्हांला? आम्हांला नाही आला तो कधी कंटाळा? आम्हांला वेळच नसतो ना कंटाळायला.. चोवीस वर्षं नोकरी केली. पण म्हटलं का कधी कंटाळा आला म्हणून? गेलोच की नाही चुपचाप कामावर? तरी बरं आम्हांला जीव रमवायला एवढी साधनं नव्हती. टीव्ही म्हणू नका, डीव्हीडी प्लेयर म्हणू नका, मोबाईल म्हणू नका, लॅपटॉप म्हणू नका. कशाला म्हणून कमी नाही. तरी आपलं उठल्या-सुटल्या आहेच – कंटाळा आला. अरे? काही नाही – भरल्या पोटाची दु:खं आहेत झालं. बाहेर जाऊन पाहा जरा...
याला आता अंत नाही. अगदी ऐकायचा कंटाळा येईपर्यंत –
तरीही कंटाळा उरलाच आहे अजगरासारखा निवांतपणे. थोडंथोडं खाऊन संपवतो आहे जगणं. निर्जीव तरी कसं म्हणावं याला? पोसत चालला आहे साला माझ्या आयुष्यावर. उदासवाणा वांझोटा लठ्ठ कंटाळा. पसरला आहे सगळीभर.
ऑफीसमधे अजून थोडं काम. भरपूर स्ट्रेचिंग. नवीन निर्बुद्ध कल्पना. चेहऱ्याला पावडर थापलेली अजून काही संभावित राजकारणं. थोडं कौतुक. पगारवाढीचा तुकडा झेललेला. वीकेण्डची अंतहीन झोप. शिळवटलेला सोमवार आणि फसफसलेला शुक्रवार.
नवीन सिनेमे, तीच प्रेमगीतं, तोच अन्यायाविरुद्ध लढा. तीच सिनेमॅटिक लिबर्टी. तोच विरह. तेच पुनर्मीलन. तेच उदात्तीकरण. तीच स्टाईल. तीच सुरुवात नि तोच शेवट.
नवीन पुस्तकं. अफगाणी स्त्रियांनी भोगलेला छळ. प्रसिद्ध लेखकांच्या बायकांनी सोसलेली मुस्कटदाबी. कॉलसेंटरमधली स्मार्ट प्रेमप्रकरणं. महाभारताचे नवीन अन्वयार्थ. ब्राह्मणी आणि दलित आणि दलित आणि ब्राह्मणी आत्मचरित्र. अजून कुठल्यातरी प्रसिद्ध देशाचं चटकदार-संस्कृतिपूर्ण ’ललित’ प्रवासवर्णन.
कवितांमधूनही साला कंटाळाच पसरलेला असावा?
एखाद्या सराईत बाजारू कवितेसारखा लांबलचक. घामट. वळवळणारा. चराचर व्यापून उरलेला. अश्लील कंटाळा उतरलाय सगळ्यावर.
कुठल्यातरी नागिणीनं नागाच्या मृत्यूचा सूड घेतल्याची बातमी झळकतेय दिवसभर टीव्हीवर. कुणीतरी महाराष्ट्राची महागायिका झालीय. अमेरिकनं कुणाच्या तरी युद्धखोरीचा निषेधही चालवला आहे सकाळपासून. शनी उद्यापासून मिथुनेत शिरणार म्हणून बोलावलेले एक तज्ज्ञ ज्योतिषी शनीच्या पीडेवर उपाय सांगतायत. कुणीतरी प्रियकराच्या खुनाचा कट करतं आहे. कुणीतरी शिरा ताणताणून करतं आहे कुणावरतरी भ्रष्टाचाराचा आरोप. कुणाचा खून, कुणावर बलात्कार. कुणावर ’बिनबुडाचे’ आरोप.
टीव्ही साला अथक गळतो आहे.
पाऊसही.
शहर बंद पडायला आलं आहे तरीही गळतोच आहे पाऊस निर्दयपणे. पाण्याचा जाड पोलादी पडदा. मातकटलेलं-गटारलेलं काळसर पाणी जिकडे तिकडे. आचके देऊन पडलेल्या लोकल्स. फलाटाच्या अपुऱ्या आसऱ्याला आलेली वळवळणारी आशाळभूत गर्दी.
तरीही पाऊस गळतो आहे.
आवाज नसलेला पावसाचा हिंस्र आवाज सगळं मिटवून टाकणारा. कुणाची वाट पाहण्यापुरतीही उसंत न देता भरत चाललेलं पाणी. शहराचे सगळे दोर कापत – गिळत जाणारा लोखंडी पाऊस.
आणि तरीही कंटाळा. सगळ्यासकट कंटाळा. एखाद्या भयप्रद श्वापदासारखा आसंमत गिळंकृत करून ढेकरही न देणारा...
कंटाळा.

Saturday, 14 June 2008

पूर्ण भाग जाणारं पुस्तक

सगळं काही शेवटी आलबेल होतं. सगळ्या अडचणी सुटतात. सगळ्या अनाकलनीय कोड्यांची नीट संगतवार उत्तरं मिळतात. सगळ्या दुष्ट लोकांचं वाट्टोळं होतं. सगळ्या सज्जन लोकांचं अखेर यथासांग भलं होतं. नायकाला नायिका मिळते. ते एकमेकांवर संपूर्ण आणि सखोल प्रेम करू लागतात. आणि दोघे सुखाने नांदू लागतात.

असले शेवट असणारी पुस्तकं लिमिट डोक्यात जातात. काहीतरी उंचावरून खाली फेकून द्यावं, काहीतरी तोडून-मोडून-जाळून टाकावं, कुणाच्यातरी उगाचच कानफटात हाणावी, अश्या अनेक अनावर हिंसक इच्छा असल्या पुस्तकांचं शेवटचं पान संपवल्यावर जाग्या होतात. सगळं जग बेतशीर सुबकपणे आपल्या दीडवितीच्या शब्दकोड्यात चपखल बसवणार्‍या लेखकाची आणि वाचणार्‍या आपली दया-दया येते.

बाकी सगळ्याचं ठीक आहे. पण हॅरी पॉटरचं हे असं नेमकं कधी झालं?

नेमका पान क्रमांक वगैरे आता आठवत नाही.

उलट त्यातलं समांतर अद्भुत विश्व पाहिलं, तेव्हा भारावून जायला झालं होतं.

'मिरर ऑफ डिझायर'मधे साध्यासुध्या आरशासारखं आपलं प्रतिबिंब दिसत नाही, तर आपल्या अंतर्मनातल्या तीव्र इच्छा मूर्त झालेल्या दिसतात, हे कळलं तेव्हा त्यातल्या अर्थपूर्ण कल्पनेची भन्नाट मजा वाटली होती.

'विझार्ड नेव्हर चूजेस वॉण्ड, इट्स दी वॉण्ड हू चूजेस दी विझार्ड' हे अजब वाक्य वाचलं, तेव्हा चक्रावून जायला झालं होतं. पण मग त्यातून छडीसारख्या निर्जीव गोष्टीला बहाल केलेला जिवंतपणा आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व दिसलं आणि बाईंबद्दल आदर वाटला.

'सॉर्टिंग हॅट'ची कल्पनाही अशीच अफलातून. आपल्याला जे व्हायचं असतं, ते आपल्याला होता येतंच. फक्त तितकी तीव्र इच्छा आणि निर्णयाचा ठामपणा असायला हवा, असं श्रीमंत तर्कशास्त्र सांगत होती बाई.

प्रत्येकाचा पॅट्रोनस फॉर्म (च् च्! पॅट्रोनस म्हणजे तुमच्या मनातल्या होकारात्मक भावनांनी तुमच्या वॉण्डमधून समूर्त होणं.) निरनिराळी रूपं घेतो इथवर ठीक आहे. पण लिलीवर नितांत प्रेम करणार्‍या स्नेपच्या पॅट्रोनसनं लिलीच्या पॅट्रोनसचा आकार घ्यावा? हे अद्भुत होतं.

राक्षसाचा प्राण कुठल्यातरी पोपटात असण्याची कल्पना आपल्याला कुठे नवीन होती? त्याच धर्तीवर व्होल्डरमॉटनं आपल्या जिवाचे सात तुकडे केले आणि अमर होण्याकरता ते कुठेकुठे दडवून ठेवले. पण त्याच्या जिवाचा एक अंश असावा चक्क हॅरीमधे. आणि त्यातून त्या दोघांमधे एक जिवंत दुवा निर्माण व्हावा? बालवाङ्मयाची काळी-पांढरी सरहद्द संपते आणि त्यांची अनाकलनीय सरमिसळ असलेला राखाडी प्रदेश सुरू होतो, तिकडे चाललं होतं सारं.

प्राणिसृष्टी म्हणू नका, भाषा म्हणू नका, मंत्र म्हणू नका, खेळ आणि विज्ञान म्हणू नका... एक संपूर्ण नवीन विश्व.

सर्वसाधारण कल्पना जर एकरेषीय असतील, तर हे कल्पनेचं विश्व म्हणजे एखाद्या प्रसरणशील ताकदवान विस्फोटासारखं होतं. दाही दिशांना विस्फारणारं. विस्फारत राहणारं.

दुर्दैवानं ते तसं राहिलं नाही. दर गोष्टीचा एक साचा ठरत गेला. नियम बनत गेले. दर वर्षी काहीतरी संकट यावं. हॅरीनं त्यावर मात करावी. सरतेशेवटी प्रोफेसर डंबलडोरनी सगळ्या अनुत्तरित प्रश्नांची संगतवार उत्तरं द्यावीत... सगळं कसं संतापजनक प्रेडिक्टेबल होत गेलं. शेवटच्या वर्षी हॅरीनं व्होल्डरमॉटवर मात केल्यावर त्याचं गिनीशी लग्न व्हावं, त्याला तीन मुलं व्हावीत (दोन मुलगे आणि एक मुलगी!) आणि त्यातल्या एकाचं नाव 'अल्बस सिव्हेरस' असावं हा तर गलिच्छपणाचा कळस होता.

अखेरशेवट हॅरीला पूर्ण भाग गेलाच.

फक्त हॅरीच नाही. अशी अपेक्षाभंग करणारी अनेक पुस्तकं असतात. माणसंही असतात - ज्यांचा थांग लागतो आपल्याला सहज. आणि सगळं इतकं सहज-प्राप्य-खुजं-नीटनेटकं असल्याबद्दल एक रानवट संताप येतो.

एरवी खरंतर एखाद्या संख्येला पूर्ण भाग गेलेला मला आवडतो. सगळं आलबेल चालू असल्याचा, सगळ्यावर आपला ताबा असल्याचा, सगळं नीट आवरून ठेवल्याचा एक फील येतो...

पण पुस्तकं, सिनेमे आणि माणसं? त्यांना पूर्ण भाग न जाण्यातच गंमत आहे.