Sunday 9 May 2010

...

दर दिवशी नवी निवड. नवीन पर्याय. नवीन प्रश्न. त्यांतून रोज नवे होत गेलेले आपण. आणि रोज बदलत जाणार्‍या आपल्या नोंदी ठेवणारेही आपण.
काय दिसतं त्यातून? वर-खाली, मागे-पुढे, ठळक-पुसट, नव्या-जुन्या, जोरकस-नाजूक रेषांच्या खुणा. दर दिवशी नवीन चित्र? आणि मग? बदलत गेलेले आणि तरीही पुन्हा पुन्हा नव्यानं जन्मत राहिलेले आवर्तातले आपण?
वर्तुळ?
हम्म.
वर्तुळ.
पाळी येते. दर अठ्ठावीस दिवसांनी. शरीरात रक्त फेर धरतं. कुणी नाही आलं, तर समंजस निमूटपणे आपलं घर मोडून वाहून जातं. दर महिन्याला तोच खेळ. न कंटाळता.
तसंच हे? आपल्यातल्या बदलांनी पुन्हा पुन्हा आपलं बदललेलं तरीही तेच चित्र काढत राहायचं? कशासाठी? कधीतरी बीज पडावं म्हणून?
कधी पडतं बीज? आपल्याला कधीही खरी न होणारी आणि तरीही खरं होण्याची स्वप्नं दाखवणारी स्वप्नं पडतात तेव्हा?
खरं होण्याचं आणि न होण्याचं तरी काय? त्या त्या स्वप्नांपुरते तर खरेच असतो की आपण. नाहीतरी स्वप्न आणि सत्य यांतलं नक्की कुठलं खरं, हे कोडं तरी कुठे सुटलं आहे कुणाला अजून?
स्वप्नं हवीत.
आपल्या ऋतुचक्राची समंजस जाणीव घेऊन दर साल पाऊस येतो.
तसा पाऊस हवा.
स्वप्नं हवीत.
काही रुजावं वा न रुजावं.
मातीनं तयार असायला हवं.