Saturday 17 October 2009

सुशीलाकाकू आणि तत्सम

यंदाच्या ’मायबोली’च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली ही कथा.
------------------------------------------------------------------

सुशीलाकाकू आणि तत्सम पंचेचाळिशी-आसपास सुखवस्तू-संवेदनशील बायकांबद्दल तिला एक विचित्र, हिंस्र राग होता.

म्हणजे तिच्याखेरीज दुसर्‍या कुणाला ते कळलं नसतंच. उलट तिचं या सगळ्या बायकांशी असलेलं गूळपीठ तसं प्रसिद्धच. त्यांच्याबद्दल कोणी काही बोललं, की ती कड घ्यायला धावलीच. पण तरी आत राग होताच. नेमका कसला राग, असा प्रश्न स्वत:लाच अनेकवार विचारूनही उत्तरावर बोट ठेवता येत नसे; आणि राग अजून अजून धुमसतच जाई.

'इतक्या कसल्या गं गप्पा मारायच्या असतात तुम्हांला तासन् तास?' किंवा 'तुझ्याएवढी असताना मी नोकरी सांभाळून आदित्याच्या वेळच्या बाळंतपणात होते, आता बघ की एखादा मुलगा. की मी बघू?' हे आणि असले प्रश्न त्या मानानं निरुपद्रवी. स्नेकच्या गेममध्ये गुंग झाल्याचं दाखवत असतानाच कानावरून वाहून जाऊ शकणारे. पण त्यांचं ते नेमानं दर श्रावणात सगळ्या रामरगाड्यासकट सत्यनारायण घालणं, इमेल करायला शिकणं आणि एखाद्या अवघड सोशिअल प्रसंगी 'ह्यांना म्हणजे काऽऽऽही कळत नाही' असा कळे न कळेसा तुच्छतादर्शक कटाक्ष टाकून, काहीतरी समयोचित धूर्त बोलून बघता बघता प्रसंग आपल्याला हवा तसा वळवणं - या सगळ्यांमधली विसंगती तिला झेपेनाशीच होई.

आपण त्यांचा लसावि न काढता आल्यामुळे उखडतो की अनिश्चिततेच्या टप्प्यावरच्या आपल्याला त्यांच्या लवचिक आत्मविश्वासाचा मत्सर वाटतो, ते न उलगडता आल्यामुळे तिनं ते भिजत घोंगडं डोक्याच्या मागे टाकून द्यायला सोईस्कर सुरुवात केली होतीच. तरी एखाद्-दुसर्‍या अवघड वेळेला मध्ये उभा राहणारा हा पेच वारून आपल्याच जिवाजवळच्या या बायकांशी दुहेरी वागता वागता तिचा जीव कासावीस होऊन जाई.

एकीकडे त्या हळव्याहून हळव्या भासत. अरुणा ढेर्‍यांची 'रंगीबेरंगी इच्छांच्या रथात बसून निघालेल्या उत्कट मुलीची गोष्ट' वाचून जिव्हारी लागल्यासारखी ओली नजर लपवणारी सुशीलाकाकू अजून आठवते की तिला. पण एकीकडे त्या तितक्याच क्रूर, निर्घृण भासत. 'अहो, असे काय पेंगताय भर बैठकीत वेंधळ्यासारखे? नीट झोपा की आत जाऊन. नैतर तोंड धुऊन या - जा...' असं वसकन् खेकसणारी प्रमिलामामी आणि खडबडून जागा होत शीपिशली हसणारा मामा बघताना घशाशी आवंढा आला होता, तो काय फक्त ती 'आपल्या' मामाला बोलली म्हणून? व्हीआरेस घेतलेल्या या कंटाळवाण्या आणि काहीशा केविलवाण्या, उतारवयातल्या माणसाशी काहीच बंध जुळले नसतील तिचे? आपल्याला त्याच्या वयाकडे बघून जे वाटतं, पोटात कालवून येतं, ते त्याच्यासोबत आयुष्य काढलेल्या आणि गाताना विलक्षण कोवळा सूर लावू शकणार्‍या या बाईला जाणवतच नसेल?- की त्याच्याबरोबर आयुष्य काढूनच ती अशी झाली असेल? - असे प्रश्नांचे लाख तुकडे एका क्षणात नव्हते आठवून गेले तिला?

नेहमी टाकत असे, तसंच आताही तिनं हे स्वत:लाच न कळणारं प्रश्नोपनिषद मागं टाकून दिलं असतं. पण "अगं, आपणच ढकलावं लागतं मुलांना, त्यांना काय कळतंय?" असं हलक्या आवाजात धूर्त शहाजोगपणे म्हणणार्‍या सुशीलाकाकूचा सूर बघता बघता तिच्या डोक्यातच गेला. "मी म्हटलं तिला - बघ बाई, हा मुलगा मी गेलं वर्षभर तुझ्याबरोबर बघते आहे. महत्त्वाकांक्षी आहे नि साधाही आहे अगदी. 'तसलं' काही वाटत नाही असं स्पष्ट म्हणालीस, तरी त्याच्या वागण्यात तसूभर फरक नाही की शिष्टपणा नाही. मग तुझं 'तसलं' वाटणं म्हंजे तरी काय? मित्र म्हणून आवडतो नं तो तुला? नवरा मित्रासारखा असण्यापेक्षा अजून मनासारखं काय असणारेय? विचार कर. मजेत जगाल आयुष्य दोघंही. प्रेम वाटायला लागतं आपोआप... मला काही बोलली नाही. पण त्याच्याशी बोलली मग ती परवा स्वत:हूनच. म्हंजे - तीच सांगत होती गं. जवळ जवळ ठरवल्यातच जमा म्हणायचं..." असं म्हणताना तिच्या स्वरातला न लपलेला यशाचा आनंद. 'अनुभवी' आनंद.

तोंडभर हसून तिला तिच्या आनंदात कंपनी देताना आतून तडकत - धुमसत गेली ती. आपल्याच निष्ठांशी अशी बेईमानी? आपल्याच पोराच्या कोवळ्या निराकार भावना मॅनिप्युलेट करून त्याचं चौकटीतलं भलं करायला बघावं? असं कसं करू शकतं कुणी? 'आपलं' कुणी?

तेव्हा तिच्या रागाचे सगळे लखलखते कंगोरे सर्रदिशी तिच्या पुढ्यात उभे ठाकले. डोक्यातला कोवळा तुकडा तिनं तिच्यापुरता जाळून-विस्कटून टाकला. स्वत:शीच चालवलेली लढाईही. आणि मग मोबाइल वापरताना त्यांची तिरपीट होई, त्यावर तिच्या वयाचे लोक खिंकाळून-टाळ्या देऊन देऊन हसत, त्यात आपलाही उंच निरपराध स्वर तिनं अलगद मिसळून दिला.

***

'वक्त जाता सुनाई' द्यायला ती काही गुलजार नव्हती.

आपल्या सोकॉल्ड संवेदनशीलतेचं धारदार पातं दुधारी असतं आणि ते बेईमान होऊन आपल्यावरच उलटतं, तेव्हा मुकाट रक्ताळत जाण्याखेरीज दुसरे काही पर्यायच असत नाहीत हे कळायलाही.

तरीही वक्त उलटलाच. जिवाजवळच्या मित्राचं मोडकळीला आलेलं अफेअर त्याच्यासोबतीनं भोगताना आपल्याच संवेदनांचे शापही तिनं भरभरून भोगले. चिंतनबैठका, तारस्वरातली भांडणं, रात्री-बेरात्री फोनवर बोलत काढणं, काही दिवस सगळं काही गोडगुलाबी होणं. पुन्हा एकदा आकांतानं आतून आतून रडणं. आपल्याच नात्यांचे काच आपल्याला सोसेनासे होतात तेव्हा ते झुगारून द्यायला बघणं. आणि सवयीचे झालेले बंध कापले जाण्याच्या कल्पनेनं अनाथ - निराधार वाटून, शहारून पुन्हा पुन्हा नात्याच्या आसर्‍याला परतणं. यांत सुरुवातीचे कोवळे दिवस कसे बघता बघता निबर - राठ होत जातात ते पाहताना बुद्धासारखी आतून विटत विटत गेली ती.

पण बोधिवृक्षाखालचा क्षण मात्र तिनं सुशीलाकाकूच्या नावे लिहून दिला.

प्रेमात न पडण्याच्या कन्फर्म्ड वयातला तिचा एक गृहस्थ-मित्र. अवकाश आणि काल आणि नियती अशी जुळून आली - बघता बघता शहाणा गृहस्थ तिच्या प्रेमात पडला. त्याची घालमेल - ओढाताण - कासाविशी - म्हटलं तर तिला कळली आणि कळली नाहीही. तळ्या-मळ्याच्या काठावरून तिनं हे सगळं पुन्हा नव्यानं अनुभवलं. समोरच्या माणसाला आपल्याबद्दल हे असं मरणप्राय उत्कट काहीतरी वाटतं आहे आणि आपण मात्र त्याची सगळी घालमेल एखाद्या गणितज्ञासारखी निर्विकारपणे निरखतो आहोत, सिनेमातल्या एखाद्या व्यक्तिरेखेसाठी 'बाहेरून' आणि 'असहाय'पणे व्हावं तसे दु:खी होतो आहोत - आपल्याला या जीवघेण्या वादळाचा परीघ मोजता येतो आहे, पण केंद्रबिंदू बघणारी नजर मात्र आपण गमावली आहे...

हे सगळे सगळे साक्षात्कार तिला झाले ते तेव्हाच.

पण स्वत:साठी टिपं गाळत न बसता - तिच्या मते - मोठ्या कौशल्यानं तिनं त्याला प्रेम आणि इतर तत्सम भावनांमधला फोलपणा विशद करून सांगितला. उलटतं वय, शरीरातली आणि मनातली बदलत जाणारी रसायनं आणि निव्वळ निव्वळ निव्वळ योगायोग - यांचा परिपाक म्हणून हे असं काहीतरी वाटत असल्याचं तिनं मित्राला यशस्वीपणे - तिच्या मते - पटवून दिलं. शी ऑल्मोस्ट टॉक्ड हिम आउट ऑफ इट - अर्थात तिच्या मते. त्यालाही हे असं स्वत:ला पटवून घेण्याची निकड भासली असेलच कदाचित. वादळं झेलण्यात भव्य-दिव्य दिमाख असतो, पण ते तितकंसं सुखकारक प्रकरण नसतं, हे समजण्याइतका - जाणिवेच्या वा नेणिवेच्या पातळीवर - मित्र परिपक्व इत्यादि होताच. त्याची समजूत पटली. नंतर कधीतरी पुलाखालून पुष्कळ पाणी वाहून गेल्यावर, शिळोप्याच्या गप्पा छाटताना 'किती मॅच्युअर्ड आहेस गं. तेव्हा मी कुठल्याकुठे वाहवत जाऊ शकलो असतो...' हे त्याचं वाक्य ऐकलं आणि त्या बेसावध क्षणी तिला आपल्यातली सुशीलाकाकू अशी वेगळी होऊन लख्ख दिसली.

आताही तिचा त्या पंचेचाळिशी-आसपास बायकांवरचा राग मावळलेला नाहीच. पण आता तिला आपल्या रागाला टोक काढून तो कुणाच्याही अंगावर नेम धरून सोडता येणं जमेनासं झालं आहे. सुशीलाकाकू तिला हल्ली 'मोठी झाली हो लेक आमची - ' असं जनरल वडीलधार्‍या प्रेमानं म्हणते. त्यात पंखांखाली घेणारी निखळ जवळीक असते की चुकल्या फकिराला मशिदीत घेणारी कावेबाज माया असते, ते तिला अजूनही ठरवता येत नाहीच.

राग - कंटिन्यूड.

------------------------------------------------------

शेवटच्या शब्दामुळे फसू नका. कथा इथेच संपली आहे. 
हे सांगायला लागावं यात सगळं आलं. :(

शुभ दीपावली

रेषेवरची अक्षरे २००९’ प्रसिद्ध झाला आहे. वाचून नक्की अभिप्राय द्या.

सुचवण्या, तक्रारी, दाद - सगळ्यांचं मनापासून स्वागत.

शुभ दीपावली!

Monday 10 August 2009

माझ्या प्रियकराची प्रेयसी...

ती होय, ती माझ्या प्रियकराची प्रेयसी.
होय होय, प्रेयसीच.
तिच्याच नसण्याचा गंध आमच्या रोमॅण्टिक रात्रीला.
तिच्याच हसण्याचे बंध आमच्यातल्या मॅच्युअर्ड मैत्रीला.
छे! जेलसी? काहीही काय!
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.
ती माझ्या प्रियकराची प्रेयसी!
बस.

---

तो कविता लिहून वहीचं पान उलटून टाकतो. पण कविता अजून संपलेली नाही, हे त्याला पक्कं ठाऊक आहे. तसा तो शब्दाचा पक्का. म्हणजे वचन पाळणारा वगैरे भंपक अर्थानं नव्हे. शब्दाचा पक्का, म्हणजे पक्का लेखक. कविता लिहिणं थांबलं, म्हणजे कविता संपत नाही. ती आपल्यापासून पुरती तुटावी लागते, हे त्याला पक्कं ठाऊक. तर अजून कविता संपलेली नाही. संपेपर्यंत चिंता नाही. संपेपर्यंत सुटका नाही. ओव्हर ऍण्ड आउट. बॅक टू आयुष्य.

तर तशा त्याला बघून काकू नेहमी खुशालतात. ’तुझी मैत्रीण गेलीय बाहेर, पण माझ्याशी मार की गप्पा,’ असं म्हणून नव्या पुस्तकांवर वगैरे त्याला यथास्थित पकवतात. पण परवा ’काकू, पोरीचं शिक्षण झालं आणि ती ऑलरेडी वयात आलीय म्हटल्यावर लग्न करून द्यायलाच हवं का लगेच,’ असं त्यानं काहीश्या बेसावधपणे विचारलं, तेव्हा ’हो. हवंच’ हे त्यांचं उत्तर आणि ’हवंच’नंतरचा ठळक टायपातला पण अदृश्य पूर्णविराम त्यानं ऐकला आणि त्याच्या डोक्यात सर्रकन काहीतरी हललं. तसं कळेल त्याला उपरोधिक आणि नाही त्याला निर्मळ वाटेलसं आपलं हातखंडा हसू हसत त्यानं तो क्षण सहज खिशात घातला खरा. पण ’घशात काहीतरी टोचल्यासारखं वाटतंय’ची नोंद त्याला तेव्हा घ्यावी लागलीच आहे.

मैत्रीण त्याची प्रेयसी नव्हे. तोही मैत्रिणीचा प्रियकर वगैरे नव्हे. ते तसले ’प्यार - मोहोब्बत - दोस्ती’वाले करण जोहरी फण्डे त्यानं आणि मैत्रिणीनं कटाक्षानं लांब ठेवलेले. त्याचं लेखक असणं; ती तिच्या बॉयफ्रेंडशी भांडून, वैतागून पार रडकुंडीला आली की तिला बाईकवरून सुसाट घुमवणं; तिला अजून नीट पेटवता येत नाही, पण मनापासून आवडते म्हणून खास प्रसंगी हातात बापानं चॉकलेट ठेवावं तशी तिच्या हातात सिगरेट पेटवून देणं; व्यासापासून तुकारामपर्यंतचा तिचा इतिहास वेळोवेळी घोटवून घोटवून, दर भांडणात कोट्स, कथा आणि किस्से तोंडावर फेकून पक्का करून घेणं; स्वत:चा काही कारणानं भडका उडाला की तिला फोन करून सुमारे तीन मिनिटं अवाक्षरही न बोलता फक्त आपला श्वास काबूत आणत राहणं... हे सगळं आणि असलं बरंच त्यांच्यामधलं शेअरिंग. बरंच बोलून, बरंच न बोलता. पण त्यांच्या इतर माणसांशी असलेल्या नात्यांवर छाया पडत राहावी इतकं आणि असं अथांग. हे सगळं वजा करून ती तिच्या सध्याच्या बॉयफ्रेंडशी काय आणि कसं बोलत असेल, हा चिवट प्रश्न या आठवड्यात त्याला कितव्यांदातरी पडतो. या वेळच्या तिच्या बॉयफ्रेंडबद्दल त्यांच्यात तसं विशेष बोलणं झालेलं नाही. म्हणजे नेहमीसारखी चर्चा इत्यादी घडलेली नाही. पण चर्चा न घडताही, नेहमीचंच बोलत असल्याच्या आविर्भावात कळत नकळत मैत्रीण त्याच्याबद्दल पुरेसं बोललेली आहे. आपली भिवई नकळत उंचावते आहे हे त्याला जाणवून, किंचित आश्चर्यानं पण सफाईदारपणे, त्यानं विषय बदलूनही. हे निराळं आहे याचीही नोंद त्याला तेव्हा घ्यावी लागलीच आहे.

तो अस्वस्थ होऊन खांदे उडवतो आणि मनात उगवलेले शब्द कागदावर रुजवत जातो. त्याला इतकंच करणं शक्य आहे. बस.

---

ती चांगले मुलींसारखे ठसठशीत झुमके घालणारी,
थोडी लाडीक, थोडी निर्बुद्ध, बरीच भित्री.
पण विलक्षण उत्कट. विलक्षण नशीबवान. विलक्षण ’बाई’.
तिच्या ’बाई’पणातच माझ्या प्रियकराच्या पौरुषाच्या पहिल्यावहिल्या पाऊलखुणा.
त्याच्या काहीश्या परिपक्व शहाण्या आणि पुष्कळदा सेक्सी टकलावर तिच्यासोबतच्या प्रेमभंगाच्या खुणा.
तिला कशी स्वीकारू?
आणि तिला कशी नाकारू?
ती माझ्या प्रियकराची पहिली प्रेयसी.

---

कविता संपत नाही. एरवी यावरून फ्रस्टेट होऊन त्यानं मैत्रिणीशी हमखास वादळी भांडण उकरून काढलं असतं. पण या वेळी नाही. स्वत:तून जणू निराळा होऊन, एखाद्या अनुभवी सुईणीसारखा एकाच वेळी सराईतपणे नाजूक आणि कुशलपणे निर्दय होत तो कविता वेगळी होताना निरखतो आहे.

आज मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडला भेटायचं आहे. वर वर बिनधास्त असल्याचं दर्शवत खिदळणारी मैत्रीण त्याच्या प्रत्येक प्रतिक्रियेकडे घारीच्या नजरेनं पाहत असणार हे त्याला ठाऊक आहे. सगळे प्रश्नं, सगळी गुपितं, सगळे पराकोटीचे वैताग, सगळ्या नव्हाळीच्या कविता निरागसपणे त्याच्या पुढ्यात आणून टाकणारी मैत्रीण. त्याच्या निष्प्राण सराईत शब्दांना एका नापसंतीच्या कटाक्षासरशी मोडीत काढून त्याला चकित करणारी त्याची धिटुकली जाणकार मैत्रीण. तिच्या सगळ्या प्रतिक्रिया आता म्हटलं तर त्याच्या नजरेतल्या पसंतीदर्शक छटेवर अवलंबून आहेत.

इथे त्याला जबाबदारीच्या जाणिवेनं पोटात एकदम खड्डा पडल्यासारखं होतं.

पण म्हटलं तर बॉयफ्रेंडला त्याला भेटण्यासाठी आणते आहे म्हणतानाच तिनं पसंती-नापसंतीचे सगळे पूल एकटीनंच पार केले असल्याचंही उघड आहे.

इथे त्याला एकदम आउट होऊन मैदानाच्या बाहेर बसल्यासारखं हेल्पलेस वाटतं.

असले जीवघेणे झोके घेत तो त्या दोघांना भेटतो. सराईतपणे बेअरिंग सांभाळून असला, तरी त्याला तारेवरून चालणारी डोंबारीण असल्याचा फील येतो आहे, हे मैत्रिणीपासून लपत नाहीच. पण त्याला चकित करण्याची आपली नेहमीची लकब वापरून ती नेत्रपल्लवीतून सहजपणे उलटा त्यालाच धीर देते. बघता बघता बॉयफ्रेंडशी हॉवर्ड रोआर्कबद्दल जिव्हाळ्यानं बोलण्याइतकी कम्फर्ट लेव्हल त्यांच्यात येते, ती नक्की कुणामुळे -त्याच्यामुळे, तिच्यामुळे की बॉयफ्रेंडमुळे - ते त्याला कळेनासं होतं.

---

काही भांडणं. हे मैत्रिणीचं नेहमीचंच. काही वादळी जीवघेणी भांडणं. हेही नेहमीचंच. पण त्याच्यापासून अलगद वेगळ्या, निर्लेप होत गेलेल्या काही भेटी. कधी तिचं कासावीस होऊन त्याच्याकडे येणं, पण अवाक्षराचेही तपशील न देणं. काही असंबद्ध प्रश्न विचारणं. कधी चक्क मुलींसारखं लाजणं. हे मात्र नेहमीसारखं नाही. नाहीच. ’ये की एकदा. बर्‍याच दिवसांत आला नाहीस,’ काकूंचा आग्रहाचा फोन. घरदार लग्नाच्या आणि बोलणी करण्याच्या आणि तारखा-मेन्यू ठरवण्याच्या कल्लोळात दंग. स्वत:च्याच इच्छेविरुद्ध त्याला वाटलेलं परकेपण आणि ते नीटच समजून सगळ्या भाऊगर्दीतही त्याला अजिबात एकटं न सोडणारे मैत्रीण आणि बॉयफ्रेंड.

ती परकी इत्यादी होत गेलेली नाही हे स्वत:लाच पटवून देताना त्याला भयानकच कष्ट पडतात. त्या परवा आलेल्या बॉयफ्रेंडला आपण इतक्या चटकन आपल्यात स्वीकारलं की काय, या प्रश्नाला उत्तर देतानाही तितकेच कष्ट पडतात. पण त्याला आरपार वाचणारी तिची धारदार नजर पाहिल्यावर, ती तितकी लांब गेलेली नाही, हे त्याला मान्य करावंच लागतं. चिडचिडीचा / आत्मपीडनाचा / आत्मकरुणेचा एक रस्ता बंद. रस्ते बंद होऊन कोंडीत सापडलं की त्याला नेहमी येतं, तसं अनावर हसू येऊ लागलेलं. कविता संपत आली आहे की काय? कुणास ठाऊक. तो खुशालतो आणि धुमसतोही.

ओव्हर ऍण्ड आउट. बॅक टू कविता.

---

कधीकधी हिरवाचार संताप उभा राहतोही माझ्या डोळ्यांत, नाही असं नाही.
सगळीभर असलेले तिच्या बोटांचे ठसे पाहून मला असुरक्षित वाटतं, अजूनही वाटतं काहीबाही.
कन्फेस करण्यासारखं काही, काही मी स्वत:पाशीही कबूल करणार नाही...
पण
ती काही त्याच्यापासून निराळी नाही.
त्याच्या आजच्या असण्यात तिच्या ’काल’ची माती मिसळलेली आहे, हे मला विसरून चालणार नाही.
जेलसी?
छे हो, अजिबात नाही.
ती माझ्या प्रियकराची माजी प्रेयसी, बाकी काही नाही!

Monday 3 August 2009

नात्याला मरण असे यावे

पाड्यावरच्या प्रत्येकाने
बेभान होऊन दातओठ खात दगड हाणून रक्त काढावे एखाद्या चेटकिणीचे,
आणि मग वाद्यांच्या चढत्या कल्लोळानिशी एका मंतरल्या क्षणी तिच्या डोसक्यात दगड घालून संपवावा सगळा खेळ पिसाटपणे;
तिच्या याराने डोळ्यांत उतरलेल्या रक्तासकट, शरीराच्या कणानकणाला आग लावून टक्क नजरेने केवळ पाहात राहावे तिचा मृत्यू अगतिकपणे,
आणि मग भण्ण शांतता पसरून राहावी आसमंतात.
तसेही यावे मरण नात्याला.
वाजतगाजत.
समारंभाने.
निर्विवाद - निर्णायक - वजनदार डोंबपावले टाकत.

पण,
जगण्याच्या धुगधुगीचे कसलेही संदेह,
आतड्याला कोडगेपणाने फसवत खेळलेले वाट पाहण्याचे खेळ,
वा मरणाच्या कल्पनेनं निष्प्राण झालेल्या पावलांना फरफटवत चालवलेल्या भेसूर वाटा -
यांपैकी काहीही न जागवता.
अंधाराचा पोलादी पडदा टाकत.
एखाद्या कसबी नटासारखे, तेजस्वी प्रकाशझोतात, रोखलेल्या श्वासांत, अगदी अगदी खरे.

नात्याला मरण असे यावे.

Friday 5 June 2009

इन्सेक्युअर्ड

खूप जिवाजवळच्या माणसांबद्दल आपण मोकळेपणानं आणि तटस्थपणे बोलूच शकत नाही, तसंच काहीसं पुस्तकांबद्दल वाटायचं . अजूनही वाटतं. पण आपल्यातले काही भाग आपल्यातून सोडवून हे असे तळहातावर निरखायला घेतले, म्हणजे मग त्यांच्या निराळ्याच बाजू दिसायला लागतात. आपल्याही.

---

तर पुस्तकं.

मला काय वाटतं पुस्तकांबद्दल? अगदी प्रामाणिक आणि तत्काळ उत्तर - प्रचंड इन्सेक्युअर्ड वाटतं.

स्वतःची पुस्तकं नीट कव्हरं-बिव्हरं घालून जपून, कडेकोट बंदोबस्तात वगैरे ठेवणं तर ठीकच आहे. सगळेच जण कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर ते करतातच. पण पुस्तकांच्या दुकानात किंवा लायब्ररीच्या काउंटरवर आपल्या हातातली पुस्तकं सोडून शेजारच्या माणसानं कुठली पुस्तकं घेतलीयेत ते बघून जीव कासावीस व्हावा? रद्दीवाल्याच्या समोरचा जुन्यापान्या पुस्तकांचा ढीग कुणी उलथापालथा करत असेल, तर आपल्या डोक्यातलं घाईचं काम सोडून आपणही तिथे धाव घ्यावीशी वाटावी? ताज्या दिवाळी अंकांची थप्पी घरी घेऊन जात असताना वाटेत कुणी ओळखीची काकू-मावशी भेटून त्यांनी अंक मागू नये म्हणून आपण आडगल्ली पकडावी? वाढदिवसाला घरी आलेल्या लोकांनी दिलेली पुस्तकं ताबडतोब एकट्यानं उघडता यावीत, म्हणून कधी एकदा पाहुणे जाताहेत असं होऊन जावं?

मला कुणी हे सांगितलं असतं तर मी सांगणार्‍याच्या तोंडावरच फिदिफिदी हसले असते, इतकं वेडसर आहे हे. पण आहे.

---

एखादा खूप वापरून झालेला पत्त्यांचा कॅट असतो. त्यातल्या किलवर गोटूचा एक कोपरा थोडा झिजलेला असतो. चौकट एक्का पोटातून वाकलेला असतो. आणि इस्पिक मेंढीच्या एका कोपर्‍याचा टवका उडालेला असतो. पूर्ण सुट्टी जर इमाने-इतबारे पत्ते खेळण्यात घालवली असेल, तर सुट्टी सरता सरता सफाईदारपणे ही तिन्ही पानं ओळखता येतात. त्याच जातीचा संबंध माझा माझ्या पुस्तकांशी असतो.

उदाहरणार्थ 'नेगल'च्या पान नंबर अडतीसवर नेगलच्या फोटोपाशी एक लिंबाच्या सरबताचा थेंब पडलेला मला नीट आठवतो. वाचता वाचता तो आला नाही, तर एकदम चुकल्या चुकल्यासारखं होतं. किंवा 'दुस्तर हा घाट'मधे 'मनुष्याने मोहाला नेहमी शरण जावे, असं ऑस्कर वाईल्ड म्हणतो'पाशी ही पेन्सिलीची अलगद खूण कुणी करून ठेवली असेल? मी तर असल्या अभ्यासू खुणा करत नाही. मग? दर वेळेला तिथे यायच्या आधीच, दिमित्रीच्या वाक्यासोबत मी त्या खुणेचीही वाट बघत असते नकळत. तिथे पोचून 'कुणी केली असेल खूण'चा निरर्थक निष्फळ खेळ खेळूनच पुढे सरकायचं. किंवा रद्दीवाल्याकडून नकद रुपये पाच मोजून आणलेलं 'कोसला' वाचताना त्याच्या मुखपृष्ठाचं पान दुसर्‍या हातात सांभाळावं लागतं, किंवा बाजूला काढून ठेवावं लागतं. तरी ते तस्सं सांभाळायचं.

आपल्या पुस्तकांशिवाय परक्या शहरात राहताना, पुस्तकं उसनी आणून वाचताना 'आपल्या' पुस्तकातलं एखादं पान - त्यांतली एखादी ओळ संदर्भहीन वा ससंदर्भ डोळ्यांसमोर येते, तेव्हा काय करायचं? पुस्तकांना फोन थोडाच करता येतो?

---

पुस्तकातली पात्रं पुस्तकातली नसतातच. उदाहरणार्थ 'बाधा'मधली रमा. किंवा 'रेणुकेचे उपाख्यान'मधली रेणू. किंवा 'मुखवटा'मधली नानी.

पण लोक चक्क अमकं अमकं पात्र असं का वागलं, अशा छापाच्या चर्चा करतात. त्यांच्या वागण्याची आणि त्यांना तसं वागायला लावणार्‍या लेखकाच्या अकलेची चर्चा. असं कसं करू शकतं कुणी?

ती पात्रं नसतात. माणसंच असतात. जिवंत. हाडामांसाची. आपले आपले निर्णय घ्यायला मजबूर असणारी. लेखकाला मुकाट बसवून ठेवणारी. आपण पुस्तकाबाहेर. वादळाबाहेर. वार्‍यापावसाआड. किनार्‍यावर सुरक्षित. अशा परिस्थितीत त्यांचे न्यायनिवाडे करणारे, त्यांच्या बर्‍या-वाईट निर्णयांना तोलत चिकित्सा करणारे आपण कोण?

पण अशा चर्चा होतात. आणि आपल्याच घरातल्या कुणाबद्दल चव्हाट्यावर चवीनं बोललं जावं आणि आपण नेभळटपणानं ते ऐकून घ्यावं, हेही मुकाट मान्य करावं लागतं.

---

मालकीचं पुस्तक. बक्षिसाचं पुस्तक. आपल्या पैशांनी विकत घेतलेलं पुस्तक. कुणी भेट दिलेलं पुस्तक. कुणाचं ढापलेलं पुस्तक. कुणाचं परत करायचं राहून गेलेलं पुस्तक. अनेक निरनिराळे टप्पे.
दर टप्प्यावर मालकी हक्काच्या भावना, त्यांची तीव्रता आणि टोक, त्यामागची कारणं बदलत जातात.
दर टप्प्यावर तीच पुस्तकं निरनिराळे अर्थ, निरनिराळ्या जातीच्या सोबती देऊ करतात.
आता आपली बस भरली, असं कितींदा मनाशी आलं; तरी आयुष्यात हक्कानं-नव्यानं पाय ठेवायला येणार्‍या माणसांसारखी पुस्तकं जमा होत जातात.

तरी अजून मला पुस्तकांबद्दल वाटणारी मूलभूत भावना बदललेली नाहीच आहे. इन्सेक्युअर्ड वाटणं. ते आहेच!

हे बरं लक्षण म्हणायचं की वाईट?

Thursday 28 May 2009

मॉर्निंग, वॉक आणि मी

शुक्रवार रात्री नऊसाडेनऊ:

उद्या (तरी) सकाळी उठून फिरायला जायचंच, मी कितव्यांदातरी निग्रहानं स्वत:शी घोकते. नेहमीप्रमाणे साडेपाच वगैरे वाजताचा अघोरी गजर लावते. मग एकदम पापमुक्त झाल्यासारखं वाटून लोळत टीव्ही. मग काही वेळ कादंबरी. झोप येण्यापुरती हातात धरलेलं अभ्यासाचं पुस्तक. व्हिक्स. पाणी. गाणी. झोप.

शनिवार सकाळी नऊसाडेनऊ:

डोळ्यांवर आलेलं ऊन. पंख्याचा घर्र घर्र आवाज. अंगभर आळस. ’माझा गजर कुणी बंद केला?’ माझी जोर नसलेली कुरकुर. उत्तरादाखल काही तुच्छतादर्शक कटाक्ष. मग शनिवार सकाळचा स्वस्तातला मल्टिप्लेक्स सिनेमा गाठायसाठी जोरदार धावाधाव. लायब्ररी. शॉपिंग मॉल. भाजी मार्केट. दुपारची स्वर्गीय झोप. सगळं स्वर्गीय वाटत असतानाच शनिवारची रंगीन रात्र कधी कूस बदलते समजत नाही. शिवाय कितीही अपराधभाव असला, तरी रविवार सकाळसाठी गजर लावायचं महापाप काही कुणी करत नाही.

रविवार संध्याकाळ सात-साडेसात:

काहीही कल्पना नसताना पायाखालची जमीन हिसकावून घ्यावी कुणी आणि आपण एकदम अनाथ एकटे कातरवेळी समुद्रकिनारी - अशा पद्धतीत वीकान्त संपून गेलेला, सोमवार पुढ्यात उभा ठाकलेला. ’उद्यापासून मात्र कुठल्याही परिस्थितीत उठायचंच. काही लाज वाटते का तुला?’ वगैरे सेल्फटॉक. पुन्हा एकदा गजर.

सोमवार सकाळी पावणेसहा:

गजर. स्नूझ. गजर. च्यायला. वाजतोय साला. उठावं का? मरू दे. ऊठ. ऊठ. ऊठ. बाहेर पाखरं किलबिलताहेत, हवा कशी गार आहे. मरू देत ती पाखरं, पांघरुणात छान वाटतेय गार हवा. ऊठ. ऊठ ****. अखेरशेवट मी उठते.
आरोग्यदायी आल्याचा चहा, व्यायामी जामानिमा, लाजेकाजेस्तव वॉर्म-अप करून बाहेर पडेपर्यंत साडेसहा.
बागेत आणि बागेभोवती हीऽऽऽऽ गर्दी. गर्दी बघून मी दचकते. आत्ता काय झालंय काय? इतके सगळे लोक? मग यथावकाश डोळ्यांवरची झोप उडून दोनेक फेर्‍या होईस्तोवर ते सगळे उत्साही आरोग्यवंत लोक असल्याचं मला कळतं.
च्यायला, संध्याकाळी सातसाडेसातनंतर खिडक्यादारं बंद करून खुडूक बसणार्‍या या शहरातले हे मंद लोक, आणि पहाटे आरोग्य सांभाळायची ही अहमहमिका, अं? येडपट साले... माझी उगाच चिडचिड.
सहावी फेरी मारताना शेजारून स्टायलिशपणे पळणारा एक मुलगा हळूच बागेच्या आतल्या बाजूनं पळणार्‍या एकीच्या वेगाचा अंदाज घेत मंदावतो. पण मग माझी नजर जाणवून, गडबडून परत एकदा जोरात पळत सुटतो. मला नकळत हसू फुटतं.

मंगळवार सकाळ सहा:

थोडासा पाऊस शिंतडून गेल्यामुळे नेहमीचे भुरे रस्ते ताजे तुकतुकीत काळेभोर दिसतायत. त्यावर ही जांभळी किनखापी फुलं? च्यायला, एकेका शहराचं नशीब असतं खरंच. माझ्या मुंबईकर मनातला मत्सर पृष्ठभागापाशीच. वर डोकवायला सदैव उत्सुक. त्याला तस्संच दाबून मी बागेकडे वळते.
कालचा तो मुलगा दिसतोच. मला बघून चक्क नजर चोरून पुढे? हा हा हा!
तिसर्‍या फेरीत बागेतल्या कोपर्‍यात एक हसर्‍या आजी-आजोबांचं वर्तुळ. एक टाळी. हा:! दोन टाळ्या. हु:! तीन टाळ्या. हा:हा:हु:हु:! त्यांना तसंच टाकून पुढे जाणं मला चक्क जड जातं. मी ऑलमोस्ट पळत पळत माझी फेरी पुरी करून त्यांच्यापाशी परत येतेय, तोवर त्यांचं शवासन चालू झालेलं. फुस्स.
मग माझं लक्ष बागेसमोरच्या घरांकडे जातं. पांढराशुभ्र रंग आणि बाल्कनीतून लडिवाळपणे खाली येऊ बघणारी गुलबाक्षी रंगाची कागदीची फुलं.
दुसरं घर. व्यक्तिमत्त्वहीन पिस्ता कलर. हे अगदीच काकूबाई घर. नीटनेटकं-स्वच्छ वगैरे आहे, पण स्वभाव एकदम ’सातच्या आत घरात’. हॅ, काय गंमत नाही.
तिसरं घर. वॉव, समोर चक्क दगडी फरसबंदी वगैरे? आणि व्हरांड्यात टांगलेला खानदानी पितळी कंदील? पण या घराच्या समोरचा गुलमोहोर गायब केला, तर हे रुबाबदार घर एकदम बापुडवाणं दिसायला लागेल, माझी खात्रीच पटते. असला परावलंबी रुबाब काय कामाचा? हॅट, नापास.
चौथं घर. रंग पिस्ताच. पण बाळबोध बटबटीत पिस्ता नव्हे. इंग्लिश कलरचा तोरा. शिवाय सगळीकडून घराला पडदानशीन करून टाकणारा अस्ताव्यस्त पसारेदार विलायती गुलमोहोर. मुंबईसारखा पाऊस कोसळला इथे, तर या खिडकीत बसायला काय बहार येईल, माझा फुकाचा कल्पनाविस्तार. तितक्यात मागच्या बाल्कनीत वाळत टाकलेले टॉवेल्स आणि चड्ड्या-बड्ड्या दिसतात आणि मी रागारागानं पुढे जाते.
पाचवं घर. हे नवंच दिसतंय. अजून समोर वाळूचा लहानसा ढीग, थोड्या विटा वगैरे आहेत. पण रंग मात्र सुरेख चकचकीत पांढरा. आणि ’हम दिल दे चुके सनम’च्या सेटची आठवण करून देणार्‍या तीन तीन गच्च्या. त्यावर लालचुटूक कौलं. अरे, पुढचं दार उघडं? हॉलमधून वर जाणारा वळसेदार जिना आणि मागच्या खिडकीतून दिसणारं हिरवंगार परस. काका पेपर वाचतायत की काय? घड्याळपण एकदम जुन्या पद्धतीचं ’टोले’जंगी दिसतंय. बाप रे, साडेसात? पळा...

बुधवार सकाळ सव्वासहा:

हा:हा:हु:हु: गाठायला धावत येऊनही फार काही हाताला लागत नाही. एक सात्विक चेहर्‍याच्या पण तितक्याश्या प्रेमळ न वाटणार्‍या आजी संशयानं तेवढ्या बघतात. मी घाईघाईत पुढे जाते.
’तो’ मुलगा दिसतोच. चक्क एक निसटतं स्माइल. सलग तिसर्‍या दिवशी मला बघून माझ्याबद्दलचा तुच्छत्वाचा भाव त्याला सोडून द्यावा लागला असेल का, असा विचार करून माझ्या नियमितपणाबद्दल मी स्वत:वरच निहायत खूश होते.
एक फेरी. दुसरी. तिसरी. चौथी. पाचवी.
’मग मी म्हटलं वन्संना, इतकं काय मनावर - ’ मी असभ्य वाटेलश्या वेगात खटकन मागे वळून बघते. मराठी? नकळत पाय रेंगाळतात, माझ्या संकुचित प्रादेशिक अस्मितेला माझा नाईलाजच असतो. सलवार-कमीझ, स्पोर्ट्स शूज, घाईघाईत वळलेला अंबाडा, ’अहों’ना गाठायला कशीबशीच मॅनेज केलेली धावरी चाल आणि ’हं हं’ करत आपली आघाडी राखून असलेले अहो. काका-काकू पुढे निघून जातात.
मी मात्र रेंगाळते.
हवेला विलक्षण ताजा वास. पाचव्या घरातल्या काकू न्हाऊन फाटकासमोर रांगोळी काढत असलेल्या. शोएब अख्तर विकेट मिळवल्यावर ज्या विमान-पोझमधे धावतो, त्याच पोझमधे धावणार्‍या एका काकांचं विमान. कशीबशी झोप आवरून, आंघोळ-पावडर-कुंकू-डिओडरण्ट उरकून, हापिसाला निघालेल्या दोन चश्मिष्ट पोरी. त्यांच्या हातातली ताजी टाईम्सची गुंडाळी. नजरेतला ’आरोग्यवंत लोकां’बद्दलचा आदर अधिक मत्सर अधिक चिडचिड माझ्यापर्यंत थेट पोचते.
आपणपण आरोग्यवंत लोकांच्यात जमा? मला एकदम मजाच वाटते.

गुरुवार सकाळ सात:

चहा - वॉर्म-अप - व्यायाम. इमानदारीत ठरलेल्या फेर्‍या मारून मला फारच घाण्याला जुंपलेल्या अळणी बैलासारखं वाटायला लागतं. मग मी सरळ पलीकडच्या इडलीवाल्याकडे मोर्चा वळवते. वाफाळती इडली आणि लाल मिरच्यांचा तवंग मिरवणारं सांबार.
आयुष्य सुंदर आहे...

शुक्रवार सकाळ साडेसहा:

कंटाळा आलाय, पण घरात बसून राहायचाही कंटाळाच आलाय. तीच ती सकाळची टीव्हीवर गळणारी गाणी, शेजार्‍यानं भक्तिभावानं लावलेली ’ओम्‌ श्री नमो नम: - तत्सवितुर्वरेण्यम्‌’ची एकसुरी उंच भुणभुण आणि तासभर नुसतंच लोळत पडल्यावर अंगात साचणारा जड आळस. मी शहारतेच.
बागेपाशी येऊन आरोग्यवंतांच्यात सामील झाल्यावर बरं वाटतं. बरं वाटल्याचा थोडा धक्काही बसतो, पण बरं वाटतंच. विमान काका आज शिक्षा झालेल्या सैनिकासारखे हात वर ठेवून फेर्‍या मारत असतात. मला हसू येतंही आणि नाहीही. मीही मुकाट माझी दौड चालू करते.

शनिवार सकाळी पावणेसहा:

’हे काय? आजपण जाणार फिरायला? बरी आहे ना तब्ब्येत? वीकेण्डलापण?’ असल्या सरबत्तीकडे दुर्लक्ष करून मी बाहेर पडते. हसणारा मुलगा, विमानकाका आणि पाचव्या घराला एक हसरी नजर-सलामी टाकते. पाय वेग घेतात...

Thursday 21 May 2009

आणखी एक धार्मिक वगैरे वगैरे


संवेदचं हे एकदम विचारप्रवर्तक वगैरे पोस्ट वाचून मी ही कमेण्ट खरडायला घेतली, पण ती इतकी मोठी झाली, की तिच्या आकाराची लाज वाटून शेवटी मी हे पोस्टायचंच ठरवलं.




खूप वायफळ तात्विक चर्चा करायची झाली, तर ’आपल्या’ धर्मात ’धर्म’ हा शब्द कर्तव्य या अर्थानी कसा वापरलाय आणि त्यामुळे प्रत्येकाचा धर्म निराळा कसा असतो असं कायच्या काय खरडत बसता येईल. पण त्याला काही अर्थ नाही. त्या अर्थानी आपण धर्म हा शब्द वापरायचं केव्हाच सोडून दिलंय. आपण देव आणि धर्म या गोष्टींची सांगड घालतोच घालतो. ’तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म’ या बिनतोड युक्तिवादात वापरलाय त्याच अर्थानं चांगलं (धर्मानं!), नियमबियम पाळून वागायचं मार्गदर्शन करणारी एक संस्था याच अर्थानं आपण तो वापरतो. आपापल्या अपराधीपणावर उत्तरं शोधायला, पांघरुणं घालायला, नियम सुधारून (वाकवून?) घ्यायला, इतरांना (आणि स्वत:लाही) धाक घालायला लोक तो बर्‍याचदा वापरत असतात.



त्या अर्थानं मी आहे का धार्मिक? बहुतेक नाही.



मला पुराणातल्या बर्‍याचश्या गोष्टी माहीत असतात, देव आणि दैवतांचा इतिहास याबद्दल कुतुहल वाटतं. धर्माचा इतिहास संस्कृतीच्या पाऊलखुणा सोबत घेऊन येतो, तो वाचायला मला आवडतं. त्यात लोकांनी आपापल्या फायद्यातोट्यासाठी, कधीकधी नि:स्वार्थीपणे, कधीकधी निव्वळ मूर्खपणानं मारून ठेवलेल्या मेखी (की मेखा?) समजून घ्यायला धमाल येते.




पण देवापुढे - अगदी तिन्हीसांजेलासुद्धा - आपसूक वगैरे माझे हात नाही जोडले जात. खूप उदास असताना, खूप काळजीत असताना, खूप हैराण झालेलं असतानाही, ’आता देवच काय ते बघून घेईल’ असं चुकूनही माझ्या मनाशी येत नाही. देवाची प्रार्थना करावी असं सकाळी - रात्री कधीच वाटत नाही. अंधाराची किती भीती वाटली, तरी रामाबिमाचं नाव माझ्या तोंडात कधीच येत नाही. असली काहीतरी एण्टिटी असेल, इथपासूनच मला टोटल अविश्वास आहे, तर मग ती आपल्याला मदत करेल, असं कसं वाटणार?



म्हणजे मी धार्मिक नसणारच. असं का असेल?



आमचं घर काही तितकं अतिरेकी आधुनिक नव्हे. म्हणजे आमच्या घरी नाही, पण बाबांच्या घरी - गावाला, आणि आजोळीही, गणपती बसतो. आम्ही त्याकरता शक्य असेल तेव्हा गावाला जातो. घरात लहानसा का होईना देव्हारा आहे. नेहमी बाबा, आणि बाबा नसले तर आई देवाची पूजा करते. तिन्हीसांजेला देवापाशी दिवा लावते. फार गडबडीत नसेल, तर कधीमधी रामरक्षा पुटपुटते. शनिवारी बाबांचा उपास असतो. चतुर्थीला घरात खिचडी होते. पाळी चालू असताना आई बाजूला बसत नाही, पण मुद्दामहून देवाला शिवायलाही जात नाही. घरी कधी हळदीकुंकू वगैरे झाल्याचं आठवत नाही. पण हळदीकुंकू घ्यायला आईची ना नसते. आजी घरात असेल, तेव्हा ती हातात एखादी बांगडी चढवून ठेवते. कुठे फिरायला वगैरे गेलो, तर आम्ही तिथली देवळंही बघतो. हात जोडतो, तीर्थप्रसाद घेतो. माझी आणि माझ्या बहिणीची पत्रिका बनवलेली आहे.




असं सगळं असताना देव किंवा त्याला लागून येणारा धर्म मी इतका बेदखल का केला असेल? याचं कारण शोधताना मला नेहमी एक गंमत आठवते.



आपल्याला मतं फुटायला लागतात त्या काळात कधीतरी, म्हणजे दहावी-अकरावीत असताना असणार, माझा मावसभाऊ घरी आला होता. आडव्या-तिडव्या वाचनामुळे, आणि अंगातल्या उद्धटपणामुळे, माझे ज्वलंत - जहाल - स्त्रीवादी - निधर्मी वगैरे विचार तेव्हा जोरात होते. ते मोठ्यामोठ्यानं मांडायची खुमखुमीही होती. सगळ्यांना त्यांचा मूर्खपणा - अन्यायीपणा दाखवून वगैरे द्यायला पाहिजे, असलं काहीतरी अचाट तेव्हा वाटायचं. असल्याच कसल्यातरी वादात मी मोठ्यामोठ्यानं ’देव नसतोच’च्या बाजूनं आणि माझा भाऊ ’देव असतोच’च्या बाजूनं तारस्वरात भांडत होतो. कुठल्यातरी एका पॉईंटला त्याच्या बाजूनं आर्ग्युमेंट्स संपली. ’तुला इतकं वाटतंय ना, देव नाही असं? मग होऊन जाऊ दे. देव्हार्‍यातला देव घे आणि त्याला पाय लावून दाखव. पाहू तुला जमतं का?’ असं आव्हान त्यानं दिलं. मीही ’हात्तेरेकी, त्यात काय, घे!’ असं म्हणत शिस्तीत जाऊन देव्हार्‍यातली देवीची लहानशी पितळी मूर्ती घेऊन जमिनीवर ठेवली, त्यावर पाय दिला आणि त्याच्याकडे विजयी मुद्रेनं पाहिलं. तो अर्थातच निरुत्तर झाला. ’तू आचरट आहेस बाबा खरंच. जरापण भीती नाही...’ असलं कायतरी तो बडबडला आणि तो वाद माझ्यापुरता जिंकून संपला. परत पत्ते सुरू झाले. संपलं.


आई घरातच होती. कशातच मधे न पडता फारसं लक्ष न दिल्यासारखं करत पडल्यापडल्या शांतपणे ऐकत होती. तिनं सगळ्या वादात माझी बाजू घेतली नाही आणि त्याचीही नाही. मला थांबवलंही नाही. नंतर काही प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही. कदाचित प्रतिक्रियेच्या या अभावामुळेच, तिला जणू कळलंच नाहीये, मी काय पराक्रम केला ते, अशा थाटात मी तिला मारे सगळी गोष्ट सांगायला गेले. तर ऐकून म्हणाली, पाय ठेवलास म्हणजे काय थोर साहस केलंस? पितळेची वस्तू ती. ती काय खाणारे तुला? तुझा नसेल विश्वास. तुझ्यापुरता. लोकांचा आहे ना. लोक त्या मूर्तीसमोर हात जोडतात. त्यांच्या विश्वासावर पाय ठेवलास. तूच कर विचार, चूक की बरोबर त्याचा.


विषय संपला. तिला काहीच फरक पडला नाही. नेहमीसारखा संध्याकाळचा दिवा लावणं, हात जोडणं यात काही फरक नाही. माझ्यावरही अजिबात राग दर्शवला नाही. तिच्यापुरता खरंच विषय संपला. तिनं मूर्ती साधी धुतलीही नाही लगेच. काय जनरल आठवड्या-पंधरवड्यानं देव्हार्‍याच्या साफसफाईची वेळ आली, तेव्हाच दिव्यासकट सगळ्या मूर्ती स्वच्छ झाल्या, हे मी मुद्दाम लक्ष ठेवून पाहिलं.


परत मी कधी देव आहे की नाही, या गोष्टीवरून तावातावानं वाद घातल्याचं आठवत नाही. पाळी चालू असताना उद्मेखून देवापाशी दिवा लावायला जाणं आणि ’मुद्दामहून अगोचरपणा नकोय’ वगैरे क्षीण विरोध करणार्‍या आईशी वाद घालणं वगैरे आचरट प्रकारही परत करावेसे वाटले नाहीत. मग ’माझा विश्वास नाही, मी देवापुढे हात जोडणार नाही’ असल्या घोषणाही कधी केल्या नाहीत. हात न जोडून जसा फरक पडत नाही, तसा जोडल्यानंही फरक पडत नाही इतपत तर्क आणि सहिष्णू वृत्ती माझ्यात शिरली असावी. सगळं आपापल्या समाधानाशी आणि विश्वासाशी येऊन थांबतं, हे कुठेतरी जाणवलं असावं.




म्हणूनच अंनिसच्या कामाबद्दल कधी भारावलेपणा वाटल्याचं आठवत नाही. फारशी खोली नसलेलं, लोकांची पिळवणूक बंद करण्याचा प्रयत्न करणारं एक काम, इतपतच महत्त्व त्याला द्यावंसं वाटलं. कायद्यापलीकडे शोषण होत नाही ना, इतकं पाहून लोकांना आपापले विश्वास-श्रद्धा जपायचा हक्क आहे, त्यांना आवश्यक असेल त्या - झेपेल त्या निष्कर्षावर त्यांनी स्वत:च आलं पाहिजे, अशी एक धारणा होऊन बसली. कितीतरी वेळा तर देवावर विश्वास नसलेले लोकही आपला अविश्वास असाच वारसाहक्कानं, विचार न करता कंटिन्यू करत असल्याचं दिसलं. तेव्हा ’आईनं सांगितलं म्हणून मी करते मनोभावे’ या साच्यातला गुरुवारचा उपास आणि असला देवावरचा अविश्वास यांत काय फरक, असं वाटून गंमत वाटली. मग कधीतरी ’धर्मशास्त्राचा इतिहास’, ’विवाहसंस्थेचा इतिहास’ वगैरे वाचलं, तेव्हा तर करमणूकच झाली. आणि या सगळ्या व्यवस्थेतलं शोषण - संधिसाधूपणा असं पुराव्यासह समोर ठेवलं तरीही ज्याला यातल्या कर्मकांडावर विश्वासायचं आहे, ज्यांना त्यातून अनामिक दिलासा मिळतो, ते सगळ्या पुराव्यांकडे डोळेझाक करूनही विश्वास ठेवणारच, याची खात्रीही पटली.



हिंदू असल्याचा अभिमान वगैरे तर मला कधी नव्हताच. हिंदू आहोत म्हणजे काय आहोत, हेच बोंबलायला माहीत नाही, तर अभिमान कसला कपाळाचा? त्यातल्या विशेषत: बायकांकरता खास बनवलेल्या चालींची मात्र शरम वाटायची. पण तसल्या मखलाश्या जगातल्या कुठल्याच धर्मानं करायच्या ठेवलेल्या नाहीत, हे कळलं, त्या कुठल्यातरी टप्प्यावर मी निधर्मी आहे असं स्वत:ला सांगणं मी सोडून दिलं. आकाशातला बाप, प्रेषित किंवा विहीरीत प्रेत टाकून देणं या गोष्टी नाहीतरी मला परक्या वाटतात. तितक्या हिंदू धर्मातल्या संकल्पना मला परक्या वाटत नाहीत म्हणजे हा माझा धर्म. कुठल्याही भोंगळ तत्त्वज्ञानापासून कठोर कर्मकांडापर्यंत आणि चार्वाकापासून ते बुद्धापर्यंत सगळ्यांनाच आपलं म्हणणारा आणि टिकून राहणारा हा लबाड धर्म आता मला कधी क्रूर, कधी मजेशीर, आणि नेहमीच सर्वायवलचं रहस्य जाणणारा वाटतो. त्यात अभिमान कसला नि लाज कसली? गंमत आहे.



पण म्हणजे मी धार्मिक आहे की काय? काय माहीत.

Tuesday 19 May 2009

लिहिण्याची सवयच गेलीय

लिहिण्याची सवयच गेलीय.

विश्राम बेडेकरांनी म्हटलं आहे, त्या चालीवर आपण लिहिल्याशिवाय जगू शकतो म्हणजे आपण लेखक नाही. मग हा अट्टाहास कशासाठी?

उगाच खुजली म्हणून.
पांढर्‍यावर आपल्या नावानं काळं झालेलं दिसलं की गारगार, एकदम सत्ताधीश वाटतं म्हणून.
कुणी कुणी 'वा, छान' म्हणतं म्हणून.
कुणी 'कशाला लिहिता ही नष्ट घाण' असं खरोखरीचं चिडून विचारल्यावर अजूनच उचकायला होतं म्हणून.
एरवी काही अंगाला लावून न घेता अल्लाद पार होणार्‍या आपल्या वॉटरप्रूफ कातडीला लिहिता लिहिता कुठेतरी जोडलं गेल्यासारखं वाटतं म्हणून.
कुठल्यातरी आठवणीतल्या किंवा स्वप्नातल्या क्षणाच्या अर्धुकात, लिहिल्यावर एकदम रितं-मोकळं-ओझंहीन वाटल्याचा भास अजून शिल्लक आहे म्हणून.

सगळीच उत्तरं. किंवा कुठलीच नाहीत.

पोटाचा खड्डा भरून बराच रिकामटेकडा वेळ आणि खुमखुमणारी ताकद उरते हेच कदाचित उत्तर.

तरीही लिहिण्याची सवय गेलीय. म्हणजे आपण लिहिण्यावाचण्याला एक निरुपयोगी छंद मानणार्‍या लोकांइतके माजलो की काय? कदाचित तसंच.

हा माज उतरवण्याकरता तरी लिहीत राह्यलं पाहिजे.
लिहिण्याची सवयच गेलीय, तरीही.

Sunday 8 March 2009

सर्जनाच्या दर्शनाने सर्जनाची वाट व्हावे

कलावंताला लिंग नसतं असं म्हणतात. पण आज जिवाजवळच्या, सोबत करणार्‍या लेखकांची नावं आठवत गेले, त्यात आश्चर्यकारक प्रमाणात बाया निघाल्या. अपवाद होतेच. चांगले सणसणीत अपवाद होते. पण ते अपवादच. नियम अधोरेखित करणारे.

बाई असणं इतकं निराळं करतं माणसाला? लेखकाला? कलावंतालाही? की आस्वाद घेण्यातली ही आपली मर्यादा? की सवयीचं-सरावाचं तेच आपलं मानण्यातला बथ्थड आळस? की खरंच जैविक-सांस्कृतिक बंध? कुणास ठाऊक.

आजच्या महिलादिनाच्या निमित्तानं या काही कविता. सोबत करणार्‍या.

रंगीबेरंगी इच्छांच्या रथात बसून
दूर निघालेल्या एका उत्कट मुलीची गोष्ट
सांगते आहे मी तुम्हांला.
मुलगी, जिला ऐकू येतो प्रेमाचा ओला आवाज
कृष्णमेघात ओथंबलेल्या पावसासारखा
आणि जिचं आख्खं हृदयच सळसळून हिरवं होतं.
जी सहज विश्वास ठेवते मग अनोळखी तरुणावर
अदृष्टातून येणार्‌या त्याच्या पौरुषाच्या गंधावर
आणि दूर सारून स्वत:चं माहेरघर,
झोकून देते स्वत:ला सरळ त्याच्यावर.
ना वाजंत्री, ना तोरणं, ना विरोध, ना रडणं
अडवू शकत नाही तिला काहीच,
एकदा मन मंतरल्यावर.
स्वप्नांचं सार्थक त्याच्या डोळ्यांत
आणि युगांचे संभव त्याच्या स्पर्शांत.

त्याच्या स्मरणानंही करता येतं तिला साहस
प्रियजनांपासून प्रेमाला लपवण्याचं.
परिचिताचा हात सोडण्याचं,
अज्ञाताला मिठी घालण्याचं.
तिला माहीत नसतात दुखरे तपशील
तिच्या पुरुषाच्या भूतकाळातून सरसरत येणारे -
कालियासारखे हिरव्या हृदयाला विळखे घालत दंश करणारे
जगणं मरणापेक्षाही अवघड करणारे.
त्याच्या फूत्कारांनी भरून जाणारं आयुष्य ठाऊक नाही तिला.
आता तुम्ही थांबवू शकाल?
परतवू शकाल?
दुखवू शकाल?
त्या रंगीबेरंगी इच्छांच्या रथातून जाणार्‌या कुंवार मुलीला?

अरुणा ढेरे (बहुधा मौजेच्या दिवाळी अंकातून)
---

नव्या वाताहतीला सामोरं जाताना
मी पुन्हा धरलं कवितेचं बोट
की, बाई... माझ्या धांदोट्या ठेवायला
असून दे थोडी जागा तुझ्या ओळींमधून
तर ती हसली खळखळून मैत्रिणीसारखी.
तिच्या हसण्यानं फडफडली वहीची पानं
आणि जुन्या वाताहती पुन्हा
सहज उघड्या पडल्या.

वाताहतीला वाताहत म्हणतात हे ठाऊक नव्हतं
तेव्हापासूनचा सगळा इतिहास,
नजीकच्या भूतकाळापर्यंतचा...
काही शिकता येत नाही या इतिहासातून,
टाळता येत नाही कुठलीही वाताहत
किंवा रोखताही येत नाही;
नष्ट करणं ही तर खूप दूरची आणि
दुरापास्त गोष्ट.
आता अनुभवामुळे फार तर
तिच्या रूपाबद्दल अंदाज बांधता येतात
आणि निमूट स्वीकारता येते
होत जाणारी पडझड;
मिसळून जा म्हणता येतं तिला
जुन्या वाताहतींच्या घोळक्यात.

खरं तर सगळी कृती मला पाठ झाली आहे:
सगळ्याच संकटांना संधी मानायचं;
पहाटे तुळशीला पाणी घालायचं:
फळ्यावर रोज नवा सुविचार लिहायचा;
हिंसेचे फुटवे खुडून टाकायचे;
आलेला ऋतू आल्हाददायक म्हणायचा;
तू सोबतच आहेस असं समजायचं;
न्हाऊन वाळवायचे ओले केस;
आरश्यात चेहरा पाहायचा ओळख राहावी म्हणून;
अंगभर बचाव गुंडाळायचा
आणि उतरायचं पुन्हा रस्त्यावर
नव्या वाताहतीला सामोरं जाण्यासाठी.

दर वेळेसारखंच असणार मग सगळं...
कोसळायचं, पुन्हा उभं राहायचं, धडपडायचं;
जे शाबूत राहिलंय ते सारं गोळा करायचं;
मातीत तूस मिसळलं की घट्टपणा येतो घड्याला
तसं सार्‌या वाताहती स्वत:त कालवत
मिसळत मळत घडवत न्यायचा नवा आकार
आणि ओलेपणीच नक्षी कोरावी
तशी लिहून ठेवायची पुन्हा एखादी कविता
नव्या वाताहतीला सामोरं जाण्यासाठी.

कविता महाजन (महाराष्ट्र टाईम्सच्या दिवाळी अंकातून)
---

माझ्या पणजीच्या आजीचे नावसुद्धा मला माहीत नाही.
परकराचे ओचे बांधून गाणी गात
ज्याच्या पारंबीला लोंबकाळून ती झुलली
तो वडसुद्धा मला ठाउक नाही.
ज्या दगडांवर धुतले तिने ऋतुस्नात बोळे,
ज्या नदीचे पाणी झाले लाल, जांभळे, काळे
तो दगड, ती नदीसुद्धा मला माहीत नाही.
जेव्हा पहिल्यांदा कण्हली ती संभोगाच्या कभिन्न रात्री
तो स्वर सुखाचा, की सूर दु:खाचा होता
तेसुद्धा मला ज्ञात नाही.
जन्म देतांना तिनं फ़ोडलेला हंबरडा मी ऐकलेला नाही.
तिला वारंवार फ़ुटलेला पान्हासुध्हा मी चाखलेला नाही.
तिनं शेंदलेल्या घागरीही मी वाहिलेल्या नाहीत.
तिला दिसलेल्या खुणादेखील मी पाहिलेल्या नाहीत.
कसा गेला तिचा जीव जाताना, कशात अडकला ठाउक नाही.
कोण रडले तिच्यासाठी, कोण कुढले उरलेल्यांतले माहीत नाही.
कोणी वेचली तिची विरासत, कोणी उष्टावून फ़ेकून दिली याद नाही.
कोणी कुठले वसे घेतले, कोण उतले, कोण मातले, ज्ञात नाही.

मात्र तिच्या तपशीलांची राख उधळणारा वारा अजूनही वाहातो.
भला मोठा श्वास होऊन माझ्या छातीत अडकतो.
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश....
त्याच असतात पारंब्या कालातीत अश्वत्थांना
अजूनही लोंबकळून झुलतात मुली ज्यांना...
पणजीची आजी नाही म्हणावी तर तसे नाही.
पण तिचे नाव मात्र आता कुणाला ठाउक नाही!

मेघना पेठे [ऑर्कुटवरून (http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=12387259&tid=5305406129799140274&start=1) साभार]

Sunday 18 January 2009

नाना परीच्या निकडी । खेळ मांडियेला ॥

ही जी चिडचिड होते, ती कशामुळे होते?
एक मिनिट. या सगळ्या प्रकारात आत्मसमर्थन का काय ते होणार. पण शक्यतोवर ते टाळून थोडं लांब जाऊन पाहायचा प्रयत्न आहे. शक्य तितका प्रामाणिक.
तर, ही जी चिडचिड होते, ती कशामुळे होते? आपल्याला हव्या तशा गोष्टी आजूबाजूला नसल्या की चिडचिड होते. हव्या तशा म्हणजे? हव्या तशा गोष्टी म्हणजे स्पेस. म्हणजे काय? आपल्याला एकट्याला निवांत जागा?
नाही, फक्त तितकंच नव्हे. आपल्याला हवं ते, हवं त्याला, हव्या त्या पद्धतीत, हवं तेव्हा बोलण्याचं - जास्त नेमकेपणानं सांगायचं तर, व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य. म्हणजे स्पेस. तर ही स्पेस आपल्याला कुणालाच मिळत नाही आहे. आणि हा फक्त जागा - कमी किंवा अधिक जागा - हा प्रश्न नाही. त्याच्यापलीकडचं काहीतरी आहे.
वर्तुळाच्या परीघामधेच दुसर्‍या वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतला आणि ते दुसरं वर्तुळ पुरं केलं तर काय होतं? परीघ एकमेकांमधे शिरतात. असं एकदा केलं तर ओव्हरलॅपिंग प्लेन तयार होतं.
पण असंच वारंवार अनेकवार परत परत परत केलं तर? तर केऑस तयार होतो.
सध्या आपण केऑसमधे राहतो आहोत. गोंधळ होणं साहजिक आहे.
कुठलं वर्तुळ आधी काढलेलं, कुठलं नंतर काढलेलं, कुठलं ठळक, कुठलं पुसट, कुठलं मोठं, कुठलं लहान - हे सगळे प्रश्न इथे गैरलागू आहेत. जिवंत गरगरती वर्तुळं आहेत. ओव्हरलॅपिंग आहेत. केऑस आहे. चिडचिड आहे.
या सगळ्याला पर्याय नाही.
तर आपण हे मुकाट स्वीकारू या.
आता हे स्वीकारूया बीकारूया प्रकरण कागदावर ठीक आहे.पण ते जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात नाकापाशी होत असतं, चार-दोन धक्के लागत असतात, पाणी अंगावर उडत असतं - तेव्हा काही झक मारायला स्वीकारूया वगैरे आठवत नाही. देधडक बेधडक पद्धतीनं आपण - म्हणजे मी - तोंड सोडून मोकळे होत असतो. मी तरी असंच डील करत आलेली आहे. कधी मी कुणाच्या अंगावर वसकन ओरडते, कधी समोरचा घुम्म बसून राहतो. चालायचंच. कभी बाजी इधर कभी बाजी उधर. एकदा माणूस आपला म्हटला, की असल्या दोन दिल्या-घेतल्याची चिंता करून भागत नाही. त्याच्या - आणि माझ्याही - इमोशनल आउटबर्स्ट्समधे आमची दोघांचीही एनर्जी भरपूर खर्च होत असते. त्यातून डोक्यावर डोकी आपटतात. त्यातून कधीकधी नाही त्या गुंतागुंती होतात, नाही असं नाही. पण एकदम आत्म्याचे दोस्त का काय म्हणतात ते - किंवा दुश्मनही - असल्याच एन्काउण्टर्समधून मिळण्याच्या शक्यतेची शक्यता असते.
ही संधी असते. धोकाही. माणूस कायमचा आपला/परका होत जाण्याची/चा. व्हाइस व्हर्सा.
तर माणसं कितीही बदलली, नवीन असली, तरी या प्रोसेसला काही शॉर्टकट नाही. त्याची काही ग्यारण्टीही नाही. हे असं असं खेळूनच पाहावं लागतं. पाहावंच लागतं. पाहावं लागतंच.
नाहीतर मग बसा मुकाट रिंगणाबाहेर. तर आपण हेही - मुकाट जरी नाही, तरी - स्वीकारू या.
स्वीकारलं की नीट मनापासून खेळता येईल. एकदा खेळच म्हटला, की शांतता कोर्ट चालू आहे स्टाईलमधे आपलं आयुष्य वेगळं आणि खेळ वेगळा या पद्धतीत नीट एन्जॉय करता येईल. स्पेस मिळेल - न मिळेल - पण तिचा आभास तरी निर्माण होईल. कुठलं तरी वर्तुळ पुसता येईल. कुठलं तरी विस्तारता येईल. आपापल्या सिस्टीममधला केऑस नीट मनासारखा एकमेकांच्या अंगावर सोडता येईल. परिणाम काय व्हायचे ते होवोत. काही बंध घट्ट होतील. काही कापले जातील.
आतून दाटलेले आपण रिते - मुक्त होऊ. कदाचित थोडे थोडे एकमेकांना भरूनही देऊ.
तर निकाल काय असायचा तो असो. खेळणं आवश्यक आहे. हे तरी आपण स्वीकारू या. स्वीकारू या?

Tuesday 13 January 2009

आम्ही लटिके ना बोलू...

एखादा देणेकरी सतत आसपास दिसत राहावा तसंच हे. गप्प, घुमा, निर्विकार चेहर्‍याचा, चिवट देणेकरी. त्याला नजरेसमोरून वारता वारता आपण थकत जातो, पण तो थकत नाही. कुठल्याही जिवंत अनुभवाच्या परीघात हक्कानं येत राहतो तो. निर्लज्जपणाचा आव आणत आपण अधिकाधिक अस्वस्थ.
चंदन-आंघोळीच्या ताज्या गंधापासून ते प्रचंड मानसिक दमणुकीच्या कडेलोट क्षणीही - हे शब्दांत पकडता येईल? वापरता येईल कुठे? - असा धंदेवाईक प्रश्न डोकं वर काढत राहतो आणि आपण आपल्यावरच्याच संतापानं होत राहतो बेभान.
धड भोगता येत नाही, धड मांडता येत नाही अशातली अवस्था. शरम तर वाटतेच आहे. तरीही - एकदाच कोलाजाची एक धेडगुजरी गोधडी विणून नामानिराळं व्हावं का- असा गेंडाकातडी प्रश्न पडतोच. आपण लोचट की हा प्रश्न लोचट - अशी कोडीही नकळत सोडवत बसलेले आपण.
अशाच कितव्यातरी क्षणी हातात येतो एखाद्या अनुभवाचा निसटता तुकडा. आपण धंदेवाईक तानाजी होऊन घोरपडीच्या वरताण नख्या रोवतो. आता शेंडी तुटो वा पारंबी तुटो, वरती पोचायचं आहे बस्स, असं डोळ्यांत उतरलेलं रक्त. तरीही हातात मातीच येते. येऊ शकते.
सर्जनाचे रंग असेही. विटके. मळके. रंगहीन.