Wednesday 20 August 2008

आवडलेले थोडे काही

संवेदचा खो घेऊन या कविता पोस्ट करतेय -
हरिलाल
खूप उशिरा ओळख पटत जावी एखाद्याची
तसे जाता जाता
एकमेकांना आवडू लागलेले आपण
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?
एखादा पाहुणा नको-नको म्हणत असताना
कोडग्यासारखा राहायला यावा आपल्या घरात
तसा तू माझ्या वस्तीला आलास
आणि खूप मनस्ताप दिलास
तुझ्या आईबाबांसारखाच मलाही.
माझ्यातल्या सगळ्या सवयी,
सगळ्या व्याधी, सगळ्या वेदना पाहून
तुला ओळखीचं वाटलं असेल
कदाचित माझं शरीर,
कदाचित...
तुला श्रीमंत करायचं असेल मला
मला आणखी दु:ख देऊन.
पण तू येण्याच्या खूप आधीपासून
तुझ्यासारखाच खूप वणवणलोय मी
दु:खाच्या शोधात,
इतका...
की तू जेव्हा शिरलास माझ्यात
तेव्हा तुझं दु:ख आणि माझं दु:ख
मला फरकच करता येईना त्यांच्यात.
म्हणूनच लोक
मला तू समजू लागले
आणि तुझा लौकिक इतका
की हळूहळू लोक मलाही ओळखू लागले.
आणि आता
माझ्या भोवताली ही माणसांची गर्दी
'तू' जमवलेली
उद्या ही मला विचारील
'कसा आहेस तू?'
तेव्हा मी तिला काय उत्तर देऊ?
मला माणसामाणसांनी समृद्ध करून जाणारा तू...
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?
मी तुला माझ्यातून जायला सांगत नाही
आणि अजून थोडा थांब म्हणून
राह्यलाही सांगत नाही
इतकी मला आता तुझी सवय झालीय...
आता तुझं असणं-नसणं
माझ्यासाठी एकाच प्रकारचा मनस्ताप!
पण तरी
तू का आवरू लागलायस
माझ्यातलं तुझं एकेक सामान?
का गुंडाळू लागलायस
प्रवेशच्या प्रवेश पानांसकट?
का करू लागलायस बांधाबांध
तासागणिक वर्षांची?

उद्या-परवा
तू अखेरचा पडदा पाडशील आपल्या दोघांत
आणि चालू लागशील दूरची पायवाट
तेव्हा
बाहेर जाताना लहान मूल जसं मागे लागतं...
तसा मी तुझ्या मागे लागू?
मी तुझ्याकडे काही मागू?
प्रयोगागणिक मला लहानाचा मोठा करत जाणारा तू...
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?

उन्हात वणवण फिरताना
मला तुझी आठवण येईलच
आईच्या डोळ्यांत बघताना
माझ्या काळजात धस्स होईलच
तुझा चेहरा विरला तरी
तुझी चाहूल राहीलच...
पण मित्रा, एक सांग...
कुठे जाशील?
काय करशील?
कसा राहशील?
तसा आहेच भणंग मीही
पण जाता-जाता
मला आणखी भणंग करून जाणारा तू...
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?

('गांधी विरुद्ध गांधी'चे शेवटचे तीन प्रयोग चाल्ले असताना)
सौमित्र
***
कुठून करावी सुरुवात
रोज एक चुटपूट ठेवून देते मी
जिभेखाली विरघळवत तास न् तास.

दिवसभर उन्हातान्हात फिरून शिणलेले शब्द,
थंडीवार्‍यात काकडलेल्या ओळी, पाऊसपाण्यात
चिंब परिच्छेद... एकवटून येतात रात्री
एका पत्रासाठी, जे तुला पाठवण्याची
शक्यता आजमावतेय मी दररोज.

कळत नाही, कुठून करावी सुरुवात
पुन्हा स्वतःला रचायला.
की, काही तरी सलग अर्थाचा शब्द
तुझ्या हातावर ठेवायला हवा...!
कविता महाजन
माझा खो नंदन आणि ए सेन मॅनला.

9 comments:

  1. "Harilal" vachun adhi kahi samajla nahi, mag magchya post madhla reference vachla ani sandarbh lagle. Mast ahet donhi kavita :)

    ReplyDelete
  2. nahi... kahi garaj nahiye ya kavitanchi!!!
    jalun tak tya!!!

    ReplyDelete
  3. चांगल्या आहेत कविता...

    ReplyDelete
  4. nice....aawadalya kavita...kho ghetoch lavkar

    ReplyDelete
  5. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  6. की बोर्डाला वाळवी लागली का?

    ReplyDelete
  7. Tu melyes ka?
    Thik aahe, khoop pahuNe tuzyakade yetayat.

    ReplyDelete
  8. tumhi lihina banda kelay ka aajkal? ka ajunahi tumacha kantala gela nahi? ... :)

    ReplyDelete