Wednesday 15 January 2020

भांडणांची चैन परवडणारी नाही

मी कधीही उजव्या विचारसरणीची समर्थक नव्हते. पण होता होईतो राजकीय घटनांवर थेट मतप्रदर्शन टाळत असे. ज्या विषयाचा आपला अद्ययावत अभ्यास नाही, त्या विषयात न पडण्याचं बंधन पाळत असे. पण जवाहरलाल नेहरू विद्यापीठातली घटना, त्यानंतरचं सत्ताधार्‍यांचं वर्तन आणि त्या सगळ्याला सर्वसामान्य माणसांनी दिलेला प्रतिसाद या गोष्टी माझ्याकरता टर्निंग पॉइंट ठरल्या. माणसांमधल्या क्रूरपणानं स्तिमित व्हायला झालं. तथाकथित तर्कशुद्ध, तथाकथित विवेकी, मध्यममार्गी, तटस्थ, वा थेट उजव्या विचारसरणीने पछाडलेले, आपल्या घराची राखरांगोळी करूनही परधर्मीयांना वा परदेशी लोकांना धडा शिकवू इच्छिणारे माथेफिरू... वा यांपैकी कोणत्याही घटकांचं मिश्रण वाहणारे – कुणीही घडलेल्या घटनांचं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समर्थन करत असेल वा त्या घटनांकरता विद्यापीठाला जबाबदार धरत असेल वा तसं दर्शवत असेल; तर मला अशा माणसाशी संभाषण करण्यात रस नाही – मग तो नातेवाईक, परिचित, आप्त, मित्र, सहकारी, शिक्षक... कुणीही असो. माणूसकीला आवाहन करून, प्रेमानं जिंकून, पटवून देऊन माणसांचं मतपरिवर्तन करू शकण्याचं मोल मला ठाऊक आहे. पण माझ्यात ती ताकद आज तरी नाही. एका प्रकारे ही मी – आणि कदाचित माझ्यासारखं कुणीही – एकाकी पडत जाण्याची प्रक्रिया आहे, हे मला कळतंय. म्हणूनच आजवर ज्या मित्रांशी वैयक्तिक कारणांमुळे कटोविकटीची भांडणं मांडली, पण जे लोक आज उजव्या विचारसरणीला विरोध करताहेत, अशांशी असलेली माझी भांडणं मी म्यान करते आहे. आज भांडणांची चैन परवडणारी नाही.

No comments:

Post a Comment