Thursday 15 November 2018

समस्यापूर्ती

पाळी येण्यापूर्वीच्या आठवड्यात कितींदा
संतप्त अनावर रडून लिहिल्या आहेत कविता
कुणीतरी हिशेब केला पाहिजे कधीतरी एकदा
कितीतरी भ्रम मग खळखळा फुटतील
प्रेमाचे-वात्सल्याचे-मैत्र्यांचे नि मत्सरांचे
फक्त रक्तामधल्या रसायनांचे प्रवाह उरतील
मोकळेपणानं भिडता येईल शरीराच्या मनाला
शरीराला शरीराची ऋतुसापेक्ष ओढ लागेल
बेघर पारवे असे बेधडक सामोरे जातील सूर्याला.
***

शेवटच्या दोन ओळी मेघना पेठे यांच्या 'छाया... माया... काया...' या कथेतल्या आहेत.
... शरीराला शरीराची ऋतुसापेक्ष ओढ लागते
आणि बेघर पारवे असे बेधडक सूर्याला सामोरे जातात...
त्या कथेतल्या एका पात्रानं लिहिलेल्या कवितेच्या या ओळी. ती कविता कथेत अपुरीच. पुष्कळ वर्षं त्या ओळी डोक्यात घोळत होत्या. समस्यापूर्तीसाठी श्लोक रचत लोक पूर्वी, तसा त्या ओळी उसन्या घेऊन केलेला हा प्रयोग. मूळ ओळींचं श्रेय अर्थात मेघना पेठे यांचं. 




No comments:

Post a Comment