Tuesday 2 October 2007

जे जे उत्तम...

नंदन, टॅग केल्याबद्दल मनापासून आभार.


’जे जे उत्तम...’मागची नंदनची भूमिका इतकी नेमक्या शब्दांत मांडलेली आहे, की ती तशीच्या तशीच इथे देते:

(पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.)


***


आपण रस्त्याने जाताना कुणी वळून तर पाहिले, पण नुसतेही पाहणार नव्हते, आणि अखेर आपल्या येण्याजाण्याने हवा तरी इकडची तिकडे हलते की नाही असेच वाटायला लागते. कुणाचे काही कारणाने लक्ष जावे असे आपल्यात काही नाही ही शंका जरी मधूनमधून आलेली असली तरी तारुण्यसुलभ आशेने तिच्याकडे दुर्लक्ष करायला पहिलेले असते; पण तो आशावाद किती मूर्ख आहे हे मनापासून आणि उपकार करायच्या हेतूने गळी उतरवण्यात आप्तेष्ट आणि मित्रमैत्रिणींना जेव्हा अपेक्षेबाहेर यश येते, तेव्हा (आपणच शोधून काढलीय जणू, अशी!) एक कल्पना काही काळ आधारभूत होते: आपल्या भल्या-बुर्‌या कसल्याही बाह्य रूपाच्या आत डोकावू शकणार्‌या कुणा विशेष संवेदनाक्षम आणि काकदृष्टीच्या अंतर्ज्ञानी व्यक्तीला आपल्या मनाचे आणि बुद्धीचे गुण दिसतील (जे आपल्यात आहेत असे सगळ्यांना वाटते) आणि ती आपल्याला जवळ करील. अर्थात ’ती’ व्यक्ती म्हणजे एक पुल्लिंगी माणूस, (आणि कल्पनाच करायची तर का नाही?) देखणा, हुशार, श्रीमंत इ. इ. अशी माफक अपेक्षा (मूर्खासारखी)! पण तिच्यातही राम नाही हे (खरे तर मूर्ख नसल्यामुळे) उमजते आणि मग उरते एक नैसर्गिक ऊर्मी: स्त्रीलिंगी मनुष्य म्हणून जी एक मर्दुमकी - म्हणजेच औरतकी - गाजवता येण्यासारखी आहे, ती बिनबोभाट गाजवावी. ह्या ऊर्मीमागेही आशाळभूत विश्वास असतो, की आपण निर्माण केलेल्या त्या माणसाला तरी (काही काळ) आई म्हणजे बिनतोड परिपूर्णता, असे वाटेल! पण त्यासाठी हरतर्‌हेच्या तडजोडी करूनही जेव्हा सगळी वासलात लागते तेव्हा आधीच माफक असलेला आत्मविश्वास संपूर्ण नष्ट होतो. खांदे पाडून, मान कासवासारखी आत घेऊन, शक्य तितक्या निरुपद्रवीपणे आयुष्य काटताना एकच मागणी उरलेली असते: इतका काळ जसा कुणाच्या नजरेस न पडता काढला तसा उरलेलाही काढून कुणाला तोशीस न पडता होत्याचे नव्हते होऊन जावे.


आयुष्याच्या अशा आखीव आणि ’सुरक्षित’ टप्प्यावर जेव्हा ध्यानीमनी नसता जाणवते, की ज्यांच्याबद्दल विचार करायचे कैक वर्षांपूर्वी सोडून दिले होते ती ’अंतर्ज्ञानी’ माणसे जगात आहेत, इतकेच नाही तर सरळ पुढ्यात उभी राहून विचारताहेत, की तुमच्या मनाची आणि बुद्धीचे जे गुण (ते आपल्या ठायी आहेत ही समजूतही तोपर्यंत सोडून दिलेली असते) आम्हांला दिसताहेत त्यांचे तुम्ही काय करताहात? तेव्हा मग चाकोरीत स्तब्ध उभे राहून स्वत:संबंधे पुनर्विचार करायचा येऊन पडतो.


हे कठीण, कारण आयुष्याची इतकी वर्षे आपण फुकट घालवली की काय, या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर द्यायची तयारी करायला लागते. बहुतांश लोकांनी ठरावीक मार्गाने वाटचाल करण्यात ज्यांचे भले असते अशांनी आखून दिलेल्या मार्गाने आपण आजवर का चालत आलो? आणि तेही त्याच्यात आपले फारसे भले दिसत नसताना? कुठलेही प्रश्न न विचारता पुढे जाणार्‌या आळशी अथवा अंध अथवा हतबल अथवा प्रवाहपतित जनांच्या ओघामागून आपण पावलामागे पाऊल का टाकत राहिलो? काही रूढ कौटुंबिक वा सामाजिक संकेतांत ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत त्यांची हुकूमशाही का सहन करत आलो? त्या नव्या ’अंतर्ज्ञानी’ मित्रांनी विचारलेल्या प्रश्नाचे प्रतिध्वनीच जणू, असे हे सारे प्रश्नही जेव्हा मनात अखंड आणि कर्कशपणे निनादू लागतात, उत्तरांसाठी हटून बसतात, तेव्हा आजवर मुकाट काटली त्याव्यतिरिक्त दुसरी वाट कुठे आहे का याचा शोध घेणेही भाग पडते.


- ’मुक्काम’, गौरी देशपांडे


***


मी या मंडळींना टॅग करतेय -




मॅड्‌झ

7 comments:

  1. मेघना, सुरेख उतारा निवडला आहेस. या खेळात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद :). आता इतर ब्लॉगर्स कुठले उतारे लिहिताहेत त्याची उत्सुकता लागली आहे.

    ReplyDelete
  2. अवघड खेळ सुरु केलास बाई..इतSSSSSSSSSकं काही आवडत असताना, एकच उतारा हा शुद्ध अन्याय आहे. दुसरं म्हणजे उतारा लिहायचा म्हणजे तो पुस्तक बघून बघून लिहीणं आलं (आळस! आणि पुस्तकाची उपलब्धता!! मला एमटी आयवा पण मिळत नाहीये references refresh करायला:()
    तिसरं म्हणजे timing! आत्ताच quarter end झाल्यानं ढिगानं reporting करायचय...

    पण मी लिहीन :) (यालाच आग असे म्हणतात!!)

    ReplyDelete
  3. एकच उतारा हा शुद्ध अन्याय आहे असं मलापण वाटलं. म्हणूनच तर काल अक्षरश: भोवताली पुस्तकांचा पसारा घालून बसले होते. ठरवताच येईना. पण अशी निवड आपली त्या त्या वेळची मन:स्थिती, आवड आणि आपल्या प्रायोरिटीज्‌ दाखवून जाते असं नाही वाटत? तीच तर गंमत...

    बाकी तुला ’आयवा मारू’पण मिळत नाहीय म्हणजे तुला खरंच ढिगानं काम असणार! लवकर ’आग’ पेटवा... :)

    ReplyDelete
  4. अर्थात तुला हे बरय सध्या. तू ज्या पद्धतीनं मिताक्षरी होते आहेस..you need a good tuen like this

    ReplyDelete
  5. utara aavaDala

    एकच उतारा हा शुद्ध अन्याय आहे असं मलापण वाटलं. म्हणूनच तर काल अक्षरश: भोवताली पुस्तकांचा पसारा घालून बसले होते. ठरवताच येईना. पण अशी निवड आपली त्या त्या वेळची मन:स्थिती, आवड आणि आपल्या प्रायोरिटीज्‌ दाखवून जाते असं नाही वाटत? तीच तर गंमत...

    haa vichar utaRyaapexa jaast aavaDala.

    ReplyDelete
  6. माझ्या - बरं आपल्या - गौरीचा उतारा दिल्याबद्दल तुलाही स्पेशल धन्यवाद, मेघना. तुझं लिखाणही खूप आवडलं. :)

    ReplyDelete
  7. अपघाताने आलो आणि आता इथे बराच वेळ आहे.
    बऱ्याच दिवसांनी तुला वाचायला मिळालं.
    बाहेर पडता आलं नाही,आणि एरव्ही नेहमीप्रमाणे
    स्वतःला अडवण्यात यशस्वी झालो नाही.
    लिहीत राहा.

    ReplyDelete