Sunday 19 July 2015

कोरा कागद निळी शाई!


हुंकारभुता बोल काही
अळीमिळी सोडून देई
इतके सारे बोललो तरी
घरभर उरून राही –

       कोरा कागद निळी शाई!

कागदाच्या चल होड्या करू
तो बघ झाला पाऊस सुरू
दिवस गेला लिखा-पढी
सोड की रे अढी-बिढी –

       चल आता मडके भरू!

"कसली अढी कसले काय,
फक्त थोडा रुसलो हाय!"
सगळा धडा पाठ आहे
मान माझी ताठ आहे –

       पण गाण्याचा शेवट नाय?

"ताठ मान हवी खरी
पण आता पुरे तिरीमिरी
म्हणतो राती परतीन घरी
मानगुटीवर बसलेय गाणे -

       गाण्याशिवाय भागणार नाय!"

तेच तर!

हुंकारभुता गाऊ काही
अळीमिळी सोडून देई
नको कागद नको शाई
कोरा कागद निळी शाई? 

       नक्को कागद नक्को शाई!
      


3 comments:

  1. सलाम...मेंदुला जोडा पेना, पण लिवण्याला आपलं म्हणा

    ReplyDelete
  2. देवाशपथ खरं सांगतेय, मी ही कविता असल्या काही क्रिप्टिक अर्थासकट नव्हती लिहिलेली! एका मित्राशी झालेल्या भांडणानंतर खरडलेली कविता. अर्धवट मजेत अर्धवट सिर्‍यसली. पण आता तिचे काहीच्या काहीच अर्थ निघताहेत! च्यायला, कवी कितीही फडतूस असला, तरी कविता आपापलं नशीब घेऊनच जन्माला येतात हे खरं. :)

    ReplyDelete
  3. awadali mala hi kavita! artha birtha sod.. pan mala asha nadamay kavita avadatat. :)
    ani god ahe.

    ReplyDelete