Saturday 27 December 2014

हॅपी न्यू इयर


ब्लॉग या माध्यमप्रकाराकडे छद्मी हसून पाहण्याची सध्याची एक सर्वमान्य पद्धत आहे. व्यक्तिगत अनुभवांचे अर्धकच्चे तपशील, डायरी, प्रेमभंगाचे अभंग, खवासदृश पाडलेल्या कविता, एकांतमैथुनं, लोकसन्मुखतेचं वावडं वगैरे वगैरे लागेबांधे ब्लॉग या गोष्टीला लागूनच येतात, असं एक आहे. तर ते तसं आहेच, हे एक सुरुवातीला मान्य करून ठेवू या. या म्हणण्याचा पुढच्या म्हणण्याशी थेट संबंध शोधायला जाण्यात तसा अर्थ नाही. पण नेपथ्यात वापरलेली प्रॉपर्टी नाटकात प्रत्यक्ष वापरली नाही, तरीही तिचं महत्त्वाचं काम असण्यातून नि दिसण्यातून पार पडत असतं हे माहीत असणार्‍याला त्या म्हणण्याचे अर्थ सापडतील असं धरून चालू.

***

तर - बरेच लोक, बरेच कार्यक्रम, बरीच कामं आणि त्या सगळ्याशी एकसमयावच्छेदेकरून (हा शब्द वापरला की धन्य होण्याची एक नवी परंपरा मराठीत रूढ झालेली आहे. तिला छेद देण्याचा प्रयत्न करतानाच मी तिच्या दिशेनं एक सलाम फेकला आहे. याचाच अर्थ परंपरा म्हणून ती यशस्वीपणे घडली आहे, हे मान्य केलं पाहिजे.) वागताना होत जाणारे आपले असंख्य प्रामाणिक तुकडे असं सध्याचं चित्र आहे.

मी त्यावर नाखूश आहे का?

नाही.

पण माणसांपासून शक्यतोवर फटकून राहून, माणसांइतकी अस्थिर-जिवंत-शक्यताबहुल नसलेली माध्यमं वापरून, जगातलं शक्य तितकं शोषून-चाखून बघण्याची आतापर्यंतची माझी शैली मला मधूनमधून आठवत राहते आहे. त्यात एक धीमेपणा, अखंडपणा, शांतता होती. माझ्या वेगानं गोष्टी स्वीकारण्याची वा नाकारण्याची मुभा होती. मला हवं असेल तेव्हा अंतर्मुख होऊन मौनात जाण्याची सोय होती. आता ते नाही. पुस्तकं आणि इंटरनेट या दोन्ही गोष्टी वापरणार्‍या माणसाला मी करते आहे ती तुलना अधिक जवळून कळेल कदाचित. त्या अर्थानं माणसं इंटरनेटवरच्या संवादी माध्यमांसारखीच असतात असं दिसतं आहे. ती तुम्हांला स्वस्थ बसू देत नाहीत. तुमच्याकडून सतत वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं - अहं, प्रत्युत्तरं? चक. प्रतिक्रिया - प्रतिक्रिया मागतात. तुमच्याकडून बळंच काढूनही घेतात. तुम्हांला थांबू देत नाहीत. त्यांना वाचणार्‍या तुमच्यात होणार्‍या बदलांसह, बदलांमुळे आणि बदलांना न जुमानताही तीही निरंतर बदलत असतात. मागचं पाऊल उचलून पुढे टाकेस्तोवर त्यांच्या असण्याचे आयाम कदाचित बदललेलेही असू शकतात आणि ते तुमच्या मागच्या पावलाशी नक्की कुठल्या प्रकारचं नातं ठेवून असतील ते तुम्हांला सतत जोखत राहावं लागतं; किंवा ते न जोखण्याचे परिणाम स्वीकारायला तयार राहावं लागतं. त्याचेही तुमच्यावर आणि त्यांच्यावर होणारे परिणाम असतातच...

हुह.

हे थकवणारं आहे, प्रश्नच नाही. पण हे विलक्षण दिलचस्प आहे, हेपण आहेच. त्यांतून हाती काय लागतं आहे त्याचे हिशेब होत राहतील. वेळ मिळेल तसतसे. तोवर - पुस्तकं न वाचणारे आणि आधुनिक माध्यमांच्या आणि माणसांच्या तथाकथित झगमगाटात रमणारे लोक उथळ असतात असं विधान सर्वमान्य असण्याच्या दिवसांत त्या विधानाचं पोकळपण तेवढं मी नोंदून ठेवते आहे.

अंतर्मुख होण्याइतकी सवड देणार्‍या, पण तितक्याश्या लोकप्रिय न उरलेल्या, ब्लॉग या माध्यमातून.

हॅपी न्यू इयर.

Friday 12 December 2014

थॅंक्यू पद्मजा, जस्ट फॉर बीइंग!

पद्मजा गेली.

'बायकांचं ललित लिखाण एकतर आक्रमक कंठाळी उत्कट असतं, नाहीतर गुलजार खवासदृश भावनाप्रधान' असा बोचरा शेरा मारणार्‍या एका मित्राला मी पद्मजा फाटक भेट दिली होती. तेव्हा बर्‍यापैकी वाचन असणारा आणि तरीही पद्मजाच्या लेखनाशी अपरिचित असणारा हा माणूस तिच्या अभिनिवेशरहित मिश्कील मुक्तपणानं हरखून गेला होता. माझं काहीही कर्तृत्व नसताना पद्मजाच्या जिवावर मीच कॉलर ताठ केल्याचं आठवतं!

पण त्याबद्दल तिलाही आक्षेप नसताच. तिला हे फुकटचं भाव खाणं कळलं असतं, तर त्यातली तेवढी दाद बरोब्बर पोचवून घेऊन ती मिश्कीलपणे हसली असती फक्त.

तशी ती फार प्रसिद्ध नव्हती. दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात असेलही. पण तो काळ माझ्या फारच लहानपणी घडून गेलेला. पुढे मी वाचायलाबिचायला लागून मराठीतले लोकप्रिय, वादग्रस्त आणि थोरबीर लेखक ओलांडून तिच्यापर्यंत पोचले, तोवर तिची लोकप्रियता ओसरली होती. माझ्या पिढीत तरी कुणाला तिचं नाव फारसं ठाऊक नसे. तिचं 'आवजो' नावाचं पुस्तक मला मिळालं ते योगायोगानं. आमच्या शाळेत बक्षिसादाखल पुस्तकं देण्याची प्रथा होती. कुणी एक उत्साही शिक्षक जाऊन घाऊक उपदेशपर, नैतिक, सुसंस्कारी आणि बजेटात बसणारी पुस्तकं खरेदी करून आणत. त्यात मला 'आवजो' कसं मिळालं, हे एक नवलच आहे. पण मिळालं खरं. तोवर पुलं आणि वपु आणि श्रीमान योगी यांत अडकलेल्या मला एकदम नवंच कायतरी सापडलं त्यात. अमेरिकेचं प्रवासवर्णन हे अगदी अन्यायकारक वर्णन होईल त्या पुस्तकाचं. अमेरिकन कुटुंबांत राहून पद्मजानं घेतलेले अनुभव, त्यातून प्रातिनिधिक मराठी मध्यमवर्गीय
कुटुंबांना त्यांच्याशी ताडून पाहणं, त्यांच्या धारणा-समज-गैरसमज-पद्धती न्याहाळून पाहणं, टोकदार मिश्कील शेरे नोंदणं आणि काठाकाठानं स्वत:लाही पारदर्शकपणे तपासत राहणं होतं त्यात. तिची स्वतःची नास्तिकवजा प्रार्थनासमाजिष्ट पार्श्वभूमी, तिचं टीव्हीवरचं करियर, तिचं वाचन आणि धारदार बुद्धिमत्ता, तिच्यातली आधुनिक लेकुरवाळी शहरी विवाहिता आणि तिचा रोखठोक प्रामाणिकपणा... हे सगळं त्यातून दिसत राहिलं. मग ते नुसत्या अमेरिकन प्रवासवर्णनांहून बरंच काय काय झालं. आंतरजालीय मराठीच्या स्फोटानं अमेरिका अगदी जवळ येण्यापूर्वीच मला अमेरिकेतल्या बर्‍याच समकालीन गोष्टींबद्दल एक अपूर्वाईरहित दृष्टी मिळाली होती, त्याचं मूळ या पुस्तकात आहे बहुतेक.

त्यानं हरखून मी तिची बाकी पुस्तकं शोधायला घेतली, तर 'गर्भश्रीमंतीचं झाड' हे एक लोकांना ठाऊक असलेलं नाव मिळालं. पण इतकी गाजलेली पुस्तकं 'औटऑफप्रिंट आहे' असं सांगण्यात आपल्याकडच्या लोकांना काय गंमत वाटते कुणास ठाऊक, पुस्तक दुर्मीळ. मग स्नेह्यांच्या कपाटांना क्लेम लावणं आलं. अनेक सव्यापसव्य करून ते पुस्तक मिळालं नि त्यातली गुलमोहर, गोनीदा आणि इरावती अशा कैच्याकै गोष्टींनी खुळावलेली अगदी ताजी पद्मजा भेटली. मग 'सोनेलूमियेर'ची एक पिवळी पडलेली प्रत. त्यातली ड्रायव्हिंग शिकणारी, आंबे हापसणारी आणि अगदी नॉनसमीक्षकी रसिकतेनं रोदँचं प्रदर्शन बघणारी पद्मजा भेटली. तोवर आपण या बाईच्या प्रेमात पडलो आहोत, हे मी कबूल करून चुकले होते. 'राही' आणि 'दिवेलागण' हे तिचे अगदी आडवाटेचे कथासंग्रह. पण तेही मी मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कृपेनं मिळवले. एरवी चरित्रांना नाकं मुरडणारी मी. पण तिच्या प्रेमापोटी मी ताराबाई मोडकांचं तिनं लिहिलेलं चरित्रही वाचलं. मग 'माणूस माझी जात' मिळालं. त्यातली मुंबईकरांची अजब आणि दिसे न दिसेशी नाजूक संवेदनशीलता नोंदणारी पद्मजा मला तोवर सवयीची झाली होती. आधुनिक शहरी आयुष्यात ती मनापासून रमलेली असे. परंपरांशी तिला फार कधी भांडावं लागलं नाही आणि ती तशी भांडलीही नाही. त्यामुळे असेल, किंवा तिचा मूळचा गंमत्या स्वभावच असेल, पण तिच्यात कडवटपणा कसा तो नावाला नसे. माणसांच्या वागण्यातली विसंगती नोंदतानाही ती त्यांच्यातला ओलसर माणूसपणा अचूक टिपून घेई. ती पहाटे लिहायला बसे, तेव्हा तिला डिस्टर्ब न करता अलगद दार ओढून घेणारी तिच्या कॉलनीतली वॉचमनपत्नी काय; किंवा विरार लोकलच्या ऐन गर्दीत धावत्या गाडीत चढणार्‍या बाईला सुखरूप वर खेचून मग काळजीपोटी तिच्या मुस्काटीत देणारी लोकलकरीण काय! एरवी सहज निसटून गेली असती, अशी ही शहरी संवेदनेची रानफुलं बघायची तिला खास नजरच होती.

'हसरी किडणी' हे याहून तसं वेगळं पुस्तक. किडण्या निकामी होणं ही एकच गोष्ट पुरेशी धसकवणारी. त्यात आणि परदेशात शिकायला असताना (मध्यमवयात परदेशात वार्धक्यशास्त्र नावाचा नवाच विषय शिकायला गेलेली असताना!) आपल्या किडण्या कामातून गेल्याचं कळणं. त्यात वैद्यकीय विम्याचं संरक्षण नाही. ट्रान्सप्लाण्टचा खर्च आवाक्याबाहेर. मुलं शिकत असलेली. किडण्यांच्या बरोबरीनं अजून नाना रोगांचे अनपेक्षित हल्ले. यांत कुणाचीही सोकॉल्ड मिश्किली कोळपून गेली असती, तर ते सहज समजण्यासारखं होतं. पण ही बाई उपद्व्यापीच! मित्रपरिवारातून आर्थिक बळ मिळवणं, ते करताना मिंधेपण न येऊ देणं, आजारातून उठल्यावर या पुस्तकाच्या रूपानं आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिद्दीनं लिहिणं - तिचं तिलाच जमू जाणे. त्या पुस्तकात किडणीच्या आजारपणाबद्दलचे सगळे तपशील येतातच. शिवाय आपण एक समाज म्हणून या दुखण्याशी कसे वागतो, आपली वैद्यकीय व्यवस्था कोणत्या प्रतीची आहे, आपल्याकडच्या अनेक थोर पारंपरिक पॅथ्या यासंदर्भात कुठल्या पातळीवर आहेत ही थक्क करून टाकणारी सामाजिक निरीक्षणं तिनं त्यात नोंदली आहेत. खेरीज या निमित्तानं तिला नव्यानं गवसलेली आणि कुटुंबातली गृहीत धरलेली मैत्रं आहेत. आपत्कालात माणसं कशी कसाला लागतात आणि तावूनसुलाखून कशी लखलखून बाहेर पडतात, याचं निरीक्षण करणारा एक पोटप्रकल्प आहे. या पुस्तकानं पोटात घेतलेलं तिचं आत्मचरित्र, सामाजिक-वैद्यकीय निरीक्षणं आणि निव्वळ माहिती - यांच्याशी स्पर्धा करणारं दुसरं पुस्तक मराठीत नाहीच.

त्याची तुलना तिनं माधव नेरूरकरांसोबत लिहिलेल्या 'बाराला दहा कमी' या ग्रंथाशीच करावी लागेल. अण्वस्त्रनिर्मितीचा इतिहास हे या पुस्तकाचं ढोबळ वर्णन. अर्थातच ते अपुरं आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थिती, वैज्ञानिकांबद्दलचे समजगैरसमज, युद्ध आणि अस्त्रं यांबाबत वैज्ञानि़कांच्यात असलेलं-नसलेलं सजगपण, त्यांचे आंतरदेशीय संबंध-मैत्र-जळफळाट-हेवेदावे आणि सहकार्य, महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर या वर्तुळात घडलेल्या घडामोडी आणि प्रत्यक्ष अण्वस्त्रनिर्मितीची गोष्ट. मग त्या भयानक संहारानंतर सर्वसामान्य माणसांवर, राज्यकर्त्यांवर, वैज्ञानिकांवर झालेले परिणाम... हेही पुस्तक गेल्या वर्षीपर्यंत 'औटॉफप्रिंट' होतं. चारेक महिन्यापूर्वी ते 'राजहंस'नं पुन्हा बाजारात आणलं.

बायका आणि दागिन्यांशी असलेले त्यांचे (आणि तिचे स्वतःचे) संबंध, दगडांची झाडं बनवण्याची खास अमेरिकी कला, तिच्या आजारपणात तिला आलेले काही अतींद्रिय अनुभव आणि खास पद्मजा-पद्धतीत शोधलेली त्यांची स्पष्टीकरणं, लहान मुलांचं साहित्य, आइनस्टाइनचं घर... यांवरचं तिचं लिहिणं आजारपणानंतर आणि वाढतं वय जमेस धरूनही विलक्षण ताजं-तरुण होतं. 'स्मायली', 'टेडी बेअर', ओरिगामीत भेटणारा जपानी करकोचा अशा गोष्टींवर लिहून त्यांच्याशी आधुनिक माणसांचे असलेले लडिवाळ संबंध उलगडून दाखवावेत, तर ते तिनंच.

आता वाटतं, आपल्याला तिला हे सगळं सांगता आलं असतं. ते आता राहून गेल्याची खंत करावी का? तर नयेच. कारण आइनस्टाइनच्या डॉक्टरांना भेटायची संधी असतानाही भेटावं की भेटू नये, अशा आट्यापाट्या स्वतःशीच खेळत, संकोचापोटी ती भेट हुकवल्याचं तिनंच एका ठिकाणी नोंदलं आहे. आणि आपल्याला आइनस्टाइन 'आधीच आणि निराळा भेटला' होता की, अशी सारवासारव करत आपल्या संकोचाचं लब्बाड स्पष्टीकरणही दिलं आहे.

तिला माझी गोची बरोबर ठाऊक असणार!

थॅंक्यू पद्मजा, जस्ट फॉर बीइंग. :)

Friday 5 December 2014

गेलं वर्ष-दीड वर्षं मी काही वाचलेलं नाही

गेलं वर्ष-दीड वर्षं मी काही वाचलेलं नाही.

तांत्रिक दृष्ट्या हे वाक्य चूकच म्हणायला हवं. कारण पोटापाण्यासाठी करण्याचं माझं काम, आयुष्याचा प्रचंड मोठा भाग व्यापून बसलेली मजकूरप्रधान माध्यमं आणि निवळ सवयीनं चाळली वा ढकलली जाणारी पुस्तकं मोजली तरी बरंच वाचन भरेल. 

पण एकूणच पुस्तकांतलं गुंतलेपण बदललं आहे. पूर्वी पुस्तकाचा कणा पाहून ते कुठलं पुस्तक आहे हे अचूक ओळखता येई. पुस्तकं कितीही अस्ताव्यस्त वाढत गेली, तरीही आपल्याला हवं ते पुस्तक काही मिनिटांत अचूक सापडे. कोणती पुस्तकं कुणाकडे गेली आहेत, ते लक्षात राहण्याकरता नोंदी करण्याची गरज भासत नसे. नवं काय वाचण्याजोगं आहे, काय वाचलंच पाहिजे, काय प्रकाशित होऊ घातलं आहे, काय कुठे मिळण्याची शक्यता आहे - याचे हिशेब डोक्यात पृष्ठभागापाशीच असत. आवृत्ती संपलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती बाजारात आली आणि आपल्याला पत्ताच नाही, असे लाजिरवाणे प्रसंग येत नसत. हल्ली... 

असो. हे पुस्तकांच्या सगुण भक्तीविषयी झालं. निर्गुण भक्ती? 

तिथेही बदल घडले आहेतच. प्रेमभंग ताजा असताना प्रियकराचं नाव उघडपणे घेणं जसं ओल्या जखमेवरची खपली काढण्यासारखं भीषण वाटतं, त्या जातीचं पुस्तकांविषयी वाटत असे. आपल्याला प्रचंड आवडणार्‍या पुस्तकाला कुणी नाव ठेवलं, तर त्या माणसावर मनातल्या मनात फुली मारणं. कर्मधर्मसंयोगानं फुलीगोळा शक्य नसला, तर मग एक दीर्घ नि:श्वास सोडून वादाची तयारी. पुस्तकांतल्या व्यक्तींविषयी रक्तामांसाच्या माणसांसारखी आपुलकी. संदर्भासह आणि संदर्भाशिवाय त्यांतली उद्धृतं आठवून येणं. आपण बोलून न दाखवलेली उद्धृतं दुसर्‍या कुणी बोलून दाखवली, तर बोलणार्‍याविषयी अलोट माया उफाळून येणं. 

आता? माझ्या एका आवडत्या लेखकानं दुसर्‍या आवडत्या लेखिकेविषयी बोलताना छद्मी प्रतिक्रिया दिली, तरीही मी समजूतदार, शांत आणि स्वीकारशीलच. अर्थात - साक्षात सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या वेळीही गावाबाहेर असणं, लोकांचा हिस्टेरिया कुतूहलानं टीव्हीवर पाहणं आणि तरी सचिनविषयी कडवट नसणं जिथे मला साधलं आहे, तिथे...

तर हेही असो!

याचं प्रतिबिंब माझ्या लिहिण्यामध्ये पडलं असणारच. (अभिव्यक्ती हा शब्द खोडून, मी लिहिणे हा शब्द वापरला आहे. झालं का!) लिहिण्याच्या जागा बदलल्या आहेत, हे एक. ब्लॉगचं काहीसं आडवाटेचं माफक खाजगीपण आणि फोरम्सवरचा चावडीसदृश गलबला यांच्यातल्या फरकाइतकाच फरक माझ्या लिहिण्यातही पडला आहे, आणि हे फक्त जागांमधल्या बदलांमुळे घडलेलं नाही. किंबहुना परिणाम आणि परिणती या गोष्टींची वर्तुळं माझ्या डोक्यात तितकीशी स्पष्ट आणि नेमकी नाहीत. विषय बदलले आहेत, शैली बदलली आहे. नेव्हल गेझिंग हा तुच्छतादर्शक उद्गार मी पुरेशा गंभीरपणे घ्यायला शिकले आहे. पण म्हणून अभ्यासपूर्ण-माहितीपूर्ण-अललित लेखन म्हणजेच ’खरं’ लेखन हे मी मान्य केलेलं नाही. ’स्पॉण्टॅनियस ओव्हरफ्लो’ असला की पुरे, ही समजूत सोडून मी थोडी पुढे आले आहे, मात्र. त्यामुळे ’तुझिया ओठांवरचा मोहर मम ओठांवर गळला गं’ लिहिणारे करंदीकर मला जितके जवळचे वाटतात, तितकेच गणपतीची सोंड नि श्लीलाश्लीलतेचा कर्दम यांवर विरूपिका लिहिणारे आणि भावनादुखाऊ लोकांना त्या विरूपिकेचं जबाबदार स्पष्टीकरण देणारे करंदीकरही जवळचे वाटतात. भावनांचं ओथंबलेपण आणि तर्ककठोर कोरडेपण, शैलीदारपणा आणि अनलंकृत शैलीविहीनता, प्रयोग आणि परंपरा, ताजेपणा आणि टिकाऊपणा, प्रेम-प्रेमभंग-दारू-जंगल आणि समाज-लोकशाही-पुरोगामित्व या टोकांपेक्षाही त्यांच्या अधल्यामधल्या प्रदेशांत असणार्‍या गोष्टी आता जास्त प्रेमानं न्याहाळल्या जातात.’आपल्याच बापाचं आहे इंटरनेट - आलं मनात, खरड आणि छाप’ या स्वातंत्र्यासह येणारे तोटे आता हळूहळू कळू लागले आहेत. 

नि आता - हे सगळं पुस्तकांपासून सुरू झालं की वाचायच्या पुस्तकांमध्ये केवळ प्रतिबिंबित झालं याबद्दलही मला प्रश्न पडायला लागले आहेत! 

ही गोंधळाची सुरुवात की सुरुवातीचा शेवट? असो. असो.

Wednesday 7 May 2014

स्वप्नसर्प


जागांशी जडती नाती
नात्यांच्या दुखर्‍या जागा |
पावसात गुंतून राही
मायेचा अवघड धागा ||

माळावर सूर्य उद्याचे
दिवसाची देती ग्वाही |
रात्रींचा हुरहुरवारा
तरी जिवास वेढून राही ||

चढलासे बघ मज सखया
हा मोहफुलांचा अर्क |
देहात फुलांचे दंश
डसला स्वप्नांचा सर्प...

Tuesday 18 March 2014

परत एकदा


पाय ठेवायला जराही जागा नसताना
इथल्या अधांतरात हरपून जाऊ नये मी,
म्हणून शोधत राहते कवितेची एखादी अर्धीमुर्धी ओळ
माझ्याआत.
ती सापडेस्तोवर
नाकातोंडात काळोख जाऊन
जीव जातो की राहतो असं झालेलं
इगोबिगो गेले खड्ड्यात-
असायचं आहे
राहायचं आहे
हरवायचं नाहीय -
इतकाच जप
आणि जीव खाऊन शोधणारे थरथरते चाचपडते हात.
बोटांना कवितेच्या ओळीचं सुटं टोक लागतं,
तेव्हाही शांत नाही वाटत लगेच.
जीव धपापत राहतो कितीतरी वेळ
एका टोकाला घट्ट धरून
विणत राहते मी कविता
कुठवर
कुणास ठाऊक.
एक क्षण असा -
हात
कविता
आणि
मी
एकच.
आजूबाजूची अंधारी अनिश्चिती बदलून
पहाटेचा कोवळा प्रकाश उमललेला सगळीभर
पावलांखाली घट्ट ओलसर माती.
मी खोल ताजा श्वास भरून घेते छातीत
आणि कवितेचा दिवा सोडून देते
अंधारउजेडाच्या सीमेवर,
अर्धपिक्क्या गाभुळलेल्या आकाशात.
विरत्या चांदण्यांत
पिवळा प्रकाश सांडत
दूर दूर विरत जाणारी आपलीच कविता पाहताना -
नवं होतं सगळं
परत एकदा.

Friday 17 January 2014

पुन्हा या रस्त्यांवरून


शरीराच्या शरीरावर उमटणार्‍या मुद्रा
तात्पुरत्या आणि आजन्म,
उष्ण आणि जिवंत गरजांनी भारलेल्या,
विलक्षण खर्‍या,
आज-आत्ताच्या क्षणात पाय घट्ट रुतवून धरणार्‍या,
उद्यामध्ये पूर्ण बहरण्याच्या अनंत शक्यतांची बीजं पोटी घेऊन असणार्‍या.
मान्य.
पण त्यातच आहेत आपल्या बहुमितीय प्रसरणशील होऊ शकणार्‍या नात्याला चौकटींचे क्रूर संदर्भ देण्याच्या शक्यताही.
उद्या,
शरीरानं शरीरावर उमटणार्‍या मुद्रा
टळणार नाहीत.
ही अपरिहार्यता
आणि आश्वासनही.
तोवर जगून घेऊ देत मला
आपल्यामधले अशारीर, निवळशंख क्षण.
कसल्याही सस्पर्श देवाणघेवाणी शक्य नसताना
एकमेकांना उद्देशून हवेवर लिहिल्या गेलेल्या कवितांच्या ओळी.
प्रिय व्यक्तींनी दिलेले सल मिटवून टाकता येतील आपल्या कोवळ्या सुरांनी
अशा भाबड्या आशा बाळगत तळ्याच्या काठावरून सोडून दिलेल्या लकेरी.
टक्क जाग्या रात्री एकमेकांना सोबत करत, लखलखत्या आभाळाकडे पाहत
एकमेकांना सांगितलेल्या सुरस आणि चमत्कारिक, पर्युत्सुक सिनेमास्कोपिक गोष्टी.
शब्दांची, अर्थांची आणि मौनांचीही भाषांतरं.
स्पर्शांच्या तहानेइतकं हे सारंही माझ्या आतड्याचं आहे,
हे तुलाही ठाऊक असेलच
असा अनाकलनीय विश्वास...
जगून घेऊ देत.
पुन्हा या रस्त्यांवरून
आपण चालू न चालू...


Friday 3 January 2014

वाटेवरल्या मुशाफिरास


ही फार आवडलेली एक कविता -

To a Stranger..

PASSING stranger! you do not know how longingly I look upon you,
You must be he I was seeking, or she I was seeking, (it comes to me, as of a dream,)
I have somewhere surely lived a life of joy with you,
All is recall’d as we flit by each other, fluid, affectionate, chaste, matured,
You grew up with me, were a boy with me, or a girl with me,
I ate with you, and slept with you—your body has become not yours only, nor left my body mine only,
You give me the pleasure of your eyes, face, flesh, as we pass—you take of my beard, breast, hands, in return,
I am not to speak to you—I am to think of you when I sit alone, or wake at night alone,
I am to wait—I do not doubt I am to meet you again,
I am to see to it that I do not lose you.

- Walt Whitman

आणि हा तिच्या भाषांतराचा प्रयत्न -

वाटेवरल्या मुशाफिरास -

१.

परिचयाची खूण नाही, नाही वा लवलेशही
स्पंदनांचा मात्र तुझिया भास हो मज प्रत्यही
आसावल्या स्वप्नांतही तू स्वप्न होऊन राहसी
कोण जाणे कोणत्या जन्मातुनी ये ओढ ही?
आज या पिकल्या क्षणी वाटांस वाटा भेटता
गाठ नाही, भेटही पण, स्पर्श होई निसटता
या क्षणातून वाहिले, जे जे उधळले, जे राखले
कोण जाणे कोणत्या जन्मात येईल सांगता?
हेच होते हेच सारे, होय, हे मज लाभलेले
हातांत हातां मन गुंफुनी एकमेकां वाहिलेले
स्तन्य माझे, वीर्य माझे - ओठांतुनी ओठांतही
कोण जाणे कोणत्या जन्मात आपण प्राशिले?
मात्र आता एकट्याने, चालायचे, चालायचे
कातरी वेळांत दचकून तुज पुन्हा आठवायचे
पडतील फिरुनी गाठी अपुल्या, नक्की, मला ही खातरी
निर्धार आता हाच तोवर ना तुला हरवायचे

२.

तुझ्यावर खिळलेल्या माझ्या नजरेतली ही ओढ तुला पुरती ठाऊक नाही.
तुझेच स्पप्न पडत आले आहे मला वारंवार, तुला खरेच ठाऊक नाही.
कुठल्यातरी एका जन्मात नक्की खिदळलो आहो आपण एकमेकांसोबत
आपल्या ओझरत्या स्पर्शाच्या या निसटत्या क्षणातून,
वाहत निघाले आहे आपल्यामधून बरेच काही...
कुठल्यातरी एका जन्मी
ऐकले आहेत आपण एकमेकांच्या नाडीचे ठोके कान लावून
दिले-घेतले आहेत काही चिमणीचे घास, काही ऊबदार श्वास -
इतके की - आता आपल्या शरीरांतही केवळ आपले असे,
फार काही उरले नाही...
वाटेवरच्या या निसटत्या क्षणीही अचूक माझ्यापाशी पोचते आहे तुझी नजर
तुझ्या अंगाचा गंधही पोहोचतो आहे थेट इथवर
तसे तुझे तरी हात मोकळे कुठे आहेत?
माझ्या अंगांगांचे सारे वळसे वेढून बसले आहेतच की तुलाही...
इथून पुढली वाट मात्र एकट्यानेच काटायची आहे.
माझ्या ओठांवर असणार आहे लाखबंद मोहोर,
नि रात्रीलाही तुझ्या आठवणीचाच काय तो आधार आहे.
पण मला ठाऊक आहे -
अमावास्या जरी झाली, तरी उजाडायचे काही राहत नाही
फक्त तोवर हरपू द्यायचे नाही तुला क्षितिजापार...
मग गाठ पडायची काही राहत नाही!