Wednesday 9 May 2007

रक्तात उतरली होती संध्याकाळ...

प्रेम वाटलं म्हणजे नक्की काय झालं? किंवा गौरी देशपांडेच कोट करायची सरळ तर आपण म्हणूया की ’पुरुषांना आणि स्त्रियांना एकमेकांना पाहून होणाऱ्या स्रावांना प्रेम-बिम म्हणण्याच्या भानगडीत न पडणंच चांगलं.’

पण तरी तुझ्याबद्दल मला किंवा माझ्याबद्दल त्याला ओढ वाटली किंवा काहीतरी हवंसं वाटलं म्हणजे काय झालं? या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात कुठून होत असते? की सुरुवात वगैरे असं काही नसतंच? नुसत्याच गोष्टी घडत जातात, असं?

म्हणजे उदाहरणार्थ तुझे गुलाबी रंगाचे ओठ आठवतात मला. तुझं किंचित चाचरत प्रचंड एक्साईट होऊन बोलणं किंवा एखादी गोष्ट फारशी मनात नसताना ’हॅ हॅ हॅ’ असं मोठ्यांदा कृत्रिम हसून ते गोष्ट उडवून लावणं किंवा तुझी काहीशी बुटकी शिडशिडीत एकरेषीय अंगलट...
हे सगळं फारच शारीर होतंय नाही? पण ’फार शारीर’ किंवा ’कमी शरीर’ असं कुठे काय असतं? मन-बिन म्हणजे तरी काय? या शरीरातल्या पेशींनी एकमुखानं केलेली मागणीच ना? ’शारीर’ या संकल्पनेला बिचकणं थांबवायला हवं. मग कदाचित या सगळ्यातून मला वाटणारा प्रचंड अपराधी भाव संपेल.

कठीण... वेल.... आहेच.

तो आणि मी बोलत असू खूप. फारच ना. सी. फडके पद्धतीत सांगायचं झालं तर तसे उपवर आणि उपवधूही असणारच आम्ही एकमेकांना. उदाहरणार्थ पुस्तकं आणि सिनेमे आणि अंगातला जास्त शहाणपणा आणि ओढून-ताणून आणलेला एकटेपणा आणि कदाचित इम्मॅच्युरिटीही. मला जमू शकणाऱ्या सगळ्या पद्धतीत संवादही साधायचा प्रयत्न केला मी त्याच्याशी. असं समजूनही पाहिलं, की ’येस, या मुलावर आपलं प्रेम आहे’. आणि खरं सांगू, त्या त्या वेळी मला वाटलंही ते खरं...

खरं असणं-नसणं शेवटी वाटण्यावरच अवलंबून असतं की काय? कुणास ठाऊक...

पण इट डिडण्ट वर्क आऊट. तसं तर सारं काही आलबेलच होतं. इथे बिनसलंय, असं काही कुणाला बोट ठेवून म्हणता आलं नसतं. पण ते तसं नाही हे मला कळत गेलं आणि एखाद्याला न समजणारी गोष्ट त्याला ’समजावून देणं’ अशक्य असतं हे माझं मतही दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत गेलं.

तसे स्पर्श वर्ज्य कधी नव्हतेच. म्हणजे थिऑरॉटिकली! कधी कधी हातात हात घेणं वा चारचौघांत वावरताना होणारे स्पर्श विनासंकोच चालवून घेणं हे चालेच. पण कधी स्पर्शाची भाषा वापरून पाहावीशी नाही वाटली मला त्याच्यासोबत. माझी नसलेली तयारी स्पष्टपणे नोंदल्यावर त्यानंही कधी निसटते म्हणूनही स्पर्श केले नाहीत हेही खरंच.
आणि तरीही एखाद्या नियत क्षणी त्याच्यासोबत असताना मला जाणवून गेलेलं माझं सगळं शरीर आठवतंच आहे मला...

पण आमच्या नात्यात हे सारं फारच मुकं राहिलं कायम. ज्या नात्यात त्या ओढीनंच होतात लहान-सहान तपशीलही जिवंत, त्यात आम्ही ते असं मुकाट मिटून टाकावं - हेच किती बोलकं आहे ना?

आणि मग मनात नकळत येत राहिलास तू. आता मागे वळून पाहताना वाटतं, हेही सहज घडलेलं की आपणच घडवून आणलेलं, सहजपणाच्या बनावाखाली? किती सहज-स्वच्छ संगती दिसते ना या साऱ्यांत? आपण कितीही नाकारायची, लपवायची म्हटली तरी ती असतेच आणि देनिस म्हणतो तशी ’कधी ना कधी रहस्याला वाचा फुटतेच...’

संदीपची ती कविता ठाऊक आहे का रे तुला -

मी जाता जाता तुला बोललो काही,
ते खरेच सारे असेल ऐसे नाही
रक्तात उतरली होती संध्याकाळ,
वदवून घेतले तिनेच काहीबाही...

म्हणजे ही रक्तातली संध्याकाळ फक्त? बाकी काही नाही?

मेघना पेठेसारखं नाट्यपूर्ण उत्कटपणे म्हणावंसं वाटतं आहे, ’या इलाही, येह माजरा क्या है...’

7 comments:

  1. Tu itak manapsun lihite aahes na ga, ki agadi tujhya vedna janavat rahatat.. keep writing! Tujhi style vegli aahe. Sheershak tar apratim ghetes tu!!

    ReplyDelete
  2. ye majara yun hai ki aap bhi hum subon ki tarah ik bar fus gai thi...there are no solutions....karan sandhyakal raktat utaratech na...sagalyanchyach.....ti ulateparyanta vaat pahana tevadhach hatat asata apalya. sarvanchyach...

    ReplyDelete
  3. संध्याकाळची वेळच अशी की नको नको त्या आठवणीना पुन्हा उजाळा देते। सौमित्र ने छान म्हटलय "दिस नकळत जाई, सांज रेंगाळून येई, क्षण एकही ही न त्याला तुझी आठवण येई" मनापासून लिहतेस। कीप इट up

    ReplyDelete
  4. स्नेहा, कोहम, प्रॅड्स -
    मनापासून थॅंक्स.
    शेवटी लिहिणं ही लिहिणाऱ्याची निखळ गरज हे तर खरंच. पण तरी कुणी वाचतं, समजून घेतं, दाद देतं - तेव्हा अप्रूप वाटल्यावाचून राहत नाही. थॅंक्स.

    ReplyDelete
  5. Ha lekh hi sundar aahe - frank aahe - vichar karayla bhaag paadnaara aaahe - keep it up!

    ReplyDelete
  6. सुरेख...खूप ओघवत्या शैलीत लिहितेस...मनातून थेट कागदावर वगैरे...छान....

    ReplyDelete
  7. होता है ऐसे भी कभीकभी
    लेकिन ये माजला क्या है वो आपने पहलेसे ही जान लिया है ये बहुत अच्छा हुवा

    ReplyDelete