Friday 30 July 2010

निरर्थक

कधी कधी असं वाटतं, की सगळ्याच गोष्टींची पुनरावृत्ती होते आहे. हातातून वाळू निसटत जावी, तशी आपली माणसं आपल्या आयुष्यातून निसटून जाताहेत. आणि आपण हताशपणे निव्वळ उभे आहोत.


हा असा भूतकाळाशी सतत तुलना करण्याचा चाळा निरर्थक आणि काही अंशी मनोरुग्णतेचं द्योतकच, हे मान्य आहे. तरीही त्याच्या पकडीतून पूर्णपणे सुटता येत नाही. आणि आता तर असं वाटतं, की पूर्णांशानं अशी सुटका करून घेणं कुणालाच कधीच शक्य नाही. स्मृती नावाचं जे टूल माणसाला मिळालेलं आहे, त्याचीच ही अपरिहार्य बाजू आहे. अनुभव आहे, आठवण आहे, आणि अपरिहार्यपणे तुलनाही आहे. कुठलाच अनुभव आता अनाघ्रात, ताजा, अस्पर्श असणार नाही. आपल्या संचिताची छाया त्यावर अनंत काळ असत असणार आहे.

अशा वेळी माणसं नव्यानं कशी जन्मून येत असतील? आज-आत्ताच्या क्षणात कशी जगत असतील? ही साधना त्यांना कशी साधत असेल? काळाचं हे प्रचंड राक्षसी दडपण झुगारायला किती प्रचंड ताकद लागत असेल?

हेही प्रश्न निरर्थकच. माणसं असं करतात किंवा करत नाहीत. परिश्रमांनी साधण्यासारखी ही गोष्टच नव्हे. तुम्ही ती करता किंवा करत नाही. अधेमधे काही संभवत नाही. कसलाही पूल नाही.

आपण अशा माणसांमध्ये मोडत नाही, हे आता स्वीकारलं पाहिजे.

---

हवं तसं वागणारी माणसं स्वीकारताना, तसं न वागणार्‍या माणसांच्या आयुष्यातून तुकडा तोडल्यासारखी बाजूला फेकलं जाताना, अधिकाधिक कडवट - आग्रही होत जाताना -  काही चुकत असेल का? याचा नीट मुळापासूनच विचार केला पाहिजे.

आपण कुठली मूल्यं मानतो?

दुसर्‍या माणसांची आयुष्यं चालवण्याचा - त्यांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा अधिकार आपल्याला नाहीय.

पण त्याच वेळी, आपल्या जीवनदृष्टीशी समांतर असणारी माणसं निवडून त्यांच्या जवळ जाण्याचा (आणि उलटही, म्हणजे न आवडणार्‍या प्रकारच्या माणसांपासून लांब जाण्याचा) हक्क आहे.

भिन्न जीवनदृष्टी समजून घेण्याचा प्रयास आपण करू शकतो. पण तिच्याशी जुळवून घेऊ शकत नाही. तसं केलं, तर आपलाच रस्ता बदललेला असेल. तसा तो बदलायलाही हरकत नाहीच - जर तसं करण्यानं सुख लागत असेल तर. त्या रस्त्याबद्दल आतून समाधान असेल तर. अन्यथा नाही.

यांत कसलाही भावनिक दबाव असू नये. (किंवा अधिक मानवी बोलायचं झालं, तर तो शक्यतोवर कमीत कमी असावा.) धमक्या असू नयेत.

’आपल्या जातीचा मिळो मज कोणी’ अशा जातीची निवळशंख आस असावी फक्त.

या मूल्यांना अनुसरून आपण वागतो का?

होय.

मग आपली माणसं अशी दूर जातात (किंवा अधिक नेमकं बोलायचं तर आपण त्यांच्यापासून दूर येतो), या वस्तुस्थितीबद्दल आपण काय करू शकत असतो?

कितीही पीळ पडला आतड्यांना, तरीही?

काहीही नाही.

हा दुराग्रह आहे? हट्ट आहे? डॉमिनन्स आहे? उद्मेखून इन्फ्लुएन्शिअल असणं आहे?

कुणास ठाऊक. असेल, किंवा नसेलही.

पण आपण त्याबद्दल काय करू शकत असतो?

Thursday 22 July 2010

मावशीबोलीतल्या कविता

संवेदच्या ’खो’ला दिलेलं हे क्षीण उत्तर.

ही कविता कुणाची ते मला ठाऊक नाही. कुठल्याश्या युगोस्लाव्हियन कवीच्या या कवितेचा कुणीसा हिंदीत केलेला अनुवाद मी विजय पाडळकरांच्या एका लेखात वाचला होता. व्हॅन गॉगनं त्याच्या भावाला लिहिलेल्या पत्रांच्या संदर्भात तिचा उल्लेख झाला होता.

कविता डोक्यात घट्ट जाऊन बसली.

अनुवादाचा प्रयत्न केला खरा. पण ‘अनुवाद काही खरा नव्हे गड्या, निदान आपलं काम तरी नक्की नव्हे’ असं आत्मज्ञान देऊनच तो झाला. असो.

ही मूळ कविता -

ऐसा होता है कभी कभी
शरद की रात्री में
जब एशफॉल्ट पर चेस्टनट गिरते है
और दूरकी घाटियोंसे
कुत्तों का भोंकना सुनाई देता है
तब जन्म लेती है
इतने अकथनीय रूपसे लालसा किसी की
जो अच्छा हो, आत्मीय हो
अंतरंग हो, साथी हो
जिसे लिख दे सबकुछ जो हमारे अंतर में है
खत हम जरूर लिखते
लेकिन
वह, जो नही है.

अनुवाद -

कधीकधी होतं असं पानगळीच्या दिवसांत,
रात्रीची नीरव शांतता,
टिपूर चांदणं
आणि दूरवर कुठेतरी भुंकणारी कुत्री...
अशा वेळी एक अनामिक तहान लागते जीव शोषून घेणारी
कुणीतरी असावं –
कुणीतरी जिवाजवळचं,
आपलं म्हणावं असं,
आतड्याचं –
मनात उसळणारं सारं सारं ओतावं ज्याच्या पुढ्यात
असं कुणीतरी.
लिहिलंही असतं म्हणा.
पण –
असं कुणीच तर नाही.

माझा खो गायत्री, श्रद्धा आणि यॉनिंग डॉगला.