Thursday 15 December 2016

मला नाही येत कवितेची भाषा

मला कविता लिहिता येत असती, 
तर लिहिली असती मी कविता.
तांबडं फुटतं तेव्हाच्या उजेडात, 
आपला निळा रंग दडवून ठेवणाऱ्या, 
काळ्यासावळ्या गुमसुम खंड्याबद्दल.
मनगटाएवढाले ताकदवान झरे पोटात रिचवत, 
स्वतःत चूर होऊन बसलेल्या, 
खोलावत जाणाऱ्या, 
गूढ, 
ऐसपैस विहिरीबद्दल.
काळ्याशार फरश्यांचा गारवा मुरवत, 
झोपाळ्याच्या कड्या कुरकुरवत, 
खिडकीच्या गजांच्या मंद सावल्या अंगाखांद्यावर झुलवत, 
गुडघ्यावर हनुवटी टेकवून बसलेल्या 
पोक्त घराबद्दल.
विनापाश होत जाण्याच्या वाटेवरल्या कुण्या निस्संगानं 
निरपेक्ष अनपेक्षितपणे हाती दिलेल्या, 
नखाएवढ्या रानफुलाबद्दल.
साध्यासुध्या, 
बोलता-बोलता विचारात पडण्याची ताकद न गमावलेल्या, 
बोलक्या-हसऱ्या-खोल डोळ्यांच्या माणसाबद्दल.
पण काय करू?
मला नाही येत कवितेची भाषा.


Wednesday 30 November 2016

राजकीय आणि अराजकीय

काही विशिष्ट माणसांबद्दल आज मी थोडी निरीक्षणं मांडणार आहे. आपला आणि राजकारणाचा काय संबंध बुवा (किंवा बाई) असा त्यांचा अतिशय मनापासून आणि निरागस वगैरे समज असतो.

ही माणसं सर्वसाधारणपणे सवर्ण आणि आकर्षक आणि मध्यमवयीन तरुण वगैरे असतात. खाऊन्पिऊन्तृप्त-अंगानं भरलेली-तरीही-शेलाटी (पुरुषमाणसं असल्यास हीच विशेषणं थोडी फिरवून वापरावीत. खाऊन्पिऊन्तृप्त-पोट-किंचित्सुट्लेलं-गृहस्थी देखणेपणा) इत्यादी त्यांचं रुपडं सहसा आढळतं.

त्यांना एखादा बॉयफ्रेंड असतो. किंवा एखादा नवरा. (नाही. पुरुष असल्यास गर्लफ्रेंड किंवा बायको वाचावं. त्यांना बॉयफ्रेंड अथवा नवरा नसू शकतो, त्या प्रकारची 'उत्च्छृंखल' आधुनिकता यांच्यात नसते. माझी पैज लावायची तयारी आहे.) ते पारंपरिक, पारंपरिक देखणे आणि पारंपरिक पुरुषी असतात. (बरोबर, गरज पडल्यास लिंगपालट करून घेणे.) लग्न झालेलं असल्यास त्यांना किमान एक मूल असतं. हे लोक एकाच वेळी अतिशय आधुनिक असतात आणि त्याच वेळी तितक्याच उत्साहाने पारंपरिक. त्यांना टीव्ही सिरियली (पु० असल्यास - क्रिकेट) बघायला आवडतात आणि त्यांची टवाळी करणंही आवडतं. त्यांची मुलं प्रचंड टीव्ही पाहतात. मात्र त्यांच्या मुलांनी चुंबनदृश्यं आणि उघड्या अंगाचे स्त्रीपुरुष, होमोसेक्शुऍलिटीचे कोणतेही उल्लेख आणि गरीब लोकांनी दिलेल्या शिव्या पाहता कामा नयेत याबद्दल ते दक्ष असतात. होय, श्रीमंत लोकांनी दिलेल्या शिव्या चालतात. किंबहुना त्या हव्यातच, शक्यतोवर इंग्रजीतू्नही हव्यात याबद्दलही ते दक्ष आणि कौतुकोत्सुक असतात. त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा आत्मविश्वास आणि विशिष्ट प्रकारचा गंड यांचं एक ठरलेलं मिश्रण असतं. त्यांना सहसा अंकुश चौधरी ते अक्षय कुमार आणि समीर धर्माधिकारी ते सलमान खान या प्रकारचे पुरुष पाहायला आवडतात (पु० अ० - गिरिजा ओक ते चित्रांगदा सेन आणि राधिका आपटे ते माधुरी दीक्षित). त्यांना सहसा उजवे हुकूमशाही प्रवृत्तीचे आणि 'काहीतरी करणारे' नेते आवडतात. काहीतरी म्हणजे नक्की काय, असा प्रश्न विचारला असता, ठाम आणि ठोस आवाजात 'काहीतरी करायला हवंच, अजिबात काही न करण्याहून ते उत्तम' अशा प्रकारचं अत्यंत गोलाकार आणि ठणठणीत निरुपयोगी संतापजनक उत्तर ते देतात.

लग्न करून मूल आणल्यामुळे किंवा एक जोडीदार कमावल्यामुळे आणि तो येनकेनप्रकारेण राखल्यामुळे जगातल्या सगळ्याच गोष्टींचं गुह्य आपल्याला समजलेलं आहे अशीही त्यांची खातरी असते. किंबहुना त्यांच्या अक्षय आत्मविश्वासाचा उगमच या तथाकथित ज्ञानातून होत असतो. त्यांच्या लिंगाचा त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वामध्ये महत्त्वाचा वाटा असतो. आपल्या लिंगाच्या सेंट-परसेंट शुद्धतेची (परस्पर्श नाही अशा अर्थीही आणि परफेक्शन अशा अर्थीही) सिद्धता जितक्या वेळा देता येईल, तितक्या वेळा देत राहणं हाही त्यांच्या एकूण आयुष्याचा एक कम्पल्सरी भाग असतो. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जगातल्या कोणत्याही माणसाला - आणि त्यातही माझ्यासारख्या माणूसघाण्या, परंपराद्वेषी, फाटक्या तोंडाच्या, बाईची इंद्रियं असूनही मासिकपाळीसाठी सॅनिटरी नॅपकिन्स हवेत म्हणून केमिस्टच्या आणि स्त्रीत्वाला ब्रेसियर कंपलसरी म्हणून अंतर्वस्त्रांच्या दुकानाला आश्रय याखेरीज त्या इंद्रियांचा कोणताही दृश्य उपयोग न करणार्या, बाई या नामाभिधाला लांछन ठरणार्‍या माणसाला - यच्चयावत गोष्टींबद्दल अधिकारवाणीने ज्ञान देण्याचा कायमचा अधिकार त्यांना प्राप्त झालेला असतो.

ते घरी आल्यावर कधीही नीट माणसासारखे दिवाणखान्यात तंगड्या पसरून बसत नाहीत. (चाणाक्ष वाचकांच्या लक्ष्यात आलं असेलच, की हे पुरुषांना गैरलागू. ते ही सोडून इतर कुठल्याच पोझिशनमध्ये बसू शकत नाहीत.) त्यांना लगबगीने स्वैपाकघरात जाऊन मदत करायची असते. माझ्या स्वैपाकघरात मी काम करत असताना कुणीही मधे लुडबुडलेलं मला - होय, कुणीही म्हणजे कुणीही. उद्या साक्षात बेनेडिक्ट कम्बरब्याच आला, तरी मी त्याला बाहेर बसवून त्याच्या त्या चांदीच्या सुरईतून मध ओतल्यासारख्या आवाजात मोठ्याने गप्पा मारायला फर्मावीन आणि मी माझं काम एकटीनंच नीट करत ओरडून गप्पांना पिना मारीन आणि कर्णसुख लुटीन. असो. तर माझ्या स्वैपाकघरात इतर कुणी लुडबुडलेलं - चालत नसल्यामुळे मला या सवयीचा सुरुवातीला प्रचंडच ताप होत असे. पण हळूहळू मी त्यावर विजय मिळवला. आपण स्वतःच बाहेरच्या खोलीत पंख्याखाली निवांत पसरायचं आणि त्यांच्या स्त्रीत्वनिर्देशक तथाकथिक मोहक आणि सराईत हालचालींकडे दुर्लक्ष्य करत गप्पा मारायच्या. स्वैपाकात वेळोवेळी लागणार्‍या - मीठ, साखर, दाण्याचं कूट, कॉफी, वेलची, आलं इत्यादी - गोष्टी आधीच नीट लपवून ठेवायच्या. त्या त्यांना न मिळाल्यामुळे त्या काही वेळातच नामोहरम होतात. येताक्षणी स्वैपाकघरात शिरून 'ताबा' घेण्याची त्यांची प्रवृत्ती निदान आपल्या बाबतीत तरी यथावकाश विझते. दिसलं-स्वैपाकघर-ताबा-घे या त्यांच्या गंडाकडे एक प्रकारची मनोरंजक आणि काही प्रमाणात उपयुक्त सवय म्हणून पाहिल्यास फायदा होतो. (मजा म्हणजे हे पुरुषांनाही लागू पडतं. आपण बाहेरच ठिय्या देऊन बसायचं. शक्य तर अर्धोन्लोळित अवस्थाच घ्यायची. चहाची कितीही तल्लफ आली तरी कान म्हणून हलवायचा नाही. यानं यांच्यातली पुरुषमंडळी नरमतात.) पण एकुणात तो संयमपरीक्षेचा प्रकार आहे, यात काडीमात्र शंका नाही.

शक्यतोवर यांच्यासोबत कुठेही प्रवासाला जाऊ नये. कारण प्रवासाला गेल्यावर त्यांना वेळ आणि पैसे वसूल करण्यात मोठा रस असतो. त्यातून शक्ती उरली तर ती त्यांच्या जोडीदाराच्या आणि मुलाच्या खाण्यापिण्याच्या आणि खरेदीच्या गरजा भागवण्यात तिचा मोठा भाग संपतो. आणि खेरीज जी शक्ती उरते, त्यात उर्वरित घरगुती गॉसिपं, राजकारणाबद्दलच्या त्यांच्या थोर समजुतींतून मारलेले ठाम शेरे आणि सेल्फ्या हे सगळं बसवायचं असल्यामुळे दस्तुरखुद्द त्यांना मजा करायला वेळच नसतो. त्यात माझीही मजा चिरडली जातेय याचं त्यांना भानही नसतं. हेही ठीकच आहे. पण त्यांची मजा म्हणजेच यच्चयावत दुनियेने मजा करण्याची आदर्श पद्धती या त्यांच्या ठाम समजामुळे आणि तो लादण्याच्या आत्मविश्वासामुळे माझ्या चिडचिडीला पारावार उरत नाही. असो. यावर तसा कोणताही निवारक उपाय नाही. असे प्रवास टाळणे हाच एक उत्तम उपाय आहे.

यांना तथाकथित व्यभिचारी स्त्रियांबद्दल एक प्रकारचा छुपा राग असतो असंही माझं निरीक्षण मला सांगतं. (बाकीच्या तपशिलांप्रमाणे हेही लिंगसापेक्ष आहेच. पण यांच्या मते पुरुष कधी व्यभिचारी नसतातच.) पण स्त्रीवादानं अलीकडच्या काही दशकांत हातपाय पसरल्यामुळे त्यांची पंचाईत होते आणि त्यांच्यातल्या बायका हल्ली वरवर अशा खुल्या लफडेबाज स्त्रियांचं समर्थन करतात. (त्या बायकांबद्दलचा यांचा राग आणि माझ्याबद्दलचा यांचा राग यांची जातकुळी एकच आहे, हेही माझं निरीक्षण आहे. पण त्याच्या कारणांमध्ये आपण तूर्तास शिरायला नको.) रात्री उशिरा बाहेर राहून आणि तोकडे कपडे घालून मूर्खासारखा बलात्कार करून घेणार्‍या बायकांचाही त्यांना थोडा रागच येतो. बलात्कार्‍याचे लिंग कापावे वगैरे मजेदार्क्रूर सूचना करून ते हा राग समाजमान्य ठिकाणी काढायचा प्रयत्न यथाशक्ती करत असतात. (पुरुषांची स्ट्रॅटेजी थोडी वेगळी असते. 'काळजी वाटते' हे त्यांचं पेटण्ट वाक्य असतं.)

या प्रकारच्या लोकांना माझी भीतीही वाटते आणि माझा एक विशिष्ट तिरस्कारही वाटतो असं माझ्या लक्ष्यात आलेलं आहे. त्यांना माझा आधारही वाटतो, हेही एक चमत्कारिक निरीक्षण. जेव्हा परंपरा धुडकावून आणि लोकांची तमा न बाळगणारे निर्णय घ्यायचे असतात आणि त्यात त्यांना पाठिंबा आणि मदत हवी असते, तेव्हा माझी त्यांना आवश्यकता भासते. पण जेव्हा मी काहीतरी व्यवस्थाविरोधी बोलत असते; चाकोरीच्या बाहेरचं पण त्यांच्या सुखवस्तू अवस्थेच्या अंगलट येऊ शकेलसं आणि आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारं मत मांडत असते; किंवा सरळसरळ त्यांच्या आत्मतृप्तीला कोणत्याही प्रकारे असुरक्षित वाटेल असं काही करत असते, तेव्हा मात्र मी जगातलं सर्वांत विध्वंसक चेटूक करणारी हडळ असते आणि खरंतर मला जाहीरपणे दगडांनी ठेचून मारलं पाहिजे, तेव्हा पार्श्वभूमीला वाद्यांचा गजर होत असला पाहिजे आणि सगळ्या टोळीने क्रूर आनंदी चीत्कार काढले पाहिजेत अशी त्यांची मनोमन खातरीच पटलेली असते; पण तथाकथित आधुनिक नागरी समाजात राहत असल्यामुळे त्यांना दुर्दैवाने तसं करता येत नाही, शिवाय या इच्छा आणि ठाम खातर्‍या बोलूनही दाखवता येत नाहीत, त्यामुळे त्यांची थोडी पंचाईत होते.

राजकारण म्हणजे फक्त मोदी किंवा केजरीवाल किंवा ट्रम्प नव्हे. हे जे काही सूक्ष्मातिसूक्ष्म, तुमच्या बहुतेकदा लक्ष्यातही न येणारं, तरीही सराईतपणे आणि एका विशिष्ट पॅटर्नला अनुसरून तुमच्याकडून स-त-त घडणारं जे आहे; ते राजकारण आहे, हे या लोकांना एकदाच नीट समजावून सांगावं अशी माझी तीव्र इच्छा असते. सध्याच्या ज्वालाग्राही दिवसांत तर फारच. मैत्र्या आणि राजकारण एकत्र आणू नका, रात्री बेरात्री मित्र मदतीला येतात मोदी नाही, असं म्हणण्याची जी चाल सांप्रतकाळी प्रचारात आहे; तिच्या पार्श्वभूमीवर हे ज्ञान पसरवण्याची नितांत गरज आहे.


Saturday 15 October 2016

मला प्रवास आवडत नाहीत

मला प्रवास आवडत नाहीत. 
मुक्कामी गावाच्या स्वभावापासून ते सहप्रवाशांच्या अकलेपर्यंत सगळंच, गाड्यांचे गोंधळ असताना तासाभरानं आलेल्या लोकलच्या दिशेनं सूर मारावा तसं. डेरिंगबाज, पण यश अनिश्चित. अनेक प्रवास माझ्या झोळीत चरफडीखेरीज आणि आगामी जहरी पूर्वग्रहांखेरीज काहीही बांधून देत नाहीत. अशी आठ्याळ कुंकवं लावून अनेक जागांवर मी कायमची फुली मारली आहे.
पण कोणत्याही थोर नियमाला असावेत, तसे अपवाद याही नियमाला आहेतच. क्वचित कधीतरी ते फळाला येतात.


***
अशीच पुण्यातली एक फेरी. कंटाळा आला, म्हणून उठून वीकान्ताला पुणं गाठलेलं. कुठेही निरुद्देश भटकलो. लाटणी, कानातली, चिंचा, बड्ड्या… असल्या काहीही रॅन्डम चिरकूट खरेद्या केल्या. कुठली-कुठली ऐन गर्दीतली धूळभरली देवळं बघून त्यांच्या गारव्याला टेकलो. पुस्तकांची दुकानं ढुंडाळली. ’गोट्या’, ’चिंगी’ आणि ’खडकावरला अंकुर’ मिळतात का बघू, म्हणून कुठल्या-कुठल्या गल्लीबोळांतून घरंगळत एका दुकानाशी पोचलो.
गृहस्थ मिशाळ, शिडशिडीत आणि उग्र होते. त्यांनी एका डुगडुगत्या स्टुलावर चढून वरच्या कप्प्यातली बरोब्बर पाच पुस्तकं खेचून खाडकन काउंटरवर आपटली. धुळीचा एक खकाणा उडाला. पण हे निर्विकार. सहजी न मिळणारी पुस्तकं हाती आल्यामुळे मी एकूण जुगार जिंकल्याच्या आनंदात. पैसे देऊन निघावं ना? पण जुगार्‍याचा मोह. मोह. त्यांच्या दुकानाची एकूण धुळकटावस्था आणि प्रचंड इंट्रेष्टिंग पुस्तकांच्या जुन्यापान्या आवृत्त्या बघून माझा पाय निघेचना. ते मिशा फेंदारून माझ्याकडे प्रश्नार्थक बघत उभे.
मला काय किडा चावला कुणास ठाऊक, बरेच महिने ज्याचा निष्फळ शोध घेतला, ते कुंडलकराचं “’छोट्याश्या सुट्टीत’ आहे का हो?” असा खडा मारला फेकून.
पूर्ण पाच सेकंद माझ्याकडे टक लावून काका उत्तरले, “आहे. पण ’झ्येरॉक्स’ आहे. चालेल?”
आहे? आहे? आहे?
मी त्यांच्याकडे भूत पाहिल्यासारखं भयचकित नजरेनं पाहिलं असणार. कारण ते किंचित हसल्याचा भास झाला. मग सावरून त्यांना म्हटलं, “चालेल, चालेल. द्या.”
ब्राउन पेपरमध्ये गुंडाळलेलं आणि वरून सेलोटेपा लावून नीट प्याक केलेलं ते पुडकं माझ्या हातात आलं. त्याचे पैसे किती विचारलं, तर म्हणाले, “बावन्न रुपये पन्नास पैसे.”
पन्नास सुट्टे पैसे दिले नसते, तर पुस्तक निर्दयपणे माझ्या हातातून काढून घेऊन त्यांनी वर फळीवर ठेवलं असतं याची मला खातरीच होती. त्यामुळे गपचूप पाकीट उलटंपालटं करून पन्नास रुपये आणि अडीच रुपये टेकवले. मी नशिबावर इतकी चकित होते, की पद्मजाचं ’गर्भश्रीमंतीचं झाड’ आहे का ते विचारायचं मला सुचलंच नाही. मी बहुतेक तरंगतच घरपर्यंत आले असणार.
परत पुण्यात इतक्या वार्‍या झाल्या, पण इतकी चमकदार पुस्तकखरेदी झाल्याची आठवण गाठीला नाही. त्या फेरीचा मुहूर्तच साडेतीनांपैकी एखादा असणार.


***
परदेशातली वारी. महिनोन्‍ महिने आधीपासून नेटानं बुकिंगं केलेली. पॅरीसमधून रात्री निघून सकाळी झ्युरिकला पोचायचं होतं. तेवढाच एक बसचा प्रवास. पण पॅरीसच्या गाडीतळापासूनच नरपटी लागायला सुरुवात.
आपल्या बिचार्‍या यष्ट्यांचे तळही बरे म्हणावेत, असं एक तीन बाजूंनी उंचवटा असलेलं उखीर-वाखीर मैदान. उगाच एखाद-दोन झाडं, थोडा कचरा, बरीच माणसं. तिथे मातीतच बरासा उंचवटा नाहीतर सामानच वापरून टेकलेली. ऑफीसच्या खोपटाला टाळं. रागरंग बघून भिवया कपाळात गेल्या. पण ’बघू तर.’ असं म्हणून थांबलो. बस आल्यावर तिचा किन्नर इंग्रजीतल्या प्रश्नावर नळ सुटल्यासारखं जर्मनमधून बदाबदा उत्तरला, आणि एकदम ’हुर्रे!’ झालं. तीन दिवस पॅरीसकरांनी करायला लावलेल्या ’डम शराज’चा (मी हाच उच्चार लिहिणारे. वाचणार्‍यांनी आपल्याला हवा तो वाचून घ्यावा.) शीण खाडकन उतरला. एकदम साक्षर-सुशिक्षित-नागरी वाटायला लागलं. त्यानं सैलावत गाडीत बसलो. एका ठिकाणी बस बदलायची होती, रात्री तीन वाजता. त्या तयारीत मोबाईलचे गजर लावून गप्पा ठोकत बसलो. ’डायवर फुलॉन जर्मन फाडतोय, पण आपल्याला च्यायला येतेच्चे भाषा, आता बोला ना, आता बोला!’ असल्या पोरकट आनंदात चूर.
अकराच्या सुमारास पहिला स्टॉप आला आणि आमची तंतरली. एक्स्प्रेस हायवेवरून तळेगावजवळ जो टोलनाका लागतो, त्याच्या अलीकडे शुक्रवारी रात्री जास्त गर्दी असते; असला सुनसान स्टॉप. ऐन हायवेवर. ना कसलं ऑफीस आजूबाजूला, ना धड दिवे. बसमधून उतरणारा बाबा पाठीवर सामान लावून झपझप कुठेसा निघूनही गेला. आम्ही इकडे गॅसवर.
आता तीन वाजता जिथे उतरायचं आहे, तिथे तरी कुणी हरीचा लाल असणारेय का, असला जेन्विन प्रश्न पडला. डायवरला विचारलं, तर त्यानं खांदे उडवले. ’काय की बॉ! आत्ता कुठलं ऑफीस उघडं असायला? बसायला जागा असेल. बहुतेक.’ हे उत्तर. तशा आम्ही चौघी होतो एकत्र. त्यामुळे टेन्शनला चारानं भागायला हरकत नव्हती. पण तरी ’श्ट्रासबुर्गला न उतरता म्युन्शनला जाऊ या का सरळ? मग तिकडून जाऊ झ्युरिकला.’ असा बूट निघाल्यावर त्यावर फार भवति न भवति होता तीनेक मिनिटांतच एकमत व्हायला आलं, यावरून एकूण रागरंगाचं त्रैराशिक मांडायला हरकत नाही. तरी आखलेले बेत इतक्या सहजी बदलायची तयारी होईना माझी. झ्युरिकहून पुढच्या ट्रेनचं तिकीट हातात होतं, तेही फुकट गेलं असतं. किती उधळी नि खर्चीक झाले मी, तरी युरोमधून खर्च जरा जास्तच उधळखोर वाटायला लागला. शेवटी एकदा थांब्याचा अंदाज घेऊ नि आयत्या वेळी ठरवू अशी घोषणा करून मी चक्क झोपून गेले.
बरोब्बर तीन वाजता - श्ट्रासबुर्ग.
उठून बाहेर डोकावून पाहिलं, तर बंगळूरच्या स्थानिक बसतळावर आहे तशी रचना असलेले बसथांबे. दिवे-बिवे होते. पण चिटपाखरू नाही. सुनसान. या बाजूला पाहिलं, तर चक्क एकुलती बाई स्टॉपवर.
तिला बघून आम्ही आपापसात चकार चर्चा न करता एकदम उतरलोच. मजा म्हणजे आमच्यातल्या कुणीतरी डायवरला विचारलं एकदा, इथे सेफ आहे ना बाबा, तर त्यावरही त्या बाबानं नजर चुकवत खांदे उडवले!
नि तरी आम्ही ’मरू देत तिच्यायला!’ म्हणून उतरलो. बस निघून गेली, पुढची बस पावणेपाचाला येईलसं सांगून.
आम्ही पाच जणीच तिथे त्या मैलभर परिसरात. मिनिटभर लागलं असेल सेटल व्हायला. सगळ्यांना बसायला जागा नव्हतीच. चक्क ’लोकसत्ते’ची थोडी पानं पसरली आणि आम्हीही पसरलो मग. नावंगावं विचारली आम्ही, आणि तोवर पळायच्या तयारीत असल्यासारखी जय्यत बसलेली ती मुलगी सैलावलीच एकदम.
ती खरीच पळायच्या तयारीत होती, हे पुढच्या दोन तासांत कळलं. ती होती दक्षिण अमेरिकेतली, पेरूची. त्याच बस कंपनीनं घोळ घातल्यामुळे रात्री ११ वाजल्यापासून तिथे एकटीच बसलेली होती. तिला पुढची बस मिळायची होती सकाळी ८ वाजता. ना कंपनीचं ऑफीस. ना वायफाय. ना इंग्रजी बोलणारं कुणी फोनवर उपलब्ध. चिडचिड आणि हताशा आणि स्वीकार. मधून-मधून एक बाप्या समोरून सायकलवरून चक्कर मारून जात होता, म्हणून बारा-साडेबाराला तिनं पायातल्या उंच टाचांच्या चपला बदलून धावायचे बूट चढवले होते. सामान आवरून हाताशी ठेवलं होतं नि त्याला खुन्नस देत तिथे बसून होती. ’आता काही अजून निभणार नाही, झोप - थकवा - दडपण अती होतंय’ अशा टप्प्यावर आमची बस येऊन त्यातून चार बायका उतरल्यामुळे ती एकदम सैलावणे अधिक उत्तेजित होणे अशा अवस्थेला आली होती.
नंतरच्या गप्पांना खरोखरच तोड नाही. ’आता कुणी मवाली फिरकला तर आम्ही काय डरत नाही’छाप वल्गना; तिचं पर्यावरण परिषदेमधलं काम; माणसांकडे किती वर्षं शिल्लक आहेत त्याचे हिशेब; युरोपियन लोक स्वतःला प्रगत म्हणवतात, पण किती तुसडे असतात; त्याहून आपण आशियाई आणि दक्षिण अमेरिकी कसे कुटुंबवत्सल; आम्हांला जर्मन येत असल्याबद्दलचं कुतूहल आणि उगाच-कौतुक; मेथीच्या ठेपल्यांची पाककृती; भारतात आणि पेरूमध्ये येण्याची आमंत्रणं आणि घेण्याची काळजी; प्रवास करत राहण्याचे बेत आणि भेटायचे वादे; मेलायडींची देवाणघेवाण… बस आल्यावरही पाय निघेना. मग त्या डायवरला थांबवून चक्क मिठ्या आणि सेल्फी!
आल्यावर तिला लिहायचं पत्र अनेकदा खोडलं. कितीतरी दिवस ड्राफ्ट पडून आहे. अजुनी तिचा पत्ता आहे जपून ठेवलेला. फोटोही. पण काय लिहू, म्हणजे आम्ही आपापसांत वाटून घेतलेला बाईपणाचा दिलासा तिला सांगता येईल, ते काही कळत नाही.


***
एका शिबिराला म्हणून माणगावला गेलो होतो. माणगावच्या यष्टी ष्ट्यांडातून पुढली बस मिळायची होती. पण माणसं जमा होईस्तो बस येईल असा रागरंग दिसेना. सकाळी आठ-साडेआठाची भूकप्रधान वेळ. आम्ही एस्टी कॅन्टीन गाठलं. सगळं निवांत होतं. हवेतली गुलाबी थंडी भोगत पोर्‍या आणि गल्ल्यावरचा शेट दोघेच गप्पा छाटत बसलेले.
एस्टी कॅन्टीनमधली पुरीभाजी मला मनापासून आवडते. स्वच्छतेचे नखरे मिटून ठेवले, तर ती चमचमीत भाजी आणि त्यावर पेश्शल फर्माईश म्हणून ओतलेली मिसळीची तर्री काहीच्या काही वेऽड लागते. फक्त पुर्‍या गरम हव्यात.
“मिळेल पुरीभाजी?” आशेनं विचारलं.
“टाकतो की. थोडा वेळ लागेल पण.”
आम्ही बसलो. साताठ मिनिटांतच बाहेर हलचल. बस आलीशी वाटली. ’झालंच!’ असा अजिजीचा कटाक्ष टाकत पोरगं पुर्‍या तळतच होतं. पाचेक मिनिटं कसंबसं थांबलो, पण एक बस गेली असती तर अजून खोळंबा झाला असता. म्हणून दोन प्लेटांचे पैसे चुकवून बस गाठली.
’नव्हतं सालं पुर्‍यांवरती नाव आपलं’ म्हणून हळहळत मी खिडकी पकडली. बस सुटता सुटता आतून तीरासारखं ते कॅन्टीनमधलं पोरगं आलं. एका नजरेत मला हेरून, खिडकीतून माझ्या हातात पुरी-भाजीचं गरम पुडकं कोंबलं आणि मी आश्चर्यातून बाहेर येऊन थॅन्क्यू म्हणायच्या आत हसून अंतर्धान पावलंही. बस सुटली. ते पुडकं पिशवीत टाकून आम्ही पुन्हा गप्पांमध्ये. मग स्टॉप हुकला, आम्ही चुकलो, बरंच चालावं लागलं, थोडा कार्यक्रमही चुकला. हे प्रकरण डोक्यातून गेलंच.
शिबिरात जेवणाची व्यवस्था होती. पण स्वैपाकाचे अंदाज चुकले आणि बरेच जणांनी समजूतदारपणे जवळचे चिवडे-बिस्किटं काढली, तेव्हा एकदम हे पाकीट आठवलं.
वाफ धरल्यामुळे गोळा झालेली भाजी नि त्या मऊ पुर्‍या. आईनं बांधून दिलेला डबा खातानाही आले नसतील, इतके मला कृतज्ञतेचे झटकेच्या झटके आले खाताना. वेऽडच.


***
रायगडाच्या पायर्‍या फाफूं करत चढत असताना भाऊ आणि वहिनीनं आत्यांना दिलेली गोड बातमी - नि मग गड कसा सर झाला ते आठवणीतून पार गायब.
गावात पोचायला रात्रीचे दोन वाजले म्हणताना, ’कशा गं एकट्या फिरता तुम्ही?’ म्हणत झापणारा नि मग कुणीतरी आणायला आलेलं दिसेस्तो बस थांबवणारा कंडक्टर.
काठ्या नि दोर्‍यांचा जुगाड करून हे‍ऽऽ एवढाले साबणाचे फुगे हवेवर सोडत बसलेल्या एका जर्मन पोराकडून घासाघीस करून खरेदी केलेल्या वेताच्या काठ्या!
विमानाला उशीर झाला तेव्हा तिथेच लाउंजमध्ये लागलेला ’मैंने प्यार किया’ बघून खिंकाळण्यात इतकी धमाल यायला लागलेली, की ‘कहे तोसे सजना’ लागलं आणि विमान आल्याची घोषणा झाली, म्हणून प्राणांतिक हळहळ…
नि तरी मला प्रवास नाहीच आवडत, म्हणजे माझा किती छळवाद झाला असेल… 
त्याबद्दल परत केव्हातरी.

***
हे या पोस्टमधून राहून गेलेलं शेपूट.

Monday 3 October 2016

हेही दिवस सरतात

कविता म्हणजे काय करतो आपण? 
आता कवितेनं पाठ फिरवल्यावर सोडवायचे हे प्रश्न. उन्हाळ्याच्या सुट्टीत पाढे लिहिल्यासारखे.
पण पाढे मला तितके काही नावडत नाहीत, नाहीतच. दाहोदरसे, तिहोत्रीदोन, चाळासे, त्रेसड्डासे… वगैरे प्रकरणं तेव्हा न समजता पाठ करून टाकली; तरी चिंचेबरोबर उगाच जिभेवर खडेमिठाचा धारदार खडा घोळवत राहावा आणि जीभ चरचरली तरी मजेशीरच वाटत राहावं, तशी त्यातली गंमत मला अजूनही आवडते. समोरचा माणूस कॅल्सी हुडकेस्तोवर आपण आकडा सांगूनही टाकतो. मग तो आपल्याला चक्क भ्यायला लागला आहे, हे लक्ष्यात येतं आणि तरी आपण निर्विकारपणाचं बेमालूम सोंग काढतो; तेव्हा मला अजूनच मजा येते.
होय, थोडी दुष्ट आहे खरी मी. असो. तर - कविता म्हणजे काय करतो आपण?
या प्रश्नाची उत्तरं कवीगणिक निरनिराळी (आणि कवित्वाच्या निरनिराळ्या तरतमपातळ्यांवरची) असणार आहेत हे कबूल करून टाकलं, तरीही आपली निराळी उत्तरं उरतातच. ती तरी कधी परजायची? तर आत्ताच. उन्हाळ्याच्या दिवसांत.
लोकांना म्हणे आनंद अनावर झाल्यावर कविता होते. मला असं काही झाल्याची आठवण नाही. आनंद झाल्यावर कामाधामाला दांड्या मारून मनसोक्त लोळावं, पुस्तकं नाहीतर स्टेशनरीच्या उधळखोर खरेद्या कराव्यात, काही रांधावं, काही खावं-प्यावं, सिनेमे पाहावेत - असल्या साध्यासरळ ब्याकबेंचर सवयी. आनंदाच्या प्रसंगी कवितेची आठवण होत नाही.
ती होते एकान्तात. प्रवास नामक गोष्टीच्या नावाखाली प्रवासाची निव्वळ लॉजिस्टिकं सोडवता सोडवता क्वचित कधीतरी मनाजोगती खिडकी मिळून जाते आणि खिडकीतून बाहेरच्या पळत्या रस्त्याकडे तंद्री लागते. मग शब्दांच्या माळकाच्या माळका डोक्यात फटाक्यांच्या लडींसारख्या एकामागून एक पेटत राहतात. कितीतरी पत्रं मी अशाच प्रवासात हवेवर लिहून काढली आहेत. मग पुढे त्यांचं पेपरवर्क तेवढं उरतं. अशाच वेळी कविता डोक्यात झुरमुरत राहतात. तशीच दुसरी वेळ म्हणजे - चहूबाजूंनी घेरून आल्यासारखं होतं, तेव्हाची. काही केल्या कशावरच वा कुणावरच रेलता म्हणून येत नाही आणि सगळं अनावर साचत जातं डोक्यात - तेव्हा कविता येते. आपल्याच सोबतीला आपणच जन्माला यावं, तशी माळावरच्या बाभळीसारखी वेडीवाकडी बेबंद उगवत जाते. शब्द भले की बुरे, जमलेले की न जमलेले, समकालीन की जडावलेले… या सगळ्यांचे हिशेब नंतर होत राहतात. पण त्या त्या वेळी कविता एक हक्काचं, जन्मजात, दिलखुश राजेपण बहाल करते. या इथे - इथे माझी सत्ता आहे, इथे मला टेकायला जागा आही. इथून मला कुणी ऊठ म्हणणार नाही - अशी, ध्रुवबाळाच्या जातीची, निरंतर आश्वस्तता कविता देऊन जाते; तेव्हा मी रिकाम्या भरधाव ट्रेनच्या दारात उभी असते आणि पुढे क्षितिजापार पसरत जाणार्‍या रुळांवरही माझंच राज्य असतं.
अधूनमधून सध्यासारखे न संपणारे उन्हाळेही येतात. अशा वेळी छापलेल्या कविता नकोनकोश्या होतात. त्यांना कोर्‍या कापडाचा, काहीसा परका वास असतो. कितीही देखण्या, नव्हाळीच्या, जिवंत असल्या; तरीही त्यांच्यात एक समारंभी तोरा असतो. आपल्याला शरमिंदं, अपुरं वाटायला लावणारा पूर्णत्वाचा रुबाब असतो. तो तोराही सोसेनासा होतो, असे हळवे दिवस. अशा वेळी मित्रांपाशी कविता उधार मागाव्यात. वापरून विटक्या, मऊ झालेल्या, धुऊन सुरकुतल्यावरही अंगचा वास ल्यालेल्या सुती कुडत्यासारख्या, त्या आपले लागेबांधे घेऊन येतात, आपल्यालाही देऊ करतात, उन्हाळे बघता बघता निभावून नेतात.
कधी हवेत निव्वळ वादंग आणि कडू आरोपप्रत्यारोप उरतात. अशा वेळी कवितांनी पाठ फिरवलेली असते. पण मी आता अनुभवानं शिकले आहे, की हेही दिवस सरतात. आपण नेटानं शब्दाला शब्द जोडत, किडूक मिडूक साठवत, रोजचे केरवारे नेटानं करत, कालच्या दिवसाला आजचा दिवस जोडत राहायचं असतं. त्या जोडकामाच्या चिकाटीतच कवितांच्या बिया सांडत-रुजत असतात़ कुठे कुठे. उद्या आपण नसलो, तरी त्यातल्याच एखाद्या कवितेचं झाड उगवणार असतं. उगवतंच.
त्यालाच तर कविता म्हणतो ना आपण?

Thursday 22 September 2016

इतक्यात वाचलेली पुस्तकं ०१

आणि मग एक दिवस...

(जालावरून साभार)
पुस्तक रंजक आहे, यात शंका नाही. त्याचं सगळं श्रेय नसीरच्या दिलखुलास निवेदनाला आणि धारदार विनोदबुद्धीला. पण त्यातून त्याच्या अभिनयपद्धतीबद्दल काही महत्त्वाचं वाचायला मिळेल, असं म्हणता? सॉरी! 

बहुतांश नटांनी नोंदलेली नटाची लक्षणं नसीरनंही नोंदली आहेत - कमालीचा नार्सिसिझम, असुरक्षितता, ध्यास. त्याच्या वडिलांसोबतचं त्याचं गुंतागुंतीचं नातं; जसपाल या जिवलग मित्रासोबतचं दुधारी नातं; अवघ्या एकोणिसाव्या वर्षी एका पस्तिशीच्या स्त्रीशी केलेला विवाह आणि लगोलग मिळालेलं, न पेलवणारं पितृत्व; ग्रॉटोव्हस्कीच्या कार्यशाळेत झालेला अपेक्षाभंग; रत्नासोबतचं प्रेम; नंतरचं सुखी-समाधानी आयुष्य... याबद्दल नसीरनं विस्तारानं लिहिलं आहे. त्याच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्याला यशानं दिलेल्या हुलकावण्या, सततचा एकटेपणा आणि जगानं नाकारलेलं असणं - हे कोणत्याही नटाच्या आत्मवृत्तात भेटावं असं. हे सगळंच अतिशय रसाळ भाषेत आणि मोकळेपणानं, प्रामाणिकपणानं नोंदलेलं आहे. त्याची तेजतर्रार विनोदबुद्धी पानापानांतून भेटते आणि आपण मनमुराद हसतो.

पण माझं इतक्यावर भागेना. मला मराठीतल्या नटांच्या चोख लेखनाची सवय. लागूंचं ’लमाण’ काय, विजयाबाईंचं ’झिम्मा’ काय, प्रभावळकरांचं ’एका खेळियाने’ काय... फक्त आणि फक्त कामाबद्दलच बोलीन, अशी शपथ वाहिल्यासारखी ही सगळी आत्मवृत्तं. अभिनय, दिग्दर्शन आणि आपलं कार्यक्षेत्रं - यावर काहीएक भाष्य गांभीर्यानं करणारी. त्या जातीचं फारसं काही मला या पुस्तकात मिळालं नाही. मुळात एखादी भूमिका सही-सही वठवणं आणि ती वठवण्याच्या प्रक्रियेबद्दल नेमकेपणानं सांगणं, या दोन निराळ्या गोष्टी आहेत, हे मी अखेर मान्य केलं. जवळजवळ तीनेकशे पानं वाचूनही, मला सतत आठवण येत होती, ती ’साप्ताहिक सकाळ’च्या सदा डुम्बरे-कालीन दिवाळी अंकात माधव वझेंनी घेतलेल्या नसीरच्या मुलाखतीची. ती कितीतरी स्पष्ट, ओघवती आणि तरीही नेमकी होती. मामुली संपादन केलेलं असूनही.

संपादनाचा विषय निघालाच आहे, तर होऊन जाऊ द्या. हे ’पॉप्युलर’ प्रकाशनानं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. ’पॉप्युलर’ हे काहीएक परंपरा असलेलं प्रकाशन आहे, असं म्हणायला हरकत नसावी. पण अनुवाद कसा होतो यावर आपला अंकुश नसेल एक वेळ (नसीरनं सई परांजपेंच्याच नावाचा आग्रह धरला असल्याचा उल्लेख प्रस्तावनेत आहे.), त्यावर संपादनाचा हात फिरवला जायला नको? एखादा शब्द घाईघाईनं खोडावा आणि मग त्यावर काहीही लिहिलं तरी मूळ शब्द अचूक वाचता येऊन रसभंग होत राहावा, तसं अनेक अनुवादित वाक्यं वाचताना होत राहतं. नको तिथे मूळचे परभाषिक शब्द तस्सेच ठेवणं (इन्स्टिट्यूट) आणि नको तिथे संकल्पनांना मराठी अवतार देणं (एकलगीत? ओह, यू मीन सोलो!) सतत दाताखाली येत राहतं. हेही एक वेळ ठीक. पण पुस्तकात चक्क प्रमाणलेखनाच्या चुका सापडाव्यात? ‌‌र्‌हस्व-दीर्घाच्या अगणित चुका, एकजात सगळी शब्दयोगी अव्ययं शब्दांपासून फटकून, बोली भाषेचा हास्यास्पद आग्रह धरताना भलतीकडे पडलेले शिरोबिंदू, ’संयुक्तिक’सारख्या अनेक शब्दांचं चुकीचं लेखन, आणि चक्क काही ठिकाणी राहून गेलेले जादाचे काने? ही हलगर्जीपणाची हद्द आहे.

हरून ऍन्ड द सी ऑफ स्टोरीज्‍



सलमान रश्दींच्या बाकीच्या वादग्रस्ततेशी माझं फार देणंघेणं नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मागणीशी अर्थातच सहमती आहे. पण आतडं असं नाही. हे पुस्तक वाचून सलमान रश्दी माझ्यासाठी एकाएकी त्रिमित झाले. बाकी पुस्तकाच्या चमत्कृतीपूर्ण आणि प्रचंड मजेशीर नि अतिकल्पक गोष्टीबद्दल हवं तितकं लिहिता येईल. पण इथे काही चमकदार गोष्टी तेवढ्या नोंदून ठेवते.

- ’गप’ (हिंदीतलं गप, मराठीतलं नव्हे!) आणि ’चुप’ (हे मात्र दोन्हीपैकी कुठलंही चालेल!) ही दोन राज्यांची नावं. एकीकडे गप्पा, एकीकडे चुप्पी. एकीकडे उजेड, एकीकडे अंधार. एकीकडे ऊब, एकीकडे थंडी. एकीकडे रंग, एकीकडे काळाकुट्ट रंग. एकीकडे... असो!
- गोपी आणि बाघा ही रेंच्या सिनेमातल्या बडबड्या ठगांची नावं बडबड्या माशांना वापरणं.
- बातचीत-बातमतकरो-बोलो-बेजुबान-माली... असल्या हिंदी अर्थपूर्ण नावांची तितकीच अर्थपूर्ण मोडतोड करून वापरणं.
- ’कथासरित्सागर’ - सी ऑफ स्टोरीज! हा संदर्भ लक्ष्यात आला तेव्हा मला एकदम ’युरेका!’ झालं.
- गोष्टी - गोष्टी, ऍज इन, कथा - त्यांच्याबद्दल काय एकेक थोर मुक्ताफळं.... "जुन्या गोष्टींमधूनच तर नव्या गोष्टी जन्माला येतात!",  "गोष्टीमधल्या जगावर कुणाचंही राज्य चालत नाही.", "त्याला काय झालं, गोष्टीत गोष्टी मिसळल्या तर? अशाच तर नव्या गोष्टी तयार होतात!", "चांगली ठणठणीत गोष्ट असली, म्हणजे मग तिच्यात थोडे फेरफार नि इकडम्‌ तिकडम्‌ केलं तरी तिला ढिम्म फरक पडत नाही! अगदी सहज पचवते ती, करून बघा..."  हे वाचून माझा फॅनफिक्शनी मेंदू किती सुखावला-सैलावला-कौतुकावला असेल, याची कल्पनाच केलेली बरी!
- चांगलं सैन्यासारखं सैन्य (पुस्तकातल्या पानांचं!) आणि समोर ठाकलेलं युद्धासारखं युद्ध! पण सैन्य सेनाप्रमुखाचं निमूट ऐकून हल्ला करील म्हणता? छे! ते सैनिक वाद घालतात, चर्चा करतात, एकमेकांचं म्हणणं खोडून काढतात, सेनाप्रमुखाला प्रश्न विचारून भंडावून सोडतात - सऽऽगळ्यांचं समाधान झाल्यावर मगच काय तो हल्लाबिल्ला करतात! नि सेनाप्रमुख? तो चिडेल? तो बेटा, कधी इकडून तर कधी तिकडून पिना मारत सगळ्या वादंगाची मौज लुटत असतो! आणि अशा प्रकारे बोलभांड राज्य आपल्या गप्पिष्ट सवयींसकट मुक्या राज्याला हरवतं!
- "राजपुत्र मूर्ख आहे खरा आमचा थोडा. पण जाऊ द्या ओ! इथे नाहीतरी मुकुटवाल्या मंडळींच्या हातात ठेवलंय काय आम्ही मोठंसं? द्या टाळी!"

असलं बरंच काय काय, बारीक-बारीक आणि महामार्मिक. भाषेच्या ह्याऽऽऽ एवढाल्ल्या गमती. नादमय संवाद. तिरपागडे वेढे दिलेले हरेक तिसर्‍या शब्दाला. समकालीनत्वाची अत्यंत मजेदार सरमिसळ. मस्ट रीड. रिफ्रेशिंग रीड.



स्टॉप व्हॉट यू आर डूइंग ऍन्ड रीड धिस!

(जालावरून साभार)

नाव जरा हिटलरी आहे, कबूल. पण त्यावर जाऊ नका. अनेक मान्यवर लेखकांनी आपापल्या वाचनानुभवावर लिहिलेले निबंध यात आहेत. त्यात संशोधक-चिकित्सक दृष्टीचे लेख आहेत, तसे निखळ स्मरणरंजनात्मक लेखही आहेत. एकूणच वाचणे या गोष्टीची आपण अनुभवलेली जादू हे लोक मन:पूत सांगताहेत.

माझ्या सध्याच्या विचारचक्राला गती देणारं हे पुस्तक होतं. वाचण्याशी असलेले संबंध तपासून पाहणं पार्श्वभूमीला चालू आहे. अशा वेळी अनेक संदर्भपुस्तकांची नावं मिळणं, काही गोष्टी इतरांच्या अनुभवांशी ताडून पाहता येणं, गोष्ट आणि न-गोष्ट या वाचनातला फरक नोंदताना त्याच्याशी संबंधित विदा मिळणं, काही थेटच पुस्तकं वाचायजोगी-शोधायजोगी हाती लागणं… अशा अनेक प्रकारे. पण त्यातला खरा महत्त्वाचा भाग कोणता असेल, तर माझी तळ्यात्मळ्यातावस्था संपवणारा. वाचन महत्त्वाचं आहे, ते हातचं निसटून जाता कामा नये, ही माझी भावना होती. पण तिला कोणता आधार आहे, असं कुणी विचारलं, तर मी निरुत्तर असे. तंत्रज्ञानातले बदल माध्यमबदलात परिणित होणारच, कालचक्राला थांबवणारे तुम्ही कोण, असा आक्रमक प्रश्न आल्यावर मला काही सुचत नसे. आपण निव्वळ स्मरणरंजन म्हणून तर पुस्तकं हातची जाऊ देत नसू, असा प्रश्न डोक्यात वळवळत राही. त्याला एक ठोस उत्तर मिळालं. मागे एकदा एका मित्राशी बोलताना तो एक अतिशय महत्त्वाचं वाक्य बोलून गेला होता. ’आपल्यासारख्या हावरट लोकांना भावनिक भूकही तीव्र असते. ती भागवणारी माणसं कायम सोबत असणं अशक्यच असतं. काही अंशी भूक माणसं भागवतात. पण उत्तम सिनेमे आणि उत्तम पुस्तकं - म्हणजे फिक्शन हो, नाहीतर काढाल कुरुंदकर बाहेर - ही भूक विस्तारतात, सखोल करतात आणि बहुतांशी भागवतात. उगाच का आपल्याला इतकं सगळं हपापून बघा-वाचावं लागतं?’ त्या वाक्याचा एक लहानसा ढग डोक्यात कुठेतरी ब्याकग्राउंडला तरंगत होता. हे पुस्तक वाचताना कधीतरी तो बरोब्बर डोक्याच्या वर येऊन थांबला. आणि एका नियत क्षणी पाऊस पडून मी भिजले. एरवी ज्या शिस्तीला ’सो व्हॉट?’ म्हणून खांदे उडवून दाखवण्यात धन्यता मानली जाते, ती कामापुरती कबूल करून मी अनेक फिक्शनी पुस्तकं नेटानं पुरी केली. मग कुठल्यातरी टप्प्यावर त्यातला ’नेट’ संपला. मी अल्लाद पुस्तकात शिरले.

हे पुस्तक म्हणतं त्यानुसार - अक्षरं म्हणजे अलीबाबाच्या गुहेचं दार असतं. ज्याला ती डीकोड करता येतात; तो दार ओलांडून पल्याड जातो. नवीन जगात दाखल होतो. ते जग जगतो. अशी अनेक जगं, अनेक आयुष्य जगतो. 

मी मधला बराच काळ पासवर्ड विसरले होते. तो मला आठवला. आठवला म्हणण्यापेक्षा - बरेचदा आपली बोटंच पासवर्ड लक्ष्यात ठेवून असतात. तो जाणिवेत न ठेवता नेणिवेत कुठेतरी नेऊन टाकतात. तो परत वर आणायचा, तर गुहेच्या बाहेर चिकाटीनं रेंगाळावं लागतं. - तसं रेंगाळायला या पुस्तकानं ढकललं. आणि बात बन गई.

Wednesday 17 August 2016

तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

काही गोष्टी जाहीर बोलू नयेत असं आपल्या मनावर लहानपणापासून पद्धतशीरपणे बिंबवण्यात आलेलं असतं. त्यात काहीएक समंजसपणा, जाण असते आयुष्याबद्दलची. काही प्रमाणात प्रस्थापितांचे हितसंबंध असतात. काही थोडी सगळ्यांचीच दीर्घकालीन सोय. एकूण परिणाम असा होतो, की ज्या गोष्टी स्पष्ट आणि स्वच्छ बोलल्या गेल्या पाहिजेत - वेळी जाहीरपणे - बोलल्या गेल्या पाहिजेत - त्याही बोलताना आपण कचरतो. वयसुलभ बंडखोरीतून, अंगभूत उद्धटपणातून, कुतूहलातून, अभिव्यक्तीच्या गरजेतून मी वेळोवेळी या मर्यादेवर मात करत आले आहे. त्याचे परिणाम स्वीकारले आहेत. आज त्याला अपवाद नाही.

एका अंकाचं काम करताना माझे ’ऐसी अक्षरे’ या संस्थळाच्या व्यवस्थापकांशी मतभेद झाले. मतभेदांना ना नाही. पण रास्त अधिकार डावलून मनमानी करण्याला मात्र ना होती, आहे. म्हणून काम पूर्ण करून बाजूला झाले.

आता अनेक प्रकल्पांची पूर्वी हातात घेतलेली कामं समोर तशीच पडलेली पाहून प्रश्न पडताहेत.

संस्था महत्त्वाची की माणसं? फक्त आपला अहं दुखावला गेला, म्हणून तर आपण हे करत नाही आहोत ना? आपल्याला जे काम करायला मनापासून आवडतं, जमतं, सुचतं; ते आपण का थांबवलं आहे? ते निराळ्या ठिकाणी करणं शक्य आहे म्हणून? तसं करण्यात संसाधनांची आणि मानसिक ताकदीची नक्की किती उधळपट्टी होते आहे, होणार आहे, आणि त्यातली किती रास्त समजायची? तुटण्याच्या या सगळ्या प्रक्रियेत आपल्या हातून अदब सुटून माणसांशी दुष्टावा होऊ नये, म्हणून किती जपायचं? अशा वेळी राहतो का आपले आपण तटस्थ मूल्यमापक? राहू शकतो? आपण एका विशिष्ट वर्तुळातून बाजूला झालो, म्हणून वर्तुळं मिटून जात नाहीत, हा जगाचा दस्तूर मानून चाललो आहोत खरे आपण. पण आपली आपल्यालाही लख्ख दिसत असते आपण बजावत असलेली भूमिका. ती सोडून देताना आपला अहं सुखावत असतो हेही खरंच. पण वर्तुळातही काहीएक मूलभूत आणि नकोसे बदल होत असतात. त्याकडे किती काळ नि कशी डोळेझाक करतात? त्या बदलांची किंमत मोजण्याइतका मोठा आहे का आपला अहं? पण क्षमाशीलतेचे आकाशवेधी टप्पे पार करणं आपल्याला अजूनही जमलेलं नाही, आपले रागलोभ - माणूसपण अद्याप रसरशीत जिवंत आहे, या गोष्टीचाही अभिमानच तर बाळगतो ना आपण? ते माणूसपण जपण्याची नाही का मोजावी लागत काही किंमत? कसं ठरवतात त्यात लहानमोठं?

नि अखेरशेवट, काय करतात अशा वेळी?

माझ्याकडे एकच एक उत्तर नाही. अशा प्रश्नांना एकच एक उत्तर असतही नाही. मग मी हे सगळं इथे का मांडते आहे?

वेळोवेळी संगतवार विचार मांडून पाहायचा खेळ खेळून मला दीर्घकालीन उत्तरं मिळाली आहेत. काही गोष्टी दाराआड न ठेवता चव्हाट्यावर आणून ठेवल्या पाहिजेत, होता होईतो शक्य तितकी अदब बाळगून, पण ठेवल्या गेल्याच पाहिजेत, हे मी मानलं आहे. या जाहीर मांडणीमुळे संस्थळाच्या संपादकांनाही काहीएक प्रश्न पडतील, उत्तरं द्यावी लागतील - लोकांना नाही, तर आपली आपल्याला द्यावी लागतील. दुटप्पीपणा टळेल, निवळेल. दीर्घकालीन महत्त्वाचं काही भलं साधण्याची - सांधण्याची शक्यता निर्माण होईल, असा भाबडा आशावाद आहे. म्हणून.

यातून संस्थळाला मी नको इतकं महत्त्व तर देत नाही ना?

नाही. संस्थळ तितकं महत्त्वाचं आहेच. त्याचसाठी हा खटाटोप.

अभिव्यक्तिस्वातंत्र्य, दडपशाहीचा निषेध, लोकशाही मूल्यं यांचा गौरव करणार्‍या पुरोगामी संस्थळाबद्दल मला मनापासून प्रेम, आपलेपणा वाटतो. ज्या लोकांना इतर अनेक मराठी संस्थळांवर बोलण्याइतका मोकळा अवकाश मिळत नाही, अशा अनेक चाकोरीबाहेरच्या लोकांना इथे निवांत-आश्वस्त वाटतं, आपली भूमिका तपासून घेण्याइतकी खुला, मतभेदासहितचा निकोप अवकाश मिळतो, हे मी वेळोवेळी निरनिराळ्या कोनांतून अनुभवलेलं आहे. अशी एक तरी जागा आपल्या वैशिष्ट्यांसह टिकावी असं मला मनापासून वाटतं. संस्थळांमधून अनेक नवनवीन पोटसंस्थळं जन्मावीत. पण त्यांच्या जन्मामागे दडपशाही भांडणांचाच इतिहास असण्याची आणि तो चवीनं चघळला जाण्याची परंपरा मात्र मोडीत निघावी, असंही वाटतं.

म्हणूनच - अशा व्यासपीठाच्या व्यवस्थापकांनी केलेल्या मनमानीचा, संपादकीय अधिकारांच्या पायमल्लीचा आणि स्वतःच्याच भूमिकांशी केलेल्या बेईमानीचा मी निषेध करते आहे. आपापले व्यक्तिगत अजेंडे दौडवण्याच्या नादात आपण संस्थळाच्या बहुआयामी प्रकृतीला एकारलेलं तर तर करत नाही ना, हे तपासून पाहण्याचं त्यांना आवाहन करते आहे. पुरेसा वेळ जाऊ दिल्यानंतर, अहंकार बाजूला ठेवत, हितचिंतकाच्या नात्यानं धोक्याची घंटा वाजवते आहे.

नेहमीप्रमाणेच, या कृतीचे परिणामही स्वयंभू आणि अनेकपदरी असणार आहेत याचं पूर्ण भान मला आहे.

Monday 20 June 2016

लकाकी

मस्त वाटतं, शाईपेनानं लिहायला. लिहिताना कागदावर झुकून एका विशिष्ट कोनातून मजकुराकडे पाहताना, ओल्या शाईमुळे अक्षरांना आलेली देखणी लकाकी दिसत राहते. ती अशक्य सुंदर असते. हळूहळू ओसरत जाते ती. पण ती ओसरत जाताना आपण कुठे थांबून पाहत राहिलेले असतो? आपण पुढच्या अक्षरांना जन्म देत, पुढच्या ओळीवर, पुढच्या ओळीवर, पुढच्या ओळीवर.

लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये, डावीकडच्या एकांड्या-लांबड्या सीटवर, पाय पसरून खिडकीत बसून, फिलॉसॉफिकली वारा पीत, पळता रस्ता आणि झाडं आणि शेतं न-न्याहाळत, डोक्यातले विचार घोळवत-मागे टाकत जाण्याइतकंच थरारक आणि सुंदर आणि शांतवणारं.

कुणाचा विश्वास बसेल का यावर?

कदाचित.

वाळून गेलेल्या अक्षरांवर नजर फिरवताना, जर ती लकाकी पुन्हा जिवंत होऊ शकली, तर. बसेलही कदाचित. One can only hope.

Thursday 9 June 2016

जन मार्मिक व्हावा...

ऐसी अक्षरेसाठी या वर्षीही एका विशेषांकाच्या संपादनाच्या मात मी सहभागी झाले होते. विशेषांकाचं नाव होतं पॉर्न ओके प्लीज. नाव खरं तर तसं स्वयंस्पष्ट आहे, त्यामुळे त्याबद्दल अधिक काही बोलत नाही! पूर्ण अंक इथे वाचता येईल. त्यात मी लिहिलेले लेख इथे एका मालिकेत प्रकाशित करणार आहे.

***

पॉर्न-ओके-प्लीज  
लेखांक तिसरा: लावणीबद्दलचा लेख
लेखनसाहाय्य: अमुक

जन मार्मिक व्हावा...

परिचय
सावित्री मेधातुल : अभिनेत्री आणि माहितीपट दिग्दर्शिका; 'व्हजायना मोनोलॉग्स' नाटकाच्या सुरुवातीच्या काही प्रयोगांत सामील; 'नटले तु्मच्यासाठी' या लावणीवरील माहितीपटाचं दिग्दर्शन; मुंबईतलं पाणीवितरण, बेने इस्रायली समाज, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा निरनिराळ्या विषयांवर माहितीपट.
भूषण कोरगांवकर : लावणी कलावंतांचं आयुष्य आणि त्यांच्या कलेचं एकमेवाद्वितीयत्व सांगणाऱ्या 'संगीतबारी' या 'राजहंस' प्रकाशित पुस्तकाचं लेखन; 'नटले तु्मच्यासाठी' या माहितीपटाची निर्मिती; निरनिराळ्या नियतकालिकांमधून कथालेखन, तसंच लावणी आणि लावणी कलावंतांबद्दल ललित लेखन.
***
'संगीतबारी' कार्यक्रमातील कलाकार :
पुष्पा सातारकर, सुनिता धोंडराईकर, लताबाई वाईकर, चंद्रकांत लाखे (ऑर्गन/पायपेटी), सुनिल जावळे (तबला), सुमित कुडाळकर (ढोलकी), नासिर शेख (मंच साहाय्यक) आणि शकुंतलाबाई नगरकर.
ध्वनी : रुचिर चव्हाण.
प्रकाश: विलास हुमणे.
छायाचित्रण : कुणाल विजयकर, सचिन यशवंते, प्रीती बकाळकर 
निर्मिती साहाय्य : प्रतिक म्हात्रे, रोशन कोरीआ.
विशेष आभार: राजहंस प्रकाशन (पुणे), आर्यभूषण थिएटर (पुणे), मजिद तांबे (संचालक: आर्यभूषण थिएटर)
***
(शकुंतलाबाई नगरकर (छायाचित्र : कुणाल विजयकर))
मला 'संगीतबारी' या कार्यक्रमाबद्दल कळलं ते अमुककडून. हा कार्यक्रम बघच, अशी त्याची शिफारस उत्सुकता वाढवणारी होतीच. पण खरं दिलचस्प होतं ते त्यानं केलेलं वर्णन.
... शकुंतला नगरकर या साधारण पन्नाशीच्या वाटणाऱ्या बाई मंचावर आल्या. ठळक मोठी चंद्रकोर, टोकदार नाक, गर्दीत दिसला तर 'डबल टेक' करायला लावणारा असा रेखीव, ठसठशीत चेहरा नि उठावदार लालसुर्ख साडी. गाण्यात साथ द्यायला मागे पुष्पाबाई. शकुंतलाबाईंनी गाणं सुरू केलं -
नेसले पीतांबर जरी
जरी गं
जरतारी लाल साडी
पहिली ओळ ऐकताच सूर ओळखीचे वाटले. अरे! ही तर 'वद जाऊ कुणाला शरण'ची चाल!!
कुणी लाल साडीतली यौवना उन्हाळ्यात रानात लाडे लाडे आंबे चाखायला बोलावते आहे असं वर्णन करता करता अचानक -
आम्ही काशीचे ब्राह्मण, द्या हो आम्हां दान घडंल पुण्य
अशा ओळी आल्या आणि मग त्यातली 'आम्ही काशीचे ब्राह्मण' हीच ओळ पकडून पुढली सातआठ मिनिटं शकुंतलाबाईंनी जे काही सादर केलं ते निव्वळ थोर! त्याला कुठल्या अभिनयाच्या शाळेत काय म्हणतील ते माहीत नाही. या पन्नाशीच्या साडी नेसलेल्या बाईनं परकायाप्रवेश का काय म्हणतात ते केल्याप्रमाणे अक्षरश: धोतराचा कासोटा मारलेला, पाण्यात उतरलेला, काशीचा गंध लावलेला, एक कर्मठ शेंडीवाला उघडाबंब गरगरीत ब्राह्मण कशी डुबकी मारेल, अर्घ्य देईल, जानवं फिरवीत आल्यागेल्या बाईकडे कळेल कळेलसा कटाक्ष कसा टाकेल, गडबडून पुन्हा प्रार्थना करण्याचं ढोंग कसं करेल वगैरे लकबी अशा काही खेळून दाखवल्या; की त्या सात-आठ मिनिटांच्या मंतरलेल्या अवकाशात आख्खा मंच काशीचा घाट झाला. आणि हे सगळं फक्त 'आम्ही काशीचे ब्राह्मण' या तीन शब्दांवर घोळवत घोळवत, लोकांची हसून पुरेवाट होईस्तोवर. थेट - स्पष्ट - कडक सलाम! मला एकीकडे मार्सेल मार्सोच्या माइमिंगची आठवण येत होती. वाटलं, या बाई कसलंही संगीत वा सूर नसतानाही काय झकास माइमिंग करतील! पण नकोच ते.. हे तीन शब्दांवर हजारो अदा करून दाखवणं नि आणखी कशाची तुलना नकोच. जे समोर चाललं आहे ते अनन्य आहे.
ही दिलखुलास दाद देणारा मराठी प्रेक्षक खरा, की 'लावणी म्हणजे बाईचा नाद' या शेलक्या शेऱ्यानं लावणीची संभावना करणारा मराठी मध्यमवर्गीय माणूस खरा? खरोखर, या अनन्य लावणीबद्दल मराठी मध्यमवर्ग नक्की काय विचार करत असतो?
शृंगार म्हणजे काहीतरी पाप-गलिच्छ-वाईट-अंधारात करण्याजोगं हा संस्कार आपल्यावर असतोच. लावणी तर शृंगाराची जणू सम्राज्ञीच. अवखळपणा, खट्याळपणा, धसमुसळेपणा, धीटपणा, नाजूक प्रेमभावना आणि विरहाचं तेजाब या शृंगाराच्या यच्चयावत छटांचा परिपूर्ण आणि निस्संकोच आविष्कार तिच्यात असतो. स्त्रीला शतकानुशतकं नाकारलेली गेलेली तिची लैंगिकता त्यातून आत्मविश्वासानं प्रकट होत असते. तरीही मध्यमवर्ग लावणीचं यथायोग्य कौतुक करतो का? 'पिंजरा'सारखा मराठीत अभिजात मानला गेलेला चित्रपट आणि त्याची लोकप्रियता हा एकच ढोबळ निकष घेतला, तरी लावणीबद्दलचं आपलं मानसचित्र सहज उघड व्हावं. हिंदी चित्रपटांमधला गल्लाभरू शृंगार आणि हिंसा राजरोस मिरवली-गौरवली जाते. पण लावणी कलाकार मात्र आपलं व्यावसायिक आयुष्य लपवून आयुष्य काढतात.
यांत कुठेतरी एक मूलभूत अन्याय आहे. श्लीलाश्लीलाचे निर्णय आणि कामभावना या दोहोंना निराळं करून बघणाऱ्या या अंकात लावणीवर होणाऱ्या या अन्यायाबद्दलची चर्चा करणं यथोचित होईल.
तर - सर्वसामान्यांना माहीत असते ती चित्रपटातली लावणी. ती फडावरच्या तमाशातही असते, पण लावणी हा त्या तमाशाचा एकमात्र घटक नव्हे. त्यात गण-गवळण-वगनाट्य-बतावणी असं सगळं असतं आणि खेरीज लावणी असते. लावणी हाच मुख्य आणि एकमात्र कार्यक्रम असतो तो बॅनर शोमध्ये. ते हे काहीसं शहरी कामकरी वर्गाचं मनोरंजन करणारं प्रकरण. नाटकं जशी नाट्यगृहात लागतात, तसेच हे लावणीचे कार्यक्रमही होतात. लाइव्ह म्युझिक असतं आणि त्यावर एकापाठोपाठ एक लावणी नंबर्स पेश होतात. (या कार्यक्रमासाठी वापरलेली परिभाषा ऐकली तरी लक्ष्यात येईल, की हे लावणीचं किती शहरी रूप आहे!)
पण यांखेरीज पारंपरिक लावणीला प्रमुख स्थान देणारी आणखी एक प्रकारची लावणी असते, जिची मुळं थेट पेशवाईतल्या बावन्नखणीपर्यंत मागे जातात. त्यातल्या कलावंतांना अजूनही समाजमान्यता मिळालेली नाही. कसब, कला आणि कष्ट हे तिन्ही अंगी असूनही जिच्यावर काहीसा अन्याय झाला आहे, ती ही लावणी - संगीतबारीची लावणी.
(शकुंतलाबाई नगरकर, पुष्पा आणि सुनीता (छायाचित्र : कुणाल विजयकर))
ती काही ठरावीक थिएटर्समध्येच होते. तिथे एकेका वर्षभराच्या बोलीवर एकेक पार्टी उतरते आणि आपले कार्यक्रम करते. या वर्षभरात थिएटरमध्ये जे कार्यक्रम होतील, त्यांतला अर्धा वाटा थिएटर मालकाला जातो, तर अर्धा वाटा पार्टीचा असतो. मात्र लावणीच्या वेळी जो दौलतजादा होतो त्यावर हक्क केवळ पार्टीचा असतो. याखेरीज खाजगी बैठका होतात. त्या बैठकांतून जी कमाई होते तीसुद्धा थिएटर मालक आणि पार्टी यांच्यात निम्मी निम्मी वाटून घेतली जाते. या पार्ट्या जी लावणी सादर करतात, ती संगीतबारीची लावणी. या लावण्यांमध्ये कमालीचं वैविध्य असतं. सादरीकरणात बैठकीची लावणी, खडी लावणी, नाचाची लावणी, छक्कड असे प्रकार असतात. विषयांमध्ये विविधता असते. थेट आणि आत्मविश्वासपूर्ण लैंगिक अभिव्यक्ती आणि चकित करून टाकणारी अदाकारी असते.
या लावणीवर आधारित असलेल्या कार्यक्रमाच्या प्रेमात पडलेल्या चाहत्यांच्या शिफारसी, पुस्तक वाचून खुलं झालेलं एक नवीन विश्व आणि परिणामी सावित्री-भूषणला गाठून मारलेल्या गप्पाया सगळ्याचं फलित म्हणजे हा लेख.
***
बारी आणि लावणी
लावणीला चांगले दिवस कसे येतील, असा प्रश्न सावित्रीला विचारला. तिचं उत्तर मूलभूत विचार करायला लावणारं होतं.
"दहाएक वर्षांपूर्वीपर्यंतही लावणी शिकायला जाणं या गोष्टीचा आपण विचारही करू शकलो नसतो. पण आता तसं उरलं नाहीय. मुली सररास अशा शिकवण्यांना जातात. मुदलात अशा शिकवण्या असतात! त्यामुळे थोडंफार बदलायला सुरुवात झालेली आहे. पण अजून बराच टप्पा गाठणं शिल्लक आहे, हेही कबूल आहे. हे सगळं काहीसं गुंतागुंतीचं आहे. एकतर तो काही विशिष्ट जातींच्या पोटापाण्याचा उद्योग आहे. हल्ली हल्ली इतर जातीतल्या मुली त्यात यायला लागल्या आहेत. त्यांपैकी भातु-कोल्हाटी जमातीतल्या स्त्रियांनी एकदा घुंगरू बांधले की त्यांचं लग्न होऊ शकत नाही, ही रीत आहे. पण बरं, रीत गुंडाळून ठेवली, बंड केलं आणि राहिली बाई लग्नाला उभी; तरी कोण लग्न करणार तिच्याशी सहजासहजी? एकट्या राहणाऱ्या बायकांना राहायला भाड्याची जागा मिळणं अजूनही मुश्किल असतं हे वास्तव आहे. पुरुषांसमोर धीट लैंगिक अभिव्यक्ती करणारी लावणी खेळून त्यांना रिझवण्याचा उद्योग करून पोट भरणाऱ्या स्त्रीशी लग्न करायला कोण तयार होणार? ते अवघडच आहे. पण गरजा तर सगळ्यांना असतातच. मग त्यात 'मालक' ही संकल्पना येते."
मालक म्हणजे काही काळाकरता एखाद्या स्त्रीनं केलेला प्रियकर म्हणा, वा कागदोपत्री कोणताही करार करता केलेला नवरा म्हणा. बरेचदा हा माणूस आधीच विवाहित, मुलंबाळं असलेला असतो. त्यानं त्याच्या पैशाच्या जोरावर आणि शौकाच्या इच्छेनं बारीमधल्या स्त्रीसोबत दुसरा संसार मांडलेला असतो. ही स्त्री आपल्या मालकासोबत असेल, त्या काळात त्याच्याशी एकनिष्ठ असते. त्याच्याकडून घरदार मिळतं, पैसे मिळतात, मुलं होतात. जोवर दोघांचीही मर्जी असते, तोवर हे नातं टिकतं. एखाद्या वर्षापासून ते साधारण पाच-सात वर्षांपर्यंत हे नातं टिकतं. जन्मभरासाठी कुणी मिळणं हे दुर्मीळच. पण तशी आस कुणाला चुकलीय? नाच करा किंवा लग्न कराअसो! तर - लग्न करायला तयार कोण होणार?
सावित्री पुढे सांगत होती -
"हे संगीतबारीतल्या स्त्रियांचं वास्तव आहे.
दुसरं असं, की लावणी म्हणजे फक्त नृत्य नव्हे. प्रेक्षकांशी संवाद करणं, त्यांना 'खेळवणं', त्यांना शृंगारिक आव्हान देणं - त्यांना भुरळ घालणं हे लावणी 'खेळण्या'चं एक अविभाज्य अंग आहे. तेच लावणीमधून काढून टाकलं तर तिचा आत्माच हिरावून घेतल्यासारखं होईल. तसेही प्रयोग झाले आपल्याकडे. ते लोकप्रियही झाले. पण ती काही खरी लावणी नव्हे. ती लावणीची नक्कल आहे.
प्रेक्षकांचा जिवंत सहभाग हा दुसरा महत्त्वाचा भाग. आताही अकलूजला जी लावणी स्पर्धा होते, त्यात पारंपरिक लावण्यांना फार सुरेख वाव दिला जातो. त्यातून अनेक सुरेख नवीन लावण्या लिहिल्या जाताहेत, जुन्या लावण्या प्रकाशात येताहेत. त्याचा या क्षेत्राला फायदाच होणार आहे, यात दुमत नाही. पण तिथेही हेच. तिथे बाया आणि पुरुष प्रेक्षक चक्क निरनिराळे बसवतात. कारण काय, तर पुरुष शिट्ट्या मारतात ते पाहून बायकांना अवघडल्यासारखं होतं! शक्यतोवर शिट्ट्या मारल्या जाऊ नयेत, एखाद्या मध्यमवर्गीय मराठी नाटकाला दाद दिल्यागत टाळ्या वाजवून दाद दिली जावी, अशी अपेक्षा तिथे असते. कारण आयोजकांना लावणीतलं हे शृंगारिक आव्हान काढून टाकून लावणी 'शुद्ध' करून घ्यायची आहे, तिला पांढरपेशी-परीटघडीची करायची आहे. त्यांच्या दृष्टीनं तो लावणीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
मला ते पटत नाही. मला वाटतं, लावणीतला हा रांगडा-थेट शृंगार ही तिची एक महत्त्वाची ओळख आहे. ती तर मिटता कामा नये. पण लावणीला प्रतिष्ठाही मिळाली पाहिजे. ही कोंडी फुटायची कशी?
त्यावर माझं उत्तर असं आहे - जोवर बाई नाचते आहे, आणि पुरुष दाद देत तिला नजरेनं भोगतो आहे, हे वर्गीकरण मिटणार नाही; तोवर त्यातलं अवघडलेपण जाणार नाही. शेवटी लावणीतला नजरेचा खेळ स्त्रीसाठी आणि पुरुषासाठी असा निरनिराळा थोडाच असतो? तीच नजरबंदी, तेच आव्हान, तीच खुळावणारी भुरळआमच्या कार्यक्रमात पुढच्या ओळींमध्ये स्त्रिया बसलेल्या असतील, तर आम्ही निवेदनात त्याबद्दल सहजगत्या बोलतो. नर्तकीशी संवाद साधताना असं खेळकरपणे सुचवतो, की 'बघा बा, पुरुषच गटवायला हवा असं काही नाहीहल्ली तसं काही राहिलेलं नाही! दिवस बदलताहेत!' त्याला हमखास दाद मिळते. अशाच प्रयत्नांतून लावणीचा आश्रयदाता म्हणजे पुरुष हे समीकरण मोडलं गेलं पाहिजे, असं मला फार वाटतं. मग त्यातला लैंगिक शोषणाचा भाव लुप्त होईल आणि लावणीचं खट्याळ आव्हानही टिकेल. आम्ही प्रेक्षकांना असंही आवाहन करतो, की तुम्ही शांत बसून हा कार्यक्रम पाहणं अपेक्षित नाही. तुम्ही दाद द्या, शिट्या मारा - तुम्ही दाद द्याल, तितका हा कार्यक्रम अधिकाधिक रंगत जाईल. कारण ही देवघेव आहे - संवाद आहे."
राजमान्यता आणि लावणी
फार खोलवर विचार करायला लावणारे मुद्दे होते हे दोन्ही. याच मुद्द्याला धरून अमुकनं लावणीला राजमान्यता मिळण्याचा विषय काढला. तिला महाराष्ट्राची शास्त्रीय नृत्यकला म्हणून राजमान्यता मिळाली; तर लावणीला प्रतिष्ठा मिळेल? तिचे दिवस बदलतील? कलाकारांच्या रोजच्या जगण्यात फरक पडेल? त्यांचं समाजातलं स्थान बदलेल?
भूषणला तसं वाटत नाही. त्याच्या मते -
"आता सरकारनं शास्त्रीय वा उपशास्त्रीय नृत्यकला असं वर्गीकरण बंद केलं आहे. 'भारतातल्या महत्त्वाच्या मंचकला' इतकंच आणि एवढंच वर्गीकरण होतं. नि हे छानच आहे! पण मुद्दा असा की, असं वर्गीकरण आता बाद असल्यामुळे मुद्रा, नवरस वा कायिक अभिनय यांच्या नियमचौकटीत लावणी कितीही अचूक बसत असली; तरी त्यानं काही फरक पडत नाही. बरं, संगीतबारीची लावणी ही मला लोककलाही वाटत नाही. लोक लोकांसाठी जी सहज सादर करू शकतात ती म्हणजे लोककला. तशी लावणी काही लोककला नव्हे. ती मुख्यत्वेकरून विशिष्ट वर्गातल्या लोकांना, त्यातही पुरुषांनाच, उपलब्ध असते. शिवाय ती कोल्हाटी, डोंबारी अशा काही विशिष्ट जातीतल्या स्त्रियाच सादर करतात आणि मुख्यत्वेकरून ती पुरुषांनाच पाहायला मिळते. ही काही लोककलेची लक्षणं नाहीत. फडाचा तमाशा किंवा त्यातली लावणी, याला मात्र लोककला म्हणता येईल.
पण वर्गीकरणाचं एक वेळ बाजूला ठेवा. लावणीला जरी सरकारदरबारी मान्यता मिळाली, तरी त्यानं कलावंतांच्या जगण्यात ताबडतोब फरक पडेल असं मला वाटत नाही. तिथे खरी महत्त्वाची ठरते ती जात. भरतनाट्यम‌ हेही पूर्वी देवदासी समाजातल्या स्त्रियांनी करण्याचं नृत्य होतं. त्याला कुठे होती प्रतिष्ठा? त्यातही शृंगारिकता होती. ती गेली, आणि मग अगदी ब्राह्मण जातीतल्या स्त्रिया ते करू लागल्या, तेव्हाच त्याला प्रतिष्ठा मिळाली. ठुमरीचं काय निराळं आहे? तिच्यातला शृंगार कमी झाला, उच्चवर्गीय स्त्रियाही ती सादर करू लागल्या; तेव्हा तिला प्रतिष्ठा मिळाली. उच्चवर्णीय स्त्रिया लावणी कधी करतील? इथे आपण पुन्हा लावणीच्या 'शुद्धीकरणाच्या प्रक्रियेपाशी' येऊन ठेपतो. ते तर करायचं नाही
शिवाय या समाजातल्या स्त्रियांच्या पोटापाण्याचा तो पेशा आहे. त्यांच्याकडून तो काढून घेऊन मग त्या कलाप्रकाराला प्रतिष्ठा मिळणार असेल, तर त्याचा काय उपयोग? ती याच समाजातल्या स्त्रियांना मिळायला हवी, तर त्याला अर्थ आहे.
कोंडी आहे खरी. पण आमचे प्रयत्न चालू आहेत. आम्ही करत असलेल्या प्रयत्नांमधलं पुढचं पाऊल म्हणजे लावणी कार्यशाळा. त्यात फक्त लावणी नृत्य असतं असा समज नावावरून होईल. पण तसं नाहीय. लावणीची अगदी प्राथमिक माहिती, तिची सामाजिक पार्श्वभूमी, तिच्यातली खास सौंदर्यस्थळं आणि शिवाय प्रत्यक्ष लावणीचं प्रशिक्षण - असं ते असतं. गृहिणींपासून ते कॉलेजमधल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींपर्यंत - होय, होय, मुलंही! फक्त मुलीच नाहीत! - आणि शास्त्रीय नर्तकींपासून ते मुक्ता बर्वे, सखी गोखले, गीतांजली कुलकर्णी यांच्यासारख्या अभिनेत्रीपर्यंत अनेक जण या कार्यशाळेत शिकून गेले आहेत. आनंदाचा भाग हा की, त्यांचं एका कार्यशाळेनं समाधान होत नाही. त्यांना लावणी खुणावत राहते. ते पुन्हा पुन्हा लावणीकडे परतत राहतात."
(वाडा इथे झालेल्या लावणीच्या निवासी कार्यशाळेत अर्चना पटेल, विशाल मोकाशी, मुक्ता बर्वे, अश्विनी, प्रथमेश भोईर, अंकुर बल्लाळ, सावित्री मेधातुल, सोनल खळे (छायाचित्र : सचिन यशवंते))
(वाडा इथे झालेल्या लावणीच्या निवासी कार्यशाळेत अर्चना पटेल, गीतांजली कुलकर्णी, सचिन यशवंते, शकुंतलाबाई नगरकर, भूषण कोरगांवकर, मुक्ता बर्वे, सोनल खळे, अंकुर बल्लाळ, श्रीराम चौधरी (छायाचित्र : प्रीती बकाळकर)
(लावणी कार्यशाळेमधल्या दोन चित्रफिती इथे आणि इथे पाहता येतील.)
लावणी कलावंतांचं जगणं
प्रतिष्ठा इतकी महत्त्वाची असते? माझा टिपिकल मध्यमवर्गीय प्रश्न. मला प्रतिष्ठा म्हणजे व्यासपीठावर जाऊन शाल आणि नारळ घेण्यासारखं काहीतरी निरुपद्रवी नाटक वाटत होतं. काय फरक पडतो त्यामुळे रोजच्या जगण्यात? सावित्रीनं मला थांबवलं. ती मोडनिंबच्या थिएटरवर कामासाठी आठवडाभर मुक्काम ठोकून आलेली होती.
"या बायकांचं जगणं सोपं नसतं.
थिएटरवरच्या आयुष्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तिथे या बायकांना आठवड्यातून फक्त एक दिवस बाहेर पडायची परवानगी असते. खरेदी, डॉक्टर, ब्यूटी पार्लरसगळं त्या एका दिवसात आटपायचं. दिवसा फक्त साडी नेसूनच वावरायचं असा दंडक असतो. सकाळी उठून नाचाचा रियाज, जेवणखाण, मग तयारी, संध्याकाळी थेटरमधला कार्यक्रम आणि मग खाजगी बैठका, असा दिनक्रम लागलेला असतो. अतिशय गुदमरवणारं असं ते वातावरण असतं.
(पिंजरा कलाकेंद्र, वेळे, सातारा (छायाचित्र: कुणाल विजयकर))
त्यात एका प्रकारे अर्थकारण गुंतलेलं असतं. सगळं उत्पन्नच मुळी त्या स्त्रीवर अवलंबून - तिनं बाहेर जाऊन कुणाशी लफडं केलं, ती कुठे निघून गेली, तिनं बाहेर काही मनोरंजन शोधलं आणि ती परतली नाही; तर? हे थेट धंदा बुडण्याशीच - पोटापाण्याशीच येऊन भिडतं! त्यामुळे त्यात ताबा गाजवणं येतंच. पण त्यात संरक्षणाचाही थोडा भाग असतो. या मुली त्यांच्या कुटुंबापासून दूर असतात, त्यांच्यापाशी शिक्षण नसतं, बाहेरच्या जगाबद्दल काही ज्ञान नसतं; त्यांना कुणी काही केलं तर जबाबदारी कोण घेणार? शेवटी थिएटर मालक आणि पार्टी हेच त्यांचं त्या काळातलं कुटुंब असतं. त्यामुळेही ही बंधनं येतात. पण परिणती अशी होते, की या मुलींना बाहेरच्या जगाचं भान नसतं, त्यात स्वतंत्रपणे वावरण्याची सवय नसते.
त्यांच्याकडे आर्थिक शहाणपण टक्केटोणपे खाऊन आलेलं असलं, तरी त्याकरता कोणतीही संस्थात्मक मदत त्यांच्यापर्यंत पोचत नाही, पोचलेली नाही, हे वास्तव आहे. वास्तविक त्यांना आरोग्याबद्दल भान आणून देण्याची गरज आहे, तत्संबंधी मदत मिळवून देण्याची गरज आहे. फक्त शरीरसंबंध आणि एड्स या दृष्टीनंच नव्हे, पण त्यांचे गुडघे-कंबर-पाठ-नियमित झोपेची गरज - अशा सगळ्याच बाबतींत. पण त्यांचा विमाही उतरवलेला नसतो. त्यांच्याकडे पुरेसं शिक्षण नसतं. ते देण्याचे कोणतेही प्रयत्न होत नाहीत. वास्तविक त्यांना ते आता गरजेचं वाटू लागलं आहे. आमच्याकडे तशी विचारणा होत असते. साधे बचत गटासारखे आर्थिक कार्यक्रम त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. त्यांची बॅंकेत खाती असली, तरी बहुसंख्य व्यवहार रोखीनं होतात.
आमच्या कार्यक्रमात मात्र आम्ही त्यांना कोणत्याही कलाकारासारखं स्वतंत्रपणे वागवतो, प्रत्येकीचं पैशाचं पाकीट प्रत्येकीच्या हातात देतो, त्यांना लोकांशी बोलाचालायला उद्युक्त करतो. आता कुठे वर्षभरानंतर थोडाफार फरक पडायला लागला आहे. त्यांच्या वागण्यात थोडा मोकळेपणा, थोडी सफाईदार झिलई, कपड्यालत्त्यात थोडं स्वातंत्र्य यांची चुणूक दिसायला लागली आहे. त्यांच्या नृत्यात तो मोकळेपणा दिसायला लागला आहे. बुजरेपणा कमी झाला आहे. अर्थात - तरी थिएटर मालकांची आणि या मुलींच्या मालकांची भीती असते! त्यांना कुणी जीन्स घालून बाहेर वावरताना दिसलं, तरी 'हे धंदे करतेस तू बाहेर?' असा ओरडा होतो! विसंगती आहे, कबूल आहे. पण इलाज काय! मग आम्ही त्यांच्याशी बोलतो, त्यांना थोडं शांत करतो, थोडी लाडीगोडी लावतो! ते निवळतात. आम्हांलाही हळूहळू मालकांची मर्जी सांभाळायची सवय झाली आहे!"
लावणीनंतरचं आयुष्य : निवृत्ती
या बायकांचं म्हातारपणीचं आयुष्य कसं असतं, असा प्रश्न आम्हांला होता. जोवर पायात धमक आहे, तोवर ठीक आहे. नंतर? निवृत्तीच्या आयुष्याचं काय? या प्रश्नावर भूषण मिश्किल हसला.
"किती खितपत पडणारं आयुष्य असेल त्यांचंअसं वाटतं ना? मलाही असं वाटायचं! त्यांची अखेर किती उपेक्षित, निष्कांचन, दयनीय असेलमी उगाच कीव करत असे त्यांची. पण तसं काही नसतं! खरं म्हणजे दोन प्रकारची निवृत्ती असते - एक म्हणजे मालकानं घरी बसायला सांगितलं, तर नाचणं संपलं. मग घरी बसायचं. पण त्या मालकाशी पटलं नाही वा मालक तुटला वा मालकानं सोडलं - की पुन्हा नाचायला उतरायचं. असं आत-बाहेर सतत चालू असतं. त्यातली अनिश्चितता गृहीतच धरलेली असते. दुसरा प्रकार म्हणजे वयामुळे घेतली जाणारी निवृत्ती. पण ही निवृत्ती घेण्याचं वय येतं, तोवर बाई आर्थिक दृष्ट्या स्थिर झालेली असते. कारकिर्दीत मुलांची शिक्षणं, लग्नकार्यं, गावी शेतीवाडी, घर बांधणं, काहीतरी उद्योग असं सगळं बयाजवार झालेलं असतं. बहुतेक जणी हे नीट जमवतात, सगळ्यांनाच जमतं असं नाही. पण एकतर प्रतिष्ठा नसतानाही मुलंबाळं मोठी करणं, लोकांच्या भोचक चौकश्यांना लपवाछपवी करत वा करता तोंड देणं, अनिश्चिततेला तोंड देणं; यांतून त्यांच्यात जगण्याचं एक निराळंच शहाणपण-चतुरपण आलेलं असतं. घुंगरू आणि पैसे इतकंच भांडवल त्यांच्यापाशी असतं. त्यामुळे त्या आलेल्या पैशांचा उत्तम विनियोग करतात. पैसे कमवण्यापासून त्याची नीट व्यवस्था लावण्यापर्यंत आणि मुलंबाळं जन्माला घालण्यापासून आपल्या कुटुंबाचं उत्तम पालनपोषण करण्यापर्यंत त्या सगळं काही करतात. स्थैर्याचं, स्वाभिमानाचं म्हातारपण घालवतात. अनेक जणींवर अनेक प्रकारचं शोषित, अस्थिर आयुष्य जगण्याची पाळी येते हे खरं. पण त्या रडत बसत नाहीत. जिद्दीनं, हसत उभ्या राहतात."
या सगळ्या गप्पांदरम्यान मला राहून राहून प्राचीन भारतातलं गणिकांचं वर्णन आठवत होतं. त्याही चतुर, अष्टावधानी, बहुश्रुत, रसिक, कलावंत इत्यादी असत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे - राजसत्तेच्या आश्रयाला असतानाही त्या लिंगभेदाच्या पलीकडचं स्वातंत्र्य मिळवणाऱ्या स्त्रिया असत. त्यांना रूढार्थानं सामाजिक प्रतिष्ठा नसे. पण संसारादी मार्गांनी मिळणाऱ्या चाकोरीबद्ध प्रतिष्ठेची गरजच पडू नये असं स्वतंत्र आयुष्य त्यांनी घडवलेलं असे. नेमकं हेच निरीक्षण पॅरिसमधल्या वेश्यांबद्दलही नोंदलं गेलं आहे. पण भारतीय संदर्भात कधीही विसरता येण्यासारखी एक गोष्ट इथेही आहेच. जातिवास्तव. या व्यवसायात येताना परिस्थिती तसंही निवडीचं स्वातंत्र्य कुणालाच देत नसते, पण परंपरेनं तिला शोषणाचा आणखी एक क्रूर वळसा मिळतो. परिस्थिती ओढवलीच दुर्दैवानं, तर कोणत्याही प्रकारचं शिक्षण वा पाठबळ नसलेली ब्राह्मणाची बाई काय करते? ती निरुपायानं पोळपाट-लाटणं हाती घेते. तिच्या पायात घुंगरू बांधले जात नाहीत. हे खास भारतीय व्यामिश्र वास्तव.
पण तरीही - लैंगिक स्वातंत्र्य आणि भौतिकदृष्ट्या समृद्ध आयुष्य - मग ते अपार कष्टांनी कमवलेलं का असेना - असेल, तर स्त्री परंपरेचं जोखड ओलांडून जाते - जाऊ शकते, असं तर नाही ना? मला निष्कर्षाचा मोह पडतो. आणि पाठोपाठ आपण या शोषक-शोषित व्यवस्थेचं उदात्तीकरण तर करू पाहत नाही ना, असा आत्मपरीक्षण करायला लावणारा धारदार प्रश्न.
उत्तर मला अजूनही सापडलेलं नाही. असो.
लावणी आणि लैंगिकता
लावणीतून व्यक्त होणाऱ्या शृंगाराच्या विशेष धीटपणाबद्दल आम्हांला कुतूहल होतं. नियम सिद्ध करणारा एखाद-दुसरा अपवाद वगळता या लावण्या लिहिलेल्या असतात त्या पुरुषांनी. त्यांत शरीरसंबंधांचं अतिशय थेट असं वर्णन असतं. क्वचित बीभत्स होऊ शकतील, असे शब्द असतात. त्यांच्यावर अदा करताना ती आकर्षक-दिलखेचक करायची, पण ओंगळ-अश्लील-बीभत्स होऊ द्यायची नाही, ते जणू आपलेच शब्द असावेत अशा आत्मविश्वासानं आणि नाजूक पद्धतीनं सादरीकरण करायचंही एक निराळीच कला आहे. त्याबद्दल आम्हांला बोलायचं होतं.
भूषणनं एक मार्मिक निरीक्षण नोंदवलं.
"शब्द जेव्हा खूप धीट असतात, तेव्हा अदा साधी-मृदू-अस्फुट असते. आणि जेव्हा शब्द अगदी साधेसुधे असतात, तेव्हा अदा उत्तान असते.
यशोदा का नंदलाला
जू जू जू जू जू जू जू...
हे चित्रपटातलं एक अंगाईगीत आहे. आता हे किती साधे, वात्सल्यपूर्ण शब्द. पण ती अंगाई अतिशय शृंगारिक पद्धतीनं सादर केली जाते. असा तोल सांभाळणं हीच लावणीची गंमत आहे. तो साधणं त्यांना उपजतच जमतं. तो काही कुणी कधी बसवून शिकवलेला नसतो त्यांना. समतोल आणि विषमतोल हे आपण आता केलेलं विश्लेषण-विच्छेदन. त्यांच्या दृष्टीनं 'त्यात आणि काय सांगायचं? ते असंच करायचं असतं!' असा साधासरळसोपा मामला असतो! त्या बोलता बोलता थेट करूनच दाखवतात! तो पारंपरिक लावणीतून, एका पिढीनं दुसऱ्या पिढीपर्यंत पोचवलेला वारसा आहे."
'संगीतबारी' पुस्तकातला एक महत्त्वाचा भाग इथे देणं अतिशय उचित होईल.
संगीतबारी, भूषण कोरगांवकर, राजहंस प्रकाशन
***
कालच्या आणि आजच्या कलेत अजून एक मोठा फरक पडलायलावण्यांच्या शब्दांमध्ये. पूर्वी अनेक विषयांवर लावण्या लिहिल्या जात होत्या. शृंगारिक, आध्यात्मिक, शिवाय देशभक्ती, वात्सल्य, वर्णनात्मक अशा विविध भावना दाखवणाऱ्याही काही लावण्या होत्या. दगलबाज प्रियकराबद्दल काही भाष्य करणाऱ्या दोन लावण्या माझ्या पाहण्यात, ऐकण्यात आल्या...
हे झालं भ्रमनिरास झालेल्या एका स्त्रीच्या हृदयीचं रुदन. दुसऱ्या बाईच्या नादी लागलेल्या आपल्या नवऱ्याबद्दल मांडलेली ही आहे कैफियत. फुलांनी सजवलेली शेज आता नुसती पडून आहे, कारण तिचा सार्थ सन्मान करणारा माझा सखा आता माझा राहिलेला नाही. त्याची बेईमानी मला कळून चुकली आहे.
दुसऱ्या स्त्रीशी संग करून त्याने माझा मानभंग केला आहे. असं वाटतंय की जणू त्याने माझा जीवच घेतलाय.
शेज मंचकी, व्यर्थ राहिली रे
शेज मंचकी...
कळूनी आला बईमान
कापिली मान,
ओवुनी प्रान, माझे आन
नवीन पाहिली सवत कोनती
तिनी मोहून, वचन देऊन
भुलला पाहून, थाप देऊन, हाक देऊन
ममता दाविली प्राणमंदिरी
बसुनी शांत पाहते अंत
माझे नाथ कसे निवांत, कसे निवांत
पाहुनी भ्रमला प्राणमंदिरी
हे शब्द जेव्हा एक लावणी गायिका तुमच्यासमोर पेश करते, तेव्हा त्यातल्या उघड विरोधाभासामुळे ते एका वेगळ्याच उंचीवर जातात. म्हणजे प्रत्यक्षात दुसऱ्या स्त्रीचा दर्जा असलेली स्त्रीच जेव्हा हे पहिल्या प्रेयसीचं दु: अनुभवते, तेव्हाच समजून येतं की शेवटी फसवणूक झालेल्या सगळ्यांची मन:स्थिती ही सारखीच असते. फसवणूक झालेली व्यक्ती, मग ती स्त्री असो वा पुरुष, विवाहित असो वा अविवाहित, आपलं माणूस दुसऱ्याच्या बाहूपाशात रममाण झालेलं पाहतानाचं दु: किती तीव्र असतं याचा एक सुंदर आलेख त्या लावणीत अनुभवास येतो.
...
या विषयावरची मी पाहिलेली दुसरी लावणी 'तुझं रं नाही होणार कल्याण' मात्र 'शेज मंचकी'च्या पहिल्या चौकाइतकी संयत नाही. त्यातली स्त्री आक्रमक आहे. मला दगा दिलास ना, आता बघ तुझ्या नशिबाचे फेरे कसे उलटे पडतील ते, तू देशोधडीला लागशील, असं सांगणारी ही नायिका सूडाच्या आगीने पेटून उठलेली आहे. रेशमा परितेकरने सादर केलेली ही लावणी पाहून स्वत: असा अपराध कधी केलेला नसतानाही तिचे शिव्याशाप ऐकून मनाचा थरकाप उडतो. बांगड्यांनी भरलेले हात जेव्हा स्टेजवर जोरजोरात आपटून आरती जावळे 'भोवंल तुला माझा तळतळाट' म्हणते, तेव्हा ते ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. हे यश जितकं रेशमा-आरतीच्या सादरीकरणाचं, तितकंच त्यातल्या कठोर शब्दांचंही आहे. या लावणीचा शेवटचा अंतरा मात्र गमतीशीर आहे.
खेळ खेळू विटी-दांडू न् भवऱ्याचा
शेवट काय करशील नवऱ्याचा
यातले 'खेळ खेळू विटी' हे तीनच शब्द भरपूर वेळ घोळवले जातात. विटी-दांडूचा खेळ यथेच्छ खेळून झाल्यावर, दमल्या-भागल्यावर तिला प्रश्न पडतो, एवढं फसवणाऱ्या या क्रूर, लबाड नवऱ्याचा शेवट कसा बरं करावा?
शृंगार या एकाच विषयाला वाहिलेल्या तर असंख्य लावण्या पूर्वी होत्या. शृंगाराच्या तर्‍हा तरी केवढ्या. सलज्ज स्त्री-आक्रमक पुरुष, आक्रमक स्त्री-लाजाळू पुरुष, दोघे आक्रमक, दोघे लाजाळू, शांत अशा वेगवेगळ्या जोड्या त्यांत असायच्या. आजच्या तुलनेत हा शृंगार जास्त थेट आणि जास्त तपशीलवार होता. वानगीदाखल काही ओळी पाहा :
'नका चोळू, जोबन हुळहुळी गं...'
'शिंगेवरती स्वार शिपाई, कमवुनी घ्या शिंगेला
आसनामध्ये आसन दाटले असे भासले मजला...'
'आवळून कवळून धरिते सख्याला, मुखामध्ये मुख घाला
कंबर उचलुनी देते सख्याला, मानेखाली हात घाला...'
'कवळे स्कंद, चुरी गेंद, होउनी धुंद, सदा फुंद...'
'कळ साहीना, मदन साचला...'
'इश्क लहर, चार प्रहर, जाहला भार, वारंवार...'
'दोन्ही मांड्यांमध्ये मांस दडपता वेणीचा बुचडा सुटला,
मानेवरती चोळी जिरली, कमरेस हासडा बसला...'
'
हळूहळू चालवा, पाझर भरवा, सुटंल वरच्यावरी
सख्या आला ओघळ मांड्यांवरी...
ओले लुगडे झाले उघडे खिसणीनं आंबा खिसा
राया तुमच्या धोतरानं डाग हा पुसा...'
हे सगळं ऐकून आजच्या द्व्यर्थी लावण्या फार फिक्या, मिळमिळीत वाटू लागतात. या जुन्या लावण्यांसारखंच शारीर गरजांचं, इच्छांचं, क्रियांचं थेट वर्णन हे भारतातील इतर कलाप्रकारांतही काही प्रमाणात आढळतं. परंतु तिथे ते देव आणि त्याची भक्त या स्वरूपात येतं, नायिकेच्या देवभक्तीचा एक प्रकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तीच कामना, तीच क्रिया, पण ती राधाकृष्णांची किंवा इतर देवांची बनून आली की तिला एक प्रकारचं दिव्यत्व येत असावं. किंबहुना नायिका म्हणजे इहलोकीची माणसं, आणि नायक म्हणजे परमेश्वर असं रूपकच योजलेलं असतं. लावणीत मात्र जे काही घडतं, ते हाडामांसाच्या माणसांत घडतं. स्वत:च्या लैंगिकतेला लपवण्याचे, दाबण्याचे संस्कार आपल्यावर सतत होत असल्यामुळे, अभिजनवर्गाला इतर कलांमधली रूपकं श्रेष्ठ वाटतात आणि लावणीतला थेटपणा कमी प्रतीचा वाटतो.
शकुंतलाबाई नगरकरांचा या बाबतीतला किस्सा इथे नमूद करावासा वाटतो...
..."जेमतेम सोळाची असंन. एके दिवशी बैठकीत त्या लावणीची फर्माईश झाली. मी गाऊ लागले.
निवळ चिमणी हो निवळ चिमणी मदनमस्ता
फोडुनी गल्ली पार, खोदिला रस्ता
नेउनी एकान्ती
लिंग हो काढिले
मला हसू येते
हे काय मांडिले
असे काय-काय शब्द होते. 'निवळ चिमणी' म्हणताना मी आपली उडणाऱ्या चिमणीची अ‍ॅक्शन सुरू केली. फर्माईश करणारा माणूस मोठा दर्दी होता. त्यानं खऱ्या अर्थाची ती किळसवाणी अ‍ॅक्शन करून दाखवली. मी लाजेनं चूर. तो हटूनच बसला. शेवटी आईनं त्याला हात जोडले, म्हणाली, हिला काही ते जमायचं नाही, आपण दुसरी लावणी घेऊ या."
सगळ्या खूप हसत होत्या.
"हा एक वाईट अनुभव झाला. पण अशे कित्येक चांगले रसिक त्या काळी होते, जे आमचं काही चुकलं, तर स्वत: करून दाखवायचे. कलेची खरी जाण तेव्हा होती. आमच्या चुका होऊ नयेत म्हणून ते धडपडायचे. कुठून-कुठून नवीन गाणी, त्यांची माहिती असं साहित्य आणून द्यायचे. कित्येक गोष्टी मी अशा रसिकांकडूनच शिकल्ये. आम्ही सगळं आत्मसात करून त्यात आपली भर घालून, नवीन आणि चांगलं काही पेश केलं की ते इतके खूश व्हायचे, की ती खुशी पाहूनच आम्ही भरून पावायचो."
"आज या चावट लावण्या बंदच झाल्यात ना?" मी म्हटलं.
"आजच्या मुलींना लाज वाटते. त्या सरळ सांगतात, जमणार नाही म्हणून. अन् त्यांनी केलं तरी ते बघायला प्रेक्षक बी राहिले नाहीत ना तश्ये. निवळ चिमणी गलिच्छच होती. पण बाकी किती चांगल्या चांगल्या लावण्या होत्या, त्या सगळ्या मागं पडल्या. आता तुम्ही जे रोज आवडीनं करता, त्यावर लावणी बनवली तर ती लगेच अश्लील कशी काय होऊ शकते? आज हिंदी पिक्चरमध्ये जी गाणी दाखवतात, ती आख्खं कुटुंब एकत्र बसून बघतं. म्हणजे लोकांना अश्लील वाटत नाही. तर मग आमची लावणी बी अश्लील नाहीच." त्यांचा मुद्दा बिनतोड होता. मधुकर नेराळेंच्या मते खजुराहोच्या मंदिरातली संभोगशिल्पं अभिजात आणि लावणीतलं संभोगवर्णन मात्र कलाहीन हे कुणी ठरवायचं?
शकुंतलाबाईंनी सादर केलेली 'सोडा सोडा राया' ही लावणी अशीच भन्नाट आहे. इश्काने पागल झालेला आपला यार कसा नको जीव करून सोडतो याचं मोठं खुमासदार वर्णन यात आहे.
सोडा सोडा राया, तनू शिणली
वेणी सुटली, निरी फिटली
तरी तुमच्या मनाची शांती नाही झाली
दमली न् झाले बाई मी
तरी मला सोडीना
घामानं काया सारी भिजली
सोडा सोडा राया, तनू शिणली
आवळुनी धरिता
कवळुनी धरिता
चुंबन घेता
दंत रुतले गालीऽऽ
साऱ्या अंगाची बाई माझ्या कमान करिता
पोटात माझ्या कळ रुतली
या चावट शब्दांवरचा शकुंतलाबाईंचा अभिनय थक्क करणारा असतो.


...
दूर देशी गेलेल्या पतीमुळे त्याची पतिव्रता कशी झुरत्ये याचं वर्णन करणाऱ्या लावण्यांमध्ये तिच्या शरीराच्या भुकेचंही तपशीलवार वर्णन असे. सगनभाऊंच्या या लावणीतली ही गरती स्त्री आपली अवस्था सांगताना म्हणते,
कामचेतना झाली शरीरी, विशेष आग्न होती
कंबरेतुनी निऱ्या भिजल्या, चोळीत भिजली छाती
मस्तीमध्ये गजराज टोचितो भाले जखमांवरती
त्या जखमांचा गुमान नाही, झुलत चालला हत्ती
मी बाहेर पडल्यावर लोक तमाशा पाहती
तशीच कळ सोशिते, परंतु आम्ही अबरूच्या गरती
माझे मला भासते, पतीवीण झोप लागेना नयनी, महालातुनी
मोहनाबाईंनी जी लावणी खेळून मुंबईतल्या रसिकांना घायाळ केलं होतं, त्या 'सुकुमार गुलाबाच्या फुला' या लावणीत तर 'वुमन ऑन टॉप' हे आसनही सांगितलं आहे.
आणखी एक, बाई, सांगिते मी मजा
बाई, खाली तुम्ही निजा
वरुनी मी हो जुगते, वरुनी मी हो जुगते...
खाली उतरायाच्या वेळी आला-बला घेते
कमरेसी घाला जरा मिठी
करा हो झटपटी, घाईला मी येते
मुळात इथे एक भूमिकांची मस्त अदलाबदल (रोल रिव्हर्सल) आहे. आपल्या साहित्यामधून पुरुषाचं चित्र नेहमी राकट, धिप्पाड, कणखर असं रंगवलेलं असतं, आणि स्त्रीचं नाजूक, सुगंधी फुलासारखं! पण या लावणीत नायिका आपल्या प्रियकराला चक्क 'सुकुमार गुलाबाच्या फुला' अशी हाक मारत्ये. स्त्रीचं सामर्थ्य आणि तिला असलेला समान दर्जा लावणीतून असा सतत दिसून येतो.
अजून एका लावणीतल्या नायिकेला स्वत:चा संभोग आरशात पाहायची इच्छा झालीय आणि हे करण्यास पतीस ती विनवणी करतेय,
आसन आरशात मला पाहू द्या...
या सगळ्या लावण्या, हे सगळे शब्द बहुसंख्य वेळा पुरुषांनी लिहिलेले असले, तरी त्यात स्त्रियांची लैंगिकता फार उघडपणे मांडलेली आढळते. भलेही ते पुरुषरंजनाकरताच लिहिलेले असू दे, भलेही त्यात स्त्रीच्या भावनांच्या अभिव्यक्तीचा हेतू नसू देत. परंतु पुरुषाने लिहिलेले हे शब्द, जेव्हा एका स्त्रीच्या तोंडून तुमच्यापर्यंत येतात, तेव्हा ती त्यात स्वतःची अशी काही भर घालते, की ते तिचे स्वत:चेच होऊन जातात. त्यामुळे लावणी म्हणजे समर्थ स्त्रियांची सशक्त अभिव्यक्तीच बनून जाते. ज्याने अशा एखाद्या ताकदीच्या कलाकाराने खेळलेली शरीरसंबंधावरची लावणी प्रत्यक्ष पाहिली आहे, त्यांनाच हे जाणवू शकेल.
...
[या लावणीतली]... नायिका आज कुठे गेली? नहाण येण्याच्या प्रसंगाचं वर्णन करणाऱ्या बऱ्याच लावण्या होत्या. एका लावणीत नायिका स्वत:च्या मासिक पाळीचं कारण सांगून सख्याला चतुराईनं दूर ठेवते. ही लावणी सादर करताना त्या काळी स्त्रिया पांढरी शुभ्र साडी नेसत आणि तोंडात पानाची पिंक ठेवीत. 'झाले दूरशी' ही ओळ आली की निरीवर पानाची पिंक टाकून तो लाल रंगाचा परिणाम साधत. आजच्या आधुनिक काळाचे परिमाण लावल्यासदेखील ते काळाच्या पुढचंच वाटतं.
माहेरी येऊन जुन्या प्रियकराकडे जाऊन त्याला 'वन लास्ट टाईम' संग करण्याची विनवणी करणाऱ्या, पतीला विविध आसनं शिकवणाऱ्या, त्याला शृंगारातली मजा दाखवणाऱ्या, त्याची थट्टा करणाऱ्या, स्वत: पुढाकार घेऊन त्याला मार्ग दाखवणाऱ्या नायिका आज का गप्प झाल्या?
आज या जुन्या धीट लावण्या बंदच झाल्या आहेत. त्या सादर करण्यासाठी एका निराळ्याच दर्जाच्या आत्मविश्वासाची गरज असते. एक प्रकारचा बेधडकपणा आणि थेटपणा अपेक्षित असतो. तो आजच्या मुलींकडे आहे का? नक्कीच आहे. मग या लावण्या आज मागे का पडल्या?
लावणी आणि प्रेक्षक
आज ही लावणी कुठे गेली, या प्रश्नाचं उत्तर गुंतागुंतीचं आहे, काहीसं गैरसोयीचंही आहे. त्याचा थेट संबंध शब्दांकडून प्रतिमाप्रधान माध्यमांकडे झुकत गेलेल्या, बटबटीत होत गेलेल्या आपल्या अभिव्यक्तीशी लागतो. ते मनात घोळवत पुढच्या प्रश्नाचा विषय काढला. प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल मी चिकार ऐकलं होतं. शहरातले प्रेक्षक, ज्यांना लावणीची सवय नाही, ही शुद्ध केलेली खट्याळ लावणी त्यांना किती रुचते, किती पचते, किती रंगते? असे अनेक प्रश्न मला पडले होते. प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिल्यानं अजूनच उत्सुकता.
सावित्रीच्या मते -
"आमचा कार्यक्रम लहान सभागृहात उत्तम रंगतो. कारण शेवटी तो बैठकीच्या नृत्याचा प्रकार आहे. मोजके प्रेक्षक, प्रेक्षक शक्य तितका जवळ असणं आणि दाद देणारा प्रेक्षक असणं या तिन्ही गोष्टी असतील, तर अर्थातच तो अधिक रंगतो. मोठ्या सभागृहात तो रंगत नाही असं नाही. दिल्लीतल्या अमराठी प्रेक्षकांनी आम्हांला छप्परतोड प्रतिसाद दिला. एक सरदारजी गृहस्थ तर शकूताईंसोबत नाचायला जवळजवळ रंगमंचावरच आले होते!"
(साठ्ये महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा दिलखुलास प्रतिसाद (छायाचित्र : कुणाल विजयकर))
***
भूषणही अमराठी प्रेक्षकांच्या कौतुकात उतरत सांगायला लागला -
"हेही एक गमतीदार निरीक्षण - आमच्या कार्यक्रमाची मजा लुटायसाठी मराठी भाषा अवगत असलीच पाहिजे, असं काही नाही! अमराठी प्रेक्षकही त्याची मनःपूत मजा लुटतात. 'आपल्याला मराठी आलं असतं, तर अजून किती मजा आली असती ना…' अशी हळहळ त्यांना वाटते. भाषेची गंमत त्यांच्याकडून हुकतेही. पण तरीही ते कार्यक्रमावर खूश असतात. एका ब्राझिलियन रंगकर्मी माणसानं तर आमच्या कार्यक्रमाचं इतकं सुंदर विश्लेषणात्मक कौतुक केलं होतं - "पारंपरिक घाट, समकालीन टिप्पणी आणि साथीला त्या स्त्रियांच्या आयुष्याची खरीखरी गोष्ट - हे तुम्ही इतकं सुंदर सादर करता! त्यातून त्या बाईला तुम्ही प्रतिष्ठाच देत असता…" हे कौतुक ऐकून आम्हांला अगदी धन्य धन्य झालं होतं! इतकं भारी विश्लेषण तर आम्हीही करू शकलो नसतो आमच्या कार्यक्रमाचं. नि हे त्याला मराठी येत नसताना - मराठी काय कोणतीही भारतीय भाषा येत नसताना. तसाच आमच्या एका कार्यक्रमाला एक ऑस्ट्रियन रंगकर्मी होता. त्याच्याशी नंतर बोलताना आम्ही त्याला सांगत होतो, आम्ही भाषांतर करण्याच्या प्रयत्नात आहोत. तर पठ्ठ्या म्हणे, "छे! काही गरज नाही. मला भाषा कळत नसली तरी तुम्ही कशाबद्दल बोलताहात, ते किती संवेदनशील-नाजूक विषयावरचं आहे, त्यात किती खोलवरचं विरेचन आहे, हे अगदी नीट कळत होतं मला. प्रेक्षकांचं हसणं-खिदळणं-मजा-मस्ती असूनही हा गंभीर धागा लपत नाही त्या कार्यक्रमातला." बास! अजून काय हवं? त्यानं आमच्या बायांना येऊन मिठ्या मारल्या, गालांवर मुके घेतले, त्यांचं अभिनंदन केलं - त्यामुळे आमच्या बायकाही खूश, तोही खूश आणि आम्हीही खूश. नंतर किती दिवस कुणीतरी गोरं दिसलं की आमच्या बायका त्याची आठवण काढायच्या!"
भूषणच्या पोतडीत अजूनही एक गंमत होती.
"पिरामल गॅलरीत आम्ही एक कार्यक्रम केला होता. लोअर परेलची ती आर्ट गॅलरी. 'पुरुषी नजर' असा विषय घेऊन त्यांनी काही कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्यात संगीतबारी आणि त्याबद्दलची चर्चा असा एक दिवस होता. त्या कार्यक्रमात शृंगाररसाबद्दलही चर्चा झाली. शृंगार दाखवण्याचे काही विशिष्ट हावभाव असतात. बाईने छाती आणि कंबर उडवणं यातूनच शृंगार दाखवला जातो असा आपला एक समज आहे. पण ते तितकंच सीमित नसतं. शकूताईंनी काशीच्या ब्राह्मणाची व्यक्तिरेखा करून दाखवणं - त्यात त्या पूर्ण पुरुषी व्यक्तिरेखा उभी करतात. आणि त्यातून शृंगाराचा एक निराळा पैलू प्रेक्षकांना अनुभवता येतो. पुरुषी नजरेतून ठरीव होत गेलेल्या शृंगाराचा साचा तर यातून मोडला जातोच. पण हे एका प्रकारे 'मेल गेझ'ला - पुरुषी नजरेला - पार उलटपालट करून टाकणारंही आहे. लावणीत हा परकायाप्रवेशाचा धागा आहेच. पूर्वी ढोलकी-फडाच्या तमाशात पुरुष बाई बनून नाचायचे. आता 'बिनबायकांच्या तमाशा' ते सूत्र आपल्याला पुन्हा भेटतं. ('न्यू यॉर्कर'मधली बातमी.) हे खास लावणीचं सामर्थ्य आहे."
आज या सामर्थ्याचं काय झालं आहे?
'नटले तु्मच्यासाठी'मध्ये शकूताई याबद्दल जे काही बोलतात, ते कमालीचं मार्मिक आहे.



'संगीतबारी' या पुस्तकात भूषणने एक गंमतीदार किस्सा सांगितला आहे. 'जवळी यावं, मला पुसावं, गुपित माझं खुशाल...' हे 'तुम्हांवर केली मी मर्जी बहाल' या प्रसिद्ध लावणीतले शब्द. त्या शब्दांवर कुणी नवखी नर्तकी नाचत असलेली. तिनं 'पुसाल' या शब्दावर काय अदा करावी? टॉवेलनं अंग खसखसून पुसण्याचा अभिनय!
हे वाचून हसू येतं खरं. पण वास्तविक ते अतिशय विदारक असं वास्तव आहे. दोन शब्दांच्या मधल्या अतिशय नाजूक जागा टिपण्याचं आणि व्यक्त करण्याचं अनन्य सामर्थ्य असलेला हा नृत्यप्रकार. तो आज कुठे येऊन पोचला आहे? कुणी याचा प्रतिवाद म्हणून अकलूजच्या स्पर्धेचं वा खुद्द सावित्री-भूषणच्या कार्यक्रमाचं आशादायी उदाहरण देईल. पण शेवटी हे दोन्ही प्रवाहाविरुद्ध चाललेले प्रयत्न आहेत. अपवादात्मक आहेत. त्यानं नियमच सिद्ध होतो. लावणीच्या क्षेत्रातल्या अस्तंगत होत चाललेल्या पारंपरिक कलावंतांवरूनही हाच नियम सिद्ध होईल, की लावणीचं हे सामर्थ्य जपण्यासाठी आज कुणापाशीच वेळ नाही. जातीचं वर्चस्व मोडायला लागलं आहे, हे चांगलं आहेच. पण परंपरेनं दिलेल्या वारशाचा चांगला भागही त्यासोबत लुप्त होऊ लागला आहे. हातात पैसे खेळवणारं नवश्रीमंत गिर्‍हाईक आज संगीतबारीचा प्रमुख प्रेक्षक आहे. त्याला लावणीबद्दलची ही जाण आहे? त्या प्रेक्षकाला रस आहे तो मन रिझवणारी, सुरेख दिसणारी आणि नाचणारी एखादी मराठमोळी मैत्रीण झटपट, तात्पुरती आणि हमखास मिळवण्यात. तो साहजिक त्याच्या आवडत्या हिंदी गाण्यांची फर्माईश करतो आणि दिसेल ते पदरी पत्करून पवित्र होतो. गिर्‍हाइकाच्या दौलतजाद्यावर कलाकाराचं पोट असल्याने कलाकारही या दुष्टचक्राचा भाग होतो. मराठी सिनेमे आणि सिनेमातली 'आयटम सॉन्ग'ही ह्या प्रक्रियेला हातभारच लावताहेत. 'देऊळ' चित्रपटातलं 'वेलकम हो राया वेलकम' आठवा. मादक गीतामधला सगळा शृंगारिक नखरा आणि नाजूकपणा काढून टाकला, नि त्यात झटपट पैशाचा माज, लखलखाटाची भूक आणि संपणारी तहान खच्चून भरली तर काय होईल? त्याचंच प्रतिबिंब त्या गाण्यात सही सही पडलेलं दिसतं.
लावणीसारखी एकमेवाद्वितीय, अभिजात कलाही हळूहळू पण निश्चितपणे या सवंगीकरणाची वाट चालू लागलेली आहे.
शाहीर रामजोशी एका लावणीतच म्हणून गेले आहेत,
...कवितारस मनांत झडकरि यावा
पुण्याचा ठेवा
दाता परि नीरस काय करावा,
जन मार्मिक व्हावा...
मराठी रसिकतेची परंपरा मोठी उज्ज्वल, रसाळ आहे खरी. पण आज लावणीचं होऊ घातलेलं हे पॉर्नीकरण टाळायचं असेल, तर जनांनाच मार्मिक व्हावं लागेल...
(छायाचित्र: कुणाल विजयकर)
***
मूळ प्रकाशित लेखन इथे वाचता येईल.