Thursday 6 December 2007

शो मस्ट गो ऑन, यू नो!

कविता. युद्ध. शृंगार. लालभडक मत्सर. रक्तपात-दंगली-खून. चळवळी-क्रांत्या आणि पुन्हा पुन्हा जन्म घेणारी कविता. एकाच चिरंतन तत्त्वाचं अव्याहत चक्र जणू...

आपल्या सगळ्यांमधलं हे जे स्पिरिट असतं ना, त्याला संस्कारांनी खूप आकार-उकार देतो आपण. वेळोवेळी काबूत ठेवतो स्वत:चेच सगळे अनावर विकार. तो संयम महत्त्वाचा खराच. पण निरोगी जिवाचं हे तडफडणारं स्पिरिट असतं ना, ते असं शांत नाही बसत. 'माझ्यात काय कमी आहे, म्हणून मी जाऊ देईन ही जगण्याची संधी' असं ज्या त्वेषानं म्हणत असेल एखादा निरोगी, चपळ, सुदृढ, नीती-अनीती न जाणणारा एखादा चित्ता भक्ष्यावर तुटून पडताना; त्याच त्वेषानं जागी होते मनातली ईर्ष्या. नीती-अनीती न जाणताच.

"मला तू हवा आहेस आणि तुलाही मी, मग का मानायचे हे संयमांचे बांध? हा कसला निसर्गाचा अपमान?"

असा रोखठोक प्रश्न यमी यमाला विचारते. ते रक्ताने भाऊ-बहीण असल्यामुळे त्यांना शरीर संबंध शास्त्रानं निषिद्ध सांगितलेला.
हाच प्रश्न विचारते निर्भयपणे लोपामुद्रा अगस्तीला. त्याला संयमानं शरीराची वासना जिंकायची आहे, म्हणून तो तिला शरीरसुख देऊ इच्छित नाही, तो तिचा पती असूनही.
हाच प्रश्न विचारते इंद्राणी इंद्राला. त्याला आता तिच्यात रस नाही उरलेला. एकेकाळी त्यांनी धुंद प्रणय अनुभवलेला असूनही. त्याचं सारं लक्ष जिंकलेलं जग वसवण्यात लागलेलं.
हाच प्रश्न विचारते अंबा भीष्माला. ती स्वत:चं क्रुद्ध तारुण्य घेउन उभी आणि तो मात्र कुरुकुलासाठी सगळ्या कोवळ्या भावना होमून मोकळा झालेला.

पुरुष आणि प्रकृती यांच्यातला हा सनातन वाद. पार वेदकाळापासून चालत आलेला.

आपल्यातला हा वाट्टेल त्या परिस्थितीत जगू पाहणारा लसलसता, फोफावणारा, संस्कृतीला जणू जन्म देणारा कोंब खरा? की संयमाचा-संस्काराचा, संस्कृतीला घडवणारा-आकार देणारा बांध खरा?

कदाचित दोन्हीही. कुणास ठाऊक...

तुला फार आवडणारा कर्ण. त्याचंही तसंच नव्हे का?
तसा कर्ण कुणालाही आवडतोच. कुठल्याही न्यायी, स्वाभिमानी माणसाला आवडावा असाच आहे तो. वाट्याला आलेलं सगळं मुकाट पचवून नशिबालाच मान खाली घालायला लावणारा. अबोलपणे सगळे सगळे मान-अपमान हसत जगून जाणारा.

पण मला कृष्ण जास्त जवळचा वाटत आला आहे नेहमीच.
त्याचं ते सगळं उधळून कुठल्याही गोष्टीत स्वत:ला अर्पून घेणं मोहवतं मला. उतू जाणार्‌य़ा दुधासारखं त्याचं व्यक्तिमत्त्व... अस्सल कलावंतासारखं स्वत:ला जगण्याच्या उल्हासात होमू पाहणारं.. उतू जाणार्‍या दुधासारखं... होमून टाकणारं... किती अर्थपूर्ण शब्द वापरले आहेत दुर्गाबाईंनी... तसाच आहे तो. गोकुळात यशोदेचा आणि राधेचा. मग रुक्मिणी-सत्यभामेचा. मग भीमार्जुनांचा. मग यादवांचा. एकातून दुसरं व्यक्तिमत्त्व जणू उमलत जातं त्याचं. बासरी, रथाचे बंध, तत्त्वज्ञान आणि धनुष्यही. सगळंच कसं उत्कट-संपूर्ण-भरभरून केलेलं. संयम विसरून.

याउलट कर्ण. परिस्थितीनं त्याला धगधगणारा संयमच शिकवला फक्त. सतत स्वत:मधल्या तेजाला आवर घालत जगण्याची मुलखावेगळी सक्ती. जणू सगळा ज्वालामुखी कोंडून धरलेला असावा छातीत असा कोंडून धरलेला अनावर आवेग.

दोन्ही जणू एकाच शक्तीची रूपं. एक उसळणारं. एक बांधलेलं.

हाच का तो बेसिक फरक? द्रविड आणि तेंडुलकरमधला? नसीर आणि अमिताभमधला?

तुझ्या आणि माझ्यामधला?

कोण महत्त्वाचं? कोण बरोबर? कोण खरं?

कदाचित दोन्हीही खरेच. कुणास ठाऊक...

आपण आपापले हट्ट हट्टानं लावून धरायला हवेत मात्र! शो मस्ट गो ऑन, यू नो!

Monday 3 December 2007

I'm just being foolishly absurd!

अशीही काही युद्धे खेळावी लागतात,
ज्यात निर्णायक पावलांनी आणि निर्विकार चेहर्‌यानं
पराभव एखाद्या डोंबासारखा उभा असतो
पुढच्याच टप्प्यावर.
आपण प्रॅक्टिकल शहाणपणा इत्यादी दाखवून
साळसूद माघार घ्यायची आहे की
पाठ फिरवण्याचा प्रॅक्टिकल निर्णय घेणार्‌या
आपल्याच सूर्याजी पिसाळांची मानवी मजबुरी क्षमाशीलपणे स्वीकारत,
बेमुर्वतपणे रक्तबंबाळ होत
पुढे घुसून ताठ मानेने मरायचे आहे
इतकाच वाव उरतो निवडीला.
युद्ध जिंकणे वा हरणे अशा वेळी अगदीच बिनमहत्त्वाचे झालेले.
डोळ्यांत उतरलेले गरम लालबुंद आवेगी रक्त
आणि डोक्यात उरलेले
'मागे फिरायचे नाही-' इतकेच तुटक वेडसर शब्द.
बाकी सगळे आपल्या जगातले नव्हेच.
अशा वेळी रक्तातला वेडसर मुरारबाजी जिंकतो
की रक्तातच दबा धरून बसलेल्या डार्विनच्या बिलंदर पेशी जिंकतात...
इतकेच पाहायचे खरे तर.
अशा वेळी काय करतात
ते खरे तर मला अजूनही उमगलेले नाही.
जीव वाचवून मुकाट खरीदावेत
शहाण्या रसिकासारखे
पिंजर्‌यातले लव्हबर्डस् इत्यादी
की झाला-न झालेसा
स्वप्नांचा राजवर्खी उदास स्पर्श जपावा
बोटांवरला?
प्रश्न मोठे भाग्याचे...
या असल्या प्रश्नांची उत्तरे देता येणे दूरच राहिले,
असले प्रश्न पाडून घेणेही आचरट आणि आत्मघातकी मानले जाते तुझ्या जगात.
माफ कर मित्रा...
I'm just being foolishly absurd!