Tuesday 31 December 2013

पाणी

उसळता एकान्त येथे |
निरवतेचा बोल आहे |
आज इथले खोल पाणी |
वाट फोडत वाहताहे ||

रम्य तारे रम्य वारे |
पाखरे दवी न्हायलेली |
मात्र पाणी साहताहे |
रात्र काळी रात्र ओली ||

उजळलेले काठ काही |
नांदते घर वाट पाही |
चंद्र पोटी पोसणार्या |
पाण्यास त्याचा ठाव नाही ||


Sunday 22 December 2013

बोंबील आणि बॅरल


पुनरुत्पादनाच्या प्रेरणेनं पुरुष आणि स्त्रिया सर्वसाधारणतः एकमेकांकडे आकर्षित होतात हे खरं. पण पुनरुत्पादन ही लैंगिक संबंधांची एकमात्र प्रेरणा नाही. त्या क्रियेतून मिळणारा आनंद ही एक महत्त्वाची प्रेरणा आहे. स्त्रीच्या योनीत पुरुषाचं लिंग या संभोगप्रकाराखेरीज इतर सर्व मैथुनप्रकार, गर्भनिरोधक साधनं, कायदेशीर गर्भपात, प्राणिसृष्टीतही आढळणारे समलिंगी संबंध या सार्‍यांच्या अस्तित्वातून हेच सिद्ध होतं की पुनरुत्पादन ही लैंगिक संबंधांची एकमात्र प्रेरणा नाही. असं असताना अमुक एका प्रकारचे संबंध / आकर्षण नैसर्गिक आणि बाकी अनैसर्गिक, असं कसं ठरवणार? असं ठरवण्याला कुठलाही ठोस आधार देता येत नाही. एकदा माणूस नैसर्गिक म्हटला की तो जे जे करेल, ते सगळं नैसर्गिकच. अर्थात कोणत्याही नैसर्गिक गोष्टींवर बंधनं नसावीतच असं म्हणणंही धोक्याचं आहे (हिंसेची प्रेरणा नैसर्गिकच आहे). पण एखादी कृती नैसर्गिक आहे की अनैसर्गिक हा त्या गोष्टीची योग्यायोग्यता ठरवण्याचा आधारच नव्हे. ती कृती करण्यामुळे इतर व्यक्तींच्या स्वातंत्र्याचा संकोच होत नाही ना, त्यांच्यावर अन्याय होत नाही ना याची खातरजमा करणं महत्त्वाचं आहे.
समलिंगी संबंधांना दोन व्यक्तींची परस्परसंमती असेल, तर त्यामुळे इतरांवर काय अन्याय संभवतो? कोणताच नाही.
मग त्याला विरोध करण्याला आधार काय?
माणसाच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणत, समलिंगी संबंध बेकायदेशीर ठरवणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी निषेध करते.

***

मराठीत फॅनफिक्शन तर नाहीच, दर्जेदार इरॉटिकाही नाही. ’शेरलॉक’ ही ’बीबीसी’ची मालिका आणि मुख्यत्वेकरून तिच्यावर लिहिली जाणारी फॅनफिक्शन यांनी मला फॅनफिक्शन, इरॉटिका या प्रकारांची रसभरित ओळख तर करून दिलीच - पण लैंगिकतेचं विविधांगी भान आणून देण्याला त्यांनी बराच हातभार लावला. त्यातल्या एका शृंगारिकेचं भाषांतर करून हे ऋण थोडंसं फेडायचा मानस बरेच दिवस होता. पण काही केल्या झेपत नव्हतं. मातृभाषेत इरॉटिका, नि चांगली इरॉटिका लिहिणं किती अवघड ते लक्षात येऊन अनेकवार हतबल तेवढं व्हायला होत होतं. ते भाषांतर पुरं व्हायला निमित्त झालं, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचं.
त्याबद्दल भूमिका घेताना काहीतरी सकारात्मक कृतीची जोड त्याला असली पाहिजे असा माझा आग्रह होता. त्यासाठी हे भाषांतर पुरं केलं. दमछाक झाली, पण मजाही आली.
हे थोर भाषांतर नाही, मान्य आहे. पण कुठूनतरी सुरुवात करावी लागतेच.

इथे हे भाषांतर उपलब्ध आहे.

शीर्षकाचा संदर्भ: विलास सारंग यांची ’मुक्त शब्द’च्या २०११ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली कथा.

Sunday 15 December 2013

टीव्ही: नॉस्टाल्जिया, नौटंकी आणि निरीक्षणं


मला टीव्ही बघायला जाम म्हणजे जामच आवडत असे. दूरदर्शनचं ते ’टॅऽऽणॅणॅणॅ-टॅणॅणॅऽऽणॅणॅऽऽ’, माना वेळावून मानेचे व्यायाम दाखवणारा दाढीवाला सरदारजी, मूकबधिरांसाठीच्या बातम्या, ’एक चिडिया... अनेक चिडिया’वालं ऍनिमेशन, ’मिले सूर मेरा तुम्हारा’... असं करत करत नाना रस्ते घेता येतील नि शेवटी आपण ’काय साला दर्जा असायचा त्या काळात टीव्हीचा! नाहीतर हल्ली...’पर्यंत एकमुखानं येऊन पोहोचू.

पण ते कढ पुढे कधीतरी काढू. तूर्तास तरी हे पोस्ट माझ्या ब्लॉगवरचं नि त्यामुळे माझ्याबद्दलचं आहे.

तर - मला टीव्ही बघायला जाम म्हणजे जामच आवडत असे. इतका की, एकदा वर्षाअखेर दाखवला जाणारा निवडक गाण्यांचा ’सुपरहिट मुकाबला’ काही कारणानं हुकला, तर मी हमसून हमसून रडले होते. माझ्या टीव्ही बघण्यावर आईबापाचा प्रचंड अन्यायकारक आक्षेप असे नि त्या काळात आमच्यातले मेजर खटके (उर्फ एकाधिकारशाहीविरुद्धची बंडं उर्फ तमाशे) टीव्ही या एकमात्र कारणावरून उडत. तेव्हा आमच्याकडे खटके पाडून च्यानेलं बदलणारा (सगळी मिळून दोन. नॅशनल नि मेट्रो. अजून एक च्यानेल कधीतरी सरकारकृपेनं दिसत असे. त्यावर रात्री अकरा वाजता चार्ली चॅप्लिन, गुरुदत्त या मंडळींचे काही सिनेमे पाहिल्याचे आठवतात. त्यातही ’कशी मी जागून, क्लॅरिटी नसलेल्या च्यानेलावर दर्जेदार सिनेमाचा अभ्यास कम रसग्रहण करू पाहतेय, पण आईबापाला किंमत नाही’ हा एकूण नूर. (असो. या पोस्टाचा बराचसा भाग अनुक्रमे नॉस्टेल्जिया वारण्यात नि त्याला शरण जाण्यात खर्ची पडणार आहे.) तर, असो.), शटर सरकावून पडदा बंद करणारा ब्लॅकऍण्डव्हाइट टीव्ही होता. ’केबल असली की अभ्यास होत नाही’ या तेव्हाच्या पालकप्रिय समजुतीप्रमाणे केबल फक्त मे महिन्याच्या सुटीत जोडण्याचा प्रघात होता. (हल्ली मुलांचे अभ्यास कसे होतात कुणास ठाऊक. बहुदा ही समजूत मोबाईलमार्गे इंटरनेटकडे सरकली असणार. तत्कालीन माध्यमांतलं सगळ्यांत प्रगत नि सगळ्यांत रोचक असं जे काही प्रकरण असतं, त्याच्यामुळे अभ्यास होत नाही असं हे समीकरण दिसतं.) परिणामी मला मेट्रोशिवाय तरणोपाय नसे. पण म्हणून काही अडलं असं नाही. मैदानी खेळांचं नि माझं सख्य तसंही कधीच नव्हतं. घनिष्ट मैत्रीही शाळेतच. त्यामुळे दिवसातला शाळेचा आणि झोपेचा वेळ वगळता बहुतांश वेळ मी टीव्हीला वाहिलेली असे. चष्म्याचा नंबर वाढणं आणि सामाजिक कौशल्यं जेमतेम पासापुरती असणं या दोन गोष्टी सोडल्या तर टीव्हीनं माझ्यासाठी पुस्तकांच्या खालोखाल महत्त्वाची भूमिका बजावली. सिनेमा या माझ्या प्रचंड आवडत्या विषयाशी ओळख करून दिली ती टीव्हीनंच. अधलामधला संतापजनक जाहिरातींचा व्यत्यय सहन करून मी इतके सिनेमे कसे काय पाहिले हे आजच्या मला अगम्य वाटतं. पण तेव्हा त्या जाहिरातींचं, ’फक्त सुटीत केबल मिळेल’ या दंडेलीचं, अशक्य वाईट दर्जाच्या थेटरप्रिंट्सचं इतकं काही वाटत नसे हे खरंच. सुटीच्या काळात तर मी दिवसाला पाचपाच सिनेमेही पाहिल्याचं आठवतं. (आईबाप बोलून थकले. चष्म्याच्या अधिकाधिक स्मार्ट फ्रेम्स येत गेल्या. अभ्यास आणि व्यायाम या गोष्टींची एकूण आयुष्यातली नगण्य पण अपरिहार्य जागा मी स्वीकारली. पण त्या काळात टीव्हीचं प्रमाण मात्र अटळ राहिलं.) परिणामी मी हिंदी सिनेमा (नट, दिग्दर्शक, त्यांची खाजगी आयुष्यं, एकुणात अभिरुचीबद्दलचं झेपेल तितपत आकलन, समांतर आणि मुख्यधारेतला सिनेमा इत्यादी सवतेसुभे, विशिष्ट वर्षांत गाजलेले, पडलेले, चाललेले, चांगलेवाईट सिनेमे, त्यांतली गाणी नि ड्वायलॉक) या विषयात पुरेशी अधिकारवाणी आणि बरंच बरंवाईट पाहून झाल्यावर येणारी जाणकार उदासीनता कमावली. (हीच उदासीनता प्रमाणाबाहेर वाढली की ती आपल्याला ’बनचुके’ हे लेबल बहाल करते हे ज्ञानही यथावकाश झालं, पण त्याकरता एका प्रेमभंगाच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून जावं लागलं. असो. असो.) कुठल्याही एका विषयात आवडीनं नि झपाटून अशी - आपल्यापुरती का होईना - अधिकारवाणी कमावताना किती विषयांमधे रानोमाळ हिंडून होतं, किती गोष्टी काठाकाठानं आपोआप समजत जातात ते आता लक्षात येतं.

त्यामुळे आता टीव्ही आणि मी (आणि टीव्ही आणि पालक, पालक आणि मी) यांच्यातलं नातं पार उलटंपालटं झालेलं असलं, तरी टीव्हीबद्दलच्या नॉस्टाल्जियाला मी थोडी तरी विकली जातेच.

***

टीव्हीमुळे घरकोंबडे असलेले माझे समवयस्क संध्याकाळी बाहेर पडू लागायला बहरता राममारुती रोड हे एक कारण होतं, तसं डेली सोप्स हेही एक महत्त्वाचं कारण होतं. निदान माझ्यासाठी तरी होतंच होतं. (एकदा संध्याकाळी बाहेर पडायला लागल्यावर त्यातले अनेक रंगीबेरंगी फायदे मला यथावकाश कळत गेले ते निराळं. पण निमित्त मात्र टीव्ही असह्य होण्याचंच होतं.)

त्याच काळात मराठी वाहिन्या एकाएकी विऊन बसल्या. काही लायकीचे कार्यक्रम झाले, नाही असं नाही; (आता आठवून लैच धमाल येते, पण तेव्हा लोक ’नक्षत्रांचे देणे’चं तिकीट मिळवायला धडपडत नि ते मिळाल्यास प्रेक्षकांत झळकून आप्तमित्रांत त्याचा पुरावा देऊन यथाशक्ती मिरवत.) पण त्यांच्याही कॉप्या निघाल्या. पॉप्युलर पुस्तकांवर मालिका निघून संपल्या. नि मग टीव्हीत काही बरं करावं, त्याकरता कष्ट घ्यावेत, कौटुंबिक घमणसा सोडून इतर काही लिहावं... याचा टीव्हीतल्या लोकांना एकदम सामूहिक कंटाळाच आला. गणपती आला, की हर एक मालिकेत लोक नटूनसजून गणपती आणून बसवत. सगळीकडे नुसत्या सुबक-सुरेल-सजावटी आरत्याच. दिवाळी आली, की सगळ्या मालिकांत दिवाळीच. यच्चयावत मालिकांतल्या बायका नटूनसजून ठुमकत ठुमकत व्हरांड्यात येणार, पणती ठेवणार नि कुर्त्यातले पुरुष त्यांच्याशी माफक रोमॅण्टिक चेष्टामस्करी करणार. सण साजरे करायची कोण अहमहमिका. (तोवर सण साजरे करणं म्हणजे आपली संस्कृती जपणं असा आचरट फण्डा रूढ व्हायचा होता. तो व्हायला तिथूनच सुरुवात झाली असणार. लोक आधी या फण्ड्याला बळी पडले की टीव्हीनं आधी त्याची टूम काढली याचं उत्तर नेहमीप्रमाणे वादग्रस्तच, त्यामुळे ते मरो. पण स्वत:च्या लग्नात नऊवारी साड्या नि धोतरं नेसून संस्कृती जपणं (जशी काही होललॉट महाराष्ट्राची संस्कृती ब्राह्मणी लुगड्यात नि नथीत गहाण पडली होती), दसर्‍याच्या आदल्या रात्री सामूहिक दीपोत्सव नि चैत्रपाडव्याला शोभायात्रा साजर्‍या करणं, मराठी भावगीतं हा संस्कृतीचा अत्युच्च मानबिंदू असल्याच्या थाटात ’दिवाळी पहाट’ ष्टाईलचे कार्यक्रम करणं नि ऐकणं... हे सगळं त्याच काळात उपटलं.) अशा निरनिराळ्या लाटा येत राहिल्या. (’आजतक’ हा एक बातम्यांचा चांगला कार्यक्रम होता. तो हिंदी न्यूजच्यानेलांमधला ’पुण्यनगरी’ होण्यापर्यंतचा प्रवासही याच दिवसांतला. (पण न्यूज च्यानेलांच्या वाट्याला नको जाऊ या. ते एक स्वतंत्र प्रकरणच आहे.) हिंदी सिनेमे, सिनेमातली गाणी आणि टेस्ट क्रिकेटही हे सगळंही गप ब्याकफूटला गेलं. गाणी जाऊन सिनेमांचे प्रोमोज दिसायला लागले.) चराचर व्यापून फक्त मालिकाच काय त्या उरल्या.

सण झाल्यावर काही काळ लफडी करणार्‍या स्त्रीपुरुषांचा जोर होता. मग कपाळावर नागकुंकू काढणार्‍या मॉडर्न खलनायिका आणि त्यांच्याशी तुलनेला साटोपचंद्रिका तुपाळ आदर्श नायिका असा एक जमाना होता. मग बराच काळ खलनायिकांनी निरनिराळी कारस्थानं करायची, सज्जन नायकांनी त्या कारस्थानांतून साटोपचंद्रिकांना वाचवायचं आणि आपली सॅडिस्टिक कल्पनाशक्ती पणाला लावलावून खलनायिकांना शिक्षा करायच्या असा एक प्रकार होता. (चांगल्या पन्नाशीतल्या कर्त्यासवरत्या बायकांना अंगठे धरून उभे करणे, तोंडाला काळे फासून घरभर फिरवणे, उठाबशा काढायला लावणे वगैरे शिक्षा बघून मी आणि मैत्रिणीनं फेटिश या अद्भुत प्रकारावर चर्चा केलेली आठवते. असो.) सध्या लग्न या गोष्टीची चलती आहे. लग्नाळलेले, लग्नाला बिचकलेले, लग्न करून मग प्रेमात पडलेले, एकत्र कुटुंबामुळे लग्न नको / हवं असलेले... असे नाना प्रकार. लग्नाची पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट... फ्याक्टरी चालू.

माझ्या हातातला रिमोट पालकांच्या हातात जाणे आणि टीव्हीची आयुष्यातली जागा कमी होत जाणे हे महत्त्वाचं स्थित्यंतर याच काळात झालं.

***

टीव्हीची बाजू घेऊन माझ्याशी भांडायची वेळ कुणावर येणार नाही. कारण मी माझ्या ष्टाईलनं त्या माध्यमाचा पुरेपूर फायदा घेऊन बसले आहे. पण आता मला काही प्रश्नही पडले आहेत. टीव्ही अजून तगून आहे खरा. पण आघाडीचं माध्यम म्हणून त्याची जागा अजून शाबूत आहे का? की इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगनं ती जागा घेतली आहे? हल्ली लोक टीव्हीवर आवर्जून काय पाहतात? (कृपा करा आणि त्या ’आई, शू करायला जाऊ का?’ असं विचारणार्‍या चाळिशीतल्या मद्दड बायका असलेल्या सिर्यलचं नाव सांगू नका. राडा होईल. असो.) टीव्हीवर आवर्जून पाहण्यासारखं काही उरावं, असं काही बलस्थान त्या माध्यमापाशी अजुनी आहे का?

मला या प्रश्नांच्या उत्तरांत मनापासून रस आहे, कारण लोकांना मी घरकोंबडी-चष्मिष्ट-मद्दड वाटत असू शकत असेन अशा काळात मी टीव्हीपासून खूप काही मिळवलं आहे. खरोखर मला टीव्ही बघायला जाम म्हणजे जामच आवडत असे...

Sunday 10 November 2013

हे श्रेय न माझे...


कवितांनी भरून येण्याचे दिवस.
असतात.
’काय लिहावं’पासून ’लिहावं का’पर्यंत
’वाचणं, लिहिणं आणि करणं’ यांच्या भाजणीचे.
चर्चांच्या निष्क्रिय निवांत बुडबुड्यांचेही...
जातात.
  अजून कविता मात्र ’होते’.
  अंगासरशी बसणारा,
  वापरून विटका, मऊ झालेला
  जुना कुर्ता ’होतो’, तशीच.
जुन्या कविता
  जाऊन बसतात कपाटांतून.
  नव्या हाताशी पुस्तकांतून.
  काही डायरीच्या पानांवर, काही सवयीनं ओठांवर.
  काही अजुनी आठवतात, म्हणून थोडं शरमल्यासारखं होतं चारचौघांत.
तरी कविता
  नाकारत नाहीत आपल्याला.
  अर्थांच्या पाकळ्या उमलत राहतातच त्यांतून.
  कवेत घेत राहतात त्या आपलं बदलतं जग.
  चकित करत राहतात.
  चक्राकार वाटांचं भान पुरवत राहतात.
पुन्हा पुन्हा
  कवितांपाशी नेऊन सोडत राहतात,
   जिवंत असतो आपण तोवर.
  जिवंत राहण्याचं पक्कं ठरवून घेतो,
   तिथवर
कवितांनी भरून येण्याचे दिवस.
राहतात.

Monday 4 November 2013

खेळघर

आज ’खेळघर’ (रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ) वाचलं. आधीच कबूल करते, माझी प्रतिक्रिया थोडी गोंधळलेली आहे.


मी एका सवर्ण कुटुंबातली, मार्कबिर्कं मिळवणारी, वाचणारी-बिचणारी, मुंबईत राहणारी व्यक्ती. आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचं अमुक इतपत भान नसलं, तर व्यक्तिमत्त्वात फाउल धरतात; त्यामुळे वर्तमानपत्रं नि आता इंटरनेटच्या माध्यमातून अद्ययावत इत्यादी राहायला धडपडणारी. मला आमटे कुटुंबीय ठाऊक असतात. उत्तरोत्तर त्यांना मध्यमवर्गात मिळत गेलेली प्रतिष्ठा आणि त्यांचं बालाजीसदृश पापमुक्ती देणारं स्टेटसही. अवचटांचं मुक्तांगण आणि त्यांची दिवाळी अंकातली प्रथितयश होत गेलेली कचकड्याची साहित्यिकी ठाऊक असते. मला बंगांचं ’सर्च’ही ठाऊक असतं आणि बालमृत्यूंवरच्या संशोधनापेक्षा फेमस झालेलं ’माझा साक्षात्कारी हृदयरोग’सुद्धा. मला समाजवादी पार्श्वभूमी असलेले मित्र असतात. त्यांच्या कुटुंबातला वेगळेपणा आणि माझी सर्वसामान्य नेमस्त हिंदूबिंदू पार्श्वभूमी जमेस धरूनही आमचे प्रश्न आणि आमचं गोंधळलेपण बरंचंसं सारखंच, एकाच टप्प्यावरचं.

अशात गोष्टीबिष्टीत म्हणून तरी एखाद्या माणसाला असली यशस्वी सामाजिक प्रयोगाची परीकथा लिहावीशी वाटते, याचं अप्रूप वाटलं. मजा वाटली. जवळीक वाटली. पण मला तिनं भारून नाही टाकलं.

या लिहिण्यातल्या रचनेत, तिच्या भाषेत किती तुटलेपणा असावा? ती भाषा कुठलीच नाहीय. ना शहराची, ना गावाची. ना बाईची, ना बुवाची. ना पुण्याची, ना मुंबईची. ना ती पात्रानुसार बदलते, ना नेपथ्यानुसार. ती फक्त लेखक नामक प्राण्याची भाषा आहे, इतकंच सारखं कळत राहतं. आयन रॅण्ड जर अमुक एका वयाच्या नंतर वाचली, तर तिच्या गोष्टीतली तीच एकसारखी दिसत राहते नि वैताग-वैताग होतो तसं काहीतरी ही गोष्ट वाचताना होत राहतं. लेखकाची स्वप्नंबिप्नं ठीक आहेत. पण म्हणून ही अशी प्लॅस्टीकची भाषा नि कटाउट्ससारखी माणसं कशी बरं माफ करावीत? केवळ तेवढ्याकरता पुस्तकावर फुली मारावी, असं हे पाप. दुसरं म्हणजे यातल्या कित्तीतरी पात्रांच्या वास्तवातल्या ओरिजिनल स्रोतांची कल्पना सहज करता येते. नि गोष्टीतली पात्रं इतकी कचकड्याची-द्विमित उरतात की डोक्यातला ’हे पात्र कुणावरून रंगवलं असेल बरं’चा चाळा शेवटापर्यंत संपतच नाही. तिसरं आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे तिच्यातला आशावाद. हा आशावाद कमालीचा भोळाभाबडा आणि कृतक आहे. इतका की, "सामाजिक कामामधले हे अमुक चार प्रयोग आणा, त्यात अमुक अमुक दोष होते हे नोंदा, त्याला तेव्हाच्या सामाजिक घडामोडींची एक जनरल बॅकग्राउण्ड द्या, थोडी मार्क्सवाद-लोहिया-डावा विचार-आणीबाणी इत्यादी चवीपुरती चर्चा, आणि मग सरतेशेवटी जनरल शांतिनिकेतन टाईप फुलंबिलं-सर्जनाचा सोहळा-नातेसंबंध हेच प्रगतीचा पाया.. डन! एक मस्त पॉझिटिव्ह गोष्ट तयार आहे बघा..." अशी मुलाखतच जणू लेखक देतो आहे असं चित्रही माझ्या मनानं तत्परतेनं रंगवलं.

तरी मी पुस्तक वाचलं. त्यात रचनेचं नावीन्य आहे. मुलाखती, डायरी, प्रथमपुरुषी निवेदन, तृतीयपुरुषी निवेदन, भाषणं... असे नाना फॉर्म्स आहेत. पण हे काही मला धरून ठेवणारं कारण नाही. मी पुस्तक वाचलं, कारण मलाही गोड शेवट असणारे हिंदी सिनेमे आवडतात. अजून काय इतकं काही संपलेलं नाही, अजून काहीतरी करण्याजोगं मस्त सापडेल, आपली निष्क्रियता आपण संपवू शकू, आपल्याला मजाही येईल, असं मला अजूनही अधूनमधून वाटत असतं. चांगले भारीपैकी धक्के खाऊनही मी अजूनही आवडलेल्या माणसांच्या प्रेमात वेडगळासारखी पडतच असते.

असल्याच वेडगळ प्रयोगाची गोष्ट सांगणारं (की सांगू पाहणारं?) पुस्तक, म्हणून बहुतेक मी ’खेळघर’ वाचलं असणार. म्हटलं ना, मी गोंधळलेय!

Tuesday 29 October 2013

माझ्या मनातला का...

आज फारा दिसांनी प्रसन्न दिवस सुरू झाला. खिडकीपासची भरार वार्‍याची जागा, कोवळं ऊन आणि ताजातवाना पोपटी मूड. हातात मस्त कोरंकरकरीत पुस्तक.

शुभांगी गोखलेचं ’रावा’ नावाचं पुस्तक. फार काही जगावेगळं, जगात बदल घडवून आणायला निघालेलं, मैलाचा दगडबिगड ठरेलसं नव्हे. आहे आपलं साधंसंच. पण फार फार जवळचं, आत्मीय वाटलं.



मराठी वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमधे अभिनेत्रींनी संवेदनशीलपणे इत्यादि लिहायची आपली समृद्धबिमृद्ध परंपरा आहेच खरी म्हणजे. पण ’कित्ती साधेपणी’ लिहिलं नि जपलेले संस्कार + तरल सर्जनक्षमता दाखवली, तरी त्या लिखाणातली अभिनेत्री काही केल्या लपत नाही असा अनुभव. लिखाण वाईट असतं असं नव्हे, पण ’कित्ती झालं तरी मी पडले नटीऽऽ’चा सूर पार्श्वभूमीला असतोच. या बाईच्या लिहिण्यात मात्र तिचं अभिनेत्री असणं गायबच आहे. खरं तर या लेखांमधले सगळे अनुभव तिच्या दैनंदिन आयुष्यातल्या कामाच्या काठाकाठानं जाणारे. कधी शूटिंगच्या धावपळीत मनसोक्त / आवर्जून / सोसासोसानं / हौसेनं / चोखंदळपणे केल्या जाणार्‍या खरेदीबद्दल नि वस्तुसंग्रहाबद्दल लिहील. कधी शूटिंगच्या धावपळीत सहकलाकारांच्या नि निर्मात्यांनी खिलवलेल्या तृप्त करणार्‍या भोजनाबद्दल ऐकवेल. कधी शूटिंगच्या धावपळीत आपल्या घरापाशी थांबून राहिलेल्या, गळक्या भिंती-आवरायचा माळा-धुवायच्या चादरी वागवत समजूतदारपणे आपली वाट पाहणार्‍या आपल्या घराबद्दल सांगेल. कधी शूटिंगच्या धावपळीत मनापासून काम करताना, एखाद्या सिरियलमधल्या जिवाजवळच्या होऊन गेलेल्या एखाद्या भूमिकेबद्दल हळवी होईल. कधी शूटिंगच्या धावपळीत....

पाहिलंत?! शूटिंग हे तिचं आयुष्य आहे. तुमचं-आमचं ऑफीस असतं, शाळा असते किंवा घरकाम असतं, अगदी तस्संच. त्यातल्या शोकेसी झगमगाटाचा पदर तिनं मुळी पांघरलेलाच नाही. सांप्रतच्या धावपळीच्या, रोज नवे मोह पाडणार्‍या, स्पर्धेच्या मायाजालात आपलं निखळ-नितळ असणं जपू पाहणारी ती एक बाई आहे, बास.

तिची संवेदनशीलता (आयला, या शब्दाच्या तर...!) पुरेपूर महानगरी आहे. म्हणजे सोईस्कर, घडी घालून ठेवता येणारी, थोडीश्शी बेगडी? अहं. महानगरी संवेदनशीलता म्हणजे अनावर आणि अनावश्यक कढ न काढता, भावुकतेच्या उंबर्‍याच्या अलीकडे थांबणारी. पुरेशी कॉस्मोपॉलिटन होत गेलेली, समजूतदार, स्मार्ट, ग्लोबल.

तिचं ललित गद्य वाचताना मी नव्यानं ताजी होत गेले. नसेल तिच्या विस्कळीत ललित लेखनात गोष्टीच्या रचनेचं कौशल्य. पण म्हणून काय झालं? कशी मस्त प्रसन्नता, गाढ समजूत, ताजी कोवळीक आहे... याबद्दल तिचे आभार कसे मानणार? नाटकाच्या रंगपटात जाऊन, आपल्याच अनाकलनीय संकोचांच्या निर्‍या आवरत ’तुमचं लिखाण फार आवडतं बरं का मला’ असं अवघडत म्हणून टाकणं माझ्याच्यानं काही व्हायचं नाही. तिच्यातल्या दिलखुलास लेखिकेलाही ते अन्यायाचंच. म्हणून माझं खुशीपत्र हे इथंच.

मज्जा आली. लिहीत र्‍हावा. 

Thursday 10 October 2013

सूरजको मैं निगल गया....

खालच्या या जुन्या पोस्टनंतरही बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं आहे. पण कृतज्ञता आहे तशीच. तुझ्यासोबत एक आख्खं युग बघायला मिळाल्याबद्दल.
बाकी प्रश्नोत्तरं होत राहतील. शंकाकुशंका, आरोपप्रत्यारोप, आकडेवारी आणि भूमिकांचं विच्छेदन... होवो.

तूर्तास फक्त एक कृतज्ञ सलाम. मजा आणलीस यार, भरभरून!

सांग ना, काय वाटतं आहे तुला आत्ता?

***

ही कदाचित हे सगळं बोलण्याची योग्य वेळ नाहीय. कुठल्याही बाजूनं बोललं तरी त्याला एक विशिष्ट रंग येण्याचे हे दिवस.

बॅडपॅचचे दिवस. ’सो कॉल्ड’ उतरणीला लागण्याचे दिवस...
वेल... लेट्स नॉट गो इनटु दॅट. ऍट्लीस्ट आत्ता नको. मग ते सगळं आहेच...

एक्झॅक्टली काय वाटतं आहे तुला आत्ता?
येस. ’अभी वहाँ का माहौल कैसा हैं?’ या आचरट प्रश्नाइतकाच हाही एक क्वालिफाईड बिनडोक प्रश्न आहे. मान्य. पण तरी तो पडला आहे मला निरागसपणॆ.

त्या कुठल्याश्या इंग्लंडातल्या पोरीनं तुझ्या जिगरबाज खेळावर फिदा होऊन तुझी ’पापी’ घेतली होती तेव्हा काय वाटलं होतं असेल तुला एक्झॅक्टली, हाही प्रश्न पडतोच की मला. किंवा बाबांना अग्नी देऊन पुढच्या विमानाने परत खेळायला जाणं जरा अमानवीच नसेल वाटलं का तुला, हाही प्रश्न पडतोच मला.
मला हक्क आहे तुला हे आणि असले कितीही बिनडोक प्रश्न विचारण्याचा.

कारण?

कारण अजुनी कोणाला काय आणि किती आचरट वाटेल याचा विचार न करता - किंबहुना तो केला तरी ’काय वाटायचं ते वाटू दे, गेले खड्ड्यात...’ असं म्हणून - तुझ्यावरची निष्ठा स्वत:लाच सिद्ध करून दाखवायला म्हणतेच की मी - "सचिनची शप्पथ - "
किंवा
जुनी मॅच तर सोडाच; पण बिस्किटं किंवा बाईक किंवा अंडी किंवा कसल्याही जाहिरातीत जरी तू दिसलास की रिमोटवरचा हात थांबतोच.
किंवा
’जिनियस काय चाटायचंय?’, ’जिंकून दिलंय का त्याने कधी इंडियाला?’, ’सगळा पैसा हो हा..’ यांपैकी कुठलीही कमेण्ट कितव्यांदाही ऐकल्यावर अजूनसुद्धा अकरावीतल्या भाबड्या पोरासारखी मुद्देसूदपणे भांडायला मी तोंड उघडतेच.
किंवा...
जाऊ दे. मुद्दा काय, तर मला हक्क आहे. माझा मीच तो स्वत:ला देऊन घेतलाय.

तर... काय वाटतं आहे तुला आत्ता?

’अरे जा रे... काय वाट्टेल ते तोंडसुख घ्या आणि वाट्टेल तेवढे जळा. पण त्याला टीमच्या बाहेर बसवायची कुणाच्या बापाची टाप नाही...’ हा माझा कॉन्फिडन्स फोल ठरल्यावर मलाच इतकं भ्रमनिरास झाल्यासारखं, आपल्यावर अन्याय झाल्यासारखं वाटतंय -
तुला काय वाटतं आहे आत्त्ता?

की तुला काहीच फारसं वाटत नाहीय या सगळ्याचं? फक्त एक बॅडपॅच आणि पुन्हा सारं होणार आहे तसंच पहिल्यासारखं एकसंध?

आय डाउट...

स्वत:ला बदलताना आरशात दिसत नसलात, तरी रोज थोडे थोडे - रेषेरेषेनं बदलत असताच की तुम्ही . तूही बदलत गेला आहेस तसाच.


परत एकदा कर्णधारपद घेतलंस तेव्हा.

परत एकदा नाईलाजानं ते उतरवून ठेवलंस तेव्हा.

एखाद्या कारकुनासारखं तोंड वेंगाडून भूखंड मागितलास तेव्हा.
लोकांची मुक्ताफळं तोंड मिटून सहन करत बॅटनं बोलायचं अजून घट्ट ठरवत गेलास तेव्हा.

आणि चिखलफेक सहन न होऊन अखेर तोंड उघडलंस तेव्हाही.

तुझ्यापासून तू पुष्कळ पुढे आला आहेस आता. नाही?

’सूरजको निगलनेवाले सभी’ पुढे येताना अशीच आग ठिणगी-ठिणगीनं हरवत येतात का रे? की उरतो तरीही त्यांच्यात एखादा धपापता जिगरबाज स्फुल्लिंग?

तुझ्यातही आहे? आहे का रे?

सांग ना - काय वाटतं आहे तुला आत्ता?

Friday 22 February 2013

आत - बाहेर


ही तटबंदी अजिंक्य नाही
मला ठाऊक आहे.
अजाणता किती वेळा आत पाऊल टाकता टाकता राहिला आहात की...
पण म्हणून राजरोस महाद्वार उघडीन तुमच्यासाठी,
असं मात्र नाही.
नाहीच.

तटबंदी आकर्षक खरी.
बुलंद, काळीकभिन्न,
अंगाखांद्यावर अवकाळी पावसाचे अवशेष खेळवत,
दाटून येत
पिंपळपानांचे अंकुर नांदवणारी

तरी -
आत पडझड बरीच.
ती पाहून उठली तुमच्या कपाळावर एक आठी जरी,
वा डोळ्यांत उमटली नापसंतीची दिसे न दिसेशी लकेर -
मग आपल्याला एकमेकांबद्दल आदर उरायचा नाही.
नि एवढा धोका पत्करावा,
इतकी श्रीमंती माझ्या गाठीला नाही.

हां,
बाहेर
मांजरपावलांनी पुढे सरकणारी
किर्र-दमट जंगलं वा उष्ण-रुक्ष वाळवंटं नाहीत,
विस्मृत नगरांचे अवशेष आहेत काही,
बाहेरही.
नि समुद्र आहे...
बाहेर यावा की,
असं म्हणत असलात,
तर गोष्ट वेगळी.

मग तटबंदीला तसाही फारसा अर्थ उरत नाही.
नाही?

Friday 15 February 2013

ऋणांचे हिशेब


फैज अहमद फैज हा कवी मित्रकृपेनं भेटला. पुरते शब्दार्थ न कळताही भाषेच्या लयीची भूल पडते नि मागून दमदार अर्थ आकर्षण अधिक सखोल करत नेतात, तसं झालं. कवी असण्यातली सगळी वेडं जगून घेणारा हा कवी. बंडखोर, स्वप्नाळू, धुंद प्रेम करणारा, प्रेम पचवून शहाणपणाचं खंतावलेलं पाऊल टाकणारा. तो गायलाही गेला खूप. वेड लागल्यासारखी मी वाचत, ऐकत, समजून घेत सुटले. १३ फेब्रुवारीला या कवीचा जन्मदिन. त्या निमित्तानं हे साहस. 

खरं तर काही ऋणनिर्देश करायला हवेत. पण काही ऋणांतून कधीच मुक्त न होण्यात... वगैरे वगैरे!

हे शब्दश: / अर्थश: भाषांतर नाही. कवितेतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ चिमटीत धरायचा; की कवितेचं कवितापण, तिच्यातला मूड असा प्रश्न अनेकवार पडला. नि फैजच्या शब्दांना हात घालायचं पाप करतोच आहोत, तर न भिता-न कचरता-मनापासून करू, असं म्हणत मी दुसरा पर्याय स्वीकारला. गायत्री नातूनं मागे केलेली चार भाषांतरं आठवून मी खचणारा धीर सावरला. तिचे आभार मानायला हवेत. वाद होऊ शकतो अनेक गाळलेल्या नि घातलेल्या शब्दांवरून. क्रमावरून. प्रतीत होणार्‍या अर्थावरून. कुठे भाषांच्या मर्यादा आहेत, कुठे नादाच्या. मला मर्यादा मान्य आहेत. 'हे सापेक्ष आहे' ही इथे पळवाट म्हणून वापरत नाही, मला खरंच असंच म्हणायचं आहे, की हा कवितेनं 'मला' दिलेला अर्थ आहे नि तो प्रत्येकासाठी निराळा असेल.

असो. पुरे. एकदाच माफी मागते.

ही फैज यांची मूळ कविता:

तुम मेरे पास रहो

तुम मेरे पास रहो
मेरे क़ातिल मेरे दिलदार, मेरे पास रहो
जिस घड़ी रात चले,
आसमानों का लहू पी के सियाह रात चले
मर्हमे-मुश्क लिये नश्तरे-अल्मास लिये
बैन करती हुई, हंसती हुई, गाती निकले
दर्द की कासनी पाजेब बजाती निकले
जिस घड़ी सीनों मे डूबे हुए दिल
आस्तीनों मे निहां हाथों की राह तकने लगे
आस लिये
और बच्चों के बिलखने कि तरह क़ुलकुले-मै
बहरे-नासूदगी मचले तो मनाये न मने
जब कोई बात बनाए न बने
जब न कोई बात चले
जिस घड़ी रात चले
जिस घड़ी मातमी सुनसान, सियाह रात चले
पास रहो
मेरे क़ातिल, मेरे दिलदार, मेरे पास रहो

(इथे नायरा नूरच्या आवाजात नि इथे विद्या शाहच्या आवाजात ती ऐकताही येईल. मला विद्या शाहची आवृत्ती अधिक आवडली.)

थांब इथे.
माझ्यापाशी.

आभाळाच्या रक्तावर पोसलेली धुंद रात्र
काळोखाची लयबद्ध पावलं टाकत येते,
तेव्हा सार्‍या व्यथांवर क्षणमात्र फुंकर पडल्यासारखी होते.
पण तिच्या पायी कसलेले असतात दुःखांचे खळाळणारे चाळ 
आणि हातच्या नक्षत्रांना लक्कन कापून जाणारी हिर्‍याची धार असते.

तेव्हा,
थांब इथे माझ्यापाशी.

एरवी छातीच्या तटबंदीआड मुकाट राहणार्‍या काळजांचा सुटू पाहतो ठाव
लागते कुण्या आश्वासक हातांची ओढ,
स्पर्शांची स्वप्नं पडू लागतात...
तिन्हीसांजेला कळवळून रडणार्‍या पोरासारखा भेसूर सूर असतो ओतल्या जाणार्‍या मद्यालाही,
अवघ्या अर्थाला निरर्थकाचे वेढे पडतात.
काहीच मनासारखं होत नाही
काही केल्या.
दूरवर कुठेच कुणीच काही बोलत नाही.
स्मशानशांतता पेरत रात्रीची काळीशार दमदार पावलं पडू लागतात.

तेव्हा जिवलगा,
थांब इथे.
माझ्यापाशी.

श्रद्धा, याच कवितेचं भाषांतर करायचा खो घेणार का?

Wednesday 13 February 2013

गोल सेटिंग आणि अप्रेझल वगैरे...

डिस्क्लेमरः
अ) कोणत्याही अर्थाने ही साहित्यकृती नाही. डोक्यातला गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न आहे. लिहिताना गोष्टी अधिक स्पष्ट दिसतात, एका विशिष्ट क्रमानी-काही कप्पे करून मांडता येतात, त्यातून काहीएक उत्तर मिळण्याची आशा निर्माण होते, म्हणून. आपापल्या जबाबदारीवर वाचणे.
आ) 'आयुष्याचा अर्थ काय?' असा प्रश्न चारचौघांत विचारला तर लोक चमत्कारिक + हेटाळणीच्या नजरेनी पाहतात. प्रश्नाला उत्तर मिळणं तर दूरच, आपल्याला लोक गंभीरपणे घेण्याची शक्यताही कमी होते,  त्यामुळे ही शब्दरचना टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. पण प्रश्न साधारण त्याच प्रकारचे आहेत.

दोष
१. आळस / कंटाळा / थोड्या वेळानी करू: समोर करण्याजोगं, ठरवलेलं, मिळवलेलं काम असतानाही रिकाम्या वेळात भलतंच काहीतरी अनुत्पादक करून वेळ संपवला जातो.
२. तेच ते आणि तेच ते: आपल्याला जे बरं जमतं, ते नि त्याच्या कुरणातल्या गोष्टींकडेच लक्ष पुरवलं जातं. नवीन, वेगळ्या - उद्या कदाचित रोचक वाटूही शकतील अशा गोष्टी करून पाहण्याची तीव्र अनिच्छा.
३. व्यापक चित्राचा लोभ आणि धरसोडः आपल्याला अनेक गोष्टींत रस वाटतो, पण कुठलीच एक गोष्ट जीव जाईस्तोवर कष्ट करून तडीस नेता येत नाही. सुरुवात करताना कुठूनतरी करावीच लागणार नि ती भव्यदिव्यव्यापक नसणार हे कागदावर कळतं. पण अशी सुरुवात मात्र अपुरी, टुकार, अनाकर्षक, कंटाळवाणी वाटते.

गुणः
१. अनेक बाजू दिसतातः कुठल्याही गोष्टीच्या अनेक बाजू दिसतात. एकांगी, सोपी भूमिका सहजी घेतली जात नाही.
२. जगण्याचा लोभः निराशेचे कितीही कढ काढले, आता नको-पुरे-मरून जाऊ असे गळे काढले, तरी अजून जगायला अधूनमधून पण सातत्याने मज्जा येते. 'जगायला' हाही बदनाम शब्द. जगायला - पक्षी: भांडायला, हसायला, रडायला, खायला, प्यायला, झोपायला, जागायला, वाचायला, लिहायला, पाहायला, दाखवायला इत्यादी. त्यामुळे दर थोड्या दिवसांनी 'नवीन काहीतरी करून पाहू'चा किडा सुचत राहतो. (हे नवीन आपल्या राखीव कुरणाशी संबंधितच काहीतरी असतं म्हणा. (नवीन पीक माणसाळवण्याऐवजी त्याच पिकाची अजून एक प्रजाती घडवण्याशी याची तुलना व्हावी.) पण ठीक.)
३. मर्यादांची जाणीवः आपण थोर-बीर नाही हे एक नीट पक्कं ठाऊक असतं. त्यामुळे उगा स्वत:बद्दल अनाठायी गोग्गोड कल्पना नाहीत. हे जमतं, हे जमत नाही, अशी ठोक विधानं. (हां, त्यांचेही तोटे असतात. कुरणं वगैरे. प. ठी.)

(इतकं भारूड जमवल्यावर आता तरी मुख्य प्रश्नाला हात घालावा.) काय केलं म्हणजे मजा येईल, येत राहील - त्याचं उत्तर मिळत नाही, म्हणून हे भारूड.
जेवणखाण, निरनिराळ्या चवी, स्वैपाक, खरेद्या, गाणी-सिनेमे-पुस्तकं... यांनी तात्पुरती मजा येते. पण ही मजा दीर्घजीवी असत नाही. उलट एका मर्यादेनंतर आपण मुख्य प्रश्नांकडे डोळेझाक करून नाही त्या अश्लील गोष्टीत शहामृगी पद्धतीत डोकं खुपसून बसलो आहोत अशी जाणीव अजून अजून टोकदार होत जाते आणि गंमत संपत जाते. हेच नातेसंबंध या बहुचर्चित गोष्टीलाही लागू करता येईल अशा टप्प्यावर मी आत्ता आहे. उत्स्फूर्तता, उत्कटता, माणसांमधे बुडी मारण्याची वृत्ती... यांतून हाताला जे लागायचं ते लागलं आहे. आता हा रस्ता पुढे कुठेच जात नाही याचं नकोसं भान आल्यामुळे अस्वस्थता अधिक. माइंड यू, मी आयुष्यातल्या भोगवस्तू वा माणसं नाकारण्याबद्दल बोलत नाहीय. तर त्या भोगण्याच्या पद्धतीबद्दल बोलतेय.

हातून म्हणण्यासारखं काहीही होत नाही. कुणी म्हणण्यासारखं, लोक कोण काही म्हणणारे, लोक गेले फुल्याफुल्यांत... हे मीच मला विचारून-म्हणून झालं आहे. त्यावर टीपी नको. कुणी म्हणण्यासारखं? तर मीच म्हणण्यासारखं. मला माझ्या कामाबद्दल (काम किंवा काहीही. शब्द महत्त्वाचा नाही) भारी वाटेल, काळाच्या छोट्याश्या तुकड्यावर तरी ते उठून दिसत राहील अशी आशा वाटेल - असं काहीतरी - काहीही.

असं काहीतरी करावंसं वाटणं हेही आउटडेटेड-आउटॉफ्फ्याशन आहे, मला कल्पना आहे. पण आता आपल्याला आवडतो सचिन तेंडुलकर तर आवडतो. असेल आउटॉफ्फ्याशन. आपण काय करू शकतो?

कृतिकार्यक्रमः
१. निदान ३ तरी नवीन गोष्टी चालू करून वर्ष संपेपर्यंत सातत्यानी रेटायच्या. त्यातली एखादी तरली तरी चांगभलं.
२. निदान ३ तरी कुरणाबाहेरच्या गोष्टी करून पाहायच्या. वर्षाखेरपर्यंत नाही रेटणार कदाचित. पण करून बघायच्याच.
(तिसरं काही सुचत नाहीये, पण ३ आकडा मस्त वाटतो. बरंच काही करून पाहतोय असं वाटतं. आठवा च्यायला. हां, हे बरंय, स्टॅण्डर्ड.)
३. वजन कमी करणे.

इत्यलम.

Monday 28 January 2013

टोक काढल्या जाणार्‍या पेन्सिलीसारखे...


टोक काढल्या जाणार्‍या पेन्सिलीसारखे स्वतःला तासत
आपण येऊन पोचतो एका टोकावर.

कंटाळा,
चाकोरीबद्ध कामांचे ढीग,
एकाच वेळी निर्बुद्ध नि क्रूर असू शकणार्‍या लोकांचे जथ्थे...
सगळी फोलपटं सोलत
एकमात्र बिंदूवर रोखले गेलेले आपण.
शरीर, मन, आत्माबित्मा बकवास मुकाट बोथटत गेलेली,
नि तरी या तिन्हीसकट निराळे आपण टोक काढून तय्यार.

फार काही नको,
दोन बिंदू नि त्यांना जोडणारी एक रेघ काढता यावी,
पेन्सिल संपून जाण्याअगोदर.


Thursday 10 January 2013

साहित्यसंमेलन आणि मी

साहित्य संमेलन ही गोष्ट माझ्यासाठी थेट महत्त्वाची नाही. त्यात चालणारे सगळे थेर मला साहित्य या माझ्या आवडत्या गोष्टीबद्दलही उद्वेग आणणारेच असतात. त्यामुळी मी त्यापासून अंतर राखून असते. पण - माझी भाषा, त्यातलं साहित्य आणि त्या साहित्याचा एक लोकमान्य - परंपरागत उत्सव या तीनही गोष्टींबद्दल मत नोंदवण्याचं अगत्य, अधिकार आणि कर्तव्य मी राखून ठेवू इच्छिते, कारण साहित्यातली प्रतीकं माझ्या आयुष्यावर दूरगामी परिणाम घडवून आणू शकतात - आणतात असं मी मानते. म्हणून हे मतप्रदर्शन.

१. साहित्यिक, रसिक आणि त्या दोहोंमधले दुवे (संपादक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते, वाचनालयं, समीक्षक, माध्यमांचे प्रतिनिधी) यांखेरीज इतर कशालाही आणि कुणालाही साहित्य संमेलनात स्थान असू नये. राजकारणी आणि प्रायोजक यांना होता होईतो दूर ठेवलं जावं. हे प्रत्यक्षात अशक्य दिसतं. पण निदान त्यांचा चेहरा तरी साहित्यप्रेमीच असला पाहिजे आणि या चेहर्‍याशी विसंगत अशी कोणतीही कृती करण्यापासून (आपला साहित्यबाह्य कार्यक्रम राबवण्यापासून) त्यांना इतर घटकांनी रोखलं पाहिजे. स्थानिक वैशिष्ट्यांना संमेलनात स्थान देतानाही वरची चौकट मानणं बंधनकारक असलं पाहिजे.

२. साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक असणं लोकशाही प्रक्रियेला धरून आहे. फक्त या प्रक्रियेत मतदानाचा अधिकार आहे त्याहून व्यापक समूहाला असला, तरच ती प्रक्रिया अर्थपूर्ण ठरेल. (सध्याच्या प्रक्रियेत नक्की कोण नि केव्हा मतदान करतं हे मला तरी ठाऊक नाही. त्यात सहभागी होण्याची इच्छा असल्यास, त्याची प्रक्रिया काय, हेही गुलदस्त्यात. जाणकारांनी प्रकाश टाकल्यास मी ऋणी असेन.)

३. तरीही हे संमेलन मुख्य धारेतलं असल्यामुळे त्याविरोधात आवाज उठतील. विद्रोही, दलित, स्त्रीवादी, उपेक्षित, असे आणि वेळोवेळी इतरही असंतोष व्यक्त होतील. ते अपरिहार्य आणि आवश्यक आहे. मात्र या असंतोषाला हिंसक परिमाण मिळता नये, ही शासनाची आणि आपलीही जबाबदारी आहे. (पुष्पाबाईंना जिल्ह्यात प्रवेशबंदी आणि त्याविरोधात संरक्षण द्यायला पोलिसांनी दर्शवलेली असमर्थता हे आपल्याला लाजिरवाणं आहे.)

या मतांच्या पार्श्वभूमीवर -

साहित्यिक आणि समाजसुधारक हमीद दलवाईंच्या घरून निघणार्‍या साहित्य दिंडीला विरोध करणारे स्थानिक मुस्लिम गट आणि संभाजी ब्रिगेडसारख्या अविचारी संघटना;

परशुरामासारख्या जातीय, हिंसक आणि पुरुषप्रधान प्रतीकांचा उद्घोष करणारे संकुचित आयोजक;

साहित्यिकांना बैल संबोधणार्‍या बाळ ठाकरेंचं नाव एका सभागृहाला देण्याला पाठिंबा देणारे राजकीय नेते;

इतर अत्यावश्यक कामांसाठी असलेला राखीव निधी 'लोकप्रतिनिधींचे सांस्कृतिक शिक्षण' या गोंडस नावाखाली राजरोसपणे साहित्य संमेलनाकडे वळवणारी राजकारणी आणि आयोजकांची अभद्र युती -
या सार्‍याचा मी एक मराठी साहित्यरसिक म्हणून निषेध करते.

(तपशिलात काही  चुका असल्यास निदर्शनास आणून देणार्‍यांचं आणि मतभेदांचंही स्वागतच आहे.)