Thursday 10 April 2008

क्यूँ नये नये से दर्द कि फ़िराक मे तलाश मे...

क्युबिकलमधे हातपाय झाडून त्याला 'एरोबिक्स' म्हणायची सवय लावून घेऊन तसे बरेच दिवस झाले.
ते करताना चेहरापण निर्विकार ठेवता येतो आता.
भिवया उंचावल्या जात नाहीत आणि फिस्सकन हसायला येणार नाही याचीपण ग्यारण्टी देता येते.
जेवायला जाताना अडीच सेंटीमीटरचं स्माइल, 'बाय' म्हणताना दीड सेंटीमीटर पुरे.
येताजाता लोकांना 'हाय' न करता 'ब्लिंक' केलं तरी चालतं.
आपण बरं, आपलं काम बरं.
एन्जॉय माडी...

असलं स्वतःचंच कौतुक करत करत परवा 'जेन फोंडा'गिरी पार पाडली.

आणि आपलं नाक दीड फूट उंचावर ठेवून अलिप्तपणे माणसांतून वाट काढत चालायला शिकलो आपण, अशी शाबासकी स्वतःला देण्याच्या बेसावध क्षणीच एरोबिक्स-बाईनं चांगलं साडेपाच सेंटीमीटरचं हास्य माझ्या दिशेनं फेकलं.

काही कळायच्या आत मी माझ्याच खांद्यावरून मागे पाहिलं.

तिथे कुणीसुद्धा नाही, हे कळल्यावर मात्र मी दचकले.

म्हणजे... मला?
का बाई?
मी काय केलंय?
माफ कर...

असे विचार डोक्यात येतात न येतात तोच तिनं मोर्चा माझ्याकडे वळवला. मी कोण-कुठची, मी कित्ती मनापासून व्यायाम करते (हो? असेल बाई..), माझं स्माईल किती गोड आहे (...) वगैरे वगैरे पायर्‍या यथासांग पार पडल्या आणि मग जवळ जवळ रोज बाईंसोबत कॉफी घेणं आलंच.

कॉफी. थोड्या कोरड्या गप्पा. थोडं हसणं. ओळख. मैत्री...?

शिट्...

नाही नाही म्हणताना किती लोकांशी ओळखी झाल्या अशा.

'ठाणे. प्रमोद महाजन का भाई रहता था वहॉं. पता है?' या माझ्या प्रश्नाला 'मुंबई-ठाने. भारत की पहली लोकल ट्रेन. सन अठ्ठारासो तिरपन,' असं उत्तर देऊन माझी विकेट घेणारा एक बिहारी.

'भुस्कुटे म्हणजे....' असं विचारत हेतुपूर्वक थांबून, मी काहीच बोलत नाही म्हटल्यावर नाईलाजानं कावरंबावरं हसून, पुढे ओळख करून घेणारी एक मराठी मुलगी. अर्थात - महाराष्ट्राचा कोस्टल एलिमेण्ट!

'क्या? अस्सी हजार? तेरे पापा देंगे इतना डिपॉझिट? चल, मैं बात करवाती हूं सस्तेमें...' असं झापणारी एक दिल्लीकर पोरगी.

दुसर्‍याच रात्री कॅबमधून परतताना अंमळ जास्तच वेळ खिडकीतून चंद्र पाहिला, तर 'होमसिक झालीयेस?' असं मराठीतून विचारून मला दचकवणारा एक मराठी कलीग.

या सगळ्यांना निकरानं टाळता टाळता माझ्या जुन्या ऑफीसमधल्या मित्रांशी किती गप्पा मारल्या मी मनातल्या मनात.

माझे सगळे नखरे- सगळी नौटंकी किती सहज चालवून घ्यायचात तुम्ही.
इथे जेवता जेवता तेव्हा खास माझ्यासाठी आणलेल्या खरड्याची चव आठवते आणि जेवण कडू होतं.
आता इथल्या रिकाम्या संध्याकाळच्या गर्भार वेळी बांग ऐकताना त्या सगळ्या जिवंत संध्याकाळींची तलवार टेकलेली राहते गळ्यापाशी.
संध्याकाळ. तिला तरी कशाला बदनाम करावं फक्त?
आठवणींना काय प्रहर असतात?

दोन क्युबिकल्सच्या मधल्या जागेत मला सूर्यनमस्कार घालून दाखवणारा आणि 'बघू नका फक्त. करा. करा,' हे वर ऐकवणारा माझा बॉस.

प्रेझेण्टेशनच्या वेळी माझ्या चेहर्‍यावरचं टेन्शन वाचून एका मित्रानं केलेला मेसेज - 'टेक अ डीप ब्रेथ ऍण्ड से लाउडली - भोसड्यात गेली कंपनी...'

एका आत्यंतिक किचकट प्रॉब्लेमवर काम करावं लागू नये म्हणून माझ्याशी लपाछपी कम् पकडापकडी खेळणारे दोन वेडसर मित्र.

'का कंटाळलीयेस इतकी? चल, आइसक्रीम खाऊया?' असं विचारून मला ऑलमोस्ट रडायला लावणारा एक मित्र.

मला साडी नेसलेली पाहिल्यावर हसून गडबडा लोळण्याची ऍक्टिंग करणारा एक मित्र.

शेवटच्या दिवशी मला एकटीला जराही वेळ न देता अखंड बडबड करणारा, जाताना मला घट्ट मिठी मारणारा एक मित्र.

माझं क्युबिकल.
माझा पीसी.
माझी खिडकी.
खाडीचा खारा वारा.
लांबवरचं जिवंत-निवांत शहर.
तिथवर नेणारे ते फिलॉसॉफिकल रूळ...

उफ्फ्...

आता मात्र नाही.
मी मुद्दामहून तुलना करीन दुष्टपणानं यांची त्यांच्याशी.
मुद्दामहून कुचकटपणानं वागीन.
तुसडेपणा करीन.

पण आता नाही. परत नाही.

कष्टानं उभी केलीय सगळी तटबंदी. आता कुणाला इतक्या सहज सुरुंग नाही लावू देणार.

मग कितीही सेंटीमीटर हसा.
पण लांब असा. सुरक्षित अंतर राखून असा...

14 comments:

  1. आपण असे कष्टाने तट उभे करायचे आणि कुणीतरी ते तोडून पुन्हा नव्याने घुसखोरी करायची... कधी अचानक सुरूंग लावून... कधी हळूच, नकळत! हे असंच चालायचं :)

    Transition is never easy. May you have the strength and forbearance to tide over this...

    ReplyDelete
  2. :-) मीही अशीच तटबंदी उभी केलई अनेकवेळा नवीन जागी आल्यावर. पण कुणीतरी असंच हसून तडा देतं त्याला आणि बघता बघता मी त्यांच्याकडे बघून ’हाय’ म्हणायला लागते. असो. मस्त वाटलं वाचून.
    -विद्या.

    ReplyDelete
  3. ये मंजीले भी खुद ही तय करे ये फासले भी खुद ही तय करे....>>कष्टानं उभी केलीय सगळी तटबंदी. आता कुणाला इतक्या सहज सुरुंग नाही लावू देणार.

    झकास.. या गाण्यानं फारच वेड लावलं होतं,त्यामुळे आपोआपच इथे आधी आले.,आवडलं पोस्ट मनापासून

    ReplyDelete
  4. हं. माझं महिन्याभरानी काय होणारे हे तू मला अत्ताच दाखवून दिलंस. छान!

    ReplyDelete
  5. मेघना, अगदी खरंय गं....
    पण तटबंदीही फितूर झाली तर काय करायच??

    ReplyDelete
  6. कोई शहर अपना नही होता है दोस्त, बस गलीयों का सुनापन वही होता है

    पण दिवस काटायचेच आहेत तर निर्विकारपणाला थोडे तडे गेलेले बरे. भाषेखालची माणसं फारशी वेगळी नसतात हे त्यातल्यात्यात समाधान.

    "संध्याकाळ. तिला तरी कशाला बदनाम करावं फक्त?
    आठवणींना काय प्रहर असतात?"....मस्तच

    ReplyDelete
  7. abstract, yet another complete, rather "paripurna" write-up :)
    moving to a new place in a set of new people is never easy.
    and in the new place, if u meet s'one who's been to your old place - and passes you a message from your old friends/colleagues who remember you fondly...
    well.. all u can do.. is smile back.. smile back at those memories.. smile back at yourself :)

    loved this write-up..
    all the best..
    enjoy maadi! :)

    ReplyDelete
  8. बर्‍याच दिवसांनी भेट दिली, आणि बरंच काही "नवीन" वाचायला मिळालं! नेहेमीप्रमाणे छान! संवेदशी सहमत... मुळात तटबंदीच कशाला उभी करायची न? दोन तीन वेळेला असे तडे गेले की मग आपोआप कष्ट घ्यायचे थांबून जातो आपण...

    ReplyDelete
  9. एखादं गाणं डोक्यात राहून दिवसरात्र तेच गुणगुणायचं हे काही नवीन नाही. सध्या हेच गाणं बसलंय डोक्यात...नि त्यातच हे शीर्षक...जवळचं वाटलं.

    ह्या अशा भिंती उभ्या करायला नाही आवडत मला. पण सध्या त्या कराव्यात का अशा विचित्र गोंधळात हे पोस्ट वाचलं..पण अजून काही फारसं पटलं नाहीये असं वागणं. म्हणजे जेवढ्यास तेवढं ठेवायचं ठरवून बसलं की जास्तच त्रास होतो. माणसं बेसिकली चांगली असतात हे अजून पूर्णतः अमान्य नाहीये बहुतेक. नि मैत्रीचा ओलावा वगैरे बेसावध गाठतोच अनपेक्षितपणे, त्यामुळे काही कोरड्या झर्‍यांमुळे सगळीच नाती मुर्दाडच ठेवावीत असं काही अजून वाटत नाहीये...

    ----

    बहुतेक हे सगळे स्थितीशीलतेचे चोचले आहेत. जगजित सिंग गातो ती एक गजल आठवते नेहमी मला अशावेळी. ती का कोण जाणे हे वाचतानाही आठवली...

    "वक्त के साथ है मिट्टी का सफर सदियों से
    किसको मालूम कहाँ के किधर के हम हैं..."

    ----

    "संध्याकाळ. तिला तरी कशाला बदनाम करावं फक्त?
    आठवणींना काय प्रहर असतात?"...सही!

    ----

    "'ठाणे. प्रमोद महाजन का भाई रहता था वहॉं. पता है?'"
    :O लाज आणत्यास!

    ReplyDelete
  10. kyaa baat hai?

    (koni aapalya dukharyaa bhavanelaa ashi dad dili kii far vichitra vatat naa? aani ka koN jane hasu umaTat cheharyaavar te nemak kaa umatat te aapalyalach mahit asat...)

    स्नेहा

    ReplyDelete
  11. किती मनस्वीपणे आणि ओघवत्या भाषेत लिहीतेस गं. मनाला अगदी स्पर्शून गेलं.

    पण वाचून झाल्यावर का कोण जाणे, तुझ्या ठाण्यातल्या आणि बंगलोरातल्या सर्वच मित्र-मैत्रिणींना याबद्दल काय वाटत असेल याचा विचार करत राहिले. आणि जर मी त्यांच्या जागी असते, तर तुझ्याशी कसं वागले असते हे शोधत राहिले मनाच्या कानाकोपऱ्यात.

    ReplyDelete
  12. Majhi tatbandi ajun tari surakshit ahe...mahit nahi he changla ki vait.

    ReplyDelete
  13. @प्रिया
    खरंय. ट्रान्झिशन इज नॉट ऍट ऑल इझी. 'चालायचंच' हेच खरं!

    @विद्या
    :)
    असं करणं काही खरं नव्हे आणि बरं त्याहून नव्हे, हे कळत असतंच की आपल्यालाही. पण तरी रक्तातला हट्टीपणा थोडाच संपतो? असले हट्ट आहेत म्हणून तर गंमत आहे!

    @श्यामली
    हे गाणं त्या दिवशी तुझ्या ब्लॉगवरच वाचलं आणि मग अंगात आलेला गुरव जसा आपल्याच घराच्या दिशेनं नारळ फेकतो, तसे मला माझेच संदर्भ दिसायला लागले त्यात. असं गाणं आहे ना काहीसं -... दुसरेके दुख पे कौन रोया ए दोस्त, सब को अपनीही किसी बात पे रोना आया....
    तसंच. :)

    @संवादिनी
    यातपण धमाल आहे पण! पाहशील तू.

    @यशोधरा
    तटबंदी फितूर होते हाच तर खरा प्रॉब्लेम! आपण तसे अगदी निष्ठूर, निश्चयी आणि निर्विकारपणे स्वयंपूर्ण असतोच. तटबंदी दगा देते, म्हणून तर...

    @संवेद
    अशा किती अनुभवांना आधीचे ओशट संदर्भ लावून उष्टं करून टाकत असतो आपण? आठवण असणे ही गोष्ट चांगली की वाईट हे ठरवता आलं आहे तुला? अशा आठवणी काढून आवंढे गिळतो, तेव्हा अन्याय नक्की कुणावर करत असतो आपण? गतकाळावर, वर्तमानावर की स्वतःवर?

    असो... हे तुझ्या 'बस गलीयों का सुनापन वही होता है...'चे परिणाम.

    @मॉन्स्यूर के
    तू म्हणतोस तसं इथे कुणी आलं आणि असं काही म्हणालं, तर आपल्याला नाही बुवा झेपायचं. हसणं बिसणं तर दूरची बात...
    :) आभार!

    @सुमेधा
    असले हट्ट करायला आणि मोडायला मजा नाही येत का पण? जित्याची खोड.... दुसरं काय!
    April 11, 2008 10:39 PM

    @ए सेन मॅन
    प्रमोद महाजन - लाजच रे, खरंच लाज! पण अरे खरंच ठाण्याला त्याच्यामुळे ओळखणारे लोक भेटतात, म्हणून कडवटपणे मी तोच प्रयोग करायला लागले आहे.

    स्थितिशीलतेचे चोचले. अगदी खरंय. चोचलेच.

    @स्नेहा
    दुखर्‍या भावनेला दाद मिळवणं नुसतंच विचित्र नाही, विकृतही वाटतं. तरी परत एकदा - जित्याची खोड... :)

    @विदुषी
    आभार. पण बाय दी वे, आपण कसेही वागली, तरीही ज्यांच्या वागण्यात फरक पडणार नाही, अशी खात्री असते, त्यांनाच ना मित्र म्हणतात? यू डोण्ट हॅव टू डिझर्व्ह व्हॉट यू गेट फ्रॉम युअर फ्रेण्ड्स...

    @आनंद
    चांगलं की वाईट यावर काही टिपण्णी मी करणं काही खरं नव्हे. कारण त्याची उत्तरं काहीही असली तरीही आपापले हट्ट लावून धरणं मला आवडतं. तुझे हट्ट तू तपासून पाहतो आहेस ना पण? मग हरकत नाही... :)

    ReplyDelete
  14. zackaass!! sundar!! changla mantr ahe-take a deep breath....

    ReplyDelete