Wednesday 15 March 2017

अगोचरही वास्तवच असतं

वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा
जयंत पवार
लोकवाङ्मय गृह प्रकाशन


आपल्याला ज्याचं लेखन स्पर्शून गेलं आहे, अशा लेखकाशी बोलायची संधी मिळाली की एक प्रश्न मला कायम सतावतो. इतकं भारी लिहिणार्या माणसाशी, आपण बावळटासारखं जाऊन बोलायचं काय? तर तुम्ही कित्ती भारी लिहिता!' हे? छे छे!

पण जयंत पवारांना भेटायची संधी मिळाली, तर असा प्रश्न मला कदापि पडणार नाही. तुमच्या कथेतल्या काका मी येऊ तुमच्याबरोबर?” या डिग्याच्या प्रश्नावर बाबी क्षणभर घुटमळून का होईना, पण चलम्हणाला, याबद्दल मी तुमची कायमची ऋणाईत आहे, हे मला त्यांना सांगायचंच आहे.

आय नो, धिस इज बिट क्रिप्टिक. नीट पहिल्यापासून सांगते. ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा' ही जयंत पवारांच्या कथासंग्रहातली कथा. मुंबईमधली एक गिरणीकामगारी चाळ. तिथे येऊ घातलेला टॉवर. त्या पार्श्वभूमीवरचं तिथलं निम्नमध्यमवर्गीय जगणं आणि भ्रष्ट महत्त्वाकांक्षी जगात त्याची क्रमाक्रमानं, धीम्या गतीनं पण निश्चितपणे, होत गेलेली पडझड, वाताहात, उद्ध्वस्त होत जाणं. त्या चाळीतल्या पौगंडावस्थेतल्या एका मुलाचं - डिग्याचं - सर्वार्थानं अनाथ, बेघर, नामशेष होत जाणं या कथेत लेखक चितारतो. कथेच्या शेवटाकडे परिस्थितीमुळे भिंतीपाशी चिरडत चाललेल्या क्षुद्र, असहाय प्राण्यासारखं त्या मुलाचं कःपदार्थ अस्तित्व बघून मी खचत गेले. त्या मुलानं कथेच्या शेवटी, मरण्यापूर्वी शेवटचा प्रयत्न करावा तसं, चाळ सोडून निघालेल्या, एका पिचलेल्या सहृदय शेजार्याला विचारलं, “काका, मी येऊ तुमच्याबरोबर?”

त्या प्रश्नात काय नव्हतं? बुडत्या माणसानं जिवाच्या आकांतानं धरावा, तसा तो दुसर्या माणसाचा दिसेल तो अवयव होता. प्रश्न विचारणारी व्यक्ती मूल असल्यामुळे, त्यात परिस्थितीच्या संभाव्य क्रौर्याचं, अटळपणाचं भान नव्हतंच. अपरंपार निरागसपणा होता, कोवळी आशा होती. महाशहरातल्या निर्दय व्यवस्थेनं आणि क्रूर समाजानं पिचवलेलं आयुष्य जगण्याजोगं करण्याचा त्या मुलाचा तो अखेरचा प्रयत्न होता. आणि म्हणूनच तो प्रश्न अजूनच धोकादायक, दबा धरून बसलेल्या श्वापदासारखा होता. तो वाचला आणि मी भिऊन पुस्तक मिटलं. जर बाबी नाही म्हणाला असता, तर त्याची चूक नसतीच. पण मग मी पुढे वाचू शकले नसते. वास्तविक कोणत्याही तथाकथित वास्तववादी लेखकानं डिग्याच्या आशेला असं कुरवाळलं नसतं. त्यानं डिग्याला निर्दय वास्तवात मरायला सोडून दिलं असतं आणि वास्तव हे असंच असतंअसा कोरडा खुलासाही केला असता. पण बाबीनं मात्र तसं केलं नाही. माणसानं माणसाला हात दिला आणि ती कथा लेखकाच्या हातून सुटून कुठल्याकुठे निघून गेली.

हे या संग्रहातल्या सगळ्याच कथांबाबत होतं. विश्वीकरणाच्या काळातली, अंदाधुंद बदलती, निसर्गापासून आणि पारंपरिक समाजरचनांपासून फटकून निघालेली, वेगवान, गुंतागुंतीची, कमालीची निर्दय अशी परिस्थिती त्यांत आहे. या परिस्थितीत, ज्यांना आवाज नाकारला गेला आहे, अशी व्याकुळ माणसं आहेत. या मुक्या, चिरडल्या जाणार्‍या माणसांच्या गोष्टी पवार सांगतात.

अशा कथांमधल्या पात्रांना सहसा वास्तववादाच्या नावाखाली अटळ निराशा झेलावी लागते. पण पवार मात्र हा रुळलेला वास्तववाद नाकारतात. दोन प्रक्रारे. एक म्हणजे - पात्रांसाठी त्यांच्या मनात करुणा आहे. त्यामुळे जग हे असंच असतं' असा कोरडा खुलासा करता ते सहृदयपणे आशेचं, माणूसपणाचं, चांगुलपणाचं, कुठेकुठे अगदी तोकड्या प्रमाणात पण निःसंशय उरलेलं, झगझगीत जिवंतपण चितारत राहतात. प्रसंगी लेखकाचं स्वातंत्र्य पणाला लावून, वास्तवाला मुरड घालत. त्यातून उमलणारे शेवट करायला ते जराही कचरत नाहीत. किंबहुना हे असे, चकित करणारे, खुल्या शक्यता घेऊन येणारे शेवट हे या कथांचं फार मोठं बलस्थान आहे. दुसरा प्रकार म्हणजे, या सगळ्या कथांमध्ये वापरलेला अद्भुताचा पदर. त्यांत भुतंखेतं आहेत. काही वास्तवाच्या पल्याडची जगं आहेत. तर्काच्या पल्याडचं अद्भुत आहे. दिव्य दृष्टीनं माणसांचं जग निर्विकारपणे निरखणारे देव आहेत.

खरंतर हे तंत्र. पण हे तंत्र गोष्टीच्या आतल्या स्तराला असं काही लगडून येतं, की ते वेगळं काढणं अशक्यच आहे. ते तंत्र तंत्र म्हणून उरतच नाही, ते गोष्टीचा भागच होतं. अतिवास्तवाचं अस्तर लेऊन आलेला वास्तवाहून वास्तव असा भाग.

बाबलच्या आयुष्यातील धादांत सत्य' या कथेत एका गरीब सुताराचा गाणारा, प्रामाणिक पोर आहे. त्याच्यावर जग अन्याय करतं आणि त्याचा निषेध म्हणून तो घरातल्या लहानशा माळ्यावर आपलं आयुष्य गोठवून घेतो. त्याच्या कथेचा उद्मेखून अलौकिक, भव्यदिव्य आणि सकारात्मक शेवट करताना पवार आपली भूमिका जोरकसपणे स्पष्ट करतात. -

‘...पण वास्तव दाखवून सुन्नपणाशिवाय अधिक काही साधणार नाही. काळाच्या मोठ्या टापूवर परिणाम करत काही मूल्यं रुजवायची असली तर कथाकार म्हणून मला मिथकंच रचली पाहिजेत...'

याचा अर्थ ते वास्तवापासून फारकत घेत कचकड्याच्या गोड गोष्टी सांगतात, असा मात्र नव्हे. कारण कथेची शेवटची ओळ कथाकाराच्या पुढ्यातला पेच मांडणारी आहे. -

बाबलचं मिथक माझ्या हाताशी आहे, पण ते कसं विश्वासार्ह बनवायचं हा माझ्यापुढचा पेच आहे.'

आजच्या व्यामिश्र-निराश करणार्या जगात कथाकारानं त्याच्या पात्रांना न्याय द्यावा तरी कसा, या पेचासह पवार आपल्या कथा घेऊन उभे ठाकतात आणि अद्भुताचा पदर विणत आपल्या कथा रचत जातात. ‘सर निघाले सप्तपाताळाकडे....' या त्यांच्या कथेत एक प्रथितयश साहित्यिक आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या वृद्ध साहित्यिकाच्या आजूबाजूचं जग पूर्णपणे बदललं आहे. पोस्टखात्याचा ढासळलेला कारभार हे बदलत्या जगाचं निव्वळ प्रतीक. पोस्टाच्या ढिसाळ कारभाराचा सोक्षमोक्ष लावायला निघालेले सर पोस्टात जातात आणि तिथल्या साचून राहिलेल्या पत्रांच्या वाटेनं अधिकाधिक खोल उतरत जातात. कुठेच पोहोचू शकलेल्या पत्रांचे ढीगच्या ढीग, दालनंच्या दालनं, मजलेच्या मजले तिथे आहेत. त्या मजकुरात हरवून जाताना सरांना विश्वरूपदर्शन होतं. कधीही आवाज मिळालेल्या, मुक्यानं जगत राहिलेल्या माणसांचा हा नरक निरखताना सर मुक्त होतात.  ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य' ही गोष्ट काहीशी कमी धारदार, बेतीव वाटली. तरीही तिची अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना आहेच. रहस्यकथेमध्ये कायम दुर्लक्षित राहिलेली, ग्लॅमरस नसलेली, गरीब पात्रं आणि दस्तुरखुद्द रहस्यकथालेखक हाही एक दुर्लक्षित मानला गेलेला साहित्यिक - अशी गुंफण करत ही गोष्ट पुढे सरकते. उत्तर नसलेल्या प्रश्नाच्या कड्यावरून वाचकाला लोटून देते. ‘तुझीच सेवा करू काय जाणे' ही कथा म्हणजे मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवांच्या भव्यदिव्य पडद्यामागचा काळाकुट्ट अंधार आहे. गिरणीकामगारांचं बंद पडत गेलेलं आयुष्य, सार्वजनिक गणेशोत्सवांच्या आर्थिक संधीतून त्यांनी आणि त्यांच्या बेकार मुलाबाळांनी शोधलेले कायदेशीर-बेकायदेशीर आधार, त्यात कुचमत-खितपत गेलेली-सडून सत्यानाश झालेली अनेक आयुष्यं आणि तरीही श्रद्धेचा बेगडी चकचकीत मुलामा मात्र तसाच्या तसा अभंग. साक्षात गणरायाच्या तोंडून वदवलेली ही गोष्ट वाचताना सुन्न व्हायला होतं.

वस्तूंशिवाय निरर्थक असलेल्या, चंगळवादी, आधुनिक आयुष्यातली शिवराळ आणि इंग्रजीप्रभावित जिवंत भाषा आणि भारतीय पुराणकथांची आठवण करून देणारी काहीशी पारंपरिक वळणाची देशी भाषा या दोघी अनेकदा या कथांमध्ये एकमेकींना छेद देतात आणि वाचक भंजाळून जातो, विचारात पडतो, वास्तवाच्या संमिश्र पोतामुळे चरकल्यासारखा होतो.

तुझीच सेवा करू काय जाणे'मधील ही काही वाक्ये वानगीदाखल पाहा -

‘... हा दाखला गणेश पुराणाच्या प्रथमाध्यायात मौजूद आहे. अगदे तसेच वर्तन पिरामल यांच्या मुलींचे राहिले. पित्याच्या कोट्यवधींच्या संपत्तीच्या लालसेने त्या भैसाटल्या त्यांनी पित्यास त्राही भगवान केले. मिल चालवण्यास कोणीही बंधू वारस नसल्यामुळे ही मालमत्ता बाजारभावाने विकून तिन्ही मुलींत धनाचे समान वाटप करावे म्हणून त्या हटून बसल्या. त्यांच्या सततच्या तगाद्याने बापाचे डोके मॅडमॅडसे झाले...'

अगोचरही वास्तवच असतं' अशा निःसंदिग्ध प्रतिपादनासह येणार्या, वास्तवाची कोंडी फोडत, वाचकाचं डोके मॅडमॅडसे' करणार्या या कथा - कोणत्याही पट्टीच्या वाचकाने वाचल्याच पाहिजेत, अशा.
***

अनुभव, मार्च २०१७मध्ये पूर्वप्रकाशित
मुखपृष्ठ जालावरून साभार

No comments:

Post a Comment