Tuesday 8 July 2008

इक कविता का वादा है, मिलेगी मुझको..

आतड्याची माणसं आपलं मरण स्वीकारत नाहीत तोवर म्हणे आपण मेलेले नसतोच.
शरीर संपून त्याची राख वा माती होतही असेल कदाचित. पण अस्तित्व मात्र उरतं.
अस्तित्व उरतं म्हणजे काय? आपण उरतो?
आपण म्हणजे जर हे शरीर, हाडकं, रक्त-मांस नसूच - तर आपण काय असतो? आपल्या माणसांच्या ऊष्ण आठवणी? आपण म्हणजे आपल्या कृतींचे कुणीतरी लावलेले अन्वयार्थ केवळ? किती भीषण आहे हे?
'एक दिन अचानक’ म्हणून एक सिनेमा पाहिला होता मृणाल सेनांचा. एक दिवस घरातला कर्ता पुरुष संध्याकाळी घरी परततच नाही. संध्याकाळ उलटते. रात्र होते. काळजीनं कुळकुळत रात्रही संपते. शिळी दमलेली सकाळ. काळजी. पोलिसांकडे नोंदवलेली तक्रार. ठिकठिकाणी केलेली शोधाशोध. कासावीस होऊन केलेली विचारणा. ढुंढाळलेल्या विहिरी. इस्पितळं. स्टेशनं. हाती आलेली रिकामी निराशा.
अशा अनेक संध्याकाळी. रात्री. सकाळी. उदासवाण्या - आशाळभूत.
आता घरानं प्राक्तन स्वीकारलं आहे त्याच्या पुरुषानं त्याच्याकडे पाठ फिरवल्याचं. पण तरीही अद्याप आशा पुरती मेलेली नाही. धुगधुगी आहे तिच्यात अजुनी. अजून कातरवेळेला जीव हुरहुरतो. चपलांची विशिष्ट करकर ऐकू आली, तर मन उशी घेतं. वरणाला फोडणी देताना अजुनी लसूण पडत नाही हातून. ’ह्यांना नाही चाल-’
चितेला अग्नी देताना, शरीराला मूठमाती देताना, अस्थी गंगेत विसर्जित करून पाण्याकडे पाठ फिरवताना हीच हुरहुर विसर्जित होत असेल? असण्याच्या आशांना चूड लागत असेल? अभाव चरचरीतपणे अधोरेखित होत असेल? काय होत असेल नेमकं?
पार्वतीबाईंचं काय झालं असेल?
त्यांचा कर्तासवरता नवरा असाच एकाएकी होत्याचा नव्हता झाला की. आत्ता होता - आत्ता नाही.
चुडा फोडू? भरलं कपाळ पुसू? मंगळसूत्र काढून ठेवू? असं कसं? अजून इकडच्या स्वारीचा देह नाही पाहिला, आणि हे काय भलतंच अभद्र? कुठे असतील ते - मी सधवेची विधवा होऊन त्यांना अपशकुन करू?
बाई आयुष्यभर अशीच जगली...अहेवपणाची लेणी लेऊन.
तिच्या मनात कातरवेळेला काय दाटलं असेल? अशुभाचा निर्वाळा देणारं आपलंच मन तिनं कसं घट्ट केलं असेल? रोज वेणीफणी करताना कुंकवाच्या करंड्यात बोटं थबकत असतील तिची? आणि जर तिला खरीच असेल खात्री सदाशिवभाऊंच्या जिवंत असण्याची, तर तिनं मनोमन साधला असेल संवाद त्यांच्याशी? काय बोलली असेल ती?
तिच्या रक्तामांसाच्या अपेक्षा होत्या जोवर, तोवर भाऊ होतेच. त्यांचं श्राद्ध झालं नव्हतं तोवर...
श्राद्ध.
हेसुद्धा आपल्याच आग्रहाला मूठमाती देण्यासाठी केलेलं कर्मकांड काय? जाणारा जीव जातो. त्याची माती होते. पण मागे राहणाऱ्यांचं काय? जाणाऱ्याच्या अभावानं उभी राहिलेली राक्षसी पोकळी कशी स्वीकारायची त्यांनी? कुठल्या ठाम दगडावर टाच रोवून स्थिर करायचे कापणारे पाय?
म्हणूनच असत असली पाहिजेत कर्मकांडं. दु:खाची कधीही न पुसता येणारी लाखबंद मोहर कपाळी उमटवण्यासाठी.
ज्यांना ही कर्मकांडं लाभत नाहीत, त्यांना खरंच नसेल येत पुरतं मरण? अशी माणसं भाग्यवान म्हणायची की अभागी?
सालं कुणाला न कळवता मरूनच पाहिलं पाहिजे एक दिवस.

14 comments:

  1. Jagtana kiti pan naak war karun tora mirawla...
    Shahanpanachya, samjutichya saglya payrya chadlo tarri pann nahich...

    Marun baghta yet nahich...

    ReplyDelete
  2. आईग्गं!!!

    वाईट लिहीणारे तर शेकडोंनी आहेत ब्लॉगविश्वात, पण परिणामकारक वाईट लिहीणारे फ़ारच मोजके.

    परिणामकारक वाईटची व्याख्या अशी की वाचणारा कुठल्याही मूड मधे वाचायला सुरुवात करेनाका, पण वाचून संपवताना त्याच्या मेंदूची गटार झालीच पाहिजे.

    त्या स्केलवर मागचं पोस्टच अप्रतिम होतं, आता हे महाअप्रतिम म्हणावं लागेल. :)

    आणखी लिहीत रहा.

    ReplyDelete
  3. ............................



    ...Sneha

    ReplyDelete
  4. "सालं कुणाला न कळवता मरूनच पाहिलं पाहिजे एक दिवस." :-))

    Great post, very effective.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  6. maunraag madhe vachalela aaThavatay - hindunchech antyasanskar etake rokh-Thok, kasalihi sajaavaT shobhaa nasaNaare. Gelelyachya rahoon gelelya jagevar shikka-mortab karaNare.

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  9. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  10. ढिगानी कॉमेन्ट्स डीलीट केलेल्या दिसताहेत...का विचारण प्रशस्त दिसत नाही पण मनुष्य-स्वभाव! दुसरं काय?

    ReplyDelete
  11. मेघन,

    एकदा तुझा ब्लॉग सापडला आणि आधाशासारखं वाचत सुटले.
    आता उपास जरा जास्तच होतोय.....
    आणि "खाईन तर तुपाशी" अशी अवस्था आहे, त्यामुळे लिहीत राहा ना ग...प्लीज.

    ReplyDelete
  12. किति दिव्स झाले लिहिल नाहि? कविता खरच 'भेटलि' कि काय? ;-)

    ReplyDelete