Wednesday 17 August 2016

तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

काही गोष्टी जाहीर बोलू नयेत असं आपल्या मनावर लहानपणापासून पद्धतशीरपणे बिंबवण्यात आलेलं असतं. त्यात काहीएक समंजसपणा, जाण असते आयुष्याबद्दलची. काही प्रमाणात प्रस्थापितांचे हितसंबंध असतात. काही थोडी सगळ्यांचीच दीर्घकालीन सोय. एकूण परिणाम असा होतो, की ज्या गोष्टी स्पष्ट आणि स्वच्छ बोलल्या गेल्या पाहिजेत - वेळी जाहीरपणे - बोलल्या गेल्या पाहिजेत - त्याही बोलताना आपण कचरतो. वयसुलभ बंडखोरीतून, अंगभूत उद्धटपणातून, कुतूहलातून, अभिव्यक्तीच्या गरजेतून मी वेळोवेळी या मर्यादेवर मात करत आले आहे. त्याचे परिणाम स्वीकारले आहेत. आज त्याला अपवाद नाही.

एका अंकाचं काम करताना माझे ’ऐसी अक्षरे’ या संस्थळाच्या व्यवस्थापकांशी मतभेद झाले. मतभेदांना ना नाही. पण रास्त अधिकार डावलून मनमानी करण्याला मात्र ना होती, आहे. म्हणून काम पूर्ण करून बाजूला झाले.

आता अनेक प्रकल्पांची पूर्वी हातात घेतलेली कामं समोर तशीच पडलेली पाहून प्रश्न पडताहेत.

संस्था महत्त्वाची की माणसं? फक्त आपला अहं दुखावला गेला, म्हणून तर आपण हे करत नाही आहोत ना? आपल्याला जे काम करायला मनापासून आवडतं, जमतं, सुचतं; ते आपण का थांबवलं आहे? ते निराळ्या ठिकाणी करणं शक्य आहे म्हणून? तसं करण्यात संसाधनांची आणि मानसिक ताकदीची नक्की किती उधळपट्टी होते आहे, होणार आहे, आणि त्यातली किती रास्त समजायची? तुटण्याच्या या सगळ्या प्रक्रियेत आपल्या हातून अदब सुटून माणसांशी दुष्टावा होऊ नये, म्हणून किती जपायचं? अशा वेळी राहतो का आपले आपण तटस्थ मूल्यमापक? राहू शकतो? आपण एका विशिष्ट वर्तुळातून बाजूला झालो, म्हणून वर्तुळं मिटून जात नाहीत, हा जगाचा दस्तूर मानून चाललो आहोत खरे आपण. पण आपली आपल्यालाही लख्ख दिसत असते आपण बजावत असलेली भूमिका. ती सोडून देताना आपला अहं सुखावत असतो हेही खरंच. पण वर्तुळातही काहीएक मूलभूत आणि नकोसे बदल होत असतात. त्याकडे किती काळ नि कशी डोळेझाक करतात? त्या बदलांची किंमत मोजण्याइतका मोठा आहे का आपला अहं? पण क्षमाशीलतेचे आकाशवेधी टप्पे पार करणं आपल्याला अजूनही जमलेलं नाही, आपले रागलोभ - माणूसपण अद्याप रसरशीत जिवंत आहे, या गोष्टीचाही अभिमानच तर बाळगतो ना आपण? ते माणूसपण जपण्याची नाही का मोजावी लागत काही किंमत? कसं ठरवतात त्यात लहानमोठं?

नि अखेरशेवट, काय करतात अशा वेळी?

माझ्याकडे एकच एक उत्तर नाही. अशा प्रश्नांना एकच एक उत्तर असतही नाही. मग मी हे सगळं इथे का मांडते आहे?

वेळोवेळी संगतवार विचार मांडून पाहायचा खेळ खेळून मला दीर्घकालीन उत्तरं मिळाली आहेत. काही गोष्टी दाराआड न ठेवता चव्हाट्यावर आणून ठेवल्या पाहिजेत, होता होईतो शक्य तितकी अदब बाळगून, पण ठेवल्या गेल्याच पाहिजेत, हे मी मानलं आहे. या जाहीर मांडणीमुळे संस्थळाच्या संपादकांनाही काहीएक प्रश्न पडतील, उत्तरं द्यावी लागतील - लोकांना नाही, तर आपली आपल्याला द्यावी लागतील. दुटप्पीपणा टळेल, निवळेल. दीर्घकालीन महत्त्वाचं काही भलं साधण्याची - सांधण्याची शक्यता निर्माण होईल, असा भाबडा आशावाद आहे. म्हणून.

यातून संस्थळाला मी नको इतकं महत्त्व तर देत नाही ना?

नाही. संस्थळ तितकं महत्त्वाचं आहेच. त्याचसाठी हा खटाटोप.

अभिव्यक्तिस्वातंत्र्य, दडपशाहीचा निषेध, लोकशाही मूल्यं यांचा गौरव करणार्‍या पुरोगामी संस्थळाबद्दल मला मनापासून प्रेम, आपलेपणा वाटतो. ज्या लोकांना इतर अनेक मराठी संस्थळांवर बोलण्याइतका मोकळा अवकाश मिळत नाही, अशा अनेक चाकोरीबाहेरच्या लोकांना इथे निवांत-आश्वस्त वाटतं, आपली भूमिका तपासून घेण्याइतकी खुला, मतभेदासहितचा निकोप अवकाश मिळतो, हे मी वेळोवेळी निरनिराळ्या कोनांतून अनुभवलेलं आहे. अशी एक तरी जागा आपल्या वैशिष्ट्यांसह टिकावी असं मला मनापासून वाटतं. संस्थळांमधून अनेक नवनवीन पोटसंस्थळं जन्मावीत. पण त्यांच्या जन्मामागे दडपशाही भांडणांचाच इतिहास असण्याची आणि तो चवीनं चघळला जाण्याची परंपरा मात्र मोडीत निघावी, असंही वाटतं.

म्हणूनच - अशा व्यासपीठाच्या व्यवस्थापकांनी केलेल्या मनमानीचा, संपादकीय अधिकारांच्या पायमल्लीचा आणि स्वतःच्याच भूमिकांशी केलेल्या बेईमानीचा मी निषेध करते आहे. आपापले व्यक्तिगत अजेंडे दौडवण्याच्या नादात आपण संस्थळाच्या बहुआयामी प्रकृतीला एकारलेलं तर तर करत नाही ना, हे तपासून पाहण्याचं त्यांना आवाहन करते आहे. पुरेसा वेळ जाऊ दिल्यानंतर, अहंकार बाजूला ठेवत, हितचिंतकाच्या नात्यानं धोक्याची घंटा वाजवते आहे.

नेहमीप्रमाणेच, या कृतीचे परिणामही स्वयंभू आणि अनेकपदरी असणार आहेत याचं पूर्ण भान मला आहे.