Friday 22 June 2007

कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...

’रंजिशी सही...’ डोक्यात घुमत असलेलं. कुठल्याही गाण्याबरोबर चालताना अर्ध्या वाटेवर डोकं वाटा चुकायला लागतं तसंच... कधी आपली ’महान’ एकाग्रता चकव्यात गुंतवते, तर कधी गाणंच पायवाट सोडून रानोमाळ भटकायला भाग पाडतं...तशातली गत झालेली. रुना लैलाचा शांत, ठाम घायाळ सूर पाझरतो आहे एका लयीत. त्याची एक नशाच चढल्यासारखं झालेलं...

’कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...’ इथे अडायला झालं.

भरम...?

खरी मी तिच्याही आधी ’तू भी तो कभी मुझको मनाने के लिए आ...’वर जाऊन तिची वाट पाहते नेहमी. पण ’मोहोब्बत का भरम रख...’? म्हणजे? पुढे जाताच येईना.

भरम...

इथे अपरिहार्यपणे मेघनाची आठवण झाली. किती वेगवेगळ्या प्रकारे या भ्रमांचं विश्व साकारलं आहे तिनं. भ्रमांचा आधार आयुष्याला जोडून ठेवणारा आणि त्यांना नाकारताना लागणारी प्रचंड अमानुष ताकद... लख्ख सत्य समोर दिसत असूनही ते नाकारून भ्रमांना कवटाळून बसण्यातली ’अठरावा उंट’मधल्या संजीवची अगतिकता... आणि ’टेलिंग दी ऍबसॉल्यूट ट्रुथ वॉज पार्ट ऑफ माय स्ट्रॅटेजी...’ म्हणून भीषण एकटेपणाला सामोरं जाणारी ’नातिचरामि’मधली मीरा...

भ्रमांच्या मोहक आधाराचं आणि फसवं आभासी सुख देण्याच्या क्षमतेचं किती नेमकं भान आहे तिला...

तशीच गौरीची कालिंदीही.

इतक्या साऱ्या तडजोडी करून जोडत तर काहीच नाही आपण...
तडजोडी मोडताना होणाऱ्या विध्वंसाचं काय?
आणि तडजोडी जगताना होणाऱ्या विध्वंसाचं?

हाही भ्रमांच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा निकराचा प्रयत्नच की...

’तुझ्या कैफात मी आता तुलाही लागलो विसरू,असे समजू नको तू की, तुला मी टाळतो आहे...’ असं म्हणतात सानेकर, तेव्हा हा ’मोहोब्बत का भरम’ असतो त्यांना खुणावणारा? असावा. नाहीतर ’तुझा आभास सोनेरी मला सांभाळतो आहे...’म्हणजे काय?

सरतेशेवटी हे सारे भ्रम?

नात्यांचे...कुणी आपल्यासाठी असण्याचे...कस्मे-वादें निभावण्याचे...प्राणांवर नभ धरण्याच्या आश्वासनांचे...स्वप्नांचे...

असूदेत. खोटे, अल्पजीवी, कधी ना कधी जमिनीवर आदळणारे.. असूदेत. तरीपण मला हवेत. समोरच्या माणसाला नेमकं काय आणि किती कळतं आहे त्याचे अंदाज बांधणंच हातात असतं फक्त...असं म्हणत चरफडत आले आहे मी नेहमीच. तरीही. भ्रमांची ताकद कळते आहे मला आता. मला नको आहे सत्य-बित्य इतक्यात. ते मीरालाच मिळू द्या. तूर्तास तरी आपल्याला नको. आपल्याला आपले भ्रम प्यारे आहेत..


कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिए आ....

क्या बात है!

कधी ना कधी ’येह आखरी शम्माही बुझाने के लिए आ...’वर पोचायचंच आहे...
तोवर ’पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...’ इतकंच खरं...